सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

को जागर्ति ?” कोजागरी ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे कोण जागे आहे असे विचारते.

नुसते शरीराने जागे नव्हे, तर शरीराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे असा ह्याचा अर्थ.

 जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.

आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. त्या चांदण्यात आपल्या मित्र – आप्तेष्टांसह मौज मजा करता यावी त्यासाठी हा उत्सव प्रचारात आला असावा. या दिवशी रात्री आप्तेष्ट मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.

कोजागरी म्हटली की आमच्या लहान पणाचे दिवस आठवतात.. लहानपणी आम्ही सगळ्या मैत्रिणी रात्री जागरण करून कोजागरी साजरी करायचो. आधी सगळ्या मैत्रिणी एकत्र येवून कोजागरीचा कार्यक्रम कसा करायचा हे ठरवायचो. मग वर्गळी गोळा करणे व मग सामानाची खरेदी अशी एक दोन दिवस आधी पासून तयारी असायची. कोणाची आई नाहीतर आजी प्रेमाने एखादा पदार्थ करून द्यायची.

सगळ्यात आधी आम्ही सगळ्या मैत्रिणी आमच्या घरासमोरचे अंगण साफ करायचो. ह्याच अंगणात रात्री आम्ही सगळे खूप मैदानी खेळ खेळायचो. खेळून दमल्यावर बैठे खेळ खेळायचो. मधेच मध्यरात्री मसाला दूध प्यायचो. मग नाचं, गाणी, भेंड्या, पत्ते, कानगोष्टी असे कार्यक्रम असायचे.. ह्यात कुणाच्या आई, काकू व आजीचाही सहभाग असायचा. थोडे दमल्यावर कोणी चुटकुले सांगायचे तर कोणी आपल्याला आलेले वेगळे अनुभव सांगायचे.

पहाटे पहाटे सगळ्यांनी मिळून केलेली भेळ, पोहे, बटाटावडा नाहीतर विकत आणलेला सामोसा असा काहीसा बेत असायचा. नंतर सगळ्यांनी अंगणात गोल करून ते सगळे खाण्याचा कार्यक्रम व्हायचा. आनंदात भर म्हणून कधी कधी कोणाचे काका नाहीतर बाबा यांच्याकडून पेप्सीकोला नाहीतर आइस्क्रीम चा कप ही मिळायचा.

त्यानंतर सगळे आवरून पहाटे पहाटे भटकंती म्हणजे फिरायला जायचो. रस्त्यावर थोडी रहदारी वाढली की सगळे आपापल्या घरी छान आठवणी घेवून परतायचो.

लहानपणीच्या ह्या कोजागिरीच्या आठवणी अजूनही इतक्या ताज्या वाटतात की आत्ता एखादी मैत्रीण येईल व आपल्याला खेळायला येतेस का ग म्हणेल असा भास होतो.

आत्ताच्या आणि पूर्वीची कोजागरी साजरी करण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असायचा समाधान वाटायचे. सगळी मैत्रीची नाती निर्मळ व निरपेक्ष असायची अगदी घट्ट.

आजकालच्या आभासी आयुष्यात सगळ्याच गोष्टीमध्ये कृत्रिमपणा, दिखावा आला आहे …. मग तो नात्यांमध्ये असो किंवा मैत्रीमध्ये … अथवा साजरे करण्यामध्ये.

लहानपणीच्या कोजागरीच्या आठवणींची मनात एक विशेष जागा आहे.. नेहमीच लक्षात राहील अशी एक गोड आठवण.

… मैत्रिणी एकमेकांना जणू विचारात आहेत ‘ को जागर्ति ‘ कोण जागर्ती…

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments