श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – २” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(”हम सभी सहीसलामत वापस आयेंगे… और यहीपर फिर एक फोटो लेंगे!” पण या वाक्यातील सत्यता सर्वजण जाणून होते… लढाई होती ती.. खेळ नव्हे! दुर्दैवाने यांमधील काही जण परतले नाहीत… त्यात शेरशहा होते !) – इथून पुढे —
या संपूर्ण मोहिमेत डॉक्टर आढाव सैन्यासोबत अगदी काही मीटर्स अंतरावर वर होते. पंधरा सोळा हजारांपेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर जखमी झालेल्या जवानांना तेथून खाली रुग्णालयात आणणे केवळ अशक्यच होते. हेलिकॉप्टरचा उपयोग नव्हता… एकच उपाय होता तो म्हणजे जखमीला पाठीवर किंवा स्ट्रेचरवर घालून खाली घेऊन येणे… आणि त्यावेळी गोळीबार तर सुरूच असणार होता. अशा भयावह परिस्थितीमध्ये डॉक्टर जर काही मीटर्सवर उपलब्ध असेल तर? आणि डॉक्टर राजेश आढाव साहेब नेमके तेथेच आणि लगेच उपलब्ध होते! महा भयावह थंडी, त्यात अंधार. उजेड दिसेल असे काही करण्याची अनुमती नव्हती. कारण रात्रीच्या अंधारात या दिसणा-या प्रकाशाच्या दिशेने गोळीबार होण्याची शक्यता अधिक होती. आणि तसे होतही होते. जीवघेण्या थंडीमुळे सलाईनच्या नळ्या, त्यातील द्रव गोठून जात होते. मग त्यासाठी एखाद्या खडकावर अंगातले कोट टाकून आडोसा करायचा… त्याखाली स्टोव पेटवून सलाईन गरम करून पातळ करायची… त्याच अंधारात सैनिकांच्या गोठून गेलेल्या शरीरांत रक्तवाहिन्या शोधायच्या आणि त्यांत सलाईन लावायचे… जखमा शिवायच्या…. सैनिकांना… ”मैं हूं ना!” म्हणत धीर द्यायचा… वरून गोळीबार सुरु आहे.. बॉम्ब फुटत आहेत…. आणि इथे डॉक्टर प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत… आणि त्यात यांना भरपूर यशही मिळते आहे…. एकदा तर असेच उपचार करीत असताना राजेश साहेबांच्या हाताला शत्रूने डागलेल्या बॉम्बगोळ्याने जखम झाली.. रक्त वाहू लागले… डॉक्टर साहेबांनी स्वत:च आपल्या हाताला बँडेज बांधले… आणि इतरांवर उपचार सुरूच ठेवले… एक अप्रतिम इतिहास घडत होता!
कॅप्टन विक्रम बात्रा हे तर जणू डॉक्टर राजेश यांचे जिवलग मित्रच बनले होते. काहीवेळा पूर्वीच एका जवानाने बात्रा साहेबांचा निरोप आणला होता… ते पुढे वरच्या बाजूला सुमारे पंचवीस मीटर्सवर दबा धरून बसलेले होते… काही वेळातच वर चढत जाऊन शत्रूवर हल्ला करायचा होता… बात्रा साहेबांचे डोके दुखू लागले होते.. तेथील हवामानात प्राणवायू कमी असल्याने असे होत असते. डॉक्टर साहेबांनी प्रत्येक सैनिकाकडे आणीबाणीच्या प्रसंगी वापरायची औषधे दिली होती… बात्रा साहेबांनी तेथूनच ओरडून विचारले… ”डॉक्टरसाहब.. कौन सी गोली चलेगी!” डॉक्टर साहेबांनी तेथूनच ओरडून सांगितले… ”विटामिन सी काम करेगी!” आणि बात्रा साहेबांना खरेच आराम पडला.
पहाटेचे चार वाजले असतील. कॅप्टन नवीन नागप्पा साहेब बात्रा साहेबांच्या समवेत लढत होते.. त्यांच्या दोन्ही पायांच्या बरोबर मध्ये एक बॉम्बगोळा पडून फुटला… त्यांचे दोन्ही पाय प्रचंड निकामी झाले…. त्यांना पाहून बात्रा साहेबांनी धाव घेतली त्या तसल्या गोळीबारात… जखमी झालेल्या नवीन नागप्पा साहेबांना त्यांनी उचलून खांद्यावर घेतले… म्हणाले… ”तुम शादीशुदा हो.. family वाले हो… तुम्हारा बचना जरुरी है! असे म्हणून त्यांनी नवीन यांना सुरक्षित जागी आणून ठेवले… आणि स्वत: लढायला पुढे गेले!
काही वेळाने एका जवानाने नवीन साहेबांना खांद्यावर लादून डॉक्टर साहेबांकडे आणले… नवीन साहेब मोठ-मोठ्याने हुंदके देत देत रडत होते… डॉक्टरसाहेबांना खूप आश्चर्य वाटले… जखमा तर मी व्यवस्थित बांधल्या आहेत… वेदनाशामक इंजेक्शनही दिले आहे.. मग तरीही हा अधिकारी एवढा तळमळतो का आहे? मग त्यांच्या लक्षात आलं… हे शरीराच्या वेदनांचे दु:ख नव्हते.. काळजाचे दु:ख होते…. ”डॉक्टर साहेब… आपला शेरशहा आपण गमावला…!” हे ऐकताच, नवीन त्यांना तुम्ही जाऊ नका… तेथे धोका आहे… गोळीबार सुरु आहे”. असे सांगत असतानाही डॉक्टरसाहेब त्या जागेपर्यंत पळत गेलेच…. त्यांनी बात्रा साहेबांना उचलण्यासाठी त्यांच्या पाठीखाली हात घातला… तिथे फक्त एक पोकळी होती.. रक्तमाखली! सिंह निघून गेला होता… पण त्याच्या चेह-यावर मोठे हास्य होते!
सैनिक म्हणाले… त्यांनी आमचा सिंह मारला… आता आम्हांलाही जगण्याचा अधिकार नाही… दुस-याच दिवशी बात्रा साहेबांच्या बलिदानाचा प्रतिशोध घेण्यासाठी आपल्या सैन्याने पुन्हा एकदा जोरदार प्रतिहल्ला चढवला.. तो ही दिवसा उजेडी… पाकड्यांना असा दिवसा हल्ला केला जाईल याची कल्पनाच नव्हती… ते मस्त स्वयंपाक करत होते, आराम फर्मावत होते… भारतीय सैनिक त्यांच्यावर चालून गेले…. तेथे होते तेवढ्या शत्रूला त्यांनी कंठस्नान घातले.. आणि ते शिखर ताब्यात घेतले…. कित्येक पाकिस्तानी मारले गेले… डॉक्टरसाहेब सैनिकांसोबत होतेच. त्यांच्य मनात तर डरपोक पाकिस्तानी सैन्याबद्दल प्रचंड राग होता… त्यांनी त्यांच्या हातात असलेली एके-४७ रायफल सज्ज करून तिच्यातून मृत पाक सैनिकांच्या देहांवर गोळ्या डागल्या… !
इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देशासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांचे डॉक्टरसाहेबांना अतिशय कौतुक वाटे. यातला कुणीही मरणाला घाबरत नव्हता. एरव्ही डॉक्टर साहेबांना प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालणारा जवान, बास्केट बॉलचा निष्णात कोच असे एरव्ही अन्य भूमिकांत असणारे अनेक जण आज अचानक लढवय्ये बनून शत्रूवर चाल करून निघाले होते.
रात्रीच्या अंधारात एका खडकावर आपला उजवा जखमी हात डाव्या हाताने धरून एक जवान बसला होता… डॉक्टर साहेब त्याच्यापर्यंत पोहोचले… त्याचा आपला एकच प्रश्न.. ”डॉक्टरसाब… मेरा हात फिरसे जुड जायेगा ना? नहीं तो मुझे वापस घर जानाही नहीं है!” डॉक्टर साहेबांनी पाहिले… केवळ कातडीच्या आधारे त्याचा तो हात लटकत होता… तरीही त्यांनी त्याला धीर दिला… ”क्यों नहीं… जरूर ठीक हो जायेगा.. और जुडेगा जरूर!
आणि त्यानंतर तो सैनिक काहीसा ग्लानीत गेला. डॉक्टरांनी मोठ्या कौशल्याने त्याच्या जखमा बांधल्या… रक्तस्राव बंद केला…. त्याला जरूर ती औषधे दिली… आज तो जवान एके ठिकाणी बास्केट बॉल प्रशिक्षक आहे. जेंव्हा केंव्हा त्याची भेट होते.. तेंव्हा तो म्हणतो… ”डॉक्टर साहब, आप सब से बुरे डॉक्टर हों! अगर उस दिन आप मुझसे झूठ नहीं बोलते तो मै उस दिन जिंदाही नहीं रहता!” अर्थात हे सर्व बोलणे त्याचा जीव वाचवल्याबद्दल केलेले कृतज्ञतेचे बोल होते.
एक असाच जखमी सैनिक आला.. पण स्वत:च्या पायाने चालत आला होता… म्हणाला… ”साब, सर में गोली लगी है!” डॉक्टर त्यावेळी आणखी दोन केसेस पहात होते…. ते म्हणाले… ”आप बैठो… आपका तीसरा नंबर… आपके नाम में राम है.. आपको कुछ नहीं होगा!” त्याला वाटलं ज्या अर्थी डॉक्टर मला तिस-या क्रमांकावर बसवताहेत.. याचा अर्थ माझ्या जखमा गंभीर नाहीत… मी उगाच घाबरून गेलो होतो ! खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता!
– क्रमशः भाग दुसरा
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈