मराठी साहित्य – काव्यानंद ☆ औक्षवंत हो… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – औक्षवंत हो – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

काजळ घेउनिया नयनीचे तीट लावते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।ध्रु।।

 

पहिली बेटी ही धनपेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।१।।

 

सीता तू अन् तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

गार्गी बनुनी विदुषी होई तारी या भारता

सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।२।।

 

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा, निर्घृण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो, सौदामिनी हो,लखलखती  तू ज्वाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।३।।

 

पत्नी जरी तू एका क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करिते सरस्वती ज्ञानाची

गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।।४।।

 

 – डॉ. निशिकांत श्रोत्री.(निशिगंध)

काव्यनन्द

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

   रमन्ते  तत्र देवता:।।

पिढ्यानुपिढ्या जपलेलं हे सुंदर विचारांचं, सुसंस्काराचं सुभाषित.  पण प्रत्यक्ष जगताना, अवतीभवतीची पीडित स्त्री जीवनं  पाहताना मनात नक्कीच येतं की सुभाषितं ही फक्त कागदावर. समाज मनावर ती कोरली आहेत का? खरोखरच नारी जन्माचा सोहळा होतो का? स्त्री आणि पुरुष यांचा  दोन व्यक्ती म्हणून विचार करताना सन्मानाच्या वागणुकींचं  पारडं नक्की कुणाकडे झुकतं? आजही एकतरी मुलगा हवाच ही मानसिकता कमी झालेलली नाही. पण जिच्या उदरातून हा वंशाचा दिवा जन्म घेतो तिचा मात्र सन्मान होतो का?

“ तुम्हाला दोन मुलीच?”

 या प्रश्नांमध्ये दडलेला,” मुलगा नाही?” हा प्रश्न बोचरा नाही का?

 अनेक शंका उत्पन्न करणारे असे प्रश्नही असंख्य आहेत. सुधारलेल्या समाजाची व्याख्या करतानाही हे प्रश्न सतत भेडसावत असतातच आणि याच पार्श्वभूमीवर औक्षवंत हो ही डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची गीतरचना माझ्या वाचनात आली आणि मी खरोखरच हे काव्य वाचून प्रभावित झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे या काव्याचा उगम एका पुरुष मनातून व्हावा याचे मला खूप समाधान आणि तितकेच अप्रूपही वाटले.

हे गीत  वाचल्यावर प्रथमतःच मनासमोर उभी राहते ती प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू आईच. ज्या मातेने नऊ महिने स्वतःच्या उदरात एक गर्भ मोठ्या मायेने  वाढविलेला असतो त्याला जन्म देताना मातृत्वाच्या भावनेने ती ओथंबलेली असते, मग ते मातृत्व मुलाचं की मुलीचं हा प्रश्नच उरत नाही.  कुशीत जन्मलेल्या बाळाची ती आणि तीच फक्त माताच असते.

 काजळ घेऊनिया नयनीचे तीट लाविते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।ध्रु।।

नुकत्याच सोसलेल्या प्रसूती वेदना ती क्षणात विसरलेली आहे आणि जन्मलेल्या आपल्या कन्येला हातात घेताना प्रथम तिच्या मुखातून उद्गार निघतात,” माझ्या डोळ्यातल्या काजळांचं तीट तुला लावते बाळे,  औक्षवंत हो! दीर्घायुषी हो! हाच आशीर्वाद मी तुला देते.”

या ध्रुपदाच्या  दोन ओळींमध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. हा एका नुकतंच मातृत्व लाभलेल्या आईने जन्मलेल्या अथवा तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या स्त्रीअंकुराला दिलेला आशीर्वाद तर आहेच.  पण औक्षवंत हो म्हणताना कुठेतरी तिच्या मनात भय आहे की माझ्या या  मुलीच्या जन्माचा सन्मान होईल का? तिच्यावर कधी अशी वेळ येऊ नये की तिला अर्धवटच हे जगणं सोडून द्यावं लागेल कारण सद्य समाजाविषयी ती कुठेतरी मनोमन साशंक आहे.

आणि म्हणूनच कदाचित तिला आपल्या बाळीला कुणाचीही नजर लागू नये,सर्व दुष्ट शक्तीपासून तिचे रक्षण व्हावे याकरिता डोळ्यातले काजळरुपी तीट लावावेसे वाटत आहे.

 पहिली बेटी ही धन पेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।१।

“म्हणताना म्हणतात हो सारे, पहिली बेटी धनाची पेटी असते. पण ओठावर एक आणि मनात एक असणारे हे सारेच ढोंगी आहेत. पण मी मात्र तुझी आई आहे. माझ्या उदरी जणू काही तुझ्या रूपानने आदीमायेनेच जन्म घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या जन्माने माझी कूस पावन झाली, माझ्या जीवनाची सार्थकता झाली आणि या माझ्या आनंदाला पारावरच नाही. सुखी दीर्घायुष्याचे सगळे मार्ग तुझ्यासाठी मुक्त असावेत हेच माझे आशीर्वचन आहे.”

आशीर्वादाऐवजी कवीने योजलेला आशीर्वचन हा शब्द मला खूपच भावला.  जन्मापासूनच तिने आपल्या कन्येचा योग्य प्रतिपाळ करण्याचा जणू काही वसा घेतला आहे. तिने तसे स्वतःला वचनबद्ध केले आहे असे या शब्दातून व्यक्त होते.

 सीता तू आणि तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

 गार्गी बनुनी विदुषी होईल तरी या भारता

 सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।२।

मुलगी झाली म्हणून त्या मातेला कणभरही कमीपणा वाटत नाही. उलट ती त्या जन्मलेल्या निरागस स्त्री अंशात सीता, द्रौपदी, जिजाऊ माता, विदुषी गार्गी, अगदी अलीकडच्या युगातली अंतराळ वीरांगना सुनीता विल्यमलाच पहात आहे. अशा अनेक गौरवशाली स्त्री व्यक्तिमत्त्वांची तिला आठवण होते आणि आपली ही बालिका ही एक दिवस अशीच दैदिप्यमान कर्तुत्वशाली व्यक्ती असेल असे सुंदर स्वप्न ती पाहते आणि त्या क्षणी पुन्हा पुन्हा ती तिला औक्षवंत हो, कीर्तीवंत हो ,यशवंत हो असे आशिष देत राहते.

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा निर्घुण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो सौदामिनी हो लखलखती हो ज्वाला

 औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।३।

मनातल्या ममतेच्या,वात्सल्येच्या वेगाबरोबरच त्या नुकत्याच, या जगात जन्म घेतलेल्या स्त्री जीवाला दुष्ट, संहारी समाजापासून सावध करण्याचेही भान बाळगते. खरं म्हणजे स्त्री ही सृजनकर्ती, जगाची निर्मिती प्रमुख. तिच्याच उदरातून कुळाचा वंश जन्म घेतो. तिच्याशिवाय ज्याचा जन्मच अशक्य आहे तिचाच मात्र तो वैरी बनतो आणि तिची निर्घृण हत्या करण्यास पुढे सरसावतो. ही केवढी विसंगती आहे!  पण तरीही ही धीरोदत्त माता आपल्या हातातल्या त्या निष्पाप, अजाण, कोवळ्या कळीला समर्थ, सक्षम करण्यासाठी म्हणते,”तू नको कसले भय बाळगूस. तू  मूर्तिमंत तेज हो, थरकाप उडवणारी चपला (वीज) हो, गगनाला भिडणारी लखलखती ज्वाला हो.

तेजस्विनी सौदामिनी ज्वाला हे तीनही शब्द तळपणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठीच आहेत. कवीने या तीन शब्दांची औचित्यपूर्ण गुंफण केली आहे. आईच्या मनातले समर्थ, बलवान, धारदार विचार ते सुंदरपणे व्यक्त करतात.

 पत्नी जरी तू एक क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करते सरस्वती ज्ञानाची

 गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।४।

स्त्री जन्माविषयी असेच म्हणतात ना? क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता.  किती सार्थ आहे हे भाष्य! मातृत्व ही अशी भावना आहे किंवा अशी भाववाचक संज्ञा आहे की जिचा काल अनंत आहे. ज्या क्षणापासून तिच्या उदरात गर्भ रुजतो त्या क्षणापासून ते तिच्या जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ आणि केवळ माताच असते. स्वतःच्या उदरातून जन्माला आलेल्या तिच्याच अंशाच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी ती अविरत झटत असते. या काव्यामधली ही माता म्हणूनच त्या अंशाला तिच्या जन्माचं महत्त्व पटवून देते. तिला संस्काराचे सिंचन करणारी सरस्वती, ज्ञानदा म्हणून संबोधते आणि निस्सिमपणे एक आशा मनी बाळगते की कळी उमलण्यापूर्वीच  खुडली न जावो. केवळ “मुलीचा गर्भ” हे निदान होताच तिची गर्भातच हत्या कधीही न होवो. आणि म्हणूनच या ठिकाणी औक्षवंत हो या आशीर्वाचनाला खूप व्यापक असा अर्थ लाभतो.

*अनंत कालची माता*हा स्त्रीविषयीचा उल्लेखही खूप विस्तारित अर्थाचा आहे. आयुष्याच्या एकेका टप्यावर पती पत्नीचं नातंही नकळत बदलतं. शृंगारमय यौवनाचा भर ओसरतो आणि त्याच पतीची ती उत्तरार्धातच नव्हे तर वेळोवेळी कशी मातेच्या रुपात भासते हेही सत्य नाकारता येत नाही.मातृत्व हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. ती पुत्राचीच नव्हे तर पतीचीही माता होते. असंहे मातृत्व खरोखरच अनंतकाली आहे.

 डॉक्टर श्रोत्रींना मी मनापासून वंदन करते, की या गीत रचनेतून त्यांनी स्त्रीचे महात्म्य अधोरेखित करणारा केवढा मौल्यवान संदेश समाजाला दिला आहे! भृणहत्ये विरुद्ध उभारलेलं हे एक काव्यरूपी शस्त्रच आहे.हे गीत वाचल्यावर निश्चितपणे जाणवते ते हे की हे एका कन्येची माता होणाऱ्या अथवा झालेल्या स्त्रीचे मनोगत आहे. कदाचित जन्मलेल्या कन्येशी किंवा गर्भांकुराशी होत असलेला हा एक प्रेमळ,ममतापूर्ण तरीही काहीसा भयभीत, चिंतामिश्रित संवादही आहे.. आपल्या उदरात वाढणारा गर्भ हा मुलीचा आहे असे समजल्यावर तिने सर्व समाजमान्य कल्पनांना डावलून केलेला एक अत्यंत बलशाली निर्धार आहे. तितक्याच समर्थपणे ती  तिच्या गर्भासाठी एक संरक्षक कवच बनलेली आहे.

सर्वच दृष्टीने हे गीत अर्थपूर्ण आणि संदेशात्मक आहे. मातेची महती सांगणारे आहे.

वात्सल्य रसातले तरीही वीरश्रीयुक्त असे रसाळ, भावनिक गीत आहे,

धनाची पेटी तेजस्विनी सौदामिनी ज्वाला आणि ती लखलखती या स्त्रीला दिलेल्या उपमा खूपच सुंदर वाटतात, आणि यथायोग्य वाटतात.

सारे —न्यारे” माता —भारता’ घाला— झाला— जीवाला ही यमके यातला अनुप्रास हा अतिशय डौलदार आहे.

साधी, सहज भाषा, नेमके शब्द अलंकार, वजनदार तरीही अवघड न वाटणारे सुरेख नादमय शब्द यामुळे औक्षवंत हो हे गीत मनावर एक वेगळीच जादू करते. एका वेगळ्याच भावना प्रवाहात अलगद घेऊन जाते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

धागेदोरे तीनशे पासष्ट दिवसांचे, विणतो आपण …. 

सुख दुःखाचे, प्रेमाचे, आनंदाचे,

मैत्र जोडतो, कधी फटकारतो, रुसतो, भुलतो,

कधी ताणतात, कधी सैलावतात, बंध‌ नात्याचे,

 

पौष घेऊन येतो संक्रांत,

” तिळगुळ घ्या अन् गोड बोला म्हणत.”……..

हळदीकुंकू वाण, दागिने हलव्याचे, आणि रथसप्तमी सूर्याची आराधना,

 

येई फाल्गुन .. … प्रेमरंगात रंगे रंगपंचमी,

भलेबुरे जाळायला होळी,

 

चैत्राची पालवी फुटली, गुढीपाडव्याला गुढी उभारली,

गुढी ऐक्याची, सद् भावाची, देशभक्तीची,

सुरु होतं हिंदू नववर्ष,

चैत्रागौर, हळदीकुंकू, डाळ, पन्ह, उसळ हरभऱ्याची,

 

हापूस, पायरीचे आगमन, घरोघरी आमरस पुरीचे जेवण,

वैशाखाचे रणरण ऊन,

परीक्षा,अभ्यास, सुट्टी, निकाल, धामधुम,

 

पावसाची चाहूल, रिमझिम, रिपरिप,

कृषीवलांची‌ लगबग, नांगरणी, पेरणी,

मुलांची सुट्टी संपली, शाळा, कॉलेज, रेनकोट,छत्री, पुस्तक,वह्या, गणवेश,

 

जेष्ठाचे आगमन,… ललनांची‌ वटसावित्री,

आषाढस्य प्रथम दिवसे म्हणत, येणारा मेघदूत,

निसर्गपूजा, बैलांचे कौतुक बैलपोळा.. 

 

श्रावण आला, पूजा नागोबाला…. 

सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौरी,

बृहस्पति पूजा बुधवारी, शुक्रवारी लक्ष्मी येई घरी,

शनिवारी मुंज मुलांना जेवण, रविवारी आदित्यांचे पूजन,

नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, भावाबहीणीच गठबंधन,

रोज गोडधोड … खीर, दींड, पुरणपोळी, नारळीभात, खांतोळी, पेढे,बर्फी, मेवामिठाई,

मसालेभात, कटाची आमटी, भजी, वडे डाव्या बाजूला,

 

पाठोपाठ गणराया आला … सुशोभन, रांगोळी 

गणेशाचे आगमन …. पूजा आरती,मंत्रपुष्पांजली … आली,आली मोदकांची थाळी,

 

अश्विनात विजयादशमी … लगेचच येणार दिवाळी,

आकाशकंदील, किल्ला… फराळाचा हल्लगुल्ला,

वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज,

पाहुण्यांची लगबग, तुळशीच लग्न, घरच्या लग्नांचे मुहूर्त, “शुभमंगल सावधान”,

 

मार्गशीर्षातल्या गुरुवारी श्रद्धेने पूजन, उपवास करिती महिला,

म्हणेतो,येतो नाताळ, तो साहेबाचा … परिणाम थोडा गुलामीचा,

 

असे संपतात बारा महिने, संकल्प राहतात अधुरे,

पुन्हा नववर्ष, नित्य,नवा हर्ष, उभारी, नवे संकल्प, उत्साहाचे वारे  

 

जीवनाचं हेच असे सार … 

इंग्रजी महिन्यातच जगतो, तरी मराठे महिने जगवूया,

ते पाठ‌ करण्याचा संकल्प करुया,

 

इतकीच छोटीशी इच्छा,

….. नववर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा……

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तारांबळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☘️ तारांबळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

तोल किती साधायचे,

मोल ज्याचे उरले नाही.

इतकी तारांबळ तरी

सोडता का सुटत नाही ?

किती व्याकूळ जीव

दुषणे एकवत नाही

तरीही नजर वाटेची

सोडता सुटत नाही

जिद्दीने चालतो जो

वादळांची बिशाद नाही

पावलांना उमेद आता

काळजातून पाझरत नाही

साजिरे हे रुप केवढे !

गोरीऱ्या त्या पाकळ्या

वादळाला का न कळला,

तिच्या मनातील मोगरा

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🕊️ मनं पाखरू! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मनं पाखरू पाखरू

पर हलके पिसागत,

जाई साता सुमद्रापार

क्षणी अचंबित वेगात !

मनं पाखरू पाखरू

सारा सयीचा खजिना,

यात दुःखी जखमांना

कधी जागा अपुरी ना !

मनं पाखरू पाखरू

घर बांधे ना फांदीवर,

नेहमी शोधित फिरे

वृक्ष साजिरा डेरेदार !

मनं पाखरू पाखरू

पंख याचे भले मोठे,

दृष्टी आडचे सुद्धा

क्षणात कवेत साठे !

मनं पाखरू पाखरू

वारा प्याले जणू वासरू,

बसे ना त्या वेसण

सांगा कसे आवरू ?

सांगा कसे आवरू ?

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “घरटे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “घरटे…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

घरटे झाले वेळीच बांधून  

इवल्याशा काड्यांनी सांघून

बाहेरून आता नीट पहाते 

चुकून  काही गेले का राहून —- 

आत मऊशी गादी झाली

जागाही सुरक्षित मिळाली

अन पंख फुटेपर्यंत मनीची 

पिल्लांची काळजीही मिटली —-

वाट पहाता काही दिसांनी

घरटे बोलेल चिवचिवाटांनी

त्याच क्षणाची वाट पहाते 

पंखाखाली घेईन त्या क्षणी —- 

जन्मोत्सव  माझ्या पिल्लांचा 

याच महाली करावयाचा

होईल सुरू मग नवाच दिनक्रम 

चिमण्या चोचींना भरवायाचा —- 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सृष्टी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ सृष्टी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(षडाक्षरी)

  ढगाळ आभाळ ,

  अवचित वेळी !

  थंडीला वेढून ,

 हवा पावसाळी!…..१

 

        चाहूल थंडीची

        सरे पावसाळा ,

        अचानक वाजे,

        पावसाचा वाळा……२

 

  पाऊस न् थंडी,

   निसर्ग सजला,

  गारव्यात याच्या,

   माणूस भिजला …..३

 

        ऋतू चक्रामध्ये,

        मनस्विनी सृष्टी!

        दिसते सर्वांना,

        तिची चमत्कृती!….४

 

  नकळत सारी,

   सृष्टी ही गोठली!

  थंडी च्या ऋतूत,

    ‘स्ट्यॅच्यू’ हीच झाली!…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ लाभो सानिध्य थोरांचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ लाभो सानिध्य थोरांचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

लाभो सानिध्य थोरांचे

सार्थक हो जीवनाचे

पूज्य भाव त्यांच्या प्रति

विचारांच्या आदर्शांचे

 

अनुभवी असे बोल

ज्ञान बुध्दी त्यांच्याकडे

उपदेश अनमोल

नेती कसे उंचीकडे

 

धन्य धन्य हे जीवन

आशीर्वाद मिळे जर

वाटचाल होते सोपी

खडतर मार्गावर

 

दिशा मिळे आपोआप

सल्ला थोरांचा मानावा

ध्येयाकडे जाण्यासाठी

त्यांचा आधार शोधावा

 

छत्रछाया कृपा त्यांची

नित्य सहज लाभावी

जीवनाची इतिश्रीही

सानिध्यात त्यांच्या व्हावी

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवीन वर्षात ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☘️ नवीन वर्षात ❔❔ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

स्वतःला नव्याने

  शोधता येईल ?

शोधले तरी

   जगता येईल ?

निवडूंगाचे 

  गुलाब होईल ?

शब्दांशिवाय

   बोलणे कळेल ?

डोळ्यातल्या भावना

    वाचल्या जातील ?

भावनेचा मनापासून

    आदर होईल ? 

स्वयंपाक घर

    विरुन जाईल ?

नास्ता जेवण

    सहज मिळेल ?

 न आवडणाऱ्या गोष्टी

     टाळता येतील ? 

हवे तेवढे

    वाचता येईल ?

हवी त्याला हाक

    देता येईल ?

विनाअट कुणी

    नाते ठेवेल ?

आई सासखं कुणी

   अलिंगन देईल ?

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 204 ☆ नदी काठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 204 – विजय साहित्य ?

☆ नदी काठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

नदी काठी विसावल्या

दोन संसारिक पिढ्या

उगवती मावळती

भाव भावनांच्या उड्या…! १

नातवंडे खेळताना

येई नदीला बाळसे

गुजगोष्ठी मनातल्या

हसे वार्धक्य छानसे…! २

देई बोलका दिलासा

आधाराची काठी हाती

टाळी वाजता पाण्यात

उजळली पहा नाती…!३

उगवती मावळती

नदी काठी संगमात

बाल,तारूण्य वार्धक्य

आठवांच्या आरश्यात…!४

उगवती दावी जोर

बालपण झाले जागे

सांजावली दोन मने

अनुभव राही मागे…!५

नदी धावते धावते

पोटी घेऊन जीवन

काठावरी फुलारले

सानथोर तनमन…!६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । 

पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ४१ ॥ 

गात्रांना वश करुनीया  ठेवी त्यांच्यावर अंकुश 

विनाशी ज्ञानविज्ञानाच्या भारता बळे करी तू नाश ॥४१॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । 

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥ 

इंद्रिये असती परा त्याहुनी आहे मन सूक्ष्म

मनाहुनीही बुद्धी परा आत्मा त्याहुनी सूक्ष्म  ॥४२॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । 

जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ४३ ॥ 

जाणुनी घेई महावीरा सूक्ष्मतम अशा आत्म्याला 

मनास घेई वश करुनीया  तल्लख बुद्धीने अपुल्या

अंकित करुनी अशा साधने दुर्जय अरिला कामाला

अंत करूनी कामरिपूचा प्राप्त करुनी घे मोक्षाला ॥४३॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी कर्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित तृतीय अध्याय संपूर्ण ॥३॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares