मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “कात्यायन शुल्बसूत्रे” –  भाषांतरकार: श्री दा खाडीलकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कात्यायन शुल्बसूत्रे” –  भाषांतरकार: श्री दा खाडीलकर ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक : कात्यायन शुल्ब सूत्रे

भाषांतरकार: श्री दा खाडीलकर 

प्रकाशक: साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य 

प्रकाशन साल: 1974 

या पुस्तकातील महत्वाच्या मजकुराचा सारांश … 

शुल्बसूत्रे हा वैदिक सूत्र वाङ्मयाचा एक भाग आहे. या सूत्रांचा उपयोग यज्ञामध्ये लागणाऱ्या, निरनिराळ्या आकारांचे मांडव, वेदी व चिती तयार करताना होत होता. त्यांच्या आकारासंबंधाने माहिती संहिता सूत्र ग्रंथांतून दिलेली आहे. मांडव, वेदी व चिती तयार करताना भूमितीचा उपयोग करावा लागतो. हे भूमितीचे नियम शुल्बसूत्रांत एकत्रित केलेले आढळतात.

बौधायन, आपस्तंब व कात्यायन यांनी स्वतंत्रपणे, त्या त्या विषयाला लागणारे सर्व भूमितीचे नियम एके ठिकाणी शुल्बसूत्राच्या पहिल्या प्रकरणात दिले आहेत. बौधायन व आपस्तंव यांनी या नियमांचा उपयोग करून निर-निराळया चितींचे आकार स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कात्यायनांनी मात्र आपल्या शल्बसूत्रांत भूमितीचे नियमच फक्त सांगितले आहेत. अशी एकंदर आठ शुल्बसूत्रे उपलब्ध आहेत. त्यांची नावे अशी:-

(१) बौधायन, (२) आपस्तंव, (३) मानव, (४) मैत्रायणीय, (५) वराह, (६) सत्याषाढ व (७) वादुल. ही सर्व सूत्रे कृष्ण यजुर्वेदाच्या उपशाखांची आहेत. याशिवाय (८) कात्यायन शुल्बसूत्र उपलब्ध असून ते शुक्लयजुर्वेद शाखेचे आहे. वरील ८ शुल्बसूत्रांत बौधायन, आपस्तंव, मानव आणि कात्यायन ही अगदी स्वतंत्र आहेत.

दुसऱ्या अध्यायातील ११ व्या सूत्रामध्ये आयताच्या कर्णावरील सिद्धांत (पायथंगोरस सिद्धांत) आला आहे. (या सर्व सूत्रांचा काय इ स पूर्व ८०० आहे. याचा अर्थ पायथागोरसच्या जन्माच्या आधीच कात्यायन शुल्बसूत्रामध्ये हा सिद्धांत मांडले गेला होता.) तसेच वर्तुळाच्या क्षेत्रफळाएवढा चौरस आणि चौरसाच्या क्षेत्रफळाएवढे वर्तुळ काढणे, याची सिद्धता दिलेली आहे. १२ वे सूत्र चौरसावरील कर्णाच्या सिद्धांताचे वर्णन करते. तर १३ व्या सूत्रात वर्गमूळ २ ची किमत सांगितली आहे.

यावरून आपल्या हे लक्षात येते की, वैदिक हिंदूंना, त्रिकोण, समांतरभुज चौकोन, आयत, वर्तुळ, इत्यादी आकृत्यांच्या क्षेत्रमापनाची उत्तम माहिती होती. त्यांना वर्तुळाचा परिघ व त्याचा व्यास यांचे गुणोत्तर अचल असल्याचे माहीत होते. त्या गुणोत्तराची किंमतही त्यांनी काढली होती… म्हणजेच π ची किंमत काढली होती. (π = ३. १६०४) त्यानंतर सहाव्या शतकातील आर्यभटांनी π = ३. १४१६ अशी काढली होती. ती आजच्या π च्या किमतीशी जुळणारी आहे.

त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे ग्रीक लोकांना माहीत नसलेल्या अशा अगदी स्वतंत्र रीतींनी काढली असल्याचा निश्चित पुरावा उपलब्ध आहे. भारतीय गणितज्ञांनी उपयोगात आणलेली अत्यंत प्रभावी रीत, जिचा उपयोग क्षेत्रमापनात केलेला आढळतो ती रीत म्हणजे “क्षेत्रफल अगर घनफल यांच्यात, कोठल्याही तन्हेने बदल न होता आकृतीत आमूलाग्र बदल करणे. ” एखादी प्रतल किंवा घन आकृती घेऊन, त्या आकृतीचे अपरिमित भाग पाडून त्या सर्व भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज अथवा घनांची बेरीज करण्याचे व त्यावरून त्या प्रतल अथवा घन आकृतीचे क्षेत्रफळ अथवा घनता ते ठरवीत असत. ही बेरीज ते अपरिमित श्रेणीने काढीत असत.

अंकगणित व बीजगणित यांचा पाया भारतात घातला गेला हे सर्वांना माहीत आहे. तसेच भूमितीचा पाया पण भारतात घातला गेला ही गोष्ट शुल्ब-सूत्रांच्या वाचनाने मनाला तंतोतंत पटते. पण हे सर्व वैदिक वाङमय उजेडात आणण्याचा मान पाश्चात्यांनाच द्यावा लागतो. इंग्रज येईपर्यंत आपल्याकडचे हे ज्ञान धुळ खातच पडले होते असे खेदाने म्हणायला लागतेय. आणि आता आपण त्या ज्ञानात भर घालण्याच्या ऐवजी आपल्या पूर्वजांचा पोकळ डमरू वाजवण्यातच आत्ममग्न झालेलो आहोत.

(सूचना: इमेजमधील गणिती मजकूर वाचण्यासाठी इमेज डाऊनलोड करून झूम करून वाचावे.)

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “लिहिते मी…” – (आत्मकथन) – लेखिका : डॉ. जयश्री फिरोदिया ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “लिहिते मी…” – (आत्मकथन) – लेखिका : डॉ. जयश्री फिरोदिया ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : लिहिते मी… (आत्मकथन)

लेखिका : डॉक्टर सौ. जयश्री फिरोदिया.

पृष्ठे:१४४

नुकतेच प्रकाशित झालेले डॉक्टर जयश्री फिरोदिया पुणे. यांचे लिहिते मी हे आत्मवृत्त वाचले आणि त्यांच्या संपूर्ण रसभरीत, चैतन्यमय, प्रेरणादायी जीवन पटाने मी अत्यंत प्रभावित झाले.

वास्तविक मूळचे नगरचे आणि पुणे येथे स्थायिक झालेले उद्योजक फिरोदिया कुटुंब हे ख्यातनामच आहे आणि डॉक्टर अरुण फिरोदिया या नामांकित उद्योजकाची पत्नी जयश्री फिरोदिया आणि त्यांनी लिहिलेले हे आत्मवृत्त.

सुरुवातीला हे पुस्तक वाचायला घेताना मनात बरेच गृहीत असे विचार होतेच. म्हणजे एका सुखी गर्भश्रीमंत महिलेची ही एक आनंदयात्रा असणार पण जसजसे मी ते पुस्तक वाचत गेले तसतशी लेखिकेच्या या लेखनातून एक अत्यंत साधी, मध्यमवर्गीय कुटुंबातील, बाळबोध संस्कृतीत वाढलेली, नीतिमूल्य जपणारी, अभिरुची संपन्न अशी अत्यंत तेज बुद्धीची, सामाजिक बांधिलकी असणारी, दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी सहजपणे समरस होणारी, स्वतःचे वैद्यकीय ज्ञान समाज स्वास्थ्यासाठी समर्पित करणारी आणि प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी म्हणून त्यांच्याही विश्वव्यापी कारभारात समंजसपणे सहभागी होणारी एक अत्यंत आदर्श व्यक्ती उलगडत जाते.

डॉक्टर जयश्री फिरोदिया यांनी त्यांचं हे आत्मवृत्त २४ भागात लिहिले आहे.

प्रीतीची अनमोल भेट म्हणून पतीकडून मिळालेल्या अनोख्या भेटीने त्या भारावून जातात. महाबळेश्वर येथे डॉक्टर जयश्री फिरोदिया पॉईंट स्थापित होतो आणि अशी ही निसर्गरम्य भेट स्वीकारताना त्या किती भावनावश होतात हे सांगत त्या त्यांच्या आत्मवृत्ताची सुरुवात करतात. पहिल्याच प्रकरणात एका सुरेख सहजीवनाची ओळख होते.

ठाण्याच्या जयश्री पाठक या मध्यमवर्गीय ब्राह्मण कन्येचा जैन राजस्थानी अरुण फिरोदियाशी झालेल्या प्रेमविवाहाची आणि त्यांच्या असाधारण सुरेख, प्रेममय, विश्वासपूर्ण सहजीवनाची ही कहाणी वाचताना मन अगदी रमून जाते.

जब वी मेट या प्रकरणात लेखिकेने फार हळुवारपणे त्यांचं हे प्रीतीचं गुपित उलगडलेलं आहे. चुपके चुपके प्रेम करण्याचा तो काळ होता. प्रेमिकांच्या मनात बुजुर्गांविषयी भय त्यावेळी असायचं. प्रेम व्यक्त करण्याची माध्यमे त्यावेळी प्रभावी नव्हती. अशा काळातलं त्यांचं जवळजवळ पाच-सहा वर्षाचं डेटिंग वाचताना वाचकाच्या मनावर हळुवार मोरपीस फिरत रहातं पण तरीही वाचताना जाणवतात ती दोघांचीही सुसंस्कारी मने. उमलत्या वयातल्या प्रेम पण उतावळेपणा नव्हता. गांभीर्याने, कर्तव्य बुद्धीने केलेला एक विचार होता, एक निर्णय होता आणि म्हणूनच त्यांचं हे साठ वर्षांचं सहजीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी झालं.

लिहिता लिहिता जयश्रीताई जागोजाग पुढच्या पिढीसाठी संदेश देत राहतात आणि ते अनमोल आहेत.

सरस्वती आणि लक्ष्मी यांचा सुरेख संगम जयश्री आणि अरुण यांच्या बहारदार सहजीवनात आढळून येतो. फिरोदिया परिवार म्हणजे पिढीजात गांधीवादी, देशप्रेमी, स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगलेला, समाजाभिमुख कार्य करणारा. या पार्श्वभूमीचा परिणाम अथवा संस्कार जयश्रीच्या जीवनावर होतोच आणि मुळातच नीती मूल्य वैचारिक तत्वं बाळगणाऱ्या जयश्रीच्याही जीवनाला एक समाजदर्शी दिशा मिळत जाते आणि त्याचा संपूर्ण वृत्तांत या पुस्तकात त्यांनी अत्यंत अभिमानाने पण सहजतेने आणि प्रामाणिकपणे मांडला आहे.

एक स्त्री ही चौफेर अंगाने किती आदर्शवत असू शकते याचा सुरेख वस्तुपाठ म्हणजेच हे पुस्तक, लिहिते मी. 

या पुस्तकात बोर्डात पहिली येणारी शालेय विद्यार्थिनी आहे, एक प्रेयसी आहे, लग्नानंतर जात- धर्म- संस्कृती रिती -भाती यांची तात्विक बैठक जाणणारी पालनकर्ती आहे. सासर, माहेरची सर्व नाती आयुष्यभर जपणारी एक कौटुंबिक गृहिणी आहे. चारही मुलांचं जातीने संगोपन करणारी, त्यांच्यात सद्गुणांचं भरणपोषण करणारी एक आई आहे, जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्ण जगभर प्रवास करणारी एक प्रवासिनी आहे, एक मनमिळाऊ मैत्रीण आहे, या सर्वांवर कडी म्हणजे एक उत्तम सामाजिक जाण ठेवून कार्यरत असणारी कर्तव्यनिष्ठ डॉक्टर आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनस्वीपणे छंद जोपासणारी चित्रकार, गायिका, नृत्यांगनाही आहे. लिहिते मी या पुस्तकात दिसते ती अशी सहस्त्ररश्मी, तेज:पुंज, निर्मळ, प्रेमळ आणि तितकीच करारी स्त्री. यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. म्हणून मला हे पुस्तक फार आवडले. ही एका गर्भश्रीमंत, ब्रॅण्डेड गाडीतून फिरणाऱ्या, महालासदृश घरात आरामात राहणाऱ्या, नवऱ्याच्या पैशावर केवळ मौजमजा करणाऱ्या, त्याच्या नावाच्या वलयात जगणाऱ्या, जगभर सुखैनेव प्रवास करणाऱ्या, निव्वळ आरामात आयुष्य व्यतीत करणाऱ्या स्त्रीची मनोरंजनात्मक कहाणी नसून ही एका कर्तव्य कठोर, स्वतःच अस्तित्व जपणाऱ्या, समाजासाठी, देशासाठी, रंजल्या गांजल्यांसाठी, पीडित -पतितांसाठी तसेच गुणपारखी, इतरांच्या कलागुणांना मनापासून दाद आणि स्फूर्ती देणाऱ्या सक्षम, सकारात्मक, स्फूर्तीदायी स्त्रीची ही कथा आहे. यात डॉं जयश्री फिरोदिया पाॅईंट महाबळेश्वर ते डॉ. जयश्री फिरोदिया फीटल मेडीसीन सेंटर दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल पुणे पर्यंतचा लक्षवेधी जीवनप्रवास आहे.

हे संपूर्ण पुस्तक जितकं शब्दमय आहे तितकंच चित्रमय आहे. वाचताना आणि पाहताना लेखिकेची कलात्मकता, निसर्गप्रेम, रसिकता पावलोपावली जाणवते. या पुस्तकात एक हळूच लपलेली जीवनविषयीची काव्यात्मकताही जाणवते. सदैव मशिनरीच्या रुक्ष वातावरणात अरुण फिरोदिया नावाचा एक हळुवार संवेदनशील कवी यात अनुभवायला मिळतो.

या वाचनीय पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातला साधेपणा, शब्दातला प्रामाणिकपणा. कसलाही बडेजाव, बढाईसदृश अविर्भाव नाही. आपण सारे एक ही भावना देणारे हे पुस्तक आहे. पुस्तकचा समारोप करताना डॉ. जयश्री फिरोदिया सहजपणे, विश्वात घडणाऱ्या मानवी संहाराविषयी सखेद भाष्य करतात. ढळणार्‍या मानवतावादाविषयी त्या चिंता व्यक्त करतात आणि याही पार्श्वभूमीवर आपला भारत देश सुजलाम सुफलाम आणि निरामय, शांततापूर्ण, समृद्ध, विकसित देश असावा अशी मनोकामना व्यक्त करतात.

डॉक्टर जब्बार पटेल यांची सुरेख प्रस्तावना लाभलेलं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. डॉ. जब्बार पटेल म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच ही एक परीकथा आहे.

आणि जाता जाता एक.. लिहिते मी या पुस्तकाद्वारे वाचकांनीही लिहिण्याची प्रेरणा घ्यावी.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 179 ☆ साहित्य की गुमटी” – व्यंग्यकार… श्री धर्मपाल महेंद्र जैन ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हमप्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है आपके द्वारा श्री धर्मपाल महेंद्र जैन जी द्वारा लिखित  साहित्य की गुमटीपर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 179 ☆

☆ “साहित्य की गुमटी” – व्यंग्यकार… श्री धर्मपाल महेंद्र जैन ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

पुस्तक चर्चा

पुस्तक : साहित्य की गुमटी

लेखक: धर्मपाल महेंद्र जैन

प्रकाशक.. शिवना प्रकाशन, सीहोर

पृष्ठ 158, मूल्य 275 रु

चर्चा: विवेक रंजन श्रीवास्तव, भोपाल

धर्मपाल महेंद्र जैन का व्यंग्य-संग्रह साहित्य की गुमटी, समकालीन भारतीय समाज, सत्ता, भाषा और डिजिटल संस्कृति पर तीखी किन्तु सुसंस्कृत टिप्पणी करता है। इसे पढ़ते हुए विनोद के साथ-साथ चित्त में चुभन का भी अनुभव होता है। धर्मपाल जी के  व्यंग्य की सार्थकता हँसाते हुए सोचने को विवश करना कही जा सकती है।

यह किताब 48 व्यंग्य रचनाओं का ऐसा संकलन है जहाँ हर रचना एक नए सामाजिक विषय पर यथार्थ के दरवाजे खोलती है। इन व्यंग्य लेखों को पढ़कर कहा जा सकता है कि वे रहते भले ही कैनेडा में हैं पर वे भारतीय समाज से मुकम्मल तौर पर जुड़े हुए हैं।

‘ज़हर के सौदागर’ से लेकर ‘रेवड़ी बाँटने वाले मालामाल’ तक लेखक ने जिस पैनेपन से समाज की नब्ज़ पर उंगली रखी है, वह उन्हें एक सफल व्यंग्यकार के रूप में स्थापित करती है।

व्यंग्य के विषयवस्तु की विविधता परिलक्षित होती है। व्यंग्य का तेवर प्रत्येक रचना में बरकरार रखा गया है।

‘ज़हर के सौदागर’ जैसी शुरुआती रचना से ही लेखक पाठक को अपने तीखे हास्य और प्रतीकात्मकता के भँवर में खींच लेता है। ‘ज़हर’ यहाँ केवल रसायन नहीं बल्कि वह मानसिक, सांस्कृतिक, भाषाई, राजनीतिक विष है जो धीरे-धीरे हमारी चेतना को ग्रस रहा है। लेखक न केवल ज़हर बेचने वाले की दुकान को केन्द्र में रखकर पूँजीवाद, अपराध, अफसरशाही और समाज के विकृत होते मूल्यों पर वार करता है बल्कि उन संरचनाओं की भी आलोचना करता है जहाँ “पिछवाड़े से धंधा” करने को शिष्टाचार समझा जाने लगा है।

‘किनारे का ताड़ वृक्ष’ एक प्रतीकात्मक रचना है, जहाँ सत्ता में बढ़ती महत्वाकांक्षाएं, विरासत को छोड़कर आत्म-महत्व के शिखर की ओर भागती जटाएँ एक विडंबनात्मक यथार्थ रचती हैं। वटवृक्ष और ताड़ वृक्ष का यह बिंब भारतीय राजनीति और साहित्यिक जगत की एक यथार्थ कथा बन जाता है।

डिजिटल समाज नया युग बोध है। ‘वाट्सऐप नहीं, भाट्सऐप’ में सोशल मीडिया पर साहित्यिक व्यक्तित्वों की ऊलजलूल प्रशंसा की झड़ी, समूहों की राजनीति और आत्ममुग्धता पर कटाक्ष है। लेखक जिस प्रकार से “भाटगिरी” शब्द का प्रयोग करता है, वह आज के डिजिटली सक्रिय साहित्यिक समाज पर तीखा व्यंग्य है । यह रचना हमारे आज के ‘वर्चुअल’ समाज की एक मज़बूत विडंबना है, जहाँ प्रशंसा अब ‘पारस्परिक लेन-देन’ का व्यापार बन चुकी है। सत्ता और व्यवस्था पर तीखा वार करता उनका व्यंग्य ‘बम्पर घोषणाओं के ज़माने में’ है। राजनीतिक पाखंड, खोखली योजनाओं और “बिना पैरों वाली घोषणाओं” का ऐसा विस्फोट किया गया है कि पाठक मुस्कराते हुए देश की विकास यात्रा पर सोचने को मजबूर हो जाता है। सत्ता द्वारा की जाने वाली घोषणाएँ किस तरह प्रचार का साधन बनती जा रही हैं, इसका वर्णन जितना मनोरंजक है, उतना ही मर्मांतक भी।

‘तानाशाह का मकबरा’ एक और रचना है जो सत्ता के जाने के बाद की उपेक्षा, विस्मरण और जनता के बदलते सरोकारों पर टिप्पणी करती है। यह व्यंग्य केवल किसी मृत शासक का पोस्टमॉर्टम नहीं करता बल्कि यह दर्शाता है कि स्मृति को कैसे राजनीतिक और प्रशासनिक उदासीनता ने धूमिल कर दिया है।

भक्ति और प्रसिद्धि का गठजोड़ आज की विसंगति है।

‘आज के भक्तिकाल में’ और ‘लाइक बटोरो और कमाओ’ जैसे व्यंग्य आज के ‘डिजिटल भक्ति आंदोलन’ पर गहरी चोट करते हैं। एक ओर लेखक यह दिखाते हैं कि कैसे “प्रसिद्धि प्रसाद” जैसा पात्र साहित्य की विधाओं को छोड़ सरकारी कविता की भक्ति में लग जाता है, वहीं दूसरी ओर फेसबुक पर ‘लाइक्स’ की दौड़ में लगे ‘प्रसिद्धि प्रसाद’ की छवि डिजिटल भिक्षुक की हो जाती है।

धर्मपाल महेंद्र जैन की विशेषता उनकी भाषा है। वे संस्कारों से बँधे लेकिन समकालीन मुहावरे में ढले हुए शब्दों से रचना को सजाते हैं। उनकी भाषा का व्यंग्य न केवल चुभता है बल्कि भीतर तक व्याप्त होता है। उनका शिल्प परिष्कृत है, वाक्य गठन में कसावट है, और हास्य में अर्थ की बहुलता है।

‘राजा और मेधावी कंप्यूटर’ जैसी रचना में तकनीक के युग में सत्ता की मानसिकता पर शानदार व्यंग्य है। कंप्यूटर की ‘बुद्धिमत्ता’ और राजा की ‘मूर्खता’ का तालमेल एक उत्कृष्ट विडंबना का उदाहरण है।

‘भाषा के हाईवे पर गड्ढे ही गड्ढे’ लेखक की  आत्मालोचनात्मक रचनाओं में से एक है। यह समकालीन आलोचना-पद्धति पर गहरा कटाक्ष करती है। ‘मित्रगण’ और ‘अमित्रगण’ के बीच की विभाजन रेखा और आलोचना को रचना की बजाय लेखक के चरित्र पर केंद्रित करना—यह सब कुछ ऐसा सच है जिसे हम जानते तो हैं, पर कहने का साहस धर्मपाल जी जैसा व्यंग्यकार ही जुटा पाता है।

‘साहित्य की गुमटी’ समकालीन व्यवस्था की सामाजिक, राजनीतिक, सांस्कृतिक और भाषाई तस्वीर को व्यंग्य की नजर से रेखांकित करने वाला दर्पण है। इसमें ‘ईडी है तो प्रजातंत्र स्थिर है’, ‘विदेश में परसाई से दो टूक’, ‘सबसे बड़ा प्रोफेसर, हिंदी का’ जैसी रचनाएँ न केवल वर्तमान की समस्याओं को उभारती हैं बल्कि पाठक को भाषा, व्यवस्था और साहित्य पर सोचने को प्रेरित करती हैं।

लेखक ने व्यंग्य को गुदगुदी का माध्यम नहीं, झकझोरने का औज़ार बना कर प्रस्तुत किया है। यह संग्रह बताता है कि व्यंग्य केवल हास्य नहीं है, यह अपने समय की तीव्र प्रतिक्रिया है, और धर्मपाल महेंद्र जैन इसके सजग व्याख्या कर्ता हैं।

जो पाठक व्यंग्य को केवल मनोरंजन नहीं, सृजनात्मक प्रतिरोध मानते हैं, उनके लिए यह किताब महत्वपूर्ण संग्रह है।

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दुर्वाची जुडी” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “दुर्वाची जुडी” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक –  दुर्वांची जुडी  

लेखिका- सौ राधिका भांडारकर

प्रकाशक – अमित प्रकाशन, पुणे

प्रथम आवृत्ती- दि. 10 मार्च 2025

मुखपृष्ठ- समृद्धी क्रिएशन

मूल्य-₹ 360/-

दुर्वांची जुडी या सौ. राधिका भांडारकर यांच्या सहाव्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा

नुकताच सावरकर सभागृह पुणे, येथे शुभंकरोती साहित्य परिवार या समूहाच्या तिसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात दि ६ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला. त्यांचे गमभन, लव्हाळी हे ललित लेख संग्रह, जीजी आणि अळवावरचे पाणी ही चरित्रे, तसेच गारवा हा काव्यसंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्या एक सिद्ध हस्त लेखिका आहेतच, पण त्यांचा मूळ पिंड कथालेखिकेचाच आहे असे मला नेहमी वाटते. राधिकाताईंची प्रत्येक कथा मी वाचलेली आहे आणि वाचताना त्या कथेत अगदी हरवून गेलेली आहे.

सौ. राधिका भांडारकर

राधिकाताई आता अनुभव संपन्न अशा ज्येष्ठ लेखिका आहेत. त्यांची कोणतीही कथा वाचताना त्या कथेत वावरणारी पात्रे ही कुठेतरी आपणही पाहिली आहेत, ती आपल्या जवळचीच आहेत असे सतत वाटत राहते. त्यामुळेच ती कथा घडत असताना आपण ती पहात असतो.

दुर्वांची जुडी या कथासंग्रहात एकूण २० कथा आहेत. प्रत्येक कथा वेगळी. त्यातील पात्रे, परिस्थिती, भोवतालचे वातावरण पूर्ण वेगळे. लेखिकेचे समाजाचे निरीक्षण किती बारीक आहे, समाजात वावरत असताना त्या तितक्याच संवेदनाशील आहेत याची आपल्याला वेळोवेळी जाणीव होते.

अ, ब, क ही या संग्रहातील पहिलीच कथा. याच्या शीर्षकातच राधिका ताईंची कल्पनाशक्ती दिसून येते. वाचण्यापूर्वी वाचक कदाचित असा विचार करील की, शाळेतील मुलांचा गणिताचा, मुख्यत्वे करून बीजगणित किंवा भूमिती या विषयाच्या अभ्यासावरील ही कथा असेल का? वाचताक्षणीच मात्र लक्षात येते की ही प्रेम कथा आहे. अ ब क या तीन माणसांची ही प्रेम कहाणी! अ आणि ब ची लहानपणापासूनची मैत्री, पुढे त्याचे प्रेमात रूपांतर. अने मात्र तिचे प्रेम कधी व्यक्त केले नाही, आणि पुढे आई-वडिलांच्या सांगण्यावरून कशी अ विवाबद्ध झाली. अगदी साधी कथा. कितीतरी अशी जोडपी समाजात सापडतील. लेखिकेने तिच्या साध्या, सरळ, सोप्या भाषेत अत्यंत सहजपणे अ ब क चे व्यक्तीचित्रण रंगवून हा प्रेमाचा त्रिकोण उलगडला आहे.

अ क शी अगदी प्रामाणिक राहून संसार करत होती हे सांगताना लेखिका लिहिते, ” धर्म, संस्कृती, निष्ठा, कर्तव्य नीति या सर्व घटकांची तिची प्रामाणिक बांधिलकी होतीच, आणि तिने ती काटेकोरपणे पाळली. ” या चारच ओळीत संपूर्ण अ आपण पाहतो.

‘क्षण आला भाग्याचा’ या कथेत राधिकाताईंनी त्यांच्या आजीचे व्यक्तीचित्रण, अल्पचरित्रच वाचकांना वाचावयास दिले आहे, परंतु ते कथा स्वरूपात सांगताना एका वेगळ्या पार्श्वभूमीवर सांगितले आहे. अंजोर नावाची एक लेखिका, तिच्या “क्षण आला भाग्याचा” या कादंबरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून दूरदर्शनवर तिची मुलाखत नियोजिली आहे आणि त्या मुलाखतीतून तिच्या आजीचे जीवन ती प्रेक्षकांना सांगते आहे. टीव्हीवर अशा प्रकारच्या मुलाखती नेहमी होत असतात ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राधिका ताईंनी ही कथा अशा प्रकारे वाचकांना सादर केली आहे.

“कांदे पोहे” ही या संग्रहातील आणखी एक कथा- दोन पिढीतील अंतर हा तर अगदी नेहमीचाच प्रश्न आहे. मुलगी उपवर झाली की घरोघरी कांदेपोह्यांचा कार्यक्रम होत असतो, पण आई-वडिलांसाठी मुली त्या कार्यक्रमात सहभागी होतात. याच विषयावरची ही कथा.

ऋता या कथेची नायिका. अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर. एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी, करिअरला महत्त्व देणारी. आजच कांदेपोह्यांचा कार्यक्रम आणि ऑफिसमध्ये तिचे महत्त्वाचे प्रेझेंटेशन. अर्थातच प्रेझेंटेशन हीच तिची प्रायाॅरिटी. आता ही मुलगी संध्याकाळी वेळेवर घरी येणार की नाही याचे तिच्या आईला आलेले टेन्शन. अशी परिस्थिती घरोघरी असते नाही का? पण राधिका ताई नेहमीच जुन्या नव्याचा मेळ चांगल्या प्रकारे घालतात. पुण्याच्या प्रसिद्ध “कांदेपोहे महिला गिरीप्रेमींची हिमालयात अष्टहजारी शिखरावर यशस्वी मोहीम होते आणि या मोहिमेचे नेतृत्व करणारी तरुण, तेजस्वी, पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असणारी हीच ऋता सोनवणे, हिची वृत्तपत्राशी झालेली बातचीत छापून येते. तिला बघायला आलेल्या काकू ती मुलाखत वाचताना रमून जातात अगदी. ऋताचा ” मुलींनो, विवाहपरंपरेत अडकलेल्या, कांदे पोह्यांना वेगळा अर्थ प्राप्त करून द्या. स्वतःचे सामर्थ्य ओळखा, अस्तित्व पारखा, आपल्यातली बलस्थाने अधिक टोकदार, धारदार बनवण्याचा प्रयत्न करा……. ” अशाप्रकारे त्या समाज प्रबोधनही करतात. याच कारणास्तव ही कथा आपल्याला भावते.

पोकळी या कथेचा विषय तर अगदीच वेगळा. माणसाच्या मनात भूतदया तर असतेच. बहुतांशी लोक कुत्रे, मांजर, मासे, यांना आपल्या घरात पाळतात, आणि मालकाचे व त्या पाळीव प्राण्याचे नाते पाहून कुणी त्रयस्थ अगदी अचंबित होतो. पोकळी या कथेत कथेची नायिका अमिता आणि तिचा कुत्रा ब्रूनो यांचे नाते आपल्याला पहावयास मिळते. ब्रूनो ची मेंटल कंडिशन बिघडल्यामुळे त्याला जगवणे शक्य नव्हते. एकदा त्यांच्या घरी त्यांची काही मित्रमंडळी आली असता एका मित्राच्या आठ वर्षांच्या मुलीवर ब्रूनो ने चक्क झडप घालून तिला पाडले. ती अतिशय घाबरली. सगळ्यांनी मिळून परिस्थिती सावरली, पण हे फार भयंकर होते. याआधीही त्याने एक दोघांना असेच घाबरविले होते. त्यामुळे आता ब्रूनोला जिवंत ठेवून रिस्क घेणे शक्य नव्हते. अमिताने ही सगळी परिस्थिती कशी हाताळली, त्यावेळची तिची मानसिक अवस्था काय होती, हे सगळे वर्णन वाचून लेखिकेच्या लेखन कौशल्याचे कौतुक करावे तितके कमीच असे वाटते. ही कथा वाचताना वाचकांचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल!

दुर्वांची जुडी ही पुस्तक शीर्षक कथा..

आयुष्यात आपल्याला एखादी व्यक्ती भेटते. तेवढ्यापुरते जुजबी संभाषण होते, आणि माणसांच्या प्रवाहात ती व्यक्ती नाहीशी ही होते. ती व्यक्ती मनात घर करून कधी बसली ते समजत नाही आणि त्यानंतर आपण त्या व्यक्तीची नाव, गाव, जरा जास्त काही चौकशी केली नाही म्हणून स्वतःचाच राग येतो. मनाला नैराश्य येते. अचानक पणे काही काळानंतर त्या व्यक्तीला भेटण्याचा पुन्हा योग येतो. आता संधी सोडायची नाही, असा विचार करत असता ती व्यक्ती लग्नासाठी मागणी घालते. अतिशय नाट्यमय आहे ही कथा. वाचताना वाचकाचे मन नक्कीच प्रफुल्लित होते. विचारांती असे वाटते, यात अशक्य काहीच नाही, असेही अनुभव कुणाला ना कुणाला तरी आले असणारच!

खरंतर सगळ्याच वीस कथा एकापेक्षा एक सरस आहेत. ‘ एक दिवस’ मधील त्रिकोणी कुटुंब, ‘बरं’ या कथेतील नानी, ‘ काव काव’ सारखी एका अतृप्त आत्म्याची कहाणी, ‘दाखला’ मधली तानीबाई, जिची मुलं जगत नाहीत, त्यामुळे समाजाने दुर्लक्षित केलेली ‘जयवंतीण’ या सर्वच कथा समाजाचे विविध रंगी चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करतात.

या सर्व वीस कथा म्हणजे लेखिका सौ. राधिकाताई भांडारकर यांच्या समृद्ध अनुभवांचा भावनिक अविष्कार आहे असेच मी म्हणेन.

– – राधिकाताई, अशाच विविध विषयांवर कथा लिहून आपल्या कथाविश्वाचा वेलु गगनावरी जावा अशा मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते.

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आनंदी जीवनाचे ७ पैलू” – लेखक : श्री सुनीत पाटील ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आनंदी जीवनाचे ७ पैलू” – लेखक : श्री सुनीत पाटील ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : आनंदी जीवनाचे ७ पैलू

लेखक : सुनीत पाटील 

प्रकाशक “ माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे

पृष्ठे: १६०

मूल्य: १९०₹ 

माणसाचं जीवन अनेक पैलूंनी व्यापलेलं आहे आणि मानवी जीवन आनंदी बनविण्यात या पैलूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. थोडक्यात काय, आनंद मिळवणं आणि आनंदी जीवन जगणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे. नाही का? आणि मग आनंद मिळवणं हेच जर जीवनाचं रहस्य असेल किंवा अंतिम उद्दिष्ट असेल तर त्यामागच्या विविध घटकांचाही तितक्याच बारकाईने अभ्यास झाला पाहिजे. आपण असंही म्हणू की, प्रत्येकाचा आनंद मिळण्याचा मार्ग आणि व्याख्याही वेगवेगळी आहे. कोणाला गायन केल्याने आनंद मिळत असेल तर कोणाला गायन ऐकल्याने, श्रवण केल्याने आनंद मिळत असेल. कोणाला मित्रांमध्ये बसून गप्पा मारल्याने आनंद मिळत असेल. पण बघा हं गंमत, प्रत्येकाची व्याख्या आणि मार्ग जरी वेगवेगळे असले तरीसुद्धा सर्वांना मिळवायचा आहे तो आनंदच !

एकूणात काय, तर आनंद मिळवणं हेच तर जीवनाचं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आपण एकाच प्रकारच्या ढाच्यात राहून साध्य करू शकत नाही. पण तरीही अशा काही सर्वमान्य व सर्वसमावेशक गोष्टी आहेतच, ज्यांचा योग्य पद्धतीने विचार व अंगीकार करून आपण आनंद मिळवू शकतो.

आपल्या प्रत्येकाच्या, अगदी प्रत्येकाच्या जीवनात असे काही टप्पे असतात की, ते आपण टाळू तर शकतच नाही पण त्याच्याशिवाय पुढेही जाता येत नाही. जसं की, एज्युकेशन म्हणजे शिक्षण हा तर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

शिक्षणाशिवाय आपण प्रत्येक जण अपूर्ण आहोत. प्रत्येकाला शिक्षण हे घेतलंच पाहिजे, नाही का? अर्थात ते कसं आणि कोणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण शिक्षणाशिवाय आपण आनंदी जीवनाची शिडी चढू शकत नाही, हे मात्र खरं. म्हणजेच असे काही टप्पे आहेतच जे कोणालाच, अगदी कोणालाच टाळता येणार नाहीत.

हां, आता त्याचा विचार प्रत्येक जण कसा करतो यावर पुढील जीवनाचा प्रवास निर्भर आहे ; मग तो प्रवास आनंदाचा असेल किंवा कमी आनंदाचा असेल.

आपण जेव्हा एखाद्या आनंदी माणसाकडे पाहतो तेव्हा प्रत्येकाला हा प्रश्न कधीतरी पडलाच असेल की, ती व्यक्ती इतकी आनंदी का आहे. तेव्हा वाटतं की, ती व्यक्ती इतरांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं करत असावी. तर मग त्याच वेगळेपणाचा आपण थोड्याशा ढोबळ अर्थाने विचार तर करून बघू, जेणेकरून आपल्याला आपल्याबरोबर सर्वांचंच जीवन आनंदी बनवता येईल.

या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण शिक्षण (एज्युकेशन), ज्ञान, (नॉलेज), कारकीर्द (करिअर), आर्थिक स्वातंत्र्य (फायनान्शिअल फ्रिडम), नातेसंबंध (रिलेशनशिप), विवाह (मॅरेज), आरोग्य (हेल्थ) या पैलूंचा प्रकर्षाने विचार करणार आहोत. हे टप्पे कोणालाच टाळता येत नाहीत, पण त्यातच जेव्हा आपण जगरहाटीला विसरून थोडा वेगळा विचार करतो किंवा त्यांचा खराखुरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असं लक्षात येतं की, अरेच्चा हे काहीतरी वेगळंच होतं आणि आपण खूपच वेगळा विचार करत होतो. खरंतर सर्वच एका विशिष्ट सिस्टिमचा भाग होतं का? असाही विचार होणं साहजिकच आहे.

हे पुस्तक वाचावं कोणी ? खरंतर हे सर्वांसाठीच आहे. परंतु तरीही, ज्यांचं जीवन जगून झालेलं आहे त्यांनी येणाऱ्या पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वाचावं, जी पिढी आत्ता आपल्या जीवनाला सुरुवात करत आहे त्यांनीही वाचावं. जे जीवनाच्या नव्हे, तर आनंदी जीवनाच्या वाटा शोधत आहेत अशा सर्वच मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या भरकटलेल्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी व स्वतःच्या जीवनाला आनंदी वाटेवर आणण्यासाठी वाचावं. आपल्या सर्वांना आनंदी जीवनाच्या प्रवासाच्या शुभेच्छा…..

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जीवनरंग” – लेखिका : सौ. पुष्पा प्रभुदेसाई ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “जीवनरंग” – लेखिका : सौ.  पुष्पा प्रभुदेसाई ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक :  जीवनरंग 

लेखिका : सौ. पुष्पा प्रभूदेसाई, मो. ९४०३५७०९८७

प्रकाशक : अथर्व प्रकाशन, कोल्हापूर 

 ९८५०६९९९११

मूल्य : रु. ३२०/-


सौ.  पुष्पा प्रभुदेसाई

☆ जीवनरंग —विविधरंगी जीवनाचे चित्रण ☆

 मिरज येथील सो. पुष्पा प्रभूदेसाई यांचे ‘जीवनरंग’ हे पहिलेच पुस्तक. ते २०२१ मध्ये प्रकाशित झाले आहे. लेखिकेने स्वतःचा परिचय करून देताना स्वतःला ‘गृहिणी ‘ असे म्हटले आहे. त्यामुळे संसाराशी संबंधित कथा किंवा लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती. पण हा लेख संग्रह वाचून झाल्यावर वाटू लागले की लेखिका ही फक्त गृहिणी नसून तिच्यात एक प्राध्यापिका लपलेली आहे व या लेखसंग्रहामुळे ती आपल्या समोर आली आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, या संग्रहातील लेख हे विविध विषयांवरील व अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहीलेले आहेत. केवळ विषयांची विविधता नव्हे तर तो विषय स्वतः समजून घेऊन तो दुस-यालाही समजावून सांगायचा आहे ही तळमळ त्यांच्या लेखनातून दिसून येते. यातील अनेक लेख पूर्वी दैनिके, दिवाळी अंक यातून प्रकाशित झाले आहेत. काही लेख निरनिराळ्या निबंध स्पर्धांना पाठवलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी स्पर्धेत पुरस्कारही मिळवले आहेत, ज्यात राज्य स्तरीय प्रथम पुरस्कारांचाही समावेश आहे. यावरुनच या लेखांच्या अभ्यासपूर्णतेची कल्पना येईल.

विषय साधा असो किंवा विशेष माहितीपूर्ण, अत्यंत साधी, सोपी, सरळ भाषा असल्यामुळे कोणताच लेख कंटाळवाणा वाटत नाही. उलट, लेखिकेने स्वतःची मते मांडताना काही काव्य पंक्ती, सुभाषिते यांचा वापर केलेला असल्यामुळे लेखांचे लालित्य वाढत गेले आहे. लेखिकेला पशू, पक्षी यांबद्दल विशेष सहानुभूती असल्यामुळे त्यांच्याविषयी लिहीताना मात्र त्यांच्यातील गृहिणी दिसून येते. तसेच आपला देश आणि थोर विभूती यांच्याविषयी लिहीताना त्यांच्या मनातील देशप्रेम व आदर अगदी सहजपणे व्यक्त होतो. त्यांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार व त्यांनी त्यांची केलेली जपणूक त्यांच्या लेखनातून सहजपणे प्रतिबिंबित होते.

या लेखसंग्रहात एकूण सत्ताविस लेख समाविष्ट आहेत. काही लेख आकाराने लहान असले तरी विषयांची गरज लक्षात घेऊन लेखन केले असल्यामुळे त्यात अपुरेपण जाणवत नाही. आकाराने मोठे असलेले लेख हे माहीतपूर्ण व अभ्यासपूर्ण आहेत. लेखाच्या आकारापेक्षा आशय महत्वाचा असल्यामुळे सर्वच लेख वाचनीय झाले आहेत.

या लेखसंग्रहात निसर्ग, पर्यावरण, देश, देव, धर्म, समाज, पशुपक्षी, वृद्धांचे प्रश्न, सामाजिक संस्थांचा परिचय, पुस्तक परिचय, नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे अशा अनेक विषयांवर लेख लिहीलेले आहेत.

‘मला भावलेला गणेश ‘ या पहिल्याच लेखातून त्यांनी गणेशाच्या त्यांच्या कल्पना सांगताना ज्ञानमय, विज्ञानमय अशा गणेशाचे दर्शन घडवले आहे.

‘पर्यावरण आणि मी ‘ आणि ‘वटवृक्षाची सावली ‘ या दोन लेखांमध्ये लेखिकेने पर्यावरणाचे महत्त्व, त्याची होणारी हेळसांड, निसर्गाविषयीची माणसाची उदासीनता याविषयी सविस्तरपणे लिहीले आहे. वटवृक्षाचा इतिहास, महत्व, पौराणिक संदर्भ देऊन या वृक्षाचे जतन करणे कसे महत्वाचे आहे हे पटवून दिले आहे.

‘ अखंड सावधपण ‘ या लेखात निसर्गातील लहानसहान पशुपक्षी हे सतत किती सावध असतात व त्यांचा हा सावधपणा माणसाने कसा शिकण्यासारखा आहे हे पटवून दिले आहे. अमीबा, वाळवी, मुंग्या, झुरळ यांसारखे कीटक, नाकतोडा, टोळ, मधमाशा, कुंभारीण यांसारख्याचे सावधपण, विविध जलचरांचे सावधपणा, बदक, राजहंस, कोंबडी, सुगरण पक्षीण या सा-यांविषयी लिहिलेले वाचताना मनोरंजन तर होतेच पण आपले ज्ञानही वाढते. याशिवाय अस्वल, गेंडा, मोर, कुत्रा यांविषयीही त्यांनी लिहिले आहे. निसर्गात प्राणी, पक्षी सावध असतातच पण झाडांना देखील सावधपणा असतो, संवेदना असतात हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. हे संपूर्ण लेखन वाचताना लेखिकेच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक करावेसे वाटते.

‘सहवासातून जीवन घडते’ हा लेख म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी लेखिकेला असलेले प्रेम, सहानुभूती यांचे दर्शन घडवणारा लेख आहे. वृक्ष, वेली, वनस्पती यांच्यापासून उत्तम नैसर्गिक औषधे मिळत असतात. त्यांचे जतन, संवर्धन कसे करावे याविषयी सांगणारा लेख म्हणजे ‘वनौषधी संरक्षण’. काही दिवस चालवलेल्या स्वतःच्या टेलिफोन बूथ सेवेतून त्यांनी जपलेली समरसता ‘ सामाजिक समरसता ‘ या लेखातून स्पष्ट होते.

समान विकासासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नदीजोड प्रकल्प असे लेखिकेने आवर्जून सांगितले आहे. त्यांनी लिहीलेला ‘ नदीजोड प्रकल्प ‘ हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण लिहीलेला लेख आहे. या प्रकल्पाची ज्याला काहीही माहिती नाही त्याने हा लेख वाचल्यास संपूर्ण प्रकल्पाची कल्पना येऊ शकते.

असाच आणखी एक अभ्यासपूर्ण लेख म्हणजे ‘ भारतीय समृद्ध रेल्वे ‘ हा होय. भारतातील पहिल्या रेल्वेपासून अगदी या लेखाच्या लेखनापर्यंत झालेल्या प्रगतीचा आलेखच त्यांनी मांडला आहे. भारतीय रेल्वेचा व्याप किती मोठा आहे व तिला समृद्ध का म्हटले आहे हे लेख वाचल्यावरच समजून येईल.

‘ विवेकानंद स्थापित रामकृष्ण मिशनचे ऐतिहासिक कार्य’ या लेखातही त्यांनी मिशनचा सुरुवातीपासूचा इतिहास कथन केला आहे. सुरुवातीची बिकट अवस्था व नंतर होत गेलेला विस्तार व कार्य पाहून मन थक्क होते.

जनावरांसाठी समाजसेवा करणा-या संस्था, स्थानिक लोक, स्वतः:चा सहभाग याविषयी त्या ‘ माणुसकिचे व्रत ‘ या लेखात लिहीतात. दुस-या एका लेखात त्या त्यांना आवडलेल्या एका पुस्तकाविषयी लिहीतात. ‘ विश्व चैतन्याचे विज्ञान ‘ या डॉ. रघुनाथ शुक्ल या प्रकांड पंडित शास्त्रज्ञाचे हे पुस्तक असून अध्यात्म आणि विज्ञान यातील ज्ञानाचा संगम घडवणारे हे पुस्तक एकदा तरी वाचावे असे आहे याची खात्री पटवून देणारा हा लेख आहे.

‘आनंदाचे डोही ‘ हे अमरनाथ यात्रेचे सुंदर प्रवास वर्णन आहे तर ‘ एक झोका ‘ हे ‘ व्यक्तीचित्रणं.!. ‘ भक्तीयोग ‘ या लेखातून गीतेतील भक्तीयोगाविषयी त्या लिहितात. काही लेखांची शिर्षके त्यातील विषय स्पष्ट करतात. उदा. – मुलांना कसे वाढवावे ?, वृद्धाश्रमाची गरज काय आहे ?, विधुर(एक आत्मचिंतन) इत्यादी. पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी सण म्हणून एकच असले तरी ती साजरी करण्याची पद्धत कशी बदलत गेली आहे हे त्यांनी ‘ दिवाळी–कालची आणि आजची ‘ या लेखातून पटवून दिले आहे. मराठी भाषेविषयीचे त्यांचे प्रेम आणि आदर ‘ मराठीचा बोलू कौतुके ‘ या लेखातून व्यक्त होते.

जगताना आपण जीवन भरभरुन अनुभवणे आणि त्याचे विविध रंग इतरांनाही उलगडून दाखवणे यात लेखिका सौ. पुष्पा प्रभूदेसाई यशस्वी झाल्या आहेत. म्हणूनच या लेखसंग्रहाचे ‘जीवनरंग ‘ हे शिर्षक सार्थ ठरते. याच वृत्तीने त्यांनी अधिकाधिक लिहावे व जीवनाच्या सर्व अंगांचे दर्शन घडवावे यासाठी त्यांना शुभेच्छा.!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अर्थात” -लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “अर्थात” -लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : अर्थात

लेखक – श्री. अच्युत गाेडबाेले

प्रकाशक : बुकगंगा

पृष्ठ: ५४४

मूल्य: ४९९₹ 

हे पुस्तक एकाच वेळी अनेक पातळ्यांवर रचलेलं आहे. एका पातळीवर इथे आधुनिक अर्थशास्त्राची तत्त्वं अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत.

दुसऱ्या पातळीवर हा चक्क एक सामाजिक इतिहास आहे. म्हणजे अगदी पुराणकाळापासून, मध्ययुगातल्या सरंजामशाहीपासून, भांडवलशाहीच्या उगमापर्यंत आणि अगदी २००० सालाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटापर्यंतच्या काळाचा हा अर्थशास्त्रीय इतिहास आहे. पैसा कसा सुरू झाला, बँकिंग, कंपन्या, स्टॉक एक्स्चेंजेस वगैरेही कशा सुरू झाल्या हे सगळं यात आहे.

तिसऱ्या पातळीवर यात अर्थशास्त्रज्ञांची अतिशय विस्मयकारक चरित्रंही वाचायला मिळतील.

यात अर्थशास्त्रातल्या वेगवेगळ्या विचारसरणींची आणि त्यांच्यातल्या वादांविषयीचीही खोलवर चर्चा आहे आणि त्यातलं काय बरोबर आणि काय चूक आहे त्याचा निर्णय वाचकांवर सोडलेला आहे.

या पुस्तकाच्या सुरुवातीला अर्थशास्त्राच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतलाय आणि नंतर ‘अर्थशास्त्राचा गाभा‌’ या विभागात अर्थशास्त्राची तत्त्वं अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहेत.

त्यानंतर अर्थशास्त्राचा इतिहास पाच भागांत सांगितलाय. शेवटचा विभाग आजच्या प्रश्नांसाठी राखून ठेवलाय.

या पुस्तकामुळे निदान काही वाचकांना तरी अर्थशास्त्राचा जास्त खोलवर अभ्यास करावा असं वाटलं, त्यातलं चैतन्य जाणवलं, त्यात जगाला दिपवून टाकेल असं संशोधन करावंसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले महत्त्वाचे प्रश्न आपले आहेत असं वाटून ते सोडवावेसे वाटले तरी या लिखाणाचं चीज होईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नवा परीघ…  लेखिका : सुश्री आश्लेषा महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ नवा परीघ…  लेखिका : सुश्री आश्लेषा महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : नवा परीघ

लेखिका : आश्लेषा महाजन 

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन

कवयित्री, लेखिका आश्लेषा महाजन यांचा दिलीपराज प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला ‘नवा परीघ’ हा कथासंग्रह नुकताच वाचला. यापूर्वी त्यांच्या कविता, आणि त्यांनी लहानांसाठी लिहिलेली-अनुवादित केलेली पुस्तकं, कादंबरी हे साहित्यप्रकार मी वाचले होते. १२ जुलै १९६१, पानशेच्या पुरावर आधारित असलेल्या कादंबरीवर मी पुस्तक परिचयदेखील लिहिलेला आहे. पण काही किरकोळ अपवाद वगळता त्यांचा ‘कथा’ हा साहित्यप्रकार मात्र माझ्या वाचनात आलेला नव्हता. आणि त्यामुळेच हा नवा कथासंग्रह नक्की कसा असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.

‘नवा परिघ’ या कथासंग्रहात सुरुवातीलाच मनोगतामध्ये आश्लेषा महाजन यांनी त्या कथासंग्रहाकडे का वळल्या किंवा कथा हा साहित्य प्रकार त्या कशा दृष्टीने पाहतात याचं उत्तम आणि प्रामाणिक कथन केलं आहे. एक वाचक म्हणून ते मनाला सहज स्पर्शून जातं. आपण एखादा साहित्यप्रकार का लिहितो आहोत, त्याची नक्की गरज काय आहे, हे एखाद्या लेखकाला/लेखिकेला समजणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या या मनोगतातून मला जाणवलं.

आणि पुढेही तोच प्रामाणिकपणा, तिच वैचारिक समज त्यांच्या प्रत्येक कथेतून दिसून येते. सद्यस्थितीतल्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या अशा या कथा आहेत. मुखपृष्ठावर दाखवल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याची विशिष्ट चौकट कुठेतरी नव्याने साधायला हवी, त्यात थोडी मोकळीक असायला हवी किंवा आजकालच्या भाषेत जरा स्पेस असायला हवी हा दृष्टिकोन यातल्या काही कथांमधून प्रकर्षाने जाणवतो. लेखिका मूलतः कवी मनाच्या आहेत किंबहुना कविता हा त्यांचा व्यक्त होण्याचा स्वाभाविक कलाप्रकार आहे त्यामुळे कथेमध्ये येणारी तरलता, काही प्रसंगांना विशिष्ट प्रकारे उद्धृत करणं, प्रत्येक गोष्टीचा शेवट ठराविक साच्यातून न करता तो वाचकाच्या दृष्टिकोनातून त्याला ठरवू देणं असेही काही प्रयोग या कथांमध्ये केल्याचं आढळतं. पण विशेष म्हणजे कथेमध्ये कुठल्याही स्वरूपात दोन ओळींची का होईना कविता घालण्याचा मोह प्रकर्षाने टाळलेला आहे. सुरुवातीच्या मनोगतातच त्यांनी सांगितलं कविता हा अतिशय उत्कट आणि हृदयस्थ प्रकार जरी असला तरी काही विचार, काही गोष्टी यांच्यासाठी मोठा परिघ असणं आवश्यक ठरतं आणि म्हणूनच त्या विषयांना त्यांनी कथा रूपात मांडलेलं आहे. या दृष्टिकोनातूनसुद्धा ‘नवा परीघ’ हे नाव या संग्रहाला साजेसं आहे असं म्हणता येईल.

यातल्या कथा निरनिराळ्या मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. आणि त्यांचं एकत्रिकरणं केलेलं आहे. त्यामुळेच काळाच्या वेगवेगळ्या तुकड्यात लेखिका स्वतःच्याच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखाद्या नात्याकडे किंवा स्त्री-पुरुष सहजीवनाकडे कशी विविध दृष्टीतून पाहते हे स्पष्टपणे दिसून येतं. तसंच या कथासंग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कथेला थेट सुरुवात होते. प्रास्ताविक आढळत नाही. आणि कुठलाही प्रकारचा पाल्हाळीकपणा न जाणवता घट्ट आकृतीबंध असलेला कथाऐवज आपल्याला वाचायला मिळतो. मोजकी पात्रं, त्यांच्यातले संवाद आणि गरजेपुरती येणारी त्यांच्या अवतीभवतीची पात्रं, त्यांची पार्श्वभूमी असे या कथांचे सर्वसाधारण स्वरूप आहे.

सुख आणि दुःख या आपल्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छाप आणि काटा या सारख्याच त्या आपल्या आयुष्याला चिकटलेल्या असतात. आणि अनेकदा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये त्यांचं प्रमाण हे बऱ्यापैकी समसमान असतं. क्वचित प्रसंगी एखाद्याचं कमी जास्त असू शकतं, पण पूर्णविरोधाभास किंवा पूर्ण एकांगी असं आयुष्य सामान्य व्यक्तींच्या पदरी खूप कमी वेळा येतं. हा सुखदुःखाचा ‘तोल’ अतिशय उत्तमरीत्या या कथांमधून साधला आहे‌.

सर्वच कथा वाचनीय आहेत. पण विशेष परिणाम करतात त्या म्हणजे मेकअप, प्लाझ्मा, गादी, लेप, जीवन है अगर जहर, व्हेंचर पायलट, एकतानता. यातली प्लासिबो आणि श्रद्धा या कथांचा अजूनही विस्तार झाला असता तर चालला असता हे ही खरं. पण कदाचित मासिक किंवा अंकातल्या शब्द मर्यादेमुळे हे बंधन आलं असावं असं वाटतं. प्रत्येक कथा साधारणपणे ८ ते १० पानांची आहे आणि एकूण १६ कथांचा यामध्ये समावेश आहे. यातल्या बऱ्याच कथांवर उत्तम प्रकारच्या लघु फिल्म होऊ शकतील. याबाबत लेखिकेने खरंच विचार करायला हवा. साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या, जीवनातल्या अनेक प्रसंगांना सहजपणे, प्रामाणिकपणे सामोरे जाणाऱ्या, कुठलाही विशिष्ट प्रकारचा सूर न लावणाऱ्या या कथा सर्वसाधारण व्यक्तीला आपल्या जिव्हाळ्याच्या वाटतील अशाच आहेत.

एकूणच या कथांमध्ये मानवी नातेसंबंधांवर जास्त भर दिलेला आहे. मुळात मानवी नातेसंबंध ही गोष्टच अतिशय गुंतागुंतीची, समजायला क्लिष्ट, हाताळताना हळुवार आणि तितकीच पारंपारिक ओझ्यात जखडलेली बाब आहे हे नक्की. तंत्रज्ञानाच्या किती सुविधा उपलब्ध झाल्या, आर्थिक स्थितीचा एकूण स्तर जरी उंचावला तरीदेखील मानवी मनाच्या काही गरजा आणि काही क्षमता-अक्षमता देखील आपल्या आयुष्याला व्यापून उरतात त्यांची बीजं रुजतात आणि नकळत विचारप्रवृत्तही करतात. या कथांमध्ये ती तळाशी रुजलेली बीजं स्पष्टपणे दिसून येतात. त्यांच्यावरच या कथांची निर्मिती झाली आहे हे स्पष्टपणे जाणवण्या इतक्या या कथा नितळ आणि निर्मळ आहेत. त्यामुळे त्या जास्त भावतात.

नव्या परिघातल्या या कथा एकदा तरी आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “राजधुरंधर ताराराणी” -लेखक : श्री राजेंद्र घाडगे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “राजधुरंधर ताराराणी” -लेखक : श्री राजेंद्र घाडगे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : राजधुरंधर ताराराणी 

लेखक: राजेंद्र घाडगे

पृष्ठ: २५२

मूल्य: ३७५ ₹ 

छत्रपती शिवरायांच्या ज्येष्ठ स्नुषा महाराणी ताराबाईसाहेब यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर मोगल सम्राट औरंगजेब याच्याविरुद्ध दिलेला लढा हा जगाच्या इतिहासातील एक देदीप्यमान लढा म्हणून ओळखला जातो. ताराबाईच्या या कामगिरीस जगाच्या इतिहासात खरोखरच तोड नाही. परकीय शत्रू मुगल सम्राट औरंगजेब, त्याचबरोबर स्वकीय शत्रू छत्रपती संभाजीपुत्र शाहूराजे आणि नानासाहेब पेशवा यांच्याविरुद्ध ताराबाईंचा झालेला राजकीय संघर्ष हा खरोखरच अभ्यासाचा विषय आहे.

महाराणी ताराबाईंनी हिंदवी स्वराज्यरक्षणासाठी केलेला संघर्ष, त्यांचे बौद्धिक गुणकौशल्य, धैर्य, राजनीतिकौशल्य, स्वराज्यनिष्ठा, नेतृत्वगुण आदी गोष्टी इतिहासप्रेमींना या पुस्तकातून जाणून घेता येतील सध्याच्या काळात भले तलवारींच्या जोरावर लढाया होत नसतील; परंतु राजकीय, सामाजिक आणि प्रसंगी कौटुंबिक परिस्थितीवर मात करतानासुद्धा मनुष्याचे नीतिधैर्य किती मजबूत असले पाहिजे, तसेच आपण आपला स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा, नैतिकता कशी जोपासली पाहिजे, याची शिकवण ताराबाईंच्या या जीवनचरित्रातून आत्मसात करता येईल आणि म्हणूनच महाराणी ताराबाईंचे हे चरित्र घराघरांत आणि मनामनांत पोहोचले पाहिजे, असे वाटते.

ठळक वैशिष्ट्ये

१) दुर्मीळ अशा असंख्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले पुस्तक.

२) लेखकाचे अभ्यासात्मक विवेचन,

३) ताराबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा निपक्षपातीपणाने घेतलेला आढावा.

४) एक पराक्रमी स्त्री म्हणून ताराबाईच्या व्यक्तिमत्त्वाला आणि प्रतिभेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयन.

५) नव्या जुन्या पिढीतील सर्व इतिहासप्रेमीसाठी एक अतिशय वाचनीय असा हा खास ग्रंथ.

लेखकाविषयी…….

राजेंद्र घाडगे हे एका नामांकित विमा संस्थेतून प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. इतिहास लेखनाच्या अनुषंगाने पाहायचं झालं, तर ते नव्या पिढीतील एक प्रतिभावंत इतिहास अभ्यासक म्हणून ओळखले जातात. या ग्रंथासह इतिहासविषयक त्यांची एकूण पांच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच राजेंद्र घाडगे हे राज्य पुरस्कार प्राप्त लेखक असून, ते उत्तम व्याख्याते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत

इतिहास संशोधकांनी, अभ्यासकांनी आणि चिकित्सक वाचकांनी ताराबाईंचा हा अद्भुत असा जीवनप्रवास समजून घ्यावा आणि आपल्या गावागावांतील शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांना, ग्रंथालयांना तसेच आपल्या जवळच्या स्नेही, मित्र, नातेवाईक मंडळींना वाढदिवस, विवाह समारंभ आदी विशेष निमित्ताने हा ग्रंथ भेट द्यावा. त्यानिमित्ताने ताराबाईंचे कार्यकर्तृत्व घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचेल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  द कारगिल गर्ल 

लेखक : गुंजन सक्सेना 

अनुवाद : शुचिता नांदापूरकर-फडके 

मुखपृष्ठ फोटोग्राफ – लेफ्टनंट कर्नल अनुपकुमार सक्सेना आणि अगंग गुणवान, अनस्प्लॅश

मुखपृष्ठ रचना – नीरज नाथ

पृष्ठे:२१६

मूल्य : ३६०₹ 

फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना (निवृत्त) फ्लाइंग ब्रँचमध्ये कमिशन प्राप्त करणाऱ्या पहिल्या मोजक्या स्त्री अधिकाऱ्यांपैकी त्या एक असून, भारतीय स्त्रीवर पडलेला छाप पुसून टाकण्यासाठी त्यांनी नेटाने लढा दिला आहे. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी निवडण्यात येणाऱ्या स्त्री अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणसत्रासाठी त्यांची निवड होऊन त्यांना चित्ता/चेतक (ऑलवीट III) या युनिटमध्ये उधमपूर इथे पाठवण्यात आलं. फॉरवर्ड एअरकंट्रोल हे त्यांचं मुख्य काम होतं. युद्धाच्या धामधुमीत त्या हेलिकॉप्टरमधून हवाई मदत (बॅटलफिल्ड एअर स्ट्राइक – युद्धभूमीवर हवाई हल्ला) आणि निकट हवाई साह्य देत होत्या. तसंच, युद्ध करणाऱ्या विमानांना आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं, हा त्यांच्या कामाचा भाग होता.

भारतीय वायुसेनेत (इंडियन एअरफोर्स) अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं, हे गुंजन यांनी या पुस्तकात अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितलं आहे. कारगिल युद्धात क्लासिक बीएएस पद्धतीने हल्ला करण्याऐवजी, जीपीएसच्या आधारे बॉम्बहल्ला करण्याची मुख्य पद्धत अमलात आली असताना, बॉम्ब लक्ष्यावर नेमके कुठे पडत आहेत, या संदर्भात गुंजनच्या युनिटने अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवली होती.

सीझफायर झाल्यानंतर १०८ स्क्वॉड्रनच्या अधिकाऱ्यांना टार्गेट भागापर्यंत नेणं, तसंच जिथे ३ आणि ८ डिव्हिजन हेडक्वार्टर्सचं काम सुरू होतं तिथे भेट देणं, ही कामगिरी गुंजनवर सोपवण्यात आली होती.

गुंजन यांना ‘द कारगिल गर्ल’ ही यथायोग्य उपाधी प्राप्त झाली. युद्धभूमीवर प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या त्या भारतीय सेनेच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यांच्यासारख्या स्त्री अधिकाऱ्यांची भारतीय वायुसेनेला आवश्यकता आहे. इतर तरुण स्त्रियांना प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन आपल्या देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहण्याची प्रेरणा अशा अधिकारी स्त्रिया नक्कीच देऊ शकतात.

“पूर्ण भरलेली ‘इन्सास’ असॉल्ट रायफल आणि एक रिव्हॉल्वर माझ्या हेलिकॉप्टरमध्ये नेहमी असे. माझं हेलिकॉप्टर जर शत्रूच्या सीमेत कोसळलं, तर मला युद्धबंदी केलं जाईल, या शक्यतेची जाणीव मला सतत होई. तरीसुद्धा, मी जे करायला हवं, ते मी करत राहिले. युद्धाचा गोंधळ तुम्हाला अति विचार करूच देत नाही.” – – गुंजन सक्सेना

सन १९९४ मध्ये वीस वर्षांची गुंजन सक्सेना म्हैसूर इथे जाणाऱ्या रेल्वेत बसली. चौथ्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (स्त्रियांकरता) पायलट कोर्सच्या निवडप्रक्रियेकरता उपस्थित राहण्यासाठी ती निघाली होती. प्रशिक्षणाचे खडतर चौऱ्याहत्तर आठवडे पार पाडल्यानंतर गुंजन सक्सेना दुन्डिगल इथल्या एअरफोर्स अॅकॅडमीतून उत्तीर्ण होऊन पायलट ऑफिसर म्हणून बाहेर पडली.

दि. ३ मे १९९९ रोजी कारगिल भागात पाकिस्तान्यांनी शिरकाव केल्याची बातमी स्थानिक धनगरांनी आणली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत हजारो भारतीय तुकड्या त्या घुसखोरांना घालवून देण्याच्या उद्दिष्टाने पर्वतांवरच्या भीषण युद्धात गुंतल्या. भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’चा पुकारा केला. प्रत्येक पायलट त्यासाठी हजर होता. तोवर युद्ध सुरू असलेल्या भागात स्त्री पायलटला कधी पाठवण्यात आलं नसलं तरी वैद्यकीय स्तरावर जखमींना उचलून आणणं, रसद पुरवठा आणि इतर कामांसाठी त्यांना तैनात केलं जाई.

सक्सेनासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची हीच वेळ होती. द्रास आणि बटालिक प्रांतात लष्करी उतारू घेऊन जाणं, सुरू असलेल्या युद्धातून जखमींना उचलून आणणं, ही कामं ती करत होतीच. शत्रूच्या स्थानाबद्दल आपल्या वरिष्ठांना ती अतिशय तंतोतंत माहितीही देत होती. तिच्या एका उड्डाणादरम्यान पाकिस्तानी रॉकेट मिसाइलपासून ती अगदी काही इंचांनी वाचली होती. या सर्वांतून निडरपणे आपलं कर्तव्य पार पाडत सक्सेनाने ‘द कारगिल गर्ल’ ही उपाधी प्राप्त केली.

तिची ही प्रेरणादायक कथा तिच्याच शब्दांत…

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares