श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
शेवटी हात रिकामेच…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
जोडून कवडी कवडी,
व्यवसाय धंदा वाढवत नेला।
सारं काही सोडून येथे,
रिकाम्या हाती एकटाच तो गेला।
*
दिलखुलास स्वभाव त्याचा,
एक एक माणूस जोडत गेला।
साध्या मराठी माणसाचा,
दिलदार शेट नकळतच झाला।
*
अपार कष्ट उपसले त्याने,
नशीब देत गेलं त्याला साथ।
धावपळीत विसरला मात्र,
उत्तम आरोग्याची मुख्य बात।
*
अक्षम्य दुर्लक्ष केलं स्वतःकडे,
हात पाय पसरण्याचा लागला ध्यास।
काय लागत जगायला जगी,
सुखाची निद्रा आणि खळगीत घास।
*
उत्तम आरोग्य -कौटुंबिक स्वास्थ्य,
यावर असते जीवनाची खरी भिस्त।
बाकी कमावणं -गमावणं गौण सारं,
मोह टाळायाची असायला हवी शिस्त।
*
प्रत्येकाने काही क्षण थांबून जरा,
स्वतः आत्मचिंतन नक्कीच करावं।
कुठे होतो-कुठे आहे-कुठे जायचं,
आध्यात्मिक विचार करुन ठरवावं।
*
प्रत्येक जन्माला येणारा,
कधी ना कधी जाणारच असतो।
मृत्यू सर्वांग सोहळा,
काळ जगाला दाखवतच राहतो।
☆
वास्तवरंग
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈