मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय मित्र प्रदीप… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ प्रिय मित्र प्रदीप… ☆ श्री सुनील देशपांडे 

प्रिय मित्र प्रदीप,

कालपासून फक्त डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात आहेत. गळा गदगदून आला आहे. तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. तू तिकडे साता समुद्रा पार! कुणास ठाऊक रात्र आहे की दिवस आहे आणि माझ्याही तोंडातून शब्द निघणे अशक्य होते आहे. टीव्हीवर वर्तमानातील सत्य पाहिल्यानंतर भूतकाळाचा इतिहास नजरेसमोरून सरकत आहे. ऊर अभिमानाने भरून आला आहे. आपण आज जिवंत आहोत हे केवढे मोठे भाग्य ! 

या क्षणी आपले मित्र जे आज हयात नाहीत पण आपल्याबरोबर होते, अशांच्या सुद्धा आठवणी मनात दाटून येत आहेत. बालपणापासून आपल्या परिस्थितीच्या आठवणी येत आहेत, अर्थात आपली परिस्थिती ही देशाच्या आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून असणार. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता लहानपणी अमेरिकेच्या मदतीचा रेशनवर तासंतास उभे राहून मिळवलेला निकृष्ट प्रतीचा गहू, मिलो, मका असे पदार्थ खाण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर सुद्धा आली होती. या परिस्थितीतून आपला देश आजच्या परिस्थितीवर आला आहे. लहानपणी दिवाळीसाठी प्रत्येकी ४०० ग्रॅम जादा साखर मिळेल अशी बातमी आज मुलांना, नातवंडांना सांगितली तर त्यांना हसू येते. पण ती वस्तुस्थिती आपण विसरू शकत नाही. या सर्व परिस्थितीतून आपल्या आई-वडिलांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या सोयी व संधी आपल्या स्वतंत्र देशामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या हे आपले केवढे मोठे भाग्य !

महाविद्यालयीन शिक्षणानंतर तू इस्रो मध्ये जॉईन झाल्याचे ऐकल्यानंतर आणि आर्यभट्ट च्या शास्त्रज्ञांच्या टीम मध्ये तुझी निवड झाल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम आमचा उर अभिमानाने भरून आला होता. आता तुला परत बाळू म्हणून हाक मारून मिठी घालता येईल का हा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु त्यानंतरच्या कित्येक वर्षानंतर झालेल्या भेटीने तू त्याचे उत्तर दिलेस. परंतु सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या पाहून मन व्यथित होत होते. तसेच अभिमानाने भरूनही येत होते. थुंबा स्पेस सेंटर मध्ये सुरुवातीच्या काळात रॉकेटचे पार्ट असेंब्ली साठी सायकल आणि बैलगाडी मधून नेत असलेले फोटो बघून मन व्यथितही होत असे आणि अभिमानाने भरूनही येत असे. अशा परिस्थितीतून आपण मंगळ आणि चंद्र यांच्या यशस्वी मोहिमा आणि तेही एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या बजेट पेक्षा कमी बजेटमध्ये यशस्वी करून दाखवल्या ही आपल्या देशाला आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीने दिलेली देणगी आहे असे नाही का वाटत ?

हे सर्व आठवून, आठवून डोळ्यातून निघणारे पाणी अजूनही थांबत नाही. मी प्रचंड भावुक झालो आहे. तुला कशा परिस्थितीतून इस्रो वर आली हे जास्त चांगले माहित आहे. आम्ही फक्त पेपरमधून वाचलेल्या बातम्यांवर मत बनवणारी माणसं. पण तरीही या सर्व शास्त्रज्ञांनी शून्यातूनच नव्हे तर शून्यापेक्षाही खालून या सर्व गोष्टींना जो उठाव मिळवून दिला त्याबद्दल त्यांना किती वंदन करू हेच समजत नाही. तुम्ही सर्व सुरुवातीच्या टीममध्ये होतात तुम्ही पायवाट निर्माण केली. आता त्याचा राजमार्ग झाला. नव्हे अंतराळ मार्ग झाला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगामध्ये पहिल्यांदाच पंधरा-वीस मिनिटे का होईना सैर करणारा माणूस हा शिवकर बापूजी तळपदे हा भारतीय होता हे आठवल्याशिवाय राहत नाही. त्याच्या आयुष्यावर ‘हवाईजादा’ नावाचा एक चित्रपट निर्माण झालेला आहे. तो युट्युब वर उपलब्ध आहे. परंतु तोही किती जणांनी पाहिला आहे कुणास ठाऊक ? ही काल्पनिक गोष्ट नव्हे तर त्याकाळची वस्तुस्थिती आहे, हे सुद्धा कित्येक जणांना माहीत नाही. ब्रिटिश गॅझेट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या काळच्या केसरीमध्ये त्याबाबतच्या बातम्या आहेत. त्यामुळे हे सत्य नाकारता येत नाही.

राइट बंधूंच्या आधी अधांतरी सफर करणारा पहिला भारतीय आज आठवतो आहे. त्यांनी जे विमान ‘मरुत्सखा’ नावाने बनवले होते ते सोलर पॉवर वर चालले होते हे सुद्धा विशेष! कारण आज या अंतराळ मोहिमेत सोलर पॉवर चा खूप मोठा उपयोग केला गेला आहे.

या सगळ्या स्मृती एकत्र दाटून येत आहेत. खरं म्हणजे मला माझ्या भावना नीट पणाने मांडताच येत नाहीत. मनात खूप दाटून आले आहे. खूप बोलायचं आहे. खूप व्यक्त करायचं आहे. परंतु कसं करावं समजत नाही. एखाद्या वेळेस हे ॲब्सर्ड वाटत असेल. पण काय करू ? व्यक्त झाल्याशिवाय राहवतही नाही. भावना समजून घ्याव्यात. अर्थात हे तुला वैयक्तिक नव्हे तर हे जाहीर पत्र आहे. माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्या ओळखीच्यांना या सगळ्या भावना समजाव्यात म्हणून हे तुझे पत्र मी सगळ्यांनाच पाठवीत आहे. परंतु तुझ्या त्याकाळच्या किंवा इसरोमधील शास्त्रज्ञ मित्रांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात ही विनंती. कालच मी यावर एकच पोस्ट टाकली होती ती अशी

इस्रोच्या सर्व आजी-माजी शास्त्रज्ञ वैज्ञानिक इंजिनियर्स जे जे कोणी सर्व तांत्रिक गोष्टी शून्यातून उभे करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्या सर्वांना माझे साष्टांग नमस्कार. मनापासून वंदन, वंदन, वंदन.

एकच शब्द माझ्या तोंडून फुटत होता या सर्वांसाठी…

 !! नम….. नमस्तुभ्यम ! नमस्तुभ्यमस्तुभ्यम !!!

या क्षणी वसंत बापटांची एक कविता आठवते आहे त्याचा उल्लेख करतो,

*

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

*

ही वडीलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो

खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो

चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥

*

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी

अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी

रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥

*

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!

स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!

काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

*

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते

अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते

नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥

*

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

जुन्या पिढीला वंदन आणि नव्या पिढीला सलाम !

कालच्या चंद्रयान मोहिमेवर बऱ्याचशा राजकीय टिपण्या आज वाचल्या आणि वाईट वाटले. विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हे राजकारणाचे विषय नाहीत हे जोपर्यंत आपल्या लोकांना समजणार नाही तोपर्यंत आपल्या दुर्दैवाचे फेरे थांबतील का? असा प्रश्न पडतो. तुमचे राजकीय मत काही असेल तरीसुद्धा वैज्ञानिक मत एकच असते आणि तेच असले पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यवहारांमध्ये राजकारण न आणता जगू शकत नाही का ? अत्यंत वाईट वाटते आणि या राजकीय गोष्टींचा कंटाळाच येऊ लागतो. असो वस्तुस्थितीला आपला इलाज नाही आणि आपल्या मताशी इतर माणसे सहमत असतीलच असेही नाही. त्यामुळे जे असेल ते स्वीकारत, परंतु या यशस्वितेच्या आनंदात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या या अत्युच्च क्षणाचा साक्षीदार झाल्याच्या आनंदात, भविष्यात केव्हाही आता मृत्यू आला तरी आनंदाने सामोरे जावसं वाटेल यात शंका नाही.

जय हिंद! भारत माता की जय !!

तुझा प्रिय मित्र,

सुनील

(माझा तिसरीपासून ते कॉलेज पर्यंतचा वर्गमित्र प्रदीप शिंदे, जो पूर्वी इस्रो या संस्थेमध्ये नोकरी करीत होता. भारताच्या यशस्वी चंद्र मोहीमेनंतर त्यास पाठवलेले हे पत्र. मुद्दाम सर्वांच्या माहितीसाठी प्रकट करीत आहे)

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ बाळकृष्ण गोजिरा… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ बाळकृष्ण गोजिरा… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

प्रथमच मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा स्त्रीच्या मनात अनामिक भावनांचा सागरच उसळतो. स्त्रीत्व आणि मातृत्व या स्त्री जीवनातल्या अनमोल बाबी आहेत. मातृत्व जणू काही स्त्रीत्व सिद्ध करतं. मातृत्व म्हणजे एक प्रकारे तिच्या स्त्री जीवनाची सफलता असते. “आपण आई होऊ शकतो किंवा आपण आई होणार” ही भावनाच स्त्रीसाठी त्रिभुवनातला आनंद देणारी असते. एकाच वेळी हर्ष, हुरहूर, जबाबदारीच्या जाणिवेनं आलेलं भय, देहात होणारे बदल आणि हे “गुपित कुणाला सांगू कसे?” अशा एका निराळ्याच मानसिकतेत ती असते पण सर्वप्रथम हे गोड गुपित तिला “त्यालाच” सांगायचे असते कारण निर्मितीच्या या सुखद वाटेवरचा प्रवास हा केवळ त्या दोघांचाच असतो म्हणूनच या आनंदाच्या क्षणाचा खरा भागीदार तोच असतो. अशाच अर्थाचं एक द्वंद्व गीत म्हणजे बाळकृष्ण गोजिरा जे डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सहज उतरलेलं आहे. मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर स्त्रीच्या अंतरंगातले तरंग त्यांनी अत्यंत जाणतेपणाने आणि हळुवारपणे टिपले आहेत. स्त्री जीवनातला असा हा अनमोल क्षण, आणि त्यातला जोडीदाराचा सहभाग नेमकेपणाने वेचणारे हे एक गोड युगुल गीत आहे.

*

वसविला बाळकृष्ण गोजिरा

 वसविला बाळकृष्ण गोजिरा”ध्रु।।

*

 ती: दान घेऊनी तव तेजाचे

 सार्थक झाले या ओटीचे 

 उजविण्या ज्योत अपुल्या घरा

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।।१।।

*

 तो: प्रेमरज्जुंचे धागे अपुले

 ती: रेशीमगाठी बंध जाहले 

 तो : गुंफिला नवा साजिरा 

 ती :वसविला बाळकृष्ण गोजिरा।।२।।

*

तो: मुकुंद अथवा आदिशक्ती 

ती :कलिका अपुल्या वेलीवरती 

 माझ्या पोटी उमलु लागली 

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।।३।।

*

कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री. (निशिगंध काव्यसंग्रह)

तीन कडव्यांचं, फक्त पंधरा ओळींचं काव्य पण किती अर्थपूर्ण किती बोलकं! मातृत्वाशी गोड धागा विणला जात असतानाच तिच्या मनातलं अगाध आंदोलन आणि तिच्या स्वप्नरंगात दंग झालेल्या “त्याचे” मन.. किती साध्या आणि सोप्या शब्दांतून या गीतात उलगडलं आहे!

 वसविला बाळकृष्ण गोजिरा

 या ध्रुवपदातला बाळकृष्ण हा शब्दच मनाला हळुवार मोरपिसाचा स्पर्श करतो. लहान बालकांसाठी बाळकृष्णाची ही एक सुंदर उपमा नेहमीच दिली जाते. कृष्ण, कन्हैया, कान्हा या शब्दातच लडिवाळपणा आहे. कृष्णाला कोणी पाहिले आहे? पण त्याचं लडिवाळ, बाळपणीचं रूप सगुणात्मक आहे आणि ते अत्यंत सुंदर गोजीरं आहे म्हणूनच उदरात वाढणाऱ्या गर्भाला या बाळकृष्णाचं रूप लाभावं ही प्रत्येक स्त्रीची मनोकामना असते आणि सहजपणे ती म्हणते, स्वतःशी आणि त्याला सांगताना,

 वसविला बाळकृष्ण गोजिरा

 *मला दिवस राहिलेत किंवा आता आपण आई-बाबा होणार बरं का?” याच भाष्याला सौंदर्याने सजविणारी,

वसविला बाळकृष्ण गोजिरा ही ओळ किती काव्यात्मक आहे! इथे बाळकृष्ण हा रुपकात्मकही आहे.

 ती: दान घेऊनी तव तेजाचे 

 सार्थक झाले या ओटीचे 

 उजविण्या ज्योत अपुल्या घरा

 वसविला बाळकृष् गोजिरा।१।

द्वंद्वगीत म्हणजे एक संवाद असतो. हाही एक आनंददायी संवाद आहे. या चार ओळी वाचताना वाचकाच्या मनात एक सहजीवनाचे सुंदर चित्र साकारते. “ती अगदी सुखाने त्याच्याजवळ बसलेली आहे. जे गुपित तिला त्याला सांगायचं आहे त्यासाठी हवा असलेला एकांत आणि निवांतपणा दोन्हीही आहे आणि तिला काहीतरी सुखाचं, आनंदाचं आपल्याला सांगायचं आहे पण नक्की काय याचा अंदाज घेत उत्सुकतेने तोही तिच्याजवळ तितक्याच उत्कट प्रेमभावनेने आलेला आहे. ”

ती पण पटकन त्याला काही सांगत नाही. म्हणते, दान घेऊनी तव तेजाचे… “तुझ्या बीजाचं दान तू मला दिलंस ते फळलं आहे. आता माझी ओटी भरली आहे आणि माझ्या देहातल्या गर्भाशयाच्या अस्तित्वाचे, पर्यायाने माझ्या स्त्रीत्वाचे आता सार्थक झाले आहे. अरे! एक नवा पाहुणा येतोय बरं का आपल्या अंगणी आणि त्याच्या आगमनाने आपल्या घरात नवा प्रकाश उजळणार आहे. असा हा बाळकृष्ण माझ्या उदरात वाढत आहे. ”

संपूर्ण कडवं तसे रूपकात्मक आहे.

दान, तेज, ज्योत, बाळकृष्ण या सर्वच शब्दांवर भावनांचा सौंदर्य साजआहे. मिलनाच्या क्षणी स्त्री ही धारक असते आणि पुरुष हा दाता असतो म्हणून स्त्रीसाठी तिला त्याच्याकडून मिळालेलं शुक्रबीज हे जणू काही पवित्र दानासारखे असते. दान शब्दाची उत्प्रेक्षा खूपच भावनिक आणि सुंदर वाटते. शिवाय हे दान असंतसं नसून तेज:पुंज आहे. इथे तेज हा शब्दही खूप अर्थपूर्ण आहे. घेणे आणि देणे या प्रक्रियेत जेव्हा उदात्तता असते तेव्हा त्या दानाला एक वेगळंच तेज प्राप्त होतं आणि अशा तेजाचं दान मिळालेलं बीज अंकुरताना प्रकाशमय असणार याची खात्री असते.

बाळकृष्ण या शब्दात गोजिरेपण, लाडिकपण, सौंदर्य तर आहेच पण त्याचबरोबर एक सात्विकता, मंगल्य, पावित्र्य, देवरुपत्व आहे आणि प्रत्येक स्त्रीला जन्माला येणारं आपलं बाळ असं गुणसंपन्न असावं असं वाटत असतं.

 तो: प्रेम रज्जूचे धागे अपुले 

 ती :रेशीमगाठी बंध जाहले

 तो : गुंफिला गोफ नवा साजिरा

 ती: वसविला बाळकृष्ण गोजिरा।२।

किती प्रेमळ संवाद! या संवादात झुळझुळ निनादणारा सूर आहे. या ओळी वाचताना सहजच कवी बी यांच्या काव्यपंक्ती मनात गुणगुणल्या.

*हे विश्वाचे आंगण 

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण

शुद्ध रसपान करण्याच्या भावनेतून जणू काही त्याला ती गर्भवती झाल्याचे कळताच तो म्हणतो, “आपलं नातं प्रेमाच्या धाग्यात विणलं आहे”. त्यावर तीही म्हणते “आता मात्र आपल्या नात्याची वीण माझ्या उदरात वाढणाऱ्या गर्भामुळे अधिकच घट्ट होणार आहे. ”

त्यालाही तिचेही भाष्य मनोमन पटते आणि तोही त्यास दुजोरा देऊन सहज म्हणतो, ” खरोखरच आपल्या प्रेमाचं हे प्रतीक आहे. हा एकमेकात गुंफलेला सुंदरसा गोफच आहे. ”

गोफ हा शब्दही नात्यांच्या संदर्भात मला खूप आवडला. विणलेल्या गोफात धाग्यांचा सहज न सुटणारा पीळ असतो. तिच्या उदरातल्या बीजाशी त्याने दिलेल्या अंशाचा संयोग झाल्यामुळे त्यांचे नाते विणलेल्या गोफासारखे घट्ट झाले आहे.

कडव्यातला एक एक शब्द मोत्यासारखा पाणीदार आणि गोजिरवाणाही आहे. दोघांच्या नात्याला दिलेली “प्रेमरज्जुचे धागे” ही उपमा अगदी निखळ आहे. रेशीमगाठी बंध जाहले … देवाधर्माच्या साक्षीने प्रेमाची एक रेशीमगाठ बांधली तर जातेच पण या गाठीचा बंध तेव्हाच होतो जेव्हा दोघांच्या मिलनातून झालेल्या निर्मितीच्या क्षणाची अनुभूती मिळते. स्त्री —पुरुषांचं नातं, प्रीत आणि प्रणयाचं फलित या स्त्री जीवनातल्याच नव्हे तर सहजीवनातल्या किती महत्त्वाच्या पायऱ्या आहेत यावर डॉ. श्रोत्री अगदी सहजपणे भाष्य करून जातात.

 तो: मुकुंद अथवा आदिशक्ती 

ती: कलिका अपुल्या वेली वरती 

 माझ्या पोटी उमलू लागली

 वसविला बाळकृष्ण गोजिरा।३।

मातृत्वाची चाहूल लागताक्षणीच दोघांच्याही मनात तेव्हाच एक उत्सुकताही सहजपणे जागृत होते. मुलगा होणार की मुलगी?

या काव्यपंक्तीत उल्लेख असलेला “तो। मात्र अत्यंत समतोल, समंजस वृत्तीचा आहे अथवा विनाकारणच ताण देणारा किंवा घेणाराही नाही. त्याला गर्भधारणेच्या प्रक्रियेतील नैसर्गिकता पूर्णपणे ज्ञात आहे आणि त्या बाबतीत त्याची मनापासून स्वीकृती आहे म्हणून तो तिला म्हणतो,

मुकुंद अथवा आदिशक्ती या संज्ञा किती सुरेखपणे साधल्या आहेत! युगंधराचं तत्व घेऊन जन्माला येणारा मुलगा असो अथवा शक्तीचं साक्षात रूप घेऊन जन्माला येणारी मुलगी असो दोघांचे स्वागतच आहे. मुकुंद आणि आदिशक्ती या दोन्ही शब्दातून, जन्म घेणाऱ्या नवजाताचा अत्यंत सात्विकपणे आणि महात्म्य अधोरेखित करून गौरवच केलेला आहे आणि तीही त्याच्या विचारांना अनुमोदन देऊन स्वीकृत भावनेने म्हणते, “खरोखरच आपल्या संसार प्रीतीच्या वेलीवर उमलणारी ही कलिका आता माझ्या उदरात वाढत आहे आपण दोघेही तिचे स्वागत करूया. ?

असं हे अत्यंत गोजिरवाणं आणि भावनिक गीत ! छोटसं, साध्या शब्दातलं! उपमा उत्प्रेक्षांनी सजवलेलं प्रतीकात्मक रूपकात्मक असं गोड गोजिरंगाणं! या गाण्यांमध्ये जाणवतं ते नात्यातलं मांगल्य, साफल्याची भावना, सार्थकतेचा अनुभव आणि स्त्री जीवनाचा मातृत्वाशी जोडलेला एक अभंग भावनांचा बंध आणि या सर्वांशी एकरूप, समरस होऊ शकणारं कवीचं संवेदनशील मन!

या गीतात साधलेली तेजाचे/ ओटीचे घरा/ गोजिरा/ साजिरा/ अपुले/ जाहले आदिशक्ती/ वेलीवरती ही सहजयमके गीताला एक ताल आणि लय प्राप्त करून देतात*

डॉक्टर श्रोत्रींच्या काव्यातले एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे शब्दांचा अजिबात नसलेला फापटपसारा, नगण्य काठिण्य, अलंकारांचा अवजडपणा टाळून सहजपणे फुलणारा शब्दांचा साज! डॉ. श्रोत्री तुमच्या काव्यप्रतिभेला माझा मनापासून प्रणाम!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #256 ☆ अधर्म… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 256 ?

☆ अधर्म ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दुष्काळाच्या झळा पाहुनी पाझर होऊ

हसवायाचे व्रत घेऊनी जोकर होऊ

*

धर्म आपला माणुसकीचा एकच आहे

सांग कशाला हवी दुष्मनी मैतर होऊ

*

कसा पहावा अधर्म येथे या डोळ्यांनी

तिसरा डोळा उघडू आणिक शेखर होऊ

*

पिझ्झा बर्गर नको व्हायला आता आपण

गरिबाघरची कायम आता भाकर होऊ

*

रस्त्यावरती पोर कुणाचे उघड्यावरती

थंडी आहे त्याच्यासाठी लोकर होऊ

*

माझ्यासाठी कायम झाला बाप फाटका

त्याच्यासाठी आता कोरे धोतर होऊ

*

पोट मारुनी पैसा पैसा जोडत गेला

त्याच्यासाठी भक्कम आपण लॉकर होऊ

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऑर्डर, ऑर्डर… ऑर्डर…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ ऑर्डर, ऑर्डर… ऑर्डर…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

अनेक ऑर्डर ऐकतच 

आपण होतो मोठे,

होती ज्याचे जन्मभर 

फायदे आणि तोटे ! 

*

खडी ऑर्डर बाबांची

ऐकू येता आपल्याला,

मूड नसतांना देखील 

बसतो मग अभ्यासाला ! 

*

“आऊट” ऑर्डर कॉलेजला

आपण घेत नाही मनावर,

फायनलला करून अभ्यास 

पास जेमतेम काठावर ! 

*

“अहो ~~” ची गोड ऑर्डर 

मिळे लग्नानंतर ऐकायला,

होता लग्नाला दहा वर्ष 

माधुर्य तिचे जाई लयाला ! 

*

चांगल्या वाईट ऑर्डरींना 

जातो नोकरीत सामोरे,

रीटायरमेंट पर्यंत मग 

विसरून जातो ते सारे ! 

*

आणि….

*

वरची शेवटची ऑर्डर,

येत नाही कधी सांगून,

मनी “त्याच्या” आले की 

तोच जातो वर घेऊन !

तोच जातो वर घेऊन !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदकंद… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदकंद… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

गालात हासते अन स्वप्नात रंगते मी

डोळ्यात पाहतांना नात्यात गुंतते मी

*

तो मंद गार वारा स्पर्शून खास गेला

कुठल्यातरी स्मृतींना जागून लाजते मी

*

घाटात वाट जाते ही दूर दूर कोठे

माझ्याच आठवांशी बंदिस्त राहते मी 

*

त्या धुंद सागराच्या भेटीत खूष धरणी

लाटेत चिंब ओली बेधुंद नाचते मी

*

या भूतलावरी हा आनंदकंद माझा

येथेच स्वर्ग आहे आनंद शोधते मी

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पितृपक्ष…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पितृपक्ष…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

हिंदू धर्म सांगे | पितरांचे ध्यान |

भोजनाचे पान | पितृपक्ष ||१||

*

सात्विक विचार ! चालवती श्राद्ध |

मुक्तीचे प्रारब्ध ! पूर्वजांचे ||२||

*

पूर्वपार त्यांनी | जपली संस्कृती |

जीवन स्विकृती | संस्कारांची ||३||

*

काकस्पर्शसाठी | कावकाव साद |

दयावे आशिर्वाद | वारसांना ||४||

*

पंधरवाड्यात | चाले दानधर्म |

दातृवाचे कर्म | स्मरणाने ||५||

*

चौऱ्याऐंशी लक्ष | योनींचे भ्रमण |

जन्मलो आपण | मुक्तीसाठी ||६||

*

हिंदूनी जपावी | संस्कृती महान !

पितरांचे भान | कृतज्ञता ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुन्हा-पुन्हा स्वप्न.. ! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पुन्हा-पुन्हा स्वप्न.. ! ☆ श्रीशैल चौगुले ☆

हिरव्या तलवारीवर

 सोनेरी रुदनाचे ज्योती

वार किरणांचा भारी

धारदार डोलती पाती

*

सप्तरंगी नभात युध्द

क्षितीजा हरवणे जिद्द

उन पावसाचा हा खेळ

झर्या-नाल्यांची पार हद्द

*

खळखळ मंजुळ साद

प्रेमगप्पा पाखर पंखा

फडफड भिजरे अंग

टपटप धारांचा डंका

*

श्रावण चाहुल काळजा

चोहिकडेही गजबजा

सारे रान, माळ हसरे

दुर डोंगरी ऋतू साजा.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 190 ☆ प्रेम… प्रेमकाव्य… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 190 ? 

☆ प्रेम… प्रेमकाव्य… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अष्टाक्षरी…)

प्रेम… प्रेमकाव्य…

प्रेम काय असतं…

 

प्रेम एक, अडीच अक्षराचं पत्र

प्रेम एक, मंत्रमुग्ध करणार स्तोत्र

प्रेम म्हणजे, आकर्षण

प्रेम म्हणजे, समर्पण.!!

 *

प्रेम एक, निर्मळ सरिता

प्रेम एक,  मुक्त कविता.!!

 *

नकोत प्रेमात वासना

असाव्या फक्त संवेदना.!!

 *

नुसते शरीराचे, आकर्षण नसावे

प्रेमाने प्रेमाला, हस्तगत करावे.!!

 *

विचार करावा, कोमल मनाचा

प्रेमात राहून, मन जिंकण्याचा.!!

 *

नकोत नुसते, गलिच्छ इशारे

प्रेमासाठी मन, शुद्ध ठेवा रे.!!

 *

गंध असल्यावर

फुले हातात असतात

गंध संपल्यावर

फुले कचऱ्यात सापडतात.!!

 *

प्रेमाचे सूत्र

मुळीच असे नसते

असे असेल तर

प्रेम लगेच संपते.!!

 *

वासनांध प्रेमाला

हवस म्हणतात

त्यात मग कुठे

बलात्कार होतात.!!

 *

म्हणून सांगतो

प्रेम अपराध नसतो

निर्मळ प्रेम

मनाचे मन जोपासतो.!!

मात्र प्रेमात पडून, वेळ निभावणे

गरज संपली की, साथ सोडणे.!!

 *

हा मात्र अक्षम्य, गुन्हा ठरतो

एखाद्याचा मृत्यू, हकनाक होतो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कोण मी ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कोण मी ? ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

कोण मी काय आहे

माझे मलाच कळू दे

प्रत्येक नावाआधी

जाणून स्वतः ला थोडे घे…

*

जग हे सुंदर, जीवन सुंदर

नात्यांमुळेच अर्थ जगण्याला

प्रत्येक नात्यात सिद्ध करताना

का होई जीव मग अर्धा अर्धा…..

*

लेक, पत्नी, सून, आई

बहिण, भावजय, मैत्रीण

कोणासाठी कोणीतरी तू झाली

स्वतः ला मात्र विसरून गेली….

*

सगळ्यांची आवडती होता होता

सतत बदलत तू गेली

खरी तुझी तुला सांगा आता

ओळख काय मागे उरली…. ?

*

सतत होताना परफेक्ट

झाला तुझ्यावरच इफेक्ट

करता करता सारं एक्सेप्ट

स्वतःला मात्र करत गेलीस रिजेक्ट…

*

नातं स्वतः शी असतं पहीलं

त्याला तोडून चालत नसतं

रोजच्या घाई गडबडीतही

स्वतः साठी काही क्षण जगायचं असतं…

*

रहा नक्कीच जगासोबत

जगून घे प्रत्येक नात्यासोबत

पण साथ स्वतःची सोडू नको

हरवून स्वतःलाच जगू तू नको…

*

जगात कुठेच मिळणार नाही

सुख समाधान शांती

तुझ्यातच आहे दडलेलं सारंकाही

त्यासाठीच बघ जोडून नातं स्वतःशी…

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कळीचं झालं फूल… कवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

कळीचं झालं फूलकवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एक दिवस लेकीला आई हळूच बोले

रांधा, वाढा, उष्टी काढा.. दुसरे मी काय केले ?

*

लेक म्हणे हसून, श्लोक, ओव्या, सुरेल गाणी

तूच ना आम्हा ऐकवलेस

स्वच्छ वाणी, सुरेल शब्द

भांडार तूच खुले केलेस 

*

तुझा स्वयंपाक बघून बघून

मलाही लागली गोडी

तुझ्यातली अन्रपूर्णा

माझ्यातही आली थोडी

*

संस्कारवर्गात नाही आई

जावे लागले आम्हाला

कसे वागावे, कसे बोलावे

ठेवा तुझाच सर्वांना

*

नव्हते यू ट्यूब, नव्हते गुगल

तरी काहीच अडले नाही

तुझ्यासोबत बोलताना

गोष्टी कधीच संपल्या नाहीत

*

सण, सोहळे, लग्नकार्य

तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट

जमाखर्च, देणीघेणी

तूच शिकवलीस अॅडजेसमेंट

*

आमच्या छोट्या दुखण्यांसाठी

डाॅक्टर आमचा तूच होशी

ओवा, हळद, शेवपा, हरडा

आजही असते माझ्यापाशी

*

तुझी रांगोळी, तुझे भरतकाम

कलात्मकता शिकवून गेली

माहित नाही कशी केव्हा

सुंदरता या जीवनी आली

*

पै पाहुण्यात वाढलो म्हणून

कंटाळा आजही येत नाही

माणसं जोडण्याची कला

जणू जगण्याचाच भाग होई

*

तरीही आई आता म्हणतेस

आयुष्यात मी काय केले

तुझ्याशिवाय का गं आई

माझ्यातल्या कळीचे फूल झाले? 

कवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे

चिकूवाडी, बोरीवली

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares