मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पत्त्यांचा बंगला… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पत्त्यांचा बंगला… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले – पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला.  बघता बघता त्याचा  प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला.  आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला.  दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली. आता इथून पुढे )

विनायक हा असाच भरकटलेला गुन्हेगारी वृत्तीचा युवक होता. दिशाहीन. कलंदर. पण नाग्याने त्यालाही सामावून घेतले.  त्याचे विनायक हे नामकरणही नाग्यानेच केले.

तिच्यावर बलात्कार झाला होता. ती उध्वस्त झाली होती. भयाण अंधार तिच्या आयुष्यात पसरला होता.  समुद्राच्या पाण्यात ती आत आत  चालत होती.  जीवनाकडे  तिने पाठ फिरवली होती.  नाग्याने तिला हात दिला. पाण्यातून बाहेर काढले.  ती रडली. नाग्याच्या छातीवर उद्रेकाने तिने बुक्के मारले.  तिला जगायचंच नव्हतं.

तिला पाहून नाग्याला इंदू ची आठवण झाली. तो मुकाट तिला घेऊन मठात आला. सर्वांना त्याने  तिची काळजी घ्यायला सांगितली.

तीच झाली नाग्याची प्रमुख शिष्या.  प्रभावती.  त्यानंतर तिचे नाव, गाव, ओळख सारेच बदलून गेले.

इंदूने ज्याला नालायक, भडवा म्हणून संबोधले होते तो नाग्या आता लोकांचा देव बनला होता.  आता पाऊले पूर्ण रुतली होती.  मागे वळण्याचा रस्ता नव्हता. लटकी का असेना पण त्याची एक प्रतिमा तयार झाली होती. आणि मुखवट्याच्या आत नागू कोंडला गेला. नागूही या स्थितीत समाधानी होता. 

असं त्याच्याजवळ काय होतं? तसं रूप होतं. त्याच्या आईचं रूप. तो गौरवर्णी, उंचापुरा भारदस्त होताच. त्याच्याजवळ वाणी आणि वक्तृत्व होतं.  ज्ञान नव्हतं पण शब्द भांडार होतं. आणि अभिनय ,नाट्य त्याच्या वृत्तीतच असावं. 

“हेचि दान देगा देवा । तुझा विसर न पडो।।”   तो अशा काही चालीत म्हणायचा की, लोक तल्लीन होऊन नाचायचे. कधी जयघोष ,कधी नाचणं, कधी हसणं तर कधी मोकळेपणानं रडणंही ….मनात येईल ते बोला…असे सगळे प्रयोग त्यांनी लोकांवर केले.  आणि काय आश्चर्य लोक त्यात गुंतून गेले. लोकांना हाच भक्तीमार्ग वाटला.

गू पाहत राहिला. अनुभवत राहिला.

महाराजांच्या वेशात गाडल्या गेलेल्या नागूच्या अस्तित्वाचे कण विरघळत गेले.  देश-विदेशात त्याची कीर्ती पसरली.  पैसा प्रसिद्धी आणि प्रसार झपाट्याने होत गेला.  त्याच्या नावाची पुस्तके ही प्रकाशित झाली. त्याचा प्रचंड खप होऊ लागला.

तसे विरोधी वारेही वाहत होते.  अनेक वेळा आयकर वाल्यांनी धाड टाकली.  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लोकांनी तर सळो की पळो केले होते.  महाराजांची बुवाबाजी,  स्त्रियांबरोबर असलेली लफडी, मठात चाललेले अनैतिक  व्यवहार,  खोटेपणा यावरही मीडियाचे रकाने भरत होते.

एका महिलेची मुलाखत टींव्ही. चॅनलवर दाखवली गेली होती. तिचा चेहरा अस्पष्ट धूसर केला होता.

ती सांगत होती…सांगताना रडत होती. “मला महाराजाने फसवले. मीही त्यांच्या कहाण्या ऐकून पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या मठात जात असे. एक दिवस त्यांनी मंत्र देण्याच्या निमीत्ताने मला एका अंधार्‍या खोलीत नेले आणि… माझा पैसा, अब्रु ,स्रीत्व सगळं लुटलं…” चॅनलवर ती खूप करवादत होती.  पण लोकांच्या मनातला विश्वास, श्रद्धा भक्ती यावर याचा अंशत:च  परिणाम होत होता.  लोक ऐकत होते. साशंकही होत होते पण तरीही पुन्हा पुन्हा जातच राहिले.

पण  कधीतरी एकांती महाराजाचा मुखवटा त्यांच्याच मनात गळायचा . 

आपण लोकांच्या हळुवार धार्मिक भावनांशी खेळ मांडलाय याचं अपराधीपण जाणवायचं. आपण संत नाही. संतत्वाच्या जवळपासही नाही. आपल्याला पैसा प्रसिद्धी याचा लोभ आहे! लोक भाबडेपणाने आपल्या नादी लागत असल्याचं आत कुठेतरी समाधान वाटायचं. श्रेष्ठत्वाची भावना आपल्याला चिकटलेली आहे . पण हा पत्त्याचा बंगला कधीतरी कोसळेल  आणि मग आपली काय दशा होईल याचं भयही मनात वाटायचं.  पण कुठेतरी असंही वाटायचं की याच लोकांनी आपल्याला हे रूप दिले ना?  त्यांनीच आपल्या अस्तित्वाचं हे बुजगावणं बनवलं ना? आणि तसे म्हटले तर या आभासी, खोट्या, लटक्या दुनियेत अनेक प्रकारची  लोकांची  दुःख समस्या विरघळत चालल्याचा भास तर त्यांनाही होतोच आहे ना? नव्हे त्यांच्यासाठी तो भास नसून सत्यच आहे…

लोक वेडे आहेत.  ते नादी लागतात. ताब्यात जातात. कच्च्या मनाची मडकी आपण फक्त फुंकतो. मग त्यात वाईट काय? चुकीचं काय! त्यांनाही लाभ. आपलाही फायदा. भावनांचा हाही एक व्यवहार. धंदा.

कधीकधी नागूला मनोमन हसूही यायचं. लोकांची कीवही वाटायची.  इतके उच्च शिक्षित,पदवीधारक, काही तर सुवर्णपदक विजेते, यशस्वी उद्योजक .इथे येतात. प्रचंड नैराश्य घेऊन येतात. का भरकटतात ही माणसं… 

करमरकर मास्तरांनी एकदा सहज म्हटलं होतं ते चांगलंच लक्षात आहे .

“सुखाचा शोध न घेणं म्हणजेच दुःखाचा शेवट होणं..”

आपण सारेच भरकटलेले आहोत. मार्ग हरवलेले  आहोत. खोटे आहोत. फसवतो. फसवले जातो.

महाराज विचारात पार डुबून गेले होते.  एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. मरगळ आली होती. बुरखा काढून टाकावासा वाटत होता. मुखवटा फेकून द्यावासा वाटत होता…बस् झालं…!!

इंदुचे शब्द कानांत घुमत होते. “नालायक..भडव्या..विश्वासघातकी..”ः

प्रभावती महाराजांना विचारत होती,

” काय झालं गुरुवर्य? आज इतके चिंतेत का?”

महाराज गप्प होते.  शांत होते. 

” उद्या मठात कृष्ण जन्माचा सोहळा आहे. मोठा भक्तगण जमणार आहे. भरपूर पावत्या फाडल्यात. देणग्याही खूप आल्यात.  या उत्सवाच्या बातम्या वृत्तपत्रात, टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध होत आहेत . उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मठात सारे या उत्सवाची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. जवळजवळ सारी तयारी झालेली आहे. एकदा आपण नजर फिरवावी. काही कमी जास्त असल्यास मार्गदर्शन करावे.”

महाराज नुसतेच “हो” म्हणाले.

पुन्हा प्रभावतीने विचारलं, 

“काय झालं?”

” हे बघ प्रभावती! उद्या सर्व भक्तगणांसमोर मी एक सत्य मांडणार आहे.”

” कोणते सत्य गुरुवर्य ?”

“एक कबुली.”

” कबुली?”

” होय प्रभावती…”

” काय सांगणार तुम्ही त्यांना?”

” उद्या त्या युगंधराची शपथ घेऊन मी खरे बोलणार आहे.  मी नागूची  कहाणी सांगणार आहे..”

प्रभावती गोंधळली  होती. आश्चर्याचा पूर तिच्या चेहऱ्यावर उसळला होता.  पण महाराज शांत होते.

‘ गोपाल कृष्ण! राधे कृष्ण! गोपाल कृष्ण! राधे कृष्ण!…’

एक मुखवटा गळून पडण्याच्या कल्पनेत महाराज मुक्त होत होते.  परिणामाची त्यांना कल्पना होती. पण पर्वा नव्हती. पत्त्याचा बंगला अखेर कोसळणार होता…

नव्हे! ते स्वत:च तो मोडणार होते…

  – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पत्त्यांचा बंगला… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पत्त्यांचा बंगला… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सभागृह माणसांनी गच्चं भरलेलं होतं. मध्यमवयीन, प्रौढ, वृद्ध तरुण सर्व प्रकारच्या वयांचा एकत्रित समूह तेथे जमला होता. निरनिराळ्या जातीचे, धर्माचे लोक तिथे उपस्थित होते.  इतकी माणसं असूनही एक थंडगार शांती सभागृहात  होती.  कोपऱ्यात उंच पितळेच्या समया तेवत होत्या.  वातावरणात उदबत्यांचे, कापराचे सुगंध दरवळत होते. मोगऱ्याच्या फुलांच्या माळा चहू बाजूला सोडलेल्या होत्या.  त्याचाही दरवळ मनाला प्रसन्न करणारा होता.

थोड्याच वेळात नागू महाराज येतील. त्यांचं हस्तीदंती आसन छान सजवलं होतं. आजूबाजूला सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. फुलांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. आसनाभोवती अत्याधुनिक साऊंड सिस्टिम होती. 

प्रत्येकाच्या प्रश्नाला नागू महाराज उत्तरे देणार होते. सभागृहातले सारेच त्यांच्या दर्शनास आतुरले होते. शिष्य प्रभावती आणि शिष्य विनायक दोघेही व्यासपीठावर आले. त्यांनी श्रोत्यांना वाकून वंदन केले. धुपारत्या उजळल्या. मधुर असा घंटा नाद घुमला. आणि शुभ्र वस्त्रे परिधान केलेले नागू महाराज सभामंडपात अवतरले. केसांचा नीट विंचरलेला जटाभार.  गळ्यात लाल पांढऱ्या मण्यांच्या माळा आणि मुद्रेवर कमालीची शांतता. नजर तीक्ष्ण. विशाल नयन. त्यांनी सभागृहात एक शांत पण धारदार नजर फिरवली. सारे श्रोते  नकळतच उभे राहिले. त्यांचे हात जोडलेले होते. महाराजांनी दोन्ही हात उंचावले आणि त्यांना बसण्याची खूण केली. क्षणात कुजबुजीचा नाद थांबला. आणि पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. महाराज ही आसनस्थ झाले.

एकेका भक्ताकडून येत असलेला भोग शिष्य विनायक स्वीकारत होता. आणि महाराजांच्या चरणाशी ठेवत होता.  त्यात फळे होती,  मिठाया होत्या, नाण्यांचे, नोटांचे बटवे होते. वस्त्रे होती. दागिने होते. दानपेट्याही  भरत होत्या. महाराजांच्या चरणी भक्ती भावाने वाहिलेल्या भेटींची रास वाढत होती. पुन्हा सारे आसनस्थ झाले.

महाराजांनी डोळे मिटले. ओंकाराचा नाद वातावरणात उमटला. सर्व भक्तांनी त्यांचे अनुकरण केले.  सभागृह ओंकारमय झाले.  आणि मग महाराज बोलू लागले,

“आपण सारी परमेश्वराची लेकरे. या धरतीवर जन्माला आलो ते एक दिवस जाण्यासाठीच. मृत्यू हा अटळ आहे. सत्य आहे.  आपण फक्त कर्म करायचे.  नको फळाची अपेक्षा. दया क्षमा शांती हे आपल्या जीवनाचे तीन खांब ढासळू द्यायचे नाही.  सुख आहे तिथे दुःख आहे. दुःखाचा अनुभव घेतला तर सुखाचा आनंद मिळेल. त्या शक्तीवर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी जीवनाला यशस्वी करी. बोला जय श्री कृष्णा… जय शिवशंकर ..पांडुरंग विठ्ठल.. राम कृष्ण की जय !!गोपाल कृष्ण राधे कृष्ण… गोपाल कृष्ण राधे कृष्ण…”      

सर्व सभागृहात एक धीर गंभीर जयघोष झाला.एव्हाना सारा भक्तगण महाराजांना वश झाला होता. जणूं प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याशी बोलतोय, याचा भास भाविकांना होत असावा. 

मग प्रश्नोत्तरे सुरू झाली. अनंत समस्या. अनंत अडचणी. नाना प्रकारची दुःखे, निराशा. अपयश, स्पर्धा, शत्रुत्व, तक्रारी, हव्यास अनंत… शेवटच नसणाऱ्या… कुणाला नोकरी हवी तर कुणाला बढती. कुणाला संतान नाही तर कोणाची मुलं म्हातारपणी सांभाळत नाहीत.. कुणाला धंद्यात खोट आली.. तर कुणाचे वादळात घरदार वाहून गेले.. वर्षानुवर्षाच्या व्याधी.. परंपरागत चालत आलेले खटले.. प्रत्येकाच्या पोतडीत भरभरून समस्या. सगळ्यांना यश हवं.  सुख हवं.  एक एक जण आपली एक एक पोतडी महाराजांसमोर ओतत होता. आता महाराजांसमोर जीवनातला सारा चिखल पसरला होता. एक गढुळ समुद्र..

महाराजांच्या इशार्‍यानुसार शिष्य प्रभावती आणि विनायक कुणाला भस्म, कुणाला फळं, कुणाला गंडे, नाणे ताईत कसले कसले मंत्र वाटत होते. भाविक सश्रद्ध मनाने स्वीकारत होते.  क्षणभर का होईना त्यांच्या मनावर आशेची पांघरूणं पसरत होती.  महाराज आहेत ना मग कसली भीती नाही, असा विश्वास वाटून ते अधिकाधिक गुंतत चालले होते. 

सभागृह रिकामे  झाले. त्याची दारे बंद झाली. आणि शिष्यांनी आलेल्या भेटींचा पसारा आवरण्यास सुरुवात केली.  अन्नधान्य, फळे, वस्त्रे, मिठाया, ठिक ठिकाणी वाटण्याची व्यवस्था ठरलेलीच होती. आणि नाण्यांनी नोटांनी भरलेल्या दानपेठ्या मठाच्या तिजोरीत  सांभाळून ठेवल्या गेल्या.  त्या तिघांनी त्या भरगच्च तिजोरीवर नजर फिरवली. आणि एकमेकांकडे बघून हलकेच स्मित केले.

प्रभावतीने महाराजांना वस्त्रे उतरवण्यास मदत केली.

“खूप दमलात तुम्ही! आता थोडा आराम करा.”

विनायकाने एका ग्लासात कसलेसे पेय आणले आणि महाराजांना दिले.

ते पिता पिता च महाराजांची तंद्री लागली.

प्रभावती आणि विनायक पुढच्या मीटिंगच्या तयारीला लागले. हे दोघे खास असले तरी महाराजांचा शिष्य गण खूप मोठा होता. प्रत्येक जण आपापले काम चोख करत होता. त्यांच्यात भांडणे,  वाद होते. मात्र महाराजांकडून मिळणारी बिदागीही  कमी नव्हती त्यामुळेच सारे या समूहाला चिकटून होते. 

महाराजांनी डोळे मिटले.

 एक लहानसं घर. तो. नागेश नाग्या ..आणि त्याची बहीण.रागीट बाप. घर चालण्यापुरतं पैसे देणारा. आजारी आई .आणि अधून मधून विचारपूस करण्यासाठी खाऊ घेऊन येणारी मावशी. खरं म्हणजे घरात कधी राहावं असं वाटलंच नाही. कसलाच आनंद नव्हता. संवाद नव्हता. प्रचंड तुटलेपण होतं एक प्रकारचं..

नाग्याची  शिक्षणात गती नव्हतीच. वाचनालयात जाऊन पुस्तकं मात्र वाचायला आवडायची. पण दहावी बारावी गुणांकन ,भविष्य, महत्त्वाकांक्षा हे काही जमलं नाही. शाळेतली प्रगती पाहून बापाने अनेक वेळा चाबकाचे फटके मारले. बहिण हुशार होती. पण आईच्या आजारपणामुळे आणि बापाच्या धाकापायी घरकामातच तिची हुशारी सडली. एक दिवस कोणा मुस्लिम तरुणाचा हात धरून ती पळून गेली आणि नंतर कधीही दिसली नाही. आधीच वासे नसलेलं घर पूर्ण कोसळलं. त्यातच एक दिवस एका काळोख्या रात्री बापाला मावशीच्या खोलीत जाताना नाग्याने पाहिलं. आई प्रचंड खोकत होती. पाणी मागत होती. म्हणून नागेश उठला होता. आणि घरातलं ते अकल्पित दृश्य पाहून नागेश पुरा भेलकांडला. बापाच्या मस्तकात त्या क्षणी त्याला गोळी घालावीशी वाटली होती.

आईने अखेर शेवटचा श्वास घेतला.

तिचे अंत्य कर्म आवरले आणि तेराव्या दिवशीच बापाने मावशीला घरात आणले. रीतसर लग्न करून.

नागेश ने घर सोडले.

अंधारात तो चालत होता. मार्ग माहित नव्हता. कुठली वाट आपली, तेही कळत नव्हते.  कुठलेच नाते उरले नव्हते. पाश नव्हते. बंध नव्हते. जगण्यासारखं काही शिल्लकही नव्हतं. पण मरायचंही नव्हतं. नाही म्हणायला एक ओला कोपरा होता.   इंदू !

ठसठशीत,  गोल बांध्याची,  गोरी, गुबगुबीत हसरी इंदू! 

एकदा तळ्याच्या काठी असलेल्या निंबाच्या झाडाखाली तिला घट्ट मिठीत पकडले होते. ओठावर ओठ टेकले होते. तिच्या गोल देहाशी  झोंबी केली होती. पण तिने ओरबाडले. किंचाळत ती म्हणाली होती,

‘नालायक! भडव्या! शरम नाही वाटत?’ अंगावर थुंकून  ती पळून गेली होती.

धागे तुटले ते तुटलेच. आपल्याला काहीच जमणार नाही आयुष्यात. प्रचंड दु:खाला सोबत घेऊन सुखाचा शोध घेण्यासाठी कितीतरी दिवस तो चालत होता. कसलीही शुद्ध त्याला नव्हती. अंगावरची वस्त्रेही फाटली होती. पिंपळाच्या पारावर तो बसून होता.. झाडावरची गळलेली पाने जणू त्याची लज्जा राखत असावीत. कोणी दयाळू बेवारशी म्हणून त्याला काही बाही खायला देत. मिळालं तर अन्न नाहीतर ऊपासमार.

दाढी वाढली. केसांच्या अस्ताव्यस्त जटा झाल्या.

एक दिवस त्याच्याजवळ आलेल्या एका वृद्धेला तो सहजच म्हणाला, ” जय राम कृष्ण हरी!! कुणी कुणाचे नसते.  पाशात बंधात अडकू नकोस. तू स्वतःच वृक्ष हो! या पिंपळासारखा. सावली दे.”

वृद्धेला वाटले माझे दुःख याला कसे कळले? हा कोणी योगी वाटतो. सिद्ध पुरुष असावा.

आणि मग गावात धूळ उडाली. आपल्या गावात बाबा आला. सुखदुःख जाणणारा. उपाय सांगणारा. चांगभलं करणारा.

नागू महाराज की जय!!

नाग्या पुढे लोकांच्या रांगा लागू लागल्या. लोकं रडू लागली.  आक्रंदू लागली. त्यांच्या चरणी लागू लागली. नाग्या थोडा भांबावला. पण मग त्याला हेही जाणवलं की जग खूप दुःखी आहे. आपल्याच सारखं.  त्यांचं दुःख हे आपलं भांडवल. 

सुरुवातीला तो प्रत्येकाच्या डोक्यावर नुसते हात ठेवायचा. वाचनालयात केलेलं वाचनही थोडसं उपयोगी पडत होतं.  लोकांना वाटायचं बाबांच्या हातात जादू आहे. शब्दात शक्ती आहे. वाणीत दैवत आहे. 

पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला.  बघता बघता त्याचा  प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला.  आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला.  दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली.

क्रमश: – 1

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

(मागील भागात आपण पहिले– ज्यांची त्वचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी उजळ होती, त्या सगळ्या लोकांवर लिवी आपल्या काळ्या त्वचेचा राग काढत होता. माझ्याशी मात्र त्याचं कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं, माझ्याशी तो अगदी मोकळेपणानी बोलत असे. त्याला बहुधा आमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटत असावं. म्हणूनच तर तो आपला रागही बेधडकपणे व्यक्त करत होता. आता इथून पुढे)

त्याचं काम मला आवडू लागलं होतं. बाहेरचं काम त्याने दोन दिवसात उरकलं, तेंव्हा मला वाटलं, की घराच्या आत सुद्धा कित्येक वर्षात रंग रंगोटी, सफाई केलेलीच नाहिये. भिंतींचा रंग जाऊन त्यावरची चमक तर कधीचीच गेलेली होती आणि आता तर कुठे कुठे वरचं प्लॅस्टर आणि रंगांचे तुकडे पडून आतली बिनरंगी भिंत दिसू लागली होती. तेंव्हा हेही काम करून घ्यावं. तो जेंव्हा काम उरकून निघाला, तेंव्हा त्याचे आजच्या कामाचे पैसे देऊन मी त्याला घरातल्या रंग-रंगोटी बद्दल बोलले. त्याने एका नजरेत घराकडे बघून  पक्का अंदाज केला, की हे घर तीन बेडरुमचं आहे. घराच्या बाहेरच्या आकाराकडे बघून आतल्या लांबी-रुंदीचा बरोबर अंदाज घेता येत होता त्याला.

त्यानं ते काम करायचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी येताना रंगाचे डबे, ब्रश, रोलर हे सगळं सामान घेऊन येण्यासाठी त्याला 500 डॉलर दिले. त्याने ते पैसे त्याच्या खिशात ठेवल्याक्षणी मला वाटायला लागलं, की आता काही हा परत येणार नाही! एकटं रहाणाऱ्या बाईला लुटायची आयती संधीच दिली होती मी त्याला! लीवीवर, त्याच्या कामावर विश्वास बसल्यानंतरही मनात अशी गोष्ट यावी, याचं माझं मलाच आश्चर्य वाटत राहिलं. अशा चेह-यांवर तर सगळं जगच संशय घेतं आणि मी पण या जगातलीच होते ना? मी आपल्याच मनाला समजावत राहिले, की जर तो आलाच नाही तरी काही हरकत नाही, पाचशे डॉलर देऊन मला थोडी अक्कल तरी येईल!

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच त्याची वाट बघायला लागले होते मी! नऊ वाजायला अजून एक तास होता आणि माझ्या मनात धाकधूक सुरु झाली होती. मनाची बेचैनी दूर करावी म्हणून विचार केला, की गल्लीच्या टोकापर्यंत एक चक्कर टाकून यावी. वेळही जाईल आणि मन तो विचार सोडून जरा दुसरीकडे वळेल. चालत जात असताना लक्षात आलं, की रोजच्यासारखी गल्ली साफ दिसत नाहिये. इकडे तिकडे कागदाचे तुकडे, झाडांची पाने आणि खाद्यपदार्थ विखरून पडलेले आहेत. दोन तीन टीम हॉर्टन्सचे कॉफीचे कप पण लवंडलेले दिसत होते. कचऱ्याचे डबे खच्चून भरलेले होते आणि त्यामुळे त्याची झाकणं बंद न झाल्याने घाण वास सगळीकडे सुटलेला होता. आसपास पडलेली सिगारेटची थोटकं न विझवताच फेकलेली दिसत होती. ते बघून माझे पाय एक क्षण तिथेच थांबले. त्या थोटकांमधे मला कधी लीवीचा तर कधी माझा चेहरा दिसत होता. एक काळा आणि एक सावळा, ज्यांना चिरडणाऱ्या पायांना कधी ही जाणीव पण होत नसेल, की आपण एखाद्या माणसाला चिरडतोय, की सिगारेटच्या थोटकाला!

जवळपास अर्धा तास भटकून मी परत आले. चहा नाश्ता घेऊन घड्याळाकडे लक्ष जायच्या आतच बाहेरून काही आवाज आले. खिडकीतून बघितलं, तर लीवीची गाडी येऊन थांबलेली होती. गाडी जागेवर लाऊन त्याच्याबरोबर त्याच्या सारखीच दिसणारी आणखी तीन माणसं दरवाजाकडे येताना दिसली. आत्तापर्यंत तर मी एकट्या लीविलाच घाबरत होते, आणि आता आणखी तीन जण! त्याने बेल वाजवली आणि म्हणाला, की इथलं काम आम्हाला एका दिवसात उरकायचं आहे, म्हणून सगळी टीमच घेऊन आलोय.

ते धडाधड घरात घुसले, तेंव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. ते चौघं आणि मी एकटी! आता तर मी मुंगी एवढी सुद्धा राहिली नव्हते त्यांच्यासमोर! चौघांनी मिळून एक फुंकर मारली असती, तरी मी उडून कुठल्या कुठे जाऊन पडले असते. बाहेरच्या खोलीपासून काम सुरु केलं त्यांनी. मी विनाकारणच स्वयंपाकघरातून आत बाहेर करत होते. तिरक्या नजरेने, ते लोक काय करतायत याच्यावर नजर टाकत होते. कोणी भिंती घासत होता, तर कोणी खाली कपडा अंथरत होता, तर कोणी डब्यातून रंग काढत होता. ना त्यांनी काही सामान हलवण्यासाठी मला बोलावलं, आणि माझी कशासाठी मदतही घेतली नाही. एकामागून एक रंगांचे डबे रिकामे होत गेले आणि ते लोक एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात राहिले.

मला आश्चर्यच वाटत होतं. इतक्या वेगानं इतकं चांगलं काम होत होतं! खोल्या नवीन रंगामुळे चमकत होत्या. सामानही बरोबर आधीच्याच जागेवर ठेवलं जात होतं. मधे मधे मी त्यांना कोक किंवा चहा कॉफी पाहिजे आहे का, हे विचारत होते. ते लोक खूश दिसत होते. खूप गप्पा मारत होते, जोरजोरात हसत होते. मधे मधे मला पण आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेत होते. त्यांची स्पष्टवक्तेपणानी बोलायची लकब पाहून मला आपोआपच हसू येत होतं. जेवणाची वेळ झाली तेंव्हा ते अर्ध्या तासासाठी बाहेर गेले. परत आले, तर माझ्यासाठी पिझ्झाची एक स्लाईस घेऊन आले.

मी विचारलं, “मला कशाला?”

लीवी म्हणाला, “कारण, तुम्ही फार चांगल्या आहात.”

ते ऐकून माझी मलाच लाज वाटली. माझ्या अंतर्मनातलं ते सत्य उघड उघड दिसून येत नव्हतं का? की माझा या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता!

पिझ्झा मला पण आवडतो, पण का कोणजाणे, ही पिझ्झाची स्लाईस मला खावीशी वाटत नव्हती. लीविच्या चांगुलपणाचा आदर वाटला, म्हणून मी ती फ्रीजमधे ठेवून दिली, नंतर फेकता येईल असा विचार करत.

काम खूपच वेगानं चाललं होतं.  मधे दोन वेळा त्यानं आणखी लागणाऱ्या रंगासाठी पैसे मागून घेतले. दर वेळी त्याला पैसे देताना मनात तीच भीति असायची. दर वेळी वाटायचं, की आता काही तो परत येत नाही! तो रंग आणायला गेला, की त्याचे सहकारी बाहेर गवतावर बसून आराम करायचे. काही वेळातच तो हसत हसत परत यायचा. त्याचं ते पांढरे शुभ्र दात दाखवत हसणं मला फार आवडून जायचं आणि माझा त्याच्यावरचा विश्वासही वाढायचा.

त्याचं काम संपता संपता संध्याकाळचे सात वाजले. दोन दिवसांचं काम एका दिवसात संपवून आता ते जाण्याची तयारी करत होते. रंग देऊन झाल्यावर झालेला कचरा, घाण साफ करून हात पाय धूत होते. मी लीविला त्याचे पैसे दिले आणि त्या चौघांना चांगलं जेवण घेता येईल अशी टीपही दिली. काम करणाऱ्याचं आणि करून घेणाऱ्याचं नातं आता सोपं झालं होतं. दिवसभर घर त्या चार जणांच्या हसण्याने दुमदुमून गेलं होतं. मला पण खूप हसवलं होतं त्यांनी. घरातली प्रत्येकच वस्तू लीविसकट चारी जणांनी बघितली होती, पण आता मला तशी काही भीति वाटत नव्हती. का कोण जाणे, पण मला सारखं असं वाटत होतं, की लीवी मला आधी भेटायला पाहिजे होता. कित्येक वेळा अशी छोटी मोठी कामं करवून घेताना मला फार कटकट झालेली होती.

जाताना बाहेरच्या लॉनवर त्याला सिगारेट ओढताना बघितलं, तेंव्हा माझ्या मनात आलंच, की आता तो सिगरेटचं अर्धवट जळलेलं थोटूक पायांनी चिरडतोय की नाही, ते बघायला हवं! त्यानं तो सिगरेटचा तुकडा विझेपर्यंत हातात धरून ठेवला आणि मग जवळच्या कचऱ्याच्या डब्यात फेकून गाडी सुरु करून निघून गेला.

त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणताही राग नाही, हे बघून मी आनंदाचा निःश्वास सोडला. मी माझ्या मनातली ती गोष्ट लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. मी फ्रीजमधून त्याने आणलेला पिझ्झा काढला आणि तो गरम करून खायला घेतला. जसा काही या खोलीत लीवी हजर आहे, आणि त्याने कौतुकाने माझ्यासाठी आणलेल्या खाण्याचा आदर मी ठेवतेय, हे बघतोय.  आता माझ्या समोर फक्त त्याचे पांढरे शुभ्र दातच नाही, त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व होतं, जे शुभ्र धवल किरणांपेक्षाही शुभ्र होतं.

मूळ हिंदी कथा : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

आज त्याच्या कामाचा दुसरा दिवस होता. मागच्या अंगणातला साचलेला कचरा आणि झाडं-झुडुपं साफ करण्यासाठी मी त्याला बोलावलं होतं. उन्हाळ्यात त्या अंगणात बसून बाहेर बसण्याचा आनंद घेण्यासाठीची ही तयारी होती. पूर्ण सात आठ महिने काकडून टाकणाऱ्या थंडीनंतर हवेत झालेला बदल, मनालाही हवाहवासा वाटत होता. येणाऱ्या उन्हाळ्यात जास्तीत जास्त वेळ बाहेर बसून मोकळ्या हवेत घालवण्यासाठी या स्वच्छतेची गरज होती. कितीतरी लोकांना फोन केल्यानंतर याला निवडलं होतं मी. त्याचं नाव होतं- लीवी.

डॉ हंसा दीप

वेळेचा पक्का होता तो. कालसारखीच आज पण बरोब्बर नऊ वाजता त्याची गाडी आतमधे लागलेली होती. बाजुच्या फाटकातून तो मागच्या अंगणात आला. येताना त्यानं फाटकाच्या आत पडलेलं वर्तमानपत्रही उचलून आणलं. पहिल्याच पानावर “मला श्वास घेता येत नाहिये” अशा शीर्षकाखाली एक मोठा फोटोही छापलेला होता. त्यात एका काळ्या माणसाला खाली पाडून, पोलिसाने त्याच्या गळ्यावर आपला पाय दाबून धरलेला दिसत होता. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात वर्णभेदाविरुध्द चालू असलेल्या मोर्च्यांच्या बातम्याच भरलेल्या होत्या.

“यू सी बॅड पिपूल इन दिस वर्ल्ड!”

मी त्याच्या या म्हणण्याला दुजोरा दिला. “जगात वाईट लोकांची कमतरता नाही”, हे मी नेहमीच म्हणत असते. माझ्या मनात असतं, तर दोन सहानुभूतीचे शब्द बोलू शकले असते मी. त्याच्या मनःस्थितीचं भान तर होतं मला, पण आपलं काम करून घेण्याची चिंता जास्त होती. त्याचं लक्ष त्या बातमीत जास्त रमू नये म्हणून मी लगेच त्याच्या हातातून वर्तमानपत्र काढून घेतलं. अनावश्यक चर्चा वाढवून कोणाच्या जखमांवर मीठ कशाला चोळायचं? म्हणून मी आज काय काय करायचं आहे, ते त्याला समजाऊ लागले.

आपल्या सिगारेटचं अर्धवट जळलेलं थोटूक पायांनी चिरडत ऐकत होता तो. त्याचे दात आवळले गेले होते. वर्तमानपत्रातल्या बातमी ळे त्याच्या मनात उसळलेला राग त्याच्या पायात उतरल्यासारखा वाटत होता. ते थोटूक राख होऊन केंव्हाच मातीत मिसळून गेलेलं होतं. पण लीवी अजूनही शांत झालेला नव्हता. त्याचं ते थोटूक पायांनी चिरडणं म्हणजे, त्या थोटकातली उरलेली ठिणगी विझवणं नव्हतं, तर त्यातून बहुदा त्याला आपल्या पायाखाली जगाला चिरडल्याचं समाधान मिळत होतं.

काल जेंव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं, तेंव्हा बघतच राहिले होते मी. फोनवर बोलताना काही कळलं नव्हतं, कोणाशी बोलतेय मी ते! बोलणाऱ्याचा आवाज जड होता आणि अगदी अदबीनं बोलत होता तो. बरोब्बर नऊ वाजता त्याची गाडी माझ्या घरापाशी येऊन थांबली होती. मी फोनवर त्याला थेट मागच्या अंगणातच यायला सांगितलं होतं. शक्यतो परके लोक घरात आतवर न आलेलेच बरं वाटतं मला. इथे मी, एक बाई एकटीच रहातेय, हे शक्यतो कोणाला कळू नये असा माझा प्रयत्न असतो. छोटी मोठी कामं करून घ्यायची तर येता जाता, इकडे तिकडे बघून लोकांना घराबद्दल बरंच काही कळून येतं. याच कारणासाठी मी जरा जास्तच खबरदारी घेत असते.

समोरून येताना बघितलं होतं मी त्याला. तो काळा होता. काळा रंग आणखी किती जास्त काळा असू शकतो, ते त्याच्याकडे बघून कळत होतं. चांगलाच उंच आणि दणकट होता तो, बघता क्षणीच भीति वाटायला लागली होती त्याची. त्यालाही कळलं असावं ते, या प्रतिक्रियेची सवय झालेली असावी त्याला.

म्हणाला, “माझ्याकडे बघू नका, माझं काम बघा!”

बरोबर बोलत होता तो. असं बोलायची त्याला गरज पडते कारण त्याचं रूप असं आहे, की त्याच्याकडे बघून अविश्वासाचा भावच निर्माण व्हावा! माणूस स्वतःला ओळखत असतो, स्वतःचे गुणावगुण त्याला चांगलेच माहित असतात. याला कळत होतं, की त्याचा चेहरा कोणालाच आवडण्याजोगा नव्हता. काळा रंग आणि मोठमोठ्या नाकपुड्या असलेलं नाक. डोक्याला टक्कल पडलेलं आणि हातात काम करून मळलेले हातमोजे आणि पायात भले भक्कम बूट! त्याच्या त्या भल्या मोठ्या, उंच, दांडग्या देहासमोर बुटकीशी मी, एखाद्या हत्तीसमोर मुंगीने मान वर करून बोलावं, तशी दिसत होते. कुठल्याही क्षणी त्यानं आपल्या पायाखाली चिरडून टाकलं, तर या मुंगीला ओरडायची पण संधि न मिळता बिचारी हे जग सोडून जायची! त्याच्या त्या व्यक्तिमत्वाच्या दडपणाखालून बाहेर यायला काही क्षणांचा अवधी लागला मला. कोण जाणे, कुठल्या देशात त्याची मुळं रुजलेली होती, पण त्याची वृत्ती स्वच्छ दिसत होती. एका कुशल कारागिराची वृत्ती! बेईमानीची खोटी गोड भाषा नाही, तर ईमानदारीची कटू झलक दिसली होती.

“एकदा माझं काम बघा, मग दुसऱ्या कोणाचं काम आवडणारच नाही तुम्हाला!” खरंच बोलत होता तो. त्यानं एका दिवसात जेवढं काम केलं होतं, तेवढं आणि त्याच्यापेक्षा चांगलं कोणी करू शकेल, ही शक्यताच नव्हती! त्याचं काम हीच त्याची ताकद बनवली होती त्यानं. हे कौशल्य काही त्याच्यात जन्मतः नव्हतं, त्यानं ते मिळवलं होतं, हेच त्याला सांगायचं होतं. आपल्या त्वचेचा रंग ठरवणं त्याच्या हातात नव्हतं. आपल्या मोठ्या आणि फुगीर नाकाला आकार देणंही त्याला शक्य नव्हतं. ज्या बाबतीत तो काही करू शकत नाही, ते त्याच्या चांगलं किंवा वाईट असण्याचं प्रमाण कसं ठरू शकेल? त्याचं रूप-रंग त्याच्या आतल्या चांगुलपणाला नाकारू शकत नाही.

आपल्या कामाचे पुरेपूर पैसे घेतो तो, त्यात कोणतीच कुचराई नाही. बोलण्यासाठी तोंड उघडलं, की त्याचे पांढरे शुभ्र दात हसत चमकून उठतात. अगदी शुभ्र मोत्यांची माळ कोणी गुंफलेली असावी, असे दिसतात. त्याचं बोलणं ऐकत असताना त्याच्या दातांच्या चमकदारपणाकडेच नजर खिळून रहाते माझी, डोळ्यांना आणखी कुठली बघण्याजोगी जागा सापडतच नाही! मला कळतंय, असा विचार करणं हा त्याच्यावर अन्याय आहे, आणि मला तो वर्णद्वेषी बनवतो. पण मी तरी काय करू! सफेत रंग कोणाला आवडत नाही? किंवा असंही म्हणता येईल, की डोळ्यांना सफेत (गोरा) रंग चांगला वाटतो, मग तो कागदाचा असो वा त्वचेचा.   

मी पण काही अगदी गोरीपान कुठे आहे? दुधाने न्हायलेली आहे. वाक्प्रचार नाही सांगत, खरंच माझ्या आईनं लहानपणी दुधानी अगदी रगडून, रगडून न्हाऊ घातलं होतं मला! ती जेंव्हा मला दुधानी आंघोळ घालायची, तेंव्हा जितका वेळ माझ्या अंगावर दूध असायचं, तेवढा वेळ प्रेमानं, कौतुकानं बघत रहायची माझ्याकडे. आणि हेच आशीर्वाद द्यायची, की रोज दुधानी न्हाशील तर अशीच दुधासारखी गोरी होशील! दुधानी रोज आंघोळ करूनसुद्धा मी जशी होते, तशीच राहिले, पण आईच्या नजरेत माझा काळेपणा निघून गेला होता. आणि मला सावळा रंग प्राप्त झाला होता. तो रंग मला या परक्या देशात अगदी सुरक्षित ठेवत असे. तपकिरी (सावळं) म्हंटलं जात असे मला. काळ्या रंगावर होणारे अत्याचारही मला सहन करावे लागत नव्हते आणि गोऱ्या रंगाच्या लोकांवर होणारा हुकुमशाहीचा आरोपही माझ्यावर होत नसे. आणि चीनमधून करोना आणल्याचा दोषही मला दिला जात नव्हता!

मला हे पण माहित आहे, की माझ्याशी बोलताना लोकांची नजर माझ्या दातांवरही जात नसेल, कारण लीविच्या दातांसारखे ते काही चमकदार मोत्यांसारखे दिसत नाहीत. चहा आणि कॉफी सतत प्यायल्याने त्यांच्यावर तपकिरी रंग चढलेला आहे. कुठल्याही प्रमाणानं मोजू गेल्यास लीविपेक्षा माझी परिस्थिती दहा टक्क्यांनी अधिक चांगली आहे. मला पण कित्येक वेळा माझ्या समोर उभे असलेले गोरे लोक आपल्यापेक्षा फार उच्च पातळीवर असल्याचं जाणवलं होतं. आणि त्याबद्दल अपराधीपणाची जाणीवही झाली होती. त्या वेळी माझ्या वृत्तीतला ताठा माझ्या कामावरच्या निष्ठेमुळेच होता. आता मी निवृत्त झाले आहे, पण लीवी सारखेच रक्ताचे घोट मीही गिळले आहेत, एकदाच नव्हे, कित्येक वेळा! गायी आणि म्हशींच्या मधे घोड्यांची कातडी घेऊन वावरणारी मी, रंगावरून चाललेल्या कट कारस्थानाचा एक भाग होतेच – गोरे, काळे आणि सावळे! अंतर्मनात, आपल्या देशाचा तो इतिहासही साक्ष देत चमकून जायचा, जेंव्हा आपल्याच देशात आपलेच लोक चिरडले जात असत. गोऱ्या पायांच्या काळ्या बुटांनी केलेलं विनाशाचं तांडव! ती कटुता आजही अंतर्मनात उरलेली आहे!

ज्यांची त्वचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी उजळ होती, त्या सगळ्या लोकांवर लिवी आपल्या काळ्या त्वचेचा राग काढत होता. माझ्याशी मात्र त्याचं कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं, माझ्याशी तो अगदी मोकळेपणानी बोलत असे. त्याला बहुधा आमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटत असावं. म्हणूनच तर तो आपला रागही बेधडकपणे व्यक्त करत होता.

क्रमश: १

मूळ हिंदी कथा : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बायको आणि गाढव… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ बायको आणि गाढव… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

उतारवयातही बायकोची कटकट कमी होत नाही, म्हणून कंटाळून त्यानं गावात जाऊन राहायचं ठरवलं. जागा आधी घेऊन ठेवलेली होतीच. तिथे फार्म हाऊस बांधलं. छोटंसं शेत होतं, त्यात भाज्या लावल्या. एक गाय घेतली, एक गाढव घेतलं. एक कुत्रा पाळला.

या सगळ्यांच्या साथीत त्याचा दिवस मजेत जायचा. पुन्हा शहरात यायचं नावही काढायचं नाही, हे त्यानं ठरवलं होतं. मात्र त्याचं नशीब त्याची पाठ सोडायला तयार नव्हतं. बायको तिथेही त्याच्या मागोमाग आलीच. दर रविवारी ती गावात यायची आणि त्याच्या डोक्याशी कटकट करायची.

` ‘हे कुठे खबदाडात घर बांधून ठेवलंय!“

“धड रस्तासुद्धा नाहीये गावात यायला!“

“कशा वेंधळ्यासारख्या पसरून ठेवल्यायंत ह्या वस्तू!“

“काय कपडे घातलेत हे? शोभतात तरी का तुम्हाला?“

“हे गाढव कशाला घेतलंय आणि? काय उपयोग ह्याचा?“

एक ना दोन.

शहरात असताना तेच, आता गावात आल्यावर तेच.

तो पार वैतागून गेला.

इथेही सुटका नाही म्हणजे काय? पण काय करू शकणार होता बिचारा? बायकोला ह्या वयात सोडूही शकत नव्हता.

गाढवावरून तर ती दरवेळी त्याचं डोकं खायची. एके दिवशी ती आली, तेव्हा त्यानंच तिला सांगितलं, “तुला गाढव नको असेल, तर तूच त्याची विल्हेवाट लाव!“

बायकोला हेच हवं होतं. तिनं गाढवाला बाजारात नेऊन विकून टाकायचं ठरवलं.

गाढवाला सोडण्यासाठी तिनं दोरीला हात लावला मात्र, त्यानं मागच्या मागे दोन लाथा मारल्या, तशी बायको कडमडली. भेलकांडत कुठेतरी जाऊन पडली. पाय फ्रॅक्चर झाला, हाताला खरचटलं, पाठही चेचली गेली. डॉक्टरांनी दोन महिने तरी घरातून बाहेर पडायचं नाही, असं सांगितलं. काळजीपोटी त्यानं तिला शहरातल्या घरातच राहायला सांगितलं, दिमतीला एक मदतनीस दिला.

ही दुर्दैवी घटना कळल्यावर जवळची मंडळी भेटायला आली. सगळ्यांनी वेगवेगळ्या वेळी येऊन त्रास देऊ नये, म्हणून त्यानं एकच वार ठरवून दिला होता. सगळे त्याच दिवशी आले.

तो डोक्याला हात लावून बसला होता.

काक्या, मावश्या, आत्या, शेजारणी, ओळखीच्या कुणीकुणी बायका येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत. तो होकारार्थी मान हलवून प्रतिसाद देई.

ओळखीचे काका, मामा, शेजारचे पुरुष, मित्र येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत.

तो नकारार्थी मान हलवे.

त्याच्या एका मित्राची बायको लांबून हा प्रकार बघत होती. न राहवून तिनं आपल्या नवऱ्याला विचारलं, “बायका जवळ येऊन काहीतरी बोलतायंत, तुमचा मित्र होकार देतोय. पुरुष जवळ आल्यावर नकार देतोय. ही काय भानगड?“

मित्र शांतपणे म्हणाला, “बायका जवळ येऊन काळजी व्यक्त करतायंत. काही लागलं तर सांगा, काकूंनी आधीच गावाला जायला नको होतं वगैरे सांगताहेत. त्यांच्या गुणांचं वर्णन करताहेत. हा होकार देतोय.“

“आणि पुरुष?“

“हं…!“ एक दीर्घ उसासा टाकून मित्र म्हणाला, “ते त्याचं गाढव दोन दिवस उधार मागतायंत!“

लेखक – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप लेकाचा अनोखा खटला !!… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ बाप लेकाचा अनोखा खटला !!… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

आपल्या मुलाबद्दल तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला.

न्यायाधीशांनी विचारले की तुमची काय तक्रार आहे.

वृद्ध वडील म्हणाले, मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे.

न्यायाधीश म्हणाले की, हा तुमचा अधिकार आहे. यामध्ये सुनावणीची गरज नाही. तुमचा सांभाळ तुमच्या मुलाने केलाच पाहिजे. ते त्यांचं कर्तव्यच आहे.

वडील म्हणाले की मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. पण तरीही मला माझ्या मुलाकडून दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे.

न्यायाधीश आश्चर्यचकित झाले,ते त्या वृद्ध वडीलांना म्हणाले “जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या पैशांची काय गरज आहे ?”

यावर त्या वृद्ध वडीलांनी आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता सांगितला. वडील न्यायाधीशांना म्हणाले, माझ्या मुलाला कोर्टात बोलावलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल.

न्यायाधीश त्या मुलाला कोर्टात बोलावून घेतात आणि सांगतात की, तुमच्या वडीलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे,मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल.

न्यायाधीशांचं बोलणे ऐकून मुलगा गोंधळून जातो आणि म्हणतो, माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही मग त्यांना माझ्या पैशांची काय गरज आहे ?

न्यायाधीश म्हणतात, ही तुमच्या वडीलांची मागणी आहे आणि त्यांचा हक्क पण आहे.

मग वडील म्हणतात, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या मुलाला सांगा की, त्याने मला दरमहा फक्त १०० रुपये द्यावे, परंतु अट अशी आहे की त्याने स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये.

न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या मुलाला सांगतात की, तुम्ही दर महिन्याला १०० रुपये तुमच्या वडिलांना विलंब न करता हातात आणून देत जावे आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा !

खटला संपल्यावर न्यायाधीश त्या वृद्ध वडिलांना आपल्याकडे बोलवतात. तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या मुलावर हा खटला का दाखल केला आणि मुलाकडून फारच तुटपुंजी किंमत का मागितली ? असे का ??

आता मात्र त्या वृद्ध वडीलांचे डोळे पाणावले. न्यायाधीश साहेब,मला माझ्या मुलाचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती, तो त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की, मला त्याला भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच पण मोबाईलवर ही कधी आम्ही बोललो मला खरच् काही आठवत नाही.

माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे.म्हणूनच मी त्याच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरुन दर महिन्याला तो माझ्यासमोर येईल, त्याला पाहून माझ्या मनाला आनंद होईल.

वृद्ध वडीलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही जर हे मला आधी सांगितले असते तर वडीलांना दुर्लक्षित केल्याचा आणि सांभाळ न केल्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी तुमच्या मुलाला सुनावली असती.

यावर ते वृद्ध वडील हसतमुखाने न्यायाधीशांकडे बघतात आणि म्हणतात, माझ्या मुलाला शिक्षा झाली आणि ते ही माझ्यामुळे या सारखे वाईट काय ! कारण माझा त्याच्यावर खूप जीव आहे आणि माझ्यामुळे त्याला शिक्षा किंवा त्रास झालेलं मला कधीच सहन होणार नाही.

हे सर्व तो मुलगा लांबून ऐकत असतो. आता मात्र त्याच्याही डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो. तो धावत येतो आणि वडीलांना मिठी मारतो. बस्स ! अजून काय हवं असतं म्हातारपणी आईवडीलांना….

मित्रांनो हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाहीत… हो ना !!!

लेखक – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 2 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆  लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 2 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

(त्यासाठी सोप्या इंग्रजी बोलीतून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो इतकंच.  तेवढं तर शिक्षकानं करायलाच हवं ना?”) इथून पुढे. 

काय बोलावं हे न सुचल्यानं मी शांत. मला माझे बांधव दिसू लागले होते. दुसरी-तिसरीच्या पाठ्यपुस्तकातले मराठी शब्दही योग्य तऱ्हेनं न लिहिणारे. तरीही प्रसवोत्सुक. रोज नवं नवं साहित्य जन्माला घालण्याची घाई झालेले. त्यासाठी ‘कळा’ही न सोसणारे. ‘अभिनंदन’ कधी करावं आणि ‘शुभेच्छा’ कधी द्याव्यात हेसुद्धा न कळणारे. अशी माणसं जर ‘मराठीचे अध्यापक’ म्हणून मिरवत असतील तर ते इंग्रजीचं काय करत असतील? घरात एकही शब्दकोश न ठेवणाऱ्या अशा माणसांना इनसायक्लोपिडियाचे सगळे खंड उशाशी ठेवणाऱ्या या बाई समजणार तरी कशा? बरं त्या काही महाविद्यालयात शिकवत नव्हत्या. त्या शिकवत होत्या माध्यमिक शाळेत. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या मुली आज आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे मळे फुलवत आहेत यात नवल काय? 

श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई

“अहो हे शब्दकोश, हे खंड जसे मला उपयोगी पडत होते, तसे नकाशे आणि माझे हे कात्रण-पुठ्ठेही.”

“तुम्ही गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर अध्यापन केलं ते इंग्रजीचं. मग नकाशाचा संबंध आला तरी कुठे?”

“आपण विषय असे तोडतो हेच चुकतं. सगळे विषय एकमेकांच्या मदतीनं शिकवले तर विद्यार्थ्यांच्या गळी चांगले उतरतात, हा माझा अनुभव.”

“पण नकाशा?”

“तुम्हाला मी उदाहरणच देते. तेव्हा दहावीला एक कविता होती फ्लॉरेन्स नाइटिंगेलवरची. ‘लेडी विथ द लॅम्प’. ही बाई परिचारिका, लेखिका आणि संख्याशास्त्रज्ञ. १८५३च्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची शुश्रूषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ म्हणूनच जग ओळखू लागलं. आता हे सारं मुलींना समजावून द्यायचं तर ते युद्ध, ती युद्धभूमी दाखवायला नको का? नुसते कवितेतल्या शब्दांचे अर्थ सांगून कुठं कविता समजते का? तेव्हा मला हे खंड आणि नकाशा उपयोगाला आले. दोन दिवस नकाशा वर्गात टांगून मी आधी ते युद्ध समजावून दिलं आणि मग ती कविता. तेव्हा कुठं ती फ्लॉरेन्स माझ्या मुलींच्या काळजात उतरली. कविता जर काळजात उतरली नाही तर मग काय उपयोग?”

काय बोलणार यावर? आमच्या भूगोलाच्या मंडळींनीही नकाशाला हात न लावण्याची शपथ घेतलेली. तिथं या बाई इंग्रजीच्या तासाला नकाशा वापरत होत्या. अशा बाई आम्हाला लाभल्या असत्या तर आमचं इंग्रजी निदान ‘बरं’ झालं असतं असं मला राहून राहून वाटत होतं. 

“पण तुम्ही तर गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर शिकवलं इंग्रजी. मग गणिताचं काय झालं? तुमची गणिताची आवड?”

“ती आवड मला स्वस्थ बसू देते थोडीच?  इंग्रजी मला शिकवावी लागली म्हणून मी शिकले. सर्वस्व पणाला लावून त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं. पण माझा जीव गणितातच अडकलेला. मग मी अकरावी, बारावीच्या मुलांसाठी गणिताचे वर्ग घेऊ लागले. पैसे कमावण्याची हौस नव्हतीच. माझा पगार मला नियमित मिळत होता. पुरेसा होता. हे वर्ग घेतले ते केवळ माझ्या हौसेसाठी. गणिताची नाळ टिकून राहावी म्हणून.”

पुन्हा माझ्याभोवती माझेच बांधव. खाजगी शिष्यवृत्ती परीक्षांना सक्तीनं  मुलं बसवून पालकांकडून फी आणि परीक्षा घेणाऱ्यांकडून कमिशन घेणारे. परीक्षार्थींच्या संख्येच्या प्रमाणात आधीच निकाल वाटून घेणारे. दोन-चार जिल्ह्यांत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेतील आधीच ठरलेल्या निकालाचे फलक मात्र ‘जिल्ह्यात… राज्यात… देशात पहिला’ असे. तेही चौकाचौकांत लावणारे. यांना बाई समजतील? गंमत म्हणजे हे ‘जिल्ह्यात… राज्यात पहिले’ शासकीय शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत का चमकत नाहीत, हे कोडं न सुटणारं. 

बाईंचं आजचं वय ९५. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा कात्रण-गठ्ठ्यांचा उद्योग नियमित सुरू होता. आता त्या थकल्या असल्या तरी अजूनही तितक्याच उत्साहानं ‘शिकणं आणि शिकवणं’ यावर बोलत असतात आणि फक्त यावरच बोलत असतात. गुढीपाडव्यादिवशी बऱ्याच दिवसांनी त्यांच्याशी गप्पा झाल्या. दुसरा विषय त्यांच्या बोलण्यात आलाच नाही. मी अजूनही त्यांच्यातला ‘शिक्षक’ समजून घेण्याच्या प्रयत्नात. सहज विचारलं परवा त्यांना. 

“एकटं राहण्याचा त्रास नाही झाला? शाळेत… समाजात?”

“आपण आपल्या कामात व्यग्र आणि विचारांवर ठाम असलो की कुणी नादाला लागतच नाही. त्यातूनही कुणी लागलं तर आपली इवलीशी तर्जनीसुद्धा कामी येते.”

“म्हणजे? मी नाही समजलो.”

“सांगते. वार्षिक तपासणी सुरू होती. विस्तार अधिकाऱ्यांसोबत उपशिक्षणाधिकारीही आलेले. त्यांनी माझं इंग्रजी शिकवणं पाहिलं. त्यांना ते आवडलंही. चहापानावेळच्या शिक्षकांच्या बैठकीत त्यांनी माझं कौतुकही केलं त्याबद्दल. आणि नको तो प्रश्न विचारला. म्हणाले, ‘बाई तुम्ही लग्न का नाही केलंत?’ 

त्यांच्या मनात काही नसेलही, त्यांचा हेतूही चांगला असेल. पण मला ते खटकलं. त्यांच्याकडं तर्जनी रोखत मी म्हटलं, ‘इटस् नन ऑफ युवर बिझनेस सर’. आणि बैठकीतून बाहेर पडले. अशी गंमत.”

बाईंच्या हसऱ्या चेहऱ्यावर खट्याळपणाची एक हलकी रेषा.

बाई हे ठामपणे बोलू शकल्या कारण त्यांना कसलाही मोह नव्हता. ना कुठल्या पुरस्काराचा, ना ‘अत्युत्कृष्ट’ शेऱ्याचा. अशा शेऱ्यासाठी नळावरच्या भांडणासारखं वचावचा भांडणाऱ्या मला नव्या नव्हत्या. पण या बाईंचं पाणी वेगळंच होतं. त्यांनी रोखलेली ‘ती’ तर्जनी ताठ होती ती त्याच पाण्यामुळं. त्यांच्या चोख कामामुळं. त्याच बळावर त्यांची सारी वाटचाल दिमाखात झालेली. त्यांचा हाच बाणेदारपणा सोबत घेऊन त्यांच्या अनेक मुलींची वाटचाल सुरू आहे, तशाच दिमाखात.  

धवल चारित्र्य, निष्कलंक हात, आपलं काम उत्तमच व्हायला हवं याचा ध्यास आणि विद्यार्थ्याविषयीची तळमळ या शिदोरीवर सांगलीच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेत सुमती बाबुराव फडकेबाईंनी आपला कार्यकाळ गाजवला. यथावकाश त्या निवृत्त झाल्या तरी त्यांच्या मुलींच्या काळजात त्यांचं स्थान आजही कायम आहे. ते कायम राहील यात कसलीच शंका नाही. 

कारण काळजात जागा मिळते ती आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या दिव्यांनाच. मेणबत्त्या काय घरभर असतातच. 

— समाप्त —

लेखक :  श्री सदानंद कदम 

मो. ९४२०७९१६८०

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ऊपरवाला देता है तो … ☆ हिन्दी-रूपांतरण – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

☆  कथा-कहानी  ☆ ऊपरवाला देता है तो … ☆ हिन्दी-रूपांतरण – सौ. उज्ज्वला केळकर

 एना और जोसेफ एक सुखी दंपति है। जोसेफ का इंपोर्ट-एक्सपोर्टका व्यवसाय है। वह व्यवसाय सम्हालता है और एना अकाउंट्स देखती है। उनके सुख में एक ही मलाल है, काँटे की तरह चुभनेवाला। विवाह के पाँच साल हो गये किंतु अब तक उन्हें कोई इश्यू नहीं है। अब यह काँटा निकालने की भी उन्होंने ठान ली।  

दोनों शहर के नामी डॉक्टर के पास गए। डॉक्टर ने दोनों की बारीकी से जाँच की और बताया, बच्चा पैदा करने में जोसेफ सक्षम है किंतु एना कभी माँ नहीं बन सकती।

अब क्या करें? दोनों विचार-विमर्श करने लगे। एना ने कहा, ‘‘किसी अनाथालय से बच्चा गोद लेंगे और उसे पाल-पोस कर बड़ा करेंगे। बच्चा बढ़ता जाएगा और हमें आनंद, सुख मिलेगा।’

जोसेफ ने कहा, ‘मैं बाप बन सकता हूँ, तो क्यों न मैं अपना बच्चा पैदा करूँ? हम सरोगेट मदरके बारे में  सोचेंगे। वह बच्चा दोनों का ना सही, कम से कम मेरा तो होगा ना!’

थोड़ा विचार-विमर्श करने के बाद एना ने अपनी सहमति जताई।

जोसेफने दैनिक न्यूज बुलेटिन में सरोगेट मदरके बारे में एड दे दी। इस एड को मैरी की ओर से प्रतिसाद मिला।

मुलाकात के वक्त मैरीने बताया, ‘उसके दो बच्चे और एक बच्ची है। बच्ची छोटी रोझेलिना। वह पेट में थी, तब उस का पति जॉन, हार्ट अटैक से स्वर्गवासीहुआ।

रोझेलिना अब डेढ़ साल की है। उस का बडा भाई एरिक तीन साल का और उस से बडा लेस्ली पाँच साल का है।’

मैरी कुछ घरों में साफ-सफाई का काम करती है और बच्चों को पालती है। मैरी ने सोचा, सरोगेट मदर की जिम्मेदारी निभाई, तो अच्छे पैसे मिलेंगे।

बच्चों का पालन-पोषण और अच्छी तरह से कर सकूँगी। उन्हें अधिक सुविधा दे सकूँगी।

मैरी के हामी भरने के बाद डॉक्टर साहब ने उसकी बारीकी से जाँच की। मैरी थोड़ी दुबली थी किंतु उसका गर्भाशय सशक्त था। थोड़ी पौष्टिक खुराक, ताजे फल,

टॉनिक मिल जाय, तो उसकी प्रकृति सुधारने में ज्यादा दिन नहीं लगेंगे, यह डॉक्टर साहब की राय थी। आखिर सर्व संमतिनुसार डॉक्टर साहब ने टेस्ट ट्यूब द्वारा

मैरी के गर्भाशय में बीज रोपित किया।

उस के बाद डॉक्टर साहब ने जब पहली बार मैरी की जाँच की, तब वे कुछ हद तक हड़बड़ा गए। उसके गर्भाशयमें दो नहीं, तीन बच्चे पल रहे थे।

तीन-तीन बच्चों का गर्भ में पलना उसके लिए जानलेवा हो सकता था क्योंकि वह बहुत दुबली थी।

डॉक्टर साहब ने मैरी से कहा, ‘तीन में से एक भ्रूण एबॉर्ट करेंगे, लेकिन सीधी-सादी, सदाचारी, पापभीरू, श्रद्धालू मैरी ने कहा,

‘ये नहीं हो सकता डॉक्टर साहब! ये तीनों बच्चे मेरे अपने भी तो हैं। इनमें से किसी एक को मैं कैसे मरवा सकती हूँ?’

डॉक्टर साहब ने मैरी को समझाने की बहुत कोशिश की, लेकिन मैरी नहीं मानी।

दिन बीतते गए। मैरी के पेट में बच्चे पलते रहे। अब उस की डिलिव्हरी का समय समीप आ गया। एक दिन मैरी पेट के दर्द से कराहने लगी।

उसे हॉस्पिटल में एडमिट किया गया। बाहर एना और जोसेफ बहुत ही उत्साहित थे। आखिर प्रतीक्षा का क्षण समाप्त हुआ। बाहर आते-आते डॉक्टर साहब ने कहा,

‘काँग्रेचुलेशन! तीन बच्चे हुए हैं। तीनों बच्चे गोल-मटोल, स्वस्थ, सुदृढ़ हैं।’ उन के पीछे-पीछे एक नर्स बच्चों को लेकर बाहर आयी। बच्चों को देखते हुए एना बोली,

‘देखो जोसेफ, तुम्हें अपना एक बच्चा चाहिये था। प्रभू येशू ने तुम्हें तीन-तीन बच्चे दिये। चलो, अब मैरी से मिल कर आते हैं।

इतने में असिस्टेंट डॉक्टर बाहर आए। उन्होंने मैरी का ब्लड प्रेशर शूट हो जाने के कारण उसके गुजर जाने का शोक समाचार सुना दिया। समाचार सुनने के बाद दोनों स्तब्ध थे।

इस स्थिति से थोड़ा उबरने के बाद जोसेफ ने कहा, ‘अब मैरी के बच्चे भी अपने ही हैं।’

‘हाँ! मैरी के कोई नजदीकी रिश्तेदार नहीं है। हम उन्हें अनाथाश्रम में नहीं भेज सकते। हमारे बच्चों को जन्म देते हुए मैरी का देहांत हो गया है।’ एना का गला भर आया।

‘देख, तू अनाथाश्रम से एक बच्चा एडॉप्ट करने का सोच रही थी। मैरी माय ने तुझे तीन-तीन बच्चे दिये।‘

एक ओर मैरी के दु:खद निधन का शोक, दूसरी ओर बच्चों की प्राप्ति का आनंद और तीसरी ओर इन छ: बच्चों को अच्छी तरह से पाल-पोस कर बड़ा करने की चिंता में डूबे  वे दोनों छ: बच्चों को गाड़ी में रखने लगे।

मूल कल्पना – डॉ. मिलिंद विनोद   

स्वैर संक्षिप्त रुपांतर – सौ. उज्ज्वला केळकर

सम्पादिका ई-अभिव्यक्ती (मराठी)

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सख्खे भाऊ… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  जीवनरंग ?

☆ सख्खे भाऊ… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

सखाराम वायाळ  मुंबईत कापडाच्या मीलमध्ये कामाला होता.ती बंद पडल्यावर आपलं बिऱ्हाड घेऊन तो गावी आला .  गावातल्या एका किराणामालाच्या दुकानात काम करून तो आपलं घर चालवत होता.त्याची बायको हौसाबाई कुणाच्याही शेतात कामाला जाई.एका पावसाळ्यात कामावरून येताना ती नदीच्या पाण्यात वाहून गेली होती.त्यानंतर सखारामनं सुरेश आणि शशिकांत या आपल्या दोन मुलांना आईची पोकळी जाणवून दिली नाही. शिकून शशिकांत त्या गावच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता.सिनिरीऑरिटी,

कामाचा अनुभव,मेहनत आणि  अंगभूत गुणांमुळे  तो तिथेच मुख्याध्यापक झाला.सुरेशनं गावातील शेतकऱ्यांच्या भाज्या,फळे विकत घेऊन त्यांचे पॅकिंग करून मुंबईत विकण्याचा धंदा सुरू केला.दोघांचीही आपापल्या क्षेत्रात होणारी प्रगती पाहून सखाराम आनंदी होता.वयोमानानुसार तो आता थकला होता.त्याचा ७५ वा वाढदिवस दोन्ही मुलांनी गावात थाटामाटाने साजरा केला.गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रातील अनेक मोठी माणसं या सोहळ्याला उपस्थित होती.कार्यक्रमानंतर रात्री जेवताना शशिकांत आपल्या वडीलांना म्हणाला,” दादा,आम्हा दोघा भावंडांची इच्छा आहे की,उद्यापासून तुम्ही कामावर जाणं थांबवावं”.

” पण बाबांनो, घरी बसून मी काय करू ? घर खायला उठंल रे मला” सखाराम उत्तरला.

” मग सुरेशच्या धंद्यात त्याला मदत करा” शशिकांत म्हणाला.

दुसऱ्या दिवसापासून सखाराम सुरेशच्या कामात मदत करू लागला.

सुरेशचं काम हलकं झालं.  गावाकडील सगळी कामं सखाराम पाहू लागल्यानं सुरेश मुंबईला  वारंवार जाऊ लागला.तिथल्या रंगीबेरंगी जीवनाकडे तो आकर्षित झाला.तिथल्या मित्रांसोबत तो दारू पिऊ लागला,बारमध्ये जाऊ लागला.धंद्यावरचं त्याचं लक्ष कमी होऊ लागलं. त्याला पैशाची चणचण भासू लागली.आपले नाद पुरवण्यासाठी तो कुणाकडूनही हातउसने पैसे घेऊ लागला. गावाकडं शशिकांतला 

उत्कृष्ट काम केल्याबद्दल मोठे पारितोषिक जाहीर झाले.राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते हे त्याला मिळणार होते.सुरेशने हे आपल्या मित्रांना सांगितलं.त्यांनी सुरेशचे कान भरले.” अरे तू इथं हाडाची काडं करतो आणि तुझा भाऊ तिकडं काहीच काम न करता मोठमोठी बक्षीसं मिळवतो “.सुरेशला हे पटलं.तो गावी दारू पिऊन आला.शशिकांत घरी नव्हता. सखारामपुढं तो शशिकांतला शिव्या देत राहीला.सखारामनं त्याला आडवलं.” अरे, दारू पिऊन तू काय बडबडतोस ? काय अवदसा तुला आठवली आज ? ” ” तू थोबाड बंद कर थेरड्या ” असं म्हणून त्यानं आपल्या बापाला कोपर्‍यात ढकललं. या घटनेनंतर सखारामनं हाय खाल्ली. त्यानं अंथरूण धरलं.सुरेशचे पायही खोलात चालले.त्याचा धंदाही बसला.आपले चेकने घेतलेले पन्नास हजार रुपये परत केले नाही म्हणून कुणीतरी त्याच्यावर पोलीसात तक्रार केली.त्याला शोधत पोलीस त्याच्या घरी आले आणि त्याला अटक करून घेऊन गेले.हे झालं तेव्हा शशिकांत घरी नव्हता.संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की,सखाराम अंथरूणावर रडत होता.

शशिकांतला त्यानं घडलेलं सगळं सांगीतलं.वडीलांना शशिकांतनं धीर दिला आणि तो तडक पोलीसचौकीत गेला.शशिकांतला पहाताच ड्युटीवरचा हवालदार म्हणाला,” सर  ,तुमच्या भावानं एकाचे पन्नास हजार रुपये घेऊन ते परत दिले नाही अशी कंप्लेंट आली म्हणून त्यांना

आणलंय “.शशिकांतच्या विनंतीवरून ते गृहस्थ चौकीत आले.शशिकांतनं त्यांना पन्नास हजारांचा चेक दिल्यावर त्यांनी केस मागं घेतली.सुरेशला घेऊन शशिकांत घरी आला.

शशिकांतच्या मागोमाग सुरेश घरात आला.मात्र आपल्या वडीलांच्या नजरेला नजर देण्याचं टाळत  होता.अपराधी भावनेनं तो एका कोपर्‍यात उभा राहिला.त्याला असं अवघडलेलं पाहून सखाराम अंथरूणावर कसाबसा उभा राहिला.शशिकांत आणि सुरेशला त्याने आपल्या कुशीत घेतलं.तिघेही रडू लागले.

सखारामच्या पायावर कोसळत सुरेश म्हणाला, ” आबा,चुकलो मी.तुम्हा दोघांना मी दारूच्या नशेत टाकून बोललो.”

” बाळा,आता आसं नको बोलू.तूच म्हंला ना दारू प्युन बोल्ला”

” हा आबा” असं म्हणून त्यानं घरात कुठंतरी ठेवलेली दारूची बाटली दूर फेकून दिली.

” आबा,शशिकांतनं माझे डोळे उघडले.आता तसला मूर्खपना मी कर्नार नाही.माजा धंदा मी पुन्ना  चालू करीन. तुमी काई पन करू नका.फक्त तुमचा आशिरवाद द्या “.

” बाळा,तू परत काम चालू कर्नार. आनी मी काय पडून राहू काय?”

असं म्हणून सखारामनं अंथरूण  बाजूला सारलं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुसरी बाजू (पाच अ.ल.क.)… सौ. स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

?जीवनरंग ?

☆ दुसरी बाजू (पाच अ...)… सौ. स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

.

आदित्य…आमच्या Society मधला एक उमदा, हरहुन्नरी तरुण…घरच्या उत्तम संस्कारात वाढलेला….

सहा महिन्यापासून अचानक केस वाढवायला लागला.. साहजिकच  लोकांच्या चर्चेला विषय….

हल्ली मुलेही मुलींसारखे केस वाढवतात… छान Bow बांधतात… नवी Fashion आहे… असे काहीबाही कानावर पडत असेच..

परवा  अगदी रात्री उशिरा  भेटला… 

“Hello काकू, कशी आहेस ?”

” मी ठीक.. पण तुला मात्र पटकन ओळखले नाही. .. नव्या रुपात..”

” हो.. सध्या एका संस्थेशी जोडला गेलो आहे… केस दर सहा महिन्यांनी कॅन्सर रुग्णांना दान करतो …

… अजून खूप कमावता नसल्याने आर्थिक लगेच शक्य नाही….. तर जे शक्य आहे तेवढे तरी !!

.

परवा मी बसमधून गावात निघाले होते…

बसला तुफान गर्दी होती… अगदी खचाखच भरलेल्या बसमध्ये नीट उभेही राहता येत नव्हते…

अशातच एक आजोबा S.N.D.T. ला चढले… साहजिकच ते उभेच होते…. 

दहाच मिनिटे झाली आणि एक बाई उठल्या… एका College युवकापाशी गेल्या आणि  जोरात भांडायला लागल्या..

” काय रे, काही समजते का…हे आजोबा उभे आहेत आणि तू आरामात बसला आहेस?… कॉलेज, घरात हेच शिकवतात का तुला ? तुला नाही का उभे राहता येत? “ ….. झालं…सगळी बस त्याच्यावर तुटून पडली…बसच्या वेगापेक्षा लोकांच्या फटकाऱ्याचा वेग खूप जास्त होता ! तो बिचारा निमूटपणे उभा राहिला…..  

थोड्या वेळाने त्याचा स्टॉप आला व जाता जाता त्या बाईंना म्हणाला, ” काकू , पंधरा दिवसांपूर्वी माझे Appendix चे Operation झालेय… आज माझी महत्वाची परीक्षा होती, की जी बुडली असती तर माझे पूर्ण Semester वाया गेले असते… सहज उभारणे शक्य नव्हते म्हणून बसून होतो ! “

एवढे बोलून झरकन उतरून गेला…… 

.

तिच्या आईच्या मते ही पिढीच काहीशी अलिप्त… स्वतःमध्येच गुंग, थोडीशी मतलबी अशीच….. 

तिचा नवीन नोकरीचा पाहिला पगार हातात आला… आज ती घरी आली ती थिरकत्या पायानेच !!

” मावशी, रविवारी सगळया कामावर सुट्टी सांगा.”

” का ग बयो? काय आहे रविवारी?”

“अहो माझा पाहिला पगार झालाय…. तुम्ही , आई आणि मी मिळून मस्त आख्खा दिवसभर लोणावळा फिरून , धमाल करून येऊयात.  माझ्या या यशात तुमच्या दोघींचीही खूप मोठा वाटा आहे !!”

.

तो पक्का नास्तिक… त्यामूळेच ‘ देवपूजेशी ‘ त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही….

ती ३०…३२ वर्षांची तरुण विधवा…एक ३-४ वर्षांचे छोटे बाळ पदरात… रोज एका ठराविक ठिकाणी ‘ फुले  विक्रीचा ‘  धंदा करत असे…. रोज बाजारातून फुलांची खरेदी करणे, आणलेल्या वेगवेगळ्या फुलांचे ढीग, 

फुलांचे हार, गजरे करणे. सोबतच बाळालाही सांभाळणे या सर्वात गुंतलेली असे….तिचा रोजचा  ‘ One Woman Show ‘ चालू असे…..

संध्याकाळी गिऱ्हाईकं येत असत.. पण हिची जरा सुकलेली, मरगळलेली, तजेला नसलेली अशी फुले, हार बघून दुसरीकडे जात असत.. … हिला बरेचदा गिऱ्हाईकांकडून  फक्त सहानभूती, चुचकारे मिळत असत … शेवटी तिचा  फुलविक्रीचा धंदा हा तिच्या रोजी-रोटीचा प्रश्न होता !

 ….  त्या दिवशी तो तिच्या स्टॉलवर आला… उगीचच थोडी फुले विकत घेतली…. जरासा रेंगाळला आणि पिशवीतून एक स्प्रे बॉटल काढून तिला देत म्हणाला ,” मावशी, यातील थोडे थोडे पाणी  दर दोन तासांनी फुलांवर, हारांवर मारत जा म्हणजे फुले छान टवटवीत राहतील…. सुकणार नाहीत !!”

… आता तिला विक्रीसाठी वेळ अपुरा पडतो…

.

ती नववीमधील गोड मुलगी… जरा खेडेगाववजा गावात राहणारी…

सुधारणेचे वारे कितीही जोरात असले तरी ते शहरी भागात….निमशहरी, खेडेगावात वातावरण थोडे वेगळेच.. तसेच जगतानाचे नियमही…

ही रोज शाळेच्या वेळी शाळेच्या Uniform मध्ये.. तर इतर वेळी अगदी  ठरलेल्या नियोजित पोशाखात… अगदी  चाकोरी आखून घेतल्यासारखे…तिला नातेवाइकांचे सततच टोचून शेरे असत…’ Fashion हा शब्द माहितीच नाही..’, ‘ काकूबाई आहे अगदी..’

परवा गाठ पडल्यावर सहज बोलतांना यावर बोलणे झाले…” काकू , मी पण सगळी Fashion करते.. फक्त ज्यावेळी आम्ही महित्यातून एकदा शहरगावात जातो ना तेव्हा… आई बाबा सोबत असताना…

कारण इथे गावात मी तशी राहिले तर त्याचा त्रास माझ्यापेक्षा आई बाबांना जास्त होईल !! “

लेखिका : – स्मिता कुलकर्णी, पुणे.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares