मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लेखननामा’ – माधुरी शानभाग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लेखननामा’ – माधुरी शानभाग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

लेखननामा

पुस्तकाचे नाव :लेखननामा

लेखिका :माधुरी शानभाग

पृष्ठ संख्या : 175

मूल्य : रु 210

प्रकाशक : सुप्रिया शरद मराठे, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

‘लेखननामा’  हा माधुरी शानभाग यांनी स्वतःच्या लेखनप्रवासाचा तटस्थपणे घेतलेला मागोवा आहे. तरुण भारत अक्षरयात्रेत प्रसिद्ध होणाऱ्या ‘लेखननामा’ या सदरातील लेखांचा हा संग्रह आहे.

माधुरी शानभाग यांनी वाङ्मयाचे अनेक प्रकार हाताळले आहेत आणि हात लावला, त्या प्रकाराचे सोने केले आहे. उदा.कथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या, ललित लेख, चरित्रं, बालसाहित्य, पुस्तकपरिचय, अनुवाद, एवढंच नव्हे, तर ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ -पोएम्स ऑफ बहिणाबाई चौधरी’ हा बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद वगैरे. केवळ सतरा वर्षांत त्यांची चव्वेचाळीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

सायन्सच्या प्राध्यापिका (आणि नंतर प्राचार्यही)असल्यामुळे ‘लेखननामा’ मधील लेखन पद्धतशीर, मुद्देसूद, शिस्तबद्ध झाले आहे. प्रत्येक प्रकाराविषयी लिहिताना, त्या प्रकारच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, इथपासून ते वापरलेली लेखनाची पद्धत, पायऱ्या यांचे व्यवस्थित विवेचन त्यांनी केले आहे.त्या त्या संदर्भातील पारिभाषिक शब्दांचाही (उदा. अनुवादाची स्रोत भाषा व लक्ष्य भाषा )सामान्य वाचकांसाठी खुलासा केला आहे.

थोडक्यात सांगायचं, तर हे पुस्तक म्हणजे नवलेखकांसाठी उत्तम मॅन्युअल आहे. हे वाचून कोणाला आपली लेखनउर्मी शोधण्याची इच्छा झाली, तर या लेखनचरित्राचे सार्थक झाले, असे  खुद्द माधुरी शानभाग यांनीच म्हटले आहे.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वानंद’ – श्री अवधूत जोशी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वानंद’ – श्री अवधूत जोशी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆ 

पुस्तकाचे नाव           : स्वानंद

लेखक                     : श्री अवधूत जोशी, मिरज.

मुद्रक व प्रकाशक    : परफेक्ट प्रिंटर्स.

यंत्रांच्या खडखडाटात बोललेले शब्दही ऐकू येणार नाहीत अशा इंजिनियरींग व्यवसायात अडकलेल्या श्री.अवधूत जोशींना शब्दांचे वेड कसे लागले कुणास ठाउक ? आपली मूळ आवड जोपासत त्यानी त्यातून आनंद मिळवला आणि तो स्वतः एकट्याने चाखण्यापेक्षा सर्वांनाच त्यात सामावून घ्यावं या हेतूने त्यांनी त्याला पुस्तकाचं स्वरूप प्राप्त करून दिल.त्यामुळे ‘ स्वानंद’ हे शिर्षक अगदी योग्यच वाटते.

पुस्तक उघडल्यावर दिसते ती अर्पणपत्रिका.श्री.पु. ल. देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांची नावे वाचून जरा आश्चर्यच वाटलं.पण पुस्तक वाचून झाल्यानंतर मात्र अर्पणपत्रिका योग्यच आहे असं वाटलं. कारण  या

पुस्तकात ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कथा आहेत, व्यक्तीचित्रणे आहेत.त्याचबरोबर शहरी मध्यम वर्गीयांची सुखदुःखे आणि स्वप्ने  सुद्धा चित्रित झाली आहेत. त्यामुळे या दोन्हीःचा संगम साधताना पु.ल. आणि व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या दोन्ही महातिर्थांपुढे नतमस्तक होणे अगदी स्वाभाविक आहे.

‘स्वानंद’ मध्ये काय आहे ? यात साधारणपणे सात कथा, दोन विनोदी लेख, एक व्यक्तीचित्र,

आणि दोन ललित लेख आहेत. संमिश्र प्रकार असल्यामुळे प्रत्येक नव्या कथेत, लेखात नाविन्य वाटते.

श्री.जोशी यांच्य लेखनशैलीचे  वैशिष्ट्य काय ?

मुख्य म्हणजे सूक्ष्म निरीक्षण हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.उदा ‘शेवटी एकटाच’ या कथेची सुरूवात  ; ‘ माझं काय चुकलं’? मधील मुलांचे खेळ व दुपारची वेळ यांचे वर्णन हे सर्व सूक्ष्म निरीक्षणामुळेच शक्य झाले आहे.साधी,सोपी व छोटी वाक्य रचना त्यांनी अगदी सहजपणे साधली आहे.मुद्दाम अलंकारीक  भाषा वापरण्याचा मोह त्यांनी टाळला आहे. मात्र अनेक ठिकाणी सहज सुलभ उपमा मात्र त्यांनी दिल्या आहेत.उदा.’ सफर खाद्यनगरीची”या लेखातील हे वाक्य पहा.

“बटाटा तर नववधूप्रमाणे सकाळी हळद खेळून जेवणात भाजी बनून येतो तर संध्याकाळी डाळीच्या पिठाच्या पूर्ण वस्त्रात लपेटला जाऊन वडा म्हणून समोर येतो.”

श्री. जोशी यांची भाषा विनोदप्रचूर आहे.ती खदखदून हसवणार नाही पण वार्याची झुळूक यावी त्याप्रमाणे त्यांचा नर्मविनोद मनाला गुदगुल्या करतो.मानवी स्वभावाच्या  वर्मावर बोट ठेवण्याच विनोदी लेखकाचं वैशिष्ट्य त्यांना साधलं आहे.काव्य हा आपला प्रांत नव्हे असं जरी ते एके ठिकाणी म्हणत असले तरी त्याच्या चारोळीवरील  लेखातून त्यांची काव्यप्रतिभा दिसून येते.केवळ एक झलक म्हणून एक रचना:

‘सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून

सौरभरावांच नाव घेते चार गडी राखून ‘

या  कथासंग्रहात कष्टकरी,मध्यमवर्गीय,सरळमार्गी साध्या माणसांच्या कथा आल्या आहेत.बालपणीच्या आठवणी आहेत.तारूण्याची स्वप्ने आहेत.उपदेशाची भाषा न वापरता त्यांच्या कथा काय सांगायचं ते सांगून जातात.पुस्तकाचं मुद्रण,मांडणी,अक्षर,मुखपृष्ठ

असं अंतरंग बहिरंग आकर्षक.श्री.अवधूत जोशी यांचा हा पहिला प्रयत्न आहे.त्यांच्याकडून आणखी  लेखन अपेक्षित आहे.त्यासाठी शुभेच्छा.

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘राधेय’ – श्री रणजीत देसाई ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

अल्प परिचय पत्र

नाव – श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

पदनाम – उपशिक्षक, केंद्रशाळा मसुरे नं.1

परिचय – प्राथमिक शिक्षक म्हणून 18 वर्षे सेवेत आहे.

माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ, ग्रंथालय येथे सचीव म्हणून कार्यरत आहे. माळगाव एज्युकेशन सोसायटी, साने गुरुजी कथामाला मालवण, कोमसाप मालवण या संस्थांचा सक्रीय सभासद आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, तालुका मालवणचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

प्राप्त पुरस्कार –

  • साने गुरुजी कथामाला मालवणचा “आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015”
  • राज्यमंत्री दिपकभाई केसरकर मित्रंडळ, सावंतवाडीचा “आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2020”
  • कोकण मराठी साहित्य परिषद, मालवणचा “कलागौरव पुरस्कार सन 2021”

 

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘राधेय’ – श्री रणजीत देसाई ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

पुस्तक – राधेय

लेखक – श्री रणजीत देसाई 

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस 

पृष्ठ संख्या – 272

मूल्य – 230 रु 

ISBN – 9788177667462

मेहता पब्लिशिंग हाउस लिंक – >> राधेय

 

पुस्तक परिचय – गुरुनाथ ताम्हनकर

“राधेय” हे कर्णचरीत्र नव्हे. लेखक रणजीत देसाई म्हणतात, “प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो. माझ्या मनातील कर्णाची ही कहाणी! भावकहाणी! याची सत्यता शोधायची झाली, तर यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल.”

शत्रू जरी याचक म्हणून आला, तरी दान देत असता खेद वाटू नये, यासाठी नेहमी सावधगिरी बाळगणारा कर्ण, मित्रत्व निभावण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रसंगी दु:ख, अवहेलना झेलणारा कर्ण या पुस्तकात रेखाटला आहे.

कादंबरीची सुरुवात कर्ण व कृष्ण यांच्या भेटीच्या प्रसंगाने केली आहे. कृष्ण भेटीवेळी कर्ण आपली व्यथा कृष्णासमोर मांडतो, “ज्या कवचकुंडलांची साक्ष जन्मदात्या मातेला सहन झाली नाही, जन्माला येताच कोणत्या अपराधास्तव त्या अज्ञात मातेने मला जलप्रवाहात सोडून दिले? ती कोण होती?” हा गहन प्रश्न तो कृष्णाला विचारतो. त्यावेळी कृष्णही त्याच्याकडे आपले कारुण्य व्यक्त करतो. “कुणाला नदीप्रवाहावर सोडून दिलं जातं, कुणाला नदी ओलांडून पैलतीर गाठावा लागतो. कुणी गवळ्याचं पोर म्हणून नंदा घरी वाढतं, तर कुणाला सूतकुलात आश्रय लाभतो. मातृवियोग दोघांच्याही भाळी सारखाच लिहिलेला.”

संपूर्ण कादंबरीत कर्णाच्या मनात चाललेली घालमेल वाचकांच्या लक्षात येते.

दुर्योधनाच्या मैत्रीचा कर्णाला शेवटपर्यंत अभिमान वाटतो. कारण शस्त्रस्पर्धेच्या वेळी कर्णाच्या कुलाचा उल्लेख करुन त्याचा तेजोभंग केला गेला. मात्र दुर्योधनाने अंगदेशाचा अभिषेक करुन त्याला राज्य दिले.

‘राधेय’ म्हणजे कर्णाच्या जीवनातील प्रत्येक बारीक सारीक प्रसंग हुबेहुब रेखाटल्यामुळे महाभारतातील अनेक दृश्ये डोळ्यासमोर तरंगू लागतात.

द्रौपदी स्वयंवर, राजसूय यज्ञ, कुंतीची कर्णाशी झालेली भेट, महाभारत युद्धप्रसंग आणि युद्धानंतरचे भावनिक प्रसंग अगदी जीवंत रेखाटले आहेत.

खांडवप्रस्थामध्ये पांडवांनी उभारलेली राजधानी लेखकाने हुबेहुब साकारली आहे.

या पुस्तकातील कर्णाच्या मनातील खदखद वर्णन करतानाच लेखकाने कर्णाच्या गुणदोषांवरही प्रकाश टाकला आहे. शकुनी मामांचा द्युत आयोजनाचा डाव त्याला आवडत नाही. जुगार आणि चारित्र्य अशा दोन गोष्टी आहेत की यात पाय टाकण्याआधी विचार करावा. नंतर पाय माघारी घेता येत नाहीत, हे कर्णाचे विचार लेखकाने अधोरेखित केले आहेत.

मात्र द्रौपदीने आपला केलेला अपमान मात्र तो विसरत नाही. तो सुडाग्नी त्याच्या मनात कायम धुमसत असतो, याचे वर्णन लेखकाने केले आहे.

कृष्ण उपदेशाचे शब्द समर्पक भाषेत लेखकाने मांडले आहेत. जय पराजयातील अर्थ ज्यानं आधीच गमावला, पण तरीही कर्तव्यावर जो अखेरपर्यंत दृढ राहिला, त्या भिष्माच्या मनातील भावनाही लेखकाने या पुस्तकात मांडल्या आहेत.

कर्ण व वृषाली यांच्यातील पतीपत्नीच्या भावनांचे चित्रणही लेखकाने उत्तम रेखातले आहे. द्रौपदी स्वयंवराला जाताना न संकोचता राजकन्येचे स्वागत करण्यास तयार असणारी वृषाली, स्वयंवरानंतर कर्णाच्या अपमानाबद्दल संताप व्यक्त करते. कर्णाने आपली कवचकुंडले इंद्राला दिल्यावर वृषालीच्या डोळ्यात अश्रू येतात, हे प्रसंग लेखकाने हळुवारपणे पुस्तकात उतरविले आहेत.

महाभारत युद्धप्रसंगातील कर्णाच्या मनातील भावभावनाही लेखकाने मांडल्या आहेत. मानवी जीवनाचे वास्तवही वाचकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

“राधेय” ही एक भावस्पर्शी कादंबरी आहे. ती वाचकांना नक्कीच आवडेल.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘थांगपत्ता’ ☆ प्रा. रोहिणी तुकदेव

थांगपत्ता-Thangpatta by Rohini Tukdev - Aakar Foundation Prakashan - BookGanga.com

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘थांगपत्ता’ ☆ प्रा. रोहिणी तुकदेव ☆ 

पुस्तक : थांगपत्ता 

पुस्तक-प्रकार : कादंबरी

लेखिका : रोहिणी तुकदेव

प्रकाशक : आकार फौंडेशन प्रकाशन

पृष्ठ संख्या : 169 (पेपर बैक)

मूल्य : रू 150

प्रा. रोहिणी तुकदेव

प्रकाशित पुस्तके

  1. साधुदास तथा गो. गो. मुजूम्दारांच्या कादंबर्या
  2. बसवेश्वर
  3. ओवी छंद : रूप आणि आविष्कार
  4. भाषिक विनिमय : तत्व आणि व्यवहार (सहकार्याने)
  5. कमला (अनुवादित कादंबरी)
  6. मराठी कदंबरीचे प्रारम्भिक वळन (संशोधन)
  7. ध्यास प्रवास ( व्यक्तिविमर्श)
  • लघुपट : ओवी : रूप आणि छंद
  • आकार फ़ाउंडेशन या मानसिक रोग्याविषयी सेवा, प्रबोधन, संशोधन करणार्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी मंद मंडळाची सदस्य
  • शैक्षणिक कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रायोगिक प्रकलपाच्य कामात व्यस्त

मनोगत,

‘थांगपत्ता’ही ही कादंबरी प्रकाशित झाली याचा मला मनापासून आनंद झाला आहे ‘आकार फौडेंशन’ने ती अत्यंत देखण्या स्वरूपात वाचकांसमोर आणली आहे. या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा ‘विचलित मनोविभ्रमा’च्या (Disassociative Fugue) विकाराने ग्रस्त आणि त्रस्त आहे. पूर्वायुष्यात कोणत्यातरी असह्य अशा अनुभवाला तिला सामोरे जावे लागते. त्याचा तिच्या मनावर जबरदस्त आघात होतो. ती लज्जित अपमानित होते. झाली गोष्ट कोणाला कळू नये एवढेच नव्हे तर पुन्हा आपल्यालाही तिची आठवण राहू नये यासाठी ती गोष्ट मनाच्या आतल्या खोल कप्प्यात दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. एका बाजूला हे चालू असतानाच दुसरीकडे आपल्याला नको असलेल्या गत गोष्टीपासून मुक्त होऊन,निर्भय, सर्वसामान्य जीवन जगावे अशी तिला ओढ असते. परस्परविरोधी भावनांच्या असह्य ताण तिच्या मनाचे स्थैर्य घालवून टाकतो. ती आपले नाव, गावा आणि पूर्वायुष्य विसरते आणि कुठेच स्थिरावू शकत नाही. यातूनच स्थलांतर, स्थानांतर, रूपांतर असे चक्र सुरू होते.

अमृता, गुंजा आणि माया अशी तिची तीन रूपे या कादंबरीत आहेत. या तिन्ही रूपात वावरताना तिच्या मनाची होणारी घालमेल कादंबरीत चितारली आहे.या प्रत्येक रुपात वावरताना तिच्या मनात सतत इतिहासाची धास्ती आहे. तो आपला पाठलाग करतो आहे,असे तिला वाटत राहते. तिच्या आजाराचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण असते. पूर्वायुष्याची विस्मृती झालेली असली तरी तिची अर्जित कौशल्ये मेंदूने टिकवून ठेवलेली असतात त्यांच्या जोरावर ती आपले आयुष्य सावरायचा प्रयत्न करते. या काळात ज्या समाजात तिला जगावे, काम करावे लागते तेथील अडचणींना संकटांना,दुरिताला तोंड द्यावे लागते. त्यातून ती कशी वाट काढते याचे चित्रणही या कादंबरीत आहे.

कादंबरीचे कथानक थोडक्यात सांगता येईल…अमृता कोल्हे या जिम चालवणाऱ्या एका पस्तिशीच्या मध्यमवर्गीय गृहिणीला अचानक घेरीयेते आणि तिची स्मृती हरवते.

नवऱ्याचा डोळा चुकवून ती घराबाहेर पडते पण बलात्कारासारखे संकट तिच्यावर धडकन कोसळतं. पोलीस तिला जिव्हाळा आधारगृहात नेऊन सोडतात. तिथून ती ‘कांचन यमकनबर्डी’ या लेखिकेकडे सहाय्यक म्हणून जाते. पण तिथेही ती फार काळ राहू शकत नाही. अचानक तिथूनही बाहेर पडते. त्यानंतरही तिच्या आयुष्यात दोन स्थित्यंतरे येतात. या सर्व काळातील तिच्या जीवनप्रवासाचे चित्रण कादंबरीच्या कथानकात केलं आहे.

कादंबरीचे कथानक घटनाप्रधान असले तरी त्याचा रोख वेगळाच आहे. आपलं अस्तित्व, आपली ओळख यांचं स्वरूप नेमकं काय असतं? जीवनाची अर्थपूर्णता हि रोखठोक वस्तुस्थिती आहे की तो माणसाने आपल्या समाधानखातर निर्माण केलेला भ्रामक फुगा आहे ? संपूर्ण विश्वचक्राच्या संदर्भात माणसाचं माणूस म्हणून काही स्थान आहे का ? या प्रश्नाच्या उत्तराची वाट अमृता उर्फ गुंजा उर्फ माया हिच्या जीवनानुभवातून शोधण्याचा प्रयत्न आणि प्रयोग मी केला आहे. तो किती यशस्वी झाला आहे, हे अर्थातच वाचक ठरवतील. तो अधिकार त्यांचा आहे.

एका विचलीत मनोविभ्रमग्रस्त स्त्रीच्या रहस्यपूर्ण जीवनाचा मागोवा घेणारी तसेच तिचा भावनिक अवकाश आणि तिच्या जगण्यात गुरफटून गेलेला सामाजिक अवकाश यांच्या परस्परसंबंधातील गुंतागुंतीचा वेध घेणारी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचकांना आवडेल, त्यांना गुंतवून ठेवले ठेवेल असा मला भरवसा वाटतो.

प्रा रोहिणी तुकदेव

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.’  – श्री शेखर देशमुख ☆ सुश्री सुमती जोशी 

सुश्री सुमती जोशी

☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.’  – श्री शेखर देशमुख ☆ सुश्री सुमती जोशी  ☆ 


पुस्तकाचे नाव : उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा.

लेखक  : श्री शेखर देशमुख

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

मूल्य : रू 299/-

पृष्ठ संख्या – 268 

ISBN : 978-93-90060-15-3

मनोविकास प्रकाशन लिंक >> उपरे विश्व. वेध मानवी स्थलांतराचा

पुस्तक परिचय : सुश्री सुमती जोशी 

उपरे विश्व

२०२० साल करोना महामारीचं. मार्च अखेरीस लॉकडाऊन झाला. पोटासाठी शहराकडे धाव घेतलेले हजारो कष्टकरी दोन पायांवर भिस्त ठेवून सामानाची पोटली डोक्यावर घेत गावी परतू लागले. माझ्यासारखी शहरी मंडळी घरात बसून दूरदर्शनवर हे सारं बघत होती. या दृश्याचा जबरदस्त प्रभाव मनात खोलवर असतानाच ‘उपरे विश्व’ हे शेखर देशमुख यांनी लिहिलेलं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक हाती आलं.

शेखर देशमुख गेली कित्येक वर्षे पत्रकार म्हणून काम करत आहेत. एच.आय.व्ही.-एड्स आणि मानवी स्थलांतर या विषयावरील संशोधनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशनची शिष्यवृत्ती, ‘लीडरशिप इन स्ट्रॅटेजिक हेल्थ कम्युनिकेशन’या अभ्यासासाठी जॉन हॉपकिन्स शिष्यवृत्ती मिळालेले आणि बहुविध जबाबदाऱ्या सहजी पेलून धरणारे शेखर देशमुख याना सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही(२०११) मिळाला आहे. शेखर देशमुख यांची ‘पॉझिटीव्ह माणसं’, लेखन सहभाग-दि प्राईस स्टोरीज, पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची’ ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

‘वेध मानवी स्थलांतराचा’ हे उपरे विश्व या पुस्तकाचं उपशीर्षक. आकाशाला गवसणी घालणारा हा व्यापक विषय २७० पानात बंदिस्त करणं, हे एक आव्हान होतं. ते त्यांनी अतिशय समर्थपणे पेललं आहे. हा विषय त्यांनी सहा प्रकरणात विभागला आहे.

‘अस्तित्व टिकवण्यासाठी’ या पहिल्या प्रकरणात अनादी अनंत कालापासून संघर्ष करत, लढा देत माणूस कसा स्थलांतर करत आलाय त्याचा आढावा घेतला आहे. अन्नपाणी आणि सुरक्षित निवारा या गरजा भागतील तिथे माणूस स्थलांतर करून राहू लागला. रोगराई, दुष्काळ, पूर, भूकंप यासारख्या अस्मानी संकटांपासून सुटका करून घेण्यासाठी माणसांनी जगभर स्थलांतर केलं. ब्रिटिशानी इथल्या शेतकऱ्याना भूमिहीन करून जावा सुमात्रा या बेटांवर मजूर म्हणून स्थलांतर करण्यास भाग पाडलं. १८४६ ते १९४० या कालखंडात जगभरात सामूहिक स्थलांतर कसं घडलं याचा लेखाजोखा इथे वाचायला मिळतो. त्या काळी उत्तर प्रदेश हा स्थलांतराचा केंद्रबिंदू होता. आज दोनशे वर्षानंतरही परिस्थिती बदललेली नाही, हे वाचून वाईट वाटलं. मला सर्वात भावला तो ‘स्त्री आणि स्थलांतर’ या विषयाचा उहापोह. लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाणं हे विधिलिखित स्थलांतर स्त्रीला टाळता येत नाही. पण परिस्थितीनं लादलेलं स्थलांतर स्त्रीला उद्ध्वस्त करणारं असतं.

‘खेडयाचं मूळ आणि शहराचं कूळ’ या दुसऱ्या प्रकरणात उत्तर प्रदेशातल्या खेडयांची स्थिती विस्तारानं सांगितली आहे. सवर्ण लोक ‘राजा’ आणि बहुजन-दलित ‘प्रजा’. सरंजामशाही मुरलेली. मालकाच्या लाथा खाण्यापेक्षा रोजी रोटीसाठी शहरात गेलेलं बरं, असा विचार करून होणारं स्थलांतर. त्यांना रहावं लागतं उघडी गटारं, कचरा कुंडया याच्या आसपास झोपडया बांधून. माणसांची ही फरपट वाचून मन उद्विग्न होतं.

‘आगीतून फुफाट्यात’ या तिसऱ्या प्रकरणात या स्थलांतरितांमुळे मुंबई. दिल्ली, कोलकाता यासारख्या शहरांची कशी वाताहत झाली त्याचं सविस्तर वर्णन आहे. ऑफिसच्या चार भिंतीत बसून केलेलं हे लेखन नाही. धारावी, प्रेम नगर, इंदिरा नगर यासारख्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून केलेलं हे लेखन वाचकांना खिळवून ठेवतं.

‘धड आणि धडगत’ हे चौथं प्रकरण. स्थलांतरामुळे प्रगती होते असं म्हणतात, पण उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी केलेलं दिशाहीन स्थलांतर कसं घटक ठरतं, हे या प्रकरणात विस्तारानं मांडलंय. मनुष्यबळाचा विचार केला तर लोकसंख्यावाढ फायदेशीर ठरते, पण निरक्षरता हा शाप ठरणार आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही बाबतीत आपल्या देशातील परिस्थती किती चिंताजनक आहे, हे आकडेवारी देत सांगितलं आहे. हवामानात होणाऱ्या बदलामुळे बांगला देशातल्या स्थलांतरितांचा प्रश्न आपल्यासाठी जाचक ठरणार आहे.

काटेरी वाटा आणि मानवी चेहरे या पाचव्या प्रकरणात पुष्कर येथे असलेल्या ब्रह्मदेवाच्या एकमेव देवळातल्या उत्सवाचं उदाहरण घेत धर्माच्या नावाखाली होणारी लोकांची लूट, फसवणूक, मसाज पार्लरच्या नावावर सेक्स आणि ड्रग्ज यांचा व्यापार करणारे स्वार्थी या संबंधी विवेचन केलं आहे. जागतिक स्तरावर स्त्रियांची चाललेली फसवणूक आणि ससेहोलपट लेखकांनी सोदाहरण दाखवली आहे.

आजचे वास्तव आणि उद्याची बात या शेवटच्या प्रकरणात २०३० साली काय परिस्थिती असेल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

एकंदरीत स्थलांतराचा एक फार मोठा दस्तऐवज तयार करण्याचं शिवधनुष्य लेखकांनी पेललं आहे. भविष्यात या विषयावर संशोधन करणाऱ्यांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.

 

सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

“कुत्रा छंद नव्हे संगत “पुस्तकाचे अंतरंग  भाग २

पहिल्या प्रकरणात कुत्रा आणि माणसाचा संबंध कसा आहे याचे दाखले दिले आहेत. वेदकाळात सरमा ही इंद्राची कुत्री आणि शामला आणि अबला ही तिची दोन पिल्ल.तसेच  धर्मराजाचे श्वानप्रेम, दत्तात्रेयांजवळचे चार कुत्रे, शिवाजी महाराजांच्या वाघ्याची स्वामिनिष्ठा, शाहू महाराजांचा खंड्या अशी कुत्र्याबद्दलची आदरणीय उदाहरणे त्यांनी सांगितली आहेत. त्याचप्रमाणे  युद्धभूमीवर काम करणारी  श्वानपथके ,त्यांचे पराक्रम , पोलिसांना गुन्हेगार पकडण्यात मदत करणारे, अनेक ठिकाणी हेरॉईन  स्फोटकांचा शोध घेणारे, मेंढ्यांच्या कळपावर राखण करणारे अशी  कुत्र्यांच्या महती ची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत, चर्चिल यांचे लिखाण लॉर्ड बायरनच्या कविता श्वानाच्या सानिध्यातच झालेल्या आहेत.

कुत्रा घरात आणताना निवड कशी करावी , घराचा आकार, पाळण्याचा हेतू, आरोग्य कसे राखावे, शिक्षण कसे द्यावे, वेगवेगळ्या कुत्र्यांच्या जाती, रंग, बांधा, रुप, स्वभाव यासह माहिती त्यांनी आपल्या पुस्तकात सोप्या पद्धतीने सांगितली आहे. हाॅलीवुड मधील कोली जातीचा लसी कुत्रा कसा श्रीमंत झाला त्याचे रसदार वर्णन केले आहे.

श्वान प्रदर्शनांना  सुरुवात कशी झाली, केंनेल क्लब मध्ये कुत्र्यांच्या कुटुंबाचा इतिहासात कशी नोंद होते ,स्पर्धेचे परीक्षक कसे गुण देतात त्यांचे फॅन्सी ड्रेस, सगळ्या गोष्टींप्रमाणेच श्वान प्रदर्शन  का  भरवली जातात, त्यांचे फायदे काय, हेही सांगितले आहे. पुस्तकात त्यांनी आपल्या प्रिन्स ला शिकविताना चे फोटो व अनेक जातींच्या कुत्र्यांचे फोटो दिले आहेत.

युद्धभूमीवर अनेक सैनिकांचे प्राण वाचविण्याचे पराक्रम केलेल्या कुत्र्यांची नावे आणि मर्दूमकीही वर्णन केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस खात्यातही जिथे पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, तेथे कुत्रा कशी मदत करतो याची उदाहरणे वाचताना तोंडात बोट घातले जाते.

कुत्र्यांचे आजार त्यावर पथ्य आणि होमिओपाथी ची औषधे ही त्यांनी सांगितली आहेत. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात अनेक श्वान प्रेमींचे प्रश्न आणि त्यावर दिलेली उत्तरे यातून कितीतरी माहितीचे भांडार मिळते.

श्वान धर्माच्या उदाहरणाचा भाग पुढील भागात

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

“कुत्रा छंद नव्हे संगत ” पुस्तक

१९९९ साली, “स्वरमाधुरी” प्रकाशनने प्रकाशित केलेल्या श्री शांताराम नारायण दाते यांनी मराठीतून लिहिलेल्या “कुत्रा छंद नव्हे संगत” या पुस्तकात कुत्रा हा प्राणी आपल्यासाठी सर्व दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याबद्दल सविस्तर सांगितले आहे.पुस्तकाचं मुखपृष्ठ हे त्यांचा स्वताचा  प्रिन्स हा कुत्रा आणि बाकीची इतर चार-पाच जातीची कुत्री यांचा फोटो असं आहे.

मिरज जवळील गणेश वाडी सारख्या गावात दाते यांचे मोठे भाऊ बेळगावहून कुलुंगी जातीची कुत्र्याची पिल्ले आणून त्यांना शिकवीत असत. ते सर्व पाहून त्यांना सगळ्या गोष्टी काही प्रमाणात माहित होत्या. पुढे नोकरीच्या निमित्ताने ते परगावी गेले. त्यांना गावाबाहेर मोठा बंगला असे. त्यामुळे कुत्र्याची गरज भासायला लागली. दरम्यान स्काॅटलडयार्डने प्रसिद्ध केलेलं एक पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. त्याचबरोबर “लसी कम होम” आणि “रिन टिन टिन” हे कुत्र्याचे उत्कृष्ट काम असलेले दोन चित्रपट पहायला मिळाले. योगायोग असा की दोनचार दिवसातच एक कुत्र्याचे पिल्लू दाराशी आले. त्याला खायला प्यायला दिलं आणि त्याचा लळाच लागला. नामकरणही झालं. “प्रिन्स” तीन महिन्याचा झाला. आणि त्याला शिकवायला सुरुवात केली. अगदी साधा गावठी कुत्रा पण इतका उत्तम काम करायला लागला की केंनेल क्लबच्या प्रदर्शनात त्याने पुरस्कार मिळवलान. “राजकमल” च्या “फुलं और कलिया” या बोलपटात प्रिन्सने इतके उत्तम काम करून प्रेक्षकांची वहावा मिळवलीन की त्या बोलपटाला पंतप्रधानांचे सुवर्ण पदक मिळाले अनेकांनी प्रिन्सला  प्रदर्शनात पाहिले होते. बोलपटही पाहिला होता. त्यामुळे दातेंकडे डॉग ट्रेनिंग साठी चौकशची रांग लागली. नोकरी आणि डॉग ट्रेनिंग कस जमणार? संपूर्ण विचाराअंती निर्णय घेतला. आणि नोकरी सोडून आनंद देणारा डॉग ट्रेनर हा उद्योग सुरू केला. बारा वर्षे या उद्योगाला जणू वाहूनच घेतले. ठाण्यात राहून मुंबईत कुलाब्यापासून जुहू पर्यंत जवळ जवळ दोनशे कुत्र्यांना शिकवले. राजेश खन्ना, दिलीपकुमार, वामन हरी पेठे, डिंपल कपाडिया असे अनेक प्रतिष्ठित लोकांचे कुत्रे त्यांनी शिकवून तयार केले. अनेकांच्या ओळखी झाल्या. कितीतरी कामे सोपी झाली. सगळ्याचे श्रेय ते आपल्या प्रिन्स ला देतात. इंडियन कॅनेल क्लबच्या प्रदर्शनासाठी पाच वेळा त्यांना परीक्षक म्हणून बोलावले होते. त्यांचा कुत्र्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यासही सखोल होता. देखणा काली,  ग्रेटडेन, अल्सेशियन, डॉबरमन, बाॅक्सर, लॅब्राडाॅर, डाल्मेशियन, पामेरियन किती नावं सांगावीत! पण प्रत्येक जातीचा स्वभाव, वैशिष्ट्य, रंग, बांधा अशी माहिती त्यांना पाठ होती. मुंबई दूरदर्शन वर कुत्र्यांसह मुलाखती आणि मार्गदर्शनही त्यांनी केले होते. चंपी, ग्लडी, रंभा, आणि प्रिन्स या चार श्वानांचा पंचवीस वर्षाचा घरात सहवास त्यांना लाभला होता.

शांत ना दाते हे माझे मामा. आम्ही भेटलो की कुत्रा या विषयावर तासन-तास गप्पा मारत बसायचो. तेव्हा मी त्यांना बरेच दिवस त्यांचे कुत्र्यांचे अनुभव आणि माहिती यावर मराठीत पुस्तक लिहिण्याचा आग्रह करत होते. त्यांनी ते मनावर घेतलं. आणि “कुत्रा छंद नव्हे संगत” या पुस्तकाचा जन्म झाला.

पुस्तकाचे अंतरंग पुढील भागात

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘माझा गाव माझा मुलूख’ – श्री मधु मंगेश कर्णिक ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘माझा गाव माझा मुलूख’ – श्री मधु मंगेश कर्णिक ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

पुस्तक – माझा गाव माझा मुलूख

लेखक – मधु मंगेश कर्णिक

परिचय – गुरुनाथ ताम्हनकर

प्रकाशक – मैजेस्टिक पब्लिशिंग हाउस 

पृष्ठ संख्या – 292

मूल्य – 300 रु 

मैजेस्टिक रीडर्स लिंक – >> माझा गाव माझा मुलूख

‘कोकण’ हा देवदेवतांच्या वरदहस्ताने पावन झालेला मुलुख. या मुलुखाप्रमाणेच येथील कोकणी माणूस आपल्या वेगवेगळ्या गुणांनी संपन्न. डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेली कोकणपट्टी ही परमेश्वराने जन्माला घातलेली अद्भूत भूमी आहे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवणे, कोणालाही फार उंचीवर न चढविणे, तरीही कोणाच्याही ख-याखु-या गुणवत्तेची मनापासून कदर करणे, ही इथली खासीयत.

या सर्वांवर प्रकाश टाकलाय “माझा गाव माझा मुलुख” या मधु मंगेश कर्णिक यांच्या पुस्तकातून. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ सतिश भवसार यांनी निसर्गचित्राने छान सजविले आहे तर मलपृष्ठावर पुस्तक लेखनामागील लेखकाचा दृष्टीकोन सांगितला आहे. कोकणचे, विशेषत: सिंधुदुर्गातील विविध गावांचे कला, संस्कृती व नैसर्गिक वर्णन तसेच या मुलुखातील परंपरांवर प्रकाशझोत टाकला आहे.

प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच लेखक बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. गावाच्या बदलत्या वास्तवाबद्दल विविध प्रसंगांचा उल्लेख करुन प्रस्तावनेतच लेखक संपूर्ण कोकणभूमीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकतात.

पुस्तकाचे दोन भाग केलेले असून ‘माझा गाव’ या भागात सिधुदुर्गातील 22 गावांचे प्रवासवर्णन आहे. तर ‘माझा मुलुख’ या दुस-या भागात मालवणी मुलुखाची लोकसंस्कृती सतरा प्रकरणांमध्ये मांडली आहे. एकूण 292 पृष्ठांचे हे पुस्तक म्हणजे साहित्याची एक मेजवाणीच म्हणायला हरकत नाही, असे मला वाटते.

काळाच्या ओघात कोकण भूमी व कोकणी माणूस बदलला. हा मुलुख आता पूर्वीसारखा दरिद्री राहिलेला नाही. रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक क्षेत्रात बदल घडला आहे. मात्र कोकणची प्राचीन संस्कृती तशी आमूलाग्र बदलणारी नाही. नव्यातील सारे पचवून ‘जुने ठेवणे’ ही इथल्या माणसाची खासीयत. जुन्या ट्रंकेच्या तळाशी जपून ठेवणारा हा जगावेगळा मुलुख आहे.

पहिल्या भाग़ात सिंधुदुर्गातील प्रत्येक गावाचे वर्णन वाचताना आपण त्या गावच्या रस्त्याने प्रत्यक्ष फिरतोय, नदी-ओहोळ भटकतोय,  नारळी फोफळीच्या, आंब्या-फणसांच्या झाडांचे दर्शन घेतोय, बकुळ- प्राजक्त फुलांचा सुवास अनुभवतोय असाच जणू भास होतो. लेखकाच्या लेखणीतला जीवंतपणा वाचकांच्या नजरेत भरतो. जे गाव आपण पाहिलेत, ते डोळ्यासमोर उभे राहतात. तर जे पहायचे राहिलेत, ते पाहण्याची इच्छा निर्माण होते.

प्रत्येक गावाच्या निसर्गाचे वेगळेपण वर्णन करताना लेखकाच्या साहित्यप्रतिभेची कल्पना येते. आपल्या जन्मगाव ‘करुळ’ बद्दल वर्णन करताना लेखक लिहितात, “या चिमुकल्या गावाने मला भरभरुन दिले. ऋतुचक्राचे सारे फेरे मी या माझ्या गावात बालपणापासून नजरेत साठवले. मान्सुनचे वारे झाडांना कसे मुळांपासून हलवतात आणि आषाढातला पाऊस कौलारांवर कसा ताशा वाजवतो, ते मी इथे अनुभवले.”

लेखक पुढे वर्णन करतात – ‘करुळ गावच्या माळावर उभे राहिले की ‘नाथ पै वनराईच्या क्षेत्रावरुन जरा पुर्वेकडे नजर टाकावी, सह्याद्रीचे निळे रुप असे काही दृष्टीत भरते की, तिथून डोळे बाजूला करु नये. चित्रात मांडून ठेवावा, तसा अवघा सह्याद्री इथून दिसतो.’

कोकणात अनेक देवस्थाने आहेत, त्यातील आचरे संस्थानचा श्री देव रामेश्वर, कुणकेश्वर, वेतोबा, सातेरी, भराडी अशा अनेकांची महती या पुस्तकात वर्णन केली आहे.

कोकणी माणसाच्या स्वभावावर पूर्ण प्रकाशझोत टाकला आहे. मालवणी मुलुखातल्या माणसाजवळ हापूसचा स्वादिष्ट गोडवा आहे, कर्लीचा काटेरीपणा आहे, तिरफळीचा मिरमिरीत झोंबरेपणाही आहे. शिवाय फुरशातला विखारही आमच्या वागण्या बोलण्याट आढळतो. याशिवाय अडसराचा कोवळेपणा, गोडपणा, फणसाचा रसाळपणा, कातळाचा खडबडीतपणा आणि आबोली – सुरंगीचा रसिकपणाही आहे. असे कितीतरी गुणदोष लेखकाने पुस्तकात मांडले आहेत.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावचे वर्णन करताना वेगवेगळे राजकिय, सांस्कृतिक, ऐतिहासिक दाखले लेखक देतात. प्राचीन परंपरांवर अभ्यासपूर्ण विवेचन लेखकाने केले आहे. गावांच्या नावांची फोड करुन सांगितली आहे.

पुस्तकाच्या दुस-या भागात मालवणी मुलुख, येथील गावरहाटी व तिचे महत्त्व, मालवणी माणसांचे चित्रण, ऋतुचक्र व पारंपारिक उत्सव आणि ते कसे साजरे होतात याची सुंदर माहिती दिली आहे. मुंबईतील चाकरमानी व घरची ओढ या गोष्टींचे मनोहारी वर्णन केले आहे.

एकंदरीत हे पुस्तक वाचून एकदा तरी संपूर्ण कोकण भ्रमंती करावी असे मला वाटते. आपणही हे पुस्तक जरुर वाचा. कोकणचा बाहेरुन काटेरी पण आतून रसाळ माणूस नक्कीच आवडेल !

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’ – डॉ शंतनू अभ्यंकर ☆ सुश्री सुमती जोशी 

सुश्री सुमती जोशी

☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’  – डॉ शंतनू अभ्यंकर ☆ सुश्री सुमती जोशी  ☆ 

फादर टेरेसा आणि इतर वल्ली

पुस्तकाचे नाव : फादर टेरेसा आणि इतर वल्ली

लेखक  : डॉ शंतनू अभ्यंकर

प्रकाशक : समकालीन प्रकाशन

मूल्य : रू 160/-

पृष्ठ संख्या – 130 

ISBN13: 9789386622662

पुस्तक परिक्षण  : सुश्री सुमती जोशी 

‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’ हे डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेलं समकालीन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं. ‘फादर टेरेसा’ हे शीर्षक ऐकल्यावर वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. मदर टेरेसा माहितेय, पण फादर तेरेसा ही काय भानगड? डॉक्टर त्याचं स्पष्टीकरण देतात. खाष्ट, उंच, धिप्पाड नर्स. आवाज आणि बोलणं सारं पुरुषी. ‘नर्स कसली, नरसोबाच तो! म्हणून फादर टेरेसा’ असं सांगून ते तिचं व्यक्तिमत्त्व शब्दांच्या माध्यमातून साकार करतात. भुलेश्वर अनॅस्थटीस्ट प्राणसख्याविषयी इतक्या तळमळीनं लिहिलंय की कोणत्याही ऑपरेशनमध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व डॉक्टर प्रांजळपणे कबूल करतात. प्रसू ही गरोदर महिला आपल्या डॅनिष नवऱ्याबरोबर येते. बाळंत होईपर्यंत वरचेवर भेटायला येते. तिचे प्रश्न, मनातल्या शंका, हक्क याविषयी चर्चा करते आणि डॉक्टरांना पेशंटच्या हक्कांची जाणीव करून देते. कोणताही आडपडदा न ठेवता डॉक्टरांनी हे नमूद केलंय. असा हा अनोखा पेशंट प्रत्यक्ष भेटलाय, असा भास वाचकांना होत राहतो. महाडचे पेशंट चाफेकर बंधू, पण त्यांची नावं दाऊद, बशीर, रहीम. कोकणी मुसलमान. त्यांची भाषा आपलीच भाषा असल्याच्या थाटात डॉक्टर त्यांची कथा आपल्याला सांगतात. सय्यद गलाह हा अफगाणिस्तानातून आलेला, इंग्रजीचा गंध नसलेला विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि डॉक्टरांचा मित्र बनतो. नियतीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे त्याच्या जीवनाची कशी फरपट होते हे त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने साकार दिलंय. जीवनात नाटक आणि नाटकाच्या अनुषंगानं येणारे इतर विषय हेच जीवनसर्वस्व असणारे ‘मास्तर’ म्हणजे एक अवलिया. हे सदाहरित मास्तर सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. ‘नाटक संपल्यावर गप्पांचा फड जमतो आणि हा चौथा अंक कधीकधी नाटकापेक्षा रंगतदार होतो’, असं लेखक म्हणतात तेव्हा आपण त्या आनंदाला मुकलोय, अशी हुरहूर वाचकांना वाटत राहते. गर्भपात करून घ्यायला आलेली कुंती, डॉक्टर च्यायला, चक्रधर, कुलीओ अशा एकापेक्षा एक सरस व्यक्ती आणि वल्लींचा परिचय डॉक्टर अचूक शब्दात करून देतात. ‘नाना’ हे त्यांच्या आजोबांचं व्यक्तिचित्र वाचल्यावर मला माझे आजोबा आठवले. त्यांचं धारदार बोलणं, तिरकस विनोद, पुण्याचा चालता बोलता शब्दकोश असलेल्या नानांचं शब्दचित्र अतिशय ह्रदयस्पर्शी झालंय.

अशी चित्रविचित्र माणसं आपल्यालाही भेटतात. पण ती शब्दबद्ध करायला भाषेवर विलक्षण प्रभुत्त्व असावं लागतं. त्या माणसाच्या मनात शिरता यावं लागतं. भाषा हवी तशी वळवता यावी लागते. इंग्लिश मिडीयममध्ये शिकूनही त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मराठीची गोडी लावली. टी.व्ही. नसलेल्या त्या काळात आपलं वाचनवेड जोपासत त्यांनी सर्वस्पर्शी वाचन केलं. त्याचाच परिपाक आणि प्रचीती या पुस्तकाच्या पानोपानी येत रहाते. अवश्य वाचावं असं हे पुस्तक.

 

सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “माय नेम इश ताता” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “माय नेम इश ताता” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ ☆

पुस्तकाचे नांव : कथा संग्रह – “माय नेम इश ताता”

मूळ लेखिका : डॉ सूर्यबाला 

अनुवाद : श्रीमती उज्वला केळकर

प्रकाशक : सुकृत प्रकाशन

प्रथम आवृत्ती : ०३ डीसेंबर २०१७

किंमत : रु ३१०

सौ. उज्ज्वला केळकर

“माय नेम ईश ताता “या  कथा संग्रहात २० कथा आहेत. सौ. ऊज्वला केळकर यांनी  मूळ हिंदी कथा,अनुवादित केल्या आहेत.

उत्कृष्ट कथांचा ऊत्कृष्ट अनुवाद  हीच या कथासंग्रहावरची पहिली छाप!!

या वीसही कथांमधून निरनिराळ्या प्रकारची माणसं, त्यांची संस्कृती, त्यांच्या भोवतालचं वातावरण, त्यांचं जगणं, त्यांचं भावविश्व, त्यांची सुख दु:खं,आशा निराशा   यांचा अनुभव येतो. प्रत्येक कथा वाचत असताना,सतत असं वाटत राहतं,आपण यांना भेटलोय्!

आपल्या भवतालचीच ही माणसं आहेत.. त्यांच्या जीवन पद्धतीशी, त्यांच्या जगण्याशी आपलं नातं जमतं..

कथेतल्या व्यक्ती आपल्या मनात रेंगाळत राहतात. रूतून बसतात.

सौ. राधिका भांडारकर

सरकारी यंत्रणेतून, अरुण वर्मा सारखी, प्रामाणिक व्यक्ती, सस्पेंड झाल्यावर म्हणते, “मला काही क्रांती’ विद्रोह घडवून नव्हता आणायचा, पण आज लोकं खर्‍याला खरं म्हणण्यासाठीही घाबरतात याचा खेद वाटतो.” हे वाचताना मन चिरुन जातं..

“माय नेम ईश ताता “या शिर्षक कथेत आई वडीलांच्या स्पर्धात्मक इर्शेला विद्रोह करणारी एक छोटी बालिका केवीलवाणी होऊन भेटते. पण तिच्यात आणि तिच्या आजीत निर्माण होणारं विश्वासाचं, भरवशाचं नातं मन भारावून टाकतं.

“कागदी नावा चांदीचे कुंतल” आणि “काय माहीत” या दोन्ही कथांमधलं, बाळपणीचं अव्यक्त प्रेम वाचताना मन हळुवार बनतं….!!

“हे घे किन्नी..” या कथेत, किन्नी, किन्नीचे लाचार बाळपण, मावशीची वर्चस्व गाजवणारी, उपकाराची माया, तिचं ऊध्वस्त प्रेम आणि एकंदरच कुणीतरी ताब्यांत घेतलेली तिच्या सुखाची दोरी…. ही किन्नी वाचताना मन विदीर्ण होतं.. या कथांमधून स्रियांच्या मनातले,जगण्यातले बारकावे जाणीवपूर्वक टिपले आहेत. शब्दरचना इतकी भक्कम आहे की कथेतलं अवास्तव वास्तवही विचार करायला लावतं…. कथा कुठेही घसरत नाही. पसरत नाही.

ती घडत जाते. जशी आहे तशी. कथा कशी सजीव भासू शकते, याचाच अनुभव हा कथा संग्रह वाचताना मिळतो.

“….ना सौंदर्य,ना सुघडपणा, ना कोमलता, ना विभ्रम… बाईपण शोधायचंच झालं तर दिसतात काळ्या ढुस्स मनगटात दोन चार मळकट बांगड्या, आणि नाकात सुंकली… संपली बाईपणाची मर्यादा…” “ती” या कथेची सुरवातच मनाची पकड घेते. कथा वाचत असताना वाचकाच्याच मनाची पडझड होते…. आयुष्यभर संघर्ष… पण तरीही ती म्हणते, “डोंगरासारख्या ऊरावर पडलेल्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्यात कुवत आहे. माझं एक घर आहे. दोन हात आहेत. आई मुलाचं पोट भरायला ते समर्थ आहेत….”

“ती” या कथेतली ही ठिणगी अंधारातली दिवटीच वाटते.,,,!,

“आशिर्वादाचे व्यापारी…” ही कथा तर मानवी मनाचे सुंदर दर्शन घडवते. धर्म, जात पंथ या पलिकडचा माणूस बघणारा सय्यद, स्वत:ला “आशिर्वादाचे व्यापारी ” म्हणून

संबोधणारा सय्यद, कथेच्या अंतीम टप्प्यावर “मानवतेचा पुजारीच “भासतो.

“गजाच्या आरपार..” या कथेत शेवटी एक सुंदर संदेश दिलाय्.

“…..मुक्त कोण आहे? कदाचित कुणीच नाही. न पुरुष.. न स्त्री.. पूर्ण मुक्ती एक स्वप्न आहे. आणि जगणं एका यथार्थात असतं. यथार्थ म्हणजे मुक्त होण्याचं  एक रंगीत स्वप्नं… जीवनांत निम्म्यापेक्षा जास्त आनंद हे स्वप्नच देतं..”

या कथासंग्रहाबद्दल प्रामुख्याने म्हणावसं वाटतं की, या सर्वच लहान रुंदीच्या कथांमधून आभाळाला व्यापतील, इतकं मानवी जीवनावरचं भाष्य दडलेलं आहे.. ते वाचकापर्यंत परिणामकारक रीतिने पोहचतं, त्याचं  श्रेय केवळ ऊज्वलाताईंच्या प्रभावी लेखनशैलीला आहे. अचूक शब्द, भाषेचा ओघ आणि लावण्य याचा अखंड झरा वाचकाला  एका सुंदर कृतीचा महान आनंद देतो.. जाणीव आणि वैचारिक ऊंची त्यांच्या लेखनात नेहमीच जाणवते. अनुवादाचं एक सुंदर तंत्र त्यांच्याजवळ असल्यामुळे, तसेच हिंदी भाषेतलं सुंदर साहित्य, मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची प्रामाणिक तळमळ प्रशंसनीय आहे…

ऊज्वलाताई खूप खूप धन्यवाद….!!!

(या लेखांत मी काही कथांवरच विचार मांडले. मात्र या कथा संग्रहातील प्रत्येक कथा सुंदर,अर्थपूर्ण आशयसंपन्न आणि विचार करायला लावणारी आहे…)

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares