श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ मी मुक्तामधले मुक्त… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मी मुक्तामधले मुक्त,
तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे,
ते सूर कसे संवादी?
माझ्यावर लिहिती गीते,
या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते,
गरूडाची गर्द भरारी।
जड लंगर तुझिया पायी,
तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य,
भूमीला प्रश्न विचार।
आभाळ म्हणाले ‘नाही’,
भूमिही म्हणाली ‘नाही’।
मग विनायकाने त्यांची,
आळवणी केली नाही।
पापण्यांत जळली लंका,
लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी,
उच्चाटन शब्दां आले।
की जन्म घ्यायच्या वेळी,
गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी,
हे अभंग नदिच्या‘बाही’।
दगडाची पार्थिव भिंत,
तो पुढे अकल्पित सरली।
‘मी कागद झाले आहे,
चल लिही’ असे ती वदली।
(वीर सावरकरांनी अंदमानात असताना, कागद-पेन यांना बंदी म्हणून गुपचूप बोरीचा काटा सोबत नेऊन, अंदमानाच्या भिंतीवर कोरून कविता लिहिल्या, काट्याची लेखणी झाली, भिंतीची वही झाली… ते रेखाटणारी एक कविता…!!)
कवी कोण आहे हे समजू शकले नाही.
प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कवी आहेत मनमोहन नातू