श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ☆ श्री संभाजी बबन गायके 

(मारता, मारता.. मरे तो झुंजणारा कमांडो ! ) 

03-00-01-10… Three Overs-No Maiden-One Run-Ten Wickets.

ज्यांना क्रिकेटची भाषा समजते त्यांना वरील आकडेवारीचा अर्थ निश्चित समजेल. इतरांसाठी सांगतो… तीन षटके गोलंदाजी केली, त्यातील एकही षटक निर्धाव गेले नाही.. एक धाव दिली आणि दहा बळी घेतले! एकाच डावात सर्वच्या सर्व गडी बाद करायचे म्हणजे दहा बळी घ्यायचे, असे क्रिकेट इतिहासात आजवर केवळ तीन वेळा घडले आहे. १९९९ मध्ये अनिल कुंबळे याने पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती आणि त्याची ही कामगिरी अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

– – – पण लढाईच्या मैदानावर खरोखरच्या कसोटीत दहा बळी घेणा-या आणि त्या प्रयत्नात स्वत:ही बळी गेलेल्या एका श्रेष्ठ सैनिकाची कहाणी लोकांच्या लक्षात नाही, कारण ती कुणाला ठाऊक नाही… म्हणून हा एक अल्प प्रयत्न!

वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकीत, आरंभी साधा शिपाई म्हणून सैन्यात भरती झालेला तो नौजवान स्वयंस्फूर्तीने PARA SF म्हणजे PARACHUTE SPECIAL FORCE च्या नवव्या रेजिमेंट मध्ये २००२ मध्ये दाखल झाला आणि बघता बघता लान्स नायक पदावर पोहोचला.

स्पेशल फोर्स खरेच नावाप्रमाणे विशेष असते. यांतील निवड प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. आधी निष्णात Parachute Diver (हवाई छत्रीच्या साहाय्याने विमानातून उडी मारणारे) व्हावे लागते, नंतरच्या अधिक कठीण प्रशिक्षणात इतर भयावह कामांसह काही तासांत शंभर किलोमीटर्सचे अंतर पायी पार करायचे, त्यात खांद्यावर दहा किलो वजन आणि सात किलो वजनाचे शास्त्र वाहून न्यायचे, अशी अनेक आव्हाने असतात. थोडक्यात सांगायचे तर, ह्या गटात सामील होऊन ‘Balidaan Badge’ मिळवायला वाघाची छाती, सिंहाची हिंमत, हत्तीचे बळ, घोड्याचे चापल्य आणि पाषाणाचे काळीज लागते. हा मान मिळवण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी केवळ दहा ते पंधरा टक्केच सैनिक स्पेशल ठरतात! याचाच अर्थ उत्तमातून सर्वोत्तम सैनिक निवडले जातात. आणि यातील एक सैनिक गमावला जाणे, म्हणजे देशाची केवढी मोठी हानी होते, हे लक्षात घेतले जावे!

भारताच्या इतर सीमांच्या तुलनेत पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू काश्मीर येथील सीमेवर गेली कित्येक वर्षे काही न काही घडत असते. याच भागातून पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसतात आणि स्थानिक युवकांना हाताशी धरून, भडकावून भारत देशविरोधी कारवाया करतात. या अतिरेक्यांना रोखून धरण्याचे काम राष्ट्रीय रायफल्स सारखे सैन्य विभाग करीत असतात. PARA Special Force चे commandos सुद्धा इथे तैनात असतात. गरज पडली तर अतिरेकी सीमेत घुसण्याच्या बेतात असताना त्यांच्या सीमेत घुसून त्यांना संपवण्याचे धाडसी कामही आपले जवान पार पाडतात. हे कमांडो छोट्या छोट्या गटांनी आपली कामगिरी बजावत असतात. आजवर सुमारे आठ हजार अतिरेकी भारतीय सैन्याने यमसदनी धाडले असून सहा हजार जणांना जिवंत पकडले आहे. आणि या प्रयत्नात शेकडो भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे…. यावरून काय ते समजावे! आजही, या क्षणीही हे छुपे युद्ध सुरु आहे. आजही आपली पोरं मारत आहेत आणि मारत आहेत! याची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे.

आजचे आपले कथानायक मोहन नाथ गोस्वामी उत्तराखंड मधील नैनीताल मधील लालकुंआ जवळच्या इंदिरानगर गावात ५ मे, १९८४ रोजी जन्मले. त्यांचे वडील सैन्यातच कार्यरत होते. त्यांच्यापासून स्फूर्ती घेउन मोहन नाथ सैन्यात भरती झाले. अतिशय नीडर, शूर आणि पराक्रमी असलेल्या मोहन नाथ यांना काश्मीर मधील खरोखरची लढाई खुणावत होती. अतिरेक्यांना मारण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. २००५ मध्ये त्यांनी para sf स्पेशल फोर्सेस मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दिला आणि अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करून ते 9, Parachute Battalion Commando बनले. भीती नावाचा शब्द शब्दकोशात नसलेले मोहन नाथ अगदी आरंभापासून सर्व मोहिमांमध्ये आघाडीवर असत. दहा वर्षांत ते लान्स नायक पदावर पोहोचले. 13625566W हा त्यांचा सर्विस क्रमांक होता. खरं तर सेवाज्येष्ठ असल्याने आता त्यांना सतत प्रत्येक मोहिमेवर जाण्याची गरज नव्हती. इतर कनिष्ठ सहकाऱ्यांना ते पुढे पाठवू शकत होते. त्यांचे वरिष्ठही त्यांना तसे सुचवत… पण मोहन नाथ यांना कर्तृत्व गाजवून दाखवायचे होते.. देशासाठी शत्रूला नेस्तनाबूत करण्यात त्यांना जास्त रस होता.. ते कुटुंबियांना नेहमी सांगायचे… मरुंगा तो दस बारा दुष्मनोको मार कर!

“सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है?” ते सिनिअर अधिकारी साहेबांस मोहिमेवर पाठवा असा हट्ट धरीत… आणि म्हणत… मी करून दाखवेन, साहेब!

आणि तसा एक नव्हे तर लागोपाठ तीन प्रसंग घडले. कुपवाडा परिसरात ६, राष्ट्रीय रायफल्स तैनात होती. 9, Para SFसुद्धा इथे सक्रीय होती. अतिरेकी शोध आणि विनाश मोहीम हाती घेतली गेली २२ ऑगस्ट, २०१५ रोजी रात्री. पाकिस्तानातून काही अतिरेकी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. मोहन नाथ गोस्वामी आपल्या तुकडीतील इतर कमांडो साथीदारांसह अतिरेक्यांना भिडले. या धुमाश्चक्रीत आपला एक सैनिक जायबंदी झाला. भीषण गोळीबाराची तमा न बाळगता मोहन नाथ यांनी त्या साथीदाराला खांद्यावर घेतले आणि सुरक्षित जागी पोहोचवले आणि पुन्हा मोर्चा सांभाळत ३ अतिरेक्यांचा खात्मा केला. लगेचच २६ ऑगस्ट, २०१५च्या रात्री ते पुन्हा मोहिमेत सामील झाले आणि विजयी होऊन परतले. आणखी तीन बळी मिळवले होते! यावेळी मूळ पाकिस्तानी असलेला एक कुप्रसिद्ध अतिरेकी जिवंत पकडण्यात आपल्या सैन्याला यश मिळाले. या दोन मोहिमांमध्ये सहा अतिरेकी खलास केले गेले. २ सप्टेंबर, २०१५… तिसरी मोठी मोहीम निघाली… अर्थातच मोहन नाथ गोस्वामी सर्वांत पुढे होते…. कुपवारा जिल्ह्यातील हापरुदा येथील घनदाट जंगलात अतिरेक्यांचा एक मोठा गट घुसल्याची माहिती मिळाली…. या लबाड श्वापदांना सापळा रचून जेरबंद करण्याची योजना होती. रात्रीचे आठ सव्वा आठ झाले असतील… अचानक चार अतिरेकी टप्प्यात आले… दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. मोहन नाथ यांचे दोन सहकारी जबर जखमी झाले.. अतिरेक्यांनी त्यांना पुरते घेरले होते आणि त्या दोघांच्या जीवाला मोठा धोका होता.. मोहन नाथ आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकारी कमांडोसह आडोसा सोडून बाहेर आले… गोळीबार सुरूच होता… चार पैकी एकाला त्यांनी अचूक ठोकले… उरलेले तीन अतिरेकी गोळीबार करीत पुढे येत असतानाच… मोहन नाथ साहेबांनी त्यांच्यावर झेप घेतली… साहेबांच्या मांडीमध्ये गोळ्या घुसल्या… पण त्याची काळजी न करता ते पुढे सरकले… त्यांनी आणखी एक बळी घेतला… त्याच्या थेट काळजात गोळी घातली… दुसऱ्याला गंभीर जखमी करून त्याला मरणपंथावर ढकलला… आता मोहन नाथ यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या… त्यांनी चौथ्या अतिरेक्याच्या अंगावर वाघासारखी झेप टाकली… त्याच्या छाताडावर गन टेकवून ट्रिगर ओढला… आणि आणखी एक अतिरेकी नरकात धाडला. पण तो पर्यंत मोहन नाथ साहेबांच्या जखमांतून प्रचंड रक्तस्राव झाला होता. या मोहिमेत त्यांनी चार अतिरेकी ठार मारण्यात मोलाची कामगिरी बजावली होती आणि शिवाय आपल्या तीन साथीदारांचे प्राणही वाचवले होते.. स्वत:चे प्राण देऊन! सलग ११ दिवसांत हाती घेतलेल्या अतिरेकीविरोधी ३ मोहिमांत commando लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी १० अतिरेकी ठार मारण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता… आणि एकाला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती! “दहा शत्रू तर नक्कीच मारीन” हे त्यांचे शब्द त्यांनी खरे करूनच प्राण सोडले…. सर, मुझसे अच्छा कौन कर सकता है? या त्यांच्या प्रश्नाला एकच उत्तर होते.. लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी साहब… आप जैसा बहादूरही इस काम को अंजाम दे सकता है!

या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी, 9, PARA SF Commando यांना मरणोत्तर अशोकचक्र (शांतता काळातील सर्वोच्च सैन्य सन्मान) प्रदान करून गौरवले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments