मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र क्र. ७९, ८०, ८१. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७९, ८०, ८१. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे ७९ – – 

सर्वदा सर्वभावेन निश्चिन्तैः भगवानेव भजनीयः ||७९||”

अर्थ : सर्वकाळी सर्व शक्तिनिशी प्रेमभावाने कोणतीही चिंता न करता एक भगवंत भक्ति करण्यास योग्य आहे असे समजून त्याची भक्ती करावी.

विवेचन : एखाद्याने साधकाने साधना करायला सुरवात केली. सकाळी अमुक अमुक वेळ अमुक उपासना आणि संध्याकाळी अमुक वेळ अमुक उपासना. बाकीचा वेळ माझा भगवंताशी संबंध नाही, असे म्हणून किंवा अशी कृती करून चालणार नाही. त्याचे अनुसंधान सतत टिकले पाहिजे, त्यासाठी त्याने सतत विविध मार्ग शोधून भगवतांच्या चिंतनात राहिले पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग सर्व संतांनी सांगितले आहेत. त्यातील एक मार्ग आपल्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करणे.

भक्ती ही केवळ काही वेळापुरती, उत्सवापुरती किंवा गरजेपुरती नसावी. ती सतत असावी. जेव्हा मन, वाणी आणि कृती या तिन्हींतून भगवंताचे स्मरण होते, तेव्हाच खरी भक्ती घडते.

भगवंताची भक्ती ही केवळ आनंद किंवा दुःखाच्या प्रसंगीच न करता, सर्व भावनांनी (जसे की प्रेम, भक्ती, करुणा, नम्रता, लोभ नसलेली तृष्णा, वियोग इ.) करावी. भक्त भगवंताशी प्रत्येक मनोभावाने जोडलेला असतो. समर्थ म्हणतात,

“नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥ हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥ कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।

आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥ संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥”

(संदर्भ : दासबोध दशक ४ समास ३)

ज्याप्रमाणात भक्ति वाढत जाते त्याप्रमाणात साधक निश्चिंत होऊ लागतो. कारण त्याच्या पाठीशी उपासनेची शक्ति उभी असते. एकदा देवाला, सद्गुरूंना साधक शरण गेला की त्याची सर्वोतोपरी काळजी सद्गुरू घेत असतात. असा सर्व संतांचा अनुभव आहे.

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

“जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥ चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु. ॥ बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥२॥ अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥ तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥४॥”

सर्व संतांमध्ये एक साम्य नक्की अनुभवायला मिळते, ते म्हणजे त्यांच्या अंतरी असलेले समाधान. त्यासाठी साधकाने आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून, आपली साधना अखंड करावी. सद्गुरू त्याला कायम सांभाळतात.

 – – – – – 

भक्ति सूत्रे ८० – – 

स कीर्त्यमानः शीघ्रमेवाविर्भवत्यनुभावयति भक्तान् ||८०||”

अर्थ : भगवंताचे कीर्तन किंवा नामस्मरण केले जाते, तेव्हा तो भगवंत फार लवकर प्रकट होतो आणि आपल्या भक्तांना आपले अस्तित्व जाणवून देतो.

विवेचन: समारोपाला चाललेल्या या लेखमालेच्या या सूत्रांत आपण भक्तीची फलश्रुती पहात आहोत.

या सूत्रात नारद मुनी आपल्याला भक्तीची एक अमूल्य अनुभूती सांगत आहेत. भक्त जेव्हा भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरण, कीर्तन करतात, त्याचे नानाविध प्रकारे गुणगान करतात, तेव्हा भगवंत दूर नसतो. तो तत्क्षणी, शीघ्रतेने, त्या भक्तांच्या रक्षणासाठी, त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट होत असतो.

सर्व संतांची चरित्रे अभ्यासली तर आपल्या ही सहज लक्षात येईल. कोणत्याही भक्ताचे चरित्र अभ्यासा. त्या त्या भक्तासाठी भगवंत धावत आलेले आहेत. मग तो गजेंद्र असो की द्रौपदी असो, भक्त प्रल्हाद असो की ध्रुव बाळ असो. भगवंत भक्ताच्या आवश्यकतेनुसार तो सखुबाईचे दळण दळतो, कबिराचे शेले विणतो, कुंभाराच्या घरी मडकी भाजतो, पाणक्या बनतो… ! किती सांगावे…

माझ्या सारख्या सामान्य मनुष्यानं भगवंताचे यथार्थ वर्णन करणे निव्वळ अशक्य!!

भक्ताने भगवंताला बोलविले की तो येतो. हे सूत्र भगवंताच्या प्रेमळ आणि कृपामय स्वभावाचे वर्णन करते. तो आपल्या भक्तांना दूर ठेवत नाही, तर त्यांच्या प्रेमाच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देतो. या सूत्रातून हे शिकायला मिळते की, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जटिल साधने आवश्यक नाहीत. प्रेमाने, भक्तिभावाने, नामस्मरणाने त्याचं आवाहन केलं की तो तत्काळ हजेरी लावतो. त्यामुळे भक्ती ही सहज, सुलभ, आणि सर्वोच्च साधना आहे. “कीर्तनातून भगवंताचा अनुभव मिळतो – हा भक्तीचा परमोच्च प्रभाव आहे. “

 – – – – 

भक्ति सूत्रे ८१ – – – 

त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी||८१||”

अर्थ : सत्य वचन, सत्य आचरण आणि सत्य संकल्प ही तीन सत्य वचने आहेत, पण त्यापेक्षा परम सत्याची भक्ति श्रेष्ठ आहे. केवळ भक्ति श्रेष्ठ आहे.

विवेचन :कोणताही काळ ज्याप्रमाणे नीतिमत्ता श्रेष्ठ मानली जाते, त्याप्रमाणे सत्य श्रेष्ठ मानले जाते. प्रामुख्याने सत्याचे तीन प्रकार सांगता येतील.

  1. सत्य वचन (वाणीने सत्य बोलणे)
  2. सत्य आचरण (कर्माने सत्य आचरण करणे)
  3. सत्य संकल्प (मनाने सत्य व संकल्पशुद्ध असणे)

नारदमुनी या सूत्रात स्पष्ट सांगतात की, जरी एखादी व्यक्ती त्रिसत्य अर्थात वाणी, आचरण आणि संकल्प पूर्णपणे सत्यनिष्ठतेनी करणारी असली, तरीसुद्धा भक्तीच त्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

एखादा मनुष्य खरे बोलणारा आहे पण त्याचे आचरण शुद्ध नाही. एखाद्याचे आचरण अतिशय शुद्ध आहे, पण त्याचा संकल्प शुद्ध नाही असे अनेक दोष मनुष्यामध्ये असू शकतात. काही लोकं प्रकांड पंडित असतात, पण त्यांचा अभिमान पण तितकाच मोठा असतो, अशा लोकांना देवाची भेट दुष्करचं असते, उलट एखादा मनुष्य पंडित नसेल, त्याला लिहिता वाचताही येत नसेल, पण त्याचा भाव शुद्ध असेल, त्याच्या मनात भक्तीचा अंकुर उगवला असेल, तर अशा मनुष्यावर देव प्रसन्न होण्याची शक्यता जास्त असते.

“मनी नाही भाव आणि देवा मला पाव”

अशाने देव पावत नसतो. तर ज्याचा भाव शुद्ध झाला, त्याला देव खात्रीने दर्शन देत असतो, असा अनुभव सर्व संतांनी घेतलेला दिसून येतो. अनेक संत लौकिक अर्थाने निरक्षर होते, पण आज त्यांच्या अभंगावर लोकं विद्या वाचस्पती ची पदवी घेत आहेत, त्यांच्यावर शोध प्रबंध प्रकाशित करीत आहेत, त्यांचे अभंग पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जात आहेत.

आपल्याकडे नुसते सत्याचे महत्त्व नाही, तर सत्याचरण करणाऱ्याने त्याला भक्तीची जोड दिली, तीच साधना पूर्ण करणारी ठरते. केवळ नैतिकता, सत्यतेचे पालन हे अध्यात्मासाठी पुरेसे नाही, तर त्याला भावपूर्ण भक्तीची जोड आवश्यक आहे.

मनुष्य भक्ति करू लागला की त्याचे भाडोत्री असलेले अवगुण त्याला सोडून जाऊ लागतात. ही भक्तीची किमया आहे. जिथे भक्ती आहे, तिथे सर्व सद्गुण आपोआप येतात. म्हणूनच नारदांनी दोनदा “भक्तिरेव गरीयसी” असे म्हणत भक्तीच्या श्रेष्ठतेवर जोर दिला आहे.

सत्य, नैतिकता, शुद्ध आचरण हेसुद्धा तेव्हाच सर्वोच्च ठरतात, जेव्हा त्यामध्ये भगवंतावरची भक्ती मिसळलेली असते. म्हणून भक्ती ही साध्यही आहे आणि साधनही. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो. श्रीमहाराज एकदा नैमिष्यारण्यात जायला निघाले. त्यावेळी थोरल्या रामाच्या मंदिरातील रामाच्या मूर्तीतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज स्वतः आले आणि त्यांनी रामाचे डोळे पुसले, तेव्हा अश्रुपात थांबला. ही भक्तीची शक्ति आहे. अशी भक्ति असेल तर भगवंत खांबातूनही प्रगटतो. ही भक्तीच्या महानतेची काही उदाहरणे.

इथे श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील एक उतारा देत आहे – – 

– – “खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान् लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. “

(संदर्भ : श्री गोंदवलेकर महाराज प्रवचने दिनांक २७ जून)

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७९, ८०, ८१.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आधुनिक संताजीराव… धनाजीराव…” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“आधुनिक संताजीराव… धनाजीराव… – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब

 २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं ! 

युद्ध कथा रम्य असतात, हे खरेच आहे. पूर्वीची युद्धं आणि आधुनिक जगातील युद्धं यांत जमीन-आस्मानाचा फरक आहे, हेही तेवढंच खरे आहे. राजे-रजवाड्यांच्या काळात सैन्य एकमेकांवर चालून जाई, मोकळ्या मैदानात जणू एखादा खेळ खेळावा, तशी युद्धं लढली जात. पुढे दोन देशांमधील युद्ध म्हणजे एका देशाने दुस-या देशाची सीमा ओलांडून तो देश काबीज करणे. विमानांच्या वापराने ही आक्रमणे अधिक खोलवर आणि धारदार होत गेली. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली युद्धंही याला अपवाद ठरली नाहीत. परंतू १९८० च्या दशकापासून भारताचे अभिन्न अंग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात भारतीय सैन्याला पाकिस्तानी, अफगाणिस्तानी घुसखोर भाडोत्री सैनिक आणि स्थानिक अतिरेकी यांचा सामना खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला… आणि आजही हीच परिस्थिती आहे. अर्थातच हे पारंपारिक युद्ध नाही. त्यामुळे आपले सैनिक या भागांत नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जात आहेत, हे जनतेला माहीत असणे गरजेचे होते. पण जनतेला ही माहिती होण्याचे मोजकेच स्रोत होते. एक चित्रपट आणि दुसरा स्रोत म्हणजे पुस्तके… जी बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत लिहिलेली असतात. या स्रोतांच्या मर्यादांमुळे नेमके चित्र उभे राहत होतेच असे नाही.

पण विडीओ मुलाखती, खाजगी वाहिन्या यांमुळे प्रत्यक्ष संबंधित व्यक्तींच्या तोंडून युद्धाची वर्णने ऐकून परिस्थिती ब-यापैकी स्पष्टपणे समजून घेता येते आहे.

युद्धकथा समाजाला आवडतात. त्यामुळे हल्ली त्या मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जात आहेत. यांतून तरुणांना प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण याचे व्यापारीकरणही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. पण त्याला इलाज नाही. मुलाखती घेणारे या क्षेत्राशी संबंधित असण्याचे प्रमाणही पूर्वी कमी होते. त्यामुळे अनेकवेळा हास्यापद प्रश्न विचारले जात. पण प्रत्यक्ष युद्धात, मोहिमांमध्ये सहभागी होऊन शौर्य गाजवलेले काही लोक या क्षेत्रात आलेले आहेत, हे खूप छान होते आहे. यांत भारतीय सैन्यातील काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत. यांत सर्वांत प्रभावी काम दिसते आहे ते The Monks And The Warriors हे podcast चालवणा-या दोघां तरुण, शूर आणि अनुभवी निवृत्त लष्करी अधिका-यांचे! 

यातील एक आहेत कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि दुसरे आहेत लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते. कर्नल कौशल कश्यप साहेबांनी मणिपूरमध्ये अनेक अतिरेकी ठार मारले… त्यासाठी त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. तर लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग यांनी सहा सहा दिवस जंगलातून पायी प्रवास करीत अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. हे दोघेही MARATHA LIGHT INFANTRY मधून निर्माण केल्या गेलेल्या 21, PARA SPECIAL FORCES या सैन्यविभागाचे मोठे शूर अधिकारी. यांनी निवृत्तीनंतर सेनेतील अधिकारी, सैनिक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्या PODCASTच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे.

 नुकतीच या जोडगोळीने ब्रिगेडीअर सुनील भानोत (सेवानिवृत्त) साहेबांची अतिशय रोमांचक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या आरंभी त्यांनी एक विशेष कृती करून त्यांच्यातल्या जिवंत सैनिकांची जणू ओळखच करून दिली.

 २१, स्पेशल फोर्सेस वाघनख दलाचे आराध्य दैवत म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्यविधाते छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब. शिवरायांनी अफझल खानास मातीत घालण्यासाठी वापरलेलं वाघनख हे हत्यार या दलाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले आहे. हे चिन्ह स्वीकारले जावे यासाठी कर्नल व्ही. बी. शिंदे (निवृत्त) साहेबांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शिवरायांचा अश्वारूढ पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आसाममध्ये स्थापित झाला आहे. हा पूर्णाकृती पुतळा पुण्यातील श्री. विराज खटावकर (शिल्पकार) यांनी बनवून दिला आहे. आणि पुण्यातून आसामपर्यंत या पुतळ्याचा गौरवशाली प्रवासही प्रसिद्ध झाला आहे.

 कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांनी MARATHA LIGHT INFANTRY तून २१ स्पेशल फोर्सेसची निर्मिती करताना देशासाठी मोठे योगदान दिले. या स्पेशल सैनिकांनी मणिपूर आणि संबंधित राज्यांत खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. पण देशाला याबाबत फारशी माहिती आहे, असे दिसत नाही. कारण जम्मू-कश्मीर, चीन सीमा यांबाबत जास्त लिहिले, बोलले जाते. असो.

 कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते यांनी त्यांच्या स्टुडीओमध्ये ठेवण्यासाठी शिवरायांची एक प्रतिमा खास बनवून घेतली आहे. या PODCAST ची सुरुवात करताना भानोत साहेबांसारख्या वीर अधिका-याच्या हस्ते महाराजांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे साधेसे, औपचारिक अनावारण करून घेतले व महाराजांना पुष्पे अर्पण केली. त्यांची ही कृती आपल्यासाठीही खूप अभिमानास्पद ठरावी. याप्रसंगी त्यांनी थोडक्यात शिवरायांची महती सांगितली जी ऐकण्यासारखीच आहे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या आसाममध्ये कार्यरत सैनिकांनी आपल्या महाराजांच्या शिकवणुकीचा अंगीकार करीत देशाच्या शत्रूला नामोहरम केले… गनिमी कावा वापरीत मोठा पराक्रम गाजवला… हे किती विशेष आहे.

 अतिशयोक्तीचा दोष स्वीकारून असे म्हणावेसे वाटते की, कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब हे दोघे अधिकारी जणू स्वराज्याचे संताजीराव-धनाजीराव म्हणूनच कार्य आहेत. हे कार्य सैनिकांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. हे दोघे ज्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे, त्यांना मार्गदर्शनही करतात. अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले हे अधिकारी इतरांच्या मुलाखती घेताना स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर नेमके प्रश्न विचारत वक्त्यांना बोलते करतात, त्यांचा योग्य तो सन्मान राखतात. हे काम अतिशय महत्त्वाचे आणि अभिनंदनीय असेच आहे. तरुणांनी THE MONKS AND WARRIORS VIDEO PODCST जो YOUTUBE वर दिसतो, तो जरूर पहावा… प्रेरणादायी आहे.

खरं तर भारतीय सैन्यदलाने स्वत:ची अशी खास PODCASTS केली पाहिजेत. यासाठी या दोघा अधिका-यांची मदत घेता येईल. कारण सैन्याची बाजूही जनतेला प्रभावीरीत्या समजली पाहिजे.

 मी यांच्यापासून प्रेरणा आणि माहिती घेऊन सैन्यकथा दर रविवारी लिहिण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मराठीत सुद्धा असे PODCAST होणे गरजेचे आहे… फक्त व्यावसायिकीकारण टाळले गेले पाहिजे. महाराष्ट्रात तर सैन्यकथांची अजिबात वानवा नाही.

धन्यवाद, कश्यप साहेब, धन्यवाद कौशलेन्द्र साहेब! बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं! 

आधुनिक संताजीराव-धनाजीराव! 

क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस १५ मे. रविंद्रनाथांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच आज आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊ या.

महर्षी देवेंद्रनाथ टागोर (ठाकूर) म्हणून प्रख्यात असलेले बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू देवेंद्रनाथ हे राजा (प्रिन्स) द्वारकानाथ टागोरांचे ज्येष्ठ पुत्र.

देवेंद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे त्यांच्या जोड़ासाँको भागातील प्रसिद्ध वडिलोपार्जित वाड्यात १५ मे १८१७ रोजी झाला.

ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. फार पूर्वी तेथून या कुटुंबाने यशोहर गावी स्थलांतर केले. कालांतराने जातीबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली.

त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय, यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले.

द्वारकानाथ टागोर हे राजा राममोहन रॉय यांचे सहकारी होते. त्यामुळे देवेंद्रनाथांना लहानपणापासूनच राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राजा राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राजा राममोहन रॉय यांचे कनिष्ठ पुत्र, देवेंद्रनाथांचे सहाध्यायी होते. बंगाली ब्राह्मोसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

राजा राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले. त्यांनी एकेश्वरवादाचा (एकाच ईश्वराची पूजा) प्रसार केला.

(अपूर्ण-उरलेला भाग पुढील भागात)

—–

गीत : ६७

THOU art the sky and thou art the nest as well.

O thou beautiful, there in the nest it is thy love that encloses the soul with colours and sounds and odours.

There comes the morning with the golden basket in her right hand bearing the wreath of beauty, silently to crown the earth.

And there comes the evening over the lonely meadows deserted by herds, through trackless paths, carrying cool draughts of peace in her golden pitcher from the western ocean of rest.

But there, where spreads the infinite sky for the soul to take her flight in, reigns the stainless white radiance. There is no day nor night, nor form nor colour, and never, never a word.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६७

*

खोपा तो प्रेमाचा

रंग गंध स्वरांचा

सजविलास साचा

आत्म्यासाठी॥

*

किरणांची झारी

सौंदर्याच्या हारी

प्रभातीची परी

धरणीसाठी॥

*

गर्द अशा वनी

संध्या, गायरानी

संदेशा घेऊनी

शांतीसाठी॥

*

वेळ संपताची

अंतीम मार्गाची

प्रभुच्या प्रेमाची 

वाट मिळे॥

*

रात ना दिवस

रंग नाही वास

चीर विश्रांतीस

स्थानासाठी॥

*

अनंत अंतराळ

तेज मायंदाळ

शब्दहीन पोकळ

आत्म्यासाठी॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

गीत : ६८

THY sunbeam comes upon this earth of mine with arms outstretched and stands at my door the livelong day to carry back to thy feet clouds made of my tears and sighs and songs.

With fond delight thou wrappest about thy starry breast that mantle of misty cloud, turning it into numberless shapes and folds and colouring it with hues ever changing.

It is so light and so fleeting, tender and tearful and dark, that is why thou lovest it, O thou spotless and serene. And that is why it may cover thy awful white light with its pathetic shadows.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६८

सहस्त्र बाहूंनी रश्मी तुझ्या,

मम धरेवर पसरती

सांज होई तो माझ्या दारी,

त्या उभ्या असती

मम अश्रू नि उसासे,

मेघरूपी घेऊन जाती 

त्या मेघांसह मम गीतांना,

तव चरणी अर्पिती 

मेघांची त्या तरल आवरणे,

तुजला आवडती

देशी त्यांना आकार विविध,

रंगछटा किती

तारांकित ती दुलई घेशी,

प्रेमभराने वक्षावरती

तू पावन, प्रसन्न अन् दुलई

 प्रेमळ, अलवार ती

प्रखर तव प्रकाश अन् 

करुण त्या छाया झाकिती

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

गीत : ६९

THE same stream of life that runs through my veins night and day runs through the world and dances in rhythmic measures.

It is the same life that shoots in joy through the dust of the earth in numberless blades of grass and breaks into tumultuous waves of leaves and flowers.

It is the same life that is rocked in the ocean-cradle of birth and of death, in ebb and in flow.

I feel my limbs are made glorious by the touch of this world of life. And my pride is from the life-throb of ages dancing in my blood this moment.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६९

*

नसानसांतून माझ्या वाहे

अशी अविरत जीवन सरिता

लयबद्ध नृत्य करिते जी 

साऱ्या विश्वातून वाहता

*

तीच उगवते धरतीमधुनि 

अन् सळसळते, पर्णफुलातुनि

जन्ममृत्युच्या चक्रातुन फिरते

भरती ओहोटीस जसे घडते 

*

तेज फाकते मम गात्रातुनि

जीवन स्पर्शाच्या जादूने

अभिमान नाचतो धमनीमधुनि

युगायुगांच्या स्पंदनाने

– क्रमशः भाग २३

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मदर्स डे – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ मदर्स डे – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

ॲना जार्विस

ज्या माऊलीनं हा दिवस सुरू केला, तिनंच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं…!!_

आपल्यासाठी ‘मदर्स डे’ म्हणजे फक्त आईला महागडं गिफ्ट देणं, सोशल मीडियावर फोटो टाकणं आणि एखादा छान केक कापणं इतकाच मर्यादित आहे… परंतु जेव्हा या दिवसामागचा खरा इतिहास समजतो, तेव्हा डोळ्यांत पाणी येतं आणि मनात एक अस्वस्थता घर करून बसते!

१० मे २०२६. सगळीकडे ‘मदर्स डे’चा उत्साह आहे, पण या उत्साहाच्या मागे एक शोकांतिका दडलेली आहे.

ही गोष्ट आहे *ॲना जार्विस* नावाच्या एका जिद्दी महिलेची, जिनं १९०८ मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ या दिवसाची सुरुवात केली होती.

ॲनाला वाटत होतं की, हा दिवस अतिशय वैयक्तिक, शांत आणि जिव्हाळ्याचा असावा. तिच्या कल्पनेतला ‘मदर्स डे’ म्हणजे आईला स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक साधं पत्र आणि तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा एक क्षण होता.  

परंतु अवघ्या दहा वर्षांत या भावनेचा अक्षरशः बाजार मांडला गेला.

कल्पना करा, ज्या भावनेला ॲनानं पवित्र मानलं होतं, त्याच भावनेचा ‘हॉस्टाईल टेकओव्हर’ झाला… हॉलमार्कसारख्या कंपन्यांनी ‘मदर्स डे’साठी खास ग्रीटिंग कार्ड्स छापायला सुरुवात केली, फुलांच्या व्यापाऱ्यांनी दर दुप्पट-तिप्पट केले आणि चॉकलेट कंपन्यांनी जाहिरातींचा पाऊस पाडला.

ॲना जार्विसला हे सगळं बघून प्रचंड संताप आला. तिनं या नफेखोर व्यापाऱ्यांना ‘लफंगे’, ‘चाचे’ _(Pirates)_ आणि ‘दरोडेखोर’ अशी शेलकी विशेषणं लावली. आईच्या आठवणीचा हा व्यापार म्हणजे माणुसकीचा अपमान आहे, असं तिचं मत होतं.

खरी लढाई तर इथून पुढं सुरू झाली… ॲनानं या व्यापारीकरणाविरुद्ध कोर्टात धाव घेतली आणि आपली उरलीसुरली सर्व संपत्ती या कायदेशीर लढायांमध्ये खर्च करून टाकली. ती इतकी हतबल झाली होती की, तिनं हा दिवस अधिकृतपणे रद्द करण्यासाठी चक्क याचिका दाखल केली होती!

ज्या दिवसासाठी तिनं आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्याच दिवसानं तिला कंगाल केलं. १९४८ मध्ये ॲना जार्विसचा मृत्यू एका सॅनिटोरियममध्ये झाला.

पण इथं एक भयानक ट्विस्ट आहे… ॲनानं ज्या फ्लोरिस्ट आणि ग्रीटिंग कार्ड कंपन्यांविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला, त्याच कंपन्यांनी तिचं हॉस्पिटलचं बिल गुपचूप भरलं होतं!

आज २०२६ मध्ये आपण पाहतोय की मदर्स डेच्या नावाखाली अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होतेय. तरीही यंदा एक बदल जाणवतोय… अनेक तरुण आता महागड्या गिफ्ट्सपेक्षा ‘क्वालिटी टाइम’ आणि साध्या घरगुती जेवणाला पसंती देताहेत. कदाचित ॲना जार्विसला हेच हवं होतं.

एका साध्या भावनेचं कॉर्पोरेट साम्राज्यात झालेलं रूपांतर आपल्याला बरंच काही शिकवून जातं. आईवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खरंच एखाद्या ‘ब्रँडेड’ वस्तूची गरज असते का?

ॲना जार्विसची ही कहाणी ऐकल्यानंतर, तुम्ही यंदाचा मदर्स डे कसा साजरा करायचं ठरवलंय?

***

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘परशुराम : न्यायाचा कठोर पण आवश्यक निनाद’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘परशुराम : न्यायाचा कठोर पण आवश्यक निनाद’ ☆ श्री दिवाकर बुरसे

परशुराम हे हिंदू परंपरेतील एक अत्यंत गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व आहे—योद्धा आणि ऋषी, क्रोध आणि तपश्चर्या, शक्ती आणि ज्ञान यांचा अद्वितीय संगम. भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणून त्यांची भूमिका धर्माचे रक्षण करणे ही होती.

परशुरामांविषयी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे त्यांचा “क्षत्रिय संहार”.

हा सर्व क्षत्रियांवर केलेला आंधळा हल्ला नव्हता, तर अन्यायी आणि धर्मभ्रष्ट सत्ताधाऱ्यांविरुद्धचा कठोर हस्तक्षेप होता. त्यांचा क्रोध हा वैयक्तिक सूड नसून, सामाजिक संतुलन पुनर्स्थापित करण्याचे साधन होता.

श्रीरामासोबतचा त्यांचा प्रसंग हा अहंकाराचा संघर्ष नसून, एका युगातून दुसऱ्या युगात होणाऱ्या परिवर्तनाचे प्रतीक आहे. तसेच, कर्णाला दिलेला शाप हा सत्य आणि अनुशासन यांवरील त्यांच्या अढळ भूमिकेचे द्योतक आहे—जरी तो आधुनिक दृष्टिकोनातून कठोर वाटला तरी.

परशुराम हे केवळ योद्धे नव्हते; ते भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांचे गुरु होते. त्यांनी युद्धकलेसोबतच नैतिकता, कर्तव्य आणि संयम यांचेही शिक्षण दिले. प्रचंड शक्ती असूनही त्यांनी वैराग्याचा मार्ग स्वीकारला—हीच त्यांची खरी महानता.

त्यांची प्रतिमा केवळ “क्रोधी योद्धा” अशी पाहणे अपूर्ण आहे. ते धर्मसंरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कठोर निर्णयांचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो—

खरी शक्ती ही केवळ सामर्थ्यात नसून, ती शहाणपण, अनुशासन आणि न्याय यांच्या संतुलनात असते.

जय परशुराम जय जय परशुराम ॥

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३७ – – 

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |

उडी घालितो संकटी स्वामी तैसा |

हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३७|

अर्थ :  चक्रवाक पक्षांना ज्याप्रमाणे सूर्य अंधारापासून मुक्ती देतो किंवा दिशा दाखवतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा भक्ताच्या संकटात त्वरित धावून जातो आणि त्याची संकटातून मुक्तता करतो. हरीभक्तीचा महिमा पावलो पावली ऐकू येतो. त्याची निशाणी गर्जते आहे. दासाभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(मार्तंड – सूर्य, निशाण – एक रणवाद्य/डंका, घाव – त्या वाद्यावरील प्रहार)

विवेचन :  भगवंत आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करण्यासाठी कशाप्रकारे धावून जातो हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देतात.

चक्रवाक पक्षातील नर आणि मादी एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु अंधारामध्ये या पक्षांची एकमेकांपासून ताटातूट होते. अंधारात त्यांना काहीही दिसत नाही. फक्त ते एकमेकांना साद घालतात. त्यांचा आर्त आवाज फक्त एकमेकांना ऐकू येतो. सूर्योदयाची ते वाट पाहत असतात. एकदा का सूर्योदय झाला की त्यांना दिसू लागते आणि विरहाच्या दुःखातून त्यांची मुक्ती होते. अशा रीतीने चक्रवाक पक्षी आणि सूर्य एकमेकांवर अवलंबून असतात.

या चक्रवाक पक्षांसाठी सूर्य ज्याप्रमाणे विरहातून मुक्तीचे कारण ठरतो, त्याप्रमाणेच भगवंत देखील आपल्या भक्तांसाठी धावून जातो आणि त्यांची संकटातून मुक्तता करतो. आपल्या संकटात जर भगवंत धावून यावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्याच्या भक्तीची ओढ लागली पाहिजे. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याची अनन्यभवाने भक्ती करायला हवी म्हणजे तो संकटप्रसंगी धावून आपली त्यातून सुटका करतो.

श्रीहरी हा भक्तवत्सल आहे. जसे भक्ताला भगवंताशिवाय होत नाही तसेच श्रीहरीला देखील आपल्या भक्ताची काळजी केल्याशिवाय चैन पडत नाही. जेव्हा भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा परमेश्वर त्याच्यासाठी स्वतःहून चार पावले पुढे येतो. हरिभक्तीचा महिमा फार मोठा आहे आणि हा महिमा आपल्याला पावलोपावली म्हणजे सर्वत्र ऐकू येतो. त्याची निशाणी म्हणजे त्याचा डंका सर्वत्र वाजतो आहे. वेद, शास्त्र, पुराणे देखील त्याचीच महती गात आहेत.

ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षातील नर आणि मादी हे दोन जीव एकमेकांसाठी आसुसलेले असतात. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत म्हणजे जीव आणि शिव. जीव शिवापासून म्हणजे आपल्या मूळ रूपापासून दूर गेला आहे. भगवंताची भेट म्हणजे जीवाचे शिवाशी मिलन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती. ईश्वराला मनापासून आवाहन केले तर तो आपल्या हाकेला धावून येतो. ईश्वर म्हणजे या विश्वातील सूक्ष्म आणि सर्वव्यापी अदृश्य शक्ती. ही शक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असते. फक्त आपले आवाहन तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरी तळमळ हवी. २७ व्या श्लोकापासून तर या ३७ व्या श्लोकापर्यंतच्या एकूण अकरा श्लोकांमध्ये परमेश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही ही गोष्ट समर्थ आपल्या मनावर ठसवतात.

स्वसंवाद : 

१) चक्रवाक पक्षाला जशी सूर्याची ओढ असते तशी माझ्या मनात परमेश्वराची आर्त ओढ कधी निर्माण झाली आहे का ?

२) “जीवाचे शिवाशी मिलन” हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात हे ध्येय मला दिसते का ?

३) हरिभक्तीचा डंका सर्वत्र वाजतो आहे. मला तो खरंच ऐकू येतो का की सांसारिक गोंगाटात तो माझ्यापर्यंत पोहोचतच नाही ?

– – – – 

श्लोक क्र. ३८ – – 

मना प्रार्थना तुजला एक आहे|

रघुराज थक्कित होऊनि पाहे |

अवज्ञा कदाही येदर्थी न कीजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३८|

अर्थ :  या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की राघवाला एकवार तू थक्क होऊन पहा (म्हणजेच त्याला समजून आणि जाणून घे). मनाने तू कायम भगवंताजवळच वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अवमान म्हणजे अवज्ञा कधीही करू नकोस.

(थक्कित – आश्चर्ययुक्त/अद्भुत, येदर्थी – या बाबतीत)

विवेचन :  आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकात मात्र ते मनाला प्रार्थना करतात की हे मना परमेश्वराकडे तू थक्क होऊन पहा. समर्थांचे हे सांगणे सुरुवातीला आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण थक्क किंवा आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो तर ज्यावेळी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडे ती गोष्ट असते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे एखादी अद्भुत गोष्ट म्हणून पाहतो.

ज्यावेळी पहिल्यांदा वाफेवरचे पहिले रेल्वे इंजिन धावले आणि त्याच्या सहाय्याने रेल्वे धावली, त्यावेळी लोकांनी थक्क होऊन तिच्याकडे पाहिले. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अद्भुत होती. बैल, घोडे किंवा ओढणारे कोणीही नसताना ही गाडी कशी चालते याचे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. पण जेव्हा ही गोष्ट त्यांना नित्याची झाली आणि त्यामागील कार्यकारण भाव समजला तेव्हा तिचे आश्चर्य त्यांना वाटेनासे झाले. हळूहळू ते तंत्रज्ञान आपण जाणून घेतले, त्याचा अभ्यास केला. त्यात पुढे प्रगती झाली. विजेवर, डिझेलवर धावणाऱ्या रेल्वे इंजिनांची निर्मिती झाली. त्यासाठी त्या तंत्रज्ञानाच्या सानिध्यात आपल्याला जावे लागते.

तशीच ईश्वराने निर्मिलेली ही सृष्टी अद्भुत आहे. चंद्र, सूर्य, तारांगणे, मेघमाला, निरनिराळे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव पाहिले की थक्क व्हायला होते. या गोष्टी एकदा काळजीपूर्वक पाहिल्या की त्याच्या मागील कार्यकारण भाव जाणून घेता येईल. एखादे तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल तर ज्याने ते निर्माण केले आहे त्याच्याजवळ जाऊन आपल्याला ते शिकावे लागते. या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे. तिचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी भगवंताला शरण जावे लागेल.

शरण जाणे म्हणजेच भगवंताच्या जवळ जाणे. त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपल्याला त्याच्याजवळ वस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच भगवंताच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि या चराचरात तो कसा भरून राहिला आहे त्याचेही ज्ञान होईल. आपले कल्याण कशात आहे हे देखील समजेल आणि मग आपोआपच आपली वाटचाल व्यवहारातून अध्यात्माकडे आणि अध्यात्माकडून मोक्षाकड अशी सुरू होईल. समर्थांचे हे सांगणे आपल्या हिताचे आहे. म्हणूनच ते म्हणतात की याची कधीही अवज्ञा करू नकोस.

स्वसंवाद :

१) मी कधी या सृष्टीकडे खऱ्या अर्थाने थक्क होऊन, आश्चर्याने पाहिले आहे का? की सर्व काही गृहीत धरून जगतो आहे?

२) माझे मन खरोखरच “राघवी वस्ती” करते आहे का, की ते अजूनही बाह्य जगातच भटकत आहे?

३) समर्थांची ही विनंती मी मनापासून स्वीकारली आहे का, की अजूनही दुर्लक्षच करत आहे? (क्रमशः

– क्रमशः श्लोक ३७ आणि ३८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३५ 

असे हो जया अंतरी भाव जैसा|

वसे हो तयार अंतरी देव तैसा |

अनन्यास रक्षीतसे चापपाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३५|

अर्थ :  आपल्या मनात परमेश्वराबद्दलचा जसा भाव असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वसतो म्हणजे त्याचे अस्तित्व जाणवते. अनन्यभावाने परमेश्वराला जो शरण जातो त्याचे रक्षण हा धनुर्धारी राम नक्कीच करतो. आपल्या भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही.

(अनन्य – एकनिष्ठ, चापपाणी – हाती धनुष्य धारण केलेला /भगवंत.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे आपल्याला सांगतात. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वर कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते सांगतात. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो. परंतु त्याच्याबद्दलची आपली जाणीव किती तीव्र आहे यावर आपल्याला त्याची होणारी अनुभूती ठरते. भगवंताविषयीची भावना जर आपल्या अंतःकरणात तीव्र असेल तर तो प्रकट होण्यास वेळ लागत नाही.

या श्लोकात ‘भाव ‘ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसा भाव तसा देव किंवा देव भावाचा भुकेला असे आपण म्हणतो. कोणी भक्त स्वतःला परमेश्वराचा दास म्हणून घेतात समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत. ही दास्यभक्ती. काही भक्त परमेश्वराला आपला पती समजून त्याची पत्नी भावाने आराधना करतात अशा प्रकारच्या भक्तीला मधुरा भक्ती असे म्हटले जाते. काही भक्त परमेश्वराला आपली आई मानून त्याची भक्ती करतात. ही वात्सल्य भक्ती. तर काही परमेश्वराला आपला मित्र किंवा सखा मानून त्याची भक्ती करतात. ही झाली सख्ख्य भक्ती. असे भक्तीचे म्हणजेच भावाचे विविध प्रकार आहेत. आपली भक्ती ज्या प्रकारची असेल तशा स्वरूपात परमेश्वर आपल्याला दर्शन देतो. त्या अनादी अनंत आणि निर्गुण निराकाराला कोणत्याही रूपात प्रकट होण्यासाठी अडचण नाही.

शेगावीचे महान संत श्री गजानन महाराज यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिले होते. कोणाला त्यांनी समर्थ रामदासांच्या रूपात दर्शन दिले तर कोणाला विठ्ठलाच्या रूपात. परमेश्वराने सुद्धा आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे विविध रूपात दर्शन दिले आहे. अर्जुनाला तर त्याने विश्वरूप दर्शन सुद्धा घडवले. अडचण परमेश्वराकडून नाही. अडचण आपल्याकडून असते. आपल्या मनामध्ये तेवढा समर्पण भाव नसतो.

परमेश्वर कोणाचे रक्षण करतो या प्रश्नाचे उत्तर समर्थ श्लोकातील तिसऱ्या ओळीत देतात. ते म्हणतात, ” अनन्यास रक्षीतसे चापपाणी. ” अनन्य म्हणजे कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही, आश्रय नाही अशा प्रकारची भावना ज्याच्या मनामध्ये असते तो अनन्य भक्त ! अशा भक्तांचे तो धनुर्धारी राम रक्षण करतो.

आपली भक्ती ही सकाम भक्ती असते. आपण देवाची भक्ती केली म्हणजे देवाने आपले रक्षण करावे, आपल्याला सुख, समाधान, यश आणि ऐश्वर्य प्रदान करावे अशी आपली इच्छा असते. अर्थात त्यात फार काही चुकीचे आहे अशातला भाग नाही. परमेश्वर आपल्या संकटात जर धावून आला नाही तर आपली त्याच्यावरील श्रद्धा डळमळीत होते. मी एवढे देवाचे करतो परंतु काही उपयोग होत नाही असे आपण म्हणतो. परंतु याला परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती म्हणता येणार नाही. मला इतर गोष्टी नाही मिळाल्यात तरी चालतील. मला फक्त परमेश्वर हवा आहे, त्याचे दर्शन हवे आहे अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तीव्रतेने निर्माण होईल तेव्हाच परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडू शकेल. श्रीकृष्णाचा भक्त सुदामा आणि त्याची पत्नी श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. त्यांच्यावर प्रपंचामध्ये अनेक संकटे आली, प्रचंड दारिद्र्य पाचवीला पुजले होते. मुलांना प्रसंगी उपाशी झोपावे लागत होते. परंतु परमेश्वरावरील त्यांची श्रद्धा कधीच डळमळीत झाली नाही. आपल्याला जे काही अन्न प्राप्त झाले असेल त्याच्यातीलच काही भाग बाजूला काढून ते परमेश्वराला अर्पण करत असत. आणि मगच स्वतः भोजन करीत. ही झाली अनन्यभक्ती. परमेश्वराने भलेही त्यांची परीक्षा पाहिली असेल परंतु अशा अनन्यभक्तांचे परमेश्वराने रक्षण केले आहे.

स्वसंवाद (नवीन) : 

१) माझी भक्ती कोणत्या प्रकारची आहे – दास्य, सख्य, वात्सल्य की मधुरा ? माझा नैसर्गिक भाव कोणता हे मी ओळखले आहे का ?

२) “जसा भाव तसा देव. ” माझ्या मनात परमेश्वराविषयी खरोखर कोणता भाव आहे ? दृढ श्रद्धा की केवळ भीती ?

३) सुदाम्याने दारिद्र्यातही आधी परमेश्वराचा वाटा काढला. तसा माझ्या जीवनात मी परमेश्वराला आधी प्राधान्य देतो का ?

४) “अनन्य” म्हणजे एकच आधार. माझ्या संकटात परमेश्वर हाच माझा खरा आधार आहे असे मला मनापासून वाटते का ? (क्रमशः)

– – – – – 

श्लोक क्र. ३६

सदा सर्वदा देव सन्निध आहे |

कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे|

सुखानंद आनंद कैवल्यदानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३६|

अर्थ : परमेश्वर कायम आपल्याजवळच आहे. फक्त तो आपली परीक्षा आणि धैर्य पाहतो. सुख, आनंद आणि कैवल्य यांचा तो दाता आहे. असा हा परमेश्वर आपल्या भक्तांचा अभिमानी असून त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही.

(सन्निध – समीप/जवळ, अल्प धारिष्ट – परीक्षा/कसोटी, कैवल्य – मोक्ष.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ परमेश्वर आपल्या कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते आपल्याला सांगतात. तर या श्लोकात हा परमेश्वर कोठे आहे, त्याचा वास कोठे आहे हे ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणजे जवळच आहे. व्यवहारामध्ये आपण सन्निध या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समी र असा घेतो परंतु अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. त्या परमेश्वराला शोधायला दूर कुठेही जावे लागत नाही. त्याचा वास आपल्या अंतर्यामीच असतो. आणि तिथे तो सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आणि आपण वेगळे नाहीच आहोत.

असे जर आहे तर मग आपल्याला त्याचे अस्तित्व का जाणवत नाही ? आपली देहबुद्धी एवढी प्रबळ असते की त्यामुळे हा देह म्हणजे मी नाही आणि आपल्या अंतरात्म्यात त्याचा वास आहे हे आपल्याला जाणवतच नाही. सकाळी उठल्यानंतर आपण ” कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्” हा श्लोक म्हणतो त्याचा अर्थ हाच आहे. आपल्या अंतर्यामी परमेश्वर वसतो आहे.

आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही परंतु साधकांना मात्र पदोपदी त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. आपण आपले मूळ स्वरूप विसरल्यामुळे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. परंतु तुकाराम महाराजांसारखे संत ईश्वर चिंतनातच रममाण झालेले असल्यामुळे त्यांना स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसते. परमेश्वर कायम आपल्याबरोबरच आहे याची जाणीव त्यांना होत असते. म्हणूनच ते म्हणतात, ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती |चालविशी हाती धरुनिया ||

परंतु परमेश्वराची अशी कृपा होण्याआधी तो आपली परीक्षा पाहतो. ही परीक्षा पाहण्यामागे आपल्या भक्ताला मानसिक दृष्ट्या खंबीर करावे, आपल्या कृपेसाठी पात्र करावे अशीच सध्या भगवंताची इच्छा असते. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. पण कधी कधी त्याचे धरलेले बोट सोडून देते. एखादेवेळी तो पडेल हे तिला माहिती असते. परंतु त्याला स्वतःला चालता यावे, तो स्वावलंबी व्हावा म्हणून ती हे करत असते. अनेक संतांनी सुद्धा आपल्या अनुयायांना अनुग्रह देण्यापूर्वी त्यांची परीक्षा पाहिली आहे. आपल्या कृपेसाठी आपला शिष्य पात्र आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच गुरु त्याच्यावर कृपा करतात. प्रत्यक्ष जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पण ज्याला पुढे जायचे आहे तो अशा प्रकारच्या परीक्षांना, संकटांना न डगमगता सामोरा जातो.

तसेच भगवंताच्या एकनिष्ठ भक्ताचे आहे. “देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो” अशी त्याची वृत्ती असते. खरा भक्त संकटप्रसंगी डगमगत नाही. परमेश्वरावरील त्याची श्रद्धा अविचल असते. परमेश्वराचा भक्त असलेल्या छोट्या प्रल्हादावर अनंत संकटे येतात. परंतु तरीदखील परमेश्वरावरील त्याची श्रद्धा ढळत नाही. मागील श्लोकात समर्थ आपल्याला जी अनन्यभक्ती सांगतात ती हीच !

अशी आपली त्याच्यावर संपूर्ण निष्ठा असली आणि त्याने घेतलेल्या परीक्षेत एकदा का आपण उत्तीर्ण झालो की मग त्याच्या कृपेचे जणू भांडारच खुले होते ! अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी भक्ताची अवस्था होते. सुख, समाधान, आनंद आणि कैवल्य म्हणजे मोक्षमार्गाचा दाता असलेला परमेश्वर आपल्याला या सर्व गोष्टी सहजच प्रदान करतो.

स्वसंवाद : 

१) “परमेश्वर अंतर्यामी आहे” हे मी जाणतो पण माझ्या दैनंदिन जीवनात मला त्याची प्रत्यक्ष जाणीव होते का ?

२) आईने बोट सोडले तरी ती दूर नसते. माझ्या संकटकाळात परमेश्वराबद्दल अशी भावना माझी असते का ?

३) परमेश्वर परीक्षा पाहतो हे मान्य आहे. माझ्या आयुष्यातील समस्यांकडे मी त्या दृष्टीने पाहतो का ?

४) “अनंत हस्ते” देणारा भगवंत आहे. मग मी त्याच्याकडे क्षुल्लक गोष्टींचीच मागणी करत राहतो का ? 

– क्रमशः श्लोक ३५ आणि ३६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५. ☆ प्रा.भारती जोगी ☆

(चित्र पुढील माहितीनुसार काल्पनिक.)

निसर्गाने रौद्र रूप धारण केलेले… भयंकर पाऊस सुरू… कालिंदी नदीला महापूर आलेला… आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत अर्ध्या रात्री एक तरूण पती माहेरी गेलेल्या पत्नीच्या आठवणीत विरहदग्ध, मिलनातूर, विकल मनाने वेड्यासारखा थेट पोचतो पत्नीच्या माहेरी, तिच्या पुढ्यात… सामोरा!! नदी पार करतांना काष्ट समजून एका मानवी शवाचा आधार घेत, भिंतीवर चढण्यासाठी दोर समजून सापाला धरून… बेभान अवस्थेत!! 

पत्नी चकीत होते… पण दुसऱ्याच क्षणी सत्य कळल्यावर, तिला आपल्या रूप आणि यौवनाचा धिक्कार करावासा वाटला. आणि तिच्या तोंडून उद्विग्न उद्गार बाहेर पडले…

लाज न लागत आपको, दौरे आहे साथ, 

धिक धिक ऐसे प्रेम को, कहा कहौ मैं नाथ !! 

आणि असा धिक्कार करत तिनं पुढे त्याला ही उन्मादावस्थेतून जागं केलं…

अस्थि चर्ममय देह, यांमे ऐसी प्रीती

जो होती रघुनाथ मंह, होती न तो भवभीती!! 

आपल्या पतीला हे असे खडे बोल सुनावणारी ही सुंदर रूप यौवना, युवती होती… रत्नावली!!! 

आणि तो युवक, तिचा पती होता… तुलसीदास उर्फ रामबोला!!! 

रत्नावली… सौंदर्य आणि बुद्धी दोन्हीं लेऊन आलेली एक धर्मपरायण युवती ! जी लावण्यम् अंतर्मन: ही होती. म्हणूनच तिने दाखवून दिले की, भारत देशातील नारी; तिने ठरवलं तर आपल्या पतीला युवावस्थेच्या उन्माद क्षणांमधून ईश्वर भक्तीकडे उन्मुख करण्यास सक्षम असते.

रत्नावली चे हे शब्द तुलसीदास ने ऐकले आणि त्याच्या मनावरील उन्माद, मोह, भ्रांती या सगळ्याचा पडदा दूर झाला. पूर्वजन्मीचे संस्कार प्रदिप्त झाले. आणि आता डोळ्यांसमोर श्रीरामाचे मंगलकारी शुभ रूप, संपूर्ण सौंदर्यासहीत दृग्गोचर झाले. आणि तो निघाला विरक्ती च्या वाटेवर, संन्यस्त वृत्ती ने, प्रभु रामचंद्र च्या कृपादृष्टी च्या लाभासाठी! 

रत्नावली जिने दाखवून दिलं की, प्रेम जेव्हा ईश्वरा प्रती नेणारे असते तेव्हा ते एक गहन परिवर्तन, एक उच्चतम आव्हान स्वीकारायला तयार असते. आणि म्हणूनच समर्पित जीवन स्वीकारायला ही तयार असते.

रत्नावली ने एक चैतन्य तुलसीदास च्या मनात चेतविले. त्याच्या चेतनेला जागवलं… आणि तुलसीदास ला ही… या… समिधेच्या शब्दस्पर्शातलं स्फुल्लिंग जाणवलं! त्याला कळलं… हाच तो क्षण! हीच ती वेळ!!! काम कडून राम कडे जाणाऱ्या भक्ती मार्गावरील जीवनयात्रा सुरू करण्याची!! तुलसीदास पुन्हा वळून न पाहण्यासाठी, निघून गेला त्या वाटेला! एक गृहस्थ, संन्यासी झाला.

त्याच्या हातून रामचरितमानस या महान ग्रंथाचं, आणि अशाच अनेक ग्रंथांचे सृजन झालं. घरा-घरात राम भजन निनादलं! तुलसीदास संत तुलसीदास पदाला पोहोचला.

पण… या सगळ्यात सगळ्यांनाच विसर पडला त्या पहिलं चैतन्य स्फुल्लिंग चेतवणा-या समिधेचा! रत्नावली ख-या अर्थाने गुरू ठरली तुलसीदास ला योग्य मार्गदर्शन करणारी, त्याला राम भेटवणारा योग्य मार्ग दाखवणारी! किती महान स्त्री म्हणावी ती… जिच्या हृदयात अगाध भक्ती भाव तर होताच, पण पतीवर ही प्रगाढ प्रेम होतं! म्हणूनच तर तिच्या दिव्य दृष्टीला आपल्या पतीचं दिव्यत्व जाणवलं ना! 

हे विसरून कसं चालेल की…

रत्ना नसती तर तुलसीदास सारखं रत्न झालंच नसतं, आणि तुलसीदासला ही राम रतन धन प्राप्त झालंच नसतं! 

रत्नावली ने दाखवून दिलं की, खरं प्रेम तेच, जे ईश्वरा जवळ घेऊन जाते. 

रत्नावली चं एकाकी जीवन स्विकारण्याचं पेललेलं आव्हान उपेक्षून नाहीच ना चालणार!! 

शेवटी तीसुद्धा एक स्त्री च होती. तिला ही वाटलंच असेल ना, की पतीने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून जीवन आपल्याबरोबर व्यतीत करावे!! तो असा कायमचा त्यागून निघून जाईल, हा तिच्या साठी धक्काच होता. एक आव्हान तिने पेरलं पतीच्या मनात, तर एक आव्हान तिच्या ही वाट्याला आलंच पेलण्यासाठी! एकाकी जीवन, आजीवन जगण्याचं! 

मग रत्नावली ने आपलं एकटेपणाचं दु:ख, ती बोचणारी सल, ती विरह व्याकुळ, झुरणा-या मनाची विकल अवस्था तिने… अनेक, असंख्य दोह्यांत, झरझर वाहणा-या अश्रूंच्या साक्षीने प्रतिबिंबित केली. वियोगाचं दु:ख स्पष्ट दिसतं त्यांत!! इतकंच नाही तर, रत्नावली च्या ज्ञानाचं, विद्वत्तेचे ही प्रतिबिंब दिसतं त्यात! तिचे दोहे, त्यांची भाषा आणि त्यांतील भाव हे दोन्ही उच्च कोटीचे आहेत. काही ठिकाणी तर तुलसीदास पेक्षाही उत्कृष्ट आहे, सरस आहे ती! पण तिची ही काव्यप्रतिभा उपेक्षितच राहिली. मुळात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे, ठामपणे उभी राहणा-या स्त्री चा त्याग, समर्पण, एकाकीपण, तिचं मोठेपण… नेहमीच अलक्षित, उपेक्षित, दुर्लक्षित राहतं! 

तीच उपेक्षा रत्नावली च्या ही वाट्याला आली.

पण हे विसरून चालणार नाही की…

रत्नावली ने पतीला धिक्कारले नसते तर रामबोलागोस्वामी तुलसीदास कसा बरं झाला असता?? 

 पतीच्या मनात रामभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारी, चैतन्य जागवणारी, तेजोमयी समिधा च ना ही रत्नावली!! 

रत्ना अगर ना होती तो तुलसी जैसा रतन नहीं होता!

– लेख क्र. ५.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

जवळजवळ १६५ वर्षांपूर्वी कोलकत्ता जवळच्या ‘जोरासांको’ येथील ठाकूर घराण्याच्या महाल सदृश घरात ७ मे १८४१ रोजी रविंद्रनाथांचा जन्म झाला. वडील महर्षी देवेंद्रनाथ व आई शारदा देवी यांचं ते चौदावं अपत्य होते. साहजिकच त्यांना आईचा सहवास फार वर्षे लाभला नाही. वडील पण सतत प्रवासांत असत. ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे देवेंद्रनाथ वरचेवर हिमालयात भटकंती करत, तिथे जाऊन रहात, त्यामुळे त्यांचा सहवास देखील फारसा मिळायचा नाही. पण जेंव्हा रविंद्र उर्फ ‘रोबी’ ने शाळे विषयीच्या तक्रारी त्यांना सांगितल्या तेंव्हा त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी रोबीला शाळेतून काढले ते कायमचेच.

घरीच वडील त्यांना शिकवू लागले. प्रवासात ते रोबीला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात शाळेत न मिळणारं, पण बौद्धिक व भावनिक जग समृद्ध करणारे शिक्षण सहज बोलता बोलता रोबीला मिळू लागलं. वडिलांबरोबर केलेला प्रवास, हिमालयातील भटकंती, निसर्गाकडून व वडिलांकडून मिळालेलं ज्ञान हा रविन्द्रनाथ यांच्या जीवनातला सुवर्णकाळ होता. याच काळात या शाळा सोडून दिलेल्या तथाकथित अज्ञानी मुलाचं रूपांतर एका सुसंस्कृत मुलात झालं. (The ugly duckling was transformed into an admired swan) ही शिदोरी त्यांना नोबेल पुरस्कारा पर्यंत घेऊन गेली व शिक्षणपद्धतीचा कायापालट करणाऱ्या शिक्षणमहर्षी या पदवीपर्यंत घेऊन गेली. पूर्ण भारताने नाही तर जगाने त्यांना कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, समाजसुधारणेचं क्षेत्र, तत्वज्ञानाचे क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील गुरुपद बहाल केलं व गुरुदेव या पदवीने सन्मानित केलं. कोणतेही समाजमान्य पारंपारिक शिक्षण न घेतलेला, कोणत्याही विद्यापीठाची कसलीही पदवी गाठीशी नसलेला हा माणूस शिक्षणक्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवतो ही गोष्ट अचंबित करणारी आहे.

त्यांच्या मनात शाळेविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या, त्या काळी सर्वसंमत असणाऱ्या, मुलांना शारीरिक क्लेश देणाऱ्या, अपमानास्पद शिक्षा करणाऱ्या पद्धतीचे जगाने खरंतर आभारच मानायला हवेत कारण त्यामुळेच रविंद्रनाथांनी शाळा सोडली. वडिलांकडून, निसर्गाकडून, पुस्तकां कडून ज्ञान मिळवून ते संवेदनशील विचारवंत, हरहुन्नरी कलाकार बनले.

रविंद्रनाथांनी लहानपणीच तीन तीन क्रांतीकारी चळवळी खूप जवळून पाहिल्या, अनुभवल्या. एक म्हणजे राजा राममोहन रॉय यांची धार्मिक पुनरुत्थानाची चळवळ, ज्यातून ब्राह्मो

समाजाची निर्मिती झाली. दुसरी म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी चालू केलेली साहित्यिक चळवळ, ज्यामुळे भारतीय, वाङ्मयीन विश्व खडबडून जागे झाले. आणि तिसरी राजकीय चळवळ ‘Indian National movement’, जी राजकीय व सांस्कृतिक दडपशाहीचा निषेध करत होती. या तीनही चळवळींत टागोर कुटुंबियांचा सक्रिय सहभाग होता व त्यामुळे बालपणी व तरुणपणी रविंद्रनाथांनी या सर्व हालचाली खूप जवळून पाहिल्या होत्या.

पौर्वात्य व पाश्चिमात्य दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी एकत्र आणून संघर्षाशिवाय मानवजातीच्या कल्याणासाठी काम करावं अशी भावना कदाचित या तिन्ही चळवळींचा त्यांच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामाचा परिपाक असावा.

वयात बरंच अंतर असूनही वडीलबंधू सत्येंद्रनाथांबरोबर रविंद्रनाथांचे वडिलांप्रमाणेच मित्रत्वाचे संबंध होते. आय ए एस असलेल्या सत्येंद्रनाथांच्या देशातील निरनिराळ्या शहरांत बदल्या व्हायच्या पण तिकडे जाऊन रोबी त्यांच्याबरोबर रहात, वेद, उपनिषदे, संत वाङ्मय यांचे वाचन करीत व त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या ज्ञान कक्षा विस्तारित असत.

‘रोबी’ या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी म्हटलय की, ” ज्या देवाचा व प्रेमाचा माझ्या सर्व साहित्यात संदर्भ आला आहे तो या जीवनाचा देव (God of life) आहे व ते प्रेम जीवनावरील प्रेम आहे. ” त्यांच्या शब्दांतून उमटणारे दैवी सूर, धर्म, भाषा, देश अशा सर्व सीमा लांघून सर्व विश्वात घुमले. आपल्या एका कवितेत ते स्वतःलाच सांगतात, “Move out of yourself, stand out in the open, you will hear the music of the universe in your heart. “

—–

☆ गीत : ६४ ☆

ON the slope of the desolate river among tall grasses I asked her, “Maiden, where do 

you go shading your lamp with your mantle? My house is all dark and lonesome ⎯ lend 

me your light! ” She raised her dark eyes for a moment and looked at my face through 

the dusk. “I have come to the river, ” she said, “to float my lamp on the stream when the 

daylight wanes in the west. ” I stood alone among tall grasses and watched the timid 

flame of her lamp uselessly drifting in the tide.

In the silence of gathering night I asked her, “Maiden, your lights are all lit ⎯ then where do you go with your lamp? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” 

She raised her dark eyes on my face and stood for a moment doubtful. “I have come, ” she said at last, “to dedicate my lamp to the sky. ” I stood and watched her light 

uselessly burning in the void.

In the moonless gloom of midnight I asked her, “Maiden, what is your quest holding the 

lamp near your heart? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” She 

stopped for a minute and thought and gazed at my face in the dark. “I have brought my light, ” she said, “to join the carnival of lamps. ” I stood and watched her little lamp uselessly lost among lights.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत :६४ ☆

नदीच्या उतरणीला उभा मी असताना,

मज दिसली ती, झाकुनि एक दीप नेताना

 

निघालीस कोठे हा दीप 

तुझा घेउनि?

देशील कां, घर माझे

आले अंधारुनि?

 

डोळे मोठ्ठे करूनि क्षण

मजकडे पाही

म्हणे मावळतीला सोडेन नदी प्रवाही

 

भित्री ज्योत थरथरुनि

वहातच गेली 

निशेच्या तमी पुन्हा दिवा घेउनि दिसली 

 

आता तरी देशील कां,

घर माझे उजळण्या?

म्हणे दिवा हा आणिला

नभासि अर्पिण्या

 

अवकाश पोकळीत दीप व्यर्थ तेवला

गडद रात्री, आली फिरुनि,

दीप छातीशी धरिला 

 

पुन्हा मी पुसले, टक लावुनि, पहात म्हणते

आनंदोत्सव असे दिव्यांचा, त्याचसाठी नेते

 

अनंत दिवे, ध्येय रहित, तेवती प्रकाशात

ती अन् तिचा दीप दोन्ही हरवले गर्दीत

 

भक्तीचा दीप न मिळे, असा आयता कोणास

ज्याचा त्याने तो ठेवावा चेतवुनि हृदयास

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ६५ ☆

WHAT divine drink wouldst thou have, my God, from this overflowing cup of my life?

My poet, is it thy delight to see thy creation through my eyes and to stand at the portals 

of my ears silently to listen to thine own eternal harmony?

Thy world is weaving words in my mind and thy joy is adding music to them. Thou givest 

thyself to me in love and then feelest thine own entire sweetness in me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६५ ☆

*

भरुनी वाहतो देवा

सुखी जीवनाचा ठेवा

*
तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून

*

कोणता रस तुजला

अर्पू मी न कळे मला

*

तूच निर्मिलेले जग 

मम नेत्री पाहशील का?

संगीत तूच निर्मिलेले

मम श्रोत्री ऐकशील का?

*

विश्व तुझेच मम हृदयी

गोफ विणे शब्दमयी

*

अलौकिक तव आलापी

सुखदायक हो भवतापी

*

बली सम तू दाता असशी

मम चेतसी तुलाच देशी

*

तव माधुरी मी हृदयी धरी

तव हृदयांगण जी तृप्त करी

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६६ ☆

SHE who ever had remained in the depth of my being, in the twilight of gleams and of glimpses; she who never opened her veils in the morning light, will be my last gift to thee, my God, folded in my final song.

Words have wooed yet failed to win her; persuasion has stretched to her its eager arms in vain.

I have roamed from country to country keeping her in the core of my heart, and around her have risen and fallen the growth and decay of my life.

Over my thoughts and actions, my slumbers and dreams, she reigned yet dwelled alone and apart.

Many a man knocked at my door and asked for her and turned away in despair.

There was none in the world who ever saw her face to face, and she remained in her 

loneliness waiting for thy recognition.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६६ ☆

*

जी अंतरात माझ्या, ती संधीप्रकाश किरणात

कुणी न तिज पाहिले, दिवसाच्या प्रकाशात

*

प्रेमयाचना शब्दांची, फोल तिला जिंकण्यास 

प्रयत्न निष्फळ होत, तिचे मन वळविण्यास

*

देशोदेशी फिरलो, हृदयात तिज स्थापुनि

आयुष्याचे चढउतार, भोवती तिच्या गुंफुनि

*

अनन्य भक्ती तुजप्रती, हृदयी येई उमलुनि

मार्ग चाललो, जो दिला तिनेच मला दावुनि 

*

सत्ता तिचीच, मम स्वप्न, विचार वा कृती

निराश झाले, ज्यांना ती मागून हवी होती

*

वाट पाहते, तव मान्यतेची, एकटीच राहुनि

अर्पण करी, तिज देवा, अखेरच्या गीतातुनि

*

– क्रमशः भाग २२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर

आशाताईंच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने कवीवर्य सुरेश भटांनी त्यांच्यासाठी एक कविता पाठवली होती. शब्द असे होते…

आता न तुझे कुठल्याही जखमांशी देणे घेणे 

पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो

हा कंठ तुझा अलबेला हा रंग तुझा मतवाला

तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो

तू सरगम सुखदुःखाचा जपलास कसा उमजेना 

हा कैफ तुझा माझ्या धमन्यातून उसळत राहो 

… खरं आहे. आज देहाने त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरात तो सळसळता कैफ मात्र चिरंतन, अविनाशी राहणार.

काल त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मन प्रचंड सैरभैर झालं. मनात आलं, लता आणि आशा नाहीत अशा जगात आता आपल्याला जगण्याची सवय करावी लागणार. चार वर्षांपूर्वी लतादीदींचे निधन झाले आणि त्याच वाटेने आता आशाताई रसिकांच्या मनावर एक पोरकेपणाची भावना ठेवून निघून गेल्या.

भारतीय सुगम संगीत क्षेत्रातल्या एका सुस्वर युगाचा अंत झाला. लता म्हणजे भगवंताची बासरी तर अशा म्हणजे राधेच्या मनातल्या कृष्णाचा सूर होता.

चाळिशीच्या दशकात चित्रपट बोलू लागला आणि गाऊही लागला. त्याच सुमारास लता आणि आशा नावाची संगीताच्या नभांगणात नक्षत्रे उगवली. दत्ता डावजेकरांचे संगीत असलेले ‘माझा बाळ’ या चित्रपटात,

चला चला नव बाळा हे गीत आशाताईंनी गायले आणि इथून पुढे सुरांच्या दुनियेत जे घडले तो चमत्कारच म्हणावा लागेल. नंतरच्या पिढ्यांसाठी संगीतातले महत्त्वाचे ब्रँड त्यांनी अधोरेखित केले. आजही संगीताच्या रिअॅलिटी शोमध्ये प्रामुख्याने आशा, लता, रफी, मुकेश, किशोर कुमार यांचीच गाणी नव्या पिढ्यांकडून गायली जातात. कित्येक गायक झालेत, होतीलही पण या सुरांचं अलौकिकत्व, तो करिष्मा केवळ अजोड आहे.

आशाताईंच्या गाण्याचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या गळ्याला पेलवत नाही किंवा बसत नाही अशी कुठलीच स्वररचना नाही. त्यांचा कंठ खऱ्या अर्थाने अष्टपैलू. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे पल्लेदार सूरही सहजपणे त्यांच्या गळ्यातून उतरले. “शूरा मी वंदिले. ” किंवा मर्मबंधातली ठेव ही” सारखी नाट्यगीते म्हणजेच एक वस्तुपाठ आहे. हिंदुस्थानी गायकीचे थाट, रंग त्यातून उलगडले. त्याच गळ्यातून अवखळ, उडती, मदमस्त शृंगारिक गाण्यांची बरसात झाली. अनवट गझला त्यांनी गायल्या. त्यांच्या गळ्यात फक्त सात स्वरच नव्हते तर सात ऋतूंचाच मुक्काम होता जणू काही. असा प्रवाही गळा म्हणजे केवळ भगवंतांचेच देणे म्हणावे लागेल.

मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही असे म्हणतात पण लतादीदीच्या वटवृक्षासमान सावलीत आशाताईंच्या स्वरवेलींचा मांडवही जोमाने बहरत गेला आणि सर्व प्रकारच्या मानमरातबाने आणि किताबाने त्यांची जोडी भरून गेली. स्वरसम्राज्ञी आशा भोसले अशी स्वतंत्र ओळख त्यांनी मिळवली. गाणे कुठलेही असो,

“ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख”

किंवा

“छोड दो आँचल चल जमाना क्या कहेगा”

किंवा अगदी अलीकडचं,

“ सपने मे मिलता है मुंडा मेरा सपने में मिलता है “

… शब्द, भाव आणि अभिनयाने भरलेलं त्यांचं गाणं ऐकणाऱ्याच्या काळजात रुतून बसतं.

वयाच्या नव्वदीत सुद्धा त्या भरजरी साडी आणि चमचमता रत्नहार परिधान करून मंचावर येऊन “ओ मेरे सोना रे सोना रे” गायला लागल्या की श्रोतृवर्ग अक्षरशः पागल होऊन जायचा.

रसिकांना त्यांनी फक्त गाणं दिले नाही तर या जन्मावर शतदा प्रेम करायलाही शिकवलं. त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या मोडक्या संसाराची लाज टाकून चित्रपट गीत क्षेत्रात एक जबरदस्त ठसा उमटवला.

त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष होता. टक्केटोणपे, मानापान त्यांनी सहन केले. जीवन म्हणजे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं पण त्याला त्यांनी त्यांच्या कंठात असलेल्या दैवी सुराने आणि आत्मविश्वासाने सडेतोड उत्तर दिले.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “स्वतः भोगलेल्या वेदनेतूनच खरा कलाकार जन्म घेतो”

त्यांच्या असामान्यत्वातही त्यांनी एक सामान्यपण जपलं होतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या,

“आज मी तुमच्यासमोर गायिका म्हणून उभी असले तरी मी एक गृहिणी आहे, माझं मन स्वयंपाक घरात रमतं. मला माझ्या मुलांना, इतरांना! सर्वांनाच स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्वतः बनवून खाऊ घालण्यात फार आनंद वाटतो, अगदी माझ्या गाण्याइतकाच. ”

त्यांचा व्यासपीठावरचा गप्पिष्ट, मोकळा, मी तुमच्यातलीच असा जाणवून देणारा वावर हेच सांगायचा की, वय हा एक निव्वळ आकडा आहे, त्यांनी १२००० च्या वर गाणी गायली असतील पण त्यांना मात्र त्याचे मुळीच कौतुक नव्हते. अजूनही हजारो गाणी गाण्याचा उत्साह त्यांच्यात टिकून होता हे विशेष. त्यांचा सूर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. उत्साह म्हणजे एखादा अवखळ धबधबाच. जीवनावरचे प्रेम त्यांच्या गायकीतून जाणवायचं. व्यक्त व्हायचं.

“भोगले जे दुःख ज्याला सुख म्हणावे लागले” ही आशाताईंनी गायलेली गझल खोल पाण्याच्या तळाशी नेते.

“जिवलगा राहिले हे दूर घर माझे

पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे.. ”

ही विराणी गावी तर ती फक्त आशाताईंनीच.

त्यांची किती गाणी आठवावीत? किती सूर साठवून ठेवावेत हृदयाच्या कप्प्यात?

आशाताईंच्या निधनाचे वृत्त ऐकताच मनात याच ओळी घुमल्या.

“ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे

” जणू काही अशाताईंच्या जाण्याचा संपूर्ण भावार्थ याच ओळीत साठलेला आहे.

शब्दसुरांना मरण नसते. सूरात्मा अमर असतो. पिढ्यानुपिढ्या ही संगीत सरिता अशीच झुळझुळ वाहत राहणार आणि या सूरगंगेच्या किनारी उभं राहून सारं चराचर त्यांना आदरांजली वाहत राहणार.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares