प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे
संक्षिप्त परिचय
शिक्षा – एम. ए(शिक्षण शास्त्र), एम. ए. (इतिहास), बी. एड.
प्रकाशन – विविध वर्तमानपत्र वा मासिके यात कविता. ले, सामाजिक विषयावरील पत्रे प्रसिद्ध, काव्यलेखन, काव्यवाचन, निबंध लेखन, यात 100 हुन अधिक बक्षिसे
विविध सामाजिक संस्थामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत.
जागतिक विज्ञान दिन निमित्त लेख
☆ विविधा ☆ विज्ञान शिक्षण: काळाची गरज ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆
महाराष्ट्रातील बीड जिल्हात शुभम सपकाळचा करणी केल्याच्या संशयावरून खून असो या आंध्रप्रदेश चितूर येथील उच्चविद्याविभूषित आई वडिलांकडून स्वतःच्या दोन मुलीना ठार मारल्याची घटना असो अशा रोज घडणाऱ्या विविध घटना जेव्हा आपण वाचतो या पाहतो तेव्हा मनाला अतिशय वेदना होतात.खरचं आपण 21व्या शतकात आहोत का हा प्रश्न पडतो. माणूस इतका निर्दयी कसा होतो? त्याला पुढील परिणामाची भीती कशी वाटतं नाही? तथ्यहीन गोष्टीवर कसा विश्वास ठेवतो? साधी पायाखाली आलेली मुंगी ही आपण मुद्दामहून मारत नाही. येथे तर जिताजागता जीव मारायला काहीच कसं वाटतं नाही?
अशावेळी आपली प्रगती, सारा झगमगाट, तंत्रज्ञान असून काय उपयोग असं वाटतं. आपण एक लहानगा जीव वाचवू शकत नाही तर काय उपयोग या सगळ्याचा.नरबळी, करनी, भोंदूगिरी, पुंर्जन्म, नवस, भूतबाधा, पैशाचा पाऊस, भानामती असे एक ना अनेक प्रकार आज ही राजरोसपणे सुरु आहेत. अशावेळी एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना विज्ञानजागृतीच फार मोठं कार्य करावे लागणार आहे. विज्ञान हे काळाची फार मोठी गरज बनले आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,
डॉ नरेंद्र दाभोळकर म्हणतात आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही.आपण विज्ञान तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सर्व सुखसोई घेतल्या त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पण आपली मानसिकता, विचार करण्याची पद्धत बदलली नाही. आधुनिक तंत्र अविष्कार म्हणून आपण घरी संगणक आणतो, विविध उपकरणे आणतो आणि कुणाची दृष्ट लागू नये म्हणून दाराला लिबू मिरची टांगतो म्हणजेच आपले हे वागणे दुट्टपीपणाचे आहे. भारतीय घटनेच्या भाग 4 अ मध्ये कलम 51 अ नुसार नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्य दिली आहेत त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणे हे एक महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला या बाबत आपण सजग केले पाहिजे. लहानपणापासून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा जोपासता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. विज्ञान तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हा फक्त पाठयपुस्तकाचा भाग न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या प्रगतीचा राजमार्ग हा विज्ञानच आहे कारण विज्ञान हे प्रगतीशील आहे नम्र आहे. त्याला व्यक्ती, स्थळ,काळ याचे बंधन नाही त्यामुळे आपणास प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास विज्ञानाचा मार्ग हा उपयुक्त व लाभदायक आहे.कोणत्याही अतार्किक, बुद्धीला न पटणाऱ्या सांगिवांगीच्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आपणास केला पाहिजे. ज्याचा पुरावा आहे ज्याचा अनुभव सर्वांना घेता येतो अशाचा बाबीवर आपल्या बुद्धीला पटत असेलतरच विश्वास ठेवला पाहिजे. विनाकारण बुवाबाबाच्या नादी लागून कर्मवादी बनन्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर मेहनतीवर ज्ञानवादी, विज्ञानवादी बनूया.
श्रद्धां आणि अंधश्रद्धा यात एक पूसटशी रेष असते त्यामुळे कधी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होईल हे कळत नाही त्यामुळे नेहमी सजग राहून सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. समाजात, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, मराठी विज्ञान परिषद मुंबई, विज्ञान आश्रम पाबळ, अगस्त्य फौंडेशन मुंबई , कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड या शासकीय वा बिगरशासकीय संस्था जोमाने कार्य करीत आहेत. चला तर आपण स्वतः पासून सुरुवात करून विज्ञानाला आपला मित्र, मार्गदर्शक, बनवूया.
© प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे
नवी मुंबई
7738436449
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
थँक्स माझा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ई अभिव्यक्ती व्यासपीठाचे आभार