मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव :शिदोरी

लेखिका: सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे

किंमत रू.240/-

संपर्क:9423029985

☆ शिदोरी – भावनांच्या मंजि-यांनी बहरलेली काव्य वृंदा – सुहास रघुनाथ पंडित ☆

सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे यांचे ‘शिदोरी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बत्तीस ललित लेख व पन्नास कविता आहेत. पहिला विभाग हा लेखांचा आहे व दुसरा विभाग हा कवितांचा काव्य मंजिरी या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. आज आपण काव्य मंजिरी तील कवितां विषयी जाणून घेऊ.

काव्य-मंजिरी हा  काव्यसंग्रह येण्यापूर्वी त्यांनी गद्य व पद्य लेखन केलेले आहे. त्यामुळे लेखनकला ही काही त्यांच्यासाठी नवीन नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छितात. त्यामुळे मनात जसे तरंग उठतील तसे त्यांना शब्दरूप देऊन त्या लेखन करू शकतात. मनाची संवेदनशीलता त्यांना काव्य लिहिण्यास उद्युक्त करते. हे मन एके ठिकाणी स्थिर न राहता सर्वत्र भिरभिरत असते आणि सारे काही टिपून घेते.  मग त्यांच्या कवितेतून निसर्ग फुलतो, कधी भक्तीचे दर्शन होते,कधी कुटुंबवत्सलता दिसून येते, कधी जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त करते, कधी चिंतनशील मनाला मोकळे करते, तर कधी वर्तमानाची दखल घेते.एखाद्या कॅनव्हासवर वेगवेगळे रंग उधळावेत आणि त्याच्या मिश्रणातून एक आकर्षक कलाकृती तयार व्हावी त्याप्रमाणेच या काव्य तुलसीच्या शब्द मंजि-या फुलून आल्या आहेत.

या काव्यसंग्रहात आपल्याला विविध विषयांवरील कविता वाचायला मिळतात. देशभक्ती बरोबरच ईश्वरावरील श्रद्धाही दिसून येते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लिहीलेली ‘स्वातंत्र्यदिनी स्मरण’ ही कविता किंवा तिरंगा, स्व. सावरकर या कविता मनातील देशप्रेमाची साक्ष देतात. तर गणपती, विठूमाऊली यांच्याबरोबरच सांगलीजवळील बागेतील गणपती मंदिराचे त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करणारे आहे. ‘कृष्ण वेडी’ ही कविता तर भक्तीमय प्रेमकाव्याचा सुंदर नमुनाच आहे.  

वर्तमानात घडणा-या घटनांची नोंदही त्यांनी घेतली आहे. कोरोनाग्रस्त काळामध्ये सहन कराव्या लागणा-या परिस्थितीचे, समस्यांचे यथार्थ वर्णन करून त्यातून बाहेर पडण्याचा आशावादही त्या व्यक्त करतात.

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कवयित्री या जीवनाविषयी आशावादीच आहेत. मनावरची उदासीनतेची काजळी निघून जाईल असा विश्वास त्यांना वाटतो. उगवतीच्या सूर्याकडे पाहून, ठप्प झालेल्या समाजजीवनाला संयम सोडू नकोस असा धीर त्या देतात. श्रावणाची चाहूल लागताच त्यांना खात्री वाटते की ‘एक दिवस नक्की येईल, पूर्ववत होता तसा’. मृत्यूच्या छायेखाली गुदमरणारा श्रावण अनुभवताना त्यांना बालकवींचा श्रावणही आठवतो हे त्यांच्या जीवनावरील श्रद्धेचे प्रतिक आहे.

कवयित्रीच्या हातून स्त्रीसुलभ कुटुंबवत्सलता स्त्रवली नाही तरच नवल! नात्यांच्या रेशीमधाग्यात शब्द गुंफून सजलेल्या त्यांच्या कविता आजी होण्याचा आनंद व्यक्त करतात, आजी आणि नात यांच्या नात्यातील भावविश्व दाखवतात आणि नव्या पिढीबरोबर जुळवून घेण्याची तयारीही दाखवतात. मग ही कविता तीन पिढ्यांची होऊन जाते.

जीवन विषयक भाष्य करणा-या त्यांच्या कविताही वाचनीय आहेत. मनाच्या भोव-याला दैवाची गती मिळत असते. त्यामुळे जगत असताना पराधिनता ही असतेच असे सुचवणारी ‘भोवरा’ कविता असो किंवा ‘माती असशी, मातीत मिसळशी’ या उक्तीची आठवण करून देणारी ‘आयुष्याची उतरंड’ ही कविता असो, जीवनावर केलेले भाष्य हे सात्विक आस्तिकतेतूनच आले आहे हे जाणवते. ‘पिंपळ’ या कवितेतही मनाला दिलेली पिंपळाची उपमा किंवा आठवणींची घरटी या कल्पना नाविन्यपूर्ण वाटतात. याच कवितेतील

आसक्तीची मुळं इतकी

घट्ट रूजली आहेत भूमीत

की त्यांना जाणीव नाहीये

अस्तित्व धोक्यात आल्याची

या काव्यपंक्तीतून मानवी मनाची नेमकी अवस्था त्यांनी सांगितली आहे. ‘भरजरी शालू’ या कवितेतून तर त्यांनी आयुष्याचा आलेखच मांडला आहे.

आत्ममग्नता,चिंतनशिलता हा तर कविचा उपजत गुणधर्म. याच चिंतनशिलतेतून, असं असलं तरी, मन क्षेत्र, विसाव्याचे क्षण, मन तळं यासारख्या कविता जन्माला आल्या आहेत.विचारांच्या मंडलात मती गुंग होत असताना नेमके शब्द सापडले की कविता कशी जन्माला येते हे ही त्यांनी ‘कवितेचा जन्म’ या कवितेतून सांगितले आहे.

रसिक मनाला खुणावणारा,चारी बाजूला पसरलेला निसर्ग कविमनाला स्वस्थ बसू देईल का? अनेक सुंदर निसर्ग कवितांची निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे. केवळ निसर्ग वर्णन न करता त्यांनी काही ठिकाणी त्याचा संबंध मनाशी जोडला आहे. मनरूपी तुळशीला येणा-या विचाररूपी मंजि-या या त्यांच्या भावुक मनाचे प्रतिकच आहेत. ‘ॠतुंची फुलमाला’ ही एक नितांत सुंदर निसर्ग कविता आहे. निसर्गात बहरणारा प्रत्येक ऋतू मनही बहरवून टाकतो हे प्रसन्न मनाचे द्योतक आहे.एकीकडे सागराची साद ऐकताना त्याना समोर साहित्य सागरही दिसू लागतो. साहित्याच्या अथांगतेची जाण असणे म्हणजेच भविष्यकाळात या साहित्य सागरातील मोत्यांचा त्यांना शोध घ्यायचा आहे याची कल्पना येते. उनझळा, पावसास, रंगपंचमी या निसर्ग कविताही सुंदर दर्शन घडवतात. शब्दझरे या कवितेतून निसर्गातील सौंदर्य शब्दातून खुलवून शब्दांचे मोती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो.

काव्याचा असा रसास्वाद घेताना, सौ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी यापूर्वी कविता लेखन केले आहे. आता काव्यसंग्रह काढून पुढचे पाऊल टाकले आहे.संवेदनशीलता आणि भावनाशीलता याबरोबरच त्यांनी काव्याकडे अधिक अभ्यासू वृत्तीने पाहिल्यास त्यांच्याकडून वृत्तबद्ध कविताही लिहून होतील असा विश्वास वाटतो. विषयांची आणि काव्यप्रकारांची विविधता त्यांच्या काव्यलतेला बहर आणत आहे. यापुढील काव्यसंग्रहात त्यांनी नवीन वाटा धुंडाळल्या आहेत याचा अनुभव वाचकांना यावा अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या साहित्य प्रवासास शुभेच्छा!!.

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सैनिक हिमालयाचा… कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त) ☆ परिचय – सुश्री अलकनंदा घुगे आंधळे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ सैनिक हिमालयाचा… कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त) ☆ परिचय – सुश्री अलकनंदा घुगे आंधळे ☆

No photo description available.

कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त)

पुस्तकाचे नाव : “सैनिक हिमालयाचा “

लेखक : कर्नल शरदचंद्र पाटील ( निवृत्त ) 

प्रकाशक : अनुकेशर प्रकाशन 

पृष्ठसंख्या : २२८ 

किंमत :    रु. ३५०/-

(या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक,  “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच  आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..)

तरुणपणी अक्षय कुमारचा सैनिक नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर बॉर्डर..चित्रपटांमधून सैनिक फक्त गरजेनुसार दाखवला जातो; खरी थीम तर लवस्टोरीच असते.. अलीकडे आलेले सत्य घटनेवरील काही चित्रपट याला अपवाद आहेत. या चित्रपटातून सैनिक मला जितका समजला नाही, तितका परवाच वाचलेल्या एका पुस्तकातून समजला. पुस्तकाचे नाव आहे, ‘सैनिक हिमालयाचा’.. आणि लेखक आहेत निवृत्त कर्नल शरदचंद्र पाटील..

चित्रपट पाहताना एक गोष्ट माईंडमधे सेट असते की, समोरचा सैनिक हा सैनिक नसून फक्त एक्टिंग करतोय. अनेक रिटेक घेऊन त्याने प्रत्येक सीन शूट केलेला असतो. मात्र वास्तवात सैनिकांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक सीन एकदाच, एका शॉटमधे ओके आणि सक्सेसफुल करायचा असतो. हाच फरक आहे चित्रपटातून सैनिक बघण्यात आणि प्रत्यक्ष पुस्तकातून सैनिक समजण्यात..

अलीकडेच प्रकाशित झालेले हे पुस्तक नुसते पुस्तक नसून, एका सैनिकाचे आत्मवृत्त आहे. एका सैनिकाने वाचक आणि भारतीय जनतेशी साधलेला संवादच आहे. २६ – २७ वर्षाच्या सैनिकी आयुष्यात लेखकाने दहा अकरा वर्षे हिमालयात घालवली. आजही लेखकाला हिमालय साद घालतो. आणि खरं सांगू का? पुस्तक वाचताना मी ही कित्येक वेळा मनोमन हिमालयात जाऊन आले. इतका जिवंतपणा लेखनातून जाणवला. प्रसंग चांदण्या रात्रीचे असोत, अंधाऱ्या रात्रीचे असोत, हिमवृष्टीचे असोत किंवा हिमस्खलनाचे असोत.. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा करण्यात लेखकाने कमालीचे यश मिळवले आहे. बर्फाच्या गुहेत अडकलेला प्रसंग असो किंवा राहत्या बंकरवर कोसळलेल्या महाकाय शिळेचा प्रसंग असो; केवळ नशीब बलवत्तर म्हणून लेखक जिवंत राहतात.. हे वाचून मन विषण्ण होते. कसे राहत असतील हे सैनिक जीवावर उदार होऊन..? सियाचीन हिमनदीसारख्या मृत्यूच्या जबड्यात जाऊन देशसेवा करण्याचे धैर्य या सैनिकांच्या अंगी कुठून येत असेल देव जाणे ..! तीन महिने दाढी न करता, केस न कापता,अंघोळ न करता? बर्फात 24 तास थंडी आणि  हिमवृष्टीशी युद्ध तर चालू असते या सैनिकांचे..!  मी तर आत्तापर्यंत समजत होते, सियाचीन हे नाव चीनच्या नावावरून पडले असेल, पण तसे नाही..तिबेटी भाषेत ‘सिया’ म्हणजे ‘गुलाब’ आणि ‘चेन’ म्हणजे ‘मुबलक’..सियाचेन म्हणजे ‘मुबलक गुलाबांची जागा’.. हे या पुस्तकातूनच उलगडले.. ऑफिसर्स मेस म्हणजे सामान्य जनतेच्या दृष्टीने चैनीची जागा, पण तसे नाही..हवामानाशी जुळवून घेण्याची कला म्हणजे अॕक्लमटायझेशन..अशा कित्येक सैनिकी संकल्पना जाणून घ्यायच्या असल्यास पुस्तक वाचावे..आतापर्यंत दोन दंश माझ्या परिचयाचे होते. एक म्हणजे सर्पदंश आणि दुसरा म्हणजे विंचूदंश.. पण हिमदंश पण असतो हे पुस्तक वाचून कळले.. हाताच्या बोटाचा सतत बर्फाशी संपर्क येऊन बोटांची संवेदनाच निघून जाते. प्रसंगी बोटे कापावीही लागतात. बोटावर निभावले तर ठीक, नाही तर मृत्यूही येऊ शकतो..इतका कठीण असतो हा हिमदंश.. खरेच या आणि अशा कित्येक गोष्टी लेखकाने या पुस्तकात जीव ओतून लिहिल्या आहेत.

कॅप्टन कपूर यांच्या जीवावर बेतलेला हिमस्खलनाचा, त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेला प्रत्यक्ष अनुभव वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.सिक्कीमच्या जंगलातील जळवांचा हल्ला असो वा हिमालयातील प्रत्येक ठाण्यावर पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत असो; या सैनिकांच्या जिद्द, चिकाटी आणि धैर्याला सलाम करावासा वाटतो..

कश्मीर फाईल्स जर समजून घ्यायची असेल तर एका सैनिकाइतकी ती कोणीच मांडू शकत नाही. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे मी म्हणेन..जागोजागी वापरलेली कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रे पुस्तकाच्या आशय-विषयाचे सौंदर्य वाढवतात. दारूगोळ्याची साफसफाई, हिमनदी, सफरचंदाच्या बागांची चित्रे खरोखर पाहण्यालायक आहेत..मधेमधे प्रसंगानुरूप लिहिलेल्या गज़ला लेखकाच्या साहित्यिक प्रतिभेची ओळख करून देतात.. खरे तर अशी पुस्तके सैनिकाकडून लिहिणे जाणे आवश्यक आहे, जेणेकरून सैनिकांविषयी सामान्य जनतेच्या मनात आदर निर्माण होईल आणि तरुण वर्ग सैनिक होण्याकडे प्रवृत्त होईल..सैनिक कोणत्या हालअपेष्टातून जातात, ते ही सर्वांना कळेल..आपण विकेंडला मौजमजा करतो, सण,समारंभ साजरे करतो, जन्मदिवस साजरे करतो..तेव्हा हे सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर कुठे तरी सीमेवर देशाचे रक्षण करत असतात.. अशा प्रत्येक सैनिकाला मानाचा मुजरा !

या लेखातून सर्वांना विनंती ..चला थोडे सैनिकांनाही प्रसिद्ध करूया.. कारण खरे हिरो तेच आहेत, चित्रपटातले नव्हे.. लेखकाने पुस्तकात लिहिलेली काही वाक्ये, खूप काही सांगून जातात.. जसे की,

“…संपूर्ण सैनिकी आयुष्यात फाजील आत्मविश्वास चालत नाही. आत्मविश्वास असावा. धाडस असावे, पण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच ! तसे केले नाही तर कधी मृत्यू झडप घालेल ते सांगता येत नाही ..”

आणखी एका प्रसंगी लेखक म्हणतात, ” पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरचे ज्ञान यात जमीन-अस्मानाचा फरक असतो..” आणि उपसंहारमधे लिहिलेली कविता, ‘त्रिवार वंदन’ तर लाजबाव आहे.

या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक,  “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच  आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..

परीक्षण : अलकनंदा घुगे आंधळे

औरंगाबाद

मोबाईलः ९४२२२४३१५९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/सौ. सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘अनादिसिद्धा’ – सुश्री भूपाली निसळ ☆ परिचय – श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अनादिसिद्धा’ – सुश्री भूपाली निसळ ☆ परिचय – श्री आनंदहरी  ☆ 

अनादिसिद्धा

लेखिका : भूपाली निसळ

प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई

पृष्ठे : १३२  किंमत : ₹ ३२०/-

‘अनादिसिद्धा ‘ भूपाली निसळ यांची अनादि वेगळेपण जपणारी सर्वांगसुंदर, लक्षवेधी कादंबरी*

अहमदनगर येथील युवा लेखिका भूपाली निसळ यांच्या ‘कल्लोळतीर्थ’ या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन ८ मार्च २०२० ला झाले आणि अल्पकाळातच ती उच्चांकी विक्री असणारी कादंबरी ठरली. अपेक्षेप्रमाणे ‘ कल्लोळतीर्थ ‘ या कादंबरीची दुसरी आवृत्ती वर्षाच्या आत प्रकाशीतही झाली. ही घटना मराठी साहित्यविश्वातील आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद अशीच घटना म्हणावी लागेल. वाचकच नाहीत असे म्हटले जात असताना ‘ कल्लोळतीर्थ ‘ ला मिळालेल्या या यशाचे जाणवलेले कारण एकच ‘कल्लोळतीर्थ ‘ च्या विषयाचे वेगळेपण आणि दर्जेदारपणा.  याचा अर्थ एकच ‘साहित्यात आपण काहीतरी वेगळे दिले, वेगळ्या विषयावरील दिले तर त्याचे उत्स्फूर्त स्वागत हे होतेच.’ हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.

कल्लोळतीर्थ ही  ‘शिल्पकलेवरील’ मराठीतील अपवादात्मक ( कदाचित एकमेव ) कादंबरी. ‘कल्लोळतीर्थ ‘ नंतर लेखिका भूपाली निसळ यांच्याकडून वाचकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्ती करणारी आणि लेखिकेकडून आणखी अपेक्षा निर्माण करणारी ‘अनादिसिद्धा ‘ ही दुसरी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

खरेतर आपल्याला सर्वच कलांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. त्यातही लेणी आणि शिल्पांचा तर खूप प्राचीन काळापासून वारसा लाभला आहे पण काही ठराविक लेणी आणि शिल्पे वगळता याची माहिती आणि  अभ्यासक वगळता फारच अल्प लोकांना आहे असे खेदाने म्हणावे लागते. लेणी-शिल्पकला केंद्रस्थानी ठेवून मराठी ललितसाहित्यात म्हणावे असे लेखन झालेले नाही, ते वाचकांपर्यंत आलेले नाही असे म्हणले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. अशा पार्श्वभूमीवर भूपाली निसळ ही युवती लेण्यांचा, शिल्पांचा अभ्यास करते, त्यावर मराठीत कादंबरी लिहिते हे खूपच कौतुकास्पद आहे.

चालुक्यकालीन वातापी येथील लेण्यांच्या, शिल्पांच्या निर्मितीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन लेखिका भूपाली निसळ यांनी ‘अनादिसिद्धा ‘ही कादंबरी लिहिली आहे. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन म्हणले की ते बोजड शब्दांतील, कंटाळवाणे असते किंवा असणार हा सर्वसामान्य वाचकांचा असणारा समज लेखिकेच्या ‘कल्लोळतीर्थ ‘ आणि ‘अनादिसिद्धा ‘ या दोन्ही कादंबरींनी खोडून काढला आहे.

‘अनादिसिद्धा ‘ चा काळ आहे तो साधारण सोळाशे वर्षांपूर्वीचा, साधारण सहाव्या शतकातील. आजच्या बदामी आणि तत्कालीन चालुक्यशासीत प्रदेशातील लेण्यांच्या निर्मितीवरील या कादंबरीत आज रूढ नसणारे काही शब्द येतात पण त्या शब्दांचा अर्थ तळटीप लिहून देण्यात आला आहे हे याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य आहे, कादंबरीची सुरवात होते तीच मुळी नाटकासारखी पात्र परिचयाने आणि तिथूनच रसिक वाचक कादंबरीशी जोडला जातो.

तो जसजसा कादंबरी वाचत जातो तसतसा तो वाचक न उरता त्यातील घटनांचा साक्षी बनत जातो, दर्शक बनत जातो.. आणि हे लेखिकेचे शब्दसामर्थ्य आहे.

बदामी परिसरात चालुक्यसाम्राट राजा कीर्तिवर्मा याच्या राजवटीत अनेक मंदिरे, लेणी – गुंफा यांची निर्मिती झाली. त्यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन लेखिकेने ही कादंबरी लिहिली आहे. सम्राटाचा अनुज, सेनापती,   वास्तुविशारद, प्रमुख शिल्पी ( शिल्पकार ), शिल्पी या मंदिरे आणि शिल्प निर्मितीत योगदान असणाऱ्या काही पात्रांबरोबर रेवती, हरिदत्त यांसारखी काही काल्पनिक पात्रेही या कादंबरीत येतात पण वास्तव आणि काल्पनिक यांचे अतिशय सुरेख, मनभावक अद्वैत साधण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

समर्पितता, आदर, आस्था, प्रेम, अहंकार, द्वेष इत्यादी मानवी भावभावनांचे आणि श्रेयवादाचे कादंबरीतील चित्रण कुठेही बटबटीतपणा येऊ न देता अतिशय संयत रूपात या कादंबरीत येते आणि ते वाचताना कादंबरी वाचकाला त्या काळात घेऊन तर जातेच पण त्याचबरोबर ती समकालाशीही  जोडत राहते हे या कादंबरीचे आणि लेखिकेचे अपूर्व यश म्हणावे लागेल.

कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते ती तिच्या आरंभापासूनच .. अगदी कादंबरीच्या अर्पणपत्रिकेपासूनच ! कादंबरी तीन प्रकरणात विभागली असून प्रत्येक प्रकरणाला अतिशय सार्थ, सुंदर, मनभावक आणि चिंतनीय अशी  वेगळी चिंतनीय अर्पणपत्रिका आहे हे ‘अनादिसिद्धा ‘ चे आणखी एक वेगळे वैशिष्ठय आहे.

कादंबरी वाचताना ‘ स्थिरता निर्माणाची स्वप्ने देते, उत्तुंगता देते. ‘ अशी वैश्विकसत्य सांगणारी, जीवनार्थ सांगणारी सुंदर वाक्ये अगदी सहजतेने ,ओघात येतात आणि क्षणभर वाचकाला थबकवतात. काही वाचकांना ती, कादंबरीचे स्वतःचे वेगळेपण अधोरेखित आणि अबाधित ठेवूनही वि.स.खांडेकरांचे आणि त्यांच्या साहित्यातील जीवनचिंतनाचे स्मरण करून देतात. हे लेखिकेच्या लेखनशैलीचे आणि ‘अनादिसिद्धा’ चे वैशिष्ठय म्हणावे लागेल.

‘अनादिसिद्धा ‘ कादंबरीत प्रारंभी दिलेला बदामी परिसरातील शिल्पस्थळांचा नकाशा तसेच संजय दळवी यांचे मुखपृष्ठ छायाचित्र व प्राजक्ता खैरनार यांच्या शिल्पांच्या छायाचित्रे लेखिकेच्या अभ्यासाची ग्वाही देतात आणि वाचकाला वाचनप्रवासात सहाय्यभूत ठरतात,भावूनही जातात.

‘अनादिसिद्धा ‘ ही लेणी-शिल्प निर्मितीवरील, वेगळ्या भवतालाचा वेध घेणारी मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरावी अशी सर्वांगसुंदर कादंबरी आहे हे निश्चित !

पुन्हा पुन्हा वाचण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘अनादिसिद्धा कादंबरीने लेखिका भूपाली निसळ यांच्या साहित्यलेखनाबाबतच्या अपेक्षा आणखी उंचावून ठेवल्या आहेत.’अनादिसिद्धा’ कादंबरी साठी आणि पुढील साहित्यलेखनासाठी भूपाली निसळ यांना खूप खूप शुभेच्छा !

प्रस्तुति – श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आरबूज… श्री रवी राजमाने ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?पुस्तकावर बोलू काही?

☆ आरबूज… श्री रवी राजमाने ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

कथासंग्रह : आरबूज

लेखक–  श्री.रवी राजमाने

प्रकाशक : ललित पब्लिकेशन, मुंबई

“ आरबूज“ —अस्सल गावरान मातीच्या कथा – सौ. सुचित्रा पवार

नुकताच रवी राजमाने सरांचा ‘आरबूज ‘ हा कथासंग्रह वाचला. एकूण १४कथा असलेला, मुलखावेगळ्या अस्सल गावच्या माणसांच्या व्यक्तिचित्रणाचा हा संग्रह वाचनीय आहे.

आरबूज म्हणजेच अफलातून, मुलखावेगळी असणारी माणसे, ज्यांना कधी प्रसिद्धी मिळालेली नसते, कधी पैश्यासाठी हापापलेपण नसते की कधी कुणाकडून कसली अपेक्षा नसते. मात्र ही माणसे समाजोपयोगी असतात, समाजहितासाठी झटत असतात, त्यांच्या दररोजच्या सामान्य जगण्यातून, साधेपणातून, जगापुढे आदर्श ठेवत असतात. मात्र त्यांच्या कार्याची वाहवा कुठेच होत नसते. इतकेच काय गावाची वेस सोडून पलीकडे त्यांची महती सुद्धा कुणाला माहीत नसते.अत्यंत निर्लेप, सालस, गोड शहाळीसारखी असतात. जन्मतात अशीच जगातल्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यात आणि मरतात सुद्धा अशीच कुठंतरी कोपऱ्यात. जशी जिवंतपणी अदखलपात्र असतात तशीच मृत्यूनंतरही ती कुणाच्या लक्षात रहात नसतात. कधी त्यांचा शेवट सुखांत होतो तर कधी करुण दुःखांत.

सरांच्या परिचयातील अशाच साध्या भोळ्या पण अफलातून, सरांना भावलेल्या माणसांच्या जीवनकथा सरांनी आरबूज मध्ये चित्रित केल्या आहेत.

शाळेच्या आवारात मुलांना भडंग, गुलाबजाम विकणारा महादूमामा मुलांच्या आरोग्यासाठी स्वतःच सर्व पदार्थ घरी बनवतो व विकतो.पोटासाठी राबणाऱ्या महादूमामांचे मन साफ आहे.. दररोज मैलोनमैल सायकल मारत जाऊन  संसाराचा गाडा चालवणारे मामा आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्टच करतात आणि एक दिवस सहजच या जगाचा निरोप घेतात. त्यांच्या प्रेमळ प्रामाणिक वागण्याची दखल जग कधीच घेत नाही.

अंजुम-सायबाची प्रेमकहाणी ही अशीच एकनिष्ठ आहे. आयुष्यभर माहेर तुटलेली सुंदर अंजुम हिंदू सायबाशी एकनिष्ठ राहून पुढं आपल्या मुलांना समाजात त्रास होऊ नये म्हणून निपुत्रिक रहाते, पण समाजाची पर्वा न करता सायबा विवाहित असूनदेखील विनातक्रार आपला पत्नीधर्म निभावते.

असाच ग्रामपंचायत आणि गाव स्वच्छ करणारा चिमा पदरमोड करून छोट्या मुलांना गोळ्या  देऊन खुश ठेवतो.

स्वतःच्या पोटाला कमी पडले तर चालेल पण दारात आलेल्या पक्षांना खाऊ घालणारी सीतामाई पण अशीच भूतदया जपणारी आहे.आयुष्यभर आपले व्रत जपत सहजच झोपलेल्या जागी क्षणात जग सोडून जाते.

स्वतः पालावर भटकंती करत खडतर आयुष्य जगणारा दगड्या गोविंदार्या असो, की पुरुषांच्या बरोबरीने पुरुषी कामे करणारी कल्पनामावशी असो, पोटासाठी राबणारी ही माणसे जगाची पर्वा न करणारी आहेत.दररोजच्या जगण्याच्या प्रश्नाला भिडत आनंदाने दुःख पचवत जगत आहेत.

गांधीवादी विचारसरणीचे, स्वच्छतेचे भोक्ते असणारे,आपल्या तत्वांशी प्रामाणिक, एकनिष्ठ रहात शिक्षणाधिकारी बी.  डी.ओ. बापू एकाकी आयुष्य जगतात आणि एकाकीच मरतात. जगावेगळ्या असणाऱ्या माणसांना जग आपल्यात सामावून घेत नसते हेच खरे.

३० फूट खोल विहीर एकटाच खोदणारा, स्वतःच्या घराचे सर्व सामान दूरवरच्या अंतरावरून सायकलवरून आणून टाकताना स्वतःचे हसे करून घेणारा अरबूज – गुलाब हुसेन भालदार उर्फ बाळू- अचाट ताकदीचा आहे. त्याच्या अचाट ताकदीचा गैरवापर मात्र तो कधीच करत नाही. आपले शेत कसून साधे सरळ जीवन जगत आहे. इतक्या अचाट ताकदीच्या माणसाची खबर कुठल्याच वृत्तपत्राला अथवा टीव्हीलाही नाही !

असाच अचाट ताकदीचा पैलवान परसूदादाही. 

कुटुंबप्रमुख पुरुष कर्तृत्ववान  नसेल तर  कुटुंबाची आबाळ होते, हालअपेष्टा होते. मात्र गृहिणी कर्तृत्ववान असेल तर ती आपल्या कुटुंबाला प्रत्येक अडीअडचणीतून तर सोडवतेच, पण आपल्या मुलाबाळांवर योग्य संस्कार करून, त्याना जीवनाची दिशा देऊन, आपला एक आदर्श निर्माण करणारी गंगू नानी म्हणजेच सरांच्या मातोश्री होत.

मोडलेल्या हाडांचे सांधे जुळवण्याचे कसब अंगी असणारा देवमामा कोणाचेही कसलेही हाड मोडलेले असले तरी आपल्या हातकौशल्याने व कसबीने बिना मोबदला बसवून देतात. खेडोपाडी डॉक्टर ,औषधोपचार मिळेपर्यंत रुग्णाचा आजार बळावायचा, म्हणून लोक देवमामाकडे जाणेच पसंत करत. देवमामा नावाप्रमाणेच देवमाणूस होता. एकदा गावातील एका शेतात धनगराचे पोर बाभळीवरून खाली पडले आणि पाय मोडला. मुलाच्या वडिलांनी त्याला देवमामाकडे आणले. पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या धनगरांकडे शहरात जायला कुठले वाहन आणि पैसे ? तरी पण देवमामाने बिना मोबदला हे काम केले म्हणून एक बकरीचे पिलू तो धनगर देवमामाला देऊ करतो पण देव मामाच्या निःस्वार्थी मनाला ते पटत नाही. म्हणून मामा ते पिलू खांद्यावर टाकून धनगराच्या वस्तीवर चालत नेऊन परत करतात.

साहित्यावर भरभरून प्रेम करणारे ,साहित्य उपासना करणारे, पण प्रसिद्धीपासून नेहमी दूर रहाणारे चंदा जोशी दादा असेच साधे, निगर्वी व्यक्तिमत्त्व.

नेहमीच समाजाच्या  नजरेत तिरस्कृत असणारी, माणूस असूनही समाज जिला जवळ करत नाही असे पायलसारखे कितीतरी शिखंडी आयुष्यभर अवहेलनेच्या आगीत धुमसत रहातात. ना नातेवाईक, ना समाज, कोणीच त्यांना आपलेसे करत नाही की त्यांच्यावर माया करत नाहीत. पायलची कहाणी वाचून खरंच हृदय कळवळून जातं. हा दैवी शाप तर नसेल ना?असे वाटते. पायलसारख्या अनेक उपेक्षितांना माणसात घेणे, त्यांना माणूस म्हणून सहज वागणूक देणे खरेच गरजेचे आहे.

आरबुजच्या माध्यमातून सरांनी आदर्श पण उपेक्षित,अदखल व्यक्तींची दखल आपल्या कथासंग्रहातून घेतली आहे. गावोगावच्या अशा आरबूज लोकांचा सत्कार व सन्मान व्हायलाच हवा.

आरबूज… लेखक – श्री रवी राजमाने

समीक्षक – © सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गारवा” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “गारवा” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – गारवा (काव्यसंग्रह)

कवियत्री – सौ. राधिका भांडारकर, पुणे

प्रकाशक – ॲड. जयमाला भगत, अजिंक्य प्रकाशन, वाशीम

मुद्रक – अजिंक्य एंटरप्राईझेस,वाशीम

अक्षर जुळवणी – अरविंद मनवर

प्रस्तावना – सौ. शोभा अवसरे (+91 98704 94993)

मुखपृष्ठ – कु. सायरा वाघमोडे ॲटलांटा (वय वर्ष्ये ९)

मूल्य – रू.१५०/—

सौ राधिका भांडारकर

माझ्या हातात सौ. राधिका भांडारकर यांचा गारवा हा नवा काव्यसंग्रह आला आणि जसजशी मी एकेक कविता वाचत गेले तसतशी मी त्यांत डुबूनच गेले.

एकूण ३३ कवितांचा हा संग्रह. ह्यात राधिकाताईंनी जीवनातील विविध विषय हाताळले आहेत. त्यात जीवनाविषयीचे तत्वज्ञान आहे, माणसांच्या प्रवृत्तींचे वर्णन आहे, जबाबदार नागरिक म्हणून त्यांची कर्तव्ये आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, आईची माया आहे, बदललेला काळ आहे, ईश्वरी शक्तीचा विश्वासही आहे.

बहुतांशी कविता मुक्त छंदात असल्या तरी काही कविता षडाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी, अक्षरछंदातही आहेत. यावरून नियमबद्ध कविता लिहिण्याचाही त्यांना चांगलाच सराव असल्याचे दिसून येते.

भासमय आणि तुझे आहे तुजपाशी ह्या कवितांतून माणसाच्या प्रवृत्ती दिसून येतात. असमाधानी वृत्तीमुळे मृगजळामागे तो कसा धावतो नि त्याची फसगत होऊन नैराश्य पदरी येते हे त्यांनी साध्या सरळ सोप्या भाषेत दाखवून  दिले आहे. त्या लिहितात…..

आपुले आपुल्यापाशी

परि नजर पल्याडी

ऊन पाण्याचाच खेळ

वाट खोटी वाकडी

खरंतर प्रत्येकच कवितेतील त्यांची भाषा सहज सुलभ असल्यामुळे कविता अधिक जवळची वाटते. कुठेही क्लिष्टता नाही, भाषेचे अवडंबर नाही.

ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद शिरावर असल्यानंतर केलेल्या कष्टाचे चीज होऊन सुखासमाधानाचे, आनंदाचे भरभराटीचे दिवस दिसतात हे सांगताना आशीर्वादया कवितेत त्या लिहितात…

आता काही कमी नाही

आयुष्यात कष्ट केले

आनंदाने केले सारे

त्याचे मात्र चीज झाले

आता खरे जाणवते

यशाकडे पाहताना

आशीर्वाद होता त्याचा

मन भरे म्हणताना

पदरया कवितेत पदराची बहुरूपे दाखवून जीवनाची वास्तवता कवियत्रीने वाचकांना सादर केली आहे.

पदर खांद्यावर

पदर डोक्यावर

तो कधी जरतारी

तर कधी ठिगळे लावलेला

सार्‍या संसाराची मदार या पदरावर असते. हलक्या फुलक्या शब्दांतून अतिशय गहन विचार या कवितेत मांडला आहे.

एखादी गोष्ट करायची नसली तर वेळ मिळत नाही ही सोयीस्कर सबब सर्वसाधारणपणे आपण सगळेच देत असतो. वेळच मिळत नाही ह्या कवितेत कवियत्री वेळ मिळत नसतो, तो काढायचा असतो आणि त्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते हा फार मोलाचा संदेश देतात.

मुलगा नसल्याची खंत आज आपण इतके प्रगत असलो तरी पुष्कळच कुटुंबात दिसून येते, किंबहुना समाजालाच त्याची जास्त चिंता असल्याचे दिसून येते. तीह्या त्यांच्या कवितेत राधिकाताईंनी समाजाला सडेतोड उत्तर दिले आहे. त्या लिहितात…

दोन लेकी लेक नाही?

प्रश्न भारी मनमोडी

यांना कसे समजावे

कन्या तिची माया वेडी

राधिकाताईंचा पिंड कथा लेखिकेचा.त्यामुळे त्यांना कथा कशी सुचते,त्याची निर्मीति कशी होते हे त्या सहजपणे त्यांच्या नादखुळा आणि शब्दगंगा ह्या दोन कवितांतून सांगून जातात.

ह्या पुस्तकात तीह्या शिर्षकाच्या दोन कविता आहेत. एक ती कन्या आणि दुसरी ती कविता. दुसर्‍या ती मध्ये साहित्यिक राधिकाताई दिसतात.

एक वादळ आलं

शब्दांच्या लाटा घेऊन

मनाच्या कागदावर फुटलं

आणि मन रितं केलं लिहून

साहित्य निर्मीतीची ही प्रक्रिया असं मन उफाळून आल्याशिवाय होऊच शकत नाही.

दप्तर ही अशीच मनाला चटका लावणारी कविता. कवियत्रीला आईच्या मायेचा ओलावा दिसतो तिच्या जपून ठेवलेल्या फाटक्या दप्तरात.

घरात पाव्हणे रावणे येणं, लेकी बाळी येणं, नातवंडांनी घर निनादून जाणं, ह्यासारखा आनंद कोणता? असे पाहुणे येती आणि क्षण ह्या दोन कविता वाचताना लक्षात येते.

“सारथी”, “धरावी कास”, “असे आणि तसे”, इत्यादी कवितांतून राधिकाताईं माणसांनी कसे जगावे, विवेक, सकारात्मकता, सत्यप्रियता वगैरे गोष्टी सुखी जीवनासाठी किती आवश्यक आहेत ते त्यांच्या सहज सुलभ शैलीतून वाचकांपर्यंत पोहोचवितात, त्यांना अमूल्य संदेश देतात.

धरावी कास या कवितेत सकारात्मक वृत्तीचे महत्व त्या सांगतात……

*अपयशामागून

यश हासते

सामोरी जाता

ओंजळी भरते

अगदी मोजक्या शब्दात किती महान तत्वज्ञान त्या सांगून जातात.

आयुष्यात पती~पत्नी हे नाते अतिशय पवित्र, प्रेमळ असते. पण तरीसुद्धा कधी कधी कसलातरी सल मनाला डाचत असतो. कुठे तरी काही कारणास्तव मन विषण्ण होते. अशीच मनोवस्था दाखविणारी तुकडेही दशाक्षरी काव्यरचना!

स्त्री कितीही शिकली तरी तिला स्वतःला बर्‍याचदा एका चौकटीत बंदिस्त करून घ्यावे लागते हे राधिकाताई त्यांच्या दार या कवितेत वाचकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.

तू असा मी अशी या कवितेत सेवा निवृत्त पती पत्नीचे नाते अगदी सहजरित्या वाचकांपुढे उभे केले आहे. तुझं नि माझं जमेना पण एकमेकांवाचून चालेना अशी गत ह्या सहजीवनात असते. वरवर कविता हलकी फुलकी वाटली तरी ती फार सखोल आहे.

गारवा ही कविता पहिल्या पावसाचे वर्णन करणारी. पावसाच्या आगमनाने हवेत जसा गारवा येतो तसाच तो मनालाही येतो हे भाव व्यक्त करणारी कविता.

आपल्या अवती भवती असणारी माणसं,नात्याचे बंध,जीवनात येणारे विविध अनुभव, कधी आनंदी तर कधी खिन्न असणारे मन, अशा परिस्थितीत ह्या संग्रहातील कविता वाचल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते, शांत वाटते म्हणून हा मनाला भासणारा गारवाच आहे.

सर्वच कविता वाचनीय आहेत, अधिकाधिक लोकांनी वाचाव्यात अशाच आहेत.

राधिकाताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा!त्यांची ही साहित्यसेवा अखंडित अशीच चालत राहो, त्यांनी लावलेला साहित्याचा हा नंदादीप दिवसानुगणिक उजळत राहो.

पुस्तक परिचय – सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बॅरिस्टर नाथ पै : लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” – संकल्पना – संजय रेंदाळकर ☆ परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “बॅरिस्टर नाथ पै : लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” – संकल्पना – संजय रेंदाळकर ☆ परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

संकल्पना – संजय रेंदाळकर,

संकलन – सुनील कोकणी, संकेत जाधव.

सृजन प्रकाशन, इचलकरंजी. 

प्रथमावृत्ती – 1 मे 2022.

इचलकरंजी येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते संजय रेंदाळकर यांच्या संकल्पनेतून सुनील कोकणी आणि संकेत जाधव यांनी खास मुलांसाठी बॅ. नाथ पै यांचे विचार आणि जीवनप्रवास उलगडणारे पुस्तक संकलित केले आहे. 

बॅ. नाथ पै यांना ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हटलं जातं. विरोधकांनाही मंत्रमुग्ध करणारे अलौकिक वक्तृत्व नाथांनी अंगभूत गुणांना प्रयत्नांची जोड देऊन कमावले होते. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या भाषणातील प्रमुख विचार या पुस्तकात संग्रहीत केलेले आहेत. नाथांचे देशभक्ती विषयक विचार, स्वातंत्र्य आणि लोकशाही बाबतची मते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कोकणावरील निस्सीम प्रेम, सीमाप्रश्नाबाबतची धडपड, विद्यार्थी व नागरीक यांना केलेले मार्गदर्शन, कलावंतांची केलेली कदर याविषयी त्यांचे विचार या पुस्तकात वाचायला मिळतात. 

“स्वातंत्र्य आणि लोकशाही ही आमची प्राणप्रिय मूल्ये आहेत. या मूल्यांचे जतन करायचे आहे. स्वातंत्र्याची पावन गंगा हिंदुस्तानच्या गावागावात जाईल; आणि मगच आमचे स्वातंत्र्य अजिंक्य होईल, अमर होईल. लोकशक्ती हाच लोकशाहीचा पाया असतो. ती राजशक्तीपेक्षा प्रभावी असते. मतदार हेच राष्ट्राचे खरे पालक आणि संरक्षक आहेत. गीतेप्रमाणेच राज्यघटना हाही माझा पवित्र ग्रंथ आहे,” असे ते म्हणत.

साहित्यिक, कलावंत यांच्याबद्दल त्यांना विशेष अभिमान होता. लेखक, कलावंत हे फार थोर असतात. त्यांचे विश्व हे अविनाशी आहे, असे ते मानत. कोकणातील दशावतार या कलेबद्दल त्यांचे प्रेम हे या ठिकाणी अधोरेखित केले आहे.

‘घटनादुरुस्ती विधेयक’ हा बॅरिस्टर नाथ पै यांच्या संसदीय कार्यकर्तृत्वाचा कळस म्हटला जातो. या विधेयकासाठी नाथांनी आपल्या बुद्धिचातुर्य, अभ्यास आणि तेजस्वी वाणीने जे योगदान दिले त्याबद्दल या पुस्तकात माहिती दिली आहे. बॅ. नाथ पै यांना पदोपदी सहकार्य करणारे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वासू देशपांडे सर यांनी नाथ आपणांस सोडून गेल्यानंतर त्यांना उद्देशून लिहिलेले पत्रही या पुस्तकात दिले आहे. नाथांना आपल्या सहका-यांविषयी असणारा जिव्हाळा, स्वतःपेक्षा देशसेवेसाठी झिजण्याची वृत्ती, कोकणावरील प्रेम याविषयी या पत्रात वाचायला मिळते.

“असिधारा व्रताने सेवादलाचे कार्य करूया ” हा नाथांचा संदेशही या पुस्तकात अधोरेखित केला आहे. यांच्याविषयीचे भाई वैद्य, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, जयानंद मठकर, बबन डिसोजा, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक विभूतींचे कौतुकोद्गार येथे संग्रहित केलेले आहेत. 

बॅ. नाथ पै यांच्या जीवनप्रवासातील महत्त्चाच्या घटना तारीखवार देण्यात आल्या आहेत. नाथांच्या जीवनातील दुर्मिळ क्षणचित्रांचाही या पुस्तकात संग्रह करण्यात आला आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर कविवर्य मंगेश पाडगावकर यांची “ ज्यांची हृदये झाडांची ” ही कविता वाचायला मिळते.

या पुस्तकाचे प्रकाशन साने गुरुजी पुण्यतिथी दिवशी बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

पुस्तक परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव   आणि शेवटी तात्पर्य(लघुकथा संग्रह)

मूळ लेखिका     हंसा दीप

अनुवाद            उज्ज्वला केळकर

प्रकाशक           मिलिंद राजाज्ञा

पृष्ठे                  १८४

किंमत              रु. ३३०/-

नुकताच,  सौ उज्ज्वला केळकर यांचा, “आणि शेवटी तात्पर्य ..”हा अनुवादित कथासंग्रह वाचनात आला.

यात एकूण १७ कथा आहेत आणि त्यांच्या, मूळ हिंदी लेखिका, कॅनडास्थित डॉक्टर हंसा दीप या आहेत.

डॉक्टर हंसा दीप या मूळच्या भारतातल्याच. त्या आदिवासी बहुल परिसरात जन्मल्या, वाढल्या, शिक्षित झाल्या.  त्यांनी शोषण, भूक, गरिबीने त्रस्त झालेल्या आदिवासींचे, तसेच परंपरांशी झुंजत, विवशतांशी लढणाऱ्या मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून अनुभवले. त्यातूनच या कथा जन्माला आल्या.सृजन व संघर्षाचा अनुभव देणाऱ्या, या सुंदर कथांचं,  नेहमीप्रमाणेच उज्ज्वला ताईंनी केलेले अनुवाद लेखन, तितकंच प्रभावी आणि परिणामकारक आहे, हे या कथा वाचताना जाणवतं.

यातली पहिलीच, शीर्षक कथा ..”आणि शेवटी तात्पर्य ..”वाचताना, एक सहज वास्तव मनाला स्पर्शून जातं.  परदेशातले एक मंदिर आणि तिथे ध्यान धारणेसाठी जमलेली परदेशस्थित, भारतीय तरुण, वृद्ध, मध्यमवर्गीय माणसे. त्यांचे आपापसातले संवाद, चर्चा, आणि एकंदरच, वरवरचं  भासणारं वातावरण. या भोवती मंदिरातल्या पंडितांचही जोडलेलं, पोटासाठीचं भक्तिविश्व. केवळ एक व्यवसाय. आणि या सर्वांचे, शेवटी तात्पर्य काय तर मंदिरात येणारे भाविक आणि पंडित यांचा उथळपणा.

‘आपण काही क्षण तरी नतमस्तक झालो’, इतकेच श्रद्धेचे मापदंड.आणि त्यांच्या भावना एनकॅश करणारे पंडीत.  याचे सहज प्रतिबिंब, या कथेत उमटले आहे.

पोपटी पान पिवळं पान… या कथेत एका वृद्ध असहाय झालेल्या, एकेकाळच्या प्रख्यात डॉक्टरांची, एकाकी मानसिकता, त्याला बेबी सिटिंग च्या निमित्ताने सापडलेल्या, काही महिन्यांंच्या बाळासोबत झालेल्या दोस्तीमुळे, कशी बदलते, याचं अत्यंत भावस्पर्शी, अद्भुत वर्णन वाचायला मिळतं.

प्रतिबिंब…. ही कथा तर अत्यंत ह्रदयस्पर्शी आहे. नातीच्या आणि आजीच्या नात्याची ही कथा अतिशय भावपूर्ण, सहज बोलता बोलता लिहिली आहे.

जी आजी, नातीला लहानपणी  प्रॉब्लेम आजी वाटायची, तीच आजी, नात स्वतः मोठी झाल्यावर तिच्या अस्तित्वात कशी सामावून जाते, या प्रवासाची ही एक सुंदर कहाणी.

रुबाब… ही कथा लहान मुलांच्या विश्वाची असली तरी, माणसाच्या जीवनात पॉवर ही कशी काम करते, आणि त्यातूनच लाचखोरीची वृत्ती कशी बळावते, याचीच सूचना देणारी, काहीशी रूपकात्मक कथा वाटते.

मला नाही मोठं व्हायचंय… या कथेतील शेवटची काही वाक्यं मनाला बिलागतात.  कथेतल्या परीचे बालमन का दुखतं, त्याचं कारण हे शब्द देतात.

“मोठ्या लोकांना कळतच नाही की, जे तिने बघितले आहे,तिला आवडले आहे तेच काम ती करू शकेल ना? तिला पसंत असलेलं प्रत्येक काम ही मोठी माणसं रिजेक्ट का करत आहेत? तिच्या ‘मी कोण होणार’ या कल्पनेला का डावलतात?”

मग तिने मोठे होण्याचा विचारच मनातून काढून टाकला. वरवर ही बालकथा वाटत असली तरी, ती रूपकात्मक आहे, माणसाच्या जीवनाला एक महत्वाचा संदेश देणारी आहे.

छोटुली…  या कथेतल्या बालकलाकारावर, पालकांच्या प्रसिद्धी, पैसा, एका ग्लॅमरच्या मोहापायी होणारा आघात अनुभवताना, मन अक्षरशः कळवळते.

तिचं सामर्थ्य… ही कथा एका शिक्षण संस्थेत असलेल्या, द्वेषाच्या स्पर्धेवर प्रकाश टाकते.मिस हैली,एक प्राध्यापिका, तिच्यावरचे आरोप ती कशी परतवून लावते,आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करते याची ही ऊत्सुकता वाढवणारी  कथा ,खूपच परिणामकारक आहे.

प्रोफेसर …ही कथा फारशी परिणामकारक नसली तरीही प्रोफेसर, विद्यार्थी, शिक्षणाबद्दलची अनास्था, राजकारण आणि या पार्श्वभूमीवर अधिकार आणि कर्तव्य याची, उपरोधिक, उपहासात्मक केलेली उलगड, ही चांगल्या प्रकारे  झाली आहे.

पाचवी भिंत… ही कथा समता सुमन या निवृत्त होणार्‍या,शाळेत प्राचार्य असलेल्या व्यक्तीच्या राजकारण प्रवेशाची आहे. काही धक्के बसल्यानंतर, राजकारण की पुन्हा शांत जीवन, या द्वद्वांत सापडलेल्या मनाची ही कथा खूपच प्रभावी आहे. आणि शेवटी समताने स्वीकारलेले आव्हान, आणि तिचे खंबीर मन, या कथेत अतिशय सुंदररित्या चितारले आहे.

रुपेरी केसात गुंतले ऊन… ही कथा तशी वाचताना हलकीफुलकी वाटली तरी, त्यात मनाच्या गाभाऱ्यातलं एक गंभीर खोल सत्य जाणवतं. आठवणीत रमलेल्या चार वृद्ध बहिणींच्या गप्पा, या कथेत वाचायला मिळतात.

“आतलं दुःख आजच काढून टाकायचं. हसून ,घ्यायचं.”

कुंडीतील सुकलेली फुले, पुन्हा नव्याने ताजी होत होती …..ही काही वाक्यं अंतराचा ठाव घेतात.

बांधाच्या खांद्यावर नदी.. .या कथेत भावनिक आंदोलनात सापडलेली स्त्री, अखेर त्यातून स्वतःच कशी सावरते, याचे एक सकारात्मक भावचित्र रेखाटलं आहे.

मधमाशी…ही कथा उल्लेखनीय आहे. अतिशय तरल भावनेला, बसलेला धक्का,यात अनुभवायला मिळतो.

तिचं हसू …..ही कथा जाणीवा नेणीवांच्या पलीकडची आहे.  या कथेत एका अकल्पित प्रेमाची ओळख होते. चूक की बरोबर या सीमारेषांच्या पलीकडे गेलेली, ही कथा मनाला घट्ट धरून ठेवते.

समर्पण…. या कथेत कोरोनाचा तो एक भयाण असा विनाशकारी काळ ,एका वेगळ्याच मानवतेचं ही दर्शन देतो. एक वृद्ध रुग्ण, स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा, एका तरुण रुग्णाच्या,  संपूर्ण भविष्याचा विचार करून मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होते.

“त्याला या वेंटिलेटरची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. मी माझं आयुष्य जगले आहे. त्याचं जगणं महत्त्वाचं आहे.” असं डॉक्टरांना सांगून ती तिच्या जीवनाचे समर्पणच करते. अतिशय सुंदर कथा!

माझ्या घरच्या आघाडीवर….. ही कथा तशी हलकीफुलकी असली तरी परिवाराच्या सौंदर्याची मेख सांगणारी आहे. स्त्री सवलीकरणाच्या आंदोलनापासून, सुरुवात होणाऱ्या या कथेत, अंदोलनातला रुक्षपणा पटवून देणारी, काही वाक्यं मनाला फारच पटतात.

सविता, नेहा, एलिसिया, आणि यापूर्वी पाहिलेली आजी, आई, यांचा रुबाब सुयशच्या विचारांना नवी दिशा देतात. हे चेहरे त्याला आपले वाटतात. त्यांच्या धमकी भरलेल्या आवाजातही,प्रेम स्त्रवस्त असतं. ते संबंध परिवाराचा अर्थ शिकवतात. हे त्याला जाणवतं.थोडक्यात,या कथेत स्त्रियांच्या अनोख्या शक्तीत घेरलेलाच एक नायक आपल्याला भेटतो.

भाजी मंडई ….या कथेत एक विश्वस्तरीय समारंभात, देश विदेशी साहित्यिकांनी, स्वतःच्या सन्मानासाठी उठवलेला अभूतपूर्व गोंधळ अनुभवायला मिळतो. त्यातून प्रसिद्धीसाठी हापापलेल्यांचे मनोदर्शन अत्यंत वास्तविकपणे उभे रहाते.

अशा विविध विषयांवर हाताळलेल्या या सर्वच कथा मनोरंजना बरोबरच एक प्रकारचं ब्रेन वॉशिंगही करतात. आयुष्यात घडणाऱ्या बिन महत्वाच्या, साध्या, घटनातूनही आशय पूर्ण संदेश देण्याची, लेखिकेची क्षमता, कौतुकास्पद आहे.

आणि शेवटी तात्पर्य काय?.. तर एक अनोखे उत्कृष्ट कथा वाचनाचे समाधान!! उज्ज्वला ताईंची भाषांतर माध्यमांवर असलेली जबरदस्त पकड, याची पुनश्च जाणीव. त्यांचे अनुवादित लेखन, इतकं प्रभावी आहे की कुठेही मूळ कथा वाचनाचा, वाचकाचा आनंद, हिरावला जाऊच शकत नाही.  त्यासाठी आपल्याच संस्कृतीत रुजणाऱ्या कथांची, त्यांची निवड ही उत्तम आणि पूर्ण असते.

वास्तविक या कथा परदेशी वातावरणात घडलेल्या आहेत. पण तरीही त्या तिथल्या भारतीयांच्या आहेत. आपल्या संस्कृतीशी जुळणाऱ्या आहेत. म्हणून त्या वाचकाशी कनेक्ट होतात.

विचारांना समृद्ध करणाऱ्या या कथासंग्रहाबद्दल मूळ हिंदी लेखिका डॉक्टर. हंसा दीप (टोरांटो कॅनडा) आणि अनुवादिका सौ उज्ज्वला केळकर या दोघींचेही आभार आणि मनापासून अभिनंदन!!

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

लेखक -सदानंद कदम

प्रकाशक- सुनील अनिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस,

प्रथमावृत्ती -नोव्हेंबर,२०२१

सदानंद कदम यांचे ‘सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा’ हे पुस्तक वाचायला मिळालं, तेव्हा खरं सांगायचं तर मला लेखकाविषयी काही माहिती नव्हती. पण जेव्हा पुस्तक वाचले, त्यांना भेटलेल्या, त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींबद्दल वाचायला मिळाले तेव्हा खरंच पुस्तक खूप आवडले ! एक दोन नाही तर अठ्ठेचाळीस व्यक्तींविषयी त्यांनी लिहिले आहे. अनेक मोठमोठ्या व्यक्तींबरोबर घालवलेले काही क्षण, काही वेळ आणि त्यांचा संवाद त्यांनी खूपच छान  रंगवले आहे. विंदा करंदीकर, कवी कुसुमाग्रज, जगदीश खेबुडकर, शांता शेळके ही तर माझी अत्यंत आवडती व्यक्तिमत्व ! त्यांच्याविषयी वाचताना तर मन भारावून जाते !

बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, रणजित देसाई ,गो नी दांडेकर, यांनी लिहिलेल्या पुस्तकांची पारायणे केलेली.. अशा थोर लेखकांचा सहवास कदम यांना लाभला. जी डी बापू लाड, नागनाथ अण्णा, शंतनुराव किर्लोस्कर, तारा भवाळकर ही तर आपल्या सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व ! इतकेच नाही तर जयमाला शिलेदार, पद्मजा फेणाणी, भक्ती बर्वे ही आपल्या नाट्य गायन क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळी ! या सर्वांबरोबर काही काळाचा सहवास कदम यांना मिळाला हे तर त्यांचे भाग्यच !

त्यांचा प्रत्येक लेख वाचताना मनापर्यंत पोचतो हीच पुस्तक आवडल्याची पावती ! सुरेश भट, अशोकजी परांजपे, शाहीर योगेश या काव्यक्षेत्रातील ज्येष्ठ मंडळींचा थोडक्यात परिचय आणि लेखकाचा त्यांच्याशी काहीना काही कारणाने आलेला संबंध आणि त्याला अनुसरून त्यांना मिळालेला सहवास, यासंबंधीचे लेख वाचनीय आहेत.

अगदी सिंधुताई सपकाळ, प्रकाश आमटे यासारख्या समाज सुधारकांबरोबरही त्यांनी काही काळ व्यतीत केला होता, तर व. पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजीराव भोसले तसेच  सुहास शिरवळकर यांच्याही संपर्कात कदम हे काही काळ  होते. एका सामान्य घरात रहाणाऱ्या व्यक्तीने केवळ आपल्या जगण्याच्या आनंदासाठी पुस्तक वाचन, ग्रंथ वाचन यास वाहून घेतले, त्यासाठी भरपूर पुस्तके खरेदी केली. आणि या  सगळ्या सांगात्यांना  बरोबर घेऊन आपले आयुष्य आनंददायी घडवले. कदम म्हणतात, ‘ माझ्या स्मरणाच्या, आठवणीच्या त्या झुल्यावर आजही मी झुलत असतो आणि माझ्या सोयऱ्यांचे बोट धरून वाटचाल करत असतो.’ 

 ‘ सांगाती ‘ हे पुस्तक मला आवडले आणि इतरांनाही ते वाचावेसे वाटावे यासाठी हा पुस्तक परिचय !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आठवणींच्या रांगोळ्या’ – सुश्री हेमलता फडके ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आठवणींच्या रांगोळ्या’ – सुश्री हेमलता फडके ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

आठवणींच्या रांगोळ्या (आत्मवृत्त )

लेखिका : हेमलता भालचंद्र फडके 

प्रकाशन : प्रतिमा प्रकाशन 

(आठवणींच्या आकृती वेधक पण रंग उदास…)

हेमलता भालचंद्र फडके यांचं  “आठवणींच्या रांगोळ्या” हे आत्मवृत्त त्यांच्या व पतीच्या आठवणींचा संग्रह आहे. मराठीतील मान्यवर समीक्षक, प्राध्यापक डाॅ. भालचंद्र फडके यांच्या त्या पत्नी.. त्यांच्या निधनानंतर मन मोकळं करण्यासाठी त्यांनी ” शब्द ” या माध्यमाचा आधार घेतला..हे त्यांचं लेखन आठवणींचे कथन करणारे असल्यामुळे त्यात जीवनातले कडू गोड प्रसंग वर्णन करण्यावर भर आहे.

हेमलताबाईंनी आपल्या दोन्हीकडच्या आजोळचं चित्रण केलेले आहे.. त्या सोलापूरच्या.. माहेरचं नाव हेमलता बाबूराव कदम… महाविद्यालयीन वयात प्रा. भालचंद्र फडके त्यांच्या विधवा मावशीला शिकवायला घरी येत.. (सगळे घरचे त्यांना सर म्हणतं)

त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना ती म्हणजे सरांशी म्हणजेच प्रा. भालचंद्र फडके यांच्याशी केलेला प्रेमविवाह… भालचंद्र फडके कोकणस्थ ब्राम्हण तर या शहाण्णव कुळी मराठा.. पण त्यांच्या माहेरी प्रागतिक विचारांचा प्रभाव असल्यामुळे लग्नाला विरोध नव्हता, पण त्यांच्या आईचा मात्र होता.( त्यांना हे लग्न मान्य नव्हते) त्यामुळे प्रत्यक्ष लग्न होईपर्यंत बराच काळ गेला. इतकं होऊनही त्यांच्या सासूबाईनी त्यांना स्वीकारलं नाही. 

संघर्षशील संसाराचे हे स्मृतिचित्र — फडके यांच्याशी लग्न होईपर्यंतच्या कालखंडातील आठवणी यात आहेत..त्या सरांविषयीच्या आदराने आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने भारलेल्या आहेत. त्या लग्नानंतरही पतीला सरच म्हणत.. त्या लिहितात.. ते माझे जीवनसाथी असूनही माझे मार्गदर्शक होते. मला कधीही एक पै चा हिशोब विचारला नाही की घरात नवरेशाही दाखवली नाही…

नोकरी निमित्ताने भालचंद्र फडके यांना अकोला अमरावती येथे काही काळ वास्तव्य करावे लागले. तेथील त्यांच्या वास्तव्यातील फडके यांच्या सार्वजनिक जीवनातील यशस्वी सहभागाविषयी त्यांनी लिहिलेले आहे. ( भाषणे आदी माध्यमातून) … 

“ संसाराचं सामान हलवताना ‘— यात फडके यांच्या ( सरांच्या) पुस्तकसंग्रहाला मिळालेला डालडा तुपाच्या डब्यांचा सहवास– त्यामुळे घडलेलं रामायण, यांचे मिश्किल वर्णन त्यांनी केलं आहे..

ना.सी. फडके यांच्या उपस्थितीत फडक्यांनी ( सरांनी) केलेले परखड भाषण आणि ना.सी. फडके यांचे त्यावरील उत्तर…फडक्यांना पुणे विद्यापीठात नोकरी मिळाल्यानंतरचा हा प्रसंग लक्षात राहणारा आहे..

” तुकारामपणा ” हा त्यांचा स्वभाव हेमलताबाईंना खटकत असे.. विद्यापीठीय राजकारणाचे बसलेले चटके, त्यांच्या भिडस्तपणाचा इतरांनी घेतलेला फायदा, निवृत्तीनंतर पेंशन मिळण्यासाठी सात वर्षे करावी लागलेली प्रतीक्षा, या सा-या गोष्टी त्यांना संसार चालवतानाही त्रास देत होत्या.. त्या संदर्भात काही व्यक्तींचे तक्रारवजा उल्लेख यात प्रसंगपरत्वे आहेत..

मुलीचा जन्म व तिचे शिक्षण व स्वतः एम.ए ची पदवी प्राप्त करून विमलाबाई गरवारे प्रशालेत केलेलं अध्यापन, या जमेच्या बाजु.. सुखवस्तू घरातील असल्याने त्या अनाठायी खर्च करतील असा सरांचा झालेला समज.  त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करायला मला दहा वर्षे लागली असे त्या इथे नमूद करतात..अनेक बाबतीत आर्थिक तपशीलही देतात….. स्वतःचा भित्रा स्वभाव व स्वतःविषयीचा न्यूनभावही व्यक्त करतात..

निवृत्तीनंतर काही वर्षातचं सरांचे सुरू झालेले आजारपण सुमारे तेरा वर्षे चालूच राहिले होते…..हे फडक्यांचे (सरांचे)

आजारपण हेमलताबाईंसाठी सत्वपरीक्षेचा अनुभव होता. त्यातील अनेक आठवणी त्या इथे तपशीलवारपणे देतात..

फडक्यांना जवळच्या असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुभाष मेंढापूरकर, तेज निवळीकर, डाॅ. किरवले यांच्या आठवणी हृद्य  आहेत.. मात्र नातेवाईक मंडळींचा आधार मिळाला नाही.. त्या लिहितात- काही गैरसमजाने दोन्हीकडचे म्हणजे सासर-माहेरचे लोक आमच्याशी बोलत नव्हते.. प्रत्यक्षात त्यांनी काही नातेवाईक मंडळींचे प्रतिकूल अनुभव दिले आहेत..

भालचंद्र फडके यांच्या मृत्युनंतर त्यांचे मन त्यांच्या आठवणींनी व्याकूळ होई.  त्या लिहितात, प्रथम प्रथम मी त्यांच्याशी तिन्ही भाषेत बोले.  ते समोर आहेत असे समजून जे बोलत असे ते वहीत लिहीत असे..

आठवणींतून स्वतःला बळ देण्याची, स्मरण संजीवनाची खास स्त्री- संवेदनायुक्त अशी ही प्रेरणा आहे. 

स्त्रीसाहित्यामागची ही ठळक निर्मिती प्रेरणा ” आठवणींच्या रांगोळ्या ” मधील वेधक आकृती व उदास रंग उठावदार करते..

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वांतः  सुखाय’ – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘स्वांतः  सुखाय’ – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

लेखिका :  गायत्री हेर्लेकर.

प्रकाशक: साई प्रकाशन,सांगली.

किंमत: रू.150/-

मी माझ्या आनंदासाठी लिहितो असे साहित्यिक म्हणत असतो व ते खरेही आहे.आपल्या नित्याच्या व्यवहारात आपल्या हातून इतक्या कृती होत असतात की आपल्या नकळत आपण त्यातून स्वार्थ आणि परमार्थ साधत असतो. सुप्रसिद्ध लेखिका गायत्री हेर्लेकर यांच्या बाबतीतही असेच झाले आहे.स्वांत सुखाय लिहिता लिहिता  त्यांनी नकळतपणे प्रत्येक वाचकाला सुख,आनंद वाटला आहे. माझ्या वाट्याला आलेल्या आनंदात सर्वांनाच सहभागी करून घेण्याचा हा एक प्रयत्न!.

कथा,कविता,नाटिका,अध्यात्म, व्यक्तिपरिचय अशा साहित्याच्या विविध प्रांतात कामगिरी बजावलेल्या लेखिका गायत्री हेर्लेकर यांचे ‘स्वांत सुखाय’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.हे पुस्तक म्हणजे विविध विषयांवरील लेखांचा एक संग्रहच आहे. यामध्ये मनाशी संवाद साधणारे,घर संसार कुटुंब याविषयी बोलणारे ,अनुभव कथन करणारे,आठवणींचा खजिना उघडणारे, वैचारिक आणि अध्यात्म व भक्तीमार्गाकडे घेऊन जाणारे लेख आहेत. विषयांची अशी विविधता असल्याने पुस्तक वाचताना सर्व प्रकारच्या वाचकांना खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.सुरूवातीच्या लेखातच त्यांनी मनाच्या रंगमंचावर जीवनपट मांडला आहे.मन,नाम,मना अशा शब्दांची उकल करत करत न उमगणा-या मनाला कसे उमगून घ्यावे तेही सांगितले आहे. ‘फुलले रे क्षण माझे’ हा लेख वाचल्यावर मन फुलवणारे क्षण स्वान्त सुखायच असतात हे मनाला पटते. निरागस बालमनाचे दर्शन घडवणारा लेखही यात आहे.मनाची शुद्धी करण्याचा मार्ग सांगणारा ‘ न दिसणारी गुलामगिरी’ सारखा लेख आहे.एकांत आणि लोकांत, एकांत आणि एकटेपणा यातील फरक समजावून देतानाच, स्विकारलेला एकांतवास सुखाकडे कसा घेऊन जातो हेही त्या सांगतात.

सुश्री गायत्री हेर्लेकर

लेखिकेतिल गृहिणीही त्यांची पाठ सोडत नाही. त्या बदलत्या कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करतात .’अगं आई गं ‘ म्हणताना आईची महती गातातच पण बापावरही अन्याय करत नाहीत.या लेखात त्यांनी बाप मंडळींची दिलेली उदाहरणे बापाची बाजू उचलूनच धरतात. Child is the father of the man ची प्रचिती देणारा  ‘मुलेही शिकवतात नकळत’ हा लेख असो किंवा स्वयंपाकघरातील अनुभवांचे रसाळ वर्णन करणारा लेख असो, त्यांच्यातील गृहिणीचे दर्शन होतेच.मार्केटिंगच्या वेडाची प्रांजळ कबुलीही त्या हसत खेळत देऊन जातात.

आठवणींशिवाय आयुष्याला काय अर्थ आहे ? चैत्रागौरीच्या आठवणींचे त्यांनी चैत्रांगणच मांडले आहे.श्रावणातील आठवणींच्या रेशीमधाराही मन चिंब करणा-या आहेत. काही अनुभव कथन करतानाही त्यांची भाषा लालित्यपूर्ण असते. औटघटकेच्या कलाकाराची ‘झाकली मूठ ‘ असो किंवा शिपाईमामांची राखी पौर्णिमा असो,दोन्ही प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

सिलेंडर वरील त्यांचा लेख वाचून नाट्यछटेची आठवण होते. तर मायमराठीवरील त्यांचा लेख म्हणजे त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान  व्यक्त करणारा  लेख आहे.

त्यांचे बरेचसे लेख हे वैचारिक व आयुष्यात आलेल्या अनुभवातून ,व्यासंगातून शिकायला लावणारे आहेत.चादरी विषयी लिहिता लिहिता त्या चिंतनाकडे घेऊन जातात. ज्येष्ठांच्या(इतरांना) खुपणा-या अपेक्षा त्या व्यक्त करतात .’सांज संध्याकाळ’ मधून त्यांनी संध्याकाळचे अनोखे दर्शन घडवले आहे.कोरोनाच्या दडपणातील काळात मनाने पाॅझिटिव्ह राहण्यासाठी सकारात्मकतेचा हसत खेळत उपदेश करतात. एका लेखातून त्यांनी पत्रकारितेवरही भाष्य केले आहे. तर कवितेचे विराट स्वरूप उलगडून दाखवताना त्या कवयित्रीच बनून जातात.सांस्कृतिक जडणघडणीमुळे मनुष्यप्राण्याला माणूसपण येते याची जाणीव करून देतात,आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या दोन बाजूही उलगडून दाखवतात. प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्राचा सर्व बाजूंनी अभ्यास करून मांडलेले विचार अत्यंत मौलिक आहेत.       

पुस्तकाच्या अंतिम भागातील सात आठ लेख हे भक्ती आणि अध्यात्म याविषयी विचार व्यक्त करणारे वाटतात. विश्वाला गुरू मानताना त्या गुरू या शब्दाची व्याप्ती, अर्थ समजावून सांगतात. पारंपारिक गुरू,आधुनिक गुरू,सर्व क्षेत्रातील गुरू,कौटुंबिक गुरू,ग्रंथगुरू या सर्वांचे स्मरण त्यांनी ठेवले आहेच, पण आधुनिक काळातील  संगणक या महागुरूसमोरही त्या नतमस्तक होत आहेत हे विशेष वाटते.

श्री स्वामी स्वरूपानंद हे तर त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यांना समजून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.तुकोबारायांना पत्र लिहून त्यांनी पालखी सोहळा  व वारकरी परंपरा याविषयी वेगळ्या पद्धतीने लेखन करून विषयाची गोडी वाढवली आहे. श्रीकृष्ण म्हणजे तर अनेक नात्यांच्या धाग्यांनी विणलेला मनमोहक गोफ.त्याचा एकेक पदर उलगडून दाखवताना भक्ती आणि श्रद्धा यांचेही दर्शन होते.ज्ञानेश्वरीचे अवलोकन करताना ‘ज्ञानेश्वरी’चे वेगवेगळे तीन अर्थ त्या समजावून सांगतात. सुख आणि आनंद याविषयी लिहिताना त्यांनी अनेक अध्याय,ओव्या,अभंग ज्ञानेश्वरी,वचने यांचा उल्लेख केला आहे.त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचल्याशिवाय ठेववत नाही. मानवी कल्याणासाठी तप अटळ आहे.पण जुन्या,प्राचीन आणि आधुनिक तपांची त्यांनी घातलेली सांगड अत्यंत समर्पक वाटते. विवेकाच्या उंबरठ्याशिवाय देहरूपी वास्तू सुखी होणार नाही हा विचार तर आजच्या काळात आवर्जून लक्षात ठेवावा असाच आहे.  

पुस्तकातील सर्व लेख वाचून झाल्यावर ,त्याचे मुखपृष्ठ किती समर्पक आहे हे लक्षात येते.

यातील बरेचसे लेख कोरोना काळात लिहिलेले आहेत.तेव्हाच्या सक्तीच्या एकांतात त्यांच्याकडून झालेले हे लेखन सर्व वाचकांना सुखावणारे आहे.प्राध्यापिकेची भूमिका पार पाडलेली असल्यामुळे अवघड विषयही सोपा करून सांगण्याची कला त्यांना अवगत आहेच, हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. संपूर्ण लेखन हे साध्या,सोप्या भाषेतील असल्यामुळे चहा पिताना मोकळेपणाने गप्पागोष्टी कराव्यात असे झाले आहे. वाचक हा विद्यार्थी आणि रसिकही असतो.त्यामुळे त्याच्याशी उत्तम प्रकारे संवाद साधण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत असे मला वाटते. या साहित्य- सुखाचा लाभ सर्व वाचनप्रेमींनी घ्यावा आणि वाटून द्विगुणीत करावा यासाठी हे माझ्या वाचनाचे अनुभव कथन.

पुढील  लेखनासाठी लाख लाख शुभेच्छा !

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares