मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वस्तिक… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वस्तिक… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपाण पाहिले –  भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला.  क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व. अखंड सोबत.  एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला. ता इथून पुढे)

आयुष्याच्या ओघात तसे बदलही  खूप झाले. आई गेली तेव्हा दुःख झालेच, पण जेव्हा वासूचे अकस्मात निधन झाले तेव्हां डीव्ही पार कोसळले.  एक अंग गळून पडल्यासारखं त्यांना वाटलं.  डीव्ही  हे नावच त्यांना तुटल्यासारखं वाटलं.  स्वस्तिक म्हणजे दोन रेषा, एक आडवी एक उभी.  एक रेषा जणूं पुसली.  हा आघात खूप मोठा होता.  पण हळूहळू त्यातूनही सारं काही सावरलं गेलं. आयुष्य पुढे जातच.  जावं लागतं.

स्वस्तिकचा पसारा वाढतच होता.  आता वयात आलेली त्यांची उच्चशिक्षित तरुण  मुलं आणि सुनाही हळूहळू प्रवेशत होत्या.  नाविन्य येत होतं. आधुनिकतेतनं रूप पालटत होतं.  अधिक मोठं, त्याहून मोठं! अधिक वेगळं, दैदीप्यमान, जे आजपर्यंत नव्हतं ते आता प्रथमच, या भव्यतेत,  दिव्यतेत डोळे दिपवून टाकणाऱ्या स्वप्नांच्या प्रदेशात, एक एक पाऊल पुढे जात असताना नक्की काय झाले कळलेच नाही.  वाटेतच काही गणितं चुकली.  आराखडे चुकले.  अंदाज खोटे ठरले.  आश्वासनं  पोकळ ठरली. फसवणूक झाली की झेपच पेलवली नाही?  कित्येक कोटींच्या ड्रीमलँड प्रोजेक्टमध्ये इन्वेस्टरची पंधरा टक्के गुंतवणूक झालेलीच होती. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झालेल्या असतानाही काही परदेशी बँकांनी मंजूर केलेली कर्जे ऐनवेळी देण्यास नकार दिला.  आणि सगळी उलथापालथ  झाली.  आधी घेतलेली स्थानिक बँकांतील कर्जे, त्यांचे हप्ते, कॅश क्रेडिट चे अकाउंट्स, स्टॉक अकाउंट्स  सर्वांच्या हिशोबात प्रचंड गडबड झाली. नोटिसांवर नोटीसा येऊ लागल्या.  वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या उलट सुलट बातम्यांमुळे चालू प्रोजेक्ट्सना खिळ बसू लागली. आणि या सगळ्यांमध्ये गुंतवलेला पैशांचा धबधबा एकदम कोसळला.  संपूर्ण आयुष्य डेबिट झालं. प्रचंड उणे.  मायनस.

” अहो माझं ऐकून तरी घ्या!”  या विनवण्यांना कायद्यामध्ये सहानुभूती नसते.  गुन्हेगारीच्या चक्रात डीव्ही पार अडकले.

” माणसं दिसतात तशी नसतात,  अखेर पैसाच माणसाला विचलित करतो.  वाममार्गाला नेतो.”

” काय गरज होती यांना? हे असे फसवणुकीचे धंदे करण्याची? ”

” लोक केवळ यांच्या नावावर भुलले आणि यांनी काय केलं स्वतःच्या झोळ्या भरल्या. भोगा आता.”

“विश्वासघातकी,भ्रष्टाचारी, चोर”

अशा अनेक तलवारींनी डीव्हींच्या काळजावर अक्षरशः वार केले.  प्रॉपर्टीज सील होत होत्या.  अटक सत्रं चालू होती.  मुलं, सुना कुठे कुठे दूर देशी नातेवाईकांकडे निघून गेले. काही हितचिंतकांनी डीव्हींनाही पळून जाण्याचा सल्ला दिला.  त्यातले काही राजकीय वर्तुळातलेही होते.

पण डीव्ही. शांत होते. अविचलित होते.  पलायनवाद त्यांना मान्य  नव्हता. चूक झाली होती. शिक्षा भोगायला हवी. त्यांना अजून अटक झालेली  नव्हती.  तत्पूर्वी न्यायालयीन चौकशी समिती समोर होणाऱ्या चौकशीला ते सामोरे जाणार होते.

ते सकाळी उठले.  नित्य नियमाप्रमाणे सर्व अटपून त्यांनी मनोभावे पूजा केली.   त्यांच्या पत्नीने, सावित्रीने पूजेची सर्व तयारी साग्रसंगीत केलेलीच होती.  सुरेख सजवलेल्या रांगोळीत स्वस्तिक रेखाटलेला होता.

डीव्ही ध्यानस्थ बसले.

स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि:|

स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु||

ॐ शांती: शांती: शांती :

घरातून निघताना पत्नीने हातावर दहिसाखर ठेवले. म्हणाली,

” तुम्ही नक्की यातून बाहेर याल.  माझी खात्री आहे. काळजी नसावी. जाणून-बुजून न केलेली घटना गुन्हा ठरू शकत नाही.  काहीतरी मार्ग नक्कीच निघेल.”

सदाशिव बॅग घेण्यासाठी आत आला. तेव्हा ते त्याला म्हणाले,

” आज गाडी काढू नकोस.  मी रिक्षाने जाणार आहे.”

कोर्टात रिक्षातून बाहेर उतरणाऱ्या डीव्हींना पाहून पत्रकार, चॅनल्स वाले यांची धावाधाव झाली.

” काय हो डीव्ही? आज रिक्षातून? तुमच्याकडे अठ्ठावीस गाड्या आहेत ना ? सगळ्या जप्त?”

“मग नेमकं काय वाटते तुम्हाला?  आज तुम्हाला अटक झाली तर?”

” तुम्ही हे सारं करताना तुमच्या प्रतिमांचाही विचार केला नाही का?”

गर्दीतून वाट काढत काढत डीव्ही चौकशी दालनात पोहोचले. अॅड. झुनझुनवाला  त्यांच्या सहकारी वकीला सोबत थोड्यावेळाने आले.  त्यांनी डीव्हींना नजरेनेच इशारा केला.

चौकशी समितीत  मोठ्या टेबलासमोर, उंच खुर्च्यांवर चार दिग्गज न्यायाधीश स्थानापन्न होते.  डीव्ही त्यांच्यासमोर शांत बसले होते.  वातावरणात कमालीची सभ्यता होती.  सहानुभूतीपूर्वक आदरही होता.

हळूहळू चौकशी प्रक्रिया उलगडत गेली.  डीव्हींनी गळ्यातल्या स्वस्तिकास स्पर्श केला.   आज ते शुभ्र, पांढऱ्या कुर्ता पायजम्यात होते. त्यांच्या गोऱ्या गळ्यात सोन्याचा स्वस्तिक चमकत होता.

विषयाला सुरुवात झाली. शपथेचं  सत्र संपलं.

“मिस्टर दिनकर भास्कर वसिष्ठ,  तुमच्या ड्रीमलँड प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही एकूण तीन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे.  असा तुमच्यावर आरोप आहे तो तुम्हाला मान्य आहे का?”

” नाही. माझ्या हातून चूक झालेली आहे हे खरं आहे. माझे हिशोब चुकलेत, अंदाज चुकलेत गणित चुकलंय. फसवणुकीचा कुठलाही माझा उद्देश नव्हता.  आणि मी या सर्व रकमेची परतफेड करण्याची हमी आपणास देतो. मला फक्त थोडा वेळ द्यावा एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे”

” पण कशी परतफेड करणार?  इतकी मोठी रक्कम तुम्ही कशी उभी करणार? ”

” माझे वकील माझ्या स्थावर जंगम ,रोख मालमत्तेचे स्टेटमेंट  देतील त्यासाठी मी आपणास विनंती करतो की माझ्या वकिलांना आपण परवानगी द्यावी.”

पुढील सर्व कायदेशीर बाबी अॅडवोकेट झुनझुनवालांनी अतिशय कुशलतेने पार पडल्या.  आणि शेवटी ते कोर्टाला उद्देशून म्हणाले,

” युवर ऑनर, माझे अशील  एक प्रतिष्ठित, नामांकित, धार्मिक वृत्तीची व्यक्ती आहे.  आजपर्यंत त्यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.  कुणाची फसवणूक केलेली नाही.  त्यांचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. आणि या व्यवसायात ते गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत. अनेक सामाजिक प्रतिष्ठानांवर ते पदाधिकारी आहेत. आणि डीव्ही एक दानशूर व्यक्तिमत्व आहे.  ते कुणाची जाणून-बुजून फसवणूक का करतील?  कायद्याप्रमाणे जरी हा गुन्हा असला तरी ही एक निव्वळ चूक आहे.  म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना एक संधी द्यावी.  त्यांची सील केलेली सर्व मालमत्ता मोकळी करावी.  त्यांना अटक करू नये म्हणजे त्यांना त्यांच्या मालमत्तेचा योग्य विनियोग करून रक्कम उभी करता येईल व परतफेड करणे त्यांना शक्य होईल.  कोर्टाने तसा पुरेसा वेळही त्यांना द्यावा.एव्हढीच माझ्या अशिलातर्फे मागणी आहे.”

आरोपी, गुन्ह्याचे स्वरूप, आरोपीचे सामाजिक स्थान, कायदा, कायद्यातील तरतुदी, मर्यादा, चौकटी आणि त्या बजावणाऱ्यांची मानसिकता याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित, पण कोर्टाकडून डीव्हींना एक संधी देण्यात आली.  हा एक ऐतिहासिक निर्णय होता.  पण ते न्यायदानाच्या प्रक्रियेत घडलं.  त्यांची सर्व मालमत्ता मोकळी करण्यात आली.  त्यांना तूर्त तरी अटक झाली नाही.  वेळेची मर्यादा त्यांना देण्यात आली. त्या क्षणी तरी हा डीव्हींचा अंशतः विजयच होता.

इतिहासात,पुराणात असे घडले आहे. राजा हरिश्चंद्राला राज्य सोडावे लागले. शिवरायांचे सर्व गड ,किल्ले एका तहात त्यांना द्यावे लागले. रामाला,पांडवांना वनवास घडला. यादवीत युगंधराचाही अंत झाला. नियती, कालचक्र..

डीव्हींनी दिलेला शब्द पाळला.  त्यांच्या चारित्र्याला लागलेला फसवणुकीचा, अनैतिकतेचा कलंक पुसला गेला. एक राज्य गेलं. एक साम्राज्य संपलं .पण एक व्यक्ती उरली. शुभ्र निष्कलंक .कदाचित पुन्हा नव्याने राज्य उभं करण्यासाठी त्यांना यातूनही सामर्थ्य मिळेल. श्रद्धेनं जपलेली आपली प्रतिकंच आपल्याला शक्ती देतात. नियतीचं आवाहन पेलण्याचं बळ देतात. कुठल्याही परिस्थीतीत तटस्थ ठेवतात.

गळ्यातल्या स्वस्तिकाला निरखत डीव्ही.हळूच पुटपुटले

कल्याणमस्तु।।

– समाप्त – 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

काल रात्री डीव्ही  पाणी प्यायला उठले आणि त्यांच्या लक्षात आले की गळ्यातला ताईत  पडलाय.  ते थोडेसे विचलित झाले, काहीसे भयभीतही झाले. पाणी पिऊन पटकन बेडपाशी आले तेव्हां उशीवर  त्यांना त्यांचा ताईत दिसला.  त्या अंधुक प्रकाशात त्यातले सोन्याचा सुरेख कमनीय स्वस्तिक चमकले.  डीव्हींना एकदम हायसं वाटलं.  त्यांनी तो पटकन उचलला आणि पुन्हा गळ्यात घातला.

अजून रात्र बरीच बाकी होती.  त्यांनी डोळे मिटले आणि झोपण्याचा प्रयत्न केला.  शेजारी सावित्री— त्यांची पत्नी शांत झोपली होती.  त्यांनी पुन्हा गळ्यातल्या स्वस्तिकाला स्पर्श केला. 

तेव्हां आई म्हणाली होती,

” दिन्या! आज मी गुरुजींकडे गेले होते. त्यांना तुझी पत्रिका दाखवली. बराच वेळ ते निरखत होते.  लांबलचक आकडेवारी लिहीत होते.  म्हणाले,” माई छान आहे  पत्रिका. तुझा दिन्या नाव कमावणार.  खूप मोठा होणार. यशस्वी, कीर्तीवंत! स्वतःचे एक साम्राज्य उभं करणार तो. पण पत्रिकेत स्पष्ट दिसतंय की पनवतीचे काही टप्पे अवघड आहेत.  मी  एक ताईत देतो. यात एक स्वस्तिक आहे तो त्याचं सदैव रक्षण करेल.  आयुष्यभर त्यांनी तो गळ्यात ठेवावा.”

तेव्हांपासून आजतागायत तो गळ्यात आहे. कधीच काढला नाही. पण दिन्या ते डीव्ही या आयुष्याच्या एका दिमाखदार प्रवासात गळ्यातल्या या स्वस्तिकाने कशी काय साथ दिली याचाही कधी विचार मनात आला नाही. कित्येक वेळा तो आपल्या गळ्यात आहे याचाही विसर पडला असेल.  मात्र एक, आई असताना आणि ती गेल्यानंतरही आजपर्यंत डीव्हींनी कधीही तो काढला नाही.

जेव्हां जेव्हां डीव्ही आईला भेटायला जात, तेव्हां तेव्हां आई त्या स्वस्तिकाकडे बघूनच म्हणायची,

” मोठा झालास. नाव कमावलंस, खूप मोठी ओळख स्वतःची मिळवलीस, राज्य उभं केलंस.  आज कितीतरी लोकांची कुटुंबं तुझ्यावर अवलंबून आहेत, पण लक्षात ठेव यात आपलं काही नसतं बरं! सारं तो करतो! त्याला विसरू नकोस. सदैव जमिनीवर राहा.  आयुष्यात वाटा खूप असतात रे!  पण सरळ वाटेवर चालत रहा.”

डीव्हींनी कूस बदलली. पहाट व्हायची ते वाट बघत होते. उद्या सकाळी अकरा वाजता कोर्टात अंतिम सुनावणी आहे. न्यायालयीन चौकशी समोर त्यांना सामोरे जायचं आहे.अॅडव्होकेट झुनझुनवालांचा रात्रीच फोन आला होता.

” डीव्ही, तशी आपली बाजू भक्कम आहे. तुमच्याकडून मुद्दामहून  गुन्हा झालेला नाही.  फसवणूक करण्याचा तुमचा हेतूही नाही.  तुम्ही फक्त एका अचानक आलेल्या वादळात अडकलात आणि मग एक एक पाऊल निसटत गेलं .हे सर्व आपल्याला खंडपीठांसमोर नीट विश्वासार्ह पद्धतीने मांडायचं आहे.  निर्णय काय लागेल ते आत्ताच सांगू शकणार नाही. पण प्रयत्न करूच.  आणि अपेक्षित प्रश्नांना कसे सामोरे जायचे, काय उत्तर द्यायचे याची पूर्वकल्पना मी तुम्हाला दिलेलीच आहे.  तेव्हां धीर ठेवा, सावध राहा.   लेट अस होप पॉझिटिव्ह!”

वास्तविक या व्यवसायात येण्याचं कुठलंही स्वप्न डीव्हींनी कधीच पाहिलं नव्हतं.  दिन्या नावाचा एक मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातला माणूस काय स्वप्न बघणार? एक पदवी, एक नोकरी, एक घर, समंजस पत्नी, गुणी मुलं, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ आणि अखेर एक समाधानी निवृत्ती!  पण सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असूनही कुठेही नोकरी मिळत नव्हती.  प्रचंड नैराश्य आलं होतं.  अजूनही आपण कुटुंबाचा आधार बनू शकत नाही या भावनेने जगताना निरुपयोगी असल्यासारखं वाटत होतं.  अगदी आत्मघाताचेही विचार मनात घोळत होते.  आत्मविश्वास पार डळमळला होता  त्याचवेळी गळ्यातल्या स्वस्तिकाला सहजपणे केलेला तो स्पर्श एकाएकी खूप आश्वासक वाटला होता.  त्याही क्षणी क्षणभर मनात आलं होतं,’ खरंच असं काही असतं का? तर्कबुद्धीच्या पलीकडे या संकेतांना नक्की काय अर्थ असतो?’

पण योगायोगाने वासू भेटला.  एका इराण्याच्या हॉटेलात. दिन्या  चहा पीत होता.  वासूनेच जोरात हाक मारली,

“अरे दिनकर?”

दिन्या निराशच होता.  नुकतीच नोकरीसाठी एक मुलाखत देऊन तो आला होता.  आणि अपयशाचीच शंभर टक्के खात्री होती.  त्यामुळे चेहरा उदास, पडलेला, निराश.

“अरे दिनकर? दिनेश स्कॉलर? काय चाललंय तुझ्या आयुष्यात? काय करतोस? कुठे असतोस? “

दिन्या शांतपणे म्हणाला होता,

“काहीही नाही.”

आणि मग दिन्याने जे आहे ते सारं वासूला सांगितलं.

भरदार अंगाच्या, धष्टपुष्ट, उंच ताड वासुने दिन्याच्या हातावर जोरात टाळी मारली.  आणि तो म्हणाला,

“अरे भावड्या!  हे बघ माझ्याकडे सॉल्लिड प्लॅन्स आहेत. या गावकूसाच्या बाहेर,  माझ्या नावावर आजोबांनी ठेवलेली एक जमीन आहे.  तो भाग पुढच्या दहा वर्षात प्रचंड गजबजणार आहे.  काही वर्षांनी ती उद्योगनगरीच होणार आहे.  सोन्याचा तुकडा आहे बघ.  आपण ती डेव्हलप करूया.”

“म्हणजे नेमकं काय ?”

“म्हणजे आपण एक प्रोजेक्ट करूया.  एक स्वयंपूर्ण नगरच बसवूया.  सदनिका, रो हाऊसेस, सर्व प्रकारची दुकानं,  मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी सुविधा, शिक्षण, आरोग्य याचा परिपूर्ण विचार करून थाटलेलं एक संपूर्ण नगर!”

वासुने जणू एक स्वप्नच दिन्याच्या हातात ठेवलं.

“हे बघ , जमीन माझी डोकं तुझं.  आजपासून तुझी आणि माझी टीम.  काय भावड्या जमतंय् का?”

“हो पण माझ्याकडे काहीच भांडवल नाहीय “

“त्याची काळजी तू करू नकोस.  तू कामाला लाग.  असा पॅव्हलीन  मध्येच आऊट होऊ नकोस.  मैदानात ये.  खेळ जमव. आपण साइटवर जाऊ आणि ठरवू  पुढचं.”

दिन्या काही बोलणार तोच त्याचं लक्ष वासूच्या गळ्यातलल्या ताईताकडे गेलं. अगदी हुबेहूब.  काळा दोरा आणि सोन्याचा सुरेख नक्षीदार स्वस्तिक. सहजच एक तार जुळली. प्रवाहाला प्रवाह मिळाला. आणि सुरुवात झाली.

आयुष्यात असही काही घडू शकत यावर विश्वास बसत नव्हता. पण ते घडलं. या पहिल्याच  स्वस्तिक प्रोजेक्टला उदंड प्रतिसाद मिळाला.  वासूने कायदेशीर बाबी, जाहिराततंत्र,  बुकिंग, सेल्स, पैशाचे नियोजन, बँकांचे व्यवहार सर्व काही अत्यंत कौशल्याने सांभाळलं.  आणि दिन्याने बौद्धिक, कल्पक, तांत्रिक, वेगवेगळे शास्त्रोक्त आराखडे, एलेवेशन्स, व्हिजीयुलायझेशनची सारी तंत्र चोख पाळली. यशाची एक वाट नव्हे, महावाटच सुरू झाली.  स्वस्तिक बिल्डर्स हे नाव प्रचंड गजबजलं. पेपरात फोटो, मुलाखती, पुढच्या प्रोजेक्टचे विचार वगैरे वगैरे सर्व काही विनासायास प्रवाहाबरोबर घडतच गेलं. 

“शहरात प्रथमच, ईको फ्रेंडली,निसर्गाच्या सान्निध्यात आगळे वेगळे आपलं घर!”अशी होर्डींग्ज झळकू लागली.

दिन्याचा डीव्ही झाला.  वास्तविक डीवी म्हणजे दिनकर आणि वासू. आणि दोघांचे मिळून स्वस्तिक, पण व्यावसायिक विश्वात, परिसरात, समाजात, देशात,  विदेशात डीव्ही याच नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली. दिनकर एक दिवस वासूला म्हणालाही होता,

“आपण दोघे म्हणजे वन सोल ईन टु बॉडीज् दोन रेषा,एका बिंदुतल्या.”

आणि नकळत दोघांनी आपले गळ्यातले स्वस्तिक असलेले ताईत सहज आनंदाने उचलले.

सगळं आयुष्यच बदलून गेलं.  राहणीमान, जीवन पद्धती, सारं सारं बदललं.  एका टिंबापासून झालेल्या सुरुवातीनं आख्खा पृथ्वी गोलच जणू पादाक्रांत केला.  देश विदेशात स्वस्तिक प्रोजेक्ट्स उभारले गेले.  पन्नास मजली टॉवर्स,  फिरती पंचतारांकित हॉटेल्स,  आरकेड्स,  हॉल्स, बँक्वेट्स हॉस्पिटल्स, आणि त्याचबरोबर इनसाईड आऊटसाईड मधले गुळगुळीत फोटो. 

दिन्या नावाचं मिटलेलं कमळ डीव्हींच्या रूपात उमलत गेलं.

कुटुंब आणि परिवाराबरोबरच एक व्यावसायिक आणि सामाजिक चेहरा दिन्याला प्राप्त झाला. काही हजारांचे कित्येक हजार कोटी झाले. 

एक दिवस डीव्ही असेच, नदीकिनारी असलेल्या त्यांच्या आलिशान बंगल्याच्या पॅटीओमध्ये शांत बसले होते. समोरच्या भिंतीवरचे म्युरल ते पाहत होते.  वास्तविक ते म्युरल म्हणजे त्यांच्या व्यवसायाचा लोगोच होता. एक सुरेख स्वस्तिक.  सूर्य, चंद्र, वायु, पृथ्वी,  लक्ष्मी,  विष्णु ब्रह्मदेव,  शिवपार्वती,  श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असणारं, शांती, समृद्धी आणि मांगल्यांचं  प्रतीक स्वस्तिक!  एकमेकांना छेदणाऱ्या दोन सरळ रेषा पुढे जाऊन विरुद्ध दिशेला वळलेल्या.

“स्वस्तिक क्षेम कायति इति स्वस्तिक:”

कुशलक्षेम, कल्याणाचे प्रतिक.

डीव्हींच्या आत, आईचा दिन्या अजूनही होता.  त्या दिन्याने मात्र समाजाभिमुख अनेक कामेही केली. लोकाभिमुख संस्थांना आर्थिक योगदान  दिले.  कितीतरी लाचार ओंजळी त्याने भरल्या.  कला, क्रीडा, धर्म, संस्कृती सर्व क्षेत्रात त्यांनी अर्थदान केले.  

भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला.  क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व.  अखंड सोबत.  एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला.

  स्वस्तिक   क्रमश: भाग १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजीची माया… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आजीची माया… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.) इथून पुढे —

दुपारची वामकुक्षी घेऊन संध्याकाळी सगळेच जण हॉलमध्ये चहाला एकत्र जमले. अनसूया एका टोकाला तर प्रियंवदा दुसऱ्या टोकाला बसते हे सरस्वतीच्या केव्हाच लक्षात आलं होतं. सगळेचजण गुपचूप बसले होते.

अनसूयेचा मुलगा चिन्मय लहानपणापासून भारी चुणचुणीत आणि चौकस. तो कुणालाही बोलकं करायचा. त्यानं सरस्वतीला विचारलं, “आज्जी, तुझी आणि आजोबांची भेट पहिल्यांदा कुठं झाली होती ग?” त्याचा हा प्रश्न अगदी अनपेक्षितच होता.

“तू कधीही काहीही विचारतोस रे? काय करणार आहेस ते ऐकून?” सरस्वतीनं दटावलं.

त्यानं हसतहसत सांगितलं, “अगं आता लवकरच माझं वधू संशोधन सुरू होईल ना! मग थोरामोठ्यांचा अनुभव नको का ऐकायला?” सगळ्याच मुलांनी सरस्वतीचा पिच्छा पुरवला.

सरस्वतीच्या डोळ्यांसमोर पंचावन्न वर्षापूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला. ती म्हणाली, “आमच्या घराजवळच आमच्या दोन्ही कुटुंबियांचे परिचित असलेले एक शिक्षक दांपत्य राहत होते. पहिल्यांदा तुमचे आजोबा मला त्यांच्या घरीच पाहायला आले होते.

सुरूवातीची ओळखपरेड म्हणून त्या सरांनी उभयतांना नाव, शिक्षण आणि नोकरी याविषयी विचारून घेतलं. अर्थात त्यांनी आधीच एकमेकांविषयी ती जुजबी माहिती दिलेलीच होती.

 त्यानंतर सरांनी आम्हा दोघांना पेन आणि दोन चिठ्ठ्या दिल्या आणि ‘एका ओळीत तुमचा सर्वात चांगला गुण कोणता ते लिहून द्या’ असं म्हणाले.

तुमच्या आजोबांनी लिहिलं होतं, ‘मला कधीच कुणाविषयी असूया वाटत नाही कारण मी कधीच कुणाशी तुलना करत नाही. ’ आणि मी लिहिलं होतं, ‘माझ्याशी कुणीही कितीही वाईट वागलं तरी मी मनात काही न ठेवता त्यांच्याशी गोडच वागते, बोलते. ’ 

झालं, सर आनंदाने म्हणाले, ‘संसारात एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी ह्यापेक्षा आणखी कसले गुण हवेत सांगा? छत्तीस गुणाने कुंडली जुळलीय, असंच समजायचं. ‘ त्यानंतर थेट लवकरच लग्नाची बोलणी झाली आणि लग्न ठरलं!” 

“वॉव, आजी तुझी स्टोरी खूप सिंपल आहे पण इंटरेस्टिंग आहे. मामांच्याविषयी, माझी आई आणि मावशीबद्दल काहीतरी सांग ना ग. ”

“आमचं लग्न झाल्यावर, तुझ्या मामांचा जन्म झाला. ‘आयुष्यात कसल्याही प्रसंगात न डगमगता धीर एकवटून राहणारा पुरुष यशस्वी होतो’, असं सांगत त्यांनी बाळाचं नामकरण सुधीर असं केलं. मामाने केलेली धडपड, कष्ट आणि त्याची प्रगती सगळ्यांच्या समोरच आहे. तुमचे आजोबा गेल्यानंतर तो किती धीराने आणि ठामपणे उभा राहिला. आज त्यानं त्याच्या कर्तबगारीवर आम्हा सर्वांना सुस्थितीत आणून ठेवलं आहे.

सुधीरच्या नंतर तुझ्या आईचा जन्म झाला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही चिठ्ठीत लिहिलेला सदगुण आठवतोय का? तेच नाव हिला देऊ या. कुणाविषयी असूया वाटत नाही अशी ती ‘अनसूया’.

त्यानंतर दोन वर्षाने तुझ्या मावशीचा जन्म झाला. यावेळी त्यांनी सुचवलं, ‘सरस्वती, ह्यावेळी तू चिठ्ठीत लिहिलेल्या सदगुणावर हिचं नाव ठेवू या. कुणीही कितीही वाईट वागलं तरी मनात काही न ठेवता त्यांच्याशी गोड वागणारी, बोलणारी अशी ती ‘प्रियंवदा’.

आता आणखी काय सांगू? तुम्ही मुलं सूज्ञ आणि संस्कारी आहात. नेमकं काय घडतंय ते तुमच्या पुढ्यातच आहे. माझं कोण ऐकतो आता? जशी ईश्वरेच्छा!” सरस्वतीने सुस्कारा टाकला.

चिन्मयनं सांगितलं, “आजी, तुला एक सिक्रेट सांगू? अगं, आम्ही सगळीच मुलं एकमेकांच्या सतत संपर्कात आहोत. अधूनमधून फोनवरून बोलत असतो. आम्हा सगळ्यांना सरस्वती आज्जींच्या मायेच्या घट्ट धाग्याने बांधून ठेवलंय. तो सहजासहजी नाही तुटणार. ” 

सरस्वतीनं चिन्मयच्या गालावरनं हात फिरवून कानशिलावर कडाकडा बोटं मोडली. “किती गुणी आहेस रे राजा. माझी सगळीच नातवंडं गुणी आहेत, संस्कारी आहेत. कुणाला काहीही वाटो. मला खात्री होती. माझी नातवंडं मार्कांच्या पलीकडे जाऊन आपलं स्वत:चं स्थान निर्माण करतील म्हणून. ” तणावाचं वातावरण थोडंसं निवळलं.

इतका वेळ दुसऱ्या टोकाला बसलेली प्रियंवदा उठून अचानक अनसूयेसमोर हात जोडून उभी राहिली आणि भरल्या डोळ्यांने पुटपुटली “ताई, मला माफ कर, माझी चूक झाली. ” 

अनसूया प्रियंवदेला मिठीत घेत म्हणाली, “वेडाबाई, चूक माझीच आहे. मीच तुझी माफी मागते. ” सगळ्या मुलांना हे अनपेक्षित होतं. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

तितक्यात सुजाता ट्रे घेऊन बाहेर आली. गरम गरम लापशीचा घमघमाट सुटला होता. बाऊलमधला पहिला घास घेताच, प्रियंवदेचा मुलगा अभिराम बोलून गेला, “आजी, इतक्या वर्षानंतरदेखील तुझ्या हातच्या लापशीच्या चवीत काहीच फरक पडलेला नाही. व्वाह, मजा आ गया. थॅंक्स. ” 

 “तुझ्या मामीला थॅंक्स सांग. ती मला स्वयंपाकघरात पाऊलही टाकायला देत नाही. ” 

खरंतर, मामाची बायको सुजाता मामी सुगरण तर होतीच पण ती रोज रोज पोळी शिकरण करायची नाही. ती रोज वेगवेगळे पदार्थ करायची. महाराष्ट्रीयन पुरणपोळीपासून साऊथ इंडियन, गुजराती, पंजाबी, चायनीज असे एक ना अनेक पदार्थ बनवायची. 

मागच्या इतक्या वर्षात पडलेला गॅप विसरून मुलं एकमेकांच्या सहवासात रंगून गेली. कॅरम बोर्ड बाहेर निघाला. आता मामांनी खास मिनि-थिएटरच बनवून घेतलं होतं. अनेक वाहिन्यांवर अनेक चित्रपट हारीने मांडून ठेवलेले असतात. रोज एक दोन सिनेमे, कॅरम, पत्ते कुटणं ह्यात तीन दिवस भुर्र्कन उडून गेले. सुधीर आणि दोघ्या बहिणी पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात मश्गुल होते.

दुधात साखर म्हटल्यासारखं, कार्यक्रमाच्या दिवशी दोन्ही जावईही येऊन दाखल झाले. घर मंगल तोरणांनी, पताकांनी सजवलेलं होतं. सनईचे मंद सूर आसमंतात विरत होते. सरस्वती आसनावर बसताच “शतमानं भवति शतायु:.. ” असा धीर गंभीर मंत्रध्वनी होत असताना उपस्थितांनी तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांची बरसात केली. त्यानंतर सरस्वतीनं भला मोठा केक कापला. सगळ्याच नातवंडांनी मिळून ‘तुम जियो हजारो साल’ या गाण्यांवर नाचत धमाल उडवून दिली.

वसंतरावांच्या आठवणीने सरस्वती क्षणभर हळवी झाली. ‘सरस्वती, आपण भाग्यवान आहोत. आपली मुलं गुणी आहेत. महत्वाचं म्हणजे वडिलधाऱ्यांचा आदर करणारी आहेत. ’ त्यांचे हे शब्द तिच्या कानांत घुमत होते. दिवाणखान्यातल्या वसंतरावांच्या तसबिरीकडे पाहून तिने आपसूकच दोन्ही हात जोडले तेव्हा वसंतरावांचा आधीच हसरा चेहरा आणखीनच उजळून गेला होता.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आजीची माया… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“आई, येत्या सत्तावीस एप्रिलला अनु आणि प्रिया विथ फॅमिली आपल्याकडे येणार आहेत!” सुधीरनं मोठ्या उत्साहात सांगितलं. 

“गेल्या कित्येक वर्षात त्या एकत्र कधीच फिरकल्या नाहीत. तर आताच दोघींना एकाचवेळी यायचं कसं सुचलं? तेहि असं अचानक?” सरस्वती खिन्न मनाने बोलली.

“अगं असं काय करतेस? येत्या तीस एप्रिलला तुझी पंचाहत्तरी साजरी करायचीय आहे ना?”

“माझी पंचाहत्तरी साजरी करायची काही आवश्यकता नाही. मी वयाने वाढले आहे, त्यात माझं काय कर्तृत्व आलंय? तो काळाचा नियम आहे, त्यात माझी काहीच कर्तबगारी नाही.” सरस्वती अनिच्छेनेच बोलली.

“आई तू म्हणतेस ते खरं आहे. अगं कृतज्ञतेचा म्हणून एक भाग असतो. आई वडिलांची पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन असे कौतुकसोहळे प्रियजनांना साजरे करावेसे वाटतात. आई, हे सगळं या दोघी बहिणींनी मिळून हे ठरवलंय. त्या दोघींचं ह्या निमित्ताने मनमिलाप झालं असेल तर मी कसं नाही म्हणू?” सुधीरनं सांगितलं. पण सरस्वतीला ते खरं वाटलं नाही. ती काहीच बोलली नाही.           

सुधीरनं लगेच अनुला फोन लावला. “अनु, तुम्ही सहकुटुंब सत्तावीस एप्रिलला इथे हजर असणार आहात. मी कसलीही सबब ऐकून घेणार नाही. येत्या तीस एप्रिलला आईची पंचाहत्तरी साजरी करायचीय. अनु आणि प्रिया या दोघींनीच हा कार्यक्रम आखला आहे म्हणून मी आईला पटवून सांगितलंय. ती किती खूश झाली, हे तुला कसं सांगू? तुम्ही दोघी आता एकत्र येणार नसाल तर कधी येणार आहात गं, आई गेल्यावर?.. खूप झालं तुमचं नाटक. तुम्हा सगळ्यांची रेल्वेची तिकीटं मी उद्या बुक करतोय. समजलं?” अनु काही बोलायच्या आतच सुधीरनं फोन ठेवून दिला. प्रियाला फोन लावून त्यानं तेच संभाषण रिपीट केलं.             

कित्येक वर्षानंतर, नागपूरहून अनसूया आणि नाशिकहून प्रियवंदा त्यांच्या मुलांच्या सोबत एकाच दिवशी माहेरात येऊन पोहोचल्या. दोन्ही लेकी, चारी नातवंडांना पाहून सरस्वतीच्या चेहऱ्यावर आनंदाचं प्रसन्न चांदणं पसरलं. कधीकाळी उन्हाळ्याच्या सुटीत ही मंडळी दरवर्षी न चुकता यायची आणि जाताना एकाच दिवशी जायची.

नातवंडांनी भरलेलं गोकुळ पाहून सरस्वतीला काय करू, काय नको असं व्हायचं. कुठल्या दिवशी काय बेत करायचा ते सरस्वती आधीच ठरवायची. त्यानुसार सून सुजाता कामाला लागायची. 

त्या मेनूत सरस्वती एकदा तरी न्याहरीला गव्हाची गूळ घालून केलेली लापशी स्वत:च्या हातानं बनवायचीच. त्यात काजू बदामाचे तुकडे पेरलेले असायचे, त्यावर तुपाची धार पडताच खमंग वास सुटायचा. सुरूवातीला एका बाऊलमधे  लापशी घेऊन सरस्वती आपल्या मऊशार सायीसारख्या हातानं ती सगळ्या नातवांना प्रेमानं एक एक घास भरवायची. दोन्ही मुलींची चार आणि सुधीरची दोन मुलं अशी एकंदरीत सहा नातवंडे डायनिंग टेबलवर पाहून सरस्वतीचा जीव आनंदाने भरून जायचा. 

सरस्वतीच्या तिन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी ह्याचं वरदान लाभलेलं होतं. सगळी मुलं एकाच वयाची होती. फार तर दोन तीन वर्षाचं अंतर. सरस्वतीला मुद्दलाचा विसर पडला होता, ती व्याज पाहूनच हरखून जायची.   

सुधीरमामा तालेवार नसला तरी मोठा दिलदार माणूस. आणि भाचरांवर जीव ओवाळून टाकणारा. उन्हाळा म्हटलं की आंब्याचेच दिवस. भाचरं यायच्या आधीच हापूस आंब्यांच्या पेट्या आणून ठेवायचा. सुधीरमामाला आंब्याची छान पारख होती. आमरसासाठी हापूस तर कापून खायला केशर, बदाम, लालबाग, लंगडा, तोतापुरी घेऊन यायचा. प्रत्येक आंब्याची वेगळीच चव असायची. आंब्यांचा घमघमीत सुवास सर्वत्र दरवळत असायचा. सगळी मुलं एकत्र बसून हसतखेळत कधी आमरस पुरी तर कधी आमरस धिरडं आणि त्या सोबत कुरडया, पापड्या, मिरची भजी, मसालेभात हादडायचे. वामकुक्षी म्हणत मुलं तासभर झोप काढायचे. कधी त्यांचे पत्त्यांचे डाव रंगत असत तर कधी कॅरम बोर्ड लागायचा. 

संध्याकाळ झाली की सगळी मुलं आजीबरोबर शुभंकरोती म्हणायचे. आजी-आजोबा चांदण्याच्या आकाशाखाली बसून रामायण महाभारतातल्या कितीतरी गोष्टी सांगायचे. मामा व्हीसीआर सोबत एकाद्या सिनेमाची व्हिडियो कॅसेट भाड्याने घेऊन यायचा. सिनेमा पाहून झाला की रात्रीच्या जेवणाची वेळ व्हायची. कुणालाच तशी जास्त भूक नसायची. कधी पावभाजी तर कधी साधी खिचडी किंवा थालीपीठ खाल्लं की भागायचं. 

गच्चीवर संध्याकाळी पाईपने पाणी मारून ठेवल्याने सगळी मुलं रात्री झोपायला ते गच्चीवरच जात असत. तोवर गच्ची थंड झालेली असायची. त्यावर मस्त गाद्या पसरून मुलं ठिय्या मांडत असत. गप्पा गोष्टी करत, रेडिओवर विविध भारतीची गाणी ऐकत पडायचे. थंड हवेच्या झुळकीने झोप अनावर झाली की आकाशातले नक्षत्र, तारे मोजत हळूहळू डोळे मिटत मस्त झोपायचे. सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडल्यावरच उठायचे. कुणीही उठवायला यायचा नाही.

सर्व मुलांच्या दरम्यान एक अतूट स्नेहाचा घट्ट धागा होता. दोघा बहिणींचं अतिशय घट्ट सख्य होतं. प्रियंवदेची मुलं अभ्यासात खूप हुशार होती. प्रियंवदा मोठ्या उत्साहाने तिच्या मुलांची प्रगती अनसूयेला सांगायची. बघता बघता मुलांच्यातल्या निरोगी स्पर्धेचं रूपांतर कधी असूयेत झालं हे कुणाला कळलंच नाही. दोघा बहिणींच्या नात्यात खोल दरी निर्माण होत गेली. मुलांचं आजोळी येणं बंद झालं. 

संस्कार वर्ग, पोहण्याचे क्लासेस, गिटार क्लासेस, व्हेकेशन बॅचेस, त्यासाठी एक ना अनेक कारणं होती. त्यामागचं खरं कारण वेगळं होतं हे कळायला सरस्वतीला वेळ लागला नाही. अनसूयेच्या मनात असूयेनं स्थान मिळवलं. ताईला माझ्या मुलांची प्रगती पाहवत नाही हे प्रियंवदेच्या मनात घर करून राहिलं. 

मुलं आता आपापल्या दुनियेत व्यस्त झाली. नोकरीही करत होते. कुणी सॉफ्टवेअर तरी कुणी कुठे. नात्यात ईर्ष्या आणि गैरसमजाचा कळी शिरला की त्यात दुरावा हा येतोच.     

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(एक दिवस आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून.) इथून पुढे – 

मी दहावीची परीक्षा दिली होती. मी मामाकडे आले. त्याच्या संसारात मी जडच होते त्यांना ! मामा म्हणाला, “ बकुळ,आपण लग्न करूया तुझं ! “ पण बाई, हे असले किळसवाणे अनुभव घेऊन मला पुरुष देहाबद्दल प्रचंड तिटकारा वाटायला लागला होता..मी  मामाला सांगितलं, “ मी जन्मात नाही लग्न करणार. तू जर माझं लग्न बळजबरीने लावलंस तर मी जीव देईन.”  त्यांना दोघांना मी घडलेली हकीकत सांगितल्यावर तर रडूच आलं त्यांना. मी गावाकडे केली बारीकसारीक कामं, पण तिथे कोण देणार एवढा पैसा? मग मला एका बाईंनी पुण्याला आणलं. त्या मावशींनी छान  काम दिलं आणि तुमच्यासारखी चांगली माणसं पण मिळाली. बाई, मी कायम राहीन तुमच्याकडे. मला आता दुसरीकडे नका ना पाठवू. “ 

देवकीच्या डोळ्यात पाणी आलं. “ बकुळ, तू फार गुणी आणि हुशार आहेस. तू असं आयुष्य वाया नको घालवू ग. पुढे शीक, असं काहीतरी शिक्षण घे की तुला सन्मानाने जगता येईल. मी शिकवीन, सगळी मदत करीन तुला. शिकशील का पुढे? बघ ! किती मार्क होते तुला दहावीला? “ बकुळ म्हणाली “ ऐशी टक्के “     “अग वेडे, मग तर तू घरकाम नाहीच करायचं. आपण तुला डी एड ला घेऊया प्रवेश. करशील ना? दोन वर्षे शिकावे लागेल पण जन्माचं कल्याण होईल ग बाळा तुझं !” 

“ बाई,मी नक्की करीन तुम्ही म्हणताय तर ! तुम्हाला अपयश देणार नाही मी .आणि तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन मी! “ 

“ वेडे, ते बघू नंतर. मला काय कमी आहे बकुळ? तू फक्त  वीस वर्षाची आहेस जेमतेम. बघूया काय  करता येतं ते.” एका प्रख्यात कॉलेजमध्ये बकुळला डी एड ला सहज प्रवेश मिळाला. बकुळ लवकर उठून जमेल तेवढं काम करून कॉलेजला जायची. राहीने आनंदाने बकुळला आपली सायकल दिली. तिने नवीन टू व्हीलर घेतल्याने सायकल पडूनच होती तिची.  बघता बघता बकुळच्या डीएडचं पहिलं वर्ष संपलं. बकुळला खूप सुंदर मार्क्स मिळाले. आता ती त्या कॉलेजमध्ये रुळून गेली. तिला काही वेळा वाटायचं, आपण काम करणारी मुलगी आहोत, आणि दिवसभर हा कोर्स करत असल्याने आपला घराला पूर्वीसारखा उपयोग होत नाही. ही  खंत ती बोलून दाखवायची देवकीला. देवकी तिला म्हणायची, “असं नको म्हणू. माझी मुलं लहान असताना तू खूप मदत केली आहेस बकुळ ! आता निवांत शीक, लक्ष लावून अभ्यास कर बेटा. सगळं छान होईल तुझं बघ.” बकुळ चांगल्या मार्कानी डीएड झाली. तिला एका शाळेत नोकरीची ऑफर सुद्धा आली.

.बकुळ पेढे घेऊन आली आणि तिने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ अग वेडे, हे काय करतेस? “ देवकीने तिला पोटाशी धरलं. “ नाही हो बाई, मी बघते ना, आमच्या डी एड कॉलेजमध्ये कुठून कुठून मुली येतात हो ! त्या किती कष्ट करून शिकतात, कोणी पहाटे मेसमध्ये दोनशे पोळ्या करून येतात, तर कोणी चाकणहून रोज अपडाऊन करतात. किती हाल आहेत बाई बाहेर ! कोणाचे वडील दारुडे तर कोणाची आईच अपंग ! किती किती सोसतात हो मुली बाहेरच्या जगात !” बकुळच्या डोळ्यात पाणी होतं हे सांगताना. “ बाई,एक मुलगी तर पोलिओ झालेली आहे पण किती जिद्दीने शिकतेय. मी तर किती भाग्यवान आहे हो, तुमच्या घरी सुरक्षित राहून शिकले आहे. मुलीसारखी मानता मला तुम्ही. बाई, हे बघा ना माझं  लेटर. मला पंधरा हजार पगार देणार आहेत सुरुवातीला. मी करू ना ही नोकरी? “ 

“ अग जरूर कर बकुळ ! खूप खूप अभिनंदन तुझं ग !” 

“ बाई,”  संकोचून बकुळ म्हणाली.. “ मी आता इथे किती दिवस रहाणार? मी डी एड कॉलेजच्या वसतिगृहात राहीन आता. मला ते कमी खर्चात तिकडे राहू देणार आहेत. आता आणखी नका लाजवू.  जाऊ द्या मला आता बाई !” बकुळ रडायला लागली. सगळं घर तिच्याभोवती जमलं.आजींना सुद्धा गहिवरून आलं… “ जा तू बकुळ. अशीच स्वतःच्या पायावर उभी रहा.” आजींनी तिला पाचशे रुपये बक्षीस दिले. “ सुट्टीच्या दिवशी येत जा हो रहायला हक्काने!” त्या म्हणाल्या.

देवकीने बकुळला छानशी बॅग दिली, छान साड्या घेऊन दिल्या. बकुळ होस्टेलवर राहायला गेली. तिने देवकीशी कायम संपर्क ठेवला. बकुळ आता पर्मनंट झाली नोकरीत.  मग तिचं फारसं  येणं जाणं होऊ शकेना देवकीकडे. देवकीची मुलं मोठी झाली. रोहन राही पुढचं शिकायला अमेरिकेला गेले आणि घरात देवकी आणि तिचा नवरा एवढेच उरले. आजीही मध्यंतरी कालवश झाल्या.

आज अचानक खूप वर्षांनी बकुळ देवकीला भेटायला आली. “ बाई, कशा आहात? “ म्हणून तिने मिठीच मारली देवकीला. “  बाई मी आता एका शाळेत सुपरवायझर झाले, आणि मी त्या शाळेच्या हॉस्टेलची मेट्रन म्हणून पण काम करते. मला शाळेने रहायला क्वार्टर्स पण दिले आहे बाई ! तुमची कृपा सगळी … “ बकुळच्या डोळ्यात अश्रू होते. “ बाई, मला लग्न कधीच नाही करावंसं वाटलं नव्हतं आणि आत्ताही वाटत नाहीये. मी आता अशीच मस्त राहीन. नको वाटतो तो अनुभव मला. आणि खूप मिळवतेय की मी ! बाई तुमचे उपकार कसे फेडू? नाही तर ही बकुळ अशीच घरकाम करत, कदाचित अशीच मरूनही गेली असती. तुम्ही देवमाणसं आहात बाई ! “ बकुळने देवकीच्या पायावर डोकं ठेवलं. “ बाई डोळे मिटा ना जरा….”   बकुळ हसत म्हणाली.

देवकीने हसत डोळे मिटले. बकुळने तिच्या हातावर काय ठेवले हे बघायला डोळे उघडले तर हातात सोन्याचे चांगलेच जड नाणे होते. “ बाई, तुम्ही माझ्यासारख्या दगडातून सोनं घडवलं म्हणून हे माझी आठवण म्हणून तुम्हाला ! नाही म्हणू नका  ना ! तुम्ही केलंत ना, त्यापेक्षा याची किंमत कमीच आहे, पण आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मला घडवणाऱ्या पहिल्या गुरूला ही गुरुदक्षिणा ! ” 

देवकीने बकुळला जवळ घेतले आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. “आनंदाश्रू आहेत हे बकुळ… नको पुसू !” देवकी म्हणाली आणि आत चहा करायला वळली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥गुरुदक्षिणा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ॥ गुरुदक्षिणा ॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

दारावरची बेल वाजली. आत्ता दुपारी कोण आलं असेल म्हणून देवकी जरा वैतागूनच दार उघडायला गेली. . . दार उघडलं तर दारात बकुळ उभी.

जवळजवळ सात आठ वर्षांनी देवकी बकुळला बघत होती. पहिल्यांदा तर तिने बकुळला ओळखलंच नाही. केवढा बदल झाला होता बकुळ मध्ये ! छानसं पोनीटेल, एका हातात घड्याळ आणि गळ्यात सोन्याची चेन. अंगावर सुंदर साडी आणि प्रसन्न हसतमुख चेहरा !

कुठे पूर्वीची कामवाली बकुळ !  शेपटा वळलेला, मोठं कुंकू आणि  हातभर बांगड्या. बकुळ देवकीकडे दिवसभर कामाला होती. देवकी होती भूल देणारी डॉक्टर. चोवीस तास तिला केव्हाही कॉल यायचे. देवकीची मुलं लहान होती आणि देवकीला चोवीस तास रहाणाऱ्या बाईची अत्यंत गरज होती. तिचे सासू-सासरे होते म्हणा, पण देवकीच्या सासरचा गोतावळा खूप होता. सतत पाहुणे, माणसांचे येणे जाणे असायचं आणि मग सासूबाईंना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ व्हायचा नाही. देवकीचा नवरा होता डोळ्यांचा डॉक्टर ! तोही दिवसभर घरी नसायचा.

देवकीने हजार लोकांना बाईबद्दल सांगून ठेवले होते. अशात कोणीतरी ही बकुळ पाठवली. आली तेव्हा बकुळ असेल सोळा सतरा वर्षाचीच. पहाता क्षणीच देवकीला आवडली ही मुलगी. मोठे डोळे, पण विलक्षण चमकदार ! 

देवकी म्हणाली, “ काय ग नाव तुझं? किती शिकली आहेस? कोणी पाठवलं तुला? “ 

“ बाई, मी बकुळ ! तुमच्या मैत्रीण नाहीत का उषाताई, त्यांनी पाठवलं मला. मी काम करत होते त्या मावशी मुलाकडे गेल्या कायमच्या. मला राहून असलेलं काम हवंय म्हणून मला उषाताईंनी पाठवलं. मी दहावी शिकले बाई, पण पुढं नाही शिकता आलं. मला. आईवडील नाहीत, मामाने वाढवलं आणि आता मामी नको म्हणती मला रहायला. रोज रोज भांडण करण्यापेक्षा मीच मग चोवीस तासांचं काम बघतेय “. . एका दमात बकुळने आपली माहिती सांगितली.

देवकीला अत्यंत गरज होती अशा बाईची ! ती म्हणाली  “ मी बघते तुला ठेवून घेऊन महिनाभर ! आवडलं, आपलं पटलं तर मग बघूया. मी कधीही केव्हाही बाहेर जाते. आजी आहेत कुरकुऱ्या, तुला पटवून घ्यावे लागेल हं ! “ बकुळ हसली आणि म्हणाली, “ बाई, उद्यापासून येऊ ना? “ देवकीला फार आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बकुळ हजर झाली. नीट नेटकी साधी साडी, जाड केसांचा शेपटा, त्यावर गजरा !देवकीचा बंगला मोठा होता, त्यामुळे बकुळला ठेवून घेण्यात देवकीला अडचण नव्हती. आल्याआल्या पदर बांधून देवकी म्हणाली, “ बाई, घर दाखवा ना आपलं ! स्वयंपाकघरात गेल्यावर आजींना तिनं खाली वाकून नमस्कार केला. आजींनी प्रश्नार्थक मुद्रेने देवकीकडे बघितलं.

“ आजी, ही बकुळ. आपल्याकडे राहून काम करणार आहे. तुमच्या हाताखाली ही मदत करील तुम्हाला स्वयंपाक घरात ! “ 

आजी म्हणाल्या, “ हो का? आत्तापर्यंत सतरा जणी आल्या, आता हिचा काय उजेड पडतो बघूया. ”  देवकीने बकुळकडे पाहिलं. बोलू नकोस अशी खूण केली आणि तिला तिची खोली दाखवली. देवकीने तिला काम समजावून सांगितलं. मुलांची ओळख करून दिली. तेवढ्यात फोन वाजलाच ! डॉ मराठ्यांकडे तिला लगेचच कॉल होता.

देवकी म्हणाली, “ बकुळ मी जातेय ! जमेल तसं कर. आले की बाकीचे सांगेन मी !” त्या दिवशी देवकीला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले. एक मिनिट फुरसत मिळाली नाही तिला. घरी आता काय काय झालं असेल म्हणतच देवकी घरी आली. हॉलमध्ये  देवकीची मुलं राही आणि रोहन बकुळ जवळ बसले होते आणि ती त्यांना गोष्ट सांगत होती आणि आजी सुद्धा ऐकत होत्या, मन लावून ! देवकीने सुटकेचा निश्वास टाकला. सुरुवात तरी चांगली झाली म्हणायची… देवकी हसून मनाशी म्हणाली. हळूहळू बकुळ घरी रुळायला लागली. देवकीच्या फोनजवळ डायरी असायची आणि त्यात सगळे तिचे कॉल्स वेळ, तारीख नोट केलेले असायचे. बकुळ हळूहळू हे करायला शिकली. आता देवकीला कोणताही फोन आला की बकुळ म्हणायची, “ एक मिनिट हं सर ! बाईंची डायरी बघून सांगते. मी ! उद्या आठ वाजता नाहीये कुठे कॉल. मी लिहून ठेवते तुमचा कॉल आणि बाई आल्या की मग करतीलच तुम्हाला कॉल. ! “ बाकीच्या डॉक्टरांना बकुळचे कौतुकच वाटायचे. ‘ देवकी, तुझ्या बकुळने फिक्स केलाय बरं कॉल ! मस्त तयार झाली ग तुझी ही असिस्टंट ! “ इतर डॉक्टरणी देवकीला हेव्याने म्हणायच्या. बकुळ हळूहळू उजवा हात झाली देवकीचा. घरात तर ती सगळ्यांची आवडती झालीच ! रोहन राहीला तर एक क्षण करमत नसे बकुळताई शिवाय, आणि आजीही खूष होत्या तिच्यावर ! देवकीला खूप लळा लागला बकुळचा. ती आता घरातलीच सदस्य नव्हती का झाली? मुलं मोठी व्हायला लागली. आता तर त्यांना सांभाळायची आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायची तशी गरजही उरली नाही. देवकी एक दिवस लवकर घरी आली होती. बकुळचे सगळे काम संपले होते. देवकीने तिला विचारलं, “ बकुळ, खूप दिवस तुला विचारीन म्हणते, पण मी तुझ्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही चौकशी केली नाही ग ! तू अशी लोकांकडे कामं करत किती वर्षे रहाणार बाळा? किती गुणी आहेस तू. काय ठरवलं आहेस तुझ्या पुढच्या आयुष्याचं बेटा? “ 

बकुळच्या डोळ्यात पाणी आलं. “ बाई, काय सांगू तुम्हाला ! फार हाल काढलेत हो मी ! माझे आई वडील खूप लवकर गेले आणि मी एकटीच मुलगी त्यांना. मग मामा मामीनं थोडे दिवस संभाळलं. त्यांनाही त्यांची मुलंबाळं होतीच आणि गरीबीही होतीच की पाचवीला पुजलेली. नाईलाजानं त्यांनी मला अनाथाश्रमात ठेवलं. पण मामी नेहमी यायची मला भेटायला, थोडे पैसे द्यायची, कपडे घ्यायची. ती तरी आणखी काय करणार होती? मी होते त्या आश्रमात मुलं मुली दोन्ही होती. मी आश्रमाच्या शाळेतच जात होते. हे सुंदर रूप सगळीकडे आड यायला लागलं हो बाई. एका रात्री एका मुलानं बळजबरी केली माझ्यावर ! मी आरडाओरडा केला. पण काही दिवसांनी हे वारंवार घडत गेलं. कोणाकडे दाद मागणार मी? एक दिवस तर आश्रमाचे माझ्या वडिलांच्या वयाचे  व्यवस्थापकच हे करायला लागले तेव्हा मी पळून गेले तिथून….

– क्रमशः भाग पहिला

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा.) — इथून पुढे – 

त्याच्या गावामध्ये त्याचे गुरु राहुल देव बर्मन यांच्याकडे वादक होते. आता ते मुंबई सोडून त्याच्या गावी स्थायीक झाले होते. स्वर, ताल, आलापी सर्व काही व्यवस्थित समजवत होते. त्यानी सर्व ज्ञान केदारला दिले होते. विश्वास मनात म्हणायचा, मी जशी राजापूरच्या खेड्यातून इतपर्यंत मजल मारली तसाच केदार. —शहरातील मुलं खूप नशिबवान. त्यांना हवी ती वाद्ये सहज उपलब्ध होतात. नाहीतर पालक वाद्य विकत घेऊन देतात किंवा आजूबाजूला हवे तेवढे क्लासेस आहेतच. शहरातील मुलांना इच्छा असेल तर मार्ग सहज मिळतो. आपल्याला हार्मोनियमवर बोटे फिरवायला वयाची १२ वर्षे लागली. त्यानंतर विविध राग. आणि तबला पेटी सोडून इतर वाद्ये फक्त लांबून बघायची. मुंबईत येऊन गुरु चरणदास यांच्या गुरुकूलमध्ये मात्र सगळी वाद्य सतार, संतुर, व्हायोलीन, बासरी, इलेक्ट्रीक गिटार, सिंथेसायझर हवी ती वाद्ये हात जोडून उभी होती. विश्वासला आपले रत्नागिरीतील गुरु ताम्हणकर बुवा आठवले. एकदा राजापूरात कीर्तन करायला आलेले. पेटीच्या साथीला कोणी नाही म्हणून आपण साथीला बसलो. लहान वयातील आपली बोटे स्वर बरोबर काढतात हे पाहून त्यांना आनंद वाटला. आपल्या वडिलांशी बोलून ते शनिवार रविवार रत्नागिरीत शिकवू लागले. वडिलांना एसटीचे भाडे देणे कठिण म्हणून आपण एसटीचे भाडे देऊ लागले. विश्वासच्या डोळ्यासमोर ताम्हणकर बुवा आले. असे गुरु अजून जगात आहेत म्हणून विद्यादान गरीबांना मिळते. 

विश्वासने आपला अंतिम रिझल्ट लिहायला घेतला. एवढ्यात केबिनचे दार उघडून सरदेसाई आत आला. या हिंदी चॅनेलवर सारे हिंदी भाषीक. फक्त रखवालदार मनोहर आणि या प्रोग्रॅमचा मॅनेजर सरदेसाई तेवढे मराठी बोलणारे. 

‘‘गुड मॉर्निंग जाधव’’

‘‘यस गुड मॉर्निंग सरदेसाई. अंतिम रिझल्ट पाच मिनिटात देतो. ’’

‘‘जाधव, त्यासंबंधातच मी बोलायला आलोय.’’

‘‘बोला.’’

सरदेसाईंनी केबिनचे दार आतून बंद केले आणि जाधव समोरच्या खुर्चीवर बसला.

‘‘जाधव, चॅनेलची इच्छा आहे, या स्पर्धेत निकिता पहिली यावी.’’

‘‘व्हॉट नॉनसेन्स, अरे निकिता माझ्याकडे सर्वात शेवटी आहे. तिचा स्कोअर ऐंशीच्या खाली आहे.’’

‘‘असू दे, अंतिम पाच मध्ये आलेला कोणीही विजेता किंवा विजेती होऊ शकतो.’’

‘‘बरोबर, पण गेल्या एक महिन्याचे मार्क निकिताला सर्वात कमी आहेत. आणि पहिल्या नंबरवर….’’

‘‘कोणीही असू दे, निकिताच विजेती होणार असे चॅनेलचे म्हणणे आहे.’’

जाधव ओरडला – ‘‘अरे का पण ? केदारवर हा अन्याय आहे.’’

‘‘याचे कारण, एन चॅनेलला दक्षिण भारतात विशेषतः ओरीसा, आंध्रप्रदेश या भागात हातपाय पसरायचे आहेत आणि निकिता ही ओरीसाची आहे. या स्पर्धेत ती विजेती झाली म्हणजे त्या भागातील लोक एन चॅनेल घरोघरी घेतली. आणि हा अंतिम फेरीचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहतील. 

‘‘चॅनेलच्या धंद्यासाठी खर्‍या गायकावर अन्याय? मग स्पर्धा घेता कशाला ? आणि परिक्षक हवे कशाला ? चॅनेलला वाटेल त्याला बक्षिसे देऊन मोकळं व्हायचं.’’

‘‘असे कार्यक्रम असले तरच टिआरपी जास्त मिळतो. लोक तहान भूक विसरुन टिव्ही पाहत राहतात. आम्हाला पण अशाच कार्यक्रमांना प्रायोजक मिळतात. विशेषतः लहान मुलांच्या स्पर्धेत लोक जास्त इमोशनल होऊन कार्यक्रम पाहतात. चॅनेल घरोघरी पोहचते. चॅनेलला खूप पैसे मिळतात. आणि परिक्षकांना पण मिळतात. ’’

‘‘अशा पैशांवर थुंकतो मी. मी पण कोकणातून गरीब घराण्यातून आलोय. दुर्गम भागात विद्या मिळवायची याला किती त्रास असतो ते मला माहिती आहे. मी केदारला ९० टक्केपेक्षा जास्त मार्क दिलेत. आणि निकिता ऐंशी टक्केच्या खाली आहे. माझ्या मार्कलिस्टवर केदारच पहिला येणार.’’

जाधवने पुन्हा मार्कलिस्ट समोर घेतली आणि तो अंतिम रिझल्ट तयार करु लागला. 

‘‘जाधव एक मिनिट थांब, हे फोटो पहा. मी पाच मिनिटांनी येतो. मग बोलू आपण.’’ त्याच्या समोर फोटोचे इनव्हलप ठेवून सरदेसाई केबिन उघडून बाहेर गेला. जाधवने इनव्हलप हातात घेतले आणि एका बाजूने उघडले. आतमधून चार फोटो बाहेर पडले. कसले फोटो म्हणून जाधव पाहू लागला आणि तो चमकला, त्याचे आणि एका कॉलगर्लचे एकामेकाच्या मिठीतले फोटो होते. त्याच्या लक्षात आले गेल्यावर्षी एक अल्बम लाँच व्हायचा होता त्यावेळी अलिबागच्या हॉटेलमध्ये पार्टी होती. पार्टीनंतर त्याच मध्ये हॉटेलमध्ये रहायचे होते. तो पार्टी संपवून त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्याच्या रुममध्ये ही कॉलगर्ल आधीपासून हजर होती. त्याला पाहताच ती त्याच्या गळ्यात पडत होती. पण त्याने तिला ढकलले. हा ‘‘हनीट्रॅप’’ आहे आणि यापासून लांब रहायला हवे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने आरडाओरड करुन इतरांना बोलावले. ती कॉलगर्ल चडफडत पळाली. तसे आपण पोलीसात कळविणार होतो पण अल्बमची मंडळी हात जोडू लागली. तसेच त्या हॉटेलची माणसेपण आमचे नाव खराब होईल पुन्हा येथे कोण येणार नाही तेव्हा पोलीसांना बोलवू नये म्हणून आग्रह करु लागली म्हणून आपण गप्प बसलो. पण हे फोटो या चॅनेलकडे कसे आले? की, गेल्यावर्षीपासून या चॅनेलचे आपल्यावर लक्ष होते ? आपल्याला परिक्षक बनवायचे आणि हवा तसा रिझल्ट नाही दिला तर हनीट्रॅपमध्ये अडकवायचे. जाधवने पुन्हा फोटो पाहिले. प्रत्येक फोटोत ती कॉलगर्ल त्याच्या हातावर पडलेली दिसत होती. जाधवला वाटलं आपण त्याच वेळी पोलीस कंम्पलेंट करायला हवी होती. आता असे फोटो पाहून आपल्यावर कोण विश्वास ठेवणार ? त्याला त्याची पत्नी अनिताची आठवण झाली. तिला पण हा प्रसंग सांगायला हवा होता. पण ठिक आहे. अनिताचा आपल्यावर विश्वास आहे. अशा फोटोंवर विश्वास ठेवणारी ती नाही. या झगमगत्या दुनियेत अशा गोष्टी नेहमीच्याच. विश्वास ने मनात म्हटले, ‘ सरदेसाई असल्या फोटोनी माझा रिझल्ट बदलणार नाही. मी तुझ्या चॅनेलला पुरुन उतरेन. ‘ 

– क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

” हे बघा आई, मी बिझी आहे. उद्या मला मिटींग्स आहेत.एवढा काही वेळ नाही मला, मी कुमारिकेच्या घरी अथर्व बरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईन,” सायली म्हणाली .

” अगं, संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला. नीट पूजा करू, तुझ्या वेळेनुसार बोलवू, ” सासूबाई म्हणाल्या .

” आई , अहो, भाव महत्त्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय.संध्याकाळी कंटाळा येतो खूप, ” सायलीने चप्पल घालता घालता म्हटलं.

” सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता? “

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला. सासूबाई म्हणाल्या, ” शिरीष, तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्त्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव  ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या , कर्तव्य विसरतोय, असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही, शिरीषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय, असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात. तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही, पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हटलं की तुम्हाला वेळ नसतो , थकलेले असता. घरच्या आरतीलाही चार वेळा ‘या रे’ म्हणावं लागतं. कुठलाही उपास म्हटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही, असं म्हणून मोकळे होता. पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…”

सायली म्हणाली ,  “आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय.”

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे, उपास तापास , देवधर्म म्हणजे स्वतःच्या मनाला , शरीराला लावून घेतलेलं बंधन . हे unproductive आहे, असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय . आहेत , बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली, तुला म्हटलं, आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल , तू म्हणालीस, भाव महत्त्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन.अगं, दे ना तू दान. पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील- आजोबांना नमस्कार कर , तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत, त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला भाव महत्त्वाचा, ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो . उद्या अथर्व तुला, मला , शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल, तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला . परवाचंच घे , घरी भजन आहे, म्हटल्यावर तू नाक मुरडलंस , वेळ नाही म्हणालीस पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं, त्यात रंगून गेलीस.फेरदेखील धरलास आमच्याबरोबर. हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो , हे मात्र खरं आई. इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी!आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच!” सायली म्हणाली .

“हो ना ? तू रे शिरीष ,  सोवळं नाही,पण निदान आंघोळ करून आरती कर, म्हटलं की हेच- भाव महत्त्वाचा . अरे, त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते. आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं . एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही. मग गोंधळ घालायचा का विचारलं की ‘आई , भाव महत्त्वाचा, देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला . अरे देव-देवी काहीच म्हणत नाहीत , हे सगळं आपल्या आनंदासाठी , आरोग्यासाठी आहे . एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना, प्रथा जपा रे . हे बघ. नेहमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या, तेवढं नाही करू शकले आणि सायली, तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे . तरीही सारासार विचार करून जे जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्त्वाचा पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते .

हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात .मनाचे डाएट म्हणा ना. ते किती प्रमाणात करायचं, ते ज्याचं त्याने ठरवावं. पण करावं, असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं. आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो. पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून , मेकप करून आपण जातो . दांडिया खेळू नये, असं नाही. पण आपलीही संस्कृती, परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्त्वाचं. तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना. मग श्रद्धा , अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू ,सारखं भाव महत्त्वाचा म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी.उद्या असेन मी, नसेन मी…” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते . असे  शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

विश्वास जाधव बिल्डींगच्या लिफ्टमधून बाहेर पडला आणि शिळ वाजवत पार्किंगमधील गाडीच्या दिशेने गेला. पार्किंग लॉटमधून त्याने शिताफीने गाडी बाहेर काढली आणि गल्लीतून बाहेर पडून गाडी मुख्य रस्त्यावर आणली. आता अंधेरीचा स्टुडिओ त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले. आज फारसे टेंशन नाही, कारण स्पर्धेचा निकाल जवळपास तयार होता. गेले आठ आठवडे स्पर्धा सुरु होती. एकंदर वीस हजार गायकांमधून वीस जण निवडले गेले. आणि या वीस जणांना आपल्या तिघांच्या हातात सोपवले गेले. माधुरी ही हिंदीतील गायिका या चॅनेलच्या प्रत्येक स्पर्धेला असे. ह्या चॅनेलची स्पर्धा आणि माधुरी हे ठरलेलेच होते. तिला फॅन्स पण फार होते. गेले पाच सिझन तिने गाजवले होते. विश्वासला पण तिच्या गाण्याबद्दल आदर होता. पण परिक्षक म्हणून सोबत बसल्यावर त्याच्या लक्षात आले की ती फार गर्विष्ठ आहे आणि या चॅनेलची लाडकी असल्याने जवळ जवळ हुकूमशहा आहे. दुसरा परिक्षक मंगेश हा पॉप म्युझिक मधील लोकप्रिय कलाकार. तो स्वभावाने बरा होता. पण उडत्या चालीची गाणी आणि पाश्चात्य गाणी त्याला जास्त आवडत. त्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी त्याला आवडत नसत. त्यामुळे अशा गाण्यावर तो टिका करायचा हे विश्वासला आवडत नव्हते. तिसरा विश्वास. हा उदयोन्मुख संगीतकार. त्याचा पाया शास्त्रीय संगीताचा होता आणि गुरु चरणदास यांचेकडे तो शास्त्रीय गाणे शिकला होता आणि त्यांच्या गुरुकुलमध्ये अजूनही शिकत होता. विश्वासचे दोन मराठी आणि दोन हिंदी सिनेमे गाजले होते. आणि हिंदी अल्बम्सनी लोकप्रियता मिळविली होती. खरं म्हणजे हिंदीतील या प्रसिध्द चॅनेलने विश्वासला परिक्षक म्हणून निवडले तो प्रसंग विश्वासच्या डोळ्यासमोर आला. एका मराठी चॅनेलच्या वार्षिक कार्यक्रमाच्यावेळी विश्वास आमंत्रितांच्या खुर्चीत बसला होता. एवढ्यात एक पंचवीस वर्षाची मुलगी त्याच्या जवळ आली – 

‘‘ आप विश्वासजी है ना ?’’

‘‘ हा, आप कौन ?’’

‘‘ मै, रचना.. एन चॅनल की तरफसे -’’

‘‘ क्या है ?’’

‘‘ मेरे सुपीरियर आपसे बात करना चाहते है, जरा बाहर आओगे ?’’

विश्वास बाहेर गेला. ती त्याला पार्किंग लॉटकडे घेऊन गेली. तिथे एका कारमध्ये तिचा सुपिरियर बसला होता. 

‘‘ हाय मिस्टर विश्वास, मै शशांक .. फ्रॉम चॅनेल एन, हमारे चॅनेल का पाँचवा सुरसंगम एक महिनेके बाद शुरू होगा.  हम चाहते है की, आप सुरसंगम प्रोग्रॅमके परीक्षकके रुप में काम करें ’’

‘‘ लेकिन मेरी कमिटमेंट…..’’

‘‘ कोई बात नहीं, ये प्रोग्रॅमकी शुटींग सप्ताहमें एक दिन होगी, सुबह १० से रात १० तक, बाकी के दिन आप फ्री है,’’

‘‘ मुझे सोचना पडेगा ’’

‘‘ कोई बात नही, हम फिर कल फोन करेंगे ’’

रात्रौ विश्वास पत्नी अनिता बरोबर बोलला. तिला पण एवढ्या मोठ्या चॅनेलने स्वतःहून संपर्क ठेवल्याबद्दल आश्चर्य वाटले. पण चांगले पैसे मिळत असतील तर ऑफर स्विकारायला हरकत नाही असे तिने मत व्यक्त केले. दुसर्‍या दिवशी एन चॅनेलवरुन पुन्हा रचनाचा फोन आला. चॅनेलने आठवड्याला लाख रुपये पेमेंट देण्याचा शब्द दिला. एक दिवस शुटींग, प्रत्येक एपिसोडचे कपडे वगैरे सर्व चॅनेल्सचे. विश्वासने विचार केला. प्रत्येक महिन्यात सहा लाख मिळत असतील आणि दोन महिने स्पर्धा चालली तर बारा लाख मिळतील. शिवाय या हिंदी चॅनेलमुळे भारतभर प्रसिध्दी. त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक सिनेमा मिळण्याची शक्यता मोठी. कार्यक्रमामुळे घराघरात आपण ओळखलो जातो हा मोठा फायदा. विश्वासला वाटले, राजापूर तालुक्यातील आपल्या गावातसुध्दा प्रत्येक घरी आपण दिसू. त्यामुळे आपले आईवडील, नातेवाईक, गाववाले किती खूष होतील हे त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याने ही ऑफर स्वीकारली.

विचार करता करता त्याची गाडी स्टुडिओपाशी आली. त्याची गाडी पाहताच रखवालदार मनोहर धावला. त्याने फाटक उघडून त्याची गाडी आत घेतली. विश्वासने गाडी पार्किंग लॉटमध्ये लावताच मनोहरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्याची बॅग बाहेर काढून तो विश्वास बरोबर सेटच्या दिशेने चालू लागला. 

‘‘ मग विश्वासराव, फायनल किरण मारणार का ?’’

‘‘ बघू , अजून दोन परीक्षक आहेत ना?’’

रखवालदार मनोहर हळू आवाजात म्हणाला –

‘‘ तसं नव्हं, या आधी प्रत्येकवेळी धक्काच बसलाय, आम्ही अंदाज बांधतो एक आणि जिंकतो दुसराच काही करा विश्वासराव त्या किरणलाच नंबर द्या, केवढा लांबून आलाय ओ, उत्तराखंडवरुन आणि गातो काय एक नंबर. या मुंबईत त्याची लोक फॅन झालीत. गरीब आहे पोरगा. पहिल्यांदा आला तवा त्याच्या अंगावरची कापडं बघवत नव्हती. मी त्याला माझ्या पोराची कापडं आणून दिली. मग चॅनेलची कापडं आली सोडा. “

‘‘ बर, बघू.’’ असं म्हणून विश्वास सेटवरील आपल्या केबिनकडे गेला. त्याने पाहिले माधुरीच्या केबिनमधून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. म्हणजे माधुरी लवकरच सेटवर पोहोचली होती. मंगेशची केबिन बंद होती. म्हणजे तो अजून पोहोचला नव्हता. विश्वासने आपली केबिन उघडली आणि एसी चालू केला. टेबलावरील ग्लासातून पाणी प्याला आणि लॉकर उघडून गेल्या दोन महिन्यातील मार्कलिस्टवर त्याने नजर टाकली. मघाशी रखवालदार मनोहर बोलला ते त्याला पुन्हा आठवले. ‘‘ या आधी प्रत्येक स्पर्धेत धक्काच बसला ’’ 

‘ धक्का का बसला ?’  विश्वासच्या मनात आलं, धक्का बसू शकतो, कारण सर्वसामान्य लोकांचे मत आणि परिक्षकांचे मत एक होणे कठिण असते. प्रेक्षक मूळ गायकाचा आवाज हुबेहुब काढला की खुष होतात पण परिक्षकाला सुर, ताल, राग, आलापी सर्वच पहावे लागते…  तो विषय झटकून विश्वासने आठ आठवड्यातील मार्कलिस्ट समोर आणली. पहिल्या चार आठवड्यात पंधरा जण कट झाले. आणि शेवटच्या महिन्यात राहिले पाच जण. जयंती, अरुण, केदार, तन्मय, निकिता. दोन मुलगे तीन मुली. त्याने स्वतः दिलेल्या मार्क्सचा अंदाज घेतला. केदार निःसंशय पहिला होता. त्याने पाहिले केदार ९० टक्केच्यावर होता. त्यानंतर जयंती, तन्मय, अरुण ही मंडळी पंच्याऐंशीच्या आसपास. आणि निकिता ऐंशीच्या खाली. त्याच्या डोळ्यासमोर केदार आला…..  केदार पासवान…  १४-१५ वर्षाचा, उत्तराखंडमधून आलेला. चेहर्‍यावरुन कळतं होतं तेथल्या आदिवासी भागातून आला असणार. मोडकी तोडकी हिंदी बोलत होता. कदाचित त्याची मातृभाषा वेगळी असेल. पहिल्या वीसात आला तेव्हा खूप घाबरलेला होता आणि सिनीअर परिक्षक माधुरी हिंदी आणि इंग्लिश मधून बोलून त्याला नर्व्हस करत होती. पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

“काय कटकट आहे!” म्हणत, पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?”

अर्धवट कळत्या , १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा, आरती, नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायचं ठरवलं. “काय गं, तुला माहीत आहे का, नवरात्र का करतात?” आईने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी. कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते. मम्मा , तू काहीही म्हण, मला पटत नाही हे.” “अगं, पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे, असं. त्याला शास्त्रीय आणि वैचारिक दोन्ही आधार आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही, तूच ठरव,” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका.

“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती. मग सगळ्या प्रकारची धान्यं थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे टेस्टिंग केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला, म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलंस.अगं, या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं.

“wow, मम्मा, भारीच की, आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती. ” पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय?तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत इगो बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःखं समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?”

“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, ” किती चौकशा त्या! अगं , मी म्हटलं ना, रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा, मुलंही खातात. ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp!”

 “आई, कसले हुशार होते गं  आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”

“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं. पूर्वी, लवकर लग्न व्हायची, पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वगैरे-त्यांचं मोटिवेशन गं.” -आई.

“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे. आता लास्ट , ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली संपणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हटलं ना, टेस्टिंग किटमधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे, हे त्या दिवशी कळतं. मग, तुमची काय ती पायलट स्टडी गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरंच काही सांगत होती.

“आणि आई , मला माहीत आहे, दसरा म्हणजे, आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना, रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची, बरोब्बर ना?”

“म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.”- आई.

आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा नवरात्रानिमित्त  शास्त्रीय जागर केला होता.

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares