मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “नंदादीपातील ज्योती” –  लेखिका : वसुधा परांजपे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “नंदादीपातील ज्योती” –  लेखिका : वसुधा परांजपे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆ 

पुस्तक : “ नंदादीपातील ज्योती “ 

लेखिका : वसुधा परांजपे 

पृष्ठे :२६०

मूल्य: ४००₹ 

परिचय : हर्षल भानुशाली 

‘नंदादीपातील ज्योती’ या पुस्तकात एकूण १९ संतांचा परिचय करून देण्यात आला आहे. त्यापैकी १६ संत महाराष्ट्रातील आहेत. हे सर्व संत परिचित आहेत. पण यांच्या अर्धांगिनींबाबत फारच कमी माहिती मिळते. या पुस्तकात ती माहिती थोडीफार का होईना, वाचायला मिळते, हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. लेखिका वसुधाताई या सध्या ८८ वर्षांच्या आहेत. हे पुस्तक लिहून त्यांनी फार मोलाची माहिती वाचकांना करून दिली आहे.

त्यांनी ‘अलौकिक विभूती व त्यांच्या अर्धांगिनी’ हे ‘मनोगत’ लिहिताना म्हटलं आहे- सर्वसामान्यांच्या घरातून देशसेवा, राष्ट्रोन्नती यासाठी झटणाऱ्या देशभक्तांच्या धर्मपत्नींचा जीवनसंघर्ष आपण वाचला असेल. याच सामान्य, पण सात्त्विक, भक्तिमार्गी मायबापांच्या पोटी जन्मलेला वंशाचा दिवाच पुढे घराला मंदिराचं रूप देतो; स्वतः नंदादीप होतो. अशा नंदादीपातील भक्तिस्नेहात भिजून चिंब झाल्यानंतर नंदादीपातील ज्योत प्रकाशित होते. नंदादीप म्हटलं की, आठवते मंदिर, त्यातील गाभारा, परमेश्वराची मूर्ती, गंधफुले वाहून त्याची श्रद्धाभावनेने केलेली आकर्षक पूजा. भक्तिभावानं फिरवलेली उदबत्ती, तिच्या सुगंधाने सुप्रसन्न झालेले मन ! अन् स्वास्थ्य टिकावं

नैसर्गिक शक्तीनं अनेक जीव जन्माला येतात, पण वर शब्दांकित केलेलं वर्णन फक्त भाग्यवान माणसालाच अनुभवायला मिळतं. म्हणूनच की काय, श्री. शंकराचार्य म्हणतात,

‘दुर्लभं त्रयमेवैतत देवानुग्रह हेतुकम्।

मनुष्यत्वं, मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः।।’

या विश्वात तीन गोष्टी दुर्मीळ आहेत. एक म्हणजे मनुष्यत्व, मानवता; दुसरी मुमुक्षत्व म्हणजे मुक्ततेची ओढ; अन् तिसरी महापुरुष संश्रयः म्हणजे सत्संग, संतसहवास ! तुम्ही म्हणाल, माणसांना काय तोटा आहे ? लोकसंख्या तर वाढतीय ! शब्द लक्षात घ्या, मनुष्यजन्म दुर्मीळ नाही. मनुष्यत्व दुर्मीळ आहे! म्हणजे आकार, देह, माणसांचे पुष्कळ आहेत हो; पण त्यातलं मन राक्षसाचं, दहशतवाद्याचं, नक्षलवाद्याच किंवा दुसऱ्याचं चांगलं न पाहून त्याला खड्यात घालण्याची खटपट करणाऱ्या दुष्टाचं असतं. असं नकोय ! माणसाच्या मनात, आचार-विचारात दया, दान, प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञता, परोपकाराची वृत्ती असेल तर, त्यात मनुष्यत्व असतं. असं मनुष्यत्व आजकाल दुर्मीळ झालेलं आहे. दुसरे म्हणजे मुक्ततेची ओढ माणसाला नाही. कारण आपण बांधलो आहोत, जखडले गेलो आहोत हेच त्याला कळत नाही. त्याचा ‘मी’पणा, सगळं मलाच हवं, नाही मिळालं तर मी ओरबाडून घेईन हा हावरेपणा व तो पुरवण्याकरता दुष्टपणा जे हवंय ते कष्ट करून न्याय्य मार्गाने मिळवावं. या कष्टार्जितातलंही थोडंसं दुसऱ्याला आपणहून द्यावं, ही सात्त्विक वृत्तीची माणसं आज दुर्मीळ आहेत.

एकनाथ म्हणतात,

‘धर्माची वाट मोडे। अधर्माची शीग चढे ।

ते आम्हा येणे घडे। संसार स्थिती ।।’

माणसाला स्वार्थीपणातून, अहंकारातून सोडवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी संताचा सहवास हवा असतो. तो आज दुर्मीळ झालाय. कारण ज्याला त्याला ओढ आहे ती नट-नट्यांच्या, स्वार्थी राजकारण्यांच्या सहवासाची! कारण तिथे स्वार्थ पोसला जातो, लोकेषणा प्राप्त होते! खरं संतत्व प्राप्त होणं हीसुद्धा सोपी गोष्ट नाही. ज्ञानेश्वरादी भावंडांचा धर्ममार्तंडांनी केलेला छळ तुम्हाला माहितीये, एकनाथांची जनार्दनपंतांनी घेतलेली वेगवेगळी परीक्षा आपल्याला आठवत असेल. तुकाराम महाराजांवर निसर्गानं किती आपत्ती कोसळवल्या हेही विदीत असेलच !

अर्वाचीन काळातही जे संत होऊन गेले त्यांच्या जीवनात आपण डोकावणार आहोत. संतांचे जीवन कर्तव्यनिष्ठा, सर्वांविषयी आत्मीयता, धर्मनीतीच्या मयदितील जीवन, मोठ्या आपत्तीतही मनाची शांतता, प्रसन्नता राखणं असं असतं ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !’ हेच त्यांचे ब्रीद ! हे सद्‌गुण आपल्यातही अंशाने का होईना प्रतिबिंबित व्हावेत, याच हेतूने आपण या नंदादीपांच्या ज्योतीप्रकाशात काही काळ घालवू, यात आपणास चिंचवडच्या मोरया गोसावींची प्रारब्धावर मात करण्याची जिद्द, शुकानंद संस्थानच्या उमाबाईंची भगवंतावरील निष्ठा, गाडगेमहाराजांच्या पत्नीची पतिनिष्ठा, संत तुलसीदासांना सहज प्रासंगिक छोटा दोहा म्हणून उपदेश करणारी त्यांची पत्नी, हरे कृष्ण, हरे कृष्ण जप करणाऱ्या गौरांग प्रभूची विष्णुप्रिया इत्यादींचा परिचय होईल. परिणामी आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व आपल्या ध्यानी येईल व आपणही थोडा वेळ एकांतात आत्मशोध घेण्याचा विचार व कृती करून प्रसन्नता प्राप्त कराल ! 

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे।

भूतांची दया हे भांडवल संता। आपुली ममता नाही देही। 

तुका म्हणे मुखे पराविया सुखे। अमृत हे मुखे स्तावन मे ।।

गुरुबोधाने ज्यांचे अंतःकरण उजळलेले राहून ज्यांनी त्या ज्ञानाचा चित्प्रकाश जगाला देण्याचे कार्य केले, अशा महान विभूतींची चरित्रे, परकीय विषयविलासी संस्कृतीच्या आक्रमणप्रसंगी महत्त्वाची ठरतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी! कारण त्यांनी सत्तत्त्वाची अनुभूती व्यक्तिगत न ठेवता लोकोद्धारासाठी वापरली. देशाच्या या आध्यात्मिक वैभवाचा पाया वसुधैव कुटुम्बकम् अर्थात आत्मने मोक्षार्थं जगत् हितायच, हा आहे! 

संत मांदियाळी

१) पू. वामनभट शाळीग्राम व सौ. पार्वतीबाई (मोरया गोसावी वंश)

२) पू. कालदीक्षित व सौ. उमादेवी (शुकानंद संस्थान)

३) पू. चैतन्य प्रभु गौरांग व सौ. विष्णुप्रिया

४) पू. गोस्वामी तुलसीदास व सौ. रत्नावली (रामचरितमानसकर्ते)

५) पू. यशवंत देव मामलेदार व सौ. रुक्मिणीबाई

६) श्री. गुंडाजीबुवा देगलूरकर व सौ. राजाई

७) पू. रामकृष्ण परमहंस व सौ. शारदादेवी

८) पू. रामानंद बीडकर महाराज व सौ. जानकीबाई

९) पू. गोंदवलेकर महाराज व सौ. सरस्वती

१०) पू. टेंबे स्वामी (वासुदेवानंदव सरस्वती) व सौ. अन्नपूर्णाबाई

११) पू. गाडगे महाराज व सौ. कुंताबाई

१२) संतकवी पू. दासगणू महाराज व सौ. सरस्वतीबाई

१३) गोजीवन पू. चौंडे महाराज व सौ. लक्ष्मीबाई

१४) प्रज्ञाचक्षू पू. गुलाबराव महाराज व सौ. मनकर्णिकाबाई

१५) पू. बाबामहाराज सहस्रबुद्धे व सौ. दुर्गाबाई (स्वरूपसंप्रदाय)

१६) पू. दादा धर्माधिकारी व सौ. दमयन्तीबाई

१७) पू. अनंतराव आठवले व सौ. इंदिराबाई (वरदानंद भारती)

१८) पू. पांडुरंगशास्त्री आठवले व सौ. निर्मलाताई (स्वाध्याय)

१९) पू. चिंतामणी सिद्धमहाराज व सौ. पद्मावतीबाई (मायबाई)

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ ‘‘अजूनही चांदरात आहे –’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ ‘अजूनही चांदरात आहे – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

 अभिनंदन ! अभिनंदन !! 

‘पुणे मराठी ग्रंथालय ‘ या ११३ वर्षे जुन्या शासनमान्य ‘अ ‘ वर्ग ग्रंथालयाने जुलै २०२४ मध्ये पुस्तक परीक्षण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या पुस्तक परीक्षणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नुकतेच प्रदान करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘अजून चांदरात आहे’ या ललित लेखांचा अंतर्भाव असलेल्या सुंदर वाचनीय पुस्तकाचे परीक्षण डॉ. मीना श्रीवास्तव यांनी लिहिले होते. या ग्रंथालयाच्या ११३ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात त्यांचा गौरवपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल डॉ. मीनाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

आजच्या अंकात वाचू या हे पुरस्कारप्राप्त पुस्तक परीक्षण……..

संपादक मंडळ,

ई – अभिव्यक्ती (मराठी विभाग)

पुस्तक- अजूनही चांदरात आहे

लेखक- श्री विश्वास देशपांडे

प्रकाशक- सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे 

पृष्ठसंख्या- १६८ पाने

पुस्तकाचे मूल्य- २०० रुपये 

(पुस्तक खरेदीसाठी लेखक श्री विश्वास देशपांडे यांच्याशी ९४०३७४९९३२ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा.)

श्री विश्वास देशपांडे

 अजूनही चांदरात आहे’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे आकर्षक लक्षवेधी रूप प्रथम पाहताक्षणी नजरेत भरते. चवथीचा चंद्र, गर्द निळेभोर अस्मान, चांदण्यात न्हायलेल्या जलाशयाची शांत निळाई, काळोखात विसावलेली पर्वतराजी अन तेजस्वी धवल रंगांनी कोरलेले शब्द! पुस्तकात ३२ ललित लेख आहेत. त्यासोबतच ८ काव्यसुमने देखील जोडलेली आहेत. विविधरंगी अन विविधगंधी विषयांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले असे हे कोलाज आकर्षक वाटते. एक १४ पानी लेख वगळता (एक लढा असाही), इतर सर्व लेख ३-४ पानी आहेत. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो आणि आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर पुस्तक एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र त्यांच्या अंतरंगात डोकावून बघावे तर लेख पूर्णत्वास पोहचलेले असतात!

वेगवेगळ्या विषयांतून लेखकाचे गहिरे वाचन, चिंतन, कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप प्रकर्षाने जाणवतो. पुस्तकातील एका लेखाच्या ‘शब्दमाधुर्य, गीतमाधुर्य, नादमाधुर्य’, या शीर्षकास अनुसरून, लेखकाच्या भाषेत शब्दमाधुर्य आहे, तसेच ती साधी, सोपी आणि सहज आहे. ‘To be simple is the most difficult thing in the world’ हे लक्षात घेतल्यास या सरल आणि तरल भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. अलंकारांचा अतिरेक नसल्याने भाषा बोजड वाटत नाही. या अर्थवाही भाषेमुळेच प्रत्येक लेख वाचनीय झाला आहे, किंबहुना हाच या पुस्तकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

सामाजिक समस्यांवरील आणि विषमतेवरील भाष्य करणाऱ्या १० लेखांवरून लेखकाच्या सामाजिक जाणीवा किती प्रखर आणि दूरदर्शी आहेत याचा प्रत्यय येतो. मोजकीच उदाहरणे द्यायची तर ‘अजूनही चांदरात आहे’ मधील आजोबा आणि आधुनिकतेचे वेड असलेला नातू यांच्यातील संवादाचा अभाव, माणसा माणसातील विसंवादाचे वर्णन करणारे ‘अंतर’, गुगल स्पेस आणि डेटामधील जटिल माहितीच्या जंगलात अडकलेल्या माणसाविषयी मांडलेला ‘जो हुकूम मेरे आका’ हा यथार्थवादी लेख, ‘ये दिल मांगे (नो) मोअर’ मधील शीतपेयांचा बाजार आणि जाहिरातींच्या घातक अतिरेकी आक्रमणाबद्दल जनजागृती करणारा लेख ‘जागतो रहो’ हे लेख वाचनीय आहेतच, पण त्याचबरोबर ते वाचकास गहन विचारमंथन करण्यास प्रवृत्त करतात.

वाढत्या प्रदूषणाचे आणि हिरवाईच्या ऱ्हासाचे विदारक परिणाम आज दिसत आहेतच, पण पुढील पिढ्यांपुढे हा प्रश्न अधिकच ज्वलंत होत जाणार आहे. त्याच अनुषंगाने स्वच्छ हरित पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘एक लढा असाही’ या लेखात चिपको आंदोलनाचा सविस्तर आढावा घेत हरितक्रांतीविषयी सखोल विवेचन करण्यात आले आहे. ‘चला आपण आधुनिक कोलंबस होऊ या’ हा लेख देखील पर्यावरणाचा आणि वृक्षवल्लींचा झालेला ऱ्हास आणि नद्यांचे दूषित जल या समस्यांवर भाष्य करतो. या लेखातील शालेय शिक्षणात पर्यावरण या विषयाचा अंतर्भाव आणि इतर मौलिक सूचना विचारणीय आहेत.

‘कवितांच्या गावा जावे’ या लेखात लेखकाच्या कल्पनेची उत्तुंग भरारी अनुभवास येते. विंदा, दत्ता हलसगीकर आणि विदर्भातील कवी बोबडे यांच्या कवितांचे काव्यमय रसग्रहण अत्युत्तम झाले आहे. भारताच्या ऐश्वर्यसंपन्न संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे ४ लेख मला जरा जास्तच भावले. ‘मनोरथा चल त्या नगरीला’ या लेखाद्वारे कर्नाटकातील हंपी या पुरातन शहराची सफर अतिशय हृद्य आहे. व्यक्तिचित्रे आणि नातेसंबंधांचे विश्लेषण करणारे ३ लेख वाचनात आले. त्यातील काळजाला भिडणाऱ्या ‘गेले द्यायचे राहून’ या लेखात लेखकाने त्यांच्या अन त्यांच्या वडिलांच्या हृदयस्पर्शी नात्याचे अलवार पदर हळुवारपणे उलगडले आहेत.

‘दिगूची मुशाफिरी’ मधील सध्याच्या राजकीय, सामाजिक अव्यवस्थेचे भीषण वास्तव आणि पत्रकारितेची दांभिकता यावरचे लेखकाचे भाष्य मनावर कठोर आघात करून जाते. पूर्वग्रहदूषित माणसे एखाद्या व्यक्तीविषयी कसा गैरसमज करून घेतात याचे चपखल उदाहरणांसहित केलेले परिणामकारक लेखन ‘लेबल्स’ या लेखात आढळते. मला भावलेल्या दोन लक्षवेधी लेखांचा उल्लेख करते, एक आहे ‘होरेगल्लू’, सुधा मूर्ती यांच्या या लेखातील हे शीर्षक म्हणजे गावातील वडाच्या झाडाखालचा ‘बेंच’, म्हणजेच आपली सुखदुःखे हक्काने शेअर करायची जागा! याच विचाराचा आजच्या संदर्भाला अनुलक्षून केला गेलेला उहापोह अनवट विचार दर्शवतो. दुसरा लेख आहे ‘ब्रायटनची ब्राईट कहाणी’ ज्यात इंग्लंड येथील ब्रायटन या गावाजवळील पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृती जागवणाऱ्या स्मारकाची कथा रेखाटलेली आहे.

पुस्तकांतील लेख आणि कवितांचे वाचन केले असता लेखकाचा मूळ पिंड गंभीर आणि वास्तववादी साहित्यिक लेखनाचा आहे असे जाणवते. पण या पुस्तकांतील काही लेख वाचल्यावर त्यांची विनोदबुद्धी देखील तितकीच तल्लख आणि प्रखर आहे असे दिसून येते. नर्म विनोदाची पखरण करीत हास्याचे रंगीबेरंगी कारंजे फुलवण्याचे कसब त्यांच्या मोजक्याच ५ लेखांत दृष्टीस पडते. ‘हम बोलेगा तो’ यात बोलघेवडी माणसे आपल्याला भेटतात, उदाहरण द्यायचे तर वैचारिक दारिद्रय प्रकट करणारे राजनीतीज्ञ! मंचावर प्रवेश करताक्षणी यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला की प्रेक्षकांची किती म्हणून गोची होते ते त्या प्रेक्षकांनाच माहित असते. ‘तेच ते’ या उपरोधिक लेखात सरकारी पातळीवर नित्याची बाब असलेल्या कचेऱ्यांमध्ये मौक्याच्या स्थळी विजेत्याप्रमाणे स्थानापन्न असलेल्या ‘विहित नमुन्यांच्या’ गमती जमती वर्णन करतांनाच त्यांच्यापायी लोकांना होणाऱ्या त्रासाचे कष्टप्रद पण रंजक वर्णन पेरले आहे. त्यातून साधलेला अप्रतिम विनोद कोपरखळ्या मारीत आपल्या चेहेऱ्यावर स्मित आणतो.

मात्र या सर्वांवर मात करणारा मला सर्वाधिक आवडलेला लेख म्हणजे ‘महानायक आजारी पडतो तेव्हां’! हा लेख तर कल्पनेच्या भराऱ्या मारीत प्रासंगिक विनोदाचा जणू धमाल धबधबाच! त्याची पार्श्वभूमी अशी की आपला लाडका महानायक अमिताभ कोरोनाने ग्रस्त झाल्यावर दवाखान्यात भर्ती होतो. हे वृत्त कळताच त्याला भेटायला चित्रनगरीतील त्याचे अनेक सहकलाकार त्याला भेटायला येतात, त्यांचे ठेवणीतले डायलॉग हिंदीतच ठेऊन लेखकाने खूप मजा आणली आहे, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान येतात तेव्हांची दवाखान्यात उडालेली धांदल आणि गांभीर्याच्या मास्कखाली दडलेल्या चौफेर विनोदाच्या बहारदार लहरींचा आस्वाद घ्यायचा असेल तर संपूर्ण लेखच प्रत्यक्ष वाचावा!

प्रतिभा आणि प्रतिमेचे वरदान लाभलेले मराठी काव्यजगतातील शीर्ष कविजन जेव्हां एकत्रितपणे ‘नक्षत्रांचे देणे’ प्रदान करतात तेव्हां ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी लेखकाची अवस्था होते. त्याचा परिपाक म्हणजे ‘कधी कधी मला वाटतं’ ही नितांतसुंदर कविता! कवितेची सुरुवातच विंदा मास्तरांच्या वर्गापासून झालीय! सुरेश भटांच्या काव्यातील काटे खुपू न देता त्यांच्या ओल्या जखमा न्याहाळीत, बालकवींच्या आनंदाला हळुवारपणे स्पर्श करीत आणि शांताबाईंच्या हिरव्या अन बरव्या ऋतुसंहाराचे रंग ओळखत आपण भेटतो ताठ कण्याने जगायला शिकवणाऱ्या अन प्रेमाने पाठीवर हात ठेवीत लढायला सज्ज करणाऱ्या कुसुमाग्रजांना! या कवींच्या सुंदर भावस्पर्शी कवितांच्या रम्य आठवणी लेखकाने जाग्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे मातृभक्त कोमलहृदयी साने गुरुजी, निसर्गकवी बा. भ. बोरकर, तत्वज्ञानी तांबे आणि रोमँटिक पाडगावकर देखील या कवितेत विराजमान झाले आहेत. सदरहू कवींकडून काय काय घ्यावे अन घेता घेता त्यांचे हातच कसे घेऊन टाकावेत हे या कवितेचे गमक आहे. ही कविता म्हणजे या पुस्तकातील अभिजात आणि अनवट साहित्यनिर्मितीचा सर्वोच्च बिंदू आहे असे मला वाटते.

मला एक अजून भावलेली कविता ‘चष्मा’ वाचतांना स्वतःबद्दल राग, निराशा आणि अगतिकता वाटायला लागते. निरनिराळ्या राजकीय पक्षांचा तथाकथित जाहीरनामा, त्यांचे हिरवे, भगवे अन निळे झेंडे ही प्रतीकचिन्हे अतिशय वास्तववादी आणि प्रभावी वाटतात. स्वतःची राजनैतिक विचारसरणी सामान्य जनतेची देखील कशी आहे, हे ठासून सांगण्यातच या पुढाऱ्यांचा वेळ आणि शक्ती खर्ची पडतात. फिल्टर आणि चष्मा या दोन प्रातिनिधिक शब्दांत कवीने हा राजनैतिक खेळखंडोबा अभिनवरित्या चितारला आहे. बेरोजगारी आणि महागाईसारख्या जनतेला पोळत असलेल्या सध्याच्या गंभीर समस्या जिथल्या तिथेच राहणार हे माहित असल्याने अत्यंत दुय्यम अशा गोष्टींकडे जनतेचे लक्ष वळवणे हे राजकीय नेत्यांचे इप्सित इथे प्रकर्षाने मांडलेले आहे. कवितेच्या शेवटी सर्वधर्म समभावाच्या झेंड्याच्या प्रतिमेचा एल्गार ध्यानी-मनी खोलवर रुजतो. हाच या कवितेचा संदेश असावा अशी माझी धारणा आहे. लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव आणि भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप त्यांच्या काव्यलेखनात दृष्टीस पडतो दिसून येतो.

एकंदरीतच ‘अजूनही चांदरात आहे’ या श्री विश्वास देशपांडे लिखित पुस्तकाची गोळाबेरीज करतांना जाणवते की, ललित लेखांचे उच्च साहित्यिक मूल्य असलेले लेख आणि कविता, नवीन विषयांची अनवट माहिती, सामाजिक समस्यांचे सखोल चिंतन, तसेच त्यांच्यावर विचारपूर्वक मांडलेले उपाय, विनोद, परिहास आणि उपरोधिक भाष्य यांनी अलंकृत असे हे पुस्तक आहे. वाचकांना लेखकाच्या या ललित लेखनाच्या लालित्याचा लळा लागेल असे मला खात्रीपूर्वक वाटते. शेवटी एकच सांगावेसे वाटते की वाचकांनी हे वाचनीय पुस्तक तर फिरफिरुनि वाचावेच, पण आपला वाचनसंग्रह समृद्ध करायला ते संग्रही ठेवावे, तसेच वाचनसंस्कृतीचा प्रसार होण्याकरता पुस्तकभेट म्हणून या पुस्तकाची निवड करावी.

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ऐलपैल ” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “ऐलपैल” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : ऐलपैल  (काव्यसंग्रह)

कवी : श्री. हरिश्चंद्र कोठावदे,  9423862226

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन पुणे, 9850962807

मूल्य : रु. 300/-

☆ ऐलपैल —- मधुघटातून झालेले काव्यामृताचे शिंपण ☆

सुप्तकोषातील कवितेला जागृत करुन वृत्तबद्ध काव्याचा मधुघट हाती देणा-या श्री. हरिश्चंद्र कोठावदे यांचा ‘ ऐलपैल ‘ हा एकशेबावन्न कवितांच्या संग्रहाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यातील काही अमृतकण रसिकांपर्यंत पोहोचावेत याहेतूने केलेले हे लेखन ! खरे तर प्रत्येक ओळीचा आस्वाद स्वतः घ्यावा असा हा काव्यसंग्रह. मुक्तछंदाची वाट न चोखाळता वृत्तबद्ध, छंदोबद्ध काव्यलेखन करणारे पुण्याचे श्री. कोठावदे यांनी या काव्यसंग्रहाद्वारे काव्यानंदाचा लाभ घडवून आणला आहे.

श्री. हरिश्चंद्र कोठावदे

शब्दसाधना करता करता शब्दसिद्धी प्राप्त करुन कधी आत्मरंजनी तर कधी विश्वरंजनी रमणा-या या कविने पादाकुलक, हरिभगिनी, आनंदकंद, अनलज्वाला, बालानंद, समुदितमदना, केशवकरणी अशा विविध वृत्तांत तसेच छंदात केलेल्या रचना वाचताना त्यातील अंतर्गत लयीमुळे मन काव्यलतेवर नकळतपणे डोलू लागते. खरे तर कवीने मनाशी साधलेला संवाद काव्याच्या रुपाने शब्दबद्ध झाला आहे. यातील कविता म्हणजे आयुष्याने दिलेल्या अनुभवांचा काव्यात्मक आलेख आहे. या कवितेत काय नाही ?, उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर त्याचा मंजुळ नाद कानी पडावा असा अनुभव देणा-या या कविता आहेत. स्वतःला कवी म्हणून फारशा गांभीर्याने कधीच घेतले नव्हते असे कवीने मनोगतात म्हटले असले तरी छंद जोपासता जोपासता छंदोबद्ध कवितांचा नजराणाच कविने रसिकांना सादर केला आहे. कवितेतून आयुष्याचा सूर मिळवताना कविला कवितेचाही सूर सापडत गेला आहे. लयबद्ध शब्द रचनेने केवळ कवितेचीच नव्हे तर जगण्याची लयही सापडली आहे. स्वप्नात रंगताना, सत्याचे रंग कितीही भयावह असले तरीही त्यांच्या उग्र रूपाकडे काणाडोळा न करणा-या या कविता आहेत. या कवितांमधून वास्तवावर प्रखर प्रहार तर केले आहेतच पण लयबद्ध गेयता बहार वाढवणारी आहे. आशा, निराशा, खंत, खिन्नता, ध्येयपूर्ती, अपुरेपणा, सुसंगती, विसंगती अशा संमिश्र भावनांनी भरलेल्या जीवनाचे यथार्थ दर्शन या कवितांतून घडत आहे. ‘ ऐलपैल ‘ मधील कविता म्हणजे नवरसांचा शाब्दिक नवोन्मेश आहे. काव्यगंगेच्या ऐलतटापासून पैलतटापर्यंत अलंकारांची हिरवळ लेऊन सजलेलं वृत्तबद्ध काव्याचं बेट म्हणजे ‘ ऐलपैल ‘ हा काव्यसंग्रह!

कविने म्हटल्याप्रमाणे अश्रू असोत, पानझड असो, संकटाची घोर रात्र असो, उन्ह असो वा चांदणे, हार असो वा झुंजणे, एकांत असो वा कोलाहल कवीची कविता ही विदेह यात्रा आहे. दुःखाला भडकपणे रंगवून त्याचे प्रदर्शन करण्याचा आततायीपणा या कवितेत नाही आणि सुखाच्या लाटेवर आरूढ होतानाही कविच्या शब्दांत उन्माद नाही.

श्री. कोठावदे यांची कविता ही सुखदुःखाचा करुणरम्य उत्सव शब्दांनी रंगविणारी कविता आहे. कविने म्हटल्याप्रमाणे ती कविला नव्याने जन्माला घालणारी आहे. ती नित्य साधनेची जाणीव करुन देणारी कविता आहे. अनुप्रासात्मक शब्दांनी काव्यातून चिंब पाऊस पाडणारी कविता आहे. अश्रूत नाहलेल्या, कंठात दाटलेल्या आणि ह्रदयात पेटलेल्या प्रीतीची जखम गोंदणारी ही कविता आहे. ही कविता स्वार्थांध बेफिकीरी पाहून उद्विग्न होणारी आहे. भोंदुगिरीच्या जमान्यात संयम, तपस्या आणि अध्यात्म यांचे स्मरण करुन देणारी ही कविता आहे. उरात ओल जपत परदुःखाशी संवाद साधणारी आहे. मुखवट्याच्या जगात अविरत झुंजत राहण्याचे सामर्थ्य देणारी कविता ‘ऐलपैल ‘ मध्ये आपल्याला वाचायला मिळते.

सर्वच्या सर्व संग्रह आपल्यासमोर ठेवणे शक्य नाही. पण संग्रहाचे कोणतेही पान उघडावे आणि त्यावरील काही पंक्ती समोर ठेवाव्यातच असा मोह होतो.

*

सांगायाचे बरेच होते, बरेच काही सांगुन झाले

काळजातले सुरुंग काही, फुटावयाचे राहुन गेले

*

दिवसाढवळ्या डोळ्यांदेखत, इथे खलांचा नंगा नाच

संत महात्मे साधू सज्जन, किती उदासिन किती लाचार 

*

ध्वस्त कराया तुझी अस्मिता

सुसज्ज सैनिक दहा दिशांचे

आरपारची अता लढाई 

भय कसले रे शत मरणांचे 

*

ध्यास असू दे नंदनवन पण, परसामधली बाग फुलू दे

नित्य नभाशी संभाषण पण, घरट्याशी संवाद असू दे

*

युद्ध लादले जर नियतीने 

नियतीशीही झुंजत राहू

अखेरच्या अन् चिंधिलाही 

निशाण बनवुन फडकत ठेऊ

*

जीवन ही तर गळकी घागर

किती भरावी तरी रिती रे

दैवाकडुनी शापालाही 

उ:शापाची कधी हमी रे

*

तुटू पाहती तट तेजाचे,

तरीही जळती दिवट्या काही

अजून असतिल परंतु शोधा,

भांगेमधल्या तुळशा काही

 *

कविते तुझीच बाधा, आजन्म भोवणार

वणव्यात चांदण्याची, मी गोष्ट सांगणार

*

मन ग्रासते मनांना, होऊन राहुकेतू 

मन जोडते मनांना, होऊन दिव्य सेतू

*

एकावर एक वीट

जावी रचित दुःखांची

होत रहावी अभेद्य 

तटबंदी काळजाची 

परि नच काळजाला

कळा पाषाणाची यावी

परदुःखांशी संवादी 

ओल उरात जपावी

*

आम्ही मेंढरे आंधळी

नाही बूड, नाही शेंडा

ज्याच्यामागे गर्दी त्याचा

खांद्यावर वाहू झेंडा

*

प्रीतीचा गंगौघ असा की

मनी मलिनता उरली नाही

विश्व प्रीतिचे दोघांचे जरी

कुंपण क्षितिजा उरले नाही

*

प्रतिसादाविण विदीर्ण हाका

तरी जळू दे दिव्यात ज्योती 

थेंब स्वातिचा कधीतरी रे

शिंपल्यातला होइल मोती !

*

पहिलावहिला पाऊस उत्कट

सहस्त्र हस्ते धरेस कवळी

अशा बरसती धो धो धारा

जन्मांतरिचे वणवे विझती

*

क्षितिजकरांनी शिंपित जीवन

गगन धरेवर झुकले रे

किती दिसांनी आभाळाला 

फुटला ऐसा पाझर रे

 *

घ्यावे दत्तक दुःखांना 

तुझे दुःख दुःख माझे

गच्च भरल्या गाड्याला 

सुपाचे का होते ओझे

 *

अशा किती काव्य पंक्ती सांगाव्यात? त्यापेक्षा त्या वाचून आनंद घेणे हेच श्रेयस्कर. कवीही म्हणत आहे,

 ” स्वान्तःसुखाय जरि ही कवने 

 दाद द्यावया दर्दी यावे

 अज्ञेयातिल रानफुलेही 

 कुणी तयांना ह्रदयी घ्यावे “

वृत्तबद्ध काव्य रचना करत असताना येणा-या बंधनांचे व मर्यादांचे भान ठेऊन या कवितांचा आस्वाद घेणा-याला काव्यानंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अशात कसदार कवितांची अपेक्षा श्री. हरिश्चंद्र कोठावदे यांच्याकडून आहे. पुढील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “लिमिटलेस” – लेखक : जिम क्लिक  — मराठी अनुवाद : डॉ. सुचिता नंदापुरकर फडके ☆ परिचय – श्री हर्षल भानुशाली ☆

श्री हर्षल भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लिमिटलेस” – लेखक : जिम क्लिक  — मराठी अनुवाद : डॉ. सुचिता नंदापुरकर फडके ☆ परिचय – श्री हर्षल भानुशाली ☆ 

पुस्तक :  लिमिटलेस  

मराठी अनुवाद: “अमर्याद “

लेखक: जिम क्विक

अनुवादक: डॉ सुचिता नंदापुरकर फडके

प्रकाशक: गोयल पृष्ठ:४४८ मूल्य:३९९₹

सवलत मूल्य:३६५ ₹ 

आपण आपल्या मेंदूचा अर्थात बुद्धिमत्तेचा कधी पूर्ण क्षमतेने वापर करून पाहिलं का?

व्यक्तीची शक्ती ही त्याच्या मेंदूत असते! जितका तल्लख मेंदू अर्थात बुद्धी तितका कार्यक्षम माणूस! 

परीक्षा असो की नावीन्यपूर्ण विचार करून व्यवसाय वृध्दी करणे यात मेंदूची भूमिका अतिशय महत्वाची!

स्मरण म्हणजे ध्यानात राहणे!आकलन म्हणणे एखादी गोष्ट समजणे जसे कोडे उलगडणे!निर्णय क्षमता, तर्क, कल्पना, शोध या काही मेंदूच्या आधीन असलेल्या गोष्टी आहेत…. मग आपल्या मेंदूची क्षमता वाढवता आली तर नाही का ही कामे सोपी होणार?

मेंदूची क्षमता वाढवता येईल का?

व्यायाम आणि पोषक आहाराचा वापर करून शरीराची कार्यक्षमता वाढते!

ध्यान, योग, चिंतनाने मनाची सहनशक्ती वाढवता येते…

पण मग मेंदूची क्षमता वाढवता येईल का असे काही उपाय आहेत का?

मेंदूची क्षमता वाढवता येते की नाही हा प्रश्न थोडावेळ बाजूला ठेऊया… त्या आधी अजून एका प्रश्नाचे उत्तर शोधू!…..

आपल्या मेंदूची असलेली पूर्ण क्षमता आपण कधी वापरली का?

कदाचित आपल्याही मेंदूत तशी अमर्याद क्षमता असेल.. अगदी आईन्स्टाईन सारखी नाही, पण आपले कार्यक्षेत्र प्रभावित करण्या इतकी निश्चितच असेल…. पण तिचा पूर्णपणे उपयोग केलेला नसेल. नव्हे आपण आपल्या मेंदूचा किंवा बुध्दीचा पूर्ण उपयोग केलेला नसतोच. तो कसा करायचा हे समजून घ्यायचे ना?

आपल्या मेंदूच्या अथवा आपल्या बुध्दीच्या पूर्ण क्षमतेचा वापर करायला शास्त्रीय पद्धतीने शिकवणारे जिम क्किक आपल्यासाठी घेउन आले आहेत एक महत्वाचे पुस्तक…. “लिमिटलेस”!

ब्रेन कोच! 

खेळाडूकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करवून घेण्याचे काम त्याचा कोच करत असतो. खेळाडू मधील असलेल्या क्षमतांचा तो पूर्ण वापर करून घेतो…. मूळात त्या क्षमता खेळाडू कडे आधीच असतात. तसाच हा ब्रेन कोच आपल्या बुध्दीच्या क्षमता पूर्णपणे वापरून घेण्यास मदत करतो आणि आपल्या मधील सर्वोत्तम बाहेर काढतो.

…. विल स्मिथ म्हणतो, “माझ्यातलं माणूसपण अधिकाधिक कसं बाहेर आणायचं हे जिम क्विक ला ठाऊक आहे!”

…. मार्क हायमन म्हणतात, “विद्वत्ता प्राप्त करून देणारं कुठलं औषध नक्कीच नसतं. मात्र आपल्या मेंदूचा सर्वोत्तम वापर करत झळझळीत भविष्य घडविण्याकरिता आवश्यक असणारी प्रक्रिया जिम आपल्यासमोर उलगडतात!”

…. लिसा मोस्कोनी म्हणतात, “मेंदू स्वास्थ्य, स्मरणशक्ती सुधारणा आणि मनाची तीक्ष्णता ; यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्राची वेगळी शाखा आहे. जिम क्विक हे त्यासंदर्भातले सर्वात योग्य मार्गदर्शक आहेत. “

शरीर स्वास्थ, मनःस्वास्थ्य हे शब्द आपल्याला माहिती आहेत. मनःस्वास्थ्य ही बाब आता गतीने रुजली जात असताना मेंदू स्वास्थ्य ही आपल्यासाठी नवीन संकल्पना उदयाला येताना दिसत आहे.

या पुस्तकाचा मला स्वतःला माझ्या क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकेल यावर शंका होती…. पण हे पुस्तक जसे जसे वाचत गेलो तसे तसे या पुस्तकाची उपयोगिता माझ्या लक्षात आली. आपण अशा अनेक गोष्टींपासून दूर आहोत हे मला स्वतःला समजले. त्यामुळे परिचय लिहिण्यासाठी वाचायला सुरू केलेलं पुस्तक मी अभ्यासणार आहे. त्यामुळे मी माझ्यासाठी माझ्या दुकानातून हे पुस्तक खरेदी केलं आहे. ज्याचा उपयोग मला आणि माझ्या मुलांना होणार आहे.

काय आहे या पुस्तकात?

स्वतःला मर्यादित करून टाकणाऱ्या सर्व गोष्टींना टाळून अमर्याद कसे करून घ्याल? आपल्या मेंदूची क्षमता कशी ओळखली पाहिजे? ती वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे याचे शास्त्रीय धडे या पुस्तकात वाचायला मिळतील.

सुरुवातीला आपल्याला आपला आणि आपल्या मेंदूचा परिचय करून घेता येतो.

  • बुद्धीवर्धन ! अर्थात बुद्धिमत्ता- वाढ!
  • झटकन शिकणे हे तंत्र अवगत करण्याची शक्ती!
  • स्मरण अधिक जलद आणि अधिक परिणामकारक करणे!
  • हे किंवा कोणतेही पुस्तक कसे वाचावे? त्याचा उपयोग कसा करून घ्यावा याचे तंत्र!
  • वाचनाची गती कशी वाढवता येईल?
  • नाही कडून होय कडे अर्थात नकारात्मक विचार बदलून सकारात्मक विचार आणि कृती!
  • सृजनशीलता अर्थात क्रियेटीव्ह!

लेखक जिम क्विक ज्यांच्या मेंदूला मार लागला. परिणामी मेंदूच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागले. मन हे मेंदूची प्रेरणा शक्ती असते. लेखकाने अतिशय कष्टाने स्वतःच्या मेंदूच्या विकासासाठी नवनवीन तंत्र आणि सराव पद्धती शोधून काढल्या. या पद्धती त्यांनी इतरांवर ही वापरून पहिल्या आणि त्यांना मेंदूच्या विकासासाठी शास्त्रीय आधार मिळाला. त्यात त्यांनी अधिक तपशीलवार अभ्यास केला. यातून त्यांचा प्रवास जगातील एक नामवंत “ब्रेन कोच” म्हणून सुरू आहे.

मागील पंचवीस वर्षे ते जागतिक पातळीवर विविध क्षेत्रातील असामान्य लोकांना अधिक परिणामकारक आणि अधिक उपयोगी बनवत असताना सामान्यांना देखील त्यांच्या मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचे कसब शिकवत आहेत.

या पुस्तकाच्या सुरुवातीला आकरा पेज हे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेल्या अभिप्राय ने व्यापले आहेत. ही सर्व दिग्गज मंडळी जिम क्विक च्या workshop चे विद्यार्थी आहेत. यातील एकेक अभिप्राय वाचत गेले की आपल्याला लेखकाच्या कार्याचा आदर वाटायला लागतो. “कोणताही मेंदू मागे राहणार नाही” या आशयाचे ब्रीद वाक्य घेऊन त्यांची संस्था जगभर काम करत आहे.

हे पुस्तक माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी अतिशय प्रभावी आणि उपयुक्त आहे. माझ्याकडे जर हे एकच पुस्तक असेल तर कदाचित मी ते कोणाला भेट देणार नाही… माझ्यासाठी आवश्यक आहे. माझा अभिप्राय एकच आहे, पुस्तकाने माणूस बदलतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. असे अनेक पुस्तकं आणि अनेक माणसं याला साक्ष आहेत.

या दसरा दिवाळी निमित्ताने आपण प्रत्येकाने या पुस्तकाचा विचार करावा. एक पुस्तक खरेदी करणारा नंतर अनेकांना हेच पुस्तक भेट देईल. विकत घ्यायला सांगेल याची मला खात्री झाली आहे.

परिचय : श्री हर्षल भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले” – लेखक : डॉ. एस. व्ही. भावे ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆

सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले” – लेखक : डॉ. एस. व्ही. भावे ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆ 

पुस्तक – रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले 

लेखक – डॉ. एस. व्ही. भावे

परिचय : सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

कवी कालिदासांनी रघुवंश या महाकाव्यात प्रभू रामचंद्रानी सीतेसह लंका ते आयोध्य केलेल्या प्रवासाचे वर्णन केले आहे. त्यांच्या या प्रवास वर्णनाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याकरिता डॉ. भावे यांनी त्याच मार्गांवरून त्याच तिथीला मार्गक्रमणा केली व कालिदासांनी रघुवंशात शेकडो वर्षांपूर्वी केलेली वर्णन कशी तंतोतंत आहेत हे या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवले आहे.

विशेष म्हणजे भावे हे व्यवसायाने डॉक्टर तरीही ते संस्कृत भाषा शिकले, वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आणि छोटेखानी विमान विकत घेतले. रीतसर सर्व परवानगी मिळवली. नवरात्री मध्ये राम–रावण यांच्यात युद्ध झाले. विजयादशमीला राम विजयी झाले. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी रावणाचे पुष्पक विमान घेऊन रामाने सीतेसह घेऊन उड्डाण केले होते. त्याच दिवशी डॉ. भावेनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. कारण कालिदासांनी केलेल्या वर्णनाचा त्यांना अनुभव घ्यायचा होता. यामुळे पुस्तक वाचताना रामायणातील काही प्रसंग व रघुवंश यातील वर्णन आपल्याला वाचता येतात.

पुस्तकात संस्कृत श्लोक फार सोप्या पद्धतीने समजावले आहेत. आश्चर्य वाटते ते म्हणजे वाल्मिकीनी लिहलेलं रामायण आणि कालिदासाचे रघुवंश यामधील पशुपक्ष्यांचे निरीक्षण, स्त्रियांचे रूप आणि वागणूक, हवामानशास्त्र, दिशा-शास्त्र व त्यातील गणितं ही गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. भावेनी खगोलशास्त्रतील गणिताचा वापर करून रामसेतू शोधून काढला. सुरवातीला विमानातून पाहिला नंतर तिथं पर्यंत बोटीने प्रवास करून त्यावरती उतरून उभे राहिले आहेत. हा सेतू रामेश्वर, पांबन, आयलंड आणि लंका यांच्या मधील समुद्रात आहे.

कालिदासांच्या एका श्लोकात मातंगनक्र हा शब्द आला आहे. याच्या शोधासाठी त्यांनी अनेक ग्रंथ हाताळले, तेथील लोकल लोकांना विचारले पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्या मार्गांवरून त्यांनी दोन -तीनदा विमान प्रवास केल्यावर त्यांना त्रिवेंद्रमच्या दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत जाणारी पर्वत राशीचा आकार क्रोकोडॉईल सारखा दिसतो, तेंव्हा त्यांना मातंगनक्रचा अर्थ कळला. लोणार सरोवराचे वर्णन वाल्मिकी मध्ये चौकोनी असे आहे तर कालिदासांनी वर्तुळाकार आहे असे अचूक वर्णन केले आहे. त्यावेळी आकाशमार्ग उपलब्ध नसतानाही हे अचूक वर्णन कसे केले असेल हे आश्चर्य वाटते. अजून एक महत्वाचे म्हणजे राम सीतेला शोधण्यासाठी जात असताना त्या मर्गावर अनेकांनी मदत केल्याने परतीच्या प्रवासात पुन्हा राम त्या ठिकाणी थांबले पण सीता विमानातून न उतरल्यामुळे त्या भागात कुठेही सीतेचे मंदिर नाही. फक्त राम -लक्ष्मण यांची मंदिर आढळून येतात.

अतिशय सुंदर फोटोग्राफी या पुस्तकात बघायला मिळते. एक आगळे – वेगळे प्रवास वर्णन तेही वाल्मिकी, कालिदास, भावे यांच्या लेखणीतून साकारलेलं. वाचनीय असेच हे पुस्तक आहे.

परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)” – संकलक / संपादक : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल — मराठी भावानुवाद – सुश्री शिल्पा शशिकांत वाडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)” – संकलक / संपादक : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल — मराठी भावानुवाद – सुश्री शिल्पा शशिकांत वाडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆ 

पुस्तक : भारत एकात्मता – स्तोत्र (सचित्र दर्शन)

संकलन / संपादन : डॉ. हरिश्चंद्र बर्ध्वाल 

मराठी अनुवाद : शिल्पा शशिकांत वाडेकर

पृष्ठे: १३६ (मोठा आकार)

मूल्य : ३००₹ 

परिचय : हर्षल भानुशाली 

आपल्यापैकी अनेक जण दररोज आंघोळ केल्यानंतर देवाला नमस्कार करतो. देवाचे नामस्मरण करत असताना काहीजण श्लोक, स्तोत्र म्हणत असतील.

‘भारत एकात्मता स्तोत्र’ हे एक असे पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्या देशातील नदी, पर्वत, तीर्थक्षेत्र, वेद, पुराण, उपनिषद, धार्मिक ग्रंथ, विद्वान, पराक्रमी महिला, पुरुष, संत, कवी, लेखक, वैज्ञानिक, क्रांतिकारक, शूरवीर राजे, समाजसुधारक आदींवर स्तोत्र रचण्यात आले आहे.

या पुस्तकात एकूण ३३ स्तोत्र आहेत. प्रथम सर्व ३३ स्तोत्र एकत्रित दिले आहेत. त्यानंतर प्रत्येक पानावर एक-एक स्तोत्र देऊन त्या स्तोत्राचा मराठी अनुवाद ठळक अक्षरांत विस्ताराने चित्रांसह दिला आहे. त्यातील पहिल्या स्तोत्रात ईश्वराचे स्मरण केले आहे. तो स्तोत्र आहे 

ॐ ज्योतिर्मय स्वरूपाय विश्वमांड्ङ्गल्यमूर्तये ।।

ॐ सच्चिदानन्दरूपाय नमोऽस्तु परमात्मने।

अर्थ : ॐ ज्योतिर्मय स्वरूपसंपन्न अशा विश्वाचे कल्याण करणाऱ्या, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्यास नमस्कार असो.

दुसऱ्या स्तोत्रात पंचमहाभूत, ग्रह, स्वर, दिशा, काल याची माहिती आहे, तिसऱ्या स्तोत्रात भारतमातेला वंदन केले आहे. चवथ्या स्तोत्रात देशातील प्रसिद्ध अशा पर्वतांची, पाचव्या स्तोत्रात प्रमुख नद्या, सहाव्या आणि सातव्या स्तोत्रात तीर्थक्षेत्रांची माहिती देताना थोडक्यात त्यांचा इतिहासही सांगितला आहे. आठव्या स्तोत्रात विश्वविख्यात अशा चार वेद, १८ पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत भगवद्‌गीतांचा आदींचा उल्लेख आहे. नवव्या स्तोत्रात जैन, बौद्ध, शीख या पंथांच्या ग्रंथांचा उल्लेख आहे.

दहाव्या आणि अकराव्या स्तोत्रात प्राचीन विद्वान, संत, शूर अशा महिलांचा समावेश केला आहे. त्यांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

बाराव्या आणि तेराव्या स्तोत्रात प्रभू श्रीराम ते भगवान परशुराम, १४व्या स्तोत्रात समाजामध्ये आदराचे स्थान मिळविणाऱ्या प्राचीन व्यक्ती, पंधराव्या स्तोत्रात विविध पंथातील वंदनीय व्यक्तींचे स्मरण केले आहे. १६व्या, १७व्या व १८व्या स्तोत्रात विविध राज्यांतील संतांची माहिती देण्यात आली आहे. १९व्या स्तोत्रात देशभक्त बिरसा मुंडा, सहजानंद आणि रामानंद स्वामी यांची माहिती दिली आहे. २०व्या आणि २१व्या स्तोत्रात साहित्य, कला क्षेत्रातील, २२व्या आणि २३व्या स्तोत्रात – ऋषी, पराक्रमी राजांची माहिती देण्यात आली आहे.

२४व्या आणि २५ व्या स्तोत्रात देशातील प्रमुख प्रशा महापराक्रमी महाराजांचा परिचय, २६व्या आणि २७व्या स्तोत्रात- भारतीय परंपरेतील प्राचीन व आधुनिक वैज्ञानिक ऋषी, गणितज्ञ यांची माहिती, २८व्या आणि २९व्या स्तोत्रात १९व्या शतकातील संत, समाजसुधारक, ३०व्या आणि ३१व्या स्तोत्रात भारतीय समाजावर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांतील व्यक्तींचा परिचय देण्यात आला आहे.

३१व्या स्तोत्रात – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर (गुरुजी) यांचा परिचय देण्यात आला आहे. ३२व्या स्तोत्रात या भारतभूमीवर जन्म घेतलेल्या अनेक अज्ञात महापुरुषांचे स्मरण करण्यात आले आहे. तो स्तोत्र असा आहे-

अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरणसंसक्तहृदया

अनिर्दिष्टा वीरा अधिसमरमुद्ध्वस्तरिपवः ।

समाजोद्धर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणाः

नमस्तेभ्यो भूयात् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् ।। ३२ ।।

वरील सर्व श्लोकांत ज्यांचा उल्लेख झालेला नाही, असेही ईश्वर चरणांवर जीवन समर्पित अनेक भक्त या भूमीवर झाले आहेत. असे अनेक अज्ञात वीर येथे झाले; ज्यांनी युद्धभूमीवर शत्रूचा विनाश केला तसेच अनेक समाजोद्धारक आणि लोकहितकारी विज्ञानाचे आविष्कर्ता येथे झाले. या सर्व सत्पुरुषांना प्रतिदिन आमचा नमस्कार असो.

शेवटच्या ३३व्या स्तोत्रात दररोज सर्व स्तोत्रांचे पठण करण्यास सांगितले आहे. तो स्तोत्र आहे-

इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत् ।

स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत् ।।३३ ।।

या सर्व स्तोत्रांमध्ये आपल्या देशातील सर्व वंदनीय गोष्टींचा समावेश केला गेला आहे. हे पुस्तक प्रत्येक कुटुंबात असावे, एवढे महत्त्वपूर्ण आहे.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक स्तोत्र म्हटला गेल्यानंतर त्याचा मराठी अर्थही वाचावा. जेणेकरून त्या-त्या स्तोत्रामध्ये कोणाकोणाचा उल्लेख आहे, ते कळेल.

आर्टपेपरवरील अतिशय सुंदर छपाई, रंगीत चित्रे आणि ठळक अक्षरात असल्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “पेशवेकालीन समाज आणि प्रशासन ” – लेखक : गो. बं. देगलूरकर — परिचय – आनंद हर्डीकर☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆

श्री हर्षल भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पेशवेकालीन समाज आणि प्रशासन ” – लेखक : गो. बं. देगलूरकर — परिचय – आनंद हर्डीकर☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆ ☆ 

पुस्तक : पेशवेकालीन समाज आणि प्रशासन 

लेखक : गो. बं. देगलूरकर,

परिचय : आनंद हर्डीकर

पृष्ठ- ३१० +२० 

मूल्य- ५००₹ फ्री होम शिपिंग

पेशवाईतील समाजाचे वस्तुनिष्ठ दर्शन

महाराष्ट्रातील वैचारिक प्रबोधनाचा ज्यांनी पाया घातला, त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जशा विविध संस्था स्थापन केल्या, तसे अनेक उपक्रमही चिकाटीने राबविले. ‘राईज ऑफ द मराठा पॉवर’ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच, पण लयास गेलेल्या मराठेशाहीच्या उत्तरार्धाचा इतिहास विस्मरणात जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारच्या ताब्यात असलेल्या पेशवे दफ्तरातील हजारो दस्तऐवजही प्रयत्नपूर्वक मिळवले. रावबहादूर जी. सी. वाड यांच्या सहकार्याने त्यांनी पार पाडलेली ही कामगिरी त्यांच्या इतर कार्याच्या मानाने तशी उपेक्षितच राहिली. न्यायमूर्तींनी पेशवे दफ्तरातले थोडेथोडके नव्हेत, तब्बल ५०, ००० कागद मिळवले होते आणि त्यातले निवडक ५००० कागद ‘डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी’ या स्वत:च पुढाकर घेऊन स्थापलेल्या संस्थेतर्फे प्रसिद्ध होतील, अशी तजवीजही केली. नऊ खंडांमध्ये प्रसिद्ध करावयाच्या त्या ऐतिहासिक साधनग्रंथाला साजेलशी सामायिक प्रस्तावनाही त्यांनी लिहिली. तथापि ‘पेशवे रोजनिशी’ चे ते खंड प्रकाशित होण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. थोड्याशा विलंबाने, पण त्या संस्थेने ते सर्व खंड प्रसिद्ध केलेदेखील. (पुढे यथावकाश संस्थेचे ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ असे नामांतर झाले. )

शंभर वर्षांपूर्वीच्या त्या घटनेची आज नव्याने दखल घेण्याचे कारणही तसेच महत्त्वाचे आहे. गेली कित्येक वर्षे दुर्मीळ असलेल्या त्या पेशवे रोजनिशीच्या आधारे संस्थेचे विद्यामान अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहिलेला ‘पेशवेकालीन समाज आणि प्रशासन’ हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासारख्या व्यासंगी विद्वानाने हा ग्रंथ लिहून न्यायमूर्तींच्या ‘त्या’ पायाभूत संकलन/ संपादनकार्याला यथोचित मानवंदना तर दिली आहेच, पण तसे करतानाच न्यायमूर्तींनी रोजनिशीच्या नऊ खंडांना लिहिलेल्या प्रस्तावनेत व्यक्त केलेली खंत लक्षात घेतली आहे; आणि ती दूर करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. ‘पेशवेकालीन इतिहासावर लिहिताना मुख्यत: राजकारण, लढाया यावरच अधिक भर दिला गेला, त्यावेळचे समाजजीवन आणि जनसामान्यांचे जीवन इकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, ’ ही न्या. रानडे यांनी व्यक्त केलेली खंत दूर करणारा हा ग्रंथ म्हणूनही दखलपात्र ठरतो. या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पेशवाईचे गुणगान करण्यासाठी जसा लिहिलेला नाही, तसाच तो मुद्दाम एखाद्या विविष्ट ज्ञातिसमूहावर आगपाखड करण्यासाठीही लिहिलेला नाही. तत्कालीन समाजाचे त्यांच्या गुणदोषासह पारदर्शक चित्र वाचकांसमोर उभे राहावे, याच दृष्टिकोनातून दोन भागांतील एकूण पंधरा प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. पेशवाईतील धार्मिक वातावरण, त्यात सांभाळली जाणारी परधर्मसहिष्णुता, जातिप्रथेचे किंवा गुलामगिरीचे अस्तित्व असतानाच अंगवळणी पडलेल्या माणुसकीच्या प्रथा, विद्वानांचा मान राखला जात असला, तरीही संस्थात्मक औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा जाणवण्याजोगा अभाव, जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी कायमची उपचारकेंद्रे उपलब्ध नसली, तरीही गोरगरिबांना मोफत औषधे पुरविणारे वैद्या सर्वत्र उपलब्ध असतील अशी तरतूद, बारा बलुतेदारांच्या मर्यादित ग्रामकेंद्रित अर्थव्यवस्थेवरचा वतनदारीचा प्रभाव, सर्रास रुढ असणारी लाचखोरी, संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी आवश्यकतेनुसार ‘जासूद’ किंवा ‘कासिद’ नेमण्याची पद्धत, आर्थिक व्यवहारांमध्ये सावकारांना दिली जाणारी प्रतिष्ठा व हमी, करदाते समाधानी राहतील अशी महसूलवसुलीची पद्धत, पेठा-वाडे-बागा-मंदिरे या सर्वांची यथायोग्य व्यवस्था पाहणारी नगररचना, महिलांच्या सुरक्षिततेविषयी विशेष दक्षता घेणारी न्यायव्यवस्था, राज्यविस्तार झाल्यानंतरही सह्याद्रीतील गडांवरचा बंदोबस्त कडक राखण्याची दक्षता, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच सुरू झालेले पुण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन… या आणि अशाच इतरही अनेक मुद्द्यांबद्दलचे साधार, सोदाहरण विवेचन आपल्याला या ग्रंथात वाचावयास मिळते.

पुण्यातली सुप्रसिद्ध सदाशिव पेठ म्हणजे पूर्वीचे मौजे नायगाव उर्फ सांडस नावाचे खेडेगाव ही ‘पेशवे रोजनिशी’त सापडलेली नोंद असो किंवा इ. स. १७५२ आणि १८०४-०५ मधील दोन नोंदींच्या आधारे महाराष्ट्रातील एकूण ३०५ किल्ल्यांची दिलेली सूची असो, ‘पेशवे रोजनिशी’ मधील १२६८ कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे परिशिष्ट असो किंवा महाप्रतापी थोरले बाजीराव पेशवे उत्तम ग्रंथसंग्राहकही होते, हे प्रकाशझोतात आणणारे तपशील असोत… या ग्रंथात पानोपानी विखुरलेल्या असंख्य बाबी पेशवाईच्या काळातील समाज आणि प्रशासन याबद्दलचे वस्तुनिष्ठ चित्र उभे करण्यात यशस्वी ठरल्या आहेत, असे जाणवते. डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे आणि या अभ्यासप्रकल्पात त्यांना साहाय्य करणाऱ्या अविनाश श्री चाफेकर व आनंद नी. दामले या दोघांचेही त्याबद्दल इतिहासप्रेमी अभ्यासक नेहमीच ऋणी राहतील. आणि या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ पुरवल्याबद्दल आयसीएचआरचेही आभार मानायला हवेत.

परिचय : आनंद हर्डीकर 

प्रस्तुती : श्री हर्षल भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “महाभारत युद्धकाळ” – लेखक : श्री नीलेश ओक — भावानुवाद – सुश्री अलका गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “महाभारत युद्धकाळ” – लेखक : श्री नीलेश ओक — भावानुवाद – सुश्री अलका गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली  

पुस्तक: महाभारत युद्ध काळ

लेखक : नीलेश ओक 

मराठी अनुवाद:अलका गोडबोले

पृष्ठ:२१६ मोठा आकार

मूल्य:४५०₹

रामायण आणि महाभारत यांची ऐतिहासिक सत्यता सिद्ध करणारे अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी लिहिलेला हा ग्रंथ!

‘ऐतिहासिक राम‘ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक निलेश ओक यांचे हा महाभारताची ऐतिहासिकता सिद्ध करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुख्यतः त्यांनी खगोलीय घटना यांना केंद्रीभूत धरून लिहिला असला तरीही महाभारताचा कल्पना विलास म्हणून उपहास करणाऱ्यांना सप्रमाण उत्तर आहे.

(महाभारताचे युद्ध दिनांक १६ ऑक्टोबर ५५६१ ते २ नोव्हेंबर ५५६१ दरम्यान झाले आहे…. पण हा कालखंड Before Common Era असा वाचावा !) 

आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांचा अभ्यास करणाऱ्यांना हा ग्रंथ म्हणजे अनमोल ठेवा आहे…. पण ज्या वाचकांना दृश्य खगोलशास्त्राचा परिचय नाही अशांसाठी प्रकरण तीन आणि चार मदत करतात आणि वाचकाला याबत साक्षर करतात.. विविध आकृत्या, तक्ते आणि कोष्टकांनी भरून गेलेला ग्रंथ!

महाभारत आणि रामायण यांचा जगावर प्रचंड प्रभाव आहे. या ग्रंथांनी भारतीय जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा पाया घातला आहे. हा आपला अभिमानास्पद इतिहास आहे….. पण भारतीयांची अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून रामायण महाभारत सारख्या इतिहासाला कल्पना विलास म्हणून हिणवलं गेलं. ही एक बाजू जरी खरी असली तरीही महाभारत वास्तवात होऊन गेलं आहे, असे म्हणणाऱ्यांनी देखील खगोलशास्त्रीय निरीक्षणं दुर्लक्षित केली आहेत. त्यात सर्वात महत्वाचं निरीक्षण म्हणजे “अरुंधती तारा !”

लेखक निलेश ओक म्हणतात, ” महाभारत युद्धाची तारीख निश्चित करण्यात जर अरुंधती हा सर्वात असंदिग्ध खगोलशास्त्रीय पुरावा म्हणून पात्र ठरत नसेल तर महाभारतातील खगोलशास्त्रीय पुराव्यांबद्दल बोलणेच थांबवले पाहिजे. “

पुस्तकातील उत्कंठावर्धक भागाची सुरुवात पाचव्या प्रकरणापासून होते. पण पहिली चार प्रकरणही तितकीच महत्त्वाची आहे. ही प्रकरणे खगोलशास्त्र समजून घेण्यासाठी फार मदत करतात. ज्यांना यात रस आहे, अशांना हा ग्रंथ फार मोठी मेजवानी!

प्रस्तुत ग्रंथ हा महाभारताची कथा सांगणारा नसून महाभारताचा कालावधी आणि तो कालावधी सिद्ध करणारा संशोधनात्मक अभ्यास आहे. ज्यांना कालगणना, अवकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र…. आदी गोष्टींची किमान तोंडओळख आहे, खगोलशास्त्र, ज्योतिष शास्त्र यांची तोंडओळख आहे, अशा वाचकांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक पर्वणी!

पहिल्या प्रकरणात लेखक मुख्य समस्या आणि विशिष्ट ध्येयांची यादी देतो. मुख्य समस्या म्हणजे “महाभारत युद्ध केव्हा झाले?”

दुसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाच्या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवरील गृहीतकांची यादी आहे. काही सिद्धांतांचा डळमळीतपणाही लेखकाने ठळकपणे मांडला आहे. याच प्रकरणात लेखकाचा सिद्धांत आणि तो सिद्धांत तपासून पाण्याची कार्यपद्धती दिली आहे.

तिसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाने खगोलशास्त्रीय निरीक्षणे आणि त्यांची स्पष्टीकरणे समजावीत या दृष्टीने खगोलशास्त्रातील मूलभूत गोष्टी दिल्या आहेत. जसे की पृथ्वीचे चलन संपातबिंदूची घटना, संपातबिंदूमुळे घडणारी उत्तर ध्रुवाची हालचाल, सूर्य आणि चंद्रग्रहणे, ग्रेगोरियन आणि ज्युलियन दिनदर्शिका… इत्यादी.

प्रकरण चार हे अद्वितीय अशी भारतीय आणि महाभारतातील खगोलशास्त्र आणि दिनदर्शिका यांच्या संकल्पना समजावून सांगते. या प्रकरणात भारतीय दिनदर्शिकेचे चांद्र सौरस्वरूप समजावले आहे. मास, पक्ष, तिथी आणि नक्षत्र समजून घेणे सोपे होते.

प्रकरण पाच मध्ये महाभारतातील अनेक निरीक्षणांपैकी एकाचा विचार केला आहे.

प्रकरण सहावे अरुंधतीच्या निरीक्षणाची समस्या आणि त्या समस्येवरील लेखकाचे उत्तर याची चर्चा करते.

सातव्या प्रकरणांमध्ये अरुंधती निरीक्षणाने परिभाषित केलेल्या कालखंडाचा शोध घेतला जातो. त्यासाठी महाभारतातील ग्रह आणि धूमकेतू यांच्या वर्णनाची मदत घेता येते.

आठव्या प्रकरणात महाभारतातील निरीक्षणे विशेषता महाभारत युद्धाच्या 18 दिवसातील चंद्राच्या कला आणि स्थिती यांचा उपयोग केला आहे.

नव्या प्रकरणात लेखकाच्या सिद्धांताच्या आणि त्यात केलेल्या अंदाजाच्या विरोधात असणाऱ्या महाभारतातील निरीक्षणांचा विचार केला आहे आणि पर्यायी स्पष्टीकरणे सुचवली आहेत.

दहाव्या प्रकरणांमध्ये स्वयंभूचे लेखक प. वि. वर्तक यांच्या सिद्धांताची रूपरेषा मांडली आहे.

अनुक्रम:

१. समस्या

२. सिद्धांत अनुमान आणि पार्श्वभूमीवरील ज्ञान

३. खगोलशास्त्राची तोंड ओळख

४. महाभारतातील खगोलशास्त्र

५. मत्सरी बहीण आणि अभिजीत चे पतन

६. अरुंधतीचे युग

७. ३६ गुण जुळले महाभारत युद्धाच्या वर्षाचा शोध

८. महाभारत युद्धाचा पहिला दिवस चंद्राच्या कला आणि स्थिती

९. परस्पर विरोधी निरीक्षणे

१०. प वि वर्तक यांचा सिद्धांत

११. अधिक चांगला योग्य सिद्धांत

१२. परिणाम भाकीते अंदाज आणि नवीन समस्या

१३. टिपणे, निवडक संदर्भ ग्रंथ, तक्ते आणि आकृत्या

लेखक परिचय : अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी रामायणासह महाभारताच्या कालनीश्चितीसंदर्भाने संशोधन केले असून सिद्धांत मांडला आहे. आपल्या सिद्धांतातून समोर आलेली माहिती या दोन ग्रंथात त्यांनी मांडली आहे. रामायणाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण १२, २०९ वर्षे आहे, तर ऋग्वेदाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण २४ हजार वर्षे असल्याचे त्यांनी खगोलशास्त्रीय पुराव्याच्या आधारे दाखवून देतात.

महाभारतासंबंधाने नीलेश ओक सांगतात “महाभारताची कालनीश्चिती करण्यासाठी मी जवळपास ३०० हून अधिक खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास केला. माझ्या संशोधनानंतर महाभारताचा काळ आजपासून ७५०० वर्षे आधीचा असल्याचे सिद्ध झाले. परंतु, आपल्यापैकी अनेकजण भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना ५ हजार वर्षे आधी असा करतात, जे चुकीचे आहे. कारण भारतीय संस्कृती त्याआधीपासून अस्तित्वात आहे. ”

यामध्ये अजून एक मुद्दा आहे आजवर आपल्या भारताचा इतिहास हा आधी इंग्रजांनी आणि त्यानंतर आलेल्या कम्युनिस्ट प्रणित इतिहास करते आणि आपला इतिहास हा हजार पंधराशेच्या वर्ष मागे नेला नाही आणि म्हणून आम्ही सगळे मागासलेले असं ठरवण्यात असा शिक्का मारण्यात ते पटाईत झाले आणि त्यांची ओढणारे इथले तथाकथित इतिहास तज्ञ त्यातच धन्यता मानू लागले. या सगळ्याला आता एक निश्चितच आळा बसून आपला इतिहास असंख्य हजार वर्ष जुना आहे आणि तो अतिशय समृद्ध असा आहे हे आपल्याला जाणून घेता येईल. या दृष्टीने या पुस्तकाचे खूप अतिशय महत्त्वाचं महत्त्व आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र) => लेखक : मा. यशवंतराव चव्हाण ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र) => लेखक : मा. यशवंतराव चव्हाण ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

पुस्तक : “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र)

लेखक : मा. यशवंतराव चव्हाण.

रोहन प्रकाशन

पृष्ठे-३१७

मूल्य-३००₹

☆ ‘कृष्णाकाठ‘- एक आदर्श राजकीय जडणघडण –  सुश्री सुचित्रा पवार  ☆

महाराष्ट्र मातेला लाभलेला एक आदर्श व्यक्तिमत्व. खरे तर हे त्यांचे आत्मचरित्र नसून एका यशस्वी नेत्याचा खडतर प्रवास आहे. एखादे लाडके, आदर्श, महान व्यक्तिमत्त्व मोठ्या घरात किंवा श्रीमंत घरात जन्म घेतल्याने घडते असे नसून आपल्या अंगच्या चांगल्या गुणांचे उदात्तीकरण केल्याने व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरच घडते हे अधोरेखित करणारा यशवंतराव चव्हाणांचा हा थोडक्यात जीवनप्रवास. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म  ते प्रथम पार्लमेंटरी सेक्रेटरी पर्यंतचे त्यांच्या जीवनातील चढ उतार व स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सक्रिय सहभाग याचा तटस्थ मागोवा म्हणजे ‘कृष्णाकाठ’ होय.

या नेत्याबद्दल कुणाच्या मनात प्रेम, आपुलकी, आदर नसेल असा माणूस महाराष्ट्रात विरळाच. मलाही त्यांच्या जीवन चरित्राबद्दल आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाबद्दल कसे न कधी कुतूहल, आदर, आपुलकी न जिव्हाळा निर्माण झाला हे आठवत नाही पण त्यांच्याबद्दल अपार जिव्हाळा आणि कमालीचा आपलेपणा आणि आदर वाटतो हे मात्र खरे.

१२मार्च १९१३ रोजी अशा या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा जन्म विट्याजवळील(जि सांगली) ढवळेश्वर या अतिशय छोट्याशा खेडेगावातील अतिसामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची पण हृदयस्पर्शी कहाणी आहे. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या आई बेशुद्ध झाल्या. देवराष्ट्रे आजोळ, ग्रामीण भाग आणि त्याकाळी दवाखाने, उपचार, औषधे याबाबतीत आपण मागासच होतो. त्यांच्या आईची न बाळाची सुखरूप सुटका व्हावी यासाठी आजीने सागरोबाला साकडे घातले व यश दे म्हणून प्रार्थना केली. झालेच तर तुझी आठवण म्हणून मुलाचे नाव ‘यश’वंत ठेवेन अशीही प्रार्थना केली आणि बाळ बाळंतीण सुखरूप सुटले. त्यावेळच्या आर्थिक सामाजिक परिस्थिनुसारच त्यांचेही बालपण होते. वडील कराडला बेलीफ. दोन थोरली भावंडे व आई यांच्यासोबतच्या सुखदुःखाचा प्रवास, कुटुंबाने वेळोवेळी त्यांना दिलेली साथ, मदत आणि निरक्षर आईचे आपल्या लाडक्या लेकास स्वातंत्र्य चळवळीत झोकून देण्याची संमती याचे वस्तुनिष्ठ चित्रण म्हणजे कृष्णाकाठ.

प्लेगच्या साथीत वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळं लेखकास लहानपणी पित्याचे प्रेम मिळू शकले नाही. लहान लहान मुलांना घेऊन आईने माहेरची वाट धरली. देवराष्ट्रे(जि. सांगली) हे त्यांचे माहेर म्हणजेच यशवंतरावांचे आजोळ. त्यांचे बाल्य इथंच गेले. इथल्या मातीत इथल्या ओढ्याकाठी ते आपल्या सवंगड्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळत, पोहत.

लहान लहान मुले व तुटपुंजे उत्पन्न यामुळे चव्हाण कुटुंबियांचे हाल झाले पण आईने कष्टातून, जिद्दीने त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कारआणि जिवनाचा सुसंस्कार दिला. वडील बेलीफ अर्थात सरकारी नोकरीत असल्याने सांत्वनाला आलेल्या वडिलांच्या एका सहृदय मित्राने(शिंगटे) अनुकम्पा तत्वावर थोरल्या भावाच्या नोकरीसाठी खटपट केली आणि मोठ्या भावाला(ज्ञानदेव)नोकरी लागली व चव्हाण कुटुंब परत कराडला वडिलांच्या कर्मभूमीकडे गेले. तीच यशवंतरावांची देखील एका अर्थाने कर्मभूमीच होती. शिक्षण, व्यवसाय आणि स्वातंत्र्य चळवळीत घेतलेली उडी आणि सक्रिय सहभाग या सर्व बाबी कराड व कराडच्या आसपासच्या परिसरातच घडल्या.

कराडला स्थाईक झाल्यावर त्यांच्या आईने मुलांवर सर्वात महत्वाचा संस्कार दिला तो म्हणजे शिक्षण. कळत्या वयात यशवंतरावाना सुद्धा कळून चुकले की जीवनात व्यवस्थित रित्या तरून जायचेअसेल तर  शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. काही माणसे विशिष्ट कर्मासाठीच जन्माला येतात त्यातलेच एक यशवंतराव देखील. घरात कुठलीच राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी नसताना यशवंतरावांचे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणे आणि नंतर वेगवेगळी राजकीय पदे भूषवणे हे त्याचेच द्योतक आहे.

ते दिवस होते स्वातंत्र्य चळवळींनी भारलेले. करू वा मरू, चले जाव, असहकार, उपोषण अशा नाना चळवळी अगदी टिपेला होत्या. प्रत्येकाचे रक्त स्वातंत्र्य प्रेमाने उसळत होते. (अपवाद देशद्रोही)साहजिकच आसपासच्या वातावरणाचा परिणाम लेखकाच्या मनात खोलवर रुजला. पण तो अगदी मुळापासून होता, त्यांच्या रक्तातच जणू स्फुरण चढले. मनात एखादा विचार खोलवर रुजणे, त्याचा अंगीकार करणे आणि या विचारांशी कुठल्याही परिस्थितीत प्रतारणा न करणे हे कोण्या सोम्या-गोम्याचे काम नसते. पोलिसांची एक लाठी बसली किंवा एक तुरुंगवास भोगला की सामान्य माणूस रुजलेला विचार मुळासकट काढून फेकतो पण यशवंतराव अशा हलक्या मातीचे बनले नव्हते.

शाळकरी वयातच म्हणजे जेमतेम१३-१४ व्या वर्षीच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. इंग्रज सरकार विरुद्ध केलेल्या भाषणासाठी त्यांना कैद करण्यात आले पण शाळकरी वय म्हणून एक दिवस तुरुंगात ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून दिले. यशवंतरावानी आपले विचार, आपण काय करणार?आपल्या जीवनातील सर्व घडामोडींची चर्चा प्रत्येक वेळी आपल्या मोठ्या भावांशी आणि आईशी केली. आसपासच्या भीतीदायक वातावरणाचे व धर पकडीचे भय व आपल्या मुलाची काळजी त्यांच्या आईला वाटणे साहजिकच आहे पण त्या माऊलीने आपल्या मुलाच्या कोणत्याच धाडसाला विरोध केला नाही. फक्त शाळा न सोडता, शैक्षणिक नुकसान न करता जे काही करता येईल ते करण्याचा सल्ला दिला आणि यशवंतरावांची चळवळीतील घोडदौड  सुरू झाली ती इप्सित धेय्याच्या अलीकडे थांबली.

१९३२ साली यशवंतरावाना पहिल्यांदाच अठरा महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. इतकी मोठी सजा प्रथमच तेही अगदी पोरसवदा वयात. त्यांना येरवडा इथं नेले जात असता आई व त्यांचे शिक्षक भेटायला आले होते. आईला अर्थातच दुःख झाले. शिक्षकांनी सांगितले की तू माफी मागीतलीस तर तू सुटशील. पण आईने बाणेदार पणे सांगितले, माफी कशासाठी मागायची?जे होईल त्याला सामोरे जायचे. धन्य ती आई!अशा अनेक माऊलीनी आपले पोटचे गोळे काळजावर दगड ठेवून देशाला दिलेत म्हणून आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. येरवडा येथील तुरुंगात गांधीजी सुद्धा शिक्षा भोगत होते मात्र कैदी जास्त असल्याने जवळच सर्व कैद्यासाठी स्वतंत्र बराकींची व्यवस्था करण्यात आली होती. छोटे छोटे तंबू प्रत्येक कैद्यासाठी उभारले होते. शिक्षा ही शेवटी शिक्षाच असते पण तिथं सहवासात आलेल्या एस एम जोशी व इतर बड्या बड्या आणि महत्वपूर्ण नेत्यांशी, व्यक्तिमत्वाशी ओळख व मार्गदर्शन झाल्याने शिक्षाही जीवनाला दिशा देणारी ठरली आणि सुसह्य झाली. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन व त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चेतून जणू त्यांना भविष्यातील जीवनाचे नवनीत मिळाले. यतींद्रनाथांचा सुद्धा यशवंतरावांवर मोठा प्रभाव होता. त्यांच्या मृत्यूनंतर यशवंतराव खूप दुःखी झाले जणू घरातीलच एखादी व्यक्ती गेली आहे. साने गुरुजींशी झालेली त्यांची भेटसुद्धा उल्लेखनीय आहे.

अठरा महिन्यांची सजा भोगून आल्यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण केले. शिक्षणाची आस, जिद्द, स्वातंत्र्य चळवळीतील धाडस व स्वभावातला गोडवा यामुळं शिक्षक प्रिय विद्यार्थी राहिले. पुढं व्यावसायिक शिक्षणासाठी पुणे इथं प्रवेश घेतला. विधी परीक्षा उत्तीर्ण होऊन कराड मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. दरम्यान वेणूताईंशी विवाह देखील झाला.

यशवंतराव भूमिगत असताना सरकारने धरपकड सुरू करून कुटुंबियांना त्रास देणे सुरू केले. मोठ्या भावाची सरकारी नोकरी असल्याने खूप बिकट स्थिती होती. वेणूताईंना आणि त्यांचे मधले बंधू गणपतरावना अटक झाली. यावेळचे दोन प्रसंग खूप हृदय हेलवणारे आहेत. वडीलबंधूंचा गणपतरावांवर जीव होता व 

गणपतरावांचा यशवंतरावांवर. गणपतरावांच्या सजेत  सूट मिळवण्यासाठी ऐकीव माहितीवर घाई घाईने त्यांनी स्वतःच्या आवाळूचे ऑपरेशन करून घेतले. जखम चिघळू नये म्हणून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला त्यांनी मानला नाही आणि जखम चिघळून त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. इकडं गणपतराव सुद्धा क्षयाने आजारी पडले. मिरजेत त्यांचे उपचार सुरू झाले. पण कुटुंबाच्या आर्थिक ओढाताणीसाठी ते आरोग्याकडे दुर्लक्ष करून काम करायला बघायचे व आजार बळावयाचा.

पुढं सार्वत्रिक निवडणुका झाल्या. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरणारे किंवा स्वतःसाठी पुढं पुढं करणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. पण तरीही त्यांची निवड पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून झाली. द्विधा मनःस्थितीतच ते बंधू गणपतराव, पत्नी वेणूताई आणि आईला सल्ला विचारण्यासाठी गेले असता तिघांनीही एकमतांनी पुढं जाण्यास सुचवले आणि त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला. लेखक म्हणतात की मुंबईला जाताना मनात असंख्य विचार, पाठीमागील सर्व आयुष्य नजरेसमोर  तरळून गेले. बोगद्यातून गाडी जात असताना ही भविष्यातील चढ उतारांची नांदी तर नसावी ना?असे वाटून गेले.

पुस्तक इथं संपलं. ‘कृष्णाकाठ’ खरे तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या व्यापक चळवळीचा एक अगदी छोटासा कोपरा आहे. पुस्तकातील प्रत्येक घटना प्रसंग त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवते. त्यावरून आपल्याला देशव्यापी चळवळ किती मोठी न व्यापक असेल याची कल्पना येते. लेखक स्वतः या चळवळीचा महत्वपूर्ण हिस्सा असले तरी त्याचे सर्व तपशील, घडामोडी आणि घटना या त्रयस्थपणे मांडल्या आहेत जे होतं तसच्या तसं. इतकेच काय त्यांनी आपल्या कौटुंबिक परिस्थितीचे वर्णन सुद्धा अतिरंजित पणे केलं नाही. नाहीतरी कित्येक लेखकांनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी अतिरंजित, तिखट मीठ लावून सांगून वाचकांकडून दया मिळवली आहे. पण स्वतः लेखकांनी कबूल केलेय की त्यावेळी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची जशी परिस्थिती होती तशीच आमची देखील होती. त्याला मी अतिरंजित करून सांगू इच्छित नाही. त्यांच्या जीवनातील कितीतरी प्रसंग आपल्या अंगावर काटा आणतात. बिळाशीत मैलोन मैलाचा प्रवास करून गुप्तपणे प्रवेश करणे, तिथं सभा घेणे आणि पोलिसांना न सापडता नदीतून पोहत कोल्हापूर गाठणे. मिळेल ती भाजीभाकरी खाऊन पुढचा कार्यक्रम करणे. कार्यकर्त्यांशी गुप्त चर्चा करणे, संघटना बांधणे. कोणत्याही प्रकारची संपर्क साधने नसताना त्यावेळची देशभक्तांची  गुप्तचर संघटना किती प्रभावी व अचूक होती हे पुस्तक वाचताना समजते न आपण मनोमन सर्वाना नमन करतो. शालेय जीवनात शिक्षकांनी “तू कोण होणार?”याचे साधे सोपे उत्तर “मी यशवंतराव होणार”असे दिल्यावर शिक्षकांनी त्यांना गर्विष्ठ, शिष्ट समजणे अशा कुठल्याच प्रसंगात त्यांना तिखट मीठ लावण्याचा मोह झाला नाही.

आपल्या मनमिळावू स्वभावाने माणसे जोडणे त्यांना समजून घेणे व बरोबर घेणे यामुळे ते सर्व मित्रात प्रिय राहिले. आपल्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या व चळवळीस सहकार्य करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सुहृदांचा त्यांनी उल्लेख केलाय आणि आठवणही ठेवली आहे. लहानपणापासून सर्व स्तरातील मुलांसोबत मैत्र केले आणि शेवट पर्यंत ते निभवले. आपले वाचन, चिंतन, मनन यामुळं सभा जिंकत राहिले. सर्वांशीच कृतज्ञता भाव ठेवला.

आपल्या कोमल हृदयामुळे ते सर्वाना आपले वाटले. आजपर्यंत आपण फक्त श्यामची आई वाचली पण यशवंतरावांच्या आईंवर सुद्धा एक स्वतंत्र पुस्तक होईल असे वाटते. पतीच्या पाठीमागे इवल्या लेकरांना खडतरपणे वाढवणारी, प्रत्येक प्रसंगात आपल्या मुलांचा आधार होणारी, कुटुंबाला प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवणारी मायाळू आई. जिने देशाला, मराठी मातेला एक थोर सुपुत्र दिला, आदरणीय व्यक्तिमत्व व आदर्श नेता दिला.

इतकी मोठी पदे भूषवून देखील आपली नाळ जन्मभूशी, मातीशी जोडून ठेवणारे विरळाच, यशवंतराव त्यातलेच एक.

या मातेला आणि यशवन्तरावाना माझे कोटी कोटी प्रणाम.

लेखक : मा. यशवंतराव चव्हाण.

समीक्षक – © सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्पंदने मनाची” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री ऋचा पत्की  ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “स्पंदने मनाची” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री ऋचा पत्की  ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : स्पंदने मनाची (काव्यसंग्रह)

कवयित्री : सुश्री ऋचा पत्की 

प्रकाशक: मुक्तरंग प्रकाशन, लातूर.

प्रथम आवृत्ती: १० मे २०२३

मूल्य: १५० रुपये.

मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेला माननीय ऋचा पत्की यांचा स्पंदने मनाची हा पहिलाच कवितासंग्रह. मात्र यातल्या सर्व ७५ कविता वाचल्यानंतर असे वाटले की काव्यशास्त्र क्षेत्रातला त्यांचा हा संचार कित्येक वर्षांपूर्वीचा असावा इतकी त्यांची कविता परिपक्व आहे. संवेदनशील, भावुक तरीही वैचारिक. जीवनाची विविध अंगे अनुभवून मनात दाटलेली ही कागदावरची स्पंदने वाचकाच्या मनावर राज्य करतात.

मनोगतात ऋचाताई म्हणतात, “ पुस्तक हेच माझे खरे मित्र या त्यांच्या एका वाक्यातच त्यांची वैचारिक बैठक किती सखोल आणि परिपूर्ण असेल याची खात्री होते. ”

या ७५ कवितांमधून त्यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. यात निसर्ग आहे, भक्तीभाव आहे, जीवनात घेतलेले निरनिराळे अनुभव आहेत, सुख आहे, आनंद आहे आणि वेदनाही आहेत तशीच नवी स्वप्नेही आहेत. जीवनाबद्दलचा आशावादही आहे. आठवणीत रमणं आहे आणि भविष्याची प्रतीक्षाही आहे.

काव्यसंग्रहाच्या शीर्षकाप्रमाणे खरोखरच ही मनातली स्पंदने आहेत. मनातले हुंकार आहेत पण या हुंकारात फूत्कार नाहीत. यात भावनेचा हळुवार, मनाला सहज जाणवणारा एक संवेदनशील स्पर्श आहे. या कविता जेव्हा मी वाचल्या तेव्हा मला प्रथम जाणवला तो कवयित्रीच्या विचारातला स्पष्टपणा आणि प्रामाणिकपणा. जे वाटलं, जे डोळ्यांना दिसलं, जे अंतरंगात लहरलं ते तसंच्या तसं शब्दात उतरवण्याचा सुंदर आणि यशस्वी झालेला प्रयत्न आहे.

यातल्या कविता मुक्त आहेत. शब्दांचा, अलंकाराचा, व्याकरणाचा उगीच फापटपसारा नाही. खूप सहजता आहे यात. काही कविता अष्टाक्षरी नियमातल्या आहेत, काही अभंग आहेत, वृत्तबद्ध गझलाही आहेत. सारेच सुंदर ओघवते आणि प्रवाही आहे.

त्यांची बाबा ही कविता वाचताना मला सहजच, “ कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलात “

 या काव्याची आठवण झाली.

 तुमच्या नंतर तव कष्टांची 

आता होते आहे जाणीव

 तुमच्या एका प्रेमळ हाकेची 

फक्त आहे उणीव…

संपूर्ण कविता खूप सुंदर आहे पण या शेवटच्या चार ओळीत पित्याविषयीची ओढ आर्ततेने जाणवते.

चांदणशेला हा शब्दच किती सुंदर आहे !

चांदणशेला पांघरतो

मंदिर कळसावरती 

गाभारी लख्ख प्रकाश 

चमचमती सांजवाती ।।

मंदिरात जात असतानाच त्या भोवतीच्या वातावरणात भक्तीमय झालेल्या मनाला गाभाऱ्यातला देव कसा तेजोमय भासतो याचं सुंदर वर्णन कवयित्रीने या कवितेत केले आहे. ही कविता वाचताना वाचकही सहजपणे त्या अज्ञात शक्ती पुढे माथा टेकवतो.

‘तू‘ ही अल्पाक्षरी कविताही हळुवार पण तितकीच मनाला भिडणारी आहे. एक अद्वैताची ही स्थिती आहे. अद्वैत परमेश्वराशी वा प्रियकराशी पण त्यातला एकतानतेचा भाव महत्त्वाचा…..

देह मी अन

प्राण तू

प्रेम मी अन

विश्वास तू 

तुझ्यातही तू अन 

माझ्यातही तू

या एका कवितेसाठी माझे ऋचा ताईंना सहस्त्र सलाम !

भांडण या कवितेत कविता आणि लेख यांचा एक गमतीदार वाद आहे आणि शेवटी या वादातून उतरलेला समंजसपणा टिपलेला आहे.

 कविता आणि लेख बोलले

 तू मी नसू मोठे आणि छोटे 

आपण ज्यात गुंफले जातो

 ते शब्दच असतती मोठे।। 

शब्दांची महती वर्णन करणारी ही कविता खूप करमणूकही करते आणि बरंच काही सांगून जाते.

‘माणूस ‘ या कवितेत ऋचाताईंनी जगताना त्यांना माणूस जसा दिसला, जसा जाणवला, समजला त्याविषयी सांगितले आहे.

 मदार नसते श्वासावरती

 माझेपण कुरवाळतो माणूस..

एका वास्तवाचा त्यांनी सहजपणे उच्चार केलेला आहे.

 मी या कवितेत त्या सांगतात 

बसेन तेथे समाधीस्थ व्हावे 

तरीही दूरवर भरकटते मी..

या कवितेत घेतलेला आत्मशोध नक्कीच वाचनीय आणि प्रशंसनीय आहे.

‘सारे कबुल आहे ‘ ही एक सुंदर गझल आहे,

 माझ्याच जीवनी काटे पसरले जे 

ते दररोजचे टोचणे मजला कबुल आहे…

…जीवनाविषयीची स्वीकृती या गझलेत प्रकर्षाने जाणवते. आणि आयुष्याचा एक खोल अर्थ लागतो.

‘दिंडी‘ हा विठ्ठल वारीचा काव्यसाज ही मनात टाळ मृदुंगासारखा दुमदुमतो.

 सगुण निर्गुणाचा नाद

 तुळशी माता डोईवरी

 अन वाट सोपी होते

 चालताना घाट वारी ।।

ही कविता वाचताना खरोखरच प्रत्यक्ष आपण वारीत असल्याचा अनुभव मिळतो.

स्पंदने मनाची ‘ ही शीर्षक कविता वाचताना त्यातला नितळपणा जाणवतो. मन या विषयावर कविता करण्याचा मोह कुठल्याही काव्यरचनाकाराला टाळता आलेला नाही. बहिणाबाईंची तर मन खसखशीचा दाणा अशा शब्दवेल्हाळ काव्याचा पगडा मराठी रसिकांच्या मनावर अढळ आहेच.

ऋचाताईंनी या मनाविषयी तितकेच सुंदर भाष्य केलेले आहे.

 मन व्यासंग व्यासंग 

जशी पुस्तकाची खूण

 मन निसंग निसंग 

वाजे अंतरीची धून…

या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे भाषेचं, विचारांचं, कल्पनांचं भावभावनांचं धन आहे.

स्पंदने मनातली वाचकांच्या मनःप्रवाहातही नैसर्गिकपणे झिरपत जातात. या कवितांचे वाचन हा एक सुखानंद आहे, एक सुरेख अनुभव आहे. माझ्या मते जे लेखन वाचकाचं लिहिणाऱ्याशी नातं जुळवतं ते सकस लेखन. ऋचाताईंच्या कवितेत हा सकसपणा निश्चितच जाणवतो.

या कवितासंग्रहाला प्राध्यापक डॉक्टर गोपाल बाहेती यांची सुरेख प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ” निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते, वेदनेचेही ज्याला गीत करता येते, त्यालाच जगण्याची रीत समजलेली असते. ” … हे अगदी सत्यात उतरल्याची साक्ष ऋचाताईंचा स्पंदने मनातली हा काव्यसंग्रह करून देतो.

अशी ही भावसमृद्ध शब्दांची लेणी ! प्रत्येकानी वाचावी, संग्रही ठेवावी आणि शब्दप्रवाहाच्या सुखद लाटांचा स्पर्श अनुभवावा असेच मी म्हणेन.

पुस्तकाचे मुखपृष्ठ ही अतिशय सुंदर आहे. *मुक्तरंग क्रिएशन*ने केलेले हे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. अरुणोदयाच्या वेळी त्या अस्फुट नारंगी प्रकाशात झोपाळ्यावर झोके घेत असलेली एक मुलगी, हाताच्या बोटावर बसलेल्या पक्ष्याशी जणू काही मनातल्या गुजगोष्टीच करत आहे. तिच्या मनातली स्पंदनं त्या विहगालाही जणू काही जाणवत आहेत…. फारच सुंदर असे हे मुखपृष्ठ !!

“ऋचाताई काव्य प्रवासातलं तुमचं हे पहिलं पाऊल अतिशय दमदारपणे पडलं आहे आणि या शब्दांच्या सागरात नाहताना ज्या ब्रह्मानंदाचा अनुभव यामुळे मिळाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद!! तसेच तुमच्या पुढील काव्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! “  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares