सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

८ मार्च महिलादिन☆ सौ शालिनी जोशी

संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत महदंबा, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत वेणाबाई हे स्त्री संत सप्तक१३ व्या शतकापासून १७ शतकापर्यंतच्या चारशे वर्षाच्या काळात होऊन गेले. सर्वांची लौकिक जीवनातील पार्श्वभूमी खडतर होती. संत वेणाबाई व संत महादंबा या बाल विधवा होत्या. संत मुक्ताबाई व संत जनाबाई अविवाहित होत्या. संत बहिणाबाईंचा विषम विवाह होता. संत सोयराबाई शुद्र, अशिक्षित, तर संत कान्होपात्रा या गणिकेची मुलगी. पण या सर्वांचे नाम स्वातंत्र्य कोणालाही हिरावून घेता आले नाही. सर्वांनी पुरुष गुरु केले व परमार्थाची वाटचाल केली. परमार्थात जात, धर्म, स्त्री, पुरुष भेद नाही म्हणून मुक्ताबाईंना पुरुष शिष्यही करता आले (चांगदेव). संत कान्होपात्रेला कुणी गुरुपदेश केला नाही. असे प्रत्येकीचे जीवन वेगळे वेगळे.

या सर्वांच्या साहित्य निर्मितीला त्या काळातील समाजातील अनिष्ठ चाली कारणीभूत आहेत. संत मुक्ताबाई कुट रचनेकडे, संत जनाबाई विठ्ठलभक्ती कडे, संत महदंबा कृष्णभक्ती कडे, संत सोयराबाई विटाळाकडे, संत बहिणाबाई जीवनातील अनुभवाकडे व कान्होपात्रा तारणहार विठ्ठलाकडे, संत वेणाबाई रामलीलेकडे वळल्या. प्रत्येकीचे आयुष्य वेगळे पण भक्ती व विरक्ती एकच. ईश्वरी सामर्थ्याचा प्रत्यय हाच आधार. संसारिक घटकांना त्यांनी अध्यात्मिक अर्थ दिला. समाजाशी संघर्ष करत उच्च पातळीवरचे पारंपरिक जीवन जगल्या. देवाशी विठ्ठलाशी त्यांचा मनमोकळा संवाद. तोच सखा, सांगाती, माऊली. कुणीही पतीचे नाते विठ्ठलाची जोडले नाही हेच महाराष्ट्रातील या संत स्त्रियांचे वैशिष्ट्य. समाजाला सदाचाराचा सद्वविचाराचा मार्ग दाखवण्याचे त्यांचे कार्य मोलाचे आहे. पतनाकडे वाटचाल होत असलेल्या समाजाला नाम भक्तीचा सोपा मार्ग दाखविला. अभंग व ओव्या रूपाने आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यामुळे स्त्रियांच्या स्वतंत्र विचाराला चालना मिळाली. समाजात स्त्रियांना स्थान मिळाले. धीटपणा मिळाला.

आजच्या सर्व क्षेत्रात उच्च स्थान मिळवणाऱ्या स्त्रियांच्या मागे या सर्वांचे पाठबळ नक्कीच आहे. कोणीतरी बीज पेरावे तेव्हा काही काळाने त्याचा वृक्ष होतो. आणि तो बहरतो. हेच खरे! सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ आणि असेच कार्य करणाऱ्या स्त्रिया या अलीकडच्या काळातील संतच. पूर्वीच्या स्त्रियांची परंपरा त्यानी चालवली आणि पुढेही चालू आहे. फक्त प्रत्येकीचे क्षेत्र वेगळे. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला सलाम!

 (काही स्त्री संतांविषयी सविस्तर माहिती देणारे लेख लवकरच प्रकाशित करत आहोत… संपादक)

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments