मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विठाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ विठाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(चार दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती.) – इथून पुढे

” काय हे विठाई, लहान व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवणं शोभून दिसतं का?

“वैनीवाय, तुमी माका परत हाडलात, नायतर मी वर गेललंय यमाच्या राज्यात ‘

“अस बोलू नकोस विठाई, एकमेकांसाठी करावंच लागतं ‘ तू माझ्यासाठी एक कर, उद्या राधेला येताना घेऊन ये तिला मी शाळेत घालणार ‘

” होय वहिनी बाय तेवढा तर जरा करा, आमच्या सारख्या अडाणी रवाने नको तेका ‘.

मी राधेचं नाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. राधेला दोन फ्रॉक, पेटीकोट, पुस्तके, वही घेतली, राधा शिकू लागली.

आमच्या तिघांच्या सुखी आनंदी संसाराला दृष्ट लागायची वेळ होती. खूप दिवसापासून माझे पती पोटात दुखण्याची तक्रार सांगत होते. त्या काळात छोट्या गावात मोठे डॉक्टर नव्हते. आधुनिक सोयी नव्हत्या. डॉक्टर पोटदुखीच्या गोळ्या देत होते, त्या गोळ्या हे घेत होते. एक दिवस सकाळी हे उठले तो त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. मी घाबरले, मुलगा माझा लहान. मी त्याला डॉक्टर नाडकर्णी कडे पाठविले, डॉक्टर आले, त्यांनी यांची परिस्थिती बघून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचे ठरवले. सिव्हिल सर्जनी अंदाज घेऊन तातडीने ऑपरेशन करायचे ठरवले. त्यांच्या अंदाजाने आठ ते 10 रक्ताच्या बाटल्यांची गरज होती. छोट्या शहरांमध्ये रक्ताच्या बाटल्या मिळणे  अशक्य होते. फक्त ओळखीच्या माणसांकडून रक्तदान करून बाटल्या जमवणे एवढेच शक्य होत, माझ्या नवऱ्याचा रक्तगट क्वचित मिळणारा होता. मग त्या रक्तगटाची रक्त मिळवायला धडपड सुरू झाली. त्यांच्या बँकेतले सर्व कर्मचारी इकडे तिकडे धावत होते. कशीबशी दोन-तीन बाटल्यांची सोय झाली. अजूनही रक्ताची गरज होती. माझा रक्तगट पॉझिटिव्ह, तर यांचा निगेटिव्ह.

दोन दिवस चाललेली माझी धावपळ विठाई पाहत होती. एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलेली असताना ती दारात बसूनच राहिली. मी घरी आल्यावर ती मला विचारायला लागली  ” दादाक काय झाला?’

“त्यांना रक्ताची गरज आहे, योग्य रक्त मिळालं की मग ऑपरेशन करायचं आहे ‘

पन रक्त गावातला खय?

” असं मिळत नाही कुणाच्यातरी अंगातून रक्त काढावे लागत ‘

” मग माझ्या अंगातून रक्त काढा ना, नायतर तेचो काय उपयोग आसा माका, माजो दादा बरो होऊक हवंयो ‘

” पण रक्तगट जमावा लागतो ना,’

” मग जमून टाका, पन बघा हा मजा रक्त तुमका चालत तर, मी खालच्या जातीचा ‘

“नाही ग विठाई, जातीचा वगैरे काही प्रश्न नाही. पण रक्तगट जमायला पाहिजे ना ‘

माझ्या मनात आले बघावा प्रयत्न करून. मी तिला सिव्हिल मध्ये घेऊन गेले. तिचा रक्तगट तपासला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या नवऱ्याचाच रक्तगट तो होता. मी विठाईला म्हणाले ” तुझं रक्त तुझ्या दादांना चालेल, तुझं रक्त थोडं घेतलं तर चालेल का?

ह्या काय इचारतास वैनीवाय, माजो जीव व्हयो तरी मी देन दादासाठी ‘

मी आवेगाने तिचा हात पकडला, “नको ग विठाई, तुझा जीव नको फक्त थोडा रक्त हवं ‘.

डॉक्टरनी तिच्या शरीरातून तीन चार बाटल्या काढल्या आणि त्या माझ्या नवऱ्याला चढवल्या. आपल्या शरीरातून रक्त काढत असताना विठाई मोठ्या कौतुकाने बघत होती. आणि त्या बाटल्या आपल्या दादासाठी म्हणून तिला मोठा आनंद झाला.

राधे शाळेत जात होती, आपल्या आजीकडे पण लक्ष देत होती. विठाईचेरस्ता झाडणे सुरु होते.

माझ्या नवऱ्याची मग कोल्हापूरला बदली झाली. मी तिला आम्ही आता कोल्हापुरात जाणार असे सांगितले.

“जावा वैनीवाय, नातवाचो मोठो अभ्यास असतलो, भायर गेल्या शिवाय दादा मोठो होऊचो नाय ‘ डोळे पुसत विठाई बोलत होती.

आम्ही जाणार त्या दिवशी विठाई पहाटेपासून हजर होती, आमच्या ट्रक चा रस्ता परत परत झाडत होती कोणी विचारले तर म्हणत होती “माजी वैनीवाय, दादा आणि नातू या रस्त्याने जातले, तेंच्या साठी झाडून ठेवताय’. शेवटी आम्ही निघालोच, रस्त्याच्या पलीकडे विठाई पदराने डोळे पुसत उभी होती, राधे उभी  होती. मी तिच्याकडे गेले आणि तिला मिठीच मारली, ” विठाई, तुला विसरण शक्य नाही, मी परत येईन तेव्हा तुला आमच्याकडे घेऊन जाईल ‘ आमचा ट्रक सुटला, लांब लांब हात हलवणारी विठाई लहान लहान होत गेली.

आम्ही कोल्हापुरात आलो, रवीचं कॉलेज सुरू झालं, यांना बँकेत प्रमोशन मिळालं, आता जास्त जबाबदारी आल्या. मी विठाईला परत येईल म्हटलं तरी मला ते शक्य झालं नाही. पण आता राधे पत्र लिहीत होती. मी पण तिला कार्ड लिहून विठाईची चवकशी करत होते.

राधे एसएससी झाली आणि तिने डीएड ला ऍडमिशन घेतल्याचे कळले, परत विठाई एकटी झाली, दिवस भराभर जात होते, आमचा रवी ग्रॅज्युएट होऊन इन्शुरन्स कंपनीत नोकरीला लागला. त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी त्याने लग्न ठरवलं.

आमची लग्नाची घाई सुरू झाली, या लग्नाला मात्र  विठाईला आणायचेच असे मी मनोमन ठरबिले. पत्रिका छापून झाल्या, मी यांना म्हटले एकदा जाऊन विठाई ला घेऊन या.

हे गाडी घेऊन मुद्दाम विठाई ला आणायला गेले, एक रात्र आपल्या मित्राकडे राहून दुसऱ्या दिवशी परत आले. मी विठाईची वाट बघत होते . पण हे एकटेच आले. मी विठाईची चौकशी केली तेंव्हा हें म्हणाले “ती फार आजारी आहें, अंथरुणाला खिळून आहें, राधी अधून मधून येते, पण तिचे शेवटचे दिवस राहिलेत. तशाही अवस्थेत तिने मला ओळखले आणि हें माझ्या हातावर ठेवले ” माझ्या नातवा साठी ‘अस म्हणून रडू लागली, मी त्या वस्तूकडे पाहिले, ते चांदीचे निरंजन होते, हें तिला कोणी दिले, हें मला कळेना. 

मी ठरवले, लग्न झाले की जाऊन यायचे, शेवटचं डोळे भरून विठाई ला पाहयचे.

लग्न झाले, पाठोपाठ सत्यनारायण झाला, मग रवी आणि कविता पांचगणीला गेले, ते शनिवारी येणार होते, मी यांना सांगितलं होत, रवी आला म्हणजे आपण त्याला आणि कविताला घेऊन विठाई ला नमस्कार करून येऊया.

शनिवारी राधेचे कार्ड आले, विठाई गेली, नातवंच्या लग्नाची तारीख विचारत होती, लग्न झाले असणार ते तिला कळले आणि दुसऱ्या दिवशी ती गेली.

आमच्या संस्थान च्या राजाने लग्नाच्या पंचवीस वर्षे झाली म्हणून सर्व आंबेडकर नगर मध्ये चांदीचा रुपया वाटलं होता, विठाईने मला पाठवून त्याचे निरंजन करुंन ठेवले, नातवंच्या ( रवी ) च्या लग्नासाठी. तेंच निरंजन दादा आले तेंव्हा तिने रवी साठी पाठविले ‘

माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलंय होत्या, शेवटी माझी विठाई मला भेटली नाहीच, मी माझ्या संसारात एवढी मग्न झाले की माझ्या नवऱ्यला रक्त देणाऱ्या विठाईला विसरले.

खूप दिवसांनी मी सावरले. आता रोज संध्याकाळी ते चांदीचे निरंजन मी देवाकडे लावते, तेव्हा विठाई मला भेटल्याचे समाधान मिळते 

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विठाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ विठाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

कोकणातला धुवाधार पाऊस, मी जेवण करण्याच्या गडबडीत होते, मुलगा रवी सकाळी सातलाच शाळेत गेलेला, हे बँकेसाठी साडेनऊला निघत, जाताना यांना डबा द्यायला लागे. माझे दोन्ही स्टो पेटत होते. एका स्टो वर भाजी शिजत होती, दुसऱ्यावर तवा ठेवून मी चपाती लाटून भाजत होते. एवढ्यात यांचा बाहेरून आवाज आला  ” अगं ये ये, आत ये ‘. मी बाहेरचा कानोसा घेतला. यांनी दरवाजा उघडला होता आणि कुणाला तरी आत बोलवत होते. मग माझ्याकडे वळून म्हणाले  ” हिच्यासाठी चहा टाक थोडा ‘. माझी जेवणाची घाई, त्यात यांचे म्हणणे चहा टाक  ” आत्ता मी चहा टाकणार नाही माझी जेवणाची घाई चालली आहे ‘.

” अग ती पावसात पूर्ण भिजली आहे कुडकुडते बिचारी ‘.

” कोण असं म्हणत मी बाहेर आले. पाहते तर एक झाडू घेतलेली म्हातारी बाई बाहेर कुडकुडत होती. त्या कुडकुडणाऱ्या बाईला पाहून मला पण तिची दया आली.

” भिजलीस ग बाई तू, ये आत ये, चहा टाकते तुझ्यासाठी ‘ म्हणून मी स्वयंपाक घरात आले आणि चहाचे आधन ठेवले. चहा तयार केला आणि बरोबर एक कप बशी घेऊन मी बाहेर आले. चहा कपात ओतला आणि तिला द्यायला गेले.

” वहिनीनू, दुसरो फुटको कप देवा, तुमच्या कपातून माका देव नको, मी खालच्या जातीचा गे माय,’

मी म्हंटल ” अगं असं आम्ही काही मानत नाही, वरची जात खालची जात असं काही नसतं. घे तू चहा ‘

” नको वैनीबाय, तुमच्या शेरात चलता आसात, आमच्या गावांनी असला चालचा नाय, तू आपलो फुटको कप हाड बघू ‘

” आता तुझ्यासाठी फुटका कप कुठून आणू? 

हे म्हणेपर्यंत ती कुठून तरी एक करवंटी घेऊन आली.

“ह्याच्यात घाला चाय ‘ती म्हणाली. मी तिच्या कपात चहा ओतला आणि बरोबर दोन बटर खायला दिले.

” एवढ्या पावसात इकडे काय करतेस ग, भिजली आहे संपूर्ण ‘

मी म्हणाले.

“रस्ते, पानांदी झाडायचं काम माझा, गेली वीस वरसा करतय, तेंच माका थोडे पैसे गावातत ‘.

” बरं बरं, आत्ता माझी घाई आहे, उद्या ये अशीच चहा घ्यायला ‘. असं म्हणून मी घरात गेले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता झाडायचा आवाज आला, मी अंदाजाने ओळखले आता ती कालची बाई परत येणार, मी स्टो वर चहा ठेवला, आमच्याकडे फुटक्या कानाचा कप नव्हता, आणि ती आमच्या कपातून चहा घेणार नव्हती, म्हणून मी एक चांगल्या कपाचा कान फोडला आणि तसा कप तयार ठेवला.

दारावर टकटक झाली तसे मी दार उघडले. काल ओळख झालेलीच होती. मुलगा रवी सकाळी शाळेत गेला होता. नवरा बँकेत गेला होता, आता मी गप्पा मारायला मोकळी होते.

मी फुटक्या कानाच्या कपातून गरम गरम चहा ओतला आणि अर्धी भाकरी सोबत दिला. तिने पटपट चहा प्यायला  आणि भाकरी पदराला बांधून घेतली.

” भाकरी बांधून घेतलीस कुणासाठी ग?

“माजी नात आसा पाच वर्षाचा, तेका ‘.” घरी कोण कोण असतं ग तुझ्या?

“माझो झील आणि नात ‘

“आणि सून ‘

सून मेली गेल्या साली, झिलाचो काय उपेग नाय, ढोल वाजवता देवळात पन आखों दिवस दारू, दारू पिऊन माका आणि नातीक मारता ‘.

” अरेरे, काय नाव नातीचं? मी विचारलं.

” राधे, असा पाच सहा वर्षाचा .

” आणि तुझं नाव काय ग मी विचारायलाच विसरले ‘

“माका इठा म्हणटत ‘

हा म्हणजे विठा असणार ‘ मी म्हणाले

” तुझ्या नातीला घेऊन ये एकदा, विठाई ‘.

“काय झ्याक हाक मारल्यात माका, विठाई. अशी हाक कोणीच मारुक नाय ‘

आणि विठाई रोज येऊ लागली, रस्ता झाडता झाडता आमच्या पानंदीत आली की माझा नवरा मला सांगायचा “तुझी विठाई येतेय, चहा तयार ठेव ‘.

एकदा मी घरात शेंगदाणे भाजत होते, तेव्हाच विठाई चहासाठी आली होती. मी तिला चहा आणि बटर घेऊन गेले.  तर म्हणाली” वैनी बाय, वास बरो येता, काय भाजतंस? माका थोडे दी गे खाऊक ‘

मी तिला भाजलेले शेंगदाणे दिले, तिने ते पदराच्या शेवटला बांधून घेतले.

“वैनीवाय, आता रस्तो झाडताना एक एक दानो तोंडात टाकीन ‘.विठाई मला म्हणायची वैनी बाय, माझ्या नवऱ्यला दादा आणि माझ्या मुलाला नातू किंवा नातवा.

काजूचा मोसम सुरू झाला की विठाई माझ्या मुलासाठी ओले काजूगर आणायची, ते काजूगरसोलताना   तिचे हात कुजून जायचे. मी तिला म्हणायचे ” विठाई, काजू सोलून तुझे हात कुजून गेले, तू असे सोडू नकोस त्याऐवजी मी सुरीने ते कापते,’

विठाई म्हणायची ” वैनी बाय, काजूची फका सूर्यन कापूची नसतत, ती हातानं चिरुची असतांत ‘

रोज घरी येणारी विठाई दोन दिवस आली नाही, रस्ता झाडायला तिच्या ऐवजी एक दुसरीच बाई दिसली, तिच्याकडे मी विठाईची चौकशी केली. ती म्हणाली विठाईला ताप येतोय, घरी झोपून आहें.’

हे बँकेत निघताच मी भर उन्हात आंबेडकर नगरच्या दिशेने चालू लागले. अंदाजे दोन किलोमीटर चालल्या नंतर आंबेडकर नगर लागले. मी विठाईची चौकशी केली आणि तिच्या झोपडीत पोहोचले. तिच्या बाजूला तिची नात बसून होती. मी राधेला विचारलं  ” केव्हापासून येतोय ग ताप?

” चार दिवस झाले बाई, थंडी वाजून ताप येतोय, दोन दिवस अंगावर काढले, कालपासून अगदी जमीना तेव्हा झोपली आहे ‘

मी विठाईच्या अंगाला हात लावून पाहिले, शरीर तापले होते. मी राधेला बरोबर घेतले आणि तिथून जवळच असणारे आमचे ओळखीचे डॉक्टर नाडकर्णी यांच्या दवाखान्यात गेले. डॉक्टर ना विनंती केली की तुम्ही आंबेडकर नगर मध्ये येऊन विठाईला तपासावे. डॉक्टर माझ्या नवऱ्याचे मित्रच. मी दवाखान्यात गेले म्हटल्यावर ते त्वरित माझ्याबरोबर आले. त्यानी विठाईला तपासले आणि मलेरियाचा संशय व्यक्त केला. आपल्या जवळील थोडी औषधे दिली दुकानातून आणायला लिहून दिली. मी राधेला घेऊन तळ्यापलीकडे असलेल्या औषध दुकानात चालत चालत गेले. तेथे ती औषधे विकत घेतली आणि परत आंबेडकर नगर मध्ये आले. राधेला औषधे कशी द्यायची हे व्यवस्थित समजावले. डॉक्टर नाडकर्णी रोज येऊन एक इंजेक्शन देणार होते.

चार दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‼ सर सुखाची ‼ ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ ‼ सर सुखाची ‼ ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

झोपलेल्या छोटूचा पापा घेत ती वळत त्याला म्हणाली, “फार समजायला लागलं आहे ह्याला, आता मला म्हणतो, इतरांसारखे मला आजी आजोबा का नाहीत दोन्ही कडचे? तिच्या वाक्याने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. “अहो मी काय म्हणते?” तो लाडीकपणे डोळे पुसत तिला म्हणाला, काय म्हणता राणी सरकार? लग्न झालं तसं तो प्रेमाने तिला राणी सरकारच म्हणायचा. 

“माझ्या हृदयावर राज्य करणारी तू आणि माझं आयुष्य विविध भावनांचे पैलू हळुवार हाताळून योग्य रंग भरणारी राणीच आहेस तू म्हणुन हि हाक. त्याच्या त्या वाक्याने हसत ती त्याचा हातात हात घेत म्हणाली, आज कायरा कडे हळदी कुंकू होतं तर गेले होते कायराच्या सासुबाई आणि त्यांच्या मावस चुलत बहिणी पण आलेल्या होत्या, कुणी सवाष्ण तर कोणी विधवा देखिल. पण सगळ्या अगदी प्रेमळ होत्या. 

कायराने सगळ्यांना ओळख करून दिली आणि तिच्या सासूबाईंनी तर भरभरून कौतुक केलं माझं. पण सहजच निघालं त्यांच्या तोंडुन, माहेर नाही बिचारीला आपल्या सारखीच पोरकी आहे. मला त्यांनी पोरकी म्हणण्यापेक्षा आपल्या सारखी ह्या शब्दाच दुःख झालं, कारण मी तर अगदी बालपणीच पोरकी झाले, त्यामुळे माझ्या ह्या पोरके पणाची तयारी फार लवकर झाली रे. त्यामुळे माहेरचे जे क्षण वाट्यालाच आले नाही ते गमावल्याचं दुःख असलं तर ते मिस होतात. ह्याचं फार काही वाटत नाही पण त्या सगळ्या बहिणी मात्र नंतर किती वेळ माहेरच्या वेगवेगळ्या आठवणी सांगत होत्या. आज म्हातारपण आलं तरी माहेर हरवल्याच दुःख होतच कुठे तरी. प्रत्येकीचा आठवणींचा साठा अप्रतिम आहे.” त्याने बरीच वर्षे अनाथ आश्रमात राहिलेल्या आपल्या बायकोचा हात थोपटला म्हणाला, मग काय म्हणायचं आहे तुला? ती म्हणाली, नाहीतरी तू मला म्हणतोस रिकामी राहू नको. पैश्या साठी नाही किमान स्वतःच्या आनंदासाठी काहितरी कर, मग मला मार्ग सापडला. बस तुझी साथ पाहिजे.

“अग काय कल्पना आहे ते तर सांग.” ती उठुन केस विंचरत आरश्या समोर बसली. मला वाटतंय आपल्या खालच्या हॉल मध्ये आपण हरवलेलं माहेर हा पाच दिवसांचा इव्हेंट सुरू करावा. बऱ्याचश्या बायकांचे माहेर हरवले आहेत रे. कुणाचे वयोमानाने हरवले तर कुणाचे प्रॉपर्टीमुळे दुरावलेले. कुणाचे खुप दूरआहेत की जाणं शक्य नाही. कुणाचे वादातून, मनामनातून हरवलेले. मला वाटतं त्यांना जूनं आठवणीतलं माहेर जगता यावं ह्या कालच्या ग्रुपचा हा प्रयोग जमला तर अशी हरवलेल्या माहेरची निवासी शिबीर घ्यायची. त्यांच्या माहेर कडचे ते पदार्थ, तसं वातवरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू.

तो आता तिच्या मागे येऊन उभा राहिला. आरश्यात तिला बघत म्हणाला, ग्रेट आयडिया आहे, करून बघू. मलाही मदत सांग. पैश्याची तर करणारच. पण कष्टाची असेल तर ती हि, कारण आई गेली तेव्हा कळतं वय होतं माझं. आई नेहमी माहेरी जाताना खुप आनंदी असायची. बघू यात बायकांचे माहेरपण उपभोगलेले चेहरे हाच आपला नफा असेल. ती उठून त्याच्याकडे वळाली. त्याचा हात पोटावर घेत म्हणाली, “हो, आणि येणार हे बाळ. जर मुलगी असेल तर तिचं माहेरपण करण्याचा आपल्या छोटुवर संस्कार असेल. छोटू निवांत झोपला होता.” हळुहळु कल्पना सगळ्यांपर्यंत पोहचून माहेरी येण्याचा तो दिवस उगवला. सकाळपासुन नाव नोंदवलेल्या माहेरवाशिनींना फोन सुरू झाले. चला येताय ना माहेरच्या अंगणात. चिवचिव करणाऱ्या चिमण्यांची अंगण वाट बघतंय. तसा लगबगीने पलीकडुन उत्साही आवाज, “हो हो निघेतोच आहे.”

जुनी पितळी भांडी, शेणाचे सारवण, देवघर त्यात. हसरी रुख्मिणी. तुळशी वृन्दावन. झोपाळा, बाजा अश्या अनेक जुन्या वस्तूंनी वास्तू सजली होती. माहेरवाशिणी लवकर घरी याव्या म्हणुन फुलपात्र दारात पालथे घातले होते. ती डोळ्यात प्रेमाचा ओलावा आणि हातात भाकर तुकडा घेऊन उभी राहिली. एक एक करत माहेरवाशिणी माहेरात यायला लागल्या. सगळं वातावरण बघून भारावल्या. चहापाणी झालं. गप्पांचे फड रंगले. जेवणाची आयती ताटं हातात आली. लोळणं झालं. तिन्ही सांजेला दिवा लागला. परत गप्पा खिचडी लोणच्याचा बेत झाला. त्याच हॉलमध्ये कोणी कोणाची आई, बहिण, मैत्रीण झालं. हरवलेलं खुप काही सापडल्या सारखं वाटलं. अंगणातल्या ओसरीवर रात्रभर चालणाऱ्या गप्पा रंगल्या. पहाटेची भूपाळी. छोट्याश्या रुख्मिणीला आरती झाली. माहेरवशींनीना तेल मसाज, नाहू माखू घालणं झालं. सेवेत ठेवलेल्या काम करणाऱ्या बायका पण ह्या नव्या संकल्पनेला उभारी देत  होत्या.

कालपेक्षा आज माहेरवाशिणी आनंदी, उत्साही दिसत होत्या. दुपारी जेवणानंतर शिबिरात आठवणी नावाचं चर्चासत्र भरलं. माहेरच्या आठवणींनी सगळ्यांचे कंठ दाटून येत होते. वेगवेगळ्या वयोगटाच्या ह्या बायका माहेर ह्या विषयावर अगदी भरभरून बोलत, रडत, हसत होत्या. शेवटी उठलेल्या ८० वर्षाच्या आजीने तर सगळ्यांनाच रडवलं. आजी म्हणाली, “आज नाती माहेरपणाला येतात तेव्हाही माझा जीव त्या घरात येई पर्यंत टांगणीला लागतो. माझ्यासाठी माझी आजी अशीच वाट बघायची.

आता मी माझ्या नातीची वाट बघते. बायकांनो माहेर आयुष्यातलं असं ठिकाण जे थंडगार सावली देतं. ती काही काळच असली तरी त्या सावलीची आठवण आयुष्यभर मनात गार झुळूक निर्माण करणारी असते. बऱ्याच वेळा परिस्थतीने ती सावली हरवते. मग आपण एकटे पडतो, रुक्ष व्हायला लागतो. पण आपल्यातला ओलावा जपण्याचं ती सावली, आयुष्यात परत देण्याचं काम ह्या शिबिराने केलंय. मला वाटतं ह्या शिबिराला नावच द्यावं ‘सर सुखाची’. हि माहेरपणाची हरवलेली सर ह्या शिबिरामुळे परत मायेने अंगावर पडली आणि त्या शिडकाव्याने हि हरवलेली माहेरवाशीण ओल्या मातीच्या सुगंधा सारखी मोहरून गेलीये. तिला असंच आनंदाने बहरू दिल्या बद्दल संयोजकांचे आभार. आजीने थरथरते हात जोडले आणि पदराने डोळे टिपले, तेव्हा सगळा हॉल रडत होता. तिने पटकन वाकून आजीला नमस्कार केला. “हे शिबीर असंच आनंद वाटण्यासाठी भरभरून चालत राहो हा आशीर्वाद द्या आजी.” आजी म्हणाली, “तुलाही माहेर नाही असं कळलं. आता जरा माझ्याकडे ये दोन दिवस माहेरपणाला.” आजी सोबत बऱ्याच जणींनी तिला माहेरपणाला बोलवलं. एक माहेर घडवताना तिने स्वतःच्या लेकरांसाठी अनेक आजोळ उभे केले. 

शिबिराच्या शेवटच्या दिवशी हॉलच्या भिंती रुक्मिणीचा चेहरा, गाभाऱ्यातली समई, सगळंच उदास झालं. अंगण ओकंबोकं वाटायला लागलं. सगळ्या माहेरवाशिणी आपल्या माहेरचा खाऊ, छोटयाशा डबीत लोणचं, थोडे पापड, खरोड्या, मेतकूट आणि ब्लाउजपीस ओटी, लाडूविडा घेऊन जड अंतःकरणाने निघाल्या. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची सर प्रत्येक जण पुसत होतं. आजी मात्र परत म्हणाल्या, “हि सर सुखाची, स्वप्नातल्या माहेरपणाची.” ती म्हणाली सगळ्यांना, “वर्षातून एकदा यायचं आहे माहेरी. अंगावर घ्यायच्या आहेत माहेरपणाच्या सरी.” सगळ्यांनी टाळ्यांनी आनंद व्यक्त केला आणि हळूहळू अंगण सुनं झालं. त्याने येऊन तिची पाठ थोपटली. एक माहेर जोडताना अनेक माहेर जोडले. माणसं जोडायला जमलं, आणखी काय पाहीजे आपल्याला संसारात. चला आपल्या सासर वजा माहेरच्या अंगणात.. हसत दोघांनी रिकाम्या हॉलचे दार ओढून घेतले. तेव्हा गाभाऱ्यातल्या रुख्मिणीने डोळे पुसले आणि पुटपुटली, “गेल्या बिचाऱ्या माहेरवाशिणी. येत राहू दे नेहमी अश्याच.” लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, बहिणाबाईंनी लिहिलंय ते अगदी खरं. 

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ मोलकरीण… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे  

(हे सगळे भयानक होते. संताप आणणारे होते. परंतू कोणाला काही करता येत नव्हते.) – इथून पुढे 

हळूहळू निर्मलालाही या गोष्टीची सवय होऊ लागली. तिला पैसाही चांगला मिळायला लागला. घरखर्चही आपोआप चालायला लागला. मग तिच्या राहणीमानही लागलीच बदलायला लागले…

कामावर येताना ती नेहमीसारखी साडी नेसून साधेपणाने यायची परंतू संध्याकाळी बाहेर ड्रेस वर फिरायची. एक-दोन वेळा तिला मी रस्त्यांना ड्रेसवर पाहिले व तिच्यातला बदल माझ्या लक्षात आला. काही गोष्टीही कानावर आल्या. मग मी ताबडतोब आईला तिला कामावरून काढण्याबद्दल सांगितले. आई सुद्धा तातडीने तिला कामावरून काढण्याचा निर्णय घेणार होती परंतू त्यापूर्वीच तिने सगळी कामे अचानक बंद केली आणि नको त्या घाणेरड्या कामात स्वतःला झोकून दिले…! ज्यातून ती कधीच बाहेर पडणार नव्हती ! तिचे काय होणार हे कदाचित तिलाही माहीत नसाव. किंवा सर्वकाही कळत असूनही तिने ते पत्करले असावे. 

निर्मलाच्या बाबतीत जे काही घडले ते भयानक होते मन त्याचा कधी स्वीकार करीत नव्हतं. नुसतं आठवलं तरी काळजाला घरे पडत होती! 

पण म्हणतात ना जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं तसेच झाले होते. निर्मलाच्या जाण्यामुळे सुरेखाची आमच्या घरी काम करण्याची इच्छा पूर्ण झाली होती.  सुरेखा सुद्धा एका गरीब साधारण तीशीतली होती. तिचा नवरा व संपूर्ण कुटुंब तिच्या सोबत होते. नवरा भाजीपाल्याची गाडी सांभाळायचा तर सुरेखा सकाळी चार घरची धुणं -भांडी करायची व संध्याकाळच्या वेळी भाजीची गाडी चालवून नवऱ्याला दारू प्यायला मोकळीक द्यायची…

आमची भाजीला जाण्यामुळेच तर तिच्याशी ओळख झाली होती.

आईच्या ती खूप मागे लागायची मला कामावर घ्या म्हणून एकासारखी विनवणी करायची परंतु आमच्या घरी निर्मला आधीच काम करत होती. निर्मला गेली की मला कामावर घ्या असेही तिने आईला अनेकदा सुचवले होते.

सुरेखा दिसायला निर्मला पेक्षाही सुंदर होती. रंगाने गोरी होती.  संसार चालवण्याची तिची धडपड व कसरत पाहून आम्हाला पण तिच्याविषयी आदर वाटायचा. तिला माणुसकी पण खूप होती. गिर्हाईकांना भाजी उदारपादार द्यायची. मिळेल तेवढ्यात समाधानी असायची.सचोटीने काम करायची.नवरा त्यातलं अर्ध पिण्यात घालवायचा पण तरी ती आनंदी असायची अन तिच्या दोन लेकरांनाही आनंदी ठेवायची.तिच्या अंगावर पातळ अगदी साधंसुधं असायचं परंतू चांगलं धुतलेलं नीटनेटकं असायचं. शिवाय तिचे विचारही चांगले असायचे. आमच्याशी थोड्या थोडक्या वेळात छान गप्पा मारायची.

बहुतेक वेळा आम्ही तिघे आई व आम्ही दोघे किंवा आई मी किंवा मी सौ.वंदना असे आम्ही दोघे भाजीपाला घ्यायला सुरेखाच्या गाडीवर संध्याकाळच्या वेळी हमखास असायचो. आमच्याशी ती खूप चांगलं बोलायची. तिच्या दृष्टीने आमची फॅमिली म्हणजे एक आदर्श कुटुंब होते.

ते दोघे पती-पत्नी आमची खूप स्तुती करायचे. आमच्या पाठीमागे इतरांच्या तोंडावर सुद्धा आमच्या बद्दल चांगले बोलायचे. मात्र अधनं मधनं  ती, “मला तुमच्या घरी काम करायचे आहे.” असं म्हणायला विसरायची नाही. “मला तुमचं काम मिळालं तर जन्मात सोडायची नाही.”असंही वारंवार म्हणायची.

आईचं आणि तिचं मायलेकी सारखं घट्ट नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चाललं होतं. आम्हीपण तिच्या बोलण्यामुळे तिच्या गरिबीमुळे सहानुभूतीमुळे कधी दोन गोष्टी महाग लागल्या तरी तिच्याकडून घ्यायचो. हे सगळं एकंदर असं असताना सुरेखाने आमचं काम दुसऱ्या दिवशी कसं सोडलं याचा विचार मी करू लागलो कारण की ती तसं करणं शक्य नव्हतं. तिला आमचे संबंध आणखी घट्ट करण्याची एक चांगली संधी मिळाली होती.

आपल्या मुलांनी सुद्धा शिकून माझ्यासारखं व्हावं अशी तिची व तिच्या नवऱ्याची इच्छा होती. तिचा नवरा मला सारखं शिक्षणाबाबत विचारायचा.

मुलांना पुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा असं म्हणायचा.मी सुद्धा त्याच्याशी त्याबाबतीत वेळ मिळेल तेव्हा अगदी मनमोकळेपणाने बोलायचो आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा करायचो. 

पुढचे आणखी दोन दिवस असेच वाट पाहण्यात गेल्यावर आईने मग सुरेखाशी संवाद साधला पण तिने जी कारणं दिली त्याने आईचे काही समाधान झाले नाही.

घरचा व्याप खूप वाढला आहे.भाजीच्या धंद्याला जास्ती वेळ देता येत नाही. धुणं-भांडीची काम आता कमी करायची आहेत.

काम करून आता कंबर दुखते. साबणाने हाताला एलर्जी होते. आधीच्या लोकांनी थोडी जादा पगार देऊन कामं वाढवलेत अशी तिची गुळगुळीत उत्तरे आम्हाला पटत नव्हती म्हणून आम्ही अस्वस्थ होतो.

एवढी सलगी राखणारी सुरेखा जेव्हा आमच्या घरचं काम मिळालं तेव्हा अक्षरशः नाचायची बाकी होती! फक्त लगेच माशी कुठे शिंकली तेच कळेना?

सरते शेवटी मी आमच्या शेजारी आमचे कुणी दुश्मन वगैरे आहे काय? ते पाहू लागलो. आमचे कॉर्टरमधले शेजारी  सगळेच चांगले मित्र आणि आमचे स्टाफ वालेच होते. बहुतेकांच्या बायका घरीच त्यामुळे त्यांना मोलकराणीची वगैरे मुळीच गरज नव्हती त्यामुळे सुरेखाला  जास्त पैसे देऊन फितवून काम करून घेण्याचा प्रश्नच नव्हता. 

मग हे सगळे घडलेच कसे?सुरेखाने आमचे काम एका दिवसात सोडलेच कसे?हा एकच आम्हाला एकसारखा सातावत होता. 

न राहून एके दिवशी मी दुसऱ्या एका भाजीवाल्या मावशी आशाबाई यांच्याशी बोलताना सुरेखाचा विषय मुद्दामच काढला. त्यावेळी त्या पटकन म्हणाल्या, “अहो सर, ती तुमच्या घरी काम तरी कशी?

मी म्हटले,” अहो तीच तर आमच्या मागे लागली होती,मला तुमच्या घरी कामाला ठेवा म्हणून…” 

 “अहो सर, पण तेव्हा  तिला तुमची जात माहित नव्हती ना !!!” ” म्हणजे? “

” अहो सर, तुमचं राहणीमान व आडनाव बघून तिला तुम्ही त्यांच्यातलेच आहात असं वाटलं पण जेव्हा  ती तुमच्या घरी आली आणि … 

” आणि काय मावशी? “

पहिल्याच दिवशी काम केल्यावर ती तुमच्या घरात घरभर फिरली तवा तुमच्या घरातले फोटो तिनं बघितले अन मग तिला तुमची जात कळली…!  हो आणि म्हणूनच तीनं तुमचं काम लगेचच सोडलं…  पण एक करा सायेब माझं नाव तिला सांगू नका नाहीतर ती मला जित्ती ठेवायची न्हाय. “आशाबाईंच्या या उत्तराने मी निरुत्तर झालो!  माणुसकीच्या आड लपलेला जातीयवाद आणि जात एवढी कृतघ्न असू शकते? याचा विचार करितच मी घरी पोहोचलो. त्यावेळी पैसे देऊन घेतलेला भाजीपाला असलेली थैली त्या गडबडीत आशाबाईकडेच विसरली होती…

– समाप्त –

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोलकरीण… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ मोलकरीण… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

दुपारचे दोन वाजून गेले होते.रोजच्यापेक्षा जेवणासाठी मला घरी जायला मला त्यादिवशी बराच उशीर झाला होता. मी त्यावेळी संस्थेच्या कॉर्टर्समध्ये राहायला होतो. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर शेवटची होती.गाडी पार्किंगमध्ये लावून मी पटापट जी ने चढून वर गेलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकून आई दरवाजात येऊन उभी होती. माझ्या येण्याची ती वाटच पाहत होती. दुपारी मी घरी येईपर्यंत ती सुद्धा जेवण करीत नसायची. तू लवकर जेवण करत जा असं मी अनेक वेळा सांगूनही ती ऐकत नव्हती आणि ऐकणारही नव्हती. कारण आईची मायाच असते तशी. लेकरांसाठी आपले तहानभूक हरवणारी ती एकमेव व्यक्ती असते.

मी दरवाजात उभ्या असलेल्या आइकडे पाहिले तर  त्यावेळी मला ती थोडी नर्व्हस दिसली. आज मला यायला उशीर झाल्यामुळे ती सुद्धा जेवणासाठी ताटकळी असल्यामुळे तसे झाले असेल असा अंदाज मी बांधला. “आई,जेवलीस का?” मी आत येताना तिला सहज विचारले.

” न्हाय ” तिने हलक्या आवाजात उत्तर दिले. 

“जेवून घ्यायचंस ना मग?” मी सोप्यावर बसत म्हटले.

” अरे जेवणारच व्हते पण धुणं वालीची वाट बघत होते. “

“म्हणजे? ती अजून आली नाही?”

” नाही बाबा अजून … “

“ती काल काही बोलली का?”

“न्हाय रे, काल तर ती एकदम खुशीत व्हती.”

“मग तिला पगार वगैरे कमी ठरवलंस काय?” 

” न्हाय रं बाबा… असं कसं! आरं बाबा नुसत्या धुणेभांड्याचेच ती सहाशे रुपये घेती. पण आपले फकस्त धुणं आणि फरशी मिळून सातशे रुपये ठरवले मी तिला.

ती सहाशेच रुपये द्या म्हणत होती पण मी म्हटलं जाऊद्या गरिबाला शंभर रुपये जास्तीचे.एकेकाळी मी बी अशीच लोकांकडं शेतात पडल ते काम करायची म्हणूनच मला पांडुरंग उभा राहिला, माझ्या पोरांचं चांगलं झालं अन अजूनबी लय चांगलं व्हाईल. ” जुने दिवस आठवून आई इमोशनल झाली होती. बोलताना तिच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले होते.मी पटकन विषय बदलत म्हटले, “मग तिला आपलं घर आवडलं नाही का?” 

“तसं बी काय न्हाय.मावशी तुमच्या घरी याची माझी विच्छा होती ती आज पुरी झाली असं ती आनंदानं म्हणत होती.

तसं म्हणायला आपल्या घरी माणसं पण कमी आहेत होय आपल्या सगळ्यांना ओळखते ती. आली असेल काहीतरी अडचण तिला आज थोडा वेळ वाट पाहू.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच दुपारी तीन वाजेपर्यंत मोलकर्णीची वाट पाहिली शेवटी आईने भिजवलेले ओले कपडे धुऊन टाकले पण ती काही आली नाही. 

मात्र ती का आली नाही याचे कोडे आईला व मला पडले होते.

विशेष म्हणजे ती न येण्यामागचे एकही सबळ कारण आम्हाला सापडत नव्हतं…

आमच्या घरी धुणं-भांडी करण्यासाठी खरे तर तीच आमच्या मागे गेल्या दोन महिन्यापासून लागली होती.

मावशी मला तुमच्या घरी कामाला न्या असं सारखं म्हणायची. पण आमच्या घरी निर्मला आधीपासूनच होती तीही कामाला व स्वभावाला खूप चांगली  होती गरजू व होतकरू होती.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईची आणि तिची छान गट्टी जमली होती आणखी दहा पाच वर्षे तरी निर्मला आपल्या घरचे काम सोडणार नाही असे मला त्यावेळी वाटत होते. 

निर्मला एक तरुण विधवा होती. तिला दोन लहान मुले होती. चार-पाच घरची धुणं -भांडी करून ती मुलांना सांभाळत होती. तिला जवळच असं कोणीच नव्हतं. पण गुणांनी ती खूप चांगली होती. तिचा चेहरा निरागस होता. डोळ्याची पापणी सदा खाली पडलेली असायची. वाट्याला आलेले भोग स्वीकारून ती परिस्थितीशी लढा देत होती. आयुष्याचा अजून खूप मोठा टप्पा बाकी होता पण तिने सुरुवात तर झकास केली होती.त्यामुळे ती आपल्या कामात यशस्वी होण्याची खात्री वाटत होती. लेकरांसाठी पडतील ते कष्ट घेण्याची तिची तयारी दिसत होती. शिवाय आई तिला दररोज धीर दयायची. 

” सरून जातील दिस आज ना उद्या.काळजी करू नगो. कष्ट करत रहा. ” असा सल्ला द्यायची अन मग निर्मलाला नवी उभारी मिळायची. ती धावून धावून घरातली कामं करायची. 

दुसऱ्या कोणाकडे हात न पसरता आपणच कष्ट करून स्वाभिमानाने जगावे असे तिने जणू ठरवले होते आणि त्याप्रमाणे ती वागत होती म्हणून आम्हालाही तिचा फार अभिमान वाटत होता. निर्मला आमच्याकडे कामाला आल्यापासून साधारणपणे चार महिने सगळे काही व्यवस्थित चालले होते. परंतू एके दिवशी भलतेच घडले! 

एक किराणा दुकानदार तिच्या झोपडीत घुसला तिला दमदाटी करून त्याने आपले साध्य साध्य केले… त्याप्रसंगी निर्मला खूपच घाबरली होती. परंतू तिला प्रतिकाराची फारशी संधी त्या नराधमाने दिली नव्हती. रात्रीच्यावेळी घरात एकटी गाठून त्याने त्याचा कुटील डाव साधला होता. हा घडलेला प्रसंग तीने आईला दुसऱ्या दिवशी सांगितला.  आईने तिला धीर दिला. खोली बदलून एखाद्या ओळखीच्या नातेवाईकाचा आधार घेण्याचा सल्ला आईने तिला दिला. त्या  दिशेने तिची नव्या झोपडीसाठी शोधाशोध सुरू झाली. परंतु कुठे काही जमले नाही.दोन लेकरांच्या एकट्या तरण्याताठ्या एकट्या बाईला खोली कोण देणार…! 

दरम्यान त्या दुकानदाराला चांगलीच चटक लागली होती.त्याच्या तोंडाला रक्त लागले होते. तहान लागली की भागवायला तो निर्मलाच्या झोपडीत राजरोसपणे घुसायचा.निर्मला खूपच भेदरली होती पण आपलीच अब्रू जाईल म्हणून बिचारी कुठेही न वाच्यता करता निमटपणे सगळे सहन करत होती. परंतु त्या नराधमाने तिचा चांगलाच गैरफायदा घेतला होता…

शेवटी त्यानेच तिला त्याच्या सोईचीच एक खोली परहस्ते मिळवून दिली व आपल्या बैठकीतल्या मित्रांना तिच्याकडे घेऊन येऊ लागला…! 

हे सगळे भयानक होते. संताप आणणारे होते. परंतू कोणाला काही करता येत नव्हते. 

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गजु ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ गजु ☆ श्री सुनील शिरवाडकर

आठ दहा वर्षाचा गजु.. आमच्या शेजारीच रहायचा. एकदा तो त्याच्या बाबांच्या मागेच लागला. मला पण तुमच्या बरोबर यायचं.. दुकानात.. मी त्रास नाही देणार.. नुसता बसुन राहीन.

गजुचे बाबा एका चहाच्या दुकानात काम करायचे. चहाच्या दुकानात म्हणजे चहा पावडर विकणाऱ्या दुकानात. तेथे ते सेल्समन होते. ते घरी आले तरी त्यांच्या शर्टला चहाचा वास यायचा. गजुला तो वास खुप आवडायचा.

तो वासच आवडायचा असं नाही, तर गजुला बाबांचा तो शर्ट पण आवडायचा. जाड पिवळ्या कापडाचा तो शर्ट.. खिशावर त्या दुकानाचा लोगो. एकदा तर गजुने घरात कुणी नसताना तो शर्ट घालुनही पाहीला होता.

खुपच मागे लागल्याने बाबांनी ठरवलं.. आज गजुला दुकानात घेऊन जायचं. तसं दुकान जवळच होतं. दुपारी त्याचे बाबा जेवायला घरीच यायचे. बाबांनी खुप सगळ्या सूचना केल्या. हे बघ.. दुपारी दोन पर्यंत  तुला दुकानात थांबावं लागेल.. माझ्या बाजुला शांतपणे बसायचं.. इकडे तिकडे हात लावायचा नाही.

गजुने मान डोलावली. बाबांसोबत तो दुकानात आला. दुकानाची साफसफाई झाली. बाबांनी काऊंटरवरून फडकं फिरवलं. उदबत्ती लावली. बाजुच्या खुर्चीत कॅशियर बसला. काऊंटरच्या आत एक स्टुल होता. गजु त्याच्यावर उभा राहिला.

तेवढ्यात एक गिऱ्हाईक आलं. त्यांना अर्धा किलो चहा हवा होता. काऊंटरच्या खाली तीन चार ड्रॉवर्स होते. त्यात वेगवेगळी चहा पत्ती होती. दार्जिलींग.. ममरी.. अशी नावे त्यावर लिहीलेली होती. बाबांनी या ड्रॉवर मधून थोडी.. त्या ड्रॉवर मधुन थोडी अशी चहा पत्ती घेतली.. स्टीलच्या डावाने हलवली. सगळं मिश्रण छान एकत्र झालं.

दुकानचं नाव असलेली एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली. त्यात एक स्टीलचा चकचकीत शिबलं ठेवलं. वरुन ती चहाची पावडर ओतली.. स्टेपलरनी दोन पिना मारल्या.. कस्टमरच्या हातात दिली. पैसै देऊन तो माणूस निघुन गेला.

गजु हे सगळं बघत होता. त्याला हे सगळं खुपचं आवडलं. दोन तीन तास तो दुकानात बसला.. अगदी शहाण्या मुलासारखा.. चहाच्या त्या मंद सुगंधानी त्याचं मन वेडावलं.

गजुचं चहाचं वेड अजुनच वाढलं. मी मोठा झाल्यावर चहावाला होणार असं तो आता सांगु लागला. त्याच्या वयाच्या मुलानी असं भविष्य रंगवणं चुकीचंच होतं. त्याचे आईबाबा पण त्याला ओरडायचे. चांगलं शिकुन मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची.. तर हा असं काय बडबडतोय म्हणून वेड्यात काढायचे.

अशीही काही वर्ष गेली. आम्हीही ती जागा सोडली. कधीमधी ऐकु यायचं.. गजु कॉलेज मध्ये जाऊ लागला. त्याच्या डोक्यात असलेलं ते चहावाल्याचं वेड आता कदाचित निघुन गेलं असावं.. मी ही त्याला.. त्याच्या फॅमिलीला विसरून गेलो.

आणि अचानक एक दिवस गजु दिसला. इतक्या वर्षांनंतर पण मी त्याला ओळखलं.

झालं काय.. एका रविवारी मी एका मित्राच्या दुकानात बसलो होतो. अधुनमधुन आम्ही मित्र जमायचो तेथे. मित्रानी फोनवरून चहा सांगितला. थोड्या वेळाने चहावाला आला.. हो तो चहावाला म्हणजे गजुच होता.

दोन्ही गुडघ्यावर फाटलेली विटकी जीन.. पिवळा धमक घट्ट टी शर्ट.. केस तेल लावून चापुन चोपुन बसवलेले.. आणि तोंडांत गुटखा. त्याच्या एका हातात काळा थर्मास होता. दुसर्या हातात पेपर ग्लास.

दुकानाच्या पायरीवर त्याने थर्मास ठेवला. एक कागदी कप घेतला.. तो थर्मासच्या कॉकखाली धरला. दुसर्या हाताने त्याने थर्मासचं झाकण दाबलं. चहाची बारीक धार कपमध्ये आली. कप भरला.. त्याने माझ्यापुढे धरला.

क्षणभर आमची नजरानजर झाली.. त्याने ओळखलं की नाही.. माहीत नाही.. पण मी एका नजरेत ओळखलं.. हा गजुच.. आपल्या शेजारचा गजु.. चहावाला गजु.

मग मी एकदा मुद्दाम गजुचा शोध घेतला. जवळच्याच एका चौकात त्याची चहाची गाडी आहे असं समजलं. मी तिथं गेलो तेव्हा गजु नव्हता. थर्मास घेऊन तिथेच कुठे आजूबाजूला गेला होता. गाडीपाशी त्याचे वडील होते. इतक्या वर्षांनंतर सुध्दा मी त्यांना ओळखलं. ती अगदी टिपीकल चहाची गाडी होती. गॅसवर दोन पितळी पातेली होती. एकात दुध होतं.. दुसऱ्या पातेल्यात चहा उकळत होता. गजुचे वडील एका डावानं तो हलवत होते.. गाडीवर चहा साखरेचे डबे होते.. स्टीलच्या पिंपात पाणी होतं.. प्लास्टिकचा जग होता.. ॲल्युमिनियमची किटली होती.. ओलं फडकं होतं.. ट्रे मध्ये काचेचे पाच सहा ग्लास होते..

तेवढ्यात घाईघाईने गजु आला. त्याचे वडील बाजूला झाले. एक छोटा पितळी खलबत्ता होता.. गजुने त्यात आल्याचे दोन तुकडे टाकले. बत्त्याने ठेचले.. दोन बोटाने तो आल्याचा चोथा पातेल्यात टाकला. किटलीचं झाकण उघडलं. चहा गाळण्यासाठी एक पातळ फडकं होतं. ते किटलीवर ठेवलं. पातेल्यातला चहा किटलीत गाळला.. झाकण लावलं.

चहाच्या त्या नुसत्या सुगंधानेच मला तरतरी आली. मी यायच्या आधीपासून कुणीतरी गिर्हाईक चहाचं पार्सल घ्यायला आलं होतं. गजुनं विचारलं.. किती चहा हवेत. मग मागच्या खिशातुन प्लास्टिकची छोटी पिशवी काढली. किटलीतुन त्यात अंदाजाने चहा ओतला.. पिशवीला गाठ मारली.. ते गिर्हाईक पैसे देऊन निघुन गेलं.

मी पण एक चहा सांगितला. त्यानं एका कागदी कपात तो मला दिला. मी मागच्या एका खुर्चीत जाऊन बसलो. त्याचे वडीलही तेथेच बसले होते. मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.. जुनी ओळख दिली.

ते जरा संकोचले.. पण मग मोकळे होऊन बोलायला लागले.

“गजु दहावी झाला.. कॉलेज मध्ये पण गेला.. पण त्याला अभ्यास झेपला नाही. दोन तीन वर्ष कशीबशी काढली.. मग शिक्षणाला रामराम ठोकला. वर्ष दोन वर्ष अशीच कुठे कुठे नोकरी केली. “

मग ही गाडी कधी सुरु केली? डोक्यात कसं आलं.. हा व्यवसाय करायचं?”

गजुचे वडील म्हणाले..

“मी रिटायर्ड झालो.. आमच्या मालकांनीच सुचवलं हे.. थोडेफार पैसे मिळाले होते.. मग सुरु केली चहाची गाडी.. तसं गजुलाही वेड होतंच चहाचं.. “

एकंदरीत मला ते समाधानी वाटले. गजुनं मेहनतीनं.. गोड बोलण्यानं‌. ‌आणि मुख्य म्हणजे चहाच्या उत्तम दर्जानं व्यवसाय चांगलाच वाढवला होता. त्याची व्यवसायाबद्दलची निष्ठा बघत होतो.. त्याची धावपळ बघत होतो. नकळत माझ्या डोळ्यासमोर जुनं दृश्य आलं.. त्याचे वडील वजन काट्यातील चहा डावाने एकत्र करत आहे.. प्लास्टिकच्या पिशवीत ओतत आहेत.. आज गजुही तेच करत होता.. पितळी पातेल्यात उकळणारा चहा डावाने हलवत होता.. किटलीतुन कॅरीबॅगमध्ये ओतत होता..

पण तरीही एक मोठ्ठा फरक होता.. त्याचे वडील नोकरी करत होते.. गजु आज मालक होता.. आपला स्वतःचा व्यवसाय असणं किती अभिमानाचीच गोष्ट असते ना.. आणि तेच सुख.. तेच समाधान दोघा बापलेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते..

मला ते पाहुन व. पुं. चे वाक्य आठवले..

‘पार्टनर’ मध्ये व. पु. म्हणतात..

मालकी हक्काची भावना हेच खरे सुख.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “माऊली घरी आल्या !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “माऊली घरी आल्या !श्री संभाजी बबन गायके 

मुंबईहून मागवलेले कापडाचे तागे भरून आलेली बैलगाडी मनोहरपंतांच्या वाड्यासमोर उभी राहिली. संध्याकाळची सात-साडेसातची वेळ होती. मनोहरपंत हरिपाठात मग्न होते. त्यांनी खुणेनेच गाडीवानाला “पार्सल आतल्या खोलीत ठेवून जा…उद्या बाजारात आल्यावर गाडीभाडं अदा करतो” असं सांगितलं. गाडीवानानं ती पाच सहा पोती,एक लाकडी खोकं अलगद आत आणून खोलीत ठेवलं आणि तो मनोहरपंतांना नमस्कार करून निघून गेला. त्याचे मनोहरपंत हे नेहमीचे ग्राहक,त्यामुळे गाडीभाड्याची चिंता त्याला नव्हती! 

पोटापाण्यासाठी मनोहरपंतांचा पिढीजात वस्त्रालंकार शिवून देण्याचा व्यवसाय होता. मात्र व्यवसाय आता केवळ नावालाच करीत असत. त्यांचे वडील विष्णुपंत हे पंचक्रोशीत नेमाचे वारकरी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे मनोहरपंतही जन्मापासून माळकरी झाले होते. थोरला चिरंजीव लवकरच कमावता झाल्याने त्यांच्यावरील प्रपंचाचा भार नाही म्हटलं तरी काहीसा कमीच झाला होता. त्यामुळे ते आपला बहुतांशी वेळ देवाधर्माच्या कार्याला देत असत. 

त्यांच्या शहरातल्या अतिशय प्रसिद्ध गणपती मंदिरातल्या मूर्ती,हत्ती आणि पालखीसाठी आवश्यक अशा मखमली वस्त्रांची निर्मिती करावी ती मनोहरपंतांनीच. देवाचं काम म्हणून तर मनोहरपंत अतिशय मन लावून काम करीत. एरव्ही अगदी पहाटेपासून सुरू झालेलं देवदर्शन दिवस अगदी वर येईस्तोवर सुरूच असे. खाकी अर्धी विजार,अनेकानेक खिसे असलेली पांढरी कोपरी, पायात साध्याशा वहाणा,डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख. चालणे अतिशय निवांत. बोलणे मऊ. आयुष्यात कुणाशी तंटा,वाद,भांडण असा विषयच नव्हता. 

कापडाचे तागे उद्या सकाळी उघडून पाहू, असा विचार करून मनोहरपंत जेवण आटोपून झोपी गेले. नित्यनेमाने पहाटे उठून देवदर्शन आटोपून आले. आल्यावर सामानाच्या खोलीत गेले. देवांसाठी विशेष दर्जाचं कापड मागवलं होतं. गणेशोत्सव तोंडावर आला होता. देवांना सजवायला हवं. 

कापडाच्या पार्सलशेजारी ठेवलेल्या लाकडी खोक्यावर त्यांची नजर पडली. कापड लाकडी खोक्यात पाठवायचे कारण काय मुंबईच्या दुकानदाराला? असा त्यांना प्रश्न पडणं साहजिकच होतं. पण खोक्यावर नाव-निशाणी तर काहीच नव्हती. स्क्रू ड्रायवरने त्यांनी ते लाकडी पार्सल उघडलं…..माउली! माउली! मनोहरपंत काहीशा मोठ्या आवाजात उद्गारले! खोक्यात छान रेशमी कापडाने झाकलेली मूर्ती होती..पद्मासन घातलेल्या अवस्थेतील…..ज्ञानोबा माऊलींची! बोलके डोळे,प्रमाणबद्ध शरीर,गळ्यात तुलसीमाला…साक्षात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय घरी आलेले होते! मनोहरपंत काही क्षण भांबावलेल्या अवस्थेत उभे होते…हात जोडायचे भानही त्यांना राहिले नव्हते ! 

आपण तर कधी कुठलीही मूर्ती मागवली नव्हती. कुणी पाठवलं असेल पार्सल? तोवर सारं घर आणि शेजारची माणसं गोळा झालेली होती. चुकून आपल्या पत्त्यावर आलेले असेल पार्सल असे मनोहरपंत मनात म्हणाले. पण माऊलींना असंच कसं ठेवायचं म्हणून त्यांनी अलगद ती मूर्ती उचलली आणि पुंडलिकवरदा हरिविठ्ठलच्या गजरात देवघरात नेऊन ठेवली! त्या दिवशी दसरा आणि दिवाळी असे दोन सण एकमेकांच्या हातांत हात घालून घरात अवतरले होते! 

मूर्ती ज्याची असेल त्याची त्याला देऊन टाकू असा त्यांचा विचार झाला. त्याकाळी मुंबईत संपर्क साधायचा म्हणजे एकतर पत्र धाडणे किंवा स्वत: जाऊन धडकणे हाच पर्याय असायचा. मनोहरपंत पेठेत गेले. गाडीवानाला विचारताच तो म्हणाला “पार्सल आलं तुमच्या मालासोबत म्हणून तुमच्या घरी टाकलं. आता कुणी पाठवलं,कधी पाठवलं हे काही मला सांगता यायचं नाही!” 

एका मोठ्या पेढीतून मनोहरपंतांनी मुंबईच्या व्यापा-याला फोन लावला. त्यालाही या पार्सलविषयी काही खबर नव्हती. तो दिवस निघून गेला. माऊली आता नव्या घरात स्थिरावल्या होत्या.  मनोहरपंतांनी त्यांच्यासाठी खास मखमली वस्त्रं शिवली. गावातल्या विठ्ठल मंदिरात होणारं ज्ञानेश्वरी पारायण आता मनोहरपंतांच्या घराच्या ओसरीत सुरु झालं…अशी एक दोन नव्हेत…दहा बारा वर्षे निघून गेली…वर्षातून किमान दोन तरी पारायणे होत असत या मूर्तीसमोर. माऊलींवर हक्क सांगायला कुणीही आलं नाही. मात्र ज्याने कुणी मोठ्या प्रेमाने ही मूर्ती घडवून घेतली असेल, त्या भक्ताविषयी मनोहरपंतांना कळवळा वाटत असे! पण आता तो भक्त खरंच आला आणि त्याने माऊलीवर हक्क सांगितला तर…? पंत आतून हलून जात असत. मातीची मूर्ती ती..पण हृदयात मोठी जागा पटकावून बसली होती. आता मूर्तीचा उल्लेख मूर्ती असा न होता केवळ ‘माऊली’  असाच होऊ लागला होता…जणू संजीवन वास्तव्य नांदत होतं घरात. भोळ्या माणसांच्या मनात अशी खूप विस्तीर्ण पटांगणे असतात…कितीही दिंड्या उतरू द्यात! 

दरवर्षीच्या आषाढीला पंत माऊलीसोबत वाटचाल करू लागले! ते अगदी त्यांच्या शेवटच्या वारीपर्यंत! 

 त्यावर्षी दिंडी गावात परतली. परतवारी करून आल्यावर जसं आळंदीत माऊलींचं  स्वागत होतं..तसंच गावात स्वागत होई! 

त्या रात्रीचं कीर्तन मोठं रंगतदार झालं. खास आळंदीहून मातब्बर कीर्तनकार बोलावले होते गावाने. जुन्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करायचं मनात होतं गावाच्या. यावर्षीच्या हरीनाम सप्ताहात वर्गणीही गोळा करायला प्रारंभ झाला होता. पंत माऊली नव्या मंदिरात स्थापन करायला परवानगी देतील का? असाही विचार काहींच्या मनात असावा. माऊली…माऊली जयघोषात कीर्तन संपलं आणि लोक घरी जायला निघाले. पंत नेहमीच मंदिराच्या दगडी खांबाला टेकून बसून कीर्तन ऐकत असत. बहुदा डोळे मिटलेले असत. मंदिर रिकामं झालं तरी पंत डोळे मिटूनच बसलेले होते. काही वेळाने कुणीतरी त्यांना हात लावून हाक मारली…तर प्रतिसाद शून्य! झोप लागून गेली असेल..लोकांना वाटलं. जोरात हलवलं तर पंत एका कुशीवर कलंडले! अकालीच असले तरी पंतांना मरण तर मोठे भाग्याचे आले, हरिनामाच्या चिंतनात आले!  

पंत गेल्यानंतर माऊलींचे काय होणार अशी चिंता करावी लागली नाही. मनोहरपंत यांच्या घरातील मुक्काम आवरता घेऊन माऊली आता नव्या घरात आल्या आहेत…तेच सौंदर्य,तेच पावित्र्य,तेच डोळे आणि त्यातील मार्दव! 

पन्नास वर्षे उलटून गेलीत….अजून कुणी माऊली मागायला आलेलं नाही…आणि आता कुणी आलं तरी स्वत: माऊलीच इथून प्रस्थान करणार नाहीत ! 

“ठायीच बैसोनी करा एक चित्त.. आवडी अनंत आळवावा ! “ असं सांगत माऊली विराजमान आहेत! रामकृष्णहरि! 

(सत्यघटनेवर आधारित)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कागदाची नाव… भाग-२ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ कागदाची नाव… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर

(पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं सुचत नव्हतं कारण दोघंही डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न  करत होतो.इतक्यात…) – इथून पुढे —

छतातून पडणाऱ्या थेंबामुळे डोकं पुसत रस्त्याकडं पाहणाऱ्या काकाच्या डोक्यावर छत्री धरल्यावर त्यानं मागे वळून पाहीलं आणि एकटक बघतच राहीला.त्याच्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.खूप दिवसांनी खरं तर वर्षांनी भेटत असल्यानं पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं हेच समजत नव्हतं.साऱ्या जुन्या आठवणी दाटून आल्या.डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न दोघंही करत होतो. इतक्यात जोरात वीज कडाडली.आकाशाकडं बघण्याच्या निमित्तानं दोघांनी डोळे पुसले.शेवटी काकानं सुरवात केली “भारतात कधी आलास” 

“दीड वर्ष झालं”

“थांबणारेस कि परत जाणार ”

“नवीन थ्री बीएचके घेतलाय.आता इथंच सेटल झालोय.”

“वा.चांगली बातमी दिलीस.आत्ता तू इथं कसा?” 

“माझं ऑफिस समोरच आहे.खिडकीतून तुला पाहीलं आणि..”

“गर्दीत ओळखलसं कसं?”

“उभं राहण्याच्या स्टाईलवरून” 

“बरी लक्षात राहिली.” काकाच्या बोलण्यावर मी फक्त हसलो. 

“रेनकोट नाही का”

“गडबडीत विसरलो.नेमकं पावसानं गाठलं.आडोशाला थांबलो तरी निम्मा भिजलोच.”काका. 

“ऑफिसमध्ये चल.गरमागरम कॉफी घेऊ.”

“आम्ही चहाबाज,कॉफी चालत नाही.”काका टाळतोय हे लक्षात आलं. 

“चहापण मिळेल”

“आता नको नंतर!!.तसंही पावसाचा जोर कमी झालाय.थोड्या वेळानं निघेन.ऑफिस माहिती झालंय.भेटायला येईन” पुन्हा एकदा शांतता.दोघंही गप्प.एकदम ऑकवर्ड परिस्थिती. 

“कसायेस”यावेळी मी पुढाकार घेतला.

“जसा असायला पाहिजे तसा.”

“म्हणजे”

“खाऊन पिऊन सुखी आहे.थोडाफार सोडला तर विशेष बदल नाही.”डोक्यावरून हात फिरवत काका हसला. 

“सेम पिंच.माझंही तसंच आहे.”

“थापा मारू नकोस.आरशात बघितलं का.अजून चाळीशी यायचीय तरीही पोक्त बाप्या वाटतोस.पोट बघ. व्यायाम बियाम सगळं बंद वाटतं.दिवसभर फक्त मोबाईल,आरामदायी खुर्ची आणि लॅपटॉप.तब्येतीची हेळसांड करून पैसे कमवायचे आणि डॉक्टरची बिलं भरायची.हो ना.”

“वेळच मिळत नाही.तू मात्र चांगलं मेंटेन केलंय” मी शिफातीनं विषय बदलला.

“पर्याय नाही.तब्येत चांगली तर सगळं ठिक नाहीतर..तसंही आयुष्य आता उतरणीला लागलं.एकदा का उतार संपला की सदामुक्कामी !!”काका भकास हसला.ते खूप खोलवर भिडलं. 

“असं का बोलतोस”

“जे खरं आहे तेच बोलतोय.बाकी,तुझी प्रगती बघून समाधान वाटलं.खूप अभिमान वाटतो.अजून भरपूर यश मिळू दे.मोठा माणूस झालास.माझी भविष्यवाणी खरी ठरली.दादा-वहिनीची पुण्याई फार मोठी म्हणूनच त्यांच्या पोटी तुझ्यासारखा हिरा आला.घराण्याचं नाव मोठं केलसं.”इतक्या वर्षानंतर भेटलो तरी काकाची  माया तसूभरही कमी झाली नव्हती.लहानपणीसारखंच अफाट कौतुक तो आताही करत होता.त्याच्याकडे माझे सगळे अपडेट्स होते आणि मला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं कारण मीच त्याला आयुष्यातून हद्दपार केलं होतं.एवढ्या वर्षात एक साधा फोन करून चौकशी केली नाही.कोणतेही ठोस कारण नसताना इतरांचे ऐकून मनात अढी निर्माण झाली आणि संबंध तोडले.कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी निर्णय घेतला त्याचचं  वाईट वाटतं होतं.काका मात्र मनमोकळं बोलत होता.माझा गिल्ट वाढला.स्वतःचीच लाज वाटायला लागली.काकाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होईना.

“काय रे!! कसल्या विचारात हरवलास.”काकाच्या आवाजानं भानावर आलो.

“तूझं मन खूप मोठयं.”काका फक्त हसला. 

“चल,निघतो आता,पाऊस कमी झालाय”

“जाणार कसा”

“बाइक जिंदाबाद”

“भिजशील ना”

“थोडफार भिजलेलं तब्येतीला चांगलं असतं.”

“एक विचारू,”

“बिनधास्त!!”

“माझा राग नाही आला” 

“अजिबात नाही पण खूप वाईट वाटलं.भांडणं नाही कि मतभेद नाही तरी तुझं बदललेलं वागणं जिव्हारी लागलं.परक्यासारखा वागण्याचा खूप त्रास झाला.” 

“कान पकडून जाब का विचारला नाही”

“मला तो हक्क नव्हता. दादाच्या जाण्यानं खूप काही बदललं म्हणून गप्प राहिलो. माझी मर्यादा माहिती होती.जाऊ दे.जे झालं ते झालं, जुने विषय आता नको.उगीच शिळ्या कढीला ऊत आणून उपयोग नाही.अचानक भेटलास,महत्वाचं म्हणजे स्वतःहून बोललास.खूप खूप छान वाटलं.आजचा दिवस सार्थकी लागला.आता भेटत राहू.पुढच्या वेळेला चहा नक्की!! बाय”. काका निघाल्यावर अस्वस्थता अजून वाढली.नक्की काय करावं सुचत नव्हतं.समोर बंद पडलेली बाईक सुरू करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या  काकाला पाहून हुंदका आला. स्वतःला रोखू शकलो नाही.धावत जाऊन काकाला बिलगल्यावर आपसूक बांध फुटला.

“काका,माफ कर.तुझ्याशी खूप चुकीचा वागलो.”

“मघाशी सांगितलं ना.सोडून दे”

“तू अजूनही तसाच आहेस पण मी बदललो रे.ईगोला कुरवाळत बसलो.”

“तुझं तुला कळलं यातच सगळं काही आलं.फार विचार करू नकोस.आता आपल्या नात्यावरची जळमटं निघून मनं स्वच्छ झाली.अजून काय पाहिजे.”त्याचवेळी विजेचा कडकडाट झाला. 

“सत्ययं,बंद पडलेलं नातं रिचार्ज झाल्याची पावती मिळाली.”

“आता माझ्या बरोबर चल.कडक चहा पिऊ” बाइक ढकलत निघालो.ऑफिसजवळ आल्यावर पुन्हा पावसाला सुरवात झाली.काकानं बॅगेतून कागद काढला अन त्याची नाव बनवून माझ्याकडं  दिली. लहानपणीचे दिवस आठवले.काका नाव बनवणार आणि मी पाण्यात सोडणार हा आमचा खेळ बराच वेळ चालायचा.खूप वर्षानंतर कागदाची नाव हातात घेतल्यावर पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं.काकाला घट्ट मिठी मारली. ईगो,यश,श्रीमंती,अहंकार,गैरसमज,रूसवे-फुगवे,मान-अपमान सगळं सगळं कागदाच्या नावे सारखंच तकलादू असतं. वाहत्या पाण्यात नाव सोडताना डोळ्यातून पश्चातापाचे थेंब नावेवर पडले आणि नाव पुढे गेली तेव्हा मन खूप शांत झालं.इतका वेळ आडोशाला थांबलेला काका अचानक पावसात जाऊन उभा राहीला.कदाचित त्याला डोळ्यातलं पाणी माझ्यापासून लपवायचं होतं.—

– समाप्त –

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कागदाची नाव… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ कागदाची नाव… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

पावसाळ्यात ऑफिस सुटण्याच्या वेळी येणारा पाऊस वैताग आणतो.दिवसभर कितीही पडला तरी काही वाटत नाही पण नेमकं घरी जायच्या वेळी आला की खूप चिडचिड होते.आतादेखील तीच परिस्थिती होती.पाच वाजताच अंधारून आलेलं.गच्च भरलेलं आभाळ मुसळधार पावसाची लक्षणं दाखवत होतं.जोरदार पाऊस म्हटलं की थांबलेले रस्ते,जागोजागी साचलेलं पाणी,बंद पडलेल्या गाड्या,जाणारे लाइट,गोगलगाय सारखं चालणारं ट्राफिक आणि गर्दी अशी टिपिकल दृश्य नजरेसमोर आली.या चक्रात अडकण्यापेक्षा ऑफिसमधून लवकर निघावं याच विचारात असताना बॉसचा फोन आला.त्यांना हवी असलेली माहिती मेल करून लॅपटॉप बंद करेपर्यंत धो धो पडायला सुरूवात झाली.

जोर पाहता पाऊस लवकर थांबण्याची चिन्ह नव्हती.आता लवकर निघूनही वेळेत पोचणं तर शक्यच नव्हतं.निवांत झालो.लॅपटॉप सुरू करून कामात डोकं खुपसलं पण लक्ष लागतं नव्हतं.कॉफीची तल्लफ आली.वाफळलेल्या कॉफीचा मग घेऊन खिडीकीतून पाऊस पाहयला लागलो.चौकात गुडघ्याइतकं पाणी साचल्यानं तलाव झालेला.गाड्यांच्या लांब रांगा,बंद पडलेल्या टू व्हीलर ढकलणारे.पावसापासून वाचण्यासाठी अनेकांनी आडोशाचा आधार घेतलेला.सहज लक्ष समोरच्या बसस्टॉपकडं गेलं तिथं काहीजण थांबलेले.जो तो मोबाईलमध्ये हरवलेला.त्यातच पाठीवर बॅग लावलेला एकजण डावा हात कमरेवर आणि उजव्या हातानं हनुवटी धरून तल्लीन होऊन पाऊस बघत होता.त्याची उभं राहण्याची स्टाईल ओळखीची वाटली.रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात चेहरे नीट दिसत नव्हते.त्या व्यक्तीला नक्कीच भेटलो आहोत असं मनापासून वाटत होतं पण नेमकं लक्षात येत नव्हतं.एकदम आयडिया सुचली.मोबाइल कॅमेरा झुम करून पाहीलं तर अंदाज बरोब्बर निघाला तो मोहन काका होता.

डोक्यावरचे विरळ केस आणि चष्मा सोडला तर काकात फार  बदल झाला नव्हता.अंगकाठी पूर्वीसारखीच शिडशिडीत होती.त्यामुळेच तर पटकन ओळखता आलं.तब्बल अकरा वर्षानंतर काकाला पाहिलं.भावनांचा कल्लोळ झाला.मन एकदम भूतकाळात गेलं.

मोहनकाका सख्खा काका,त्याच्या नशिबात संसारसुख नव्हतं.लग्न टिकलं नाही.त्या अनुभवावरून काका दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडला नाही.काकाचा माझ्यावर विशेष लोभ.लहानपणी सगळ्यात जास्त लाड त्यानं केले.मागेल ती वस्तु आणून द्यायचा.यावरून बाबांबरोबर वादावादी व्हायची तरीही लाड थांबले नाहीत.दरवर्षी पास झालो की काकाकडून हटके गिफ्ट ठरलेलं.त्याच्या गिफ्टची उत्सुकता मलाच नाही तर घरातल्या सर्वानांच असायची.दहावीला नव्वद टक्क्यांनी पास झाल्यावर भरपूर गिफ्ट मिळाली पण काकानं दिलेला दाढीचा ब्रश आणि शेविंग क्रीम सर्वात आवडलं.उमलत्या वयात त्या दोन्ही गोष्टींचे फार अप्रूप होतं.काकाची समयसूचकता खूप आवडली म्हणूनच नंतर बरीच वर्षे त्या दोन्ही गोष्टी जपून ठेवल्या होत्या.बारावी पास झाल्यावर एक शर्ट आवडलेला पण किंमतीमुळे आई-बाबांनी घेऊन दिला नाही.काकाला कळलं आणि संध्याकाळीच तो शर्ट माझ्या अंगात होता.त्यावरून घरात खडाजंगी झाली पण काकानं शर्ट परत केला नाही.असा हा मोहन काका. 

पण म्हणतात ना,आयुष्याला कधी अन कुठं वळण मिळेलं हे सांगता येत नाही. काही घटनांमुळे  आमच्यात अंतर पडलं.इतकंकी एकमेकांचं तोंड पहाणं सोडलं.लग्नकार्यात भेट झालीच तर उसनं हसणं आणि कोरडी विचारपूस यापलीकडे काही नाही.इतका दुरावा येण्याचं मुख्य कारण बाबा आणि काका यांच्यातला वडीलोपार्जित जमिनीचा वाद.बाबांना जमीन विकायची होती तर काकाचा विरोध.यावरून बरेच दिवस धुसपुस होती.नातेवाईकांनी,वडीलाधाऱ्यांनी समजावून सांगितलं पण तोडगा निघाला नाही.शेवटी  जमिनीच्या वाटण्या झाल्या आणि एकमेकांविषयीच्या भावनांच्याही.खरंतर दोघांनाही मनातून खूप वाईट वाटत होतं पण ईगो आडवा आला.अबोला सुरू झाला.जवळ राहणाऱ्या काकानं दोनचार दिवसात घर बदललं.त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि माझ्या शिक्षणासाठी बाबांना जमीन विकावी लागली परंतु धाकटा भाऊ दुरावला ही गोष्ट बाबांनी खूप मनाला लावून घेतली.तब्येतीवर परिणाम झाला.सहा महिन्यातच हार्ट अटकचं निमित्त होऊन बाबा गेले.वाटणी आणि काका यामुळेच हे घडलं अशी माझी पक्की धारणा झाली.आईनं देखील दुजोरा दिला.अजून कटुता वाढली.मोबाईलमध्ये नंबर होते पण कधीच कॉल नाही की मेसेज नाही.आधीच नावापूरतं असलेलं आमच्यातले संबंध पूर्णपणे तुटले.ते पुन्हा जोडण्यासाठी कुणाकडूनच प्रयत्न झाले नाहीत.     

आयुष्य असंचं असतं.काही गोष्टींना बाजूला करून पुढे जावचं लागतं  कारण वेळ कोणासाठी थांबत नाही.माझ्याही बाबतीत तेच झालं.शिक्षण संपल्यावर लगेच नोकरी मिळाली नंतर यशाच्या नवनवीन पायऱ्या गाठत आयुष्यात स्थिरावलो.नोकरीच्या निमित्तानं परदेशी गेलो.पहिल्यांदा परदेशी जाताना काकाचे शब्द आठवले.तो नेहमी म्हणायचा की हा पोरगा फॉरेनला जाणार.तेच खरं ठरलं.नुसताच गेलो नाही तर चांगली दहा वर्षे राहिलो.लग्न,बायको,संसार,मुली,नवीन नाती आणि जबाबदाऱ्या या सगळयात ‘काका’ विस्मृतीत गेला.कधीतरी चुकूनमाकून आठवण यायची पण तेवढ्यापुरतीच. 

आणि आज खूप दिवसांनी अचानक काका दिसला.मनात खोलवर असलेल्या आठवणी सरर्कन डोळ्यासमोर आल्या.वास्तविक आई-बाबांशी वाद असले तरी काका माझ्याची कधीच वाईट वागला नाही तरीसुद्धा आईच्या दबावामुळे मी काकाशी बोलणं सोडलं.दुरावा इतका वाढला की माझ्या लग्नाचं आमंत्रणसुद्धा दिलं नाही तरीही अक्षता टाकण्यापूरती काकानं हजेरी लावली.माझी भेट न घेता लांबूनच आशीर्वाद देऊन न जेवताच परत गेला.त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं.काकासोबतच्या एकेक हळव्या आठवणींनी खूप भरून आलं.कोणालाही समजण्याआधी चटकन डोळे पुसून टाकले.

“कोणीतरी स्पेशल व्यक्ती दिसली वाटतं.बराच वेळ खिडकीतून बघतोयेस” मित्राच्या आवजानं भानावर आलो.काकाला भेटायची तीव्र इच्छा झाली.आज ईगोपेक्षा नात्याचं पारड जड होतं. 

“छत्री आहे का रे” मी मित्राला विचारलं.

“आहे.एवढ्या पावसात कुठं जायचयं.खास व्यक्ती आहे वाटतं”

“येस.खासमखास आहे.परत आल्यावर सांगतो.आधी छत्री दे” छत्री घेऊन निघालो.बसस्टॉप जवळ आलो.पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं थांबलेले एकेकजण जात होते.छतातून गळणाऱ्या थेंबामुळे सारखं सारखं डोकं पुसत काका  रस्त्याकडे पाहत होता.मी डोक्यावर छत्री धरली तेव्हा काकानं मागे वळून पाहीलं आणि एकटक बघतच राहीला.चेहऱ्यावरून  आश्चर्याचा बसलेला सुखद धक्का जाणवत होता. पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं सुचत नव्हतं कारण दोघंही डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न  करत होतो.इतक्यात ……….

– क्रमशः भाग पहिला

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मला माफ करा… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मला माफ करा…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आई-बाबा आमच्याकडे राहत नाहीत म्हणून राहुल आणि माझी भावजय मनापासून हळहळ व्यक्त करीत असतात. आजी-आजोबांच्याकडे राहता येत नाही म्हणून माझा पुतण्या व पुतणी सदैव खंत व्यक्त करत असतात.) – इथून पुढे —  

खरं तर सगळीच नाती प्रेमाच्या पायावर उभी असतात. परंतु जीवनयात्रा मात्र तडजोड नावाच्या कुबड्यांच्या साहाय्यानेच पूर्ण करावी लागते. चल, आपण गप्पा मारत बसलो आहोत. इतक्यात आमची दुरंतो एक नंबरवर येईल. बी-नाईन डबा समोरच लागतो. तुला मात्र तीन नंबर प्लॅटफॉर्मवर जावं लागेल. पुन्हा भेटू या. हे माझं कार्ड” असं म्हणत राघवेंद्र आईला घेऊन प्लॅटफॉर्मकडे निघाला. 

बेंगलुरूला जाणारी उद्यान एक्सप्रेस उशीराने धावत असल्याने अजून एका तासाचा अवधी होता. महेश अस्वस्थपणे बसून राहिला. राघवेंद्राने महेशवर पुन्हा एकदा मात केली होती. संस्काराच्या बळावर ह्यावेळी त्याने महेशला खुजं ठरवलं होतं. महेश आत्ममग्न होऊन विचार करीत बसला. 

चार महिने संपून एक आठवडा झाला तरी अविनाश दादाचा बाबांना घेऊन जाण्याविषयी निरोप आला नाही. बाबांना सांभाळायची त्याची पाळी येते त्याचवेळी त्याची रजा मंजूर होत नाही किंवा तो कुठल्याशा टूरवर असतो. ऑफिसचा कर्मचारी बाबांना बेंगलोरला पोचवायला चाललाय. 

बाबा आजही निघायला आढेवेढे घेत होते. चुकार मुलं शाळा चुकवण्यासाठी काहीतरी कारणं सांगतात ना, तसं तब्येत बरी नाही म्हणून बाबा बेंगलोरला जायला कुरकुरत होते. मी आधीच टू-टायर एसीची रिझर्वेशन करवून घेतली होती म्हणून बरं आहे. 

मी घरात मात्र खलनायक ठरलो. 

‘बाबा, आजोबांना बेंगलोरला पाठवायची एवढी जबरदस्ती कशाला करताय? राहू द्या ना इथंच’ असं दोन्ही मुलं म्हणत होती. काल रात्री मुग्धा तर माझ्याशी चक्क भांडत होती. ‘अहो, मामंजीना त्यांच्या मनाविरूध्द कशाला पाठवताय? त्यांचा तुम्हाला काय त्रास होतोय? माझं ऐका. आपली मुलेही मोठी झाली आहेत. त्यांना सगळं समजतं. पुढे जाऊन त्यांनीही आपल्याला दर सहा महिन्याला असं बस्तान हलवा म्हटल्यावर तुम्हाला सहन होईल का, त्याचा एकदा विचार करा म्हणून विनवत होती. आज हा राघवेंद्र अचानक उगवला आणि मला शाब्दिक चपराक मारून गेला. 

महेशचं दुसरं मन म्हणालं, ‘राघवेंद्र म्हणतो त्यात काय चुकीचं आहे? माझ्याहून दोघे मोठे बंधू पदवीधर झाले, नोकऱ्या मिळवल्या. दोघांची लग्ने एकाच मांडवात झाली. नोकरीच्या निमित्ताने घर सोडून बाहेर पडले. मी शेंडेफळ असल्याने आईबाबांचा लाडका होतो. आज मी जो काही आहे ते केवळ बाबांच्या प्रोत्साहनानेच. ते सदैव माझ्या पाठीशी असायचे. मी रात्री अभ्यासासाठी जागत असायचो त्यावेळी ते जागे असायचे. नोकरीच्या वेळी देखील त्यांचंच मार्गदर्शन उपयोगी पडलं. माझं लग्नही त्यांनी किती हौसेनं आणि थाटामाटात केलं. 

आई गंभीर आजारी होती तेव्हा एका रात्री मी आईबाबांचं संभाषण आडून ऐकलं होतं. मी असं कसं विसरलो? आई म्हणत होती, ‘अहो, मी फार दिवस जगेन असं वाटत नाही. मी गेल्यावर तुमची हेळसांड होईल म्हणून माझा जीव इथेच घुटमळतोय हो.’ बाबा आईला धीर देत म्हणाले, ‘सरस्वती, तुला काही होणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. महेश आणि मुग्धा मला कधीच अंतर देणार नाहीत. ते मला फुलासारखं जपतील ह्याची मला खात्री आहे.’ बाबांना माझ्याविषयी किती खात्री होती.

आई गेली अन पहाडासारखे बाबा खचून गेले. ज्या बाबांनी माझा हात धरून मला पुढे नेलं होतं, त्यांना आज माझ्या आधाराची आवश्यकता आहे आणि मी त्यांना दूर लोटू पाहतोय. आईबाबांच्या आशीर्वादाने देवानेही मला भरभरून दिलंय. बाबांना सांभाळणं काहीच अवघड नाहीये. माझ्यासारखा नतद्रष्ट मीच आहे.

अचानक “ शंभू” या हाकेने महेशची तंद्री भंग पावली. आपला थरथरता हात महेशच्या मनगटावर ठेवत बाबा काकुळतीने म्हणाले, “शंभू, बाळा तू मला न्यायला येशील ना रे? मला बेंगलुरूत अजिबात करमत नाही. अरे, पुण्यातलं घर हे माझं आनंदनिधान आहे. ते घर आम्ही मोठ्या कष्टानं उभं केलंय. ह्या घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा, त्या खिडक्या, भिंती यांच्याशी माझं अतूट नातं आहे, मैत्री आहे. खिडकीजवळ थांबून मी तुळशी वृंदावनाकडे बघतो, तेव्हा मला तुझ्या आईची आठवण येते. नकळत डोळ्यांच्या पापण्या ओलावतात. मग खिडकीतून येणारा मंद वारा माझे ओघळलेले अश्रू पुसून माझं सांत्वन करून जातो रे.” 

महेश पटकन जागेवरून उठला आणि म्हणाला, “बाबा, तुम्ही इथेच थांबा. हा मी आलोच.” महेश धावतच बाहेर पडला. दुरंतो अजून सुटायची होती. बी-नाईनचा डबा समोरच होता. राघवेंद्रच्या कार्डावरून महेशने मोबाईल लावला. “राघवेंद्रा मी बी-नाईनच्या बाहेर उभा आहे. एका मिनिटासाठी येशील का?” 

राघवेंद्र काही क्षणासाठी खाली उतरला. महेशने राघवेंद्रला घट्ट मिठी मारली आणि एवढंच बोलला, “‘मित्रा, आपली ही भेट माझ्या स्मरणात कायमची राहील. दिल्लीहून परत आल्यावर तुम्ही सहकुटुंब माझ्या घरी या. हे माझं कार्ड!” एवढ्यात गाडीने शिट्टी दिली आणि वेग घेतला तसा हळूहळू राघवेंद्र दृष्टीआड झाला.             

महेश वेटींग रूमवर परत आला. दोघा कर्मचाऱ्यांना म्हणाला, “चला, घरी जाऊ या. ट्रीप कॅन्सल. बॅगा आपल्या कारमध्ये ठेवा.”

बाबा गोंधळून जात म्हणाले, “शंभू बेटा, अचानक असं काय झालं? मी काही चुकीचं बोललोय का? नाराज होऊ नकोस रे बाळा, मी जाईन बेंगळुरूला राहायला.” 

महेशने हात धरून बाबांना उठवलं. भावूक झालेल्या महेशने कित्येक वर्षानी बाबांना गळामिठी मारली आणि कसंबसं सावरत म्हणाला, “बाबा, मला माफ करा. आपण आपल्या घरी जाऊ या. आता तुम्ही कायमचे पुण्यातल्या घरात राहा. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, हे माझं वचन आहे.”  

बाबा पाणावलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत पुटपुटले, ” पाहिलंस सरस्वती, माझं म्हणणं खरं ठरलंय ना? तू उगाच काळजी करत होतीस…” आणि बाबा त्यांच्या लाडक्या शंभूचा हात धरून समाधानाने आपल्या घराकडे जाण्यासाठी परत निघाले…….       

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares