अशाच काहीशा नावाची आणि अर्थ असणारी बहिणाबाई यांची एक कविता शाळेत होती…
बिना कपाशीनं ऊले
त्याले बोंड म्हनू नये…..
हरिनाम हि ना बोले
त्याले तोंड म्हनू नये……
नाही वाऱ्याने हालंल
त्याले पान म्हनू नये…
असे बरेच कशाला काय म्हणू नये हे खास अहिराणी भाषेत पण सहज समजेल या शब्दांत त्यांनी सांगितले आहे. हे सगळे दोष आहेत. माणूस म्हणून कसे रहावे हेच सांगण्याचा हेतू त्यात होता. यात त्यांनी माणूसच नाही, तर वनस्पती, आणि निसर्ग यांच्यातील अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक गोष्टी सहज ओघावत्या शब्दात सांगितल्या.
पण आता काळ बदलला. जगण्याचे तंत्र (आम्ही आमचेच) बदलले. नवीन तंत्रज्ञानात आम्ही आमचे वागण्याचे ताळतंत्र काही प्रमाणात सोडले. कारण आता आला मोबाईलचा जमाना. आणि या मोबाईलच्या जमान्यात आम्ही माणूस म्हणून जगायचेच विसरलो. इतकेच नाही तर काही अपप्रवृत्तींचे दर्शन आम्ही राजरोसपणे दाखवायला, करायला लागलो. (अर्थात सगळेच नाही. पण संख्या कमी देखील नाही.) याचे वाईट वाटणारे आहेत तसेच समर्थक देखील आहेत. (तो खुपच ॲक्टिव्ह असतो, मोबाईल वर गाणं बघतच जेवतो, शाळेत जात नाही अजून, पण मोबाइल बरोब्बर हाताळतो इ…)
आता मोबाईल त्यातले फेसबुक, व्हॉटस्ॲप, गुगल, यू ट्यूब, इनस्टा. ट्विटर, गेम या बद्दलच तरुणाईचे ट्विट असते. असे आणि इतरही बरेच काही यातच आम्ही स्वतःला हरवले आहे. आम्ही या मोबाईलच्या अधीन झालो आहोत. आणि अप्रत्यक्ष पणे त्यांचे समर्थन देखील करतो. आम्ही कामाव्यतिरिक्त बराचसा वेळ मोबाईल मध्येच घालवून वेळ घालवत असतो.
आज सहजपणे या मोबाईल बद्दल खालील प्रमाणे म्हणतील का?……. कारण सततचा त्याचा वापर. आणि तो वापरण्याची अधीरता.
नाही केले अपडेट…..
त्याला स्टेटस् म्हणू नये..
नाही बदलले चित्र…..
त्याला डी.पी. म्हणू नये.
नाही आला मेसेज……
त्याला गृप म्हणू नये.
नाही काढले फोटो…….
त्याला सोहळा म्हणू नये.
ज्याने केले नाही फॉरवर्ड……
त्याला ॲक्टिव्ह म्हणू नये.
जो जागेवरच थांबला…….
त्याला नेट म्हणू नये.
जो वेळेवर संपला…..
त्याला नेटपॅक म्हणू नये.
ज्याने नाही झाला संपर्क…….
त्याला रेंज म्हणू नये.
ज्याने दाखविला नाही रस्ता…….
त्याला मॅप म्हणू नये.
जी लवकर डिस्चार्ज झाली……
तिला बॅटरी म्हणू नये.
ज्याचे दिले नाही उत्तर……..
त्याला गुगल म्हणू नये.
जी भरते लवकर……
त्याला मेमरी म्हणू नये.
ज्यात नाही नवे ॲप……
त्याला प्ले स्टोअर म्हणू नये. जो होतो सतत हॅंग…….
त्याला मोबाईल म्हणू नये.
शेवटी तर असे म्हणावे लागेल की……
ज्यांच्याकडे नाही मोबाईल……..
त्याला माणूस म्हणून नये.
जिथे नाही वाय फाय……..
त्याला घर म्हणू नये.
कारण आम्ही बराचवेळ काही कारणाने किंवा कारणाशिवाय मोबाईल सोबतच असतो.
सगळ्या नवीन गोष्टी वाईटच असतात असे नाही. पण चांगले काय आहे? हे आपणच समजून घेत ते आणि तेवढेच वापरले पाहिजे. नेमके, वेचक घेऊन ठराविक काळात वापरला तर मोबाईल देखील चांगलाच आहे.
ज्या काळी, म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी, ” महिला दिन ” साजरा करून त्या दिवशी खोटी … औपचारिक कणव दाखवून महिला वर्गाला शुभेच्छा देण्याची प्रथा नव्हती, त्या वेळी नामवंत कवी विंदा करंदीकर यांनी ‘ झपताल ‘ या नावाची किती सुरेख कविता लिहून तत्कालीन स्त्रीचे जीवन रेखाटले होते ते दर्शविण्यासाठी ती कविता खाली देत आहे. आता सर्रास इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या तरुण पिढीला हे कोण विंदा ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे . पण घरातील कोणा शिकलेल्या आजी … आजोबा , काका…काकू ,मामा… मावशी ,आई …बाबा याजकडून ते माहीत करून घ्यावे …
विंदांच्या या ‘झपताल’ कवितेचं वैशिष्ट्य हे की ती कविता कोणी स्त्रीने लिहिलेली तक्रारवजा कविता नाही, तर त्या जुन्या काळांतल्या एका पुरुषाने, एका संवेदनशील पतीने आपल्या पत्नीचं केलेलं कौतुक आहे.
आपल्याकडे महाराष्ट्रातल्या साधारणपणे मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात सत्तरऐंशी वर्षांपूर्वी घरी चोवीस तास ‘आई’ किंवा ‘पत्नी’ म्हणून कामाच्या रगाड्यात भरडल्या जाणा-या आणि चाळीतल्या सव्वा-दीड खोलीत आयुष्य काढीत उभं आयुष्य फक्त सहन, सहन आणि सहन करीत करीत काढलेल्या महिलांची काय स्थिती होती, ते विंदांनी त्यांच्या ‘झपताल’ या कवितेत समर्पकपणे मांडलेलं आहे.
आमच्या मागच्या पिढीतल्या नऊवारी लुगड्यातल्या कोणाही आजी, आई, मावशी, आत्या, काकू, मामी…. यांना स्वत:ची ‘मतं’ तर दूरच राहिली, स्वत:ची ‘पर्स’ही त्यांना माहीत नव्हती. तरी घटस्फोट न घेता, (ब्रेक-अप न करता) आणि कोणतंही ‘लोन’ न घेता, भांडततंडत का असेना, पटलं न पटलं तरी, पन्नास पन्नास, साठ साठ वर्ष चार, पाच, सहा मुलं वाढवून, पुढे त्यांना मार्गी लावून, ‘त्याचसाठी अट्टाहास करीत ‘शेवटच्या दिसापर्यंत’ टुकीने संसार निभावले.
विंदांची ही कविता हल्लीच्या तरुणींना समजेलच असं नाही, त्यात त्यांची चूकही नाही. कारण त्यांना हे मुळातच काही माहीतच नाही. त्यातल्या काही अस्सल ‘मराठी’ शब्दांचा अर्थही समजणार नाही, उदा. ओचें, उभे नेसून, पोतेरें, मुतेली, बाळसे, चूल लाल होणे, मंमं, आणि संसाराची दहा फुटी खोली.. वगैरे. घरी एखादी आजी असलीच तर तिला त्यांनी या शब्दांचे अर्थ विचारावे. ते दिवस आणि तो काळ ज्यांनी पाहिला आहे, भोगला आहे, त्यांनाच ही कविता चांगली समजेल, घरोघरच्या साठी-सत्तरी उलटून गेलेल्या केवळ महिलांनाच नव्हे तर घरोघरच्या संवेदनशील असलेल्या पुरूषांनाही समजेल.
☆ झपताल ☆
ओचें बांधून पहांटे उठते तेव्हांपासून झपाझपा वावरत असतेस
कुरकुरणा-या पाळण्यामधून दोन डोळे उमलूं लागतात
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते ……
उभे नेसून वावरत असतेस.. तुझ्या पोते-याने म्हातारी चूल पुन्हां एकदां लाल होते
आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवूं लागतो
म्हणून तो तुला हवा असतो……
मधून मधून तुझ्या पायांमध्यें माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात
त्यांची मान चिमटीत धरून तूं त्यांना बाजूला करतेस,
तरी पण चिऊकाऊच्या मंमं मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो ……
तूं घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात