श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ आडात नाहि पाणी आता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वनहरिणी)
☆
आडात नाहि पाणी आता, सांग कसा रे भरू पोहरा
हरदासाची सरली पोथी, काय नवे ते सांगू तुजला
*
नवजाताच्या नजरेमधले, कुठे कालचे कुतुहल आता
सरळसोट अन् रटाळ केवळ, उरली झापडबंदी आता
*
तीच पुरातन नगरे आणिक अवशेषांची तीच विराणी
त्याच वाहत्या जखमा आणिक अश्रूंचीही तीच कहाणी
*
शोकामधले सरले गुंजन, वाहुन वाहुन सुकले ओघळ
तेच कालचे घाव आजही, जातिवंत तो शिणला विव्हळ
*
अंतहीन त्या अंध रातिला, का दावावा सूर्य उद्याचा
का फासावा पराभवांना, रंग विलक्षण हौतात्म्याचा
*
सृजनाचा हा जन्मोत्सव की, जन्मा आले मरण नव्याने
असा कसा हा दीपराग की, ज्योती गिळल्या काळोखाने
*
किति टांगावी वेशीवरती, मी माझी ही अशी लक्तरे
कुठवर न्यावी भर बाजारी, घरंदाज ही माझी दुःखे
*
मगरमिठीतुन तुझिया कविते, विमुक्त मजला जरा होउ दे
तुझ्या पारही बरीच दुनिया, दुनियादारी मला शिकू दे !
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈