मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दोघी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ त्या दोघी… – भाग-१  ☆ श्री प्रदीप केळूसकर

घरातून बाहेर पडता पडता सेलफोन वाजला म्हणून सुलभाने पर्स उघडली आणि फोन हातात घेतला आणि फोनवरचे नाव पाहताच तिच्या चेहर्‍यावर स्मित आले कारण फोन तिच्या मैत्रिणीचा स्मिताचाच होता.

‘‘काय ग ? आज सकाळीच ? बँकेत गेली नाहीस का ?’’

‘‘अग बँकेतूनच बोलते. संध्याकाळी स्टेशनवर भेटतेस ?’’

‘‘हो, भेटूया. सहा वाजता ना ?’’‘‘हो, नेहमीच्या जागेवर.’’

‘‘येते.’’

सुलभा झपझप पोस्टाच्या दिशेने चालू लागली. काल जमा केलेली सर्व कलेक्शन आरडी पोस्टात जमा करायची होती. आणि मग इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. काल एक पॉलिसी मिळाली होती ती ऑफिसमध्ये द्यायची होती. शिवाय तीन वाजता डेव्हलपमेंट ऑफिसर ज्योतीने मिटींग ठेवलेली आहे. ती मिटींग करुन साडेपाच पर्यंत बाहेर पडायचं आणि सहाच्या आधी विलेपार्ले स्टेशनवर नेहमीच्या जागी स्मिताला भेटायचं. ही एवढी कामं डोक्यात ठेवून सुलभा पोस्टात पोहोचली. रोजच्या प्रमाणे पोस्टाची कामे केली. मग इन्शुरन्स कंपनीत जाऊन आणि तीनची मिटींग अटेंड करुन साडेपाचला बाहेर पडली. आणि झपझप स्टेशनच्या दिशेने चालू लागली. कधी एकदा स्टेशनवर पोहोचतो आणि स्मिताला भेटतो असे तिला झाले. खर तर स्मिता आणि ती सोमवारीच भेटल्या होत्या आणि आज शुक्रवार मध्ये फक्त चार दिवस झाले. पण त्या दोघींची कोल्हापूरातली बालवाडीपासूनची मैत्री. दोघींची जोडी शाळा, कॉलेजात तशीच राहिली. सुलभा लग्न होऊन पार्ल्याला आली आणि स्मिता गोरेगांवात. सुलभा पोस्टाचे आणि इन्शुरन्सचे काम करायची आणि स्मिता बँकेत लागली. दोघींची एवढी मैत्री की, संसारातल्या बारीक सारीक गोष्टी पण एकमेकींना सांगायच्या.

आज काय एवढे अर्जंट काम काढल स्मिताने, असे मनात म्हणत सुलभा सहा वाजता विलेपार्ले स्टेशनवर पोहोचली. तेव्हा स्मिता नुकतीच तिथं आली होती आणि रुमालाने घाम पुसत होती. रेल्वेचा जिना उतरता उतरता सुलभाला स्मिता दिसली. तिला बघून सुलभाच्या मनात आले -‘‘काय परिस्थिती झाली स्मितूची किती देखणी ही, कोल्हापूरात असताना महाद्वार रोडला आपण फिरायला जायचो तेव्हा कोल्हापूरातील पोरं मागून मागून यायची. स्मिताने सुलभाला पाहताच हात दाखवला तशी स्मिता तिच्या दिशेने पुढे आली. मग दोघी तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या टोकाला आल्या. ही दोघींची बोलण्याची जागा होती. इथे थोडी शांतता होती. सुलभा स्मिताला म्हणाली –

‘‘काय ग एवढ काम काढलस? सोमवारी तर भेटलो होतो ना ?’’

‘‘काय सांगायचं कप्पाळ ! माझ्या मागे एक एक टेन्शन आणि टेन्शन’’

‘‘काय झालं ?’’

‘‘तेजू कोणाबरोबर तरी फिरते अशी बातमी होतीच. काल माझ्या व्हॉटस् अ‍ॅपवर कोणीतरी दोघांचा फोटो पाठविला. तिच्याबरोबर एक दाढीवाला पुरुष, हिच्यापेक्षा वयानं बराच मोठा दिसत होता. शेवटी काल तिला खडसावलं. तेव्हा कळलं तो गोरेगांव स्टेशन जवळचा लोखंडाचा व्यापारी जमीर.’’‘‘मुस्लिम दिसतोय।’’ सुलभा ओरडली.

‘‘हो गं माझे विचार तुला माहित आहेत ना ? माझे आईबाबा होते संघाशी संबंधित, माझेपण विचार त्यांच्यासारखेच. ते तर झालंच शिवाय तो वयानं पण पंधरा वर्षांनी मोठा.’’

‘‘बाप रे ! मग अभयला कळलं का ?’’

‘‘ तो असतो का घरी ? सकाळी टेबल टेनिस खेळायला बाहेर पडतो आणि सायंकाळी क्लबमध्ये ब्रिज खेळायला जातो. त्याच्या मॅचिस आणि टुर्नामेंटस. तो बेफिकीर बाप. आयुष्यात जबाबदारी कसली घेतली नाही त्याने. त्याला काय? तो खांदे उडवित म्हणेल, ‘‘तिच लाईफ आहे ते. मी कोण लुडबुड करणारा?’’ असं म्हणून तो गाढ झोपेल. झोप माझीच उडाली गं सुलु.’’

‘‘खरं आहे गं स्मितू, हे वयच असं असतं. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी मुलं निर्णय घेतात. ती ठाम आहे का? मी तिच्याशी बोलून बघू?’’

‘‘बघ तुझं ऐकतेय का ते, मी निघते. घरी जाऊन जेवण करायचं आहे. दहा वाजल्यानंतर दोघं बाप लेक गिळायला येतील. त्यांना काहीतरी घालायला हवं ना? आणि परत उद्याचा माझा डबा – त्याची तयारी. जाते.’’

‘‘सांभाळून जा ग स्मितू, रस्ता सांभाळून क्रॉस कर. आजूबाजूच्या गाड्या बघ आणि मगच रस्ता ओलांड.’’

‘हो’ म्हणत स्मिता गेली आणि तिच्या पाठमोर्‍या शरीराकडे सुलभा पाहत राहिली. स्मिता दिसेनाशी झाली तशी ती घरी जायला वळली. आज खूप दगदग झाली म्हणून सुलभाने रिक्षा केली. रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि डोळे मिटून रिक्षाच्या पाठीवर टेकून बसली. आपल्या संसारापेक्षा तिला स्मिताच्या संसाराची आणि स्मिताची जास्त काळजी वाटत होती. बेजबाबदार नवरा, हाताबाहेर गेलेली एकुलती एक मुलगी. कुटुंबासाठी नोकरी करण्याची गरज, नोकरी आणि संसार सांभाळता सांभाळता होणारी दमणूक कधी या स्मिताला विश्रांती मिळणार आहे कोण जाणे ? त्यात आता तिच्या मुलीने तेजश्रीने घेतलेला निर्णय. पहिल्यापासून ही तेजश्री आपल्याला आवडत नव्हती. बेफिकीर मुलगी. आईच्या कष्टाचे आणि धावपळीचे काहीसुध्दा पडले नाही तिला. रिक्षा थांबवून सुलभा घरी आली. नवरा नऊच्या पुढेच येणार, कन्या विनयाचा पाच वाजताच फोन आलेला. आता थोडा वेळ विश्रांती घेऊ. पोळ्या साडे आठनंतर केल्या तरी चालतील. असे म्हणत वॉश घेऊन, कपडे बदलून सुलभा बेडवर पडली. तिच्या मनात आले – यावेळी स्मिता काय करत असेल? गोरेगांवला उतरुन भाजी, ब्रेड घेऊन दोन किलोमीटर अंतर चालत असेल. तिला किती वेळा सांगितलं अगं स्टेशनवरुन रिक्षाने जा. पण कुटुंबासाठी पैसे वाचवायचे म्हणून चालत जाते. पुन्हा घर दुसर्‍या मजल्यावर. लिफ्ट नाही. घरी गेल्या गेल्या जेवणाची तयारी. बरं या दोघांना साग्रसंगीत जेवण हवं. अधून मधून नॉनव्हेज हवं. दोघांची मदत शून्य. सुलभाच्या अंगाचा संताप संताप झाला. आपला नवरा असा असता तर मी सरळ केला असता. पण स्मितू पडली गरीब गाय. स्वतः रडत बसेल पण नवर्‍याला बोलणार नाही. त्यात आता तेजश्रीने ठरविलेले लग्न. आपण आता उद्या फोन करावा. यावेळी कुठेतरी मित्राबरोबर नाहीतर मैत्रिणीबरोबर हुंदडत असेल असा विचार करता करता सुलभाचा डोळा लागला. दारावरची बेल वाजली तशी ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. तिचा नवरा राजन आला होता. तिने घड्याळ्यात पाहिले. साडेआठ वाजले होते.

‘‘आज लवकर ! मेनन ने लवकर सोडलं वाटतं’’

‘‘हो मेनन साहेब पण अंधेरीला जात होते त्यांनीच सोडलं’’

‘‘माझ्या पोळ्या करायच्या आहेत, वॉश घ्या तो पर्यंत जेवण वाढतेच.’’

हो म्हणत राजन कपडे बदलून वॉशरुममध्ये गेला तोपर्यंत सुलभाने गॅस पेटवून पोळ्या करायला घेतल्या. राजन बाहेर आला तो पर्यंत तिने ताटात जेवण वाढायला घेतले.

‘‘आज पोस्टात गेली होतीस का?’’

‘‘हो तर. आज खूप धावपळ, पोस्ट, एलआयसी, त्यात ज्योतीने मिटींग लावलेली आणि स्मितूचा फोन – स्टेशनला भेटायला ये म्हणून…’’

‘‘पण स्मिता सोमवारीच भेटलेली ना?’’

‘‘भेटलेली पण आज पुन्हा भेटू म्हणाली. तिच्या पोरीने तेजूने लग्न जमवलयं म्हणे’’

‘‘आ ऽऽ कोणाबरोबर ?’’

‘‘आहे कोणी मुस्लिम, लोखंडाचा व्यापारी गोरेगांव स्टेशनजवळचा.’’

‘‘अरे बापरे, मग स्मिता – अभयची काय म्हणतोय ?’’

‘‘स्मितूची झोप उडालीय बिचारीची, अभय काय बिनधास्त माणूस, तुमच्या एकदम विरुध्द.’’ ‘‘म्हणजे ?’’

‘‘तुम्ही अति काळजी करणारे, आपल्या विनूने स्वतः लग्न जमवल म्हणून ब्लड प्रेशर वाढवून घेतलंत. पण विनूने लग्न जमवलं ते उच्च शिक्षित, एमबीए झालेला, चांगल्या कुटुंबातील मुलाशी, आता बिपीन तुम्हाला मुलगा वाटतो.’’

‘‘अगं बाप हा असाच हळवा असतो. तो बाहेरुन फणसासारखा वाटत असला तरी’

‘‘पण त्याला आहे ना अपवाद ! हा स्मितूचा नवरा अभय’’

‘‘अग त्याला पण वाटत असेल, बाहेरुन दाखवलं नाही तरी.’’

‘‘कुठलं काय ? स्मितू सांगत होती उद्यापासून तो ट्रेकिंगला चाललाय चार दिवस भिमाशंकरला’’ सुलभाने दोघांचं जेवण घेतलं पण तिच्या डोळ्यासमोर होती स्मिता. कोल्हापूरातून ग्रॅज्युएट झाल्यावर स्मिता आणि मी नोकरीसाठी कसल्या कसल्या परीक्षा देत होतो तेवढ्यात मुंबईत सचिवालयात नोकरी करणार्‍या अभयचे स्मितासाठी स्थळ आले. मुंबईत जायला मिळणार म्हणून स्मिता लग्नाला तयार झाली. अभय होता पण देखणा. आम्ही तिच्या मैत्रिणी तिच्या भाग्याचा हेवा करत होतो. पण लग्नानंतर चार पाच महिन्या नंतर स्मिता आली ती निराश होऊन. तिच्यामते अभय अती आळशी, बेफिकीर माणूस होता. सचिवालयात नोकरीला होता पण त्याचे नोकरीत धड लक्ष नव्हते. सतत खेळ, ट्रेकिंग, मित्र मंडळी, पार्ट्या, पैसे किती खर्च करायचा त्याला मर्यादा नव्हती. एका वर्षानंतर स्मितूची बँकेत निवड झाली आणि तिचा पगार घरात यायला लागला तसा तो जास्तच बेफिकीर झाला. त्याच्या पार्ट्या वाढल्या. खर्च वाढले. त्याच दरम्यान सुलभाचे राजनशी लग्न झाले. राजन इन्शुरन्स कंपनीत नाकासमोर चालणारा, काटकसरी, संसारी. सुलभा पार्ल्यात आणि स्मिता गोरेगावला. सुलभा मुंबईत आली तशी दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. स्मिताची बँकेची नोकरी होती. मग स्टेशनवर भेटणे सुरु झाले. मग सुलभाचे बाळंतपण आले. कोल्हापूरात न्यू महाद्वार रोडवर चिपलकट्टी हॉस्पिटलमध्ये विनया झाली. सुलभाची काळजी घ्यायला स्मिता कोल्हापूरात हजर होती. मग बारसं करुनच मुंबईला गेली. एका वर्षाने स्मिताचं बाळंतपण. पुन्हा चिपलकट्टी हॉस्पिटल. तेजश्रीचा जन्म. तेजश्रीच्या बारशाला अभय आला नाही हे सर्वांना खटकलं.

सुलभाची विनया दोन वर्षाची झाली आणि सुलभाने पोस्टल एजन्सी घेतली. एलआयसीचे काम करु लागली. मॅच्युअल फंड एजन्सी घेतली. सुलभाचा नवरा राजन तिला सहकार्य करणारा. रविवारी सुट्टी असेल तेव्हा सुलभाला मदत करणारा. प्रसंगी पोस्टाचं कलेक्शन आणणारा. स्मिताचा नवरा सतत बाहेर, स्पोर्टस, मित्र, ट्रेकिंग. वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्मिताच्या नवर्‍याने – अभयने नोकरी सोडली आणि टेबल टेनिसचा ट्रेनर म्हणून गोरेगांव स्पोर्टस क्लबमध्ये नोकरी पकडली. मग पहाटे उठून जाणे, दुपारी येणे, दुपारी भरपूर झोपणे, संध्याकाळी जाणे, रात्रौ उशिरा येणे, मग खेळाच्या स्पर्धा कधी इथे, कधी तिथे. मग जय पराजय, पार्ट्या, बाहेर खाणे, पैसे उडविणे हे सुरूच. यात स्मिताची खूप ओढाताण झाली. नवरा सतत बाहेरगावी म्हणून तेजश्रीचे लाड झाले आणि तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.

जेवता जेवता सुलभाच्या डोळ्यासमोर सर्व येत होते. स्मिता मग नर्व्हस होत गेली. सतत आपल्या विचारात राहू लागली. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला. केस गळू लागले. सुलभाच्या एक लक्षात आले. गेली काही वर्षे स्मितू स्वतःच्या विमा पॉलिसीज काढू लागली आहे. आपण तिला म्हणायचो अग सगळ्या पॉलिसी स्वतःच्या नावाने कशाला काढतेस? काही तेजूच्या नावाने काढ, अभयच्या काढ. तिचे म्हणणे – तिला स्वतःचे काही खरं वाटत नाहीय. अभयला नोकरी नाही, आपल्यामागे तेजूला काही कमी पडायला नको.

रात्री झोपताना सुलभाने मनाशी ठरविले, उद्या तेजूला काय ते विचारायचे. दुसर्‍या दिवशी तिने तेजश्रीला फोन लावला. तिचा फोन कशासाठी हे तिने ओळखले असावे.

‘‘काय ग मावशी, आई काही बोलली वाटतं?’’

‘‘काय ?’’

‘‘माझ्या लग्नाचं’’

‘‘होय बाई, काहीतरी घाईघाईत निर्णय घेऊ नकोस तेजू’’

‘‘मावशी, मला समजतं आता. मी तेवीस वर्षाची आहे. तुमच्या टिपीकल मिडलक्लास लोकांचे रडगाणं मला सांगू नकोस.’’

‘‘अग पण त्याचा धर्म ?’’

‘‘मी एवढ्यात लग्न करीन असं नाही गं मावशी, सुरुवातीला मी रिलेशनमध्ये राहीन, तो आवडला तर मग लग्न.’’

‘‘अगं बाई असलं काहीतरी बोलू नकोस. मी काय, तुझी आई काय? आम्ही कोल्हापूरातल्या साध्या मुली गं, असले संस्कार आमच्यावर नाहीत.’’

‘‘पण मी कोल्हापूरातली नाही ना? मी मुंबईतल्या अभय कानविंदेंची मुलगी आहे. माझा बाबा बघा कसा फॉरवर्ड विचाराचा आहे. नाहीतर तुम्ही ….’’ असं म्हणून तेजश्रीने फोन ठेवला. सुलभाने तेजश्रीला पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने फोन उचललाच नाही.

क्रमश: १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मानिनी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(हात पिवळे करून कुन्या रामचंद्राच्या हातात सोपवून धुमध‌डाक्यात तुझं लग्न करून दिईन म्हनलं. पन न्हाई. दिसभर बापाची आठवन काढत रडत बसलीया. तुम्हीच सांगा हिला काईतरी.”) – इथून पुढे —-

“राधाक्का, नवरा जरी राम असला तरी त्या मृण्मयी असलेल्या सीतेच्या नशीबीसुद्धा वनवास आलाच होता ना? त्या सीतेला वाल्मिकी मुनींच्या आश्रमात तरी आश्रय मिळाला होता. हिला कोण आहे? बिचारी बापाविना पोर….” मी नकळत बोलून गेलो, त्यासरशी मृण्मयीचे डोळे पुन्हा भरून आले. आईच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं मनसोक्त रडून घेतले. पटकन डोळ्यांतले अश्रू पुसत ती म्हणाली, “सर, मला लग्नाच्या आधी स्वावलंबी व्हायचं आहे. शिकून मोठं व्हायचं आहे. त्यानंतर माझ्या आईसकट मला स्वीकारणारा राम भेटला तरच मी लग्न करेन. तोपर्यंत लग्नाचा विचारही करणार नाही. मला नुसतं पदवीधर व्हायचं नाहीये. मला डॉक्टर व्हायचं आहे. आता तूर्त मला मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी प्रशांत सरांचा कोचिंग क्लास लावायचा आहे. सांगा हिला. मी प्रवेश परीक्षेत मेरिटमध्ये आले नाही तर ती सांगेल ते करीन हा माझा शब्द आहे.” 

“सायेब, एकीकडे कर्जाचे हप्ते भरतेच आहे. कोचिंग क्लासची फी कुठनं भरू सांगा?” 

“राधाक्का, तुमची लाडकी लेक बोर्डात मेरिटमध्ये पास झालीय. तिला तिचा मार्ग शोधू द्या. कोचिंग क्लासच्या फीची तुम्ही काळजी करू नका. मी प्रशांत सरांशी बोलतो. माझं ऐका. तिला आता फक्त क्लासला जाऊ द्या. नंतर काय करायचं ते आपण नंतर ठरवू या.” असं म्हणत मी मृण्मयीच्या हातात पुष्पगुच्छ ठेवला आणि पेढ्यांचा बॉक्सही दिला.   

मृण्मयी पटकन उठली आणि मला नमस्कार करायला आली. मी म्हटलं, “घरी जा, देवापुढे दिवा लावून पेढ्यांचा बॉक्स ठेव आणि त्याचे आशिर्वाद घे. काळजी करू नकोस, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल.”    

ते दोघे बाहेर पडताच मी प्रशांतला फोन लावला. फोन उचलताच “साहेब, या महिन्याचा कर्जाचा हप्ता आला नाही काय? हाऊसिंग लोन की कार लोन? तुमचा फोन आलाय म्हणून विचारतोय.” प्रशांतनं विचारलं. त्यावर मी हसतच म्हटलं, “अरे काही खात्यांची मी काळजीच करत नसतो, त्यात तुझी कर्जखातीदेखील आहेत. बरं ते जाऊ दे, मी तुला दुसऱ्याच कामासाठी फोन करतोय असं म्हणून मृण्मयीविषयी त्याला सांगितलं. फी मध्ये किती कन्सेशन देता येईल ते सांग.” 

क्षणभर थांबून तो म्हणाला, “साहेब, ती मुलगी तुमच्या नात्यातली ना गोत्यातली. तिच्या शिक्षणासाठी तुम्ही इतक्या आपुलकीने आस्था दाखवता आहात तर, मलासुद्धा काहीतरी करायला हवं ना? मग माझ्याकडून शंभर टक्के कन्सेशन. तिला प्रवेश फी म्हणून फक्त पाचशे रूपये भरायला सांगा. आणि हो, ती मेरिटमधे आली तर माझे शंभर टक्के वसूल झाल्यासारखेच ना !” असं म्हणत त्याने आपली व्यावसायिकता शाबित असल्याचं सिद्ध केलं.

मृण्मयीची जिद्द कामी आली. ती प्रवेश परीक्षेत मेरिटमधे आली. फ्लॅट बॅंकेकडे तारण होताच. गवर्नमेंट मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळताच तिचं शैक्षणिक कर्ज मंजूर झालं. मृण्मयीवर चोहीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. 

एका शनिवारी संध्याकाळी तिच्या समाजबांधवांच्याकडून तिचा भव्य सत्कार होता. कार्यक्रमाला मलाही निमंत्रण देण्यासाठी मृण्मयीनं सुचवलं असावं. दोघे संयोजक निमंत्रण देण्यासाठी स्वत: बॅंकेत आले. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता घट्ट पाय रोवून उभे राहतात त्यांच्याविषयी मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. 

मी कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहोचलो. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हार आणि पुष्पगुच्छ देऊन मृण्मयीचा सत्कार करण्यात आला. आपल्या समाजातील एक कन्या स्वत:च्या हिंमतीवर घवघवीत यश मिळवून मेडिकलला प्रवेश मिळवते ह्याचा समाजबांधवांना कोण कौतुक वाटत होते. प्रत्येकजण आपल्या छोटेखानी भाषणात मृण्मयीवर कौतुकाचे गुलाबपाणी मनसोक्तपणे शिंपडत होता. 

शेवटी समाजाचे अध्यक्ष उभे ठाकले. बोलता बोलता ते म्हणाले, ‘आपल्या मुली शिकून पुढे जायला पाहिजेत. एका चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असूनदेखील मृण्मयीने जे यश मिळवले आहे, ते यश म्हणजे आपल्या समाजासाठी भूषणावह आहे. मी माझ्याकडून तिला पाच हजार रूपयांची मदत जाहीर करतो आहे. इतर समाजबांधवांना देखील मी मदतीचे आवाहन करतोय. मदत करणार आहात ना?’ असं म्हणताच सभेतल्या कित्येकांचे होकारार्थी हात उंचावले गेले. 

सत्काराचं उत्तर देण्यासाठी मृण्मयी उभी राहिली. “माझ्या शाळेत, कॉलेजात सत्कार झाले. परंतु आपल्या समाजबांधवांकडून मायेपोटी, अभिमानापोटी झालेला हा घरचा सत्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. आताच आपल्या अध्यक्ष महोदयांनी माझा उल्लेख चहा-टपरी चालवणाऱ्याची कन्या असा केला. मला त्यात किंचितही कमीपणा वाटला नाही हे मी आधीच नमूद करते. मुळात प्रामाणिकपणे करता येणाऱ्या कुठल्याही व्यवसायाला कमी लेखताच कामा नये. त्याच व्यवसायावर माझे वडील आजन्म स्वाभिमाने जगले. माझ्या पित्याच्या माघारी माझी आईदेखील तीच टपरी त्याच जोमाने चालवून मला शिकवते आहे. या प्रसंगी अध्यक्ष महोदयांनी माझ्यासाठी मदत तर जाहीर केलीच आहे तसंच तुम्हा सर्वांना सहृदयपणे मदतीचे आवाहन केले आहे. मी आपणा सर्वांना नम्रपणे सांगू इच्छिते की मला फक्त तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि सदिच्छा हव्या आहेत. माझ्या स्वर्गीय पित्याला आणि माझ्या आईलादेखील मी असं कुणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबलेलं आवडणार नाही. माझ्या आईबाबांच्या विश्वासार्हतेमुळे म्हणा, आणि मी उत्तम मार्काने पास झाल्याने बॅंकेने मला शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे, ते पुरेसे आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. जर तुम्हाला शक्य असेल तर, प्राप्त परिस्थितीमुळे व्यवसायात कोलमडून पडलेल्या आपल्या एखाद्या समाजबांधवाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी मदत करा, त्यामुळे त्याचे एक अख्खे कुटुंब उभे राहिल. धन्यवाद !!” 

कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. एका विनम्र, मृदुभाषिणी असलेल्या मृण्मयीचा मानिनी अवतार मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता. 

बेंगलुरूच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच आम्ही झपझप पावलं टाकत बोर्डिंग गेटकडे निघालो.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ मानिनी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन बेंगलुरूला जाण्यासाठी दोन तास आधीच आम्ही इंदोरच्या एयरपोर्टवर येऊन पोहोचलो. वाचण्यासाठी म्हणून बॅगेतून पुस्तक काढत होतो, तितक्यात पंचेचाळीसच्या आसपास असलेली एक तरुणी माझ्यासमोर येऊन उभी ठाकली आणि आनंदाश्चर्याने म्हणाली, “सर, तुम्ही? इकडे कसे? ओळखलंत का मला?……” प्रश्नामागून प्रश्न टाकत होती. मी भांबावल्यासारखं पाहत होतो. तिनेच सांगितले, “सर, मी मृण्मयी. मेडिकलसाठी तुम्हीच तर मला…” 

मृण्मयी हे आगळं वेगळं नाव ऐकताक्षणी माझी ट्यूब पेटली. माझ्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू पाहताच ती आम्हा उभयतांना नमस्कार करण्यासाठी वाकली. तेवढ्यात एक तरूण मुलांच्यासोबत आला. मग तिने ओळख करून दिली, “सर, हे माझे पति डॉक्टर राम, कॉर्डियालॉजिस्ट आणि ही आमची मुलं.” असं म्हणतच तिने त्यांना नमस्कार करायची खूण केली. मी त्यांना मध्येच थांबवलं. 

त्यानंतर तिने गायनाकॉलिजस्टमधे एमडी कसं केलं, राम तिला कसा भेटला आणि आंबेगावला त्यांचं क्लिनिक कसं सुरू केलं याविषयी ती भरभरून बोलत होती. माझ्याशी संपर्क करण्यासाठी तिने काय काय प्रयत्न केले हे ती सांगत होती. 

मी तिला मध्येच थांबवून ‘राधाक्का कुठं असते’ असं विचारलं. “सर, आई माझ्याकडेच राहत होती. गेल्यावर्षी ती कोविडमध्ये गेली आणि मी खऱ्या अर्थाने निराधार झाले. मी डॉक्टर असले म्हणून काय झालं? मी खूप प्रयत्न केले. अखेर नियतीपुढे हात टेकावे लागले.” 

मी विषय बदलत इंदोरला येण्याचं कारण विचारलं. डॉ. रामच्या कुणा नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने ते दोन दिवसासाठी आले होते. पुण्याच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच तिनं तिचं व्हिजीटींग कार्ड दिलं आणि ‘पुण्यात आलात तर अवश्य या’ म्हणून पुन्हा पुन्हा आवर्जून सांगत होती.

ती पाठमोरी होताच…. माझ्या डोळ्यांसमोर पंचवीस वर्षापूर्वीचा तो स्मृतीपट अलगद उलगडला गेला…..   

संध्याकाळचे सात वाजले होते. जवळजवळ सगळा स्टाफ निघून गेला होता. केबिनवर टकटक करून विसूभाऊ लगबगीने आत आले. त्यांच्यासोबत एक चुणचुणीत मुलगीही होती. त्यांच्या हातात लहानसा पेढ्यांचा बॉक्स होता. “सायेब, ही माझी ल्योक हाय. मृण्मयी. दहावी परीक्षेत पास झालीय. तुम्हास्नी  पेढे द्यायला आल्तो.” 

एक पेढा घेऊन मी त्यांना बसायला सांगून फाईली आवरत होतो. तितक्यात तिने तिची मार्कशीट दाखवली. तिला चक्क ९६% मार्क होते. गणित आणि सायन्समध्ये पैकीच्या पैकी. मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, “व्वा, खूप छान. अभिनंदन बेटा तुझं. विसूभाऊ, कन्येला खूप चांगले मार्क मिळाले आहेत. विसूभाऊंचे डोळे आनंदाने भरून आले.

मी पटकन पुढचा प्रश्न टाकला, 

“अहो, लेकीचं असं एवढी अवघड नाव कसं ठेवलंत?” त्यावर विसूभाऊंची कळी खुलली “त्याचं असं हायं सायेब, आमच्या लग्नाला आठ वरस झाली व्हती. घरात पाळणा हलत नव्हता. मग म्या प्रभू रामचंद्रालाच साकडं घातलं. मुलगा झाला तर रामचंद्र नाव ठेवीन म्हनून. पन रामानं आमच्या पोटी ही ल्येक पाठवली. मंग म्या म्हनलं, राम न्हाई तर न्हाई. लेकीचं नाव सीता ठिवतो. पन हिची आई सीता नावाला कबूल हुईना. का म्हनलं तर तिच्या नशीबी वनवासच यिल म्हून. मग म्या तुमच्यासारख्या एका शिकलेल्या माणसाकडनं सीतेची आनिक कंची नावं हायेत म्हनून इच्यारून घेतलं. त्येनी हे एक नाव सांगितलं. मातीत सापडली म्हनून मृण्मयी. माझ्यावानीच हिची आईबी अडाणी. गुमान बसली. 

बरं ते असू द्या सायेब. ही पोरगी सायन्सला जायचं म्हनतीय अन हिची आई पुढं शिकवायलाचं नगं म्हनतीय तवा काय करायचं ते तुम्हास्नी इच्यारायला आल्तो.” 

मी तिला सायन्स शाखेत प्रवेश घ्यायला सांगितलं. मृण्मयीचे विलक्षण बोलके डोळे आनंदाने चमकले.

“बराय सायेब, म्या तुमच्या शब्दाभायेर न्हाई” असं म्हणत विसूभाऊ निघून गेले.   

विसूभाऊंची आमच्या शाखेच्या जवळच एक चहाची टपरी होती. विसूभाऊ आणि राधाक्का सकाळी नवालाच येऊन स्टोव्ह पेटवून चहाला आधण ठेवायचे. दिवसभर वाफाळत्या चहाचे किती तरी कप भरले जायचे, ते कळायचंच नाही. त्या भागात आलेले लोक हमखास विसूभाऊंच्या चहाचा आस्वाद घेऊनच पुढे जायचे. सगळंच टापटीप आणि स्वच्छ. विसूभाऊ एकदम शिस्तीचा आणि निर्व्यसनी माणूस. 

जवळच्याच कॉलनीत एक रिसेल फ्लॅट विकत घेताना त्यांना मी बॅंकेकडून एक लाखाचं कर्ज मंजूर केलं होतं. त्यावेळी वारसदारांची नावं घेताना त्यांना एक मुलगी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोळशाच्या खाणीत रत्न लाभावं तसं विसूभाऊंना कन्यारत्न लाभलं होतं. धावक जसं लांब लांब ढांगा टाकत पळतो तसं विसूभाऊ दर महिन्याला एकाचवेळी दोन किंवा तीन हप्ते धडाधड भरत होते. आणि एके दिवशी विसूभाऊ कार्डियाक अरेस्टने झोपेतच गेले.

जगरहाटी थांबत नाही. राधाक्का एका मुलाला मदतीला घेऊन त्याच जोमात चहाची टपरी चालवत होत्या आणि त्याच धडाक्यात कर्जाचे हप्ते भरत होत्या. 

संध्याकाळचे सहा वाजत होते. “साहेब, राधाक्का त्यांच्या मुलीसोबत तुम्हाला भेटायचं म्हणत होत्या. केव्हा यायला सांगू?” शिपायानं येऊन विचारलं. 

“सात वाजता यायला सांग. आणि एक काम कर. एक पुष्पगुच्छ आणि पाव किलो पेढ्याचा बॉक्स घेऊन ये.” असं सांगून त्याच्या हातात पैसे दिले. बारावी सायन्सला मृण्मयीचं नाव मेरिट लिस्टमध्ये आल्याचं मला सकाळीच कळलं होतं.    

त्या दोघी सात वाजता केबिनमध्ये आल्या. मेरिटमध्ये पास झालेल्या मृण्मयीचा चेहरा कोमेजून गेला होता. तिचे चमकदार बोलके डोळे विझल्यासारखे वाटत होते. 

“सायेब, या मुलीच्या डोक्यात डाकटर व्हायाचं खूळ भरलंय. मी कितीबी राबले तरी डाकटरकीचा खर्च माझ्याच्यानं झेपणार हाये का? म्या तर दहावीलाच बास कर म्हनले हुते. हिच्या बापानं पुढं शिकायला पाठवली. म्या म्हनलं त्यो खर्च आपल्यास्नी झेपायचा नाही. ते बीएस्शी का काय म्हणत्यात ते कर. दिवसभर हिथं कॅंटिन चालवून तुला शिकवीन म्हनलं. हात पिवळे करून कुन्या रामचंद्राच्या हातात सोपवून धुमध‌डाक्यात तुझं लग्न करून दिईन म्हनलं. पन न्हाई. दिसभर बापाची आठवन काढत रडत बसलीया. तुम्हीच सांगा हिला काईतरी.”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ बाज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“अरे,सायकलवर कशी जमेल ही बाज न्यायला..? तुला लोडिंग रिक्षा करून न्यावी लागेल. माझ्या ओळखीचा आहे एकजण, विचारतो त्याला..” एवढं बोलत समोरच्या माणसाने फोन लावला आणि श्यामने खिशातले पैसे काढून मोजायला सुरुवात केली. कळकट, गुंडाळलेल्या दहाच्या, पन्नासच्या नोटा.. फार नसतील पण रिक्षा ठरली तर पुरतील का? ह्या विचारात त्याने पटापट सरळ करून त्या एकात एक घातल्या आणि परत खिशात ठेवल्या. मनात हिशोबाचे खेळ सुरूच होते. ह्यांना आपण महिनाभर बाज मागणार, त्याचेच पैसे किती घेतील माहीत नाही. त्यात ती नेण्याची गाडी नाहीच परवडणार…

… समोरचा माणूस फोनवर बोलून श्यामकडे आला आणि म्हणाला, ” गाडीवाला पाचशे रुपये म्हणतोय.. बघा जमतंय का? “

श्यामने कपाळावर आलेला घाम पुसला.. ” नको, राहू द्या. मी बघतो कशी न्यायची ते ” म्हणत आपल्या सायकलला न्याहाळले… तिच्यावर हात फिरवला आणि तिच्याजवळ वाकून म्हणाला, ” तुला मदत करावीच लागेल गं…” 

शेजारच्या किराणा दुकानातून त्याने सुतळी विकत घेतली आणि बाज उचलली. त्याक्षणी जाणवलं, बाज जड होती, त्यामुळे पण तिला घरी नेण्याचा प्रश्न उभा राहणार होताच.. हे अगदी आपल्या घरापासून  दूर असलेलं घर. पण इतर ठिकाणी बाज खूप महाग, आपल्याला परवडणार नाही अशीच…. आणि बायकोची तर मागणी होती, ” लेकीला बाळांतपणाला बाज आणा.. माझ्या बाळांतपणाला मी सहन केलं… खाली पोतड्यावर झोपले. पण कोवळ्या अंगात सर्दी अशी भिनली की आयुष्यभर दुखणे सहन करून जगणं सुरू आहे. आता माझ्या लेकीचे नातवंडाचे हाल नको..”  तिच्या ह्या वाक्यावर त्याक्षणी आपल्याला आठवलं… आयुष्यात कुठलेही अट्टहास नव्हते हिचे.. कोवळ्या वयात हिने आपला संसार सुरू केला.. पण गरोदरपणातही ओठ घट्ट मिटून सगळं काही सोसलं ते आयुष्यभर. पण आता नातवंड आणि लेक, तिला त्यांच्याबाबतीत हेळसांड नकोय …. स्वतः घरचं सगळं करून चार घरचे भांडे घासते.. थोडं थोडं तूप, बदाम, मनुके, सगळं लाडूचं सामान.. घरातला कोपरा स्वच्छ करून ठेवलाय बाळंतिणीची बाज टाकायला…

स्वतःच आयुष्य कसंही गेलं तरी येणाऱ्या जीवासाठी तिची ही तगमग खरंच आपल्यालाही सकारात्मक करून गेली.. आपणही मग चार खेपा धान्याच्या गोण्या दुकानातून गिऱ्हाईकाच्या घरी नेहमीपेक्षा जास्त केल्या…. त्यादिवशी ह्या कोपऱ्यातल्या घरात पोते टाकले आणि निघताना त्या माहेरवाशीण लेकीची तगमग बघितली.. तिच्या घरातले सगळे नेमके शेजाऱ्याच्या लग्नाला गेले होते आणि घरातला नोकर माणूस तिच्या आक्रोशाने गडबडला, आपल्याला म्हणाला.. ” कसंही कर आणि रिक्षापर्यंत हिला नेऊ लाग..”

सगळे पोते काढलेल्या हातगाडीवर ती बिचारी कशीबशी बसली.. दाराशी कार उभी असून तिच्यावर ही वेळ आली.. कोपऱ्यावर मिळालेली रिक्षा आणि मग सगळी धावपळ.. त्यादिवशीची कमाई तिच्या चहापाण्यात गेली होती.. पण आपल्या लेकीसारखीच होती ती.. त्यांनतर आलेले तिचे घरचे लोक.. आपले आभार मानत होते.. त्यांनी आपल्याला दिलेलं बक्षीस आपण नाकारलं होतं.. तेव्हा तो माणूस म्हणाला होता.. ” काही मदत लागली तर नक्की सांग., आम्ही कायम तुझ्या ऋणात राहू,..”

आज ह्या घटनेला सहा महिने झाले. म्हणजे त्यांच्या घरात जी बाई बाळंत झाली ती आता त्या बाजेवर झोपत नसेल.. बघू तर विचारून… म्हणून आपण शब्द टाकला….  ” तुमच्या ताईची बाळंतिणीची बाज मिळल का..? नाही, फक्त एखादा महिना.. लेक बाळांतपणाला आली आहे माझी..? “

आपलं बोलणं ऐकून खुर्चीत बसलेल्या आजी म्हणाल्या होत्या, ” बाज अगदी जन्मापासून आपल्याशी जोडलेली असते.. खरंतर बाज हा शब्द माणसाच्या बाण्याशी निगडित आहे.. ‘ काय बाज आहे त्यांचा ‘ असं आपण म्हणतो.. पण तुम्ही ओळख नसताना, परिस्थिती नसताना.. हिम्मत दाखवून आमच्या नातीसाठी जे केलं.. तो माणुसकीचा बाज आज क्वचितच सगळ्यांमध्ये दिसतो.. तुमच्यासारख्या माणसाला ही बाज देण्यात आनंदच आहे.. आणि हो, बाज आणण्याची गडबड नको.. ठेवा आठवण म्हणून, माणुसकीची बाज अशीच ठेवा. त्यावर सुखाची झोप नक्की घ्या..”

आजीचं वाक्य मनाला भिडलं आपल्या.. आपली आई नेहमी म्हणायची, ” माणुसकीची बाज विणत राहा.. वेळेकाळेला एकमेकांना मदत करून ही बाज विणली की ह्या बाजेवर येणारी झोप आनंदाचीच…”

मनात आलेल्या ह्या विचारांनी आणि लेकीसाठी मिळालेल्या बाजेने त्यालाच खूप आनंद झाला. फक्त हिला नेणं मात्र सर्कस आहे. पण जमवावं तर लागेल, म्हणत तिला सायकलला घट्ट बांधून तो निघाला होता…  आवश्यक त्या परिस्थितीत आपल्या प्रामाणिकपणामुळे मिळालेलं ते बक्षीस घेऊन जातांना त्याला दिसत होती त्याची पोटुशी लेक आणि हसरी बायको … त्या बाजेवर समाधानाचं आयुष्य विणणारी…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग ४ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग ४ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – गर्दी मेंढीच्या चालीने निघाली होती. सगळे पळत होते, बस! जो कुणी फुटपाथवर मधे होता, तो त्या ट्रकच्या पकडीत होता. डाव्या-उजव्या बाजूला पळणारे लोक धक्क्यांनी कधी या बाजूला, तर कधी त्या बाजूला पडत होते. असं वाटत होतं, की ट्रक चालवणारा डोळे बंद करून ट्रक चालवतोय. लोकांना चिरडत पुढे पुढे निघालाय. अशा तर्‍हेने तर कुणी किडा—मुंग्यांनाही चिरडत नाही. – आता इथून पुढे )

डॉ. हंसा दीप

साशा पूर्ण ताकदीनिशी ओरडला, ‘ए, थांब… यू ….. बास्टर्ड …’ पण ट्रक वेगाने लोकांना चिरडत जातच होता. पुरुष, महिला, बालके, जे समोर येईल, ते चिरडत ट्रक पुढे पुढे चालला होता आणि शेवटी एका झाडाला धडकून थांबला. साशा भान विसरून त्या ट्रककडे धावत सुटला. पण मधे मधे तडफडणारी शरीरे त्याला थांबवत होती. त्याच्या पायाला त्या मुलाचा हात लागला. त्याच्या हातात आईस्क्रीमचा कप होता. साशा त्याच्यावर पडता पडता वाचला.  समोर एक नवयुवती रक्ताने न्हालेली होती. तिच्या अर्ध्या चेहर्‍यावर तिचे कुरळे केस होते आणि अर्ध्या चेहर्‍यावर कुणा अन्य लाल हातांनी आपला आधार शोधला होता. काळ्या-सोनेरी रंगाची पर्स आपल्या मालकिणीकडे बघत होती, जी तिच्यावर आत्यंतिक प्रेम करत होती. व्हील चेअरवर बसलेल्या महिलेचे हात अजूनही हॅंडलवर  होते, पण व्हील चेअर तुटून चपटी झाली होती.

साशा एक प्रकारच्या उन्मादाने ओरडत होता. रडत होता. आणि किंचाळतही होता. कण्हणं, किंचाळया, पोलिसांचा सायरन, अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन, सगळ्यांचे एकत्रित आवाज वातावरणात घुमत होते. मिनिटापूर्वीचं ते चैतन्यमय वातावरण आता कानफोडू आवाजात बदललं होतं. चारी बाजूला हाहा:कार होता. धावपळ होती. लोक त्या जागेपासून धावत सुटले होते, जसा काही तो ट्रक पुन्हा परतून येणार आहे. सायरन आणि माईकमधून पोलिसांचा आवाज अजूनही ट्रकमधे असलेल्या ड्रायवरला चेतावणी देत होता.

ज्या उद्देशाने साशाने भाड्याचा ट्रक आणला होता, त्या उद्देशाचा त्याला विसरच पडला. असंच तर सगळं तो करणार होता. असंच लोकांना तो चिरडू इच्छित होता. पण आता या क्षणी तो लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या बरोबर संतापही वहात चालला होता आणि संतापाबरोबर आणखीही खूप काही वाहून जात होतं. जसा काही त्याचा भूतकाळच वाहून जात होता.  

किंचाळणारं क्रंदन, भयभीत क्रंदन, वेदनामय क्रंदन, सगळीकडे क्रंदनच क्रंदन. काही प्रेतं होती, काही जिवंत प्रेतं होती. फुटपाथवरून वहाणारं रक्त होतं, रक्तरंजित कपडे होते. आणखीही खूप काही होतं, ज्यांच्यासाठी शब्द ध्वनीविहीन झाले होते. पोलिस आणि अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन अधीक जोरात वाजू लागला. साशा, जखमी  होऊन पाडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी धावपळ करत होता. आपण काय करतोय, हे त्याला कळत नव्हतं. पण जे लक्षात येईल, ते करण्याचा प्रयत्न करत होता. जखमींना अ‍ॅम्ब्युलन्सपर्यन्त पोचवत होता. कुणी मृत झाला आहे, असं वाटून पुढे जात होता, तर समोर पाडलेल्या शरीरात श्वास चालू आहे, असं प्रतीत व्हायचं. रक्तप्रवाहाच्या वाढत्या गतीबरोबर मेंदूची गती ताळमेळ साधत नव्हती. वेदनेच्या सागरात तो डुबक्या घेत राहिला होता. भागदौड होती, कोलाहल होता, चित्कार होते, संताप होता. माणसाचं वाहणारं रक्त आणि वाहणारे अश्रू, एकमेकांशी जसे स्पर्धा करत होते. कुणाचा वेग जास्त आहे.

साशाचे हात रक्तरंजित होते, पण हे हात मदत करणारे होते. खून करणारे नव्हते. आपल्या त्या हातांकडे तो टवकारून बघत होता. ते हात भक्षक होता होता, एकाएकी रक्षक झाले होते. यात कुणी त्याचे नव्हते. मात्र हेच लोक त्याची शिकार होणार होते. हेच करायची इच्छा होती त्याची?

मग त्याने ऐकलं, त्या खुन्याला पोलिसांनी पकडलय. त्याला पकडल्यावर तो ओरडू लागला. ‘मला मारा.’, ‘मला शूट करा.’ त्याचा हा आवाज त्याच्या भ्याडपणाचं प्रतिबिंब होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याचे हात-पाय बांधले. त्याला गाडीत टाकून दिले आणि त्याला घेऊन ते निघाले. बंदूकधार्‍यांच्या काही गाड्या त्याच्या मागून चालल्या. आता सारे पोलीसवले, फायर ब्रिगेडवाले लोकांना मदत करू लागले होते. शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती त्या खुन्याची छी… थू… करू लागले. साशाला वाटलं, ते सारे साशाबद्दल बोलाहेत. त्याची छी… थू… करताहेत. या जघन्य अपराधासाठी त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव होतोय. सगळ्या भाषेतल्या शिव्या. पण…. हा कोण मधेच आला त्याची शंभर टक्के प्रतिछाया बनून. अगदी त्याच्याच सारखा विचार करणारा . त्याच्याच सारखा न्यायाच्या शोधात असलेला. हा माणूस मधे आला नसता, तर साशाच सगळं करणार होता.

जर तसं खरोखरंच झालं असतं, तर साशाच्या बाबतीत न्याय झाला असता? अखेर कसा न्याय त्याला हवा होता? निर्दोष लोकांना मारून कापून त्याला, लहानपणी भोगलेल्या भोगांचा न्याय मिळणार होता? की ज्याने त्याच्यावर अन्याय केला होता, त्याला शिक्षा मिळणार होती? आणि जे निर्दोष लोक मेले त्यांचा न्याय-निवाडा कोण करणार होतं?

या सगळ्याचा विचार करण्याची शक्ती त्याच्यात आली, तेव्हा तो इतका थकला होता की आता तिला ताबडतोब घरी जावंसं वाटलं. त्याच्या कानात अजूनही चीत्कार घुमत होते. दुपारच्या वेळी हालचाल आणि चैतन्यपूर्ण असणारा हा भाग आता स्मशानघाट बनला होता. पोलिसांच्या पिवळ्या पट्ट्यांनी घेरलेला हा भाग आता मृत्यूच्या विहीरीसारखा प्रतीत होत होता.

साशा रडत होता. मोठमोठ्याने रडत होता. त्याच्या मनात साठलेला क्रोध त्याच्या आसवांतून वाहून जात होता. त्याच्या समोर घडलेल्या खून-खराब्याकडे बघताना त्याला वाटू लागलं, या तूलनेत आपल्याबाबतीत काहीच विशेष घडलं नाही. ज्याने हे घडवलं, तोदेखील आपल्यासारखाच वर्षानुवर्ष मनात आग बाळगून होता का? त्यालादेखील आपलं लहानपण वेदनेने विव्हळत आणि ओरडत-किंचाळत घालवावं लागलं होतं का?

साशासारखं अनेकांच्या बाबतीत घडलेलं असू शकतं, असा विचार त्याच्या स्वप्नातही कधी आला नव्हता. त्याला वाटत राहीलं, सगळा जुलूम आपल्यालाच सहन करावा लागलाय. दुसर्‍या कुणालाच नाही. आता मात्र त्याला वाटतय, असे अनेक लोक असतील, ज्यांच्या मनात असले घाव घर करून राहिले असतील.

त्याच्या डोक्यात वळवळणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला आता मिळालेली  होती. त्या जागेतील रक्तरंजित शरीरे आता कुठल्याही न्यायाबद्दल उमेद बाळगू शकणार नाहीत. साशाने ज्यांना मदत केली, ते काही त्याचे आपले नव्हते, पण त्याला असं केल्याने खूप समाधान, शांती मिळाली होती. ही त्याच्यात अद्यापही असलेल्या माणुसकीची ओळख होती. आपल्यातली द्वेषभावना संपुष्टात यावी, म्हणून हा रक्तपात आवश्यक होता का? तीस सालापर्यंत मनात भरून राहिलेली तिरस्काराची भावना आता प्रेमात बदलत चालली होती. असं प्रेम, जे मनाच्या तळात किती तरी वर्षे लपून राहिलं होतं. यावेळी त्याला असा संतोष वाटत होता, जो यापूर्वी कधीच वाटला नव्हता.

साशाला वाटलं, आता आपण एकटं नाही राहू शकणार. त्याने लीसाला फोन करण्यासाठी आपला फोन शोधला. पण तो कुठे तरी पडून गेला होता. बेसावधसा तो कुणाला तरी बघत होता. कुणाला तरी शोधत होता. कुणाच्या तरी जगण्यासाठी प्रार्थना करत होता. कुणाचा हात कापला गेलेला होता तर कुणाचा पाय. तो त्या सार्‍यांसाठी देवाची करुणा भाकत होता.

त्या ट्रकच्या जवळपासही साशाला जावसं वाटत नव्हतं, ज्याला तो दैत्य बनवून घेऊन आला होता. ट्रकमध्ये बसल्यापासून त्याच्या मन-मस्तकात घोळत असलेल्या विचारांच्या जवळपासदेखील तो फिरकू इच्छित नव्हता. ज्या विचाराने त्याचे मन-मस्तक कलुषित केले होते. ज्या ड्रायव्हरच्या सीटवर बसून त्याने जसा विचार केला होता, तसंच घडताना उघड्या डोळ्यांनी त्याने पाहीलं होतं. आता त्या ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची त्याची हिंमत होत नव्हती.

एकाएकी त्याला आपल्या गळ्यापाशी भार पडत असल्याचं जाणवलं. दोन कोमल हात त्याच्या खांद्याला स्पर्श करत दिलासा देत होते. त्याने क्षणार्धात मान वळवून पाहीलं. ती लीसा होती. तिला आपल्या हातांनी मिठी मारत साशा रडू लागला. तीही मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या काळजाचा थरकाप झाला होता. दोघांची थरथर कापणारी शरीरे, एकमेकांना आधार देत होती, सांत्वना देत होती. शहराच्या इतिहासातील त्या खूनी दिवसाचे ते दोघे साक्षीदार होते. भरल्या बाजाराला स्मशानघट बनवणार्‍या त्या क्षणांचे ते दोघे साक्षीदार होते. साशाच्या हृदयाची धडधड अबोल होती, पण ती धडधड, खूप काही सांगत होती. भूतकाळाला, भूतकाळात झोकून देऊन नव्या पानावर नवी कहाणी लिहू पाहत होती. नि:संदेह लीसाच्या बाहूत आता एक नवी व्यक्ती होती. नवे विचार असलेली व्यक्ती. साशा…. शंभर टक्के परिवर्तीत साशा….

मूळ हिंदी  कथा 👉 ‘शत प्रतिशत’- मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग ३ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही.  कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर. आता इथून पुढे)

आपल्यावर खूप अन्याय झालाय आणि काही झालं तरी याचा बदला आपण घ्यायचाच असा ठाम निश्चयही त्याने आता केला. इतकी वर्षे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा हिशेब करत, तो मानवी नात्यांपासून दूर राहिला. त्याने कुणाला संधीच दिली नाही, त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण करायची.

डॉ. हंसा दीप

कोर्टाने जेव्हा त्याला, जोएना आणि कीथ या दांपत्याच्या हवाली केलं तेव्हा त्याच्या माथ्यावर एक छत आलं. रहाण्यासाठी चांगलं घर, आणि जगण्यासाही जे जे आवश्यक, ते सारं तिथे होतं. या दोघा पती-पत्नीमध्ये कधी भांडणे झालेली त्याने पाहिली नाहीत. सगळे कसे हळू आवाजात विनम्र होऊन बोलायचे. त्या घराने कधी, कुणाचा मोठा आवाज ऐकला नव्हता. त्याच्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे, हे कधी ल्क्षातच आलं नाही त्याच्या. त्याला वाटायचं, पोलीस आणि कोर्ट यांच्या भीतीमुळे, ते त्याच्याशी चांगलं  वागतात. थोडा जरी आवाज झाला, तरी तो खडबडून उठून बसे. त्याला वाटायचं, आत्ता त्याच्या थोबाडीत बसेल. असेच दिवस जात राहिले. होता होता तो सतरा, अठरा वर्षाचा झाला. या दरम्यान त्याचे दत्तक आई-वडीलही गेले. तो शाळेत गेला होता. दोघेही रेग्युलर चेक आपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. ते परत कधी आलेच नाहीत. तो शाळेतून परत आला, तेव्हा नातेवाईकांची, परिचितांची तिथे गर्दी झाली होती. त्याच्या कानावर आलं, की रस्त्यावर एका अपघातात, त्या दोघांचा मृत्यू झालाय. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तिथे राहायला सांगितलं. पण तो आपल्याच नादात मुक्त पक्षाप्रमाणे, आपली वाट शोधत आपलं घरटं बनवण्यासाठी तिथून बाहेर पडला.

आता तो एकटा… अगदी एकटा होता. त्याच्या आई-वडलांना त्याच्यापासून हिरावून घेणं, हा त्याच्यावर झालेला अन्याय होता. त्यानंतर तो मिळेल ते आणि जमेल तसं काम करू लागला आणि स्वत:च स्वत:चा चरितार्थ चालवू लागाला. स्वत:ला खूश ठेवण्यासाठी जे जे म्हणून करता येणं शक्य होतं, ते सारं त्याने केलं, पण तो कुणाचा मित्र नाही बनू शकला. त्याला एकच भीती होती, कुणी त्याच्या जवळ आलं आणि हिंसक बनलं, तर काय होईल?

तो बुद्धिमान होताच. मनापासून अभ्यासही केला. जोएना आणि कीथने त्याच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च केला होता. तो त्यांना निराश करणार नव्हता. ते चांगले होते, पण त्याला सतत वाटायचं, की त्यांनी त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवायला नको. त्याचंच त्याला दु:ख व्हायचं. त्यांचं लाडा-कोडाचं वागणं, त्याला पोकळ वाटायचं. सगळ्यात त्याला जास्त भीती कशाची वाटायची, तर त्याच्या आत धुमसणार्‍या संतापाची. तो कधीही उसळून बाहेर येऊ शकत होता.

सगळ्याचा विचार करता करता तो खूप पुढे आला होता. आता या मनोकामनेचा अंत करण्याच्या दृष्टीने तो खूप जवळ पोचला होता. बस्स! ही शेवटचीच लाल बत्ती. त्यानंतर तो लगेचच त्या ठिकाणी पोचेल.

‘अरे साशा तू? ‘ शेवटच्या लाल दिव्याशी गाडी थांबली, तेव्हा कुणी तरी हवेत हात फडकावत म्हंटलं.

आपलं नाव ऐकल्यावर तो गडबडून गेला. त्याला वाटलं, कुणी तरी आपली चोरी पकडलीय. त्याने वळून पाहिलं. ती लीसा होती. ती आत्ता इथे काय करतेय? साशाला प्रश्न पडला. ती नेहमीच साशाच्या अवती-भवती रेंगाळायची. पण काम झाल्यावर. ‘आत्ता इथे…?’ ही तर कामाची वेळ होती. आज त्याच्याप्रमाणेच लीसानेही कामातून रजा घेतली आहे का? यावेळी लीसाशी बोलत राहीलं, तर तो आपल काम करू शकणार नाही. तिची नजर चुकवून निघून जाणंच योग्य होईल. त्याने तिला न पाहिल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत काही तरी शोधत असल्याचे नाटक करू लागला. तिथे खरं तर काहीच नव्हतं.

“साशा, साशा!” ती इतकी मोठमोठ्याने ओरडत होती, की आता तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तर लोक तिला वेडीच समजतील. त्याला हार मानावी लागली.

हो. मीच! सगळं ठीक आहे ना? तू यावेळी इथे कशी? कामावर गेली नाहीस का? ‘ साशाच्या स्वरात आश्चर्य होतं आणि पाठ सोडवून घ्यायची घाईही होती.

‘आज मी रजा घेतलीय, पण तू इथे कसा? तू पण रजा घेतलीयस का?’

‘रजा नाही घेतली. पण एका मित्राला घर बदलण्यासाठी मदत करतोय. त्यानंतर कामावर जाईन.’

‘चल साशा! कॉफी घेऊयात. नंतर जा म्हणे.’ लीसाच्या डोळ्यात चमक होती, ’ठीक आहे’ साशा म्हणाला. दिवा बदलला होता आणि त्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोचायचं होतं. मधेच लीसा आली, तर सगळंच अवघड झालं असतं. त्यापूर्वी तिच्याबरोबार कॉफी होऊन जाऊ दे. काही बिघडत नाही. थोड्या वेळाने तो आपलं काम करू शकतो.

लीसाला पसंतीचा अंगठा दाखवून त्याने आधी विचार करून ठेवला होता, तिथे गाडी पार्क केली. आजचीही मुलाखत लीसाला संस्मरणीय वाटायला हवी, असा विचार करत तो तिच्यासोबत आत जाऊन बसला. त्याच्या आतल्या धोकादायक इच्छांचा तिला वासही लागू नये, यासाठी नेहमीपेक्षा तो जास्तच काळजी घेत होता. लीसाला जरा आश्चर्यच वाटलं.

‘काय झालं? आज जरा वेगळा वाटतोयस तू! ‘ लीसा म्हणाली. या आकस्मिक झालेल्या भेटीचा आनंद लीसाच्या चेहर्‍यावर झळकत होता. 

‘लीसा आज तू फार गोड दिसते आहेस.’ लीसाच्या डोळ्यात बघत तो प्रेमाने म्हणाला.

 ‘आज तू प्रथमच माझ्याकडे नीटपणे बघतोयस.’ आपले खोडकर डोळे नाचवत लीसा म्हणाली.

‘ मग काय आधी डोळे बंद होते? ‘ सगळं माहीत असूनही साशा आजाण बनू पहात होता. त्याला अभिनय काही करता येत नव्हता. आज प्रथमच तो अगदी मनापासून बोलत होता.

‘मला तरी असंच वाटतय, की तू कधी माझ्याकडे नीटपणे पाहीलंच नाहीस. मीच तेवढी अशी आहे, की कित्येक दिवसापासून तुझ्या मागे मागे फिरते आहे आणि एक तू आहेस, जो माझ्यापासून दूर दूर पळतो आहेस.’

‘माहीत आहे.’ हत्यार खाली ठेवण्यातच आपली भलाई आहे, हे साशाच्या लक्षात आलं.

‘शाळेपासून हे असंच चाललय. कधी कधी मला वाटतं मी वेडी आहे, जी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करतेय. मरतेय तुझ्यासाठी. आता तर आपण दोघे मिळवायलाही लागलोत. आता तू कुठल्या गोष्टीसाठी वाट बघतोयस, कुणास ठाऊक?’ लीसा आणखी थोडी त्याच्याजवळ सरकली. तिची जवळीक साशाला चांगली वाटली. शरीराच्या ऊबेचं आकर्षण प्रथमच त्याला जाणवलं. एक वेगळीच ओढ, ज्याच्या पकडीत तो यापूर्वी कधीच आला नव्हता.

लवकरच कळेल तुला, मी कोणत्या गोष्टीची वाट पाहत होतो.’ तिचे हात आपल्या हातात घेऊन साशा म्हणाला आणि क्षणभर विसरलेलं त्याचं लक्ष्य त्याच्यासमोर आलं.

‘खरच!’  त्याच्या हाताचं चुंबन घेत लीसा म्हणाली, ‘ओह! साशा, चल, मग आपण लग्न करू. आता प्रतीक्षा करणं आवघड झालय! ‘

‘लीसा तू चांगली मुलगी आहेस. किती तरी चांगली मुले तुला मिळू शकतील. ‘ तिचा आनंद साशाला जाणवत होता, पण एक शंकाही होतीच.

‘अनेक जण मिळतील, पण तू नाही ना मिळणार! बरं ते जाऊ दे. हा भाड्याचा ट्रक घेऊन तू निघलाहेस कुठे? घर बदलण्यासाठी कुठल्या मित्राची मदत करायला निघाला आहेस?’

‘आहे एक जुना दोस्त. ‘ पुन्हा एकदा आपली विचारांची गाडी रुळावर आणीत साशा म्हणाला. ‘लीसा प्लीज़ आता मला जाऊ दे. जरा घाईत आहे. ल्ग्नासारख्या गोष्टीवर विचार करण्यासाठी थोडा वेळ तरी हवा ना!’

‘ हो! हो! नक्कीच! जरूर वेळ घे, पण इतकाही वेळ लावू नको, की आपण म्हातारे होऊ. पण साशा आज आणखी थोडा वेळ थांब ना! जीवनातील हे रोमांचक क्षण, मी आणखी थोडा वेळ अनुभवू इच्छिते.’ लीसाला प्रथमच इतक्या निवांतपणे    साशा भेटला होता आणि हे क्षण ती हातचे जाऊ देऊ इच्छित नव्हती.  

‘ नाही लीसा मला जायला हवं. मी माझ्या दोस्ताला वेळ दिलीय.’  साशाच्या डोक्यातील विचारांची वावटळ त्याला घाई करायला उसकत होती.

‘मी पण येऊ का तुझ्याबरोबर?’

‘नको.’ तिचा पाठलाग चुकवणं, तसं आधीपासूनही त्याला अवघड वाटायचं. तिला खूप आवडायचा तो, पण तिला माहीत नाही, आज त्याचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्याच्यासाठी खास आहे. आज त्याचात परिवर्तन होणार आहे. यानंतर ना आठवणी रहातील, ना तो. ना भूतकाळ राहील, ना भविष्यकाळ.

कॉफी शॉपमधून उठून आता तो तिला बाय म्हणत होता, एवढ्यात त्याच्या समोरून एक ट्रक धडधडत- खडखडत निघाला आणि फुटपाथवर चढला. फुटपाथवर चढताच त्याने अशी गती पकडली की जणू जमिनीवर कुणीच नाही आहे. त्याचा अ‍ॅक्सीलेटर दाबला जात होता आणि किंचाळ्यांचा आवाज  आकाश फाडू पाहात होता. भूकंप झाला होता जसा. जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. कुणी वाचले. कुणी टायरच्या खाली आले. कुणी मधेच अडकून ओढले जाऊ लागले. आता सगळीकडून पायी चालणारे वाट फुटेल तिकडे अंदाधुंद पळत सुटले. गर्दीला डोळे नव्हते. गर्दी मेंढीच्या चालीने निघाली होती. सगळे पळत होते, बस! जो कुणी फुटपाथवर मधे होता, तो त्या ट्रकच्या पकडीत होता. डाव्या-उजव्या बाजूला पळणारे लोक धक्क्यांनी कधी या बाजूला, तर कधी त्या बाजूला पडत होते. असं वाटत होतं, की ट्रक चालवणारा डोळे बंद करून ट्रक चालवतोय. लोकांना चिरडत पुढे पुढे निघालाय. अशा तर्‍हेने तर कुणी किडा—मुंग्यांनाही चिरडत नाही.

क्रमश: भाग ३

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – कधी कधी त्याला वाटायचं, हे सगळे लोक मुंग्यांसारखे आहेत. त्यांना हातात घेऊन चुरगळून टाकावं. गाडीच्या चाकाखाली तुडवून टाकावं. आपल्या जंगली जिद्दीसाठी ते जशी मुलांना आपली शिकार बनवतात, तशी त्यांची शिकार करावी. आता इथून पुढे)

त्याच्या मनात आलं, या सार्‍यासाठी मग आजचाच दिवस का निवडू नये? आज जीवनातला आपला खास दिवस आहे. आज आपला वाढदिवस आहे. भयमुक्त होण्यासाठी, यापेक्षा दुसरा चांगला दिवस कोणता असेल? आज नाही केलं, तर पुन्हा कधी करायला जमेल?

अकस्मात मनात आलेल्या या विचारात त्याच्या मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी दडून राहिलेला उन्माद सामील झाला. त्याच उन्मादाने रस्ता दाखवला. एका भाड्याने मिळणार्‍या गाडीच्या ऑफीसचा. त्याने अनेकदा कार, जीप भाड्याने घेतली होती. मग विचार केला, आज एक ट्रकच भाड्याने घेतला तर- नंतर विचार करू काय करायचं ते. जेवढ्या त्वरेने हा विचार त्याच्या मनात आला, तेवढ्या त्वरेने त्याने तो अमलातही आणला. नाही तर एखादा निर्णय घेण्यासाठी त्याला किती तरी दिवस, महीने, वर्षसुद्धा लागायचं.

डॉ. हंसा दीप

साशाने एक छोटा ट्रक भाड्याने घेतला आणि वेगाने ट्रक चालवू लागला. त्याच्या गतीपेक्षा त्याच्या डोक्यातील विचारांची गती किती तरी पटीने जास्त होती. आज तो तीस वर्षांचा झाला होता. पूर्णपणे लायक झाला होता. आज नाही, तर पुन्हा कधीच नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायला, तो अगदी उतावीळ झाला होता. शांती आणि सौहार्द बाळगत तो इथपर्यंत पोचला होता. आता यापेक्षा तो जास्त प्रतीक्षा करू शकत नव्हता.

एक गोष्ट करणं शक्य होतं. गाडीचा वेग वाढवायचा. ती फुटपाथवर चढवायची. फुटपाथवर असलेल्या लोकांना चिरडत सुसाट वेगाने गाडी पुढे न्यायची. रस्त्याच्या शेवटी कडेला जे झाड आहे, त्याला गाडी टकरवायची. मग गाडीही वाचणार नाही आणि तोही.  गाडीला नंतर आग लागली, आणि त्याची नावनिशाणीही मिटून गेली, तर सोन्याहून पिवळं. आणि अशा तर्‍हेने त्याच्या ‘मिशन सूड’ या मोहिमेचा यशस्वी अंत होईल. तो तृप्त होईल आणि समाधानाने मरेल.

पण का  कुणास ठाऊक, गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळली. कदाचित आपल्या घराचा निरोप घ्यावासा वाटला त्याला. धिम्या गतीने तो गाडी चालवत होता. त्याला लोकांना भासवायचं होतं की तो घर बदलतोय आणि सामान घेऊन जाण्यासाठी त्याने ट्रक आणलाय. तो मात्र घरच नव्हे, तर शहर, देशच काय जगही बदलायची इच्छा धरून आलाय. घराजवळ त्याच्या परिचयाचे अनेक चेहरे आपल्या कामावर जाताना त्याला दिसत होते.

“गुड मार्निंग, काय म्हणातोयस दोस्त?” जवळून निघलेला जेसन एका क्षणासाठी थांबला. तो कामावर जाताना रोजच सकाळी भेटायचा.  जेसनच नव्हे, तर अनेक लोक याचवेळी कामावर निघण्यासाठी बाहेर पडत.

“गुड मार्निंग जेसन, सगळं ठीक आहे.” आपले हात हवेत पसरून त्याच्या अभिवादनाला उत्तर देत, साशाने स्मितहास्य केलं.

‘आज ट्रक घेऊन कामावर निघालायस?’

‘हं! एका दोस्ताचं सामान शिफ्ट करायचय. नंतर कामावर तर जायलाच हवं!’

‘ काम तर करायलाच हवं! ठीक आहे परत भेटू!’

जेसन तिथेच कुठे तरी रहायचा. तसेच आणखी काही लोक होते। येता-जाता दिसायचे. त्यापलीकडे कुणाशी तसा काही संबंध नव्हता. रोज याच वेळी भेटणार्‍यांना हाय-हॅलो करून तो पुढे निघाला. कुणालाही जराशीही कुणकुण नव्हती की आजचा दिवस त्याच्यासाठी किती खास दिवस आहे. मुक्तीचा दिवस. त्या विचारातून मुक्ती मिळवण्याचा दिवस, ज्या विचाराने आजपर्यंत त्याची पाठ सोडली नव्हती. त्या जखमेपासून मुक्ती, जिची वेदना त्याला रक्तबंबाळ करत त्याच्या काळजापर्यंत पोचली होती. शरीराचे घाव केव्हाच भरून आले होते, पण त्या जखमांनी मनावर घातलेले घाव अजूनही ताजेच होते. त्यामुळे आजपर्यंत तो कुणालाही आपलं मानू शकला नाही. प्रत्येक जण त्याला दहशतवादीच वाटायचा. मुखवटा घालून आलाय आपल्यापुढे, असं वाटायचं त्याला. मुखवटा काढला, तर आत हिंसक पशूच असणार आहे, जो त्याला पकडीत जखडणार आहे असं वाटायचं त्याला. तो धडपडेल. तडफडेल. मदतीसाठी इतरांना हाका मारेल, असे विचार त्याच्या मनात यायचे.

साशाचे पालन-पोषण करताना, त्याच्या दत्तक माता-पित्यांनी त्याला खूप काही शिकवलंही होतं. अनेकदा भूतकाळ त्याची पाठ सोडायचा, तेव्हा तो असा माणूस बनायचा, की प्रत्येकाला तो हवाहवासा वाटायचा. प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करू लागायचा. रुंद कपाळ, भुरे केस, छोटीशी फ्रेंच कट दाढी. मोठा आकर्षक दिसायचा तो. त्याचे नाव घेऊन मुली दीर्घ निश्वास टाकत. त्याची शालीनता बघून अनेक जणी त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत. पण कुणीच त्याच्या मनाच्या तळापर्यंत पोचली नाही. एक एक करत सगळ्यांनी आपले हत्यार टाकले. अपवाद फक्त लीसाचा.

लीसा अजूनही त्याच्या मागे आहे. तिचं शालेय शिक्षण त्याच्याबरोबरच झालय. अनेकदा ती त्याला भेटायला येते. त्याच्या घराच्या बाहेरही आणि कामाच्या बाहेरही.  साशाने तिची उपेक्षा केली, बघून न बघितल्यासारखं केलं, तरी ती आपली सावलीसारखी त्याचा मागे असते. तिचा स्वत:चा परिवार आहे. ती कामदेखील करते. साशाला कधी कधी समजतच नाही की साशा तिच्यापासून दूर का रहातो?       

साशाची इच्छा असूनही तो लीसाला समजावू शकला नाही, की ती त्याला आवडते, पण त्याच्या आत जी भीती आहे, तिला तो घाबरतोय. ती भीती त्याला अशा तर्‍हेने जखडून टाकते, की कुठल्याही व्यक्तीतला चांगुलपणा त्याच्या ल्क्षातच येत नाही. त्याला नेहमी तेच तेच आणि तेवढंच दिसतं. चांगल्या चेहर्‍यांच्या आतही त्याला कुठे ना कुठे तरी पशुता दृष्टीस पडते. मनापासून वाटूनही पापुद्र्यांखाली जमलेल्या भीतीपासून त्याला मुक्ती मिळत नाही. ओल्या मातीला जसा आकार दिला जाईल, त्याच आकारात ती वस्तू कायम रहाते, तुटल्या-फुटल्याशिवाय या वस्तूचं दुसरं काहीच होऊ शकत नाही तसंच. साशाचं बालमनदेखील त्या भीतीत असं घट्ट जखडलं गेलय, इतकं पक्कं झालय की बदलायला तिथे कुठे वावच उरला नाही.

लीसाकडेदेखील, तो त्या पद्धतीने बघू शकला नाही, ज्या पद्धतीने त्याने बघावं, असं लीसाला वाटत होतं. साशालादेखील तिच्या संगतीत खूप छान वाटायचं. तो तिच्या संगतीत वेळ घालवू इच्छ्त असे. पण काही क्षणातच ते विचार त्याच्या डोक्यात प्रहार करू लागत, आणि ते त्याला एकटं  राहायला भाग पाडत. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एक दिवस लीसा साशाला म्हणाली, ‘ मी तुला मुळीच आवडत नाही का? ‘

या प्रश्नासाठी तो तयार नव्हता. उत्तर लगेच द्यायला हवं होतं. त्यामुळे गोष्ट घुमवून फिरवून तो बोलू शकला नाही. तो म्हणाला, ‘तू मला खूप आवडतेस.’

‘खरंच!’ लीसाचे डोळे चमकले. साशाच्या डोळ्यात खोलवर काहीतरी शोधताना तिचा चेहरा प्रफुल्लित झाला. तिच्या आंगोपांगातून खुषी झळकू लागली. असं उत्तर येणं तिच्यासाठी खूप रोमॅंटिक होतं आणि खूप रोमांचकही.

‘ हो. अगदी खरं!’ तो स्वत:ला थोपवू शकला नाही. एका तरुण हास्यासह तो तिच्याकडे एकटक बघत राहिला.

‘मग माझ्यापासून दूर का रहातोस?’

‘कारण मी अजून तरी कुठलंही नातं जोडायला तयार नाही.‘

‘ काही हरकत नाही. मी समजू शकते. तुला हवा तेवढा वेळ तू घे. मला तुझी सदैव प्रतीक्षा राहील.’

लीसा आसपासच कुठे तरी राहायची  आणि साशाची येण्या-जाण्याची वेळ बघून त्याला भेटण्याचा प्रयत्न करत करायची. साशादेखील सामान्य दिसण्याचा, रहाण्याचा प्रयत्न करत रहायचा. आपल्या आत कोणतं युद्ध चालू आहे, याची त्याने कुणालाही जराही जाणीव होऊ दिली नव्हती.

जेव्हा भूतकाळच्या आक्रमणापासून तो दूर असायचा, तेव्हा तो सगळ्यांना खूप मदत करायचा. सगळ्यांच्या मनात त्याने आपल्यासाठी खास जागा निर्माण केली होती. गरजावंतांसाठी जे जे करणं शक्य असेल, ते ते तो करत होता.     आज मात्र तो जसा विचार करत होता, तसा त्याने यापूर्वी कधीच केला नव्हता. आज त्याच्यात इतकी आकड आली होती, की स्वत:ला सशक्त दाखवण्यासाठी, आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो निघाला होता. टोरॅंटो शहराच्या नार्थ यॉर्क एरियात, फिंच अ‍ॅव्हेन्यूपासून पुढे जात  यंग स्ट्रीट आणि शेपर्ड अ‍ॅव्हेन्यूच्या चौकाजवळ त्याला पोचायचं होतं. आपलं काम पूर्ण करण्यासाठी. त्या प्रत्येक घटनेबद्दलचा न्याय मिळवण्यासाठी, काही खास लोकांचे चेहरे काजव्याप्रमाणे चमकत होते आणि अदृश्य होत होते. त्याच्यावर दया दाखवणार्‍यांचेही चेहरे त्यात सामील होते.

‘बिच्चारा..’

‘राक्षसाच्या घरात जन्माला आलाय हा निष्पाप मुलगा…’

‘मार खाऊन खाऊन दिवस काढतोय.‘   

‘सारखा भेदरलेला असतो. ‘

लोक दहा तोंडांनी बोलत. जेवढी तोंडे, तेवढे बोल. सगळ्यांची तोंडे तो आता बंद करेल.

गाडी पुढे… पुढे… पुढे चालली होती. लाल दिवा, हिरवा दिवा, याच्याबरोबर त्याच्या छातीची धडधड वाढत होती… कमी होत होती. दुपारची वेळ होती. रहदारी जास्त नव्हती. एकदा तिथे पोचलं, की गाडी कुठून कशी वर चढवायची, याचा तो विचार करणार होता. आपल्या हातातलं स्टियरिंग व्हील त्याने आशा तर्‍हेने धरून ठेवलं होतं, जशी काही  कुणाची तरी मानगुटच त्याने धरून ठेवलीय. त्याला जुनी आठवण झाली. मागे एकदा त्याच्या वडलांनी त्याची अशीच मानगुट धरून ठेवली होती. ती कशी बशी सोडवून घेऊन तो आपल्या खोलीत आला होता. खोलीचा दरवाजा बंद करून तो दिवसभर आत उपाशी तापाशी तसाच बसून राहिला होता. अशीच एकदा त्याच्या आवडत्या सायकलीची मोडतोड करण्यात आली होती. सायकलीच्या प्रत्येक भागाचे तुकडे तुकडे होत असलेले बघताना त्याला वाटत राहिलं, आपल्या शरिराचेच बोटा बोटाएवढे तुकडे होऊन फेकले जाताहेत. सायकलचा प्रत्येक भाग तोडताना होणारा आवाज त्याला आपल्याच ओरडण्यासारखा वाटला, मदतीसाठी जणू तो कुणाला तरी हाका मारत होता.

त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही.  कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर.

    क्रमश: भाग २

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

परिवर्तन – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा !’

‘आज भलताच गोड दियातोयस.  काही खास…’

’आज मौज-मस्ती करण्याचा दिवस आहे ना!’

‘खायचं… प्यायचं… आणि दिवसभर भटकायचं’

‘भाड्याची गाडी घेऊन ड्रायव्हिंगचा आनंद लुटायचा. ‘

आज साशाचा तिसावा जन्मदिवस. केस नीट-नेटके करत आणि आरशाशी बोलत तो हसतो. स्वत:शी गप्पा मारायला त्याला आवडतं. आज तर खास दिवसाची खास सकाळ आहे. मस्तपैकी तयार होऊन स्वत:ला वाढदिवसाची भेट देण्यासाठी बाहेर जायचय. रजा आधीच घेऊन झालीय. शहरातल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये सकाळचा नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण त्याहून खास अशा चांगल्या जागी. भूकदेखील इतर दिवसांच्या मानाने तीव्रतर झालीय. खास रेस्टॉरंटमधील खास पदार्थांचा दरवळ आत्तापासून नाकपुड्यातून वहात पोटापर्यंत जाण्यासाठी उतावीळ झालाय. 

डॉ. हंसा दीप

आपल्या संथ गतीने आरामात कपडे बदलून बूट घालण्यासाठी तो बाहेर आला. घाईघाईत जवळच्याच स्टुलाला धडकला आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्नात जी उडी मारली, ते तो भिंतीवर जाऊन आपटला.  शरिराचं सारं वजन हातांनी पेललं. इतकी वेदना झाली, की काही काळ डोळे रहाटगाडग्याप्रमाणे गरगरले. त्याने या छोट्याशा दुर्घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. आता उत्तम पॉलीश केलेले बूट घालण्यासाठी तो सेल्फमध्ये मोजे शोधू लागला.

अर्ध्या बाहीचा आपल्या आवडीचा टी – शर्ट घालून बुटाची लेस बांधताना जाणवलं, त्याचा हात जरासा आखडलाय. हात कुरवाळत, चोळत त्याने कोपरापर्यंत पाहिले. तिथे हिरवे-निळे डाग उमटले होते. त्या डागांजवळ चांगली जखम झाली होती. त्याच्याजवळच्या कातडीवर रक्ताचे लहान लहान थेंब चमकत होते. बाहेर येण्यासाठी उसळ्या मारत होते. हा डाग किवा हे आलेलं रक्त साधंसं रक्त नव्हतं. त्याचा सगळा इतिहास त्यात सामावलेला होता. एक दोन पाने नव्हेत. सगळंच्या सगळं पुस्तक होतं. इतिहासाचं हे पुस्तक असं होतं , की जे उघडायचं, तेव्हा त्याचं मन आणि मस्तक पूर्णपणे विषासक्त करूनच बंद व्हायचं. हेदेखील आज व्हायला हवं होतं? आज तो खूप खूश होता. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी छानपैकी सजून – धजून तयार झाला होता. जखम झाली, त्याठिकाणी त्याची नजर गेली, तेव्हा एक क्षणही लागला नाही, त्याला, ती — त्यावेळची—- दृश्ये डोळ्यापुढे यायला, ज्यावेळी, तो भिंतीवर आपटावा, म्हणून त्याला धक्का मारला जात होता. अशाच प्रकारच्या काळ्या-निळ्या खुणा त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी उमटत होत्या. या खुणा नष्ट होण्यासाठी  जितका वेळ लागायचा, त्यापेक्षा किती तरी जास्त वेळ त्याच्या मनाती भयाची भावना नष्ट व्हायला लागायचा. जेव्हा असे डाग डोळ्यासमोर यायचे, तेव्हा तेव्हा, तो त्या ठिकाणी पोचायचा, जिथे त्याला कधीच जायची इच्छा नसे. 

एकदा त्याच्या हातून दुधाचा कप पडला, दूध सांडलं आणि ते टेबलाच्या कडेने  वहात, जवळच बसलेल्या त्याच्या वडलांची पॅंट आणि कोट ओला करून गेलं. त्यावेळी त्याने जशी काही सिंहगर्जना ऐकली. त्याला एक जोरदार थप्पड मारली गेली. तो भेलकांडला. खुर्चीवरून खाली पडून भिंतीला टक्करला. डोकं, हात, पाय, नाक सगळ्याला जखम झाली. त्यावर हिरवे-निळे डाग उभारले. नाकातून रक्त वाहू लागलं. टप- टप दुधात रक्ताचा लालिमा मिसळला आणि एक नवाच मातकट रंग तयार झाला. त्या निरागस मुलाचं मन मळून गेलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा दुधाचा कप हातात येई, तेव्हा तेव्हा त्याचे हात कापू लागत. डोळे घट्ट मिटून तो दूध गटकत जाई आणि कप खाली ठेवूनच श्वास घेई.

हानपणापासूनच तो भयाच्या अंधार्‍या विहिरीत ढकलला गेला होता. बाहेरचे जग समजून घेण्यासाठी जेव्हा त्याला बाहेर काढलं गेलं, तोपर्यंत त्या विहिरीचं साठलेलं, दुर्गंधयुक्त पाणी त्याच्या रक्तात मिसळलं होतं. शरीरात पसरलेली ही घृणेची दुर्गंधी, जेव्हा तेव्हा बाहेर येऊन, त्याला श्वास घेणं अवघड करायची. त्याला अशा तर्‍हेने विचलित करायची, की तो गुदमरून जायचा. हे ते जग होतं, जिथे त्याने हिंसेशिवाय दुसरं काहीच बघितलं नव्हतं. जनावरांनी केलेली हिंसा, त्यांच्या पोट भरण्याशी संबंधित असते. पण माणसाने केलेल्या हिंसेची भूक अनेक प्रकारची असते. कधी ती त्याच्या अहंकाराशी जोडलेली असते, कधी त्याच्या नशेशी, कधी त्याच्या चीड-त्राग्याशी जोडलेली असते, कधी त्याच्या अपयशाशी. अशा तर्‍हेची दानवीयता, मानवतेला गिळून, चांगल्या माणसाला राक्षस बनवते आणि हिंस्त्र श्वापदाप्रमाणे जीवन जगायला भाग पाडते.

हेच सगळं त्याने पाहिलं होतं. शिकवलं होतं किंवा असं म्हणा, त्याला दाखवलं गेलं होतं. तो जे काही लहानपणापासून शिकला होता, ते त्याने साठवून ठेवलं होतं आणि तेच मनातल्या मनात शिंपडत होता. आपल्या तिरस्काराच्या पेरलेल्या बियाणाला तो पाणी देत राहिला. ते अंकुरित झाले. फुलले, फळले. आतल्या क्रोधाला, वैरात रूपांतरीत करत, त्याच्या तळतळाटाची वाढ करत राहिले. हे त्याचा आतील युद्धं होतं. ते जिंकण्याचा तो किती तरी वर्षे प्रयत्न करत होता, पण जिंकू शकत नव्हता. जेव्हा त्याला मार दिला जायचा, तेव्हा त्याला वाचवणारं कोणीच नसे. आसपास कोणी नसेच, तर येणार तरी कोण? शेजारी दूर होते. त्याच्या हळू आवाजातलं ओरडणं, किंचळणं त्यांच्यापर्यंत पोचतच नसे. त्याच्याजवळ होती फक्त भीती.

एक दिवस खेळता खेळता, त्याने बॉलला मारलेली कीक वर टांगलेल्या काचेच्या झुंबरावर जाऊन आदळली. झुंबर महागडं होतंच. शिवाय त्याच्या दिवाणखानाभर विखुरलेल्या काचा गोळा करायचं काम… त्याच्या वडलांचा संताप आटोक्याबाहेर गेला. त्या दिवशी रागावलेल्या वडलांनी त्याला असं काही मारलं की त्याचे दातच तुटले. तोडातून वहाणारं रक्त, त्याच्या डोळ्यात उतरलं होतं. सुडाचं एक बीज त्याच्या मनात अंकुरू लगलं. तो काही सांगू शकत नव्हता, पण आपली वेदना एकत्र करू लागला होता. घाव, जखमा, वेदना आणि भीती यांचा एकत्रित प्रभाव त्याला माणसांपासून तोडत राहिला.

पुढल्या वेळी त्याच्या शरीरावर चामड्याच्या पट्ट्याची अशी बरसात झाली, ज्याची वेदना तो अद्यापही विसरू शकला नाही. त्यावेळी त्याने आपल्या वडलांना एका बाईबरोबर पाहिल्यावर तोंड विचकले होते. वडलांचा संताप, पट्ट्याबरोबर साशाच्या शरिरावर उतरत होता. इतकं मोठं झाल्यावरही, कधी कधी झोपेत ते दु:स्वप्न त्याचा पाठलाग करायचं. दचकून घामाने थबथबत तो झोपेतून जागा व्हायचा. अर्ध्या रात्री, ते दृश्य झोपेतून त्याला उठवून आपल्या बाहुंचा विळखा घालायचा आणि तो त्यात धसत जायचा. 

काळानुसार हे घाव भरण्याच्याऐवजी ते अधिकाधिक खोल जात आहेत. छोट्या- मोठ्या घावांचा त्याने हिशेबच ठेवला नाही. मोजण्यासाठी अनेकदा त्याला ती दृश्ये डोळ्यापुढे आणावी लागत. अनेकदा त्याने ती पीडा अनुभवली होती, कारण ती दृश्ये, ती वेदना तो विसरूच शकत नव्हता.

जेव्हा रोजच्या ओरडण्या-किंचाळण्याचा आवाज वाढत गेला, आवाज मोठा होऊ लागला, तेव्हा शेजारी-पाजारी त्रासले. मुलाची स्थिती लक्षात आली, तशी माणुसकी पाझरली. कुणी तरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस, कोर्ट वगैरे सोपस्कार होऊन त्याला दत्तक आई-वडलांकडे सोपवण्यात आलं. ज्यांना स्वत:चे मूल नव्हते, असे पालक, अशा  निरागस मुलांना, अन्न, वस्त्र, निवारा देण्यासाठी स्वेच्छेने तयार असत.

साशा नवीन घरात गेला, पण इथेही त्याची भीती कमी झाली नाही. नवी आई जोएना  आणि नवीन डॅडी कीथ प्रयत्न करत राहिले, ‘साशा, घाबरू नको. आता हेच तुझे घर आहे. इथे तुला जे हवं असेल, ते तू करू शकतोस. बोल तुला काय पसंत आहे? चल. फिरायला जाऊ. तुझ्यासाठी खूप खेळणी घेऊन येऊ.’

तो मान खाली घालून ऐकत राहयचा. त्याला भयमुक्त करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच असायचे.  कित्येक दिवस तो काही बोललाच नाही. नंतर बोलायला लागला, तोही घाबरतच. त्याला वाटायचं, हे प्रेम नकली आहे. थोडीशी जरी चूक झाली, तरी त्याला पुन्हा शिक्षा होईल. गप्प बसणंच योग्य. जे जसं असेल, तसं तो स्वीकारायचा. खायला सांगितलं, खायचा. झोपायला सांगितलं, बिछान्याकडे जायचा. मग झोप येवो, अथवा न येवो. जे सांगितलं जाई, ती काळ्या दगडावरची रेघ समजून तो तसं वागायचा. कुणालाही एवढीही तक्रार करायला जागा मिळू नये, असं तो वागायचा. नाही तर पुन्हा कुणाचे तरी हात त्याला मारायला उठतील, असं त्याला वाटायचं.

शाळेत जाताना अनेक मुले रस्त्यावरून आईचा हात धरून जाताना त्याला दिसायची. पण त्याला काही फरक पडत नसे. तो आई या शब्दाशी परिचित होता. आईच्या नात्याशी नाही. आईच्या आकार- प्रकाराशी परिचित होता. आईच्या ममतेशी नाही. आपल्यावर थोपलेल्या घरात तो कैद होता. आपल्या घरातून तो मुक्त झाला, तरी जोएनाला आईच्या रूपात बघण्याचा त्याने कधी प्रयत्नच केला नाही.

एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे शालीन बनून त्याने हे दिवस काढले. एका मेहनती व्यक्तीप्रमाणे तो आपले जीवन जगत होता. मात्र एक विचार सतत त्याच्या मनात यायचा, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेतला पाहिजे. ‘मीच का?’, ‘माझ्याच बाबतीत असं का व्हावं?’ हेच प्रश्न त्याच्या मनात वारंवार यायचे. त्याला टोचत रहायचे. या जखमातून अजूनही पू वाहत होता. त्यावर मलमपट्टी करण्याची वेळ आली होती. स्वत:ला न्याय मिळवून घेऊ इच्छित होता तो. आपल्या मनातील या टोचणीपासून त्याला मुक्ती हवी होती, पण कशी? त्याला कळत नव्हतं.

बालपणीच्या सहनशीलतेची त्याला आता किंमत वसूल करायची होती. आताही प्रतिकार केला नाही, तर जगातले सगळे लोक आपल्या हिंसक स्वभावाने प्रत्येक मुलाला आपली शिकार बनवतील, असं त्याला वाटायचं. कधी कधी त्याला वाटायचं, हे सगळे लोक मुंग्यांसारखे आहेत. त्यांना हातात घेऊन चुरगळून टाकावं. गाडीच्या चाकाखाली तुडवून टाकावं. आपल्या जंगली जिद्दीसाठी ते जशी मुलांना आपली शिकार बनवतात, तशी त्यांची शिकार करावी.

    क्रमश: भाग १

मूळ हिंदी  कथा 👉 शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फुंकर… भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ फुंकर… भाग-1 डॉ. ज्योती गोडबोले 

वर्षभर आजारी आणि अंथरुणाला खिळलेले  आबा अखेर देवाघरी गेले. रीतीप्रमाणे चार लोक येऊन सांत्वन करून,  चार गोष्टी सांगून गेले आणि घरात माई अगदी   एकट्या पडल्या. त्यांना सगळं मागचं आठवलं. नंदिनी तिकडे  दूर परदेशात ! आणि अरुणला तेव्हा आबांचं प्रेम कधीच नव्हतं. त्यांचा अतिशय शीघ्रकोपी स्वभाव, आणि दुसऱ्याला सतत मूर्खात काढायची वृत्ती. त्यामुळे माणसे कधीच जोडली गेली नाहीत. नोकरीत खपून गेलं, पण एकदा रिटायर झाल्यावर कोण ऐकून घेणार ! आबांची हुशारीही दुर्दैवाने अरुणकडे आली नाही. तो वारसा मात्र नंदिनीला मिळाला आणि अतिशय तल्लख बुद्धी घेऊन आलेली नंदिनी डॉक्टर झाली आणि आपल्याच वर्गमित्राशी लग्न करून परदेशात गेली ती कायमचीच. माई आबा अगदी कौतुकाने दोनचार वेळा तिच्याकडे जाऊनही आले.  पण मग पुढेपुढे त्यांना तो प्रवास, ती थंडी झेपेना. जमेल तशी नंदिनी येत राहिली पण तिचंही येणं हळूहळू कमीच होत गेलं. आबांनी हरप्रयत्न करूनही अरुण जेमतेम बी.कॉम. झाला आणि पुढे मला शिकायचं नाही यावर ठाम राहिला. खूप वशिले आणि ओळखी काढून आबांनी अरुणला खाजगी नोकरीत चिकटवून दिला. निर्विकारपणे अरुण ती नोकरी करू लागला. ना कसली जिद्द,ना कसली पुढे जाण्याची इच्छा! माईना अरुणचं काही वेळा वाईट वाटे. लहानपणी अरुण चांगला हुशार होता शाळेत. बोलका, खेळात भाग घेणारा,अभ्यासातसुद्धा  चांगले असत मार्क्स त्याला. पण नंदिनी शाळेत गेली आणि त्याच्यापेक्षा  तीन वर्षानी लहान असूनही अभ्यास, खेळ , वक्तृत्व सर्व गोष्टीत चमकू लागली तेव्हा शाळेत आपोआप अरूणची तुलना तिच्याशी होऊ लागली आणि घरीही आबा सतत त्याला तुच्छ वागवू लागले. अरुण अबोल झाला  मनाने खचूनच गेला आणि पहिल्या दहा नंबरात असणारा अरुण पार शेवटच्या नंबरात जायला लागला. माईंनी खूप प्रयत्न केले, त्याला शिकवणी लावली, पण त्याची घसरण थांबलीच नाही. हसरा आनंदी अरुण अबोल घुमा झाला आणि  त्याला जबर  इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स आला.  दिवसदिवस त्याचा आबांशी संवाद होत नसे आणि  माईंशी मात्र तो जरा तरी खुलेपणाने बोलत असे. नंदिनीनेही कधीही अरुणला विश्वासात घेतले नाही, की त्याच्यावर प्रेम केले नाही. त्या दोघा भावंडात अजिबात ओढ प्रेम काहीही नव्हते कधीही.  नंदिनी भावाच्या सदैव वरचढच राहिली. माईना हे समजत होते पण त्या काही करू शकायच्या नाहीत. उलट काही सांगायला गेलं तर नंदिनी म्हणायची, “दादा अगदी मंद आहे माई ! शाळेत सुद्धा नुसता शेवटच्या  बाकावर बसलेला असतो. बाई मलाच म्हणतात,जरा शिकव तुझ्या दादाला.लाज वाटतेअगदी ! असा कसा ग हा.” माई हताश व्हायच्या पण दोन्ही मुलं आपलीच ! शिकवणी लावली म्हणून तो निदान बरे मार्क्स मिळवू लागला. नंदिनी लग्न करून गेल्यावर अरुणला उलट हायसेच वाटले. जरातरी तो घरात माईंशी बोलायला मन मोकळं करायला लागला. माई आता त्याच्या लग्नाचा विचार करायला लागल्या. आबा कुत्सितपणे म्हणाले, “ कोण देणार याला मुलगी ? एवढ्याश्या पगारात भागणार आहे का दोघांचे तरी? मग मात्र माई संतापल्या.“ तुम्ही कधी त्याला आपले म्हणालात? सतत त्या नंदिनीचा उदोउदो ! अहो, स्वभाव बघा की त्याचा. किती चांगला आहे अरुण आपला. त्याचे गुण, मदत करायची वृत्ती, गरीब, समंजसपणा दिसत नाही का तुम्हाला? आहे ना त्याला घरदार ! भरेल हो पोट आपलं आणि बायकोचं. तुम्ही  नका करु बरं काळजी..असेल त्याच्या नशिबात ती नक्की येईल समोर. इतकाही कमी पगार नाही त्याला. तो सांगत नाही तुम्हाला कधी ,पण मागच्या महिन्यातच पगारवाढ झाली आणि सुपरवायझर झाला माझा अरुण.” ‘माईंच्या डोळ्यात पाणी आलं. ……त्या दिवशी सहज म्हणून जुन्या वाड्यातल्या कुसुमताई माईंकडे भेटायला आल्या. “ छान आहे हो फ्लॅट माई ! मी प्रथमच येतेय ना इतक्या वर्षांनी.”  मग नंदिनीची, तिच्या मुलांची चौकशी करून झाली आणि म्हणाल्या, “ अरुणचं कसं चाललंय? किती पगार आहे त्याला? “ माईंनी सांगितल्यावर म्हणाल्या

“चांगला आहे की मग ! लग्न करताय का? आहे एक मुलगी. पण आईबाप गरीब आहेत हो ! मुलगी खरोखर चांगली आहे बघा, पण पैसा नाही म्हणून लग्न रखडलंय. मुलगी लाख आहे, पण लग्नात काही मिळणार नाही. घेता का करून? बघा बाई.हवी तर घेऊन येते उद्या. अरुण, आबा, तुम्ही बघा भेटा तिला “   माई हरखून गेल्या. “ कुसुमताई,आणा तिला उद्याच.बघू या. काय योग असतील तसं होईल बघा. “ 

दुसऱ्या दिवशी कुसुमताई जाईला घेऊन आल्या. काळीसावळी पण तरतरीत जाई त्यांना बघता क्षणीच आवडली. किती चटपटीत होती मुलगी. साधीसुधी साडी होती अंगावर पण नीट नेसलेली आणि छान गजरा  मोठ्या लांब डौलदार शेपट्यावर. म्हणाली, “ मला खूप शिकायचं होतं हो, पण ऐपत नाही माझ्या आईवडिलांची ! मग मी डी.एड. केलं आणि मला शाळेत नोकरी आहे. इतका इतका पगार आहे मला.मी नोकरी केलेली चालणार आहे ना तुम्हाला? “ अरुणला जाई आवडलीच. माईंनाही जाई पसंत पडली. आबा म्हणाले, “ छान आहे मुलगी. ती हो म्हणू दे आपल्या  चिरंजीवांना म्हणजे झालं ! “ 

जाईचा होकार आला आणि  तिच्या आईवडिलांनी साधंसुधं लग्न करून दिलं. जाई माप ओलांडून घरात आली. जाई घरात आली आणि माईंचं घर चैतन्याने भरून गेलं. कधी नव्हे ते आबा स्वयंपाकघरात बसून चहा घेत अरुण माईंशी बोलू लागले.माई माई करत जाई सतत त्यांच्या मागे असायची. शाळेत जायच्या आधी ती सगळा स्वयंपाक उरकून जायची. ‘तुम्ही फक्त कुकर लावा माई, मी डबे भरलेत आमचे दोघांचे !’   माईंचा हात हलका झाला जाईमुळे. रोज शाळेतून आली की शाळेतल्या गमती ऐकताना आबासुद्धा  त्यात भाग घेऊ लागले. अरुणमध्ये आमूलाग्र बदल झाला जाईमुळे. मुळात तो हुशार होताच पण जी काजळी त्याच्या व्यक्तिमत्वावर बसली होती ती जाईने झटकून टाकली.

गोड बोलून तिनं त्याला त्याच्या फॅक्टरीत पुढच्या परीक्षा द्यायला लावल्या. माईना हा बदल अतिशय आवडला. हसतमुख जाई कधी दोन दिवस माहेरी गेली तर करमायचे नाही माईंना. तिच्या गरीब, साध्यासुध्या माहेरघरी किती अदबीने स्वागत होई माई अरुण आणि आबांचे ! तिची सुगरण आई छान पदार्थ आवर्जून पाठवी अरुणरावांनाआवडतात म्हणून. आपली गुणी मुलगी या श्रीमंत घरात पडली म्हणून कौतुकच वाटायचे तिच्या आईवडिलांना माईंचे. जरी अरुण आबांच्या दृष्टीने कमी होता तरी जाईच्या माहेरी त्याची पत चांगलीच होती. त्यांना त्याचा पगार खूपच वाटायचा. जाई सासरी रमून गेली आणि अरुण  माईंचं तर पान हलेना जाई शिवाय. 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला.) इथून पुढे —-

सगळेच मोठे होत होते.  रिया, तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?

आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता, हर्षल ने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही.  त्याला कधीही बांधून ठेवले नाही.  तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलेही होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा.  येणाऱ्या पाहुण्यांमधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रूनोशी गट्टी करायचे.  त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही.

पण काही दिवसापूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली.अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातुर झालं.

संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलर वरच्या पत्त्यावरुन काॅपने त्याला घरी आणले.  पण काॅपने त्यांना चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लाॅ बद्दल खणखणीत सुनावलं.दंडाची रक्कम वसूल करुन तो निघून गेला. 

थोडं चिंतातूर, भयावह  वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रूनोला चांगलाच दम भरला.  पण तो फक्त हर्षलच्या पायाभोवती गुंडाळून राहिला. आणि त्याच्या डोळ्यातून टपकणार्‍या  अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला.

“काय झालं असेल याला?”

अमिता म्हणाली,” अरे ! प्राण्यांमध्येही  हार्मोनल बदल घडत असतात.  तेही अस्वस्थ बेचैन होतात.  त्यांना कळतही असेल पण व्यक्त होता येत नाही ना?”

” म्हणजे आपण कमी पडतो का?”

” कदाचित हो.”

अमिताने एकच शंका काढली, ” मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पझेसिव्ह  झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळं  त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात. रिया तान्याचे दूर राहणे.  या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.  तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय.  आतल्या आत घुसमटतोय तो “

” मग याला आपण काय करायचं?  त्याला कसं नॉर्मल करायचं?”

” बघूया.  वाट पाहूया.”

पण त्या दिवशी मात्र  ब्रूनोने कमाल केली.

दरवर्षीप्रमाणे अमिता— हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती.  मस्त तयारी चालू होती.  एकीकडे ब्रूनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं.

संध्याकाळी सारे जमले.  सगळे मस्त नटूनथटून आले होते.  प्रफुल्लीतही  आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणार्‍या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता.  गप्पा, गाणी, खाणे,पिणे चालूच होते.

इतक्यात ब्रूनोने  संकर्षणच्या आठ वर्षाच्या मुलीवर झडपच घातली.  तिला फरफटत  त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती.  सगळ्यांची धावपळ झाली.  अमिता, हर्षलही  ब्रूनोला आवरू शकत नव्हते.  पण त्या ग्रुप मध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली.  आणि अत्यंत कुशलतेने ब्रूनोला ताब्यात घेतलं. सुदैवाने त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत पण तिला प्रचंड मानसिक  धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. “आय हेट ब्रूनो. आय डोन्ट लाईक हिम !”

आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही.  आवरतीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले.  हर्षल, अमिता प्रत्येकाला अजीजीने  “सॉरी” म्हणत होते.  तसे सारे  जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. 

” इट्स ओके रे यार ! टेक केअर.”  म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले.  फक्त डॉग ट्रेनर मणी मागे राहून हर्षलला म्हणाला, ” नो मोअर रिस्क नाऊ.  वेळ आली आहे.  तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लाॅ माहित आहेत ना?”

नाईलाजाने अमिता, हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला खूप कठीण,  अत्यंत, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा  पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता.  क्षणभर अमिताला वाटलं,” आपण भारतात असतो तर काय केलं असतं?”

पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता.

पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती.   व्हेटशी —पशुवैद्याशी तिचं बोलणं  झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही एक कृती असते. लगेच  वेळही ठरली.आजचीच.

सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त,” बी ब्रेव्ह” एवढंच म्हणाला होता. 

सकाळपासून ब्रूनो अमिताच्या पायात घुटमळत होता. अमिताने गराज उघडलं.  गाडीत बसायलाही तो तयार नव्हता.  अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रूनोला उचलले आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकले.  अमिताला एकच आश्चर्य वाटले तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटले नाही.  संपूर्ण ड्राईव्ह मध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता.” मी चूक आहे की बरोबर?”  तिला इतकंही वाटलं,” मी माणूस कां झाले?  अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे.  माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.  या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खर्‍या  प्रेम भावनेला अशा रितीने तिलांजली देत आहे का?”

व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रूनोबरोबर आत गेली. व्हेटने  इंजेक्शन तयार केले.  पण ब्रूनो  त्याला अजिबात सहकार्य देतच नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पहावे ना.  तीच म्हणाली,” डॉक्टर ! माझ्याकडेच द्या.  मीच देते त्याला इंजेक्शन.  मीही एक डॉक्टरच आहे.”

वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होते.

पण अमिताने  ब्रूनोला कुरवाळलं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून  गोंजारलं, मांडीवर घेतलं.  ब्रुनोने  तिच्याकडे इतक्या विश्वास पूर्ण नजरेने पाहिलं की  क्षणभर अमिताचे हात थरथरले.  पण मनात ती एवढेच म्हणाली,

” आय एम व्हेरी सॉरी ब्रूनो.  परमेश्वरा ! मला क्षमा कर.” हळूहळू ब्रूनोच्या  शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला.  भयाण  शांत,  नि:शब्द, निश्चेष्ट.

एक पर्व संपलं. नव्हे संपवलं.  एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक  नातं अनंतात विलीन झालं. 

घरभर ब्रूनो सोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी, त्याच्या सोबत काढलेली  छायाचित्रे.  त्याचं ब्लॅंकेट, त्याची गादी,  भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग.  घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं.  ते कसं निपटायचं?

जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळल्या.  एक अलौकिक संवेदनांचं, भाव भावनांचं, दिव्य,  वर्णनातीत भावविश्व संपून गेलं.  आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयाण  पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. 

 येईल का ती कधी भरून? 

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares