श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातलेसुध्दा ‘त्या’चा अलौकिक स्पर्श अनुभवास आलेले अनेक प्रसंग आहेत. ताईच्या संदर्भातला हा प्रसंग त्यातलाच एक प्रातिनिधिक प्रसंग म्हणता येईल. यानंतरचा पुढे कांही वर्षांनी आलेला असाच उत्कट अनुभव देणारा प्रसंगही माझ्या मनावर कोरला गेलेला आहे!)

एका जीवघेण्या अशा सार्वत्रिक संकटाच्या पार्श्वभूमीवरचा तो प्रसंग! जितका भयावह तितकाच चित्तथरारक!

सांगली-कोल्हापूर सारख्या नदीकाठी वसलेल्या शहरांबरोबरच नदीपात्रा जवळच्या अनेक खेडेगावांना उध्वस्त करून गेलेल्या २००५ सालच्या महापुराचा भयावह अनुभव इतिहासजमा झालाय हे गृहीत धरलेल्या आम्हा सर्वांना पुढे अनेक वर्षांनी त्यापेक्षाही जास्त हादरवून सोडलं ते २०१९ सालच्या महापुराने!

६ ऑगस्ट२०१९ ची ती काळरात्र मी कधीच विसरणं शक्य नाही.

कोयना धरण होण्यापूर्वी नद्यांना येणारे पूर ही नदीकाठच्या गावांसाठी त्याकाळी नित्याचीच बाब असे. धरण झाल्यानंतर मात्र नदीचं पाणी वाढलं तरी पुराने घातलेला हैदोस आणि त्याची भयावहता तशी कालबाह्यच झाली होती. त्यानंतर जवळजवळ सहा दशकांचा मधला प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर २००५ साली अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आम्हा सांगलीकरांना हादरवून गेला होता खरा पण तो आमच्या दृष्टीने अपवादात्मकच ठरला. कारण त्यानंतर पुढची सलग १४ वर्षे तो कधीच इकडे फिरकला नव्हता. त्याने अचानक घाला घातला तो खूप नंतर थेट २०१९ च्या पावसाळ्यांत!

तरीही या वेळचा पाऊस २००५ सारखा अतिवृष्टी सदृश नसल्याने आणि तो आधीचा अनुभव गाठीशी असल्याने त्याचं फारसं दडपण लगेच जाणवलं नव्हतं हे खरं, पण पाणीपातळीत कणाकणाने होणारी वाढ हळूहळू वातावरण तापवू लागलीच. २००५ साली काळ ठरलेला जून महिनाही यावेळी उलटून गेला, पावसाचा जोरही अधून मधून कमी होऊ लागला त्यामुळे आता स्थलांतर करायची वेळ तरी येणार नाही असंच वाटत होतं.जुलै संपत आला तेव्हापासून मात्र एक दोनदा येणारी उघडीपही नाहीशी झाली. ४ ऑगस्टपासून धुवांधार पावसामुळे वातावरणाबरोबरच मनातली स्वस्थताही गढूळ होऊ लागली. तरीही ५ आॅगस्ट उजाडला तेव्हाही हरिपूर रस्त्याच्या अलिकडून सांगलीहून हरिपूरला वाहणारं नदीचं पात्र बऱ्यापैकी खोल असल्याने पाणी अद्याप पात्राबाहेर पडलेलं नव्हतं.ते बाहेर पडेल तेव्हा बराच चढ चढून हरिपूर रोडला पाण्याने स्पर्श करण्याइतकी पाण्याची पातळी वाढण्यासारखी परिस्थिती तोवर तरी निर्माण झालेली नव्हतीच.आता पाऊसही अधून मधून ओसरू लागला होता.पावसाची तीव्रताही कमी झालेली.पण धरण क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू झाला, धरणातून अतिरिक्त पाणी सोडले जायची शक्यता निर्माण झाली, प्रशासनाकडूनही धोक्याच्या सूचना दिल्या गेल्या आणि अचानक ५ ऑगस्टची ती मध्यरात्रच काळरात्र ठरली!!

हरीपूर रोडवरील विनायकनगर येथे आमचा बंगला रोडपासून थोडा आत ४ थ्या गल्लीत होता. त्यातील ग्राऊंड फ्लोअरवर किचन, देवघर आणि आमची बेडरूम. दोन्ही नाती आणि अनघा/सलिल यांच्या बेडरुम्स् पहिल्या मजल्यावर. सर्वांची रात्रीची जेवणं आवरली. निजानीज झाली आणि आम्ही गाढ झोपेत असतानाच सलिलच्या हाकांच्या आवाजाने आम्ही दचकून जागे झालो.

“बाबा, हरिपूर रोड क्राॅस करून नुकतंच पाणी पुढं आलंय. कॉलनीतले आम्ही बरेच जण जागे राहून थोड्या थोड्या वेळाने आळीपाळीने पुढंपर्यंत जाऊन बघून येत होतो.आपण आता शक्य तितक्या लवकर इथून निघायला हवंय. तुम्ही दोघेही फ्रेश व्हा. सोबत घ्यायचं सामान बघून बॅग भरुन तयार ठेवा. तोवर आम्हीही आमचं आवरतोय.” तो म्हणाला.

पहाटेचे तेव्हा तीन वाजून गेले होते.कां, कसं वगैरे विचारत बसायची ती वेळ नव्हती. वाईटातली चांगली अशी एकच गोष्ट म्हणजे बाहेर पडून जायचं कुठं? हा प्रश्न आमच्यापुरता आधीच सुटलेला होता. सलिलच्या मावशीचा सुसज्ज फ्लॅट पूरक्षेत्राबाहेर असलेल्या विश्रामबागच्या वाटेवरच्या गुलमोहर काॅलनीत होता.त्यांचं सध्याचं वास्तव्य पुण्यात मुलाकडे असल्याने फ्लॅट बंदच होता. त्याची एक किल्ली आमच्याकडेच होती. मावशीला इथल्या परिस्थितीची कल्पना होती आणि सलिलशीही तिचं फोनवर याबाबत बोलणं झालंच होतं.सलिल/अनघाने अचानक यावंच लागलं तर गैरसोय नको म्हणून दोन दिवस आधीच तिथे जाऊन तो फ्लॅट झाडून स्वच्छ करून ठेवला होता. आमच्या बॅगा भरून झाल्या तेव्हा पहाटेचे सहा वाजत आले होते. त्यापूर्वीच आम्हा सर्वांच्या टू व्हिलर्स त्या दोघांनी दोन हेलपाटे घालून त्या फ्लॅटच्या पार्किंगमधे नेऊन ठेवल्या होत्या. आणि आता आम्हा सर्वांना कारने तिथे सोडून ते दोघे बाकीची जमेल तेवढी आवराआवर करायला पुन्हा इथे परत येणार होते.

आम्हाला फ्लॅटवर पोचवून ते दोघे लगेच परत निघाले तोवर मधे फार तर पंधरा-वीस मिनिटेच गेली असतील. ज्या रस्त्याने आम्ही इकडे आलो होतो तोच रस्ता नेहमीच्या रस्त्यापेक्षा अधिक सुरक्षित असल्याने त्यांची कार त्याच रस्त्याने परत निघाली होती. त्या पंधरा मिनिटांच्या अवधित मघाशी कसंबसं पाऊल बुडेल एवढंच पाणी असणाऱ्या त्या रस्त्यावर आता कारची निम्मी चाकं बुडली जातील एवढं पाणी वाढलं होतं. घरापर्यंत गेल्यावर पाहिलं तर हरिपूर रोड ओलांडून विनायकनगरमधे घुसलेल्या पाण्याने हळूहळू पुढे यायला सुरुवात केली होती.

‘आता बाकी कांही आवराआवर करत न बसता आतील जिन्याखालच्या मोकळ्या जागेत मागे सरकून ठेवलेले नुकत्याच घेतलेल्या जास्तीच्या गव्हाचे डबे तेवढे वर नेऊन ठेवू आणि लगेच परत निघू ‘ असं दोघांनी ठरवलं आणि कुलूप उघडून घाईघाईने आत धाव घेतली.दोन डबे वर नेऊन ठेवल्यानंतर बाकीचे डबे आणायला खाली उतरत असताना सलिलला खिडकीतून पुराचं पाणी आमच्या शेजारच्या रिकाम्या प्लाॅटवर घुसल्याचं लक्षात आलं. अशा परिस्थितीत आता जास्त वेळ तिथं थांबणं धोक्याचं ठरणार होतं. बाकीचे तीन डबे थेट वर नेऊन ठेवण्याऐवजी त्यांनी घाईघाईने जिन्यातल्या वळणानंतर असलेल्या पॅसेजमधेच ठेवून ते दोघे बाहेर पडले. तोपर्यंत रस्त्यावरचं पाणी वीतभर वाढलेलं होतं जे थोडा उशीर झाला असता तर कारच्या बंद खिडक्यांना सहजपणे टेकू शकलं असतं.

त्या दोघांचा हा अनुभव पुढे होऊ शकणाऱ्या वाताहातीची कल्पना यायला आम्हाला पुरेसा होता. आता होईल ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यानंतरचे पहिले चारही दिवस सकाळी लवकरच ब्रेकफास्ट करून बाहेर पडलेले सलिल/अनघा रात्री खूप उशिरा परत येत असत. संपूर्ण दिवस आम्ही दोघे आणि आमच्या नाती घरी असू. पुरामुळे सलिलचं ऑफिस आणि अनघाचे क्लासेस् परिस्थिती निवळेपर्यंत बंदच रहाणार असल्याने घरी न थांबता त्या दोघांनी सांगलीत युद्धपातळीवर सुरु असलेल्या, पूरात अडकून पडलेल्या निराधारांचं रेस्क्यू ऑपरेशन आणि गरजू पूरग्रस्तांच्या रहाण्या-जेवणाची व्यवस्था अशा सामाजिक उपक्रमांशी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वत:ला जोडून घेतलं होतं!

त्या दरम्यानचे त्यांचे ऐकतानाही अंगावर कांटा यावा असे भयानक अनुभव हा एका प्रदीर्घ अशा स्वतंत्र लेखाचाच विषय होईल. तरीही अशी अवेळ येते तेव्हा जात, पंथ, धर्म, राजकीय पक्षांशी असणारी बांधिलकी असे सगळे भेद विसरुन माणुसकीच्या धाग्याने सगळेजण कसे एकजूट होऊ शकतात याचंही तेच अनुभव म्हणजे एक अनोखं उदाहरण होतं! यासाठी सरकार, स्थानिक प्रशासन यांचं सहाय्य होतंच शिवाय रा.स्व.संघाने स्वत:च्या हिंमतीवर सुरू केलेल्या या अभियानाला असा सर्व स्तरातून मिळालेला सक्रीय पाठिंबा मला नक्कीच कौतुकास्पद वाटला होता! पाऊस कमी होत गेला तसं सर्वदूर पसरलेलं पुराचं पाणी हळूहळू माघार घेत पूर्णत: ओसरायला आम्ही घर सोडल्यानंतरचा पाचवा दिवस उजाडला. तरीही लगेच सर्वांनी परत न जाता “तिथं काय परिस्थिती आहे ते आम्ही दोघे आधी बघून येतो आणि मग आपण ठरवू.” असं सलिल म्हणाला. दोघेही तिथली परिस्थिती पाहून परत आले तेव्हा ते सगळं घरी कसं सांगावं याच विवंचनेत होते!

स्टॅंडवरून पुढे हरिपूर रोडला लागल्यानंतर घरापर्यंत जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर पाण्याबरोबर वहात आलेले कपडे, अन्न, फळं, सगळ्यांचे ढीगच्या ढीग कुजून त्यांच्या असह्य दुर्गंधीने त्या परिसरालाच उकिरड्याचं किळसवाणं विद्रूप प्राप्त झालं होतं! पूर्ण नियोजनपूर्वक परिसर सफाईचं काम सुरू करायला प्रशासनाला अजून एखादा दिवस लागणार होताच. तशाच घाणीतून पुढे जात घराची अवस्था पहावी म्हणून ते दोघे घरापर्यंत जाऊन पोहोचले तेव्हा घराभोवतालची परिस्थितीही यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. बरेच प्रयत्न करुनही घराचं कुलूप निघेना तेव्हा कुलूप फोडून दार ढकलायचा प्रयत्न केला तेव्हा ते कणभरही हलायला तयारच नव्हतं. प्रचंड शक्ती लावून दोघांनी दार ढकललं तेव्हा कुठे दाराला थोडी फट पडली. त्यातून आलेला दुर्गंधीचा भपकारा आणि दाराला चिकटून आत संपूर्ण हाॅलभर पाय घट्ट रोवून उभ्या राहिलेल्या, पाण्याने स्वत:बरोबर वहात आणलेल्या चिखलाच्या कमरेपेक्षाही उंच अशा अभेद्य भिंतीचं ओझरतं दर्शन त्यांना झालं तेव्हा त्यांना धक्काच बसला.त्या चिखलामुळेच दार पूर्ण उघडलं जात नाहीय हे लक्षात आलं. मग नाईलाजाने दार तसंच ओढून घेऊन ते परत आले होते.अशा परिस्थितीत त्या घरी सर्वांनी लगेच परत जाणे शक्यच नव्हते. नंतर त्यांनीच पुढाकार घेऊन घरसफाईचं तत्परतेने योग्य नियोजन केलं. पुढे सलग दोन दिवस आणि दोन रात्री अथक कष्ट करून निदान त्या घरातला वावर थोडा तरी सुसह्य होईल इतपत स्वच्छता झालीय याची खात्री होईपर्यंत आमचा पुनर्गृहप्रवेश तेवढे दिवस पुढे ढकलायचा असं ठरवून ते दोघे कामाला लागले.पहिल्या दिवशी होईल तेवढी कामे मार्गी लागल्यानंतर रात्री खूप उशीरा ते दोघे परत आले तेव्हा प्रचंड थकलेले तर होतेच पण त्याहीपेक्षा आतून खूप अस्वस्थ असल्यासारखे बराच वेळ गप्प गप्पच होते. पुढे नाईलाजाने सांगणंच आवश्यक होतं ते मोजक्या शब्दात त्यांनी सांगितलं खरं पण त्या अल्पाक्षरातूनही स्पष्टपणे जाणवलेलं आमच्या संपूर्ण घराचंच नव्हे तर आजूबाजूच्या घरांचं चित्रही किती विदारक असेल या कल्पनेनेच आम्ही क्षणभर कां होईना मनोमन धास्तावलोच होतो!

सलिल आणि अनघा आमची प्रतिक्रिया अजमावत वाट पहात असल्यासारखे बसून होते. आम्ही नुसतं ऐकूनच इतके अस्वस्थ झालोय. या दोघांना ते सगळे प्रत्यक्ष पहात दिवसभर तिथे वावरताना किती त्रास झाला असेल हा विचार मनात आला आणि मी भानावर आलो. स्वतःला सावरलं. खरंतर या दोघांना याक्षणी आपल्या आधाराची गरज आहे हे लक्षात येताच मी शांतपणे त्यांना सांगितलं.. ‘ आपण सगळे हातीपायी धड आहोत आणि या संकटाला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षमही आहोत. ही परमेश्वराची कृपाच म्हणायची. त्यामुळे नशिबाला दोष देत बसायचं नाही. हे बघा, जे नुकसान झालंय ते भरून काढण्याची शक्ती आधी ‘त्या’नेच आपल्याला दिलीय आणि मग हे संकट आणलंय. मग घाबरायचं कशाला? आता यातून बाहेर कसं पडायचं याचा आपण विचार करुया.” सलिलने चमकून माझ्याकडं पाहिलं.

“हो बाबा. हे आम्हीही मनापासून स्वीकारलंय.पण ते तेवढंच असतं तर कांहीच प्रश्न नव्हता बाबा. पण…”

“पण काय..?”

“बाबा..तुम्ही सहन करूच शकणार नाही अशी एक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला आत्ताच सांगणं आवश्यक आहे. पण तुम्ही त्रास करून घेणार नसलात तरंच सांगेन…” तो कसंबसं म्हणाला. पण घडलंय त्यापेक्षा अधिक धक्कादायक काय असणार? असंच मला वाटतं राहिलं.

“नाही त्रास करून घेणार. बोल तू. काय झालंय?” मी आत्मविश्वासाने म्हणालो.

त्याने पुढे जे सांगितलं ते ऐकून मी सून्नच झालो!अक्षरश: गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो जे म्हणाला होता ते खरंच होतं.पैशाने ज्याची भरपाईच होऊ शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो…!!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments