श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ चैतन्यदीप… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त :अनलज्वाला)
(मात्रा :८+८+८)
दिधले किती कुणाला,झोळीत काय आले
किर्दीत बंद आता, सारे हिशेब झाले !
सोवळा कोण कैसा ,रानात पारध्यांच्या
रक्तात माखलेले ,माझेच दोन भाले !…
वाजली गुहेत नित्य, माझीच शोकवीणा
आकांत त्या दिशांचे,श्रवणी कधी न आले !
मृग वर्षला झडीने ,आपापल्या परीने…….
भूमी न चिंब भिजली, लज्जेस दान आले !
दाटून खूप आले ,पण वर्षलेच नाही
आभाळ प्रार्थनेचे, वंध्याच रे निघाले !
गज तोडण्यात सारे, आयुष्य बाद झाले…….
तुटण्यास पिंजरा पण, झडण्यास पंख आले !
उदयास्त थांबलेले ,अंधार गोठलेला……
क्षण कोवळे नि हळवे, चैतन्यदीप झाले !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈