श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ पितृदेवो नम: – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(त्यानी आमच्या वाडीत सर्व घरात पेढे वाटले पण आईला आणि मला वाटतं असे त्याने हे अप्पाना सांगायला हवे होते.. एकवेळ त्याने आम्हाला कळविले नसते तरी चालले असते.. ) इथून पुढे —

म्हणता म्हणता मी बारावी झाले आणि रत्नागिरीस डी एड ची ऍडमिशन घेतली. आप्पा मला रत्नागिरीस घेऊन गेले तेंव्हा माझ्या लक्षात आले, रत्नागिरीस सुद्धा अप्पांच्या किती ओळखी? अगदी st स्टॅन्ड वर सुद्धा लोक अप्पांशी बोलायला येत होती, आम्ही ज्या लॉजवर राहिलो एक रात्र, तेथे पण अप्पाना मोठं मान.. कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी पोहोचलो तेथील क्लार्क अप्पाना ओळखत होते, त्यानी भरभर आमची कामे केली. अप्पांच्या नाट्यप्रेमाने आणि भजनी गाण्याने अप्पानी माणसे जोडली होती.

अप्पांचे नाट्यप्रेम आणि भजनप्रेम जोरात होते, त्यानी पंचक्रोशीतील धडपडया तरुणांना एकत्र करून नाटकें सुरु ठेवली, आमच्या गावात नोकरीनिमित्त आलेल्या दोन बाई पण नाटकात भाग घेऊ लागल्या आणि आप्पा बाळ कोल्हटकरांची, मधुसूदन कालेलकरांची नाटकें बसवू लागले आणि सावंतवाडी, वेगुले, मालवण ते रत्नागिरी पर्यत नाटकें नेऊ लागले.

दादा नोकरीला लागला आणि मामानी त्याचे लग्न जमवले. त्याच्याच ऑफिस मधील मुलगी. दादाने पत्र लिहून आईला कळविले आणि आईला आणि मला लग्नाला बोलावले. अप्पाना दादाचे लग्न ठरत आहे, हे कळले तेंव्हा 

आप्पा – आनंदाची बातमी आहे, जोशी च्या घरात नवीन सून येते आहे, तुम्हाला दोघीना बोलवले आहे, मी st चे बुकिंग करून ठेवतो, तुम्ही दोघी जा लग्नाला, रविला आणि तूझ्या भावाला पण आनंद होईल.

आई – पण त्याने आपल्या पित्याला बोलावलेले नाही, हे मला आवडलेले नाही. मी लग्नाला जायची नाही.

आप्पा – असे करू नका, त्याला वाईट वाटेल, माझी काळजी करू नका. तुम्ही दोघी जाच.

आई – मी नाही जाणारं, येथूनच अक्षता टाकेन, नंदेला जाऊदे.

शेवटी आई लग्नाला गेली नाही आणि मी पण नाही.

माझ्या अप्पाना लग्नाला बोलावले नाही म्हणजे काय?

—रवी —

माझ्या लग्नाला आई, नंदा आली नाहीत, कदाचित अप्पाना लग्नाला बोलवले नाही, हे त्याना खटकले असेल. पण अप्पानाबद्दल माझ्या मनात अढी बसलीच आहे, ती कशी निघणार. शिवाय ती मंडळी आली तर मामाकडेच उतरणार आणि मामा आणि अप्पांचे बोलणे किती वर्षांपासून नाही. म्हणजे मामाची पण आप्पा लग्नाला येऊ नये अशी इच्छा असणार.

लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात मामांच्या आणि ऑफिस च्या कृपेनें मी जागा घेतली आणि आता तरी आईने माझे घर पहावे, असे मला वाटू लागले. मी तिला पत्र लिहिले पण तिचे उत्तर आले नाही.

माझ्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले असतील, एक दिवस नंदेचा ऑफिसमध्ये फोन आला आणि मी सटपटलोच “आईला अर्धांग वायूचा मोठा झटका आला असून अप्पानी तिला रत्नागिरीत परकार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे ‘.

मी घाबरलो, आई म्हणजे माझा कलीजा होता, मी त्याच दिवशी रात्रीची रत्नागिरी st पकडली आणि पहाटे रत्नागिरीत पोहोचलो.

आईची परिस्थिती गंभीर होती, सलाईन्स लावलेली होती. तिचा फक्त एक डोळा उघडा होता आणि एक हात हलत होता. ती कुणालाच ओळखत नव्हती. आप्पा आणि नंदा बाजूलाच होती.

मला पहाताच आप्पा रडू लागले, नंदा रडू लागली, माझ्याही डोळ्यातून अश्रू गलत होते.

संध्याकाळी मी डॉ ना भेटलो, त्त्यांचे म्हणणे आता पेशन्टला घरी घेऊन जा, हॉस्पिटलमधील उपचार केले आहेत, यापुढे उपचार नाहीत. घरी नेऊन मालिश करा, व्यायाम करून घ्या.

 त्याच दिवशी आम्ही आईला घरी आणले.

आईला घरी आणल्यापासून अप्पानी आईचा चार्ज घेतला. रोज तेलाने मालिश करण्यापासून हात वरखाली करणे, पाय वर करणे, गरम पाण्याने शेकणे सुरु केले. शिवाय आम्हा सर्वांचे जेवणं करणे सुद्धा.

अप्पानी आईला हॉस्पिटल मधून घरी आणले हे कळले मात्र, दुसऱ्या दिवशी पासून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक भेटायला येऊ लागले, कित्येक लोक मदत करण्यासाठी आले. काही बायकांनी रोज भांडी घासून दयायचा, जमिनीला शेण सरवून द्यायच्या.

कोणी आईसाठी तेल आणली, डुकराचे तेल आणले.

एव्हडी माणसे आमच्या घरी कशी काय येतात हा मला प्रश्न पडत होता. गावचे सरपंच, पोलीस पाटील अगदी जिल्ह्याचे आमदार पण येऊन चौकशी करून गेले, सारे जणं येऊन अप्पाना भेटत होते. काही लागलं तर कळवा, असे सांगत होते.

मी नंदेला विचारलं “नंदे, एव्हडी माणसे चौकशीला, मदतीला कशी काय येत आहेत?

नंदी म्हणाली “दादा, हे अप्पामुळे, आप्पा सर्व समाजात मिसळतात, कोण कुठल्या जातीचा हे पहात नाहीत. त्याना घेऊन भजन करतात, कोणालाही पेटी तबला विना मोबदला शिकवतात, गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन नाटकें बसवतात त्यामुळे ही लोक अप्पांच्या मदतीसाठी धावून आलीत ‘.

 मला शरम वाटली. मी असे काहीच केले नाही, अशी माणसे जोडली नाहीत.

रत्नागिरीच्या डॉ नी एक दिवसाड एक इंजेकशन घायला लिहून दिले होते. या खेडेगावात कोण इंजेकशन देणार असा मला प्रश्न पडला, अप्पानी दहा km वरील डॉ ना निरोप पाठविला मात्र, ते डॉ घरी येऊन इंजेकशन देऊ लागले, आईचे ब्लड प्रेशर पाहू लागले. अप्पानी एव्हडी माणसे जोडली होती, हे खरे.

आईच्या आजारपणामुळे आप्पा सर्वच आघाडी्यावर लढत होते. पहाटे उठून गोठ्यात जाणे, शेण काढणे, दूध काढणे मग आईची स्वछता.. कपडे बदलणे.. आंघोळ घालणे.. आमच्यासाठी चहा, नाश्ता करणे.

मग गावात भिक्षुकीला जाणे. नंदी मदतीला होती थोडीफ़ार पण तिला पण कॉलेजला जायची घाई होती. मग माझ्या आईची काळजी कोण घेणार?

माझी रजा पण संपत आलेली, नंदी रतनगिरीला जायची, मग घर आणि अंथरुणाला खिललेली आईकडे लक्ष द्यायला कोण? एकटे आप्पा, आणि त्यानी गोळा केलेली माणसं.

आणि मी अप्पाना दोष दयायचो?गेल्या कित्येक वर्षात त्याचेशी भाषण केलेले नाही, माझ्या लग्नात त्याना बोलावले नाही? त्याना सून दाखवली नाही अजून? नवीन घर घेतल मुंबईत, तर बघायला या म्हंटले नाही?

किती चुकीचा वागलो मी. आई आणि नंदू सारखी सांगायची, अप्पांशी निदान दोन शब्द बोल… ते पण केल नाही मी.

माझा जायचा दिवस आला, दुपारी जेऊन निघणार होतो मी.. अप्पानी वरण भात मेतकूट तयार ठेवले होते. अप्पानी आईला सूप भरविले आणि नंदीने ताटे घेतली.

मी कसाबसा दोन घास घशाखाली घातले. मी उठलो हे पाहून आप्पा आणि नंदी पण ताटावरून उठली. मी आईकडे जाऊन तिच्या डोकयावरून हात फिरवीला, माझ्या पाठीच आप्पा आणि नंदी उभी होती.

घशात कढ येत होते, डोळ्यात अश्रू जमा होत होते. काहीकळायचंय आत मी अप्पांच्या गळ्यात पडलो, “क्षमा करा आप्पा, तुमच्या कोकराला क्षमा करा, तुम्हांला ओळखल नाही मी आप्पा ‘.

आप्पा मला थोपटत होते.

“असुदे, असुदे बाळा, अरे बाप मुलावर कधी रागवेल काय? बाप मुलावर फक्त प्रेम करतो, तो रागवेल कसा?

“आप्पा, माझ्यासारखा मुलगा असता तर कुठलाई बाप रागावला असताच, पण आपा, तुम्ही खरच महान आहात.. तुम्ही गावातील लोकांना जमवून भजने करता, नाटकें करता, जातीपतीचा विचार करत नाही म्हणून मी दोष देत होतो, पण तुम्ही समाजात मिसळून किती माणसे जमवलीत हे आईच्या या आजारपणात समजले. आपण समाजात मिसळलो तर समाज तुमच्या मदतीला धावतो, हे मला समजलं क्षमा करा आप्पा, क्षमा करा ‘.

आप्पा रडत रडत मला थोपटत होते, शेजारी नंदी पण मला मिठी मारून रडत होती.

मी बाहेर पडताना आईकडे पाहिले, आई पण हसत होती असा मला भास होत होता.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments