मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अग्निदिव्य… भाग – १ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆

अर्चना सुरेश देशपांडे

 

? जीवनरंग ?

☆ अग्निदिव्य भाग-१ ☆ अर्चना सुरेश देशपांडे ☆

अंगातला एप्रन काढून खुर्चीवर ठेवत माधुरीने” विमल मावशी “अशी हाक मारली. “आले आले हो ताई” म्हणत विमल मावशी लगबगीने स्टाफ रूम मध्ये आल्या. हाताची घडी डोक्या खाली घेत माधुरी कोचवर कलंडली.. “आई ग!”अती श्रमामुळे तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.

माधुरी जवळ जवळ आठ-दहा तासांनी जरा आरामात आडवी झाली होती. सकाळपासून तिची नुसती धावपळ सुरू होती. दुपारपासून अडकलेल्या रूपालीचे बाळंतपण करण्यात तिने आपलं कौशल्य पणाला लावले होते. आता रूपाली आणि तिचे बाळ दोघेही शांतपणे झोपले होते. रूपालीच्या चेहऱ्यावर आनंदाचं चांदणं पसरलं होतं. तिची सुखरूपपणे सोडवणूक करण्यासाठी माधुरीवर खूपच मानसिक ताण आला होता. अशा प्रकारची अवघड केस हाताळण्याची तिची पहिलीच वेळ होती. डॉक्टर साने प्रख्यात स्त्री रोग तज्ञ होते, त्यांचयावर रुग्णांचा विश्वास होता आणि त्यांच्या हाताला यश होते. आज माधुरीवर सर्व हॉस्पिटलची जबाबदारी टाकून डॉक्टर विश्वास साने व त्यांच्या पत्नी विशाखा साने दोन दिवस मुंबईला कॉन्फरन्स साठी गेले होते. त्यांचा माधुरीच्या कामावर पूर्ण विश्वास होता आणि रूपाली चे बाळंतपण यशस्वीरित्या पार पाडून तिने विश्वास सार्थ करून दाखवला होता. आता ती स्टाफ रूम मध्ये परतली होती. विमल मावशींची चाहूल लागताच माधुरी म्हणाली, “मावशी माझ्यासाठी एक कप कॉफी करता का?! तुमची कॉफी होईपर्यंत मी फ्रेश होऊन येते”

आषाढातील दिवस होते, हवा पावसाळी होती आकाशात काळया ढगांनी गर्दी केली होती. अशावेळी कॉफीची आवश्यकता होती. माधुरी फ्रेश होऊन येताच मावशी वाफाळलेली कॉफी आणि बिस्किटांची डिश घेऊन आल्या. ” ताई सकाळ धरनं लई थकलासा! ही गरम गरम काफी घ्या, मंग वाईज बरं वाटल “म्हणून त्यांनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला आणि राहिलेली कामे उरकण्या साठी त्या आत गेल्या.

माधुरीने कप तोंडाला लावून एक घोट घेतला असेल तोच बाहेरून बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला. अनुभवी माधुरीने तान्ह्या बाळाचा आवाज लगेच ओळखला. तिनं”विमल मावशी”अशी हाक मारताच हातातले काम सोडून त्या बाहेर आल्या. ” ताई अजून काही हवे आहे का?”. ‘नाही, मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जरा मावशी बघा हो बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येतोय तो?

मावशींनी चाहूल घेतली व आवाज बाहेरून येतोय हे लक्षात येताच त्या मुख्य दरवाजाकडे धावल्या.

विमल मावशींनी मुख्य दरवाजा उघडला. कंदीलाच्या प्रकाशात दरवाजाच्या समोर नुकतंच जन्मलेलं इवलसं बाळ टॉवेल मध्ये गुंडाळलेले त्यांना दिसले. ते पाहताच त्यांनी माधुरीला हाक मारली. “ताई लवकर बाहेर या”मावशींची हाक ऐकून माधुरी कॉफीचा कप तसाच ठेवून दाराशी धावली. दारात टॉवेलमध्ये गुंडाळलेले छोटसं बाळ अन् त्याला पाऊस लागू नये म्हणून डोक्यावर उघडलेली छत्री हे दृश्य तिला दिसले.

माधुरीतील डॉक्टरी हृदयाने तिला कर्तव्याची जाणीव करून दिली. तिने पटकन बाळाला उचलले टॉवेल मध्ये गुंडाळलेल्या निष्पाप अर्भकाला तपासले. लालचुटूक ओठ, गोरीपान, डोक्यावर भरपूर जावळ असलेली बालिका होती. तिने किलकिले डोळे करून पाहिले पण उजेड सहन न झाल्याने ती पुन्हा निस्तब्ध पडून राहिली. तिचे वजन कमी होते, ती थंडीने कुडकुडत होती. माधुरीने मावशींच्या मदतीने बाळाला स्वच्छ केले, तिला प्रथम मधाचे बोट चाटवलं, ड्रॉपर ने थोडे दूध पाजले. दवाखान्यातील कपडे घालून चटकन् “इंक्युबेटर “मध्ये ठेवले. अशी केस घ्यायची म्हटलं तर डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागणार होती पण माधुरीने ठरवले की बोलणी बसली तरी बेहत्तर पण माणुसकीला काळिमा लावून घ्यायचा नाही. त्यामुळे त्या मुलीची सर्व व्यवस्था झाल्यावर तिने डॉक्टरांना फोन केला, “सर मी एक अनौरस मुलगी दाखल करून घेतली आहे. तिची परिस्थिती पाहता तुमच्या परवानगीशिवाय मला दाखल करून घेणे भाग पडले. ” डॉक्टर साने म्हणाले, “वेल डन माधुरी”केवळ मुलगी म्हणून तिला जगण्याचा अधिकार नाकारणारे हे कोण? असा विचार माधुरीच्या मनात चमकून गेला. काही झाले तरी या बाळाला वाचवायचे असे तिने निर्धार केला. ती तिची खूप काळजी घेत होती आज गुंतागुंतीची केस तिने एकटीने हाताळली होती. यश पदरी पडल्यामुळे खुश होती खरं पाहता तिला विश्रांतीची गरज होती पण त्या निष्पाप बाळासाठी तिचा जीव कासावीस होत होता. दहा मिनिटाच्या अंतराने जाऊन ती स्वतः बाळाची तपासणी करत होती.

तिला ड्रॉपर ने दूध पाजत होती. तिच्या योग्य वाढीसाठी औषधांचे drops देत होती. तिला वाचवण्यासाठी धडपडत होती. तीन महिन्याच्या अथक प्रयत्नाने त्या बाळाची तब्येत सुधारू लागली. सतत सहवासात राहिल्यामुळे त्या दोघींच्यात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला, माधुरीला तिचा लळा लागला. ,. या निष्पाप मुलीला अंतर द्यायचे नाही असे तिने मनोमन ठरवून टाकले. एक दिवस माधुरीने “या मुलीला माझी मुलगी म्हणून वाढविण्याची माझी इच्छा आहे” हे डॉक्टर साने यांच्या कानावर घातले.

डॉक्टर साने म्हणाले, “तुझा निर्णय चांगला आहे पण अगं माधुरी भावनेच्या भरात असा निर्णय येऊ नकोस. अजून तुझे लग्न व्हायचे आहे. या मुलींमुळे तुला आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, लोकांच्या शंका कुशंकांना सामोरे जावे लागेल, लोकांच्या कुत्सित नजरा सहन कराव्या लागतील. , लोक तुझी बदनामी करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत थोडक्यात काय तुला एक प्रकारचे “अग्नी दिव्य” करावे लागेल. याची तुझी तयारी आहे का? दोन दिवस पूर्ण विचार कर आणि मगच निर्णय अन्यथा आपण तिची चांगल्या अनाथाश्रमात सोय करू,. ”

रात्रीचे दोन वाजले होते. सगळीकडे निरव शांतता पसरली होती पण माधुरीच्या डोक्यात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. तरीसुद्धा त्या विचारावर मात करून तिने त्या निष्पाप बालिकेचे मातृत्व स्वीकारण्याचा निश्चय केला. दुसरे दिवशी डॉक्टरांना ती म्हणाली, “पूर्णविचारांती मी त्या मुलीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे “. डॉक्टरांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले.

मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो’ माणसाचं काहीसं तसंच असतं, काही माणसं काही क्षणात आपली होऊन जातात तशी त्या बाळाने माधुरीवर मोहिनी घातली होती जणू! डॉक्टरांच्या संमतीने दवाखान्यातील रुग्णांच्या समवेत बाळाचं थाटामाटात बारस करून माधुरीने तिचे नाव ठेवले “मोहिनी. ” मोहिनी म्हणजे माधुरीच्या आयुष्यात एक गोड स्वप्न होतं, तिच्या बोबड्या बोलांनी सर्वांवर गारुड केले होते. समंजस आणि गोड, तेवढीच खेळकर स्वभावाची मोहिनी नेहमी सर्वांना हवीहवीशी वाटे.

माधुरीला आपले बालपण आठवले. आई, बाबा आणि ती एक सुखी कुटुंब होते. तिचे वडील एका छोट्या कंपनीत अकाउंट सेक्शन मध्ये नोकरीला होते. आई गृहिणी होती. पैशाची चणचण होती पण काटकसरीने तिची आई छान घर चालवत होती. लाडक्या माधुरीची हौस पुरी करत होती. माधुरी एक साधी मुलगी होती, तिला खूप शिकायचे होते, फुलपाखरांचे पंख लावू उडायचं होते. तिच्या आईला तिच्या गुणांचे कौतुक होते. एके दिवशी लेकीच्या शाळेत लेकीचे नृत्य पाहण्यासाठी ते गेले आणि कार्यक्रम संपवून घरी परतत असताना त्यांच्याच स्कूटरला कारने धडक दिली. आई वडील दोघेही खाली पडले पण गाडीवाला न थांबताच भरधाव निघून गेला. कोणीतरी मामाला फोन करून बातमी कळवली. तो तात्काळ त्या ठिकाणी पोचला पण तो येण्यापूर्वी ते दोघे जग सोडून गेले होते. माधुरीचे वडील एकटेच तिच्या मामाला आपल्या बहिणीची निशाणी म्हणून माधुरीला घरी घेऊन जाणे भाग होते. माधुरी शाळेतून येण्यापूर्वी सर्व संपले होते. आई-वडिलांचा मृतदेह पाहून माधुरीने हंबरडा फोडला. मामाने कसेबसे सावरले. थोडे दिवस मामीने प्रेमाने केले. आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर मामाने माधुरीला घरी नेले खरे पण मामीला मात्र घरकामासाठी आयती मोलकरीण मिळाली. तिने या पोरीला अनेक प्रकारे छळले. मामा ऑफिसला गेला की तिच्याकडून घरची कामे करून घ्यायची मग शाळेत जायची परवानगी द्यायची. रात्री काम आवरून तिने अभ्यासाला सुरुवात केली की मामी ओरडत येई, “लाईट बिल काय तुझा बाप भरणार?’माधुरी नाईलाजाने लाईट बंद करून झोपायला जायची. मामाच्या घरी तिला “अश्रित “हाच दर्जा मिळाला होता. राब राब राबून शिव्या खाणेच तिच्या नशिबात होते. आपल्या नशिबात आहे ते भोगायलाच पाहिजे असा विचार करून ती गप्प बसत होती आणि तोंडातून ब्र न काढता जोमाने अभ्यास करीत होती.

– क्रमशः भाग पहिला 

©  अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संस्थापक संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ५ अनुवादित लघुकथा – आणखीन एक वीरगती / विश – नवीन वर्षाची / वारसा / भीती / नात्यांचा अंत – हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी भावानुवाद – जस्मिन शेख ☆

जस्मिन शेख

🌸 जीवनरंग 🌸

☆ ५ अनुवादित लघुकथा – आणखीन एक वीरगती / विश – नवीन वर्षाची / वारसा / भीती / नात्यांचा अंत – मूळ हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी अनुवाद – जस्मिन शेख ☆

☆ १. आणखीन एक वीरगती ☆

आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर लांब सियाचीनच्या बर्फाच्छादित दऱ्याखोऱ्यांमध्ये देशाची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक सैनिकांसोबत हनमन थप्पा आपल्या धरती मातेच्या सेवेत हजर होता. काही क्षणातच डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बर्फाच्या एका प्रचंड वादळाने काही सैनिकांना आपल्या मिठीत कवटाळले. तेव्हा बर्फच त्यांचे कफन बनले, बर्फातच त्यांचे दहन झाले आणि बर्फच त्यांची कबर बनली. मग सुरू झाले ‘सर्च अभियान’! 

साऱ्या जगाने तर त्यांना मृत घोषित केले होते. परंतु हनमन थप्पा यांची पत्नी महादेवी आणि कन्या नेत्रा यांच्या डोळ्यात मात्र अजूनही आशेची किरणे चमकत होती. भारतीय नारीच्या दृढ विश्वासाने प्रेरित झालेली होती ना!

शेवटी एका पत्नीच्या अचल श्रद्धेने चमत्कार घडवला. प्रचंड बर्फाच्या खाली घुसमटून गेलेला, दबून गेलेला हनमन थप्पा जिवंत सापडला. त्याच्या पत्नीचा विश्वास बहरून आला. ती हनमन थप्पाच्या सुरक्षेसाठी देवाला साकडे घालू लागली. मग काय! पूर्ण देशात प्रार्थनेचे वादळ वाहू लागले. मंदिरातील घंटा रात्रंदिवस निनाद करू लागली. मशिदीमध्ये नमाजचे पठण होऊ लागले. चर्चमध्ये प्रार्थनांचा गजर चालू झाला. तर गुरुद्वारा मधून ग्रंथं वाचनाचा आवाज घुमू लागला. भारतीयांची ही अनोखी राष्ट्रभावना बघून अख्खे विश्व विस्मयचकित झाले. ‘मेरा भारत महान’ ही भावना सर्वांच्या मनावर विराजमान झाली. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोधैर्यही वाढू लागले.

पण म्हणतात ना ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’. शेवटी करोडोंना दुःखाच्या अंधारात लोटून एका सैनिकाला वीरगती प्राप्त झाली आणि तेव्हा भारत मातेला सुद्धा अश्रू अनावर झाले.

मूळ हिंदी कथा : सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद : जस्मिन शेख

२. विश… नवीन वर्षाची !

वर्षाची शेवटची रात्र. शर्मा साहेब कुटुंबासह हॉल मध्ये विराजमान! रात्री १२वाजण्याची उत्सुकता!आज घड्याळात बघण्याची गरजच काय? फटाक्यांचा आवाज आणि आतषबाजीनेच कळून चुकेल की गतवर्षाचे बारा वाजलेत आणि नवीन वर्षाचे आगमन झाले आहे.

शर्मा साहेब म्हणाले, ” नेहमीप्रमाणे आज सगळ्यांनी आपापली एक विश सांगायची आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी वर्षभर कटिबद्ध रहायचे आहे. ” 

शर्मा वहिनींनी सुरुवात केली, ” माझी तर अशी इच्छा आहे की माझा मुलगा शिकून डॉक्टर बनावा आणि मुलीला सुखी सासर मिळावे. “

यावर नीताने लगेच आपली इच्छा प्रकट केली, ” मी माझं शिक्षण पूर्ण करून आधी नोकरी करणार नंतर लग्न, जेणेकरून जीवनात कोणती कमतरता भासू नये. “

शर्मा साहेब आणि अखिल शांत राहीले. शेवटी एका बापाने आपली इच्छा व्यक्त केली, “माझी केवळ इतकीच मागणी आहे की, माझ्या मुलाची आणि मुलीची इच्छा पूर्ण होवो आणि माझं म्हातारपण सुखात जावो. “

आता सगळ्यांच्या नजरा अखिलकडे वळल्या. फटाके फुटू लागले, रोषणाईचे नृत्य सुरू झाले. त्यातच अखिलने धमाका फोडला, ” बाबा, मला नेता बनायचे आहे. ” बाबांना धक्का बसला. मग समजावण्याच्या सुरात म्हणाले, “बाळा, नेत्याचं जीवन विवादातच अडकलेलं असतं. न पटणा-या मूल्यांशी गाठ बांधावी लागते. आणि अनिश्चित कार्यकाळ असतो. नेता केवळ लेखक आणि मिडियातील एक व्यंगचित्रं बनून राहतं. “

– – पण अखिल आपला दृढविश्वास कायम ठेवत म्हणाला, ” नाही बाबा, या देशाला आता योग्य नेत्याची गरज आहे. जर देशच विस्कटलेला असेल तर डॉक्टर, इंजिनिअर कसे टिकतील देशात? “

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जास्मिन शेख

☆ ३. वारसा ☆

रोगशय्येवर पडून शेवटच्या घटका मोजणारा बाप आणि समोर त्याचा स्नेहकांक्षी ! बाप मनातलं बोलायला व्याकूळ आणि मुलाची ऐकण्याची तेवढीच अतुरता ! बापाने स्पष्ट शब्दात मन मोकळं केलं, “बाळा, माझ्याकडे या घराशिवाय आता काहीच शिल्लक उरलं नाही. जे काही होतं ते सगळ तुझ्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालं. आज मला अभिमान आहे की माझा मुलगा विदेशात एका मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे. बस जे काही आहे ते या कपाटात बंद आहे. “

मुलाला आश्चर्य वाटलं. लोकं मौल्यवान वस्तू एकतर बँकेतील लॉकर मध्ये ठेवतात किंवा तिजोरीत! मुलाच्या मनातील गोंधळ अचूक ओळखून त्या लेखक बाप ख-या परिस्थितीवरून पर्दा उठवत म्हणाला, “मुला, या कपाटात माझी प्रकाशित पुस्तके, अप्रकाशित साहित्य-लेखन‌, वाचक आणि लेखक मित्रांनी पाठवलेले प्रशंसापत्र आहेत. हीच माझी आयुष्यभराची पुंजी आहे. जी मी तुझ्या हाती सुपूर्द करतो. “

मुलाला माहित होते की वडिलांनी अखंड आयुष्य साहित्य सेवा केली होती. शेवटी मुलगा अभिमानाने बोलला, “बाबा, या घराला मी साहित्य संग्रहालय बनवेन, अप्रकाशित लेखन‌ साहित्य प्रकाशकाकडे पाठवेन, सर्व प्रशंसापत्रांचा एक सुंदर अल्बम बनवेन आणि तुमचे स्मृतीचिन्ह आपल्या कुटुंबाची परंपरागत संपत्ती म्हणून कायम जतन करेन. हाच माझा अनमोल वारसा आहे. “

– – – असहनीय वेदनेने त्रस्त असून ही बाबांचे डोळे आनंदाने चमकू लागले.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ४. भीती ☆

विधवा आईच्या मृत्यूनंतर शालिनीने एक खूप मोठा निर्णय घेतला की ती तिच्या लहान बहिणीला एकटी सोडू शकत नाही. तिला सोबत ठेवल्याने तिची काळजीपण राहणार नाही आणि मोहिनीला एकटेपणा छळणार नाही. पतीच्या सहमतीने तिला आणखीन बळ दिलं.

मोहिनी, ताईच्या या निर्णयाने आपले सर्व दु:ख विसरून गेली. विचार केला, ताई आणि भावजींच्या आधाराने ती तिचे भविष्य उभारण्याचा प्रयत्न करेल. शहरातील प्रत्येक दिवशी घडणा-या वाईट घटनांमुळे तिच्या मनात भयंकर भिती घर बनवत होती. तिच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. अशात ताईचे संरक्षण एक शक्ती बनून तिच्यातील भीती कमी करत होती. ती आता आनंदात होती. मनापासून ताई-भावजींची काळजी घेऊ लागली.

अचानक पोटदुखीमुळे शालिनीला दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. थोड्या वेळाने ताईच्या कुशलतेचा समाचार ऐकून तिला बरे वाटले. भावजी दवाखान्यातून कधी परत येतील कोणास ठावूक? त्यांना पण पत्नीच्या तब्बेतीची काळजी आहेच की! त्यांच्याकडे डुप्लिकेट चावी आहेच. नाहीतर सकाळी दवाखान्यात जावून भावजींना घरी पाठवते. या विचारातच शेवटी ती झोपायला गेली.

अर्ध्या रात्री कोणाच्यातरी स्पर्शाने मोहिनीला जाग आली. समोर भावजींना पाहून चाट पडली. जी भिती मरून गेली होती ती पुन्हा जिवंत होऊ लागली. घृणा अन् क्रोधाच्या आवेशाने भावजींचा चेहरा नखांनी रक्ताने माखून टाकला. जुन्या भितीने पुन्हा डोके वर काढले. ती रात्र खूप जड गेली. आता केवळ घरातील नव्हे तर अखंड जगातील भितीशी संघर्ष करण्यासाठी ती कटिबद्ध झाली. पहाटेच तिच्या पायांनी वाट धरली… गर्ल्स होस्टेलची!

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ५. नात्यांचा अंत ☆

खुशहाल वृद्धाश्रमाचा रौप्यमहोत्सवी समारंभ ! समारंभाचे प्रमुख अतिथी अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. आलोककुमार यांचे आगमन! आलोककुमार याच शहराचे रहिवासी होते. याच शहरातील गल्ली-बोळात त्यांचे बालपण व्यतीत झाले होते. त्यांना माहित होते की भारतात अनुदान देऊन सन्मान मिळवण्याची प्रथा आहे. या शहरातील एक ही वृद्ध व्यक्ती निराधार राहू नये यासाठी त्यांनी खुशहाल वृद्धाश्रमला ५० लाखांची देणगी दिली.

आता मुख्य अतिथींचे गुणगान करणे, जोरदार स्वागत करणे तसेच त्यांच्या उदारतेची प्रशंसा करणे हे तर कमिटी सदस्यांची नैतिक जबाबदारी बनते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षांनी वृद्धाश्रमातील वरिष्ठ वृद्धाच्या हस्ते श्री. आलोककुमार यांचा सत्कार करण्याचे ठरवले. जेव्हा एक वृद्ध व्यक्ती कांप-या हातात फुलांचा हार घेऊन मंचावर आली. तेव्हा आलोककुमार यांच्या चेह-याचा रंग उडाला. पण गतकाळातील सर्व दु:खांवर मौनाचे पांघरूण घालून एका बापाने आपल्या मुलाच्या इभ्रतीत मोरपीस खोवले. श्री आलोककुमार यांची मान लाजेने झुकली पण लोकांना वाटले त्यांनी सत्कारासाठी मान झुकवली.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

मिरज जि. सांगली मो 9881584475

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कृतज्ञतेचे अश्रू…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शोभा जोशी☆

शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “कृतज्ञतेचे अश्रू…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शोभा जोशी

“सरू, चाळीस वर्षं… तब्बल चाळीस वर्षं रक्ताचं पाणी केलं ग म्या या पोरांसाठी! स्वतःच्या लेकरावाणी जपलं एकेकाला. पण आज माझा शाळेतला शेवटचा दिवस होता, निरोप समारंभ तर सोडाच, पण एकानेबी साधं १ रुपयाचं गुलाबाचं फूल बी दिलं न्हाय ग. म्या काय कमी पडलो व्हतो का ग शिकवायला? का आजकालच्या पोरांच्या काळजात पाझरच उरला न्हाय?”

देसाई सर सोफ्यावर बसून लहान मुलासारखे धाय मोकलून रडत होते आणि त्यांची बायको त्यांना निमूटपणे सावरत होती.

देसाई सर… जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक. शिस्तीचे पक्के, पण मनाने मेणासारखे मऊ. हातातल्या छडीचा मार आणि डोळ्यातलं प्रेम, दोन्हीही विद्यार्थ्यांनी अनुभवलं होतं. आज ३१ मार्च. देसाई सरांच्या रिटायरमेंटचा (सेवानिवृत्तीचा) दिवस.

सकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपली जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती. “आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल… ” या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.

सर शाळेत पोहोचले. पण हे काय? शाळेचं फाटक उघडंच होतं, पण तिथे ना फुलांची सजावट होती, ना मंडप टाकला होता. पटांगण सुनं सुनं होतं. सर ऑफिसमध्ये गेले. सहकारी शिक्षकांनी “गुड मॉर्निंग सर” म्हटलं आणि आपापल्या कामाला लागले. शिपाई रामू काका सुद्धा नेहमीसारखेच चहा घेऊन आले.

देसाई सरांना वाटलं, ‘कदाचित सरप्राइज असेल. दुपारपर्यंत तयारी करतील. ‘

दुपार झाली, शाळा सुटायची वेळ झाली. पण काहीच हालचाल नाही. शेवटची घंटा वाजली. मुलं दप्तरं घेऊन पळाली. शिक्षकांनी रजिस्टरवर सह्या केल्या आणि “सर, येतो आम्ही, निवांत भेटा आता, ” असं रुक्षपणे म्हणून निघून गेले.

देसाई सर आपल्या खुर्चीतून उठले. त्यांनी त्या रिकाम्या वर्गांकडे पाहिलं. भिंतीवरचे फळे, ती बाकडी… सगळं काही शांत होतं. त्यांच्या गळ्यात हुंदका दाटून आला. “ज्या शाळेला मी मंदिर मानलं, तिथे आज माझ्या जाण्याने कुणालाच काही फरक पडत नाही?”

जड पावलांनी, मान खाली घालून सर शाळेबाहेर पडले. रस्ताभर त्यांना लोकांचे चेहरा बघवत नव्हते. त्यांना वाटत होतं, आपण आयुष्यभर फुकट राबलो. कुणालाच कदर नाही.

घरी येताना त्यांच्या डोक्यात एकच विचार चक्रावून गेला – ‘कर्ज’.

देसाई सरांनी मुलीच्या लग्नासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी बँकेतून ५ लाखांचे कर्ज काढले होते.

पेन्शनमधून अर्धे पैसे जाणार होते. म्हातारपण कसं जाईल, या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख होतं ते ‘उपेक्षेचं’.

घरी आल्यावर त्यांनी पत्नीसमोर मन मोकळं केलं आणि रडू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

सरांनी डोळे पुसले आणि दार उघडलं. समोर पोस्टमन उभा होता.

“देसाई साहेब, बँकेतून पत्र आलंय. अर्जंट आहे, सही करा. “

सरांच्या पोटात गोळा आला. ‘नक्कीच कर्जाच्या हप्त्याची नोटीस असेल. रिटायर झालो नाही तोच बँकेने तगादा लावला, ‘ असं वाटून त्यांनी थरथरत्या हाताने पाकीट घेतलं.

ते सोफ्यावर बसले आणि त्यांनी पाकीट फोडलं. आत एक बँकेचं अधिकृत पत्र आणि एक दुमडलेला कागद होता.

सरांनी बँकेचं पत्र वाचायला सुरुवात केली आणि… वाचता वाचता त्यांचे डोळे विस्फारले. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांनी चष्मा पुसून पुन्हा वाचलं.

त्यात स्पष्ट लिहिलं होतं – “श्री. देसाई सर, तुमचे घराचे ५, ००, ००० (पाच लाख) रुपयांचे गृहकर्ज आज दिनांक ३१ मे रोजी पूर्णपणे परतफेड (Nil/Closed) करण्यात आले आहे. आता बँकेची तुमच्यावर कोणतीही देणी बाकी नाहीत. “

सर गोंधळले. “हे कसं शक्य आहे? मी तर पैसे भरलेच नाहीत. “

त्यांनी तो सोबतचा दुसरा कागद उघडला. ते एक हाताने लिहिलेलं पत्र होतं.

पत्र

“आदरणीय देसाई सर,

आम्हाला माहित आहे, आज तुम्ही शाळेतून रिकाम्या हाताने आणि जड अंतकरणाने घरी गेलात. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या विद्यार्थ्यांची आठवणशक्ती कमी झाली आहे. पण सर, तुमची शिकवण आम्ही विसरलो नाही.

आम्ही सर्वांनी (तुमच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनी) मिळून ठरवलं होतं की, तुम्हाला हार-तुरे, शाल-श्रीफळ आणि पेढे देऊन तुमचा सत्कार करायचा नाही. त्या हार-फुलांची किंमत दोन दिवसात कोमेजून जाते.

त्याऐवजी आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून ‘गुप्त वर्गणी’ जमा करत होतो. त्यात आम्हां विद्यार्थ्यांसोबत शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी, शिपायांनी आणि मुख्य म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या पदावर असलेल्या तुमच्या माजी विद्यार्थ्यांनी तर खूप मदत केली. आम्हाला माहित होतं की तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझे आहे आणि निवृत्तीनंतर तुम्हाला त्याची काळजी सतावणार आहे.

म्हणून, तुमच्या निवृत्तीच्या दिवशी, आम्ही तुम्हाला ‘ताणमुक्त’ आयुष्य भेट देत आहोत.

सर, तुम्ही आम्हाला घडवलंत, आता तुमचं म्हातारपण सुखात जावं, हीच आमची खरी गुरुदक्षिणा!

तुमच्यावर प्रेम करणारी… तुमची ‘कृतघ्न’ वाटलेली पोरं!”

 

पत्राखाली शेकडो विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.

देसाई सर स्तब्ध झाले. त्यांच्या हातातून कागद गळून पडला.

तेवढ्यात घराबाहेर “देसाई सर आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणा ऐकू आल्या.

सरांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. संपूर्ण गल्लीत त्यांचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी उभे होते. कुणी ढोल वाजवत होतं, तर कुणी डोळ्यात पाणी आणून बघत होतं.

देसाई सर धावत बाहेर आले. त्यांनी कोणा एकाला नाही, तर समोरच्या गर्दीला हात जोडले आणि गुडघे टेकून जमिनीवर डोकं ठेवलं.

त्यांच्या डोळ्यातून आज दुःख नाही, तर अपार कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते.

त्यांना उमजलं होतं – ‘माणसं जोडली की पैसा गौण ठरतो. हार गळ्यात नाही, तर लोकांच्या हृदयात असावा लागतो. ‘

आज देसाई सर जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक होते.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : शोभा जोशी 

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॲटिट्यूड – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

?जीवनरंग ?

☆ ॲटिट्यूड – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

“तुझी लायकी नाहीये इथं बसायची, चल मागे जा!” लग्नमंडपात सासूने माझ्या आई-वडिलांना उठवलं… पण जेव्हा मी हातात माईक घेतला, तेव्हा नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला सिक्युरिटी गार्डने धक्के मारून बाहेर काढलं!

माझं नाव ‘स्वराली’. मी पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत ‘फायनान्शिअल ॲडव्हायझर’ म्हणून मोठ्या पदावर काम करते. माझे बाबा, ‘माधवराव’ हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि नुकतेच निवृत्त झाले होते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याची ३५ वर्षांची पुंजी, म्हणजे जवळपास ४० लाख रुपये, माझ्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले होते.

माझे लग्न ‘समीर’ नावाच्या एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाशी ठरले होते. समीरचे कुटुंब अत्यंत श्रीमंत होते. लग्नाआधीच समीरच्या आईने (माझ्या होणाऱ्या सासूने) एक अट ठेवली होती- “आम्हाला हुंडा नकोय, पण आमच्या स्टेटसप्रमाणे लग्न लोणावळ्याच्या ‘फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्येच’ झाले पाहिजे. ” मुलीच्या सुखासाठी माझ्या बाबांनी हसत हसत स्वतःचा सर्व ‘पीएफ’ (PF) आणि रिटायरमेंट फंड मोडून त्या ५-स्टार लग्नाचा सर्व खर्च उचलला.

*तो अपमानाचा प्रसंग आणि माझ्या बापाचे डोळे:*

लोणावळ्याच्या त्या आलिशान रिसॉर्टमध्ये लग्नाचा दिवस उजाडला. हॉल फुलांनी सजला होता. मी नवरीच्या वेशात स्टेजवर बसले होते आणि समीर माझ्या बाजूला होता. ५०० पाहुणे आले होते. स्टेजच्या अगदी समोर पहिल्या रांगेत ‘व्हीआयपी (VIP) सोफे’ लावले होते. माझे बाबा आणि आई तिथे जाऊन बसले, जेणेकरून त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीचे ‘लग्न आणि फेरे’ जवळून बघता येतील.

तितक्यात समीरची आई (सासूबाई) त्यांच्या श्रीमंत मैत्रिणींना घेऊन तिथे आल्या. त्यांनी माझ्या बाबांना बघितले आणि अत्यंत तुच्छतेने व मोठ्या आवाजात म्हणाल्या,

“अहो माधवराव, हे ‘व्हीआयपी’ लोकांसाठी आणि आमच्या खास पाहुण्यांसाठी सोफे आहेत. तुम्ही मुलीवाले आहात, त्यात तुमचे हे साधे कपडे या सोफ्यांना मॅच होत नाहीत. जा, तुम्ही तिथे मागच्या रांगेत जेवणाच्या काऊंटर जवळ जाऊन बसा!”

माझ्या काळजात धस्स झालं. ज्या बापाने या लग्नासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला स्टेजसमोरून कुत्र्यासारखं हाकललं जात होतं! माझ्या बाबांनी कोणताही तमाशा केला नाही… त्यांनी मान खाली घातली, हात जोडले आणि ते शांतपणे आईला घेऊन एकदम शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात जाऊन बसले.

माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. मी समीरला म्हणाले, “समीर, बघ तुझ्या आईने माझ्या बाबांचा किती मोठा अपमान केलाय. त्यांना पुढे बोलाव. “

पण समीर अत्यंत निर्लज्जपणे हसून म्हणाला, “अगं स्वराली, रिलॅक्स! आईला स्टेटस मेंटेन करावं लागतं यार. तुझे बाबा जुन्या विचारांचे आणि गरीब दिसतात, ते तिथे मागेच ठीक आहेत. तू फक्त स्माईल कर, फोटोग्राफर बघतोय!”

*तो संतापाचा स्फोट आणि माझा ‘भयंकर’ निर्णय:*

समीरचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यांतले अश्रू अचानक आटले. तिथे प्रचंड संतापाची आग पेटली. जो नवरा माझ्या बापाच्या स्वाभिमानाची किंमत करत नाही, तो आयुष्यभर माझी काय इज्जत करणार?

मी एक सेकंदही विचार केला नाही. मी नवरीचा तो जड शालू सावरला आणि स्टेजवरून थेट खाली उतरले. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. मी चालत थेट डीजे (DJ) च्या माणसाकडे गेले आणि त्याच्या हातातला *’माईक’ (Mic)* खेचून घेतला!

“सगळ्यांनी लक्ष द्या!” माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला.

मी माईकवर अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, “समीर आणि त्याच्या घरच्यांना वाटतंय की ते खूप उच्च दर्जाचे लोक आहेत आणि माझे बाबा भिकारी आहेत. बरोबर ना सासूबाई? तुम्ही माझ्या बाबांना या पहिल्या रांगेतून उठवून मागे पाठवलं… कारण त्यांची ‘लायकी’ नाहीये. तर आता सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका…

हा जो ५-स्टार रिसॉर्ट आहे, हे जे ५०० लोकांचे ५६ भोग ताटात वाढले आहेत आणि ज्या व्हीआयपी सोफ्यांवर तुम्ही तुमचा ‘माज’ घेऊन बसला आहात… त्या सगळ्याचे ‘४० लाख रुपये’ माझ्या याच गरीब बापाने भरले आहेत! तुम्ही मुलावाले म्हणून एक रुपयाचाही खर्च केला नाहीये. माझ्या बापाच्या पैशांवर फुकटची मज्जा मारायला आलात आणि माझ्याच बापाला लायकी काढताय?”

हे ऐकताच समीरच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला! समीर धावत खाली आला. “स्वराली, काय वेडेपणा लावलाय हा? माईक खाली ठेव, आमची इज्जत जातेय!” तो ओरडला.

मी थेट समीरच्या श्रीमुखात अशी एक सणसणीत चपराक मारली की त्याचा माईकवर मोठा आवाज आला!

“तुझी इज्जत? भिकाऱ्यांची कसली आलीये इज्जत?” मी गरजले. “तू आणि तुझी आई माझ्या पैशावर विकले गेलेले भिकारी आहात! आणि मी माझ्या बापाच्या पैशातून तुमच्यासारखा ‘कचरा’ विकत घेणार नाहीये. मी हे लग्न आत्ता याच क्षणी मोडत आहे!”

*पायाखालची जमीन सरकवणारा तो ‘मास्टरस्ट्रोक’:*

समीरचे वडील रागाने पुढे आले आणि म्हणाले, “तुझी एवढी हिंमत? आता बघ आम्ही काय करतो. एकदा नवरी मंडपातून परत गेली ना, की कोणताच मुलगा तुझ्याशी लग्न करणार नाही! तू आयुष्यभर कुंवारी राहशील आणि हे ४० लाख पाण्यात जातील. “

मी एक अत्यंत भेदक स्माईल दिली. मी रिसॉर्टच्या जनरल मॅनेजरला हाक मारली.

“मॅनेजर साहेब, या रिसॉर्टचे पूर्ण बुकिंग कुणाच्या नावावर आहे आणि पेमेंट कोणी केलंय?” मॅनेजरने माईकवर सांगितले, “मॅडम, सर्व ४० लाखांचे बुकिंग तुमच्या (स्वरालीच्या) अकाउंटमधून आणि तुमच्या नावावर झाले आहे. “

मी समीरच्या बापाकडे बघून हसले आणि म्हणाले,

“ऐकलंत सासरेबुवा? या रिसॉर्टची मालकीण आजच्या दिवसापुरती ‘मी’ आहे! मॅनेजर साहेब… हे समीर आणि त्याचे नातेवाईक आता माझे पाहुणे नाहीत, ते ‘घुसखोर’ (Trespassers) आहेत. तुमच्या सिक्युरिटी गार्ड्सना बोलवा आणि या समीरच्या खानदानाला पुढच्या १० मिनिटांत गेटच्या बाहेर काढा! यांच्या ताटातलं जेवणही काढून घ्या!”

पुढच्या ५ मिनिटांत जे घडलं, ते बघून सगळ्या पाहुण्यांचे डोळे विस्फारले! रिसॉर्टच्या ८-१० बाऊन्सर आणि सिक्युरिटी गार्ड्सनी समीरच्या आई-वडिलांना आणि त्यांच्या त्या गर्विष्ठ नातेवाईकांना अक्षरशः धक्के मारत, त्यांचे सामान अंगावर फेकत त्यांना रिसॉर्टच्या बाहेर हाकलून दिले! जो माज ते दाखवत होते, तो माज रस्त्यावरच्या धुळीत मिळाला होता!

तो सुवर्णक्षण आणि बापाचा सन्मान:**

मी धावत गेले आणि माझ्या बाबांना घट्ट मिठी मारली. ते ढसाढसा रडत होते. मी आई-बाबांचा हात पकडला, त्यांना अत्यंत सन्मानाने घेऊन आले आणि स्टेजवरच्या त्या दोन राजेशाही खुर्च्यांवर बसवले.

मी माईकवरून माझ्या घरच्या आणि ऑफिसच्या पाहुण्यांना म्हणाले,

“हे ४० लाख रुपये पाण्यात गेले नाहीत! आजपासून हे माझे लग्न नाहीये… तर आज माझ्या बाबांच्या *’निवृत्तीचा (Retirement) भव्य सत्कार समारंभ’* आहे! ज्या बापाने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, आज हा पूर्ण उत्सव फक्त त्यांच्या सन्मानासाठी आहे! तुम्ही सर्वांनी पोटभर जेवण करा आणि माझ्या आई-बाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या!”*

पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा असा काही कडकडाट झाला की त्याच्या आवाजाने रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या समीर आणि त्याच्या कुटुंबाचे कान फाटले असतील!

जेव्हा एखादी मुलगी रडत बसण्यापेक्षा किंवा समाजाला घाबरून अपमान सहन करण्यापेक्षा, आपल्या आई-वडिलांसाठी ‘रणचंडी’ बनते… तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला एक ‘कडक’ मेसेज जातो. आज मी कुंवारी असले, तरी मी अभिमानाने जगतेय… कारण मी एक नवरा गमावला, पण माझ्या बापाचा ‘स्वाभिमान’ जिंकला होता! खोट्या प्रतिष्ठेसाठी झुकण्यापेक्षा, मुलीने दाखवलेला हा ‘कडक ॲटिट्यूड’ आणि आई-वडिलांचा केलेला सन्मान तुम्हाला कसा वाटला?

*

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘पुन्हा एकदा ‘नीट’…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘पुन्हा एकदा ‘नीट’…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(‘टोटल आठ लाख देना पडेगा.. पर कन्फर्म करनेका पाच.. बादमे देढ.. देढ दो बार.. और ये दो दिन मे..

त्या मुलीने फोन ठेवला.. पाठोपाठ एक मेसेज आला.

त्यावर एका बँकेचा अकाउंट नंबर आणि कोडनंबर आला.

 हे सारे आठवत असताना बाहेर स्कुटर वाजली.. तिने ओळखले मुग्धा आली.. तिने गॅस बारीक केला आणि ती लगबगीने दार उघडायला गेली.) 

– इथून पुढे – – 

आईला बघताच मुग्धा धावली आणि तिने आईला कडकडून मिठी मारली..

‘आई शेवटी आपण जिंकलो.. शिरा दे आधी..

‘हो बाई.. शिरा करून तुझीच वाट पहाते आहे… सहाशेच्या वर निश्चित ना? कारण त्या मुल्लाना अजून दिढ द्यायचे आहेत..

‘हे शेवटचे ना आई? आणि नाही दिले तर?

‘अग त्या लोकांचे हात वरपर्यत पोचलेले असतात.. ते पासाचे नापास करू शकतात.. सारी यंत्रणा पोखरली आहे ग यांनी..

‘पण आता हे पैसे कसे जमवणार?

‘मुग्धा.. बाबांना लपवून पैसे उभे करणे सोपे नव्हे. मी हे सर्व माझ्या जबाबदारीने तुझ्यासाठी केल… बाबांनी पैसे खाल्ले असते तर असे पैसे सहज देता आले असते.. पण तुझे बाबा म्हणजे तत्वाचा माणूस.. पहिले पाच लाख देताना आईने लग्नात घातलेल्या बांगडया विकल्या.. मग दिढ लाख देताना चेन विकली.. आता पाळी या पाटलीची..

‘पण आई.. बाबांना कळले नाही ना अजून?

‘त्यांचे माझ्या दागिन्याकडे लक्षच नसते.. त्यांची पुस्तके आणि वाचन.. डुप्लिकेट दागिने घालून सध्या मी मिरवते आहे..

‘आई.. तू काळजी करू नकोस.. मी फक्त डॉक्टर होउदे.. तुझे सर्व दागिने परत तूझ्या गळ्यात घालते कीं नाही बघ..

‘हो ग बाई.. तू मोठी हो. स्वतः पैसे मिळव.. आमच्यासारखे नवऱ्यावर अवलंबून राहू नकोस..

‘बघच आई… मी किती पैसे मिळवते ते..

दोघी शिरा खाता खाता बोलत होत्या.

आपली सोन्याची पाटली विकून मंजुने मुल्लासरांचे पैसे पुरे केले. पुन्हा एकदा डुप्लिकेट पाटली तिच्या हातात आली.

रिझल्टला वेळ असल्याने मुग्धाने नॉर्थ ईस्टची ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. तिच्या बाबांनी आनंदाने सर्व खर्च केला.. ट्रिपचे फोटो ती आईबाबांना पाठवत होती आणि प्रत्येक ठिकाणची वर्णने पण टाकत होती.

मुग्धाला फिरायला, ट्रेकिंग करायला फार आवडे.. पण शाळेचा आणि मग नीट परीक्षेचा अभ्यास असल्याने तिला हा छंद बाजूला ठेवायला लागला होता.

मंजू आनंदात होती.. मुग्धा ट्रिप एन्जॉय करत होती.. आता काही दिवसात नीट परीक्षेचा निकाल लागायचा होता.. त्यात ती सहाशेच्यावर स्कोर करणार होती.. मग टॉप मेडिकल कॉलेजमध्ये किंवा एम्समध्ये तिला ऍडमिशन मिळणार होत…. पण?

अचानक टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या..

“नीट परीक्षेत गडबड… सरकारने परीक्षा रद्द केली.. पुन्हा नीट परीक्षा होणार.

मुग्धाने मोबाईलवर ही बातमी वाचली. तिच्या काळजात धस्स झाले.. तिने टीव्ही लावला.. तीच बातमी होती.

एव्हड्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला..

‘नीट परीक्षा रद्द केल्याची बातमी आहे… परत परीक्षा होणार आहे.. मुग्धाला फोन करून सांग आणि बोलावून घे..

‘हो. हो.. बोलावते तिला..

धडधडत्या काळजाने तिने उत्तर दिले.

तिने माधवला फोन लावला.. कारण नीटसाठी त्यानेच फिल्डिंग लावली होती… माधवचा फोन बंद होता.. तिने त्याच्या बायकोला म्हणजे मधूला फोन लावला.. तिचाही फोन बंद.. तिने माधवच्या शेजाऱ्यांना फोन लावला.. त्यांनी सांगितले.. काल पासून त्यांचे घर बंद आहे.. बरीच लोक त्यांना शोधत आहेत.

मंजुने रडत रडत मुग्धाला फोन लावला..

‘अग बाई.. नीट परीक्षेतील घोटाळा बाहेर आला आहे..

तिकडे मुग्धाला धक्का बसला.

किंचाळून तिने विचारले..

‘काय? घोटाळा बाहेर आला? परीक्षा रद्द? परत परीक्षा होणार? अरे देवा.. मला मग मेडिकल विसरायला हवं..

‘अग गधडे.. या तूझ्या नीट पायी माझे दहा लाखाचे दागिने विकले.. त्या माधवच्या नादाला लागून, आता तो आणि मधू नाहीसे झालेत.. तू ताबडतोब इकडे ये बघू.. मला कस तरी होतंय.. बर हे मी नवऱ्यापासून दडवून केलंय..

टीव्हीवर बातम्या येत होत्या.. भारतभर छापे टाकणे सुरु होते. सी बी आयकडे प्रकरण गेले होते.. पेपर फोडणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतले जात होते.. आणि मुल्लाला अटक झाल्याची बातमी आली.. एकएकजण ताब्यात येत होता..

दोन दिवसांनी मुग्धा घरी आली. आल्या आल्या रडायला लागली..

‘आई.. मी किती स्वप्न पाहिलं होत माहित आहे… मी मोठी डॉक्टर होणार होते.. मोठं हॉस्पिटल बांधणार होते.. मोठी गाडी…

चिडून मंजू ओरडली..

‘जळूदे तुझं हॉस्पिटल.. आणि गाडी.. स्वतः अभ्यास करायचा नाही.. आणि डॉक्टर व्हायचंय तुम्हाला… तूझ्यापायी माझ्या नवऱ्याशी खोटे बोलले मी… त्याला न सांगता दागिने विकले आणि लंकेची पार्वती झाले.. तुम्हा मुलांना फक्त डॉक्टर व्हयचंय असत किंवा इंजिनीरिंग किंवा शासकीय अधिकारी.. बस्स.. खूप पैसे मिळवायचे असतात.. त्यासाठी आम्हा पालकाचा बळी जातो.. तूझ्या हट्टापायी मी माधवला शब्द टाकला आणि त्याने असा अघोरीं मार्ग सांगितला. माझीच चूक झाली.. मी एका चरित्र्यवान सरकारी अधिकाऱ्याची बायको आहे.. हे मी विसरले… आता सीबीआय चौकशी करते आहे.. पेपर फोडणारे शिक्षक, क्लासवाले सापडले आहेत.. मुल्लाला पकडले आहे.. कदाचित मुल्लाकडे कुणाकुणाला पेपर दिलेत.. याची लिस्ट मिळाली तर..

भोवळ येऊन मंजू खाली कोसळली आणि मुग्धा.. ‘आई, आई करत.. धावली.

सीबीआयने नीट परीक्षा गैरव्यवहाराची पाळेमूळे खणली.. मुल्लाचे सर्किट सापडले… माधवला अटक झाली..

दुसऱ्या दिवसाच्या पेपरमध्ये आणि चॅनेलवर ठळक बातमी होती..

‘नीट परीक्षेतील गैरव्यव्हार पैकी मुख्य आरोपी मुल्ला कडून पैसे देऊन आपल्या मुली साठी पेपर मिळविल्याबंद्दल नायब तहसीलदाराला अटक आणि नोकरीतून बडतर्फ…

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘पुन्हा एकदा ‘नीट’…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ ‘पुन्हा एकदा ‘नीट’…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

मुग्धाची आई मंजुश्री मुग्धाची वाट पहात होती. मुग्धा नीट परीक्षा द्यायला सेंटरवर गेली होती. तिला अंदाज होताच.. मुग्धा हसत हसत येणार, कारण तिने फिल्डिंगच तशी लावली होती. तिच्या नवऱ्याचा मध्येच फोन आला..

‘काय आली काय मुग्धा?

‘नाही अजून.. हॉलच्या बाहेर आली कीं लावेल फोन..

एवढ्यात मंजूला मुग्धाचा फोन येतो आहे असे दिसलें…

‘तिचा फोन येतो आहे.. मग करते मी फोन तुम्हाला..

असे म्हणून मंजुने मुलीचा फोन घेतला…

‘बोल ग. कस काय?

‘येस मम्मा.. शंभर टक्के..

‘सेम टू सेम काय?

‘केमिस्ट्री, झुलॉजी सेम.. बायोमध्ये थोडे बदल होते.. पण सहाशेवर निश्चित..

‘देव पावला.. तू लवकर घरी ये.. पण बाबांना काही बोलू नकोस.. त्याना फक्त पेपर सोपे गेलेत म्हणून सांग.

‘त्याना मी कशी सांगेन ममा.. तू माझ्यासाठी शिरा करून ठेव, तोपर्यंत मी पोचतेच..

मंजूला समाधान वाटलं.. गेले वर्षंभर टेन्शन होत.. गोलमाल करायला लागलं आणि ते सुद्धा नवऱ्यापासून लपवून.

मंजुने नवऱ्याला फोन लावला.

‘अहो.. मुग्धाचा फोन आलेला.. खूष आहे ती.. सहाशेवर निश्चित म्हणते आहे..

‘कमाल आहे… कधी फारसा अभ्यास करताना दिसत नव्हती आणि मूळची पण हुशार नव्हे.. तरी म्हणते सहाशेच्यावर?

‘अहो.. क्लासमध्ये अभ्यास करायची, घरी करत नसेल कदाचित..

‘बर बर.. म्हणत मुग्धाच्या बाबांनी फोन ठेवला.

तेव्हडयात मंजूच्या लक्षात आले.. माधवला म्हणजेच तिच्या भावाला फोन करायला हवा, त्यानेच तर हे घडवून आणले..

तिने तिच्या भावाला.. माधवला फोन लावला.. पण तो बिझी येत होता.. तिच्या लक्षात आले, माधवला अनेकांचे फोन येत असणारं, आपल्यासारखे अनेकजण त्याच्या लिस्टमध्ये असणारं..

लेकीने गोड शिरा करायला सांगितलं हे मंजुच्या लक्षात आले.. गाणे गुणगुणत ती किचनमध्ये आली.. तिने रवा बशीत घेतला, निवडून घेतला.. एका पातेल्यात तूप ओतलं आणि गरम करायला घेतल, एव्हड्यात माधवचा फोन आलेला तिला दिसला..

‘काय मंजू.. खूष ना?

‘होय रे बाबा.. मुग्धाने फोन केलेला.. सहाशेच्या वर जाईन म्हणते आहे..

‘निश्चित जाईल, म्हणजे ज्या मुलांना नोट्स मिळाल्यात.. ती सर्वच मुलांची मेडिकल ऍडमिशन पक्की.

‘हो.. बर झालं बाबा… तू त्या मुल्लासरांची गाठ घालून दिलीस, नाहीतर मुग्धा मेडिकलला जाऊ शकली नसती.

‘हो ताई.. बर आठवलं.. त्या मुल्लासरांना अजून दिढ लाख दयायचे आहेत, लक्षात आहे ना..

‘हो.. नवऱ्याला न सांगता पैसे जमवणे फार कठीण असते रे माधव, विशेष करून नोकरी न करणाऱ्या बाईला.. बांगडया गेल्या आता पाटल्या..

‘पण भावोजीना कळले नाही ना अजून?

‘माधव, डुप्लिकेट दागिने कोस्मेटिक्सच्या दुकानात मिळतात ते एव्हडे ओरिजिनल सारखे दिसतात… बायका फसतात तेथे पुरुष फसयला काय?

‘हो ग.. आणि एकदा मुग्धा डॉक्टर झाली कीं खोऱ्याने पैसे मिळवील.. मग हवे तेव्हढे खऱ्या सोन्याचे दागिने कर..

खळखळून हसत मंजुने फोन ठेवला.

शिरा करता करता मंजू विचार करत होती.. ‘आपली एकुलती एक लाडकी मुलगी, आपली आणि तिची पण इच्छा, तिने डॉक्टर व्हावे, साधे नव्हे.. सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर.. ज्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंटशिवाय भेटता येत नाही.. अशी डॉक्टर.. पण.. मुग्धा फारशी हुशार नव्हती, म्हणजे दहावीत तिने मिळविले नव्वत टक्के.. पण सध्या नव्वद टक्के म्हणजे काय.. सर्वांनाच मिळतात.. पण मेडिकलला ऍडमिशन म्हणजे, त्यात नीट परीक्षा. ?.. त्याचा अडथळा कसा पार करणार? त्या परीक्षेत साडेपाचशेपेक्षा मार्क्स हवेत.. देशात वीस लाख मुले ही परीक्षा देतात.. त्यात मुग्धा कुठे बसणार? काही लोक पैसे भरून ऍडमिशन घेतात म्हणे.. बरेच डॉक्टर्स लोक आपल्या मुलांना पैसे भरून कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेतात.. पण आपला नवरा असे कदापि करायचा नाही.. नायब तहसीलदार आहे पण पाच पैसे लाच घेणार नाही.. सारे नियमाला धरून..

या विचारात असताना आपला भाऊ.. माधव, एकदा घरी आला असताना मी त्याला म्हंटले..

‘माधव.. मुग्धाला मेडिकलला जायचे आहे रे, पण..

‘पण काय?

‘ती फारशी हुशार नाही रे आणि तिला अभ्यासाचा कंटाळा.. नीटची परीक्षा असते ना..

‘अग नीटच्या परीक्षेचेचे टेन्शन घेऊ नकोस… तुला काय वाटते गेल्या काही वर्षात जे मेडिकलला गेलेत ते खरेच हुशार होते.. त्यातील काही हुशार होते हे खरे.. बाकी..

‘बाकी काय?

‘ पैसे मोजले तर प्रश्न दोन दिवस आधी कळतात.. तशी रॉकेट्स सुरु आहेत..

‘काय सांगतोस?

‘तस हे सर्वांनाच सांगत नाही मी.. फक्त जवळच्या माणसांना.. उघड झालं तर सगळे आत जातील.. मी मुग्धासाठी प्रयत्न करतो.. पण बारा पंधरा लाख तरी दयायला लागतील आणि गुपित ठेवावे लागेल.. भावोजीना मात्र सांगू नकोस.

शिरा करता करता मंजू मागील आठवत होती. बारावी परीक्षा झाली आणि एक दिवस माधवचा फोन आला..

‘ताई.. मी व्यवस्था केली आहे, पण या कानाचे त्या कानाला कळता नये.. नाहीतर सगळे आत जातील.. केमिस्ट्री आणि झुवोलोजीचे पेपरसेटर कळले आहेत.. मुल्ला नावाचा माणूस आहे नागपूरचा.. तो फिल्डिंग लावतो आहे.. आता त्याचा तुला डायरेक्ट फोन येईल.. ओके..

मंजू आठवू लागली…

आणि अचानक एकदा एक अनोळखी नंबरवरुन कॉल आला..

‘आप मंजुजी हैं?

‘हा..

‘मैं मुल्लासरके ऑफिससे बात कर रही हूं..

‘हा..

‘माधवसरने आपको बोला होगा..

‘हा..

‘यदी आप इंटरेस्टेड हैं.. तो मैं मेसेज करती हूं.. वो नंबरपर फाईव्ह पेटी जमा करो.. और मुझे उसका स्क्रिनशॉट भेंजो..

‘पाच लाख.. ?

‘टोटल आठ लाख देना पडेगा.. पर कन्फर्म करनेका पाच.. बादमे देढ.. देढ दो बार.. और ये दो दिनमे..

त्या मुलीने फोन ठेवला.. पाठोपाठ एक मेसेज आला.

त्यावर एका बँकेचा अकाउंट नंबर आणि कोडनंबर आला.

 हे सारे आठवत असताना बाहेर स्कुटर वाजली.. तिने ओळखले मुग्धा आली.. तिने गॅस बारीक केला आणि ती लगबगीने दार उघडायला गेली.

– क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चौफुला… – भाग – २ ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ चौफुला… – भाग – २ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

(आत्ताच्या जमान्यात आपण हौसेने घेतलेली मग मोठी तांब्या पितळेची भांडी निरुपयोगी आहेत हे तर खरंच. नूतनचीही आता साठी होईल. तिची सून सुजाता अगदी टापटीपीची आहे. नूतनचा नातूच आता वर्षाचा होईल.) – इथून पुढे – – 

सुजाताचं नाव निघाल्यावर मागच्या वर्षीचा प्रसंग आठवून त्या तिघी हसू लागल्या. सुजाताच्या डोहाळे जेवणासाठी म्हणून वत्सला नूतनकडे गेली होती. डोहाळे जेवणाच्या दुसऱ्या दिवशी जरा पाय मोकळे करायला, देवळात जायला म्हणून वत्सला बाहेर गेली तर वेड्यावाकड्या उंच स फुटपाथ वर अडखळून पडली. हाताला थोडं फ्रॅक्चर झालं. नातवानं आजीला घराजवळ असलेल्या नर्सिंग होम मध्ये दाखल केलं होतं. डॉक्टर ओळखीचे होते या ८० च्या जवळ आलेल्या आजींच्या हाताला प्लास्टर घालायचा आधी केलेल्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्याच पाहून डॉक्टरांनीच आजींचं अभिनंदन केलं होतं. चार दिवस तिथे नर्सिंग होम मध्येच राहायचं ठरलं.

वत्सला पुढे म्हणाली, हॉस्पिटलमध्ये चार दिवस आणि नूतनकडे जेमतेम चार-पाच आठवडे काढून प्लास्टर काढल्यावर नूतनला इकडेच पोचवायला लावलं मला. आपल्याच मठीत बरं वाटतं ग!तुम्ही तिघी आणि बाकी इथली नेहमीची सगळी माणसं होती मदतीला. छान बरी झाले लवकर. एक सांगू का आपल्याच दुखण्याचा बाऊ करत बसायचं नाही. सोशिकपणे गुपचूप झोपून चांगली विश्रांती घ्यायची. आपलं आपल्याला आतून बरं करण्याची उमेद धरायची म्हणजे चटकन बरं वाटतं. मुक्या जनावरांच्या दुखण्याखुपण्याला कोण असतंय? त्यांची ती नैसर्गिक बरी होतात. तसंच! 

हो ग अगदी बरोबर बोललीस. आणि खरं सांगू का आता आपल्याला एकटं स्वतंत्र राहायची सवय झालीय. ते सकाळी उठून भांड्यांचे आवाज, कुकरच्या शिट्ट्या, लहान मुलांचे हट्ट, रडणं काऽऽही नको वाटतं आता. इंदू म्हणाली.

पण आता दोन-तीन वर्ष तरी म्हणजे हे नवीन बांधकाम होईपर्यंत आलटून पालटून मला सुरेश आणि साधनाकडे राहावं लागेल. ती दोघं आणि त्यांच्या घरची अगदी अगत्यानं करतात आणिआता आपलं तरी काय? आपल्यानंतर ही नवी जागा आपल्या वारसांनाच मिळणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी या जागेसाठी किडूकमिडूक विकून शिल्लक खर्ची घालून इथे पैसे भरायचा धीर केला म्हणून हे दिवस दिसत आहे. आपण दोघींनी लाडू पोळ्या करून विकल्या. सुशीनं कॉलनीतील नोकरी करणाऱ्या लेकीसुनांची मुलं सांभाळली म्हणून आपल्या मुलांचे शाळा कालेज क्लासेस सारं निभावलं. बाबी तर काय वधू वर मंडळ, महिला मंडळ, सगळे उत्सव, साऱ्यांमध्ये मदतीला तत्पर! मुलं-मुली चांगली निघाली हे मात्र आपलं नशीब.

तेवढ्यात फोन वाजलाच. सुशील तिच्या पंचाहत्तरीची तारीख सांगितली. मग लता म्हणजे सुशीची मुलगी बोलली. या तिघी मावशींनी आठ दिवस तिच्याकडे राहायचं आमंत्रण दिलं. आणि सांगितलं की तुमच्यासाठी सिंगापूर ट्रीपची चौकशी करून आले. आता तुम्हाला बिल्डरकडून ॲडव्हान्स भाडं मिळेल. जरा मजा करून या चौघी मैत्रीणी. वत्सला तिला म्हणाली, अगं तुझी कल्पना छान आहे पण झोपेलाना आम्हाला ते सगळं, तो विमान प्रवास ?

झकास झेपेल. आयुष्याचा प्रवास कणखरपणे केलात. आता ही मजेची ट्रीप करून या चौघी मैत्रिणी. लता म्हणाली. वत्सलानाने बाबीजवळ फोन दिला. तर बाबीने खुसूखुसू हसत, बरं बघूया तिकडे आल्यावर. असं म्हणून फोन बंद केला.

अगं काय झालं, काय म्हणत होती लता या दोघींच्या उत्सुक प्रश्नावर बाबी म्हणाली लता म्हणते ट्रिपमध्ये तुम्ही पंजाबी ड्रेस घाला. त्याचीही खरेदी करूया इकडेच. इंदू म्हणाली, अगं बाकी सगळ्या पॅन्टीत असतील मग आपण कशाला काकुबाई राहायचं असं वाटत असेल तिला. आठवतंय ना आपण नऊवारीतून सहावारीत आलो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला आणि बाकीच्यांनाही अवघड वाटत होतं मग झाली सवय आणि आता नाटक सिनेमाला जाताना, गाण्याच्या, व्याख्यानांच्या कार्यक्रमाला जाताना तेच बरं वाटतं.

आणि रात्री घालायला गाऊन घ्यायचे का? फार धुणंपाण्याची कटकट नको. मागच्या वर्षी माझं हाताचं ऑपरेशन झालं ना तेव्हा नूतनन गाऊनच दिले होते घालायला. बरं वाटतं सुटसुटीत आणि मोकळं.

समोरून निर्मलाला येताना पाहून त्या तिघी बोलायचं थांबल्या. तिच्याजवळच्या पिशवीतून डब्यातल्या बटाटेवड्यांचा खमंग वास येत होता. आजी आज इकडे कशा बसलात? घेता का बटाटेवडा? झकास झालाय बघा.

एकच प्लेट पुरे. काल रात्री जरा पोटात खुटखुटत होतं. घेतला लगेच ओवा आणि गरम पाणी इंदू म्हणाली. आणि हे तेलकट आत्ता खाल्लं की रात्री घशाशी येतं बाबी म्हणाली.

आता बारा रुपये प्लेट केली बरं का आजी. सगळ्या वस्तू खूप महाग झाल्या आहेत पैसे घेऊन निघताना आ निर्मला म्हणाली. बघते अजून थोडं फिरून. थोडेच उरलेत वडे.

निर्मलाला या चौघींबद्दल कृतज्ञ आदर होता. त्यांनीच निर्मलाला हा मार्ग सुचवला होता. शिवाय पुरणपोळी, मोदक यासारखे पदार्थ निगुतीने करायलाही शिकवले होते. आता त्या कॉलनीत निर्मलाला ऑर्डर्सना तोटा नव्हता. नवऱ्याच्या साध्या नोकरीला ही जोड मिळाली. तोही जमेल तशी मदत करीत असतो. शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन्ही मुलांच्या क्लासेसची फी भरायला आता निर्मलाला जड जात नव्हतं. या आजींची तिला शिकवण होती की कॉलनीत सगळेच ओळखीचे पण व्यवहाराला पक्कं रहायचं. अगदी आमच्याकडूनसुद्धा त्याच भावाने पैसे घ्यायचे. पदार्थाची चव आणि रंग छान पाहिजे. बाजार भाव पाहून त्यापेक्षा थोडी कमी किंमत ठेवायची हा गुरूमंत्र निर्मला कसोशीने जपत होती. निर्मलाकडून घेतलेली वडा प्लेट चविष्टपणे खाता खाता पुन्हा तिघींची चर्चा सुरू झाली.

पुण्याला जायला टॅक्सी सांगायची ना आपल्या कॉलनीतल्या निलेशची? इंदूने विचारले. हो चालेल. पण मला वाटतं लता म्हणते म्हणून एखादा ड्रेस घ्यावा. बाकी आपल्या छान छान साड्या नेसूया. ड्रेसची सवय नाही आपल्याला. उगीच अवघडल्यासारखं वाटून ट्रीपची मजाच जायची.

खरंय तुझं! बाबी म्हणाली. आपण असं करू. सिंगापूरहून आल्यावर दुसऱ्या ट्रिपला जायच्या आधी पंजाबीची प्रॅक्टिस करू. बाबीच्या या मिश्किल बोलण्यावर तिघी हसत उठल्या. काळोख पडायला लागला होता. सांजवात लावून स्तोत्र म्हणेपर्यंत टीव्हीवरच्या त्या रोजच्या मालिका सुरू होतील. मग उद्या नेहमीच्या बाकावर बसून आल्यागेल्याशी बोलताना कुठल्या मालिकेला कुणाला नावाजायचं आणि कुणाला नावं ठेवायची ते ठरवता येईल. रात्रीसाठी एखादं थालीपीठ करावे की दोन आंबोळ्या कराव्या की डाळ तांदुळाची खिचडी करावी याचा विचार चालता चालता त्यांच्या मनात घोळत होता.

समाप्त

© पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चौफुला… – भाग – १ ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ चौफुला… – भाग – १ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

आज संध्याकाळी कॉलनीमध्ये नेहमीच्या बाकावरू न बसता त्या तिघींनी जरा मागच्या बाजूच्या एका कडेच्या बाकावर बसायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे बाबी आणि वत्सला त्या बाकावर बसून इंदूची वाट पाहत होत्या. इथे मागच्या बाजूला बांधकामाच्या सामानाचा जास्त पसारात पडलेला दिसत होता. त्या जुन्या कॉलनीतल्या बिल्डिंग पाडून नवीन टॉवर्स बांधण्याचं काम जोरात चालू होतं. एक दोन महिन्यात उरलेल्या सगळ्यांनी जागा रिकाम्या करून द्यायच्या होत्या. बिल्डर बरोबरच्या कराराप्रमाणे त्यांना दोन-तीन वर्षासाठी भरपूर भाडेही मिळणार होते.

समोरून हातात भाजीची पिशवी घेऊन इंदू इकडेच येताना दिसली. येता येता बघितलं तुझ्या घराकडे तर कुलूप होतं. कुठे गेली होतीस आत्ता? 

बाबीन विचारलं.

अगं बदाम संपले होते ना ते आणले. येताना अंबाडी ताजी दिसली म्हणून घेतल्या दोन जोड्या. तू सांगितल्याप्रमाणे गेली काही वर्ष मी नियमानं रोज रात्री दोन बदाम भिजत टाकते आणि सकाळी नाश्त्याचा वेळी दुधाबरोबर दोन बदाम आणि दोन खजुराचा बिया खाल्ल्या की खरंच बरं वाटतं.

होऽऽ ना! मी सुद्धा तो नियम चुकविला नाहीये बाबीनं सांगितल्यापासून. वत्सला म्हणाली.

किती वाजले ग? आता पंधरा वीस मिनिटात येईल सुशीचा फोन पुण्याहून बाबी म्हणाली आणि गळ्यातल्या लांब दोरीच्या छोट्या पिशवी ठेवलेला मोबाईल, आज सकाळी आठवणीने चार्ज करून ठेवलाय, असं म्हणून तिने तो बाहेर काढला.

बाबी, वत्सला इंदू आणि सुशी या चौघींचा छान जमलेला गोफ, गेली अनेक वर्षं कॉलनीच्या परिचयाचा होता. या चौफुल्यापैकी आता सुशी दोन-तीन वर्षासाठी पुण्याला लेकीकडे राहायला गेली होती. या चौघींमध्ये लहान असलेल्या सुशीची पंचाहत्तरी साजरी करायची होती. त्यासाठी जर्मनीहून मुद्दाम आणि तिच्या मुलगा, सून, नातवंड येणार होती. हॉलची तारीख बहुतेक आज नक्की होईल. उद्या संध्याकाळी फोन करते तुम्हांला तिघींना. असा सुशीचा काल बाबीला फोन आला होता म्हणून त्यांनी आज जरा नेहमीपेक्षा वेगळी जागा बसण्यासाठी ठरवून ठेवली होती.

तशी बाबी आता एकटीच! या कॉलनीत राहायला येऊन चाळीस वर्ष होऊन गेली होती. मूलबाळ झालं नाही. पण नवऱ्याचं मिळकतीत व्यवस्थित संसार करताना कधीही कपाळावर आठी नाही की तोंड आंबट नाही.

सासर माहेर साऱ्यांना धरून होती. जरूर असेल तेव्हा त्यांच्या मुला बाळांच्या कार्यातून हौसेने मदत करीत होती. म् हसतमुख राहण्यामुळे दामोदरपंतांचे शेवटले आजारपण तिने सगळ्यांच्या मदतीने निभावलं. त्यानंतर नेत्रा, तिच्या धाकट्या बहिणीची मुलगी किती आग्रहाने तिच्याकडे राहायला बोलावीत होते. पण या तिघी सख्या मैत्रिणींच्या सांगण्याप्रमाणे तिने एकटीनेनेच राहण्याचा निर्णय घेतला. अधूनमधून कुणी काही निमित्ताने बोलावलं तर चार दिवस जायचं. परत आपल्या या दोन खोलांच्या स्वतंत्र जगात परतायचे तेच छान वाटत होतं. आणि पंचाहत्तरी होऊन गेली तरी प्रकृतीही तशी खणखणीत होती.

दोन-तीन महिन्यांपूर्वी सुदिप वाढदिवस होता म्हणून नेत्रा बाबीमावशीला आग्रहाने तिच्याकडे घेऊन गेली होती. बोलता बोलता नेत्रा म्हणाली, मावशी, सुदीपला मोदक खूप आवडतात पण मला नाही बाई जमत तो पसारा.

हात्तीच्या! सोप्प काम आहे. करूया आपण मोदक.

अगं पण, भाचीला मध्येच तोडंत बाबीमावशी म्हणाली, तुझी कामवाली देईल ना दोन नारळ खरवडून? मी दाखवते तसं तू पुरण कर आणि मोदकाची चांगली पिठी मिळते ती घेऊन ये की झालं.

सुदिपच्या वाढदिवसाच्या दिवशी उकडीवर वाफेसाठी झाकण टाकल्यावर बाबी मावशीनं स्वयंपाक घराचा तो लांबट ओटा मोकळा करून घेतला. स्टुलाच्या मदतीने पटकन ओट्यावर चढून बसलेल्या बाबी मावशीकडे नेत्रा पाहतच राहिली. मोदकाच्या पारीला सारख्या अंतराने चुण्या घालत होती. ते बघताना नेत्राला लहानपणी ती सुट्टीत बाबी मावशीकडे राहायला जायची तेव्हाची आठवण झाली. घरदार लख्ख , करणंसवरणं सगळं नीटनेटकं. दुपारचा चहा झाला की ती आरशाफणीची पेटी घेऊन बसायची. मग नेत्रा तिच्याकडून दोन झकास पाच पेडी वेण्या घालून घ्यायची. बाबीमावशी अंबाडा घालून त्यावरून बारीक जाळी घालून आकड्याने बसवायची. तोंड धुवून हलकीशी पावडर लावली की, पेटीतल्या डबीतल थोडं मेण कुंकवाच्या जागी लावायची. पेटीमध्ये स्टोव्हच्या पिनेचा गोल भोक असलेला मागचा अर्धा भाग ठेवलेला होता. ते गोल भोक मेणावर ठेवून आरशात बघत ती त्यावर लाल गोल पिंजर लावी ते बघायला नेत्राला फार आवडत असे.

आत्तासुद्धा तिने केलेले चुणिदार पाकळ्यांचे, उंचेल्या नाकाचे सारखे मोदक इतके छान दिसत होते की तिने नवऱ्याला आणि सुदीपला मुद्दाम हाका मारून ते दाखवले. दहावीत गेलेल्या सुदीपने चटकन त्याच्या मोबाईलवर मावशीआजीचा मोदकांसकट छान फोटो काढला. नेत्राने फ्रेम करून दिलेला तो फोटो बाबी मावशीनं हौसेने घरात टेबलावर ठेवला होता. नेत्राने एकीकडे गॅसवर मोदक उकडायला आधण ठेवलं आणि दुसरीकडे आठवणीने घरचं लोणी कढवत ठेवलं. ही सुद्धा बाबी मावशीची शिकवण. मोदक पुरणपोळ्या असा बेत असला की त्याच दिवशी कढंवलेलं घरचं ताजं तूप पाहिजे. सुदीपला साजूकतूपा बरोबर भरपूर मोदक खाताना पाहून दोघी खुश झाल्या.

यावेळी मात्र नेत्राने बाबी मावशीचं न ऐकता नवऱ्याला मावशीसाठी सेल फोन आणायला सांगितला. अगं एक फोन घरात असताना हा कशाला दुसरा ?

तुझ्या गळ्यात घालायला. नेत्राने हसतच सांगितलं.

अगं , कधी कधी तू कुठे आहेस, कशी आहेस काहीच कळत नाही. एवढ्या लांबून पटकन उठून येता येत नाही. आणि आले तरी तू भेटशील याची खात्री काय? असू दे हा फोन. आठ दिवसांमध्ये सुदीपने आजीला हा फोन कसा वापरायचा, कसा चार्ज करायचा ते शिकवून प्रॅक्टिस करून घेतली. बाबी मावशीला आता या फोनची थोडी सवय झाली होती. आणि त्याचा उपयोगही लक्षात आला होता.

बाकावर बसून सुशीच्या फोनची वाट पाहत गप्पा चालू होत्या. वत्सला म्हणाली, मी उद्या मोडवाल्याला बोलावलं आहे. आपल्यालासुद्धा आता इथलं हळूहळू आवरायला घ्यायला हवं. नूतनने बजावलं आहे की तिच्याकडे राहायला जाताना अगदी कमीत कमी सामान बरोबर आणायचं म्हणून माळ्यावरची ती सगळी अडगळ देऊन टाकायला सांगितलय तिनं. आत्ताच्या जमान्यात आपण हौसेने घेतलेली मग मोठी तांब्या पितळेची भांडी निरुपयोगी आहेत हे तर खरंच. नूतनचीही आता साठी होईल. तिची सून सुजाता अगदी टापटीपीची आहे. नूतनचा नातूच आता वर्षाचा होईल.

– क्रमशः भाग पहिला 

© पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक होती नलू…” ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ “एक होती नलू…” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

ही कथा आहे नलू परटिणीची. माझ्या लहानपणी आमच्या घरी नलू कपडे धुण्यासाठी यायची. नवी नवरी असताना ती आपला सासरा मारुती याच्या बरोबर यायची. मारुती न चुकता मंगळवारी भट्टीचे कपडे घेऊन यायचा, अगदी म्हातारा झाला तरी एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात भट्टीचे कपडे बांधलेले गाठोडे असायचे. या मारुतीची सून नलू. मारुतीला स्वतःची मुलगी नसल्यामुळे तो नलूची लेकी प्रमाणे काळजी घ्यायचा.

नऊवारी साडी, डोक्यावर भुरक्या रंगाचे केस, कपाळावर रुपया एवढे कुंकू आणि, हसतमुख चेहरा अशी नलू आमच्या घरी आली की आम्हाला खूप मजा वाटायची. माझं तर “ताई ताई “करून कौतुक करायची. अशी मनमिळावू नलू मला खूप आवडायची. पण बिचारीच्या नशिबाला फक्त कष्ट आणि कष्टच होते. तिचा दारुडा नवरा रोज संध्याकाळी दारू ढोसून यायचा आणि तिला बुकलायचा. या मुलीने काय काय सोचले! व्यसनाच्या काळात जे होते ते सर्व. मारहाण, शिवीगाळ, माहेरचा उद्धार. पण अपार कष्ट करूनही कायम हसतमुख असायची.

ती आमच्या घरी कपडे न्यायला आली की साबण चुरा घालून कपडे भिजवायची आणि नदीवर धुवायला जायची. नदीच्या खळखळत्या पाण्यात कपडे धुऊन, पांढऱ्या कपड्यांना नीळ घालून कपडे वाळवून संध्याकाळी घरी घेऊन यायची. सासरा असे पर्यंत तिला थोडीफार मदत व्हायची पण सासऱ्याच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली. , पदरी एक पोर होतं. पोराला नदीच्या काठावर बसवून, कपडे स्वच्छ धुवायची आणि संध्याकाळी घरी आणायची.

नलू अतिशय प्रामाणिकपणे काम करायची. कपडा गहाळ झाला अशी कोणाची तक्रार नसायची. माझी आई तिच्या पोरावर माया करायची, आमच्या घासातला घास त्याला द्यायची. नलू पावसाळ्यात नदीवर कपडे धुऊन आणायचीआणि माजघरातल्या दांडीवर‌‌ निऱ्या करून काठीवर व्यवस्थित ठेवून, एकही सुरकुती‌‌ न पाडता दांडीवर टाकायची. ते पाहताना मला खूप गंमत वाटायची.

दिवाळीच्या पाडव्याला ती ओवाळायला यायची. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे उशिरापर्यंत लोळायची इच्छा असायची पण वडिलांच्या धाकामुळे पाडव्याला लवकर उठायला लागायचे. पाडव्या दिवशी अगदी सातच्या ठोक्याला नलू तबक घेऊन हजर व्हायची. टोक पदरी साडी, नाकात नथ, कपाळावर रुपया एवढे लाल भडक कुंकू लक्ष्मी सारखी वाटायची. वडिलांसह आम्हा सर्व मुलांना ओवाळायची. ओवाळताना ‘”रुपयाची तबक सोन्याच्या वाती ओवाळते चंद्र ज्योती “असं काहीतरी म्हणायची. आम्ही सर्वजण एक एक बंदा रुपया ओवाळणी ठेवायचो. ओवाळणी पाहून तिचं मन हरखून जायचं. आई तिची साडीने ओटी भरायची. दुसऱ्या दिवशी न चुकता ती साडी नेसून यायची आणि माझ्या आई वडिलांच्या पाया पडायची असे बरेच वर्ष चालू होते.

तिचा मुलगा शाळा शिकत होता आणि तिचा पती बापूराव दारू प्यायचा. माझ्या वडिलांनी त्याला परोपरीने “दारूचे दुष्परिणाम” समजावून सांगितले. ” उद्यापासून नाही मालक”हे त्याचे उत्तर ठरलेले आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरूच.

मुलगा दहावी पास झाला. शहरात लॉन्ड्रीत कामाला लागला. आई बापाला घेऊन शहरात गेला. जरा बरे दिवस आल्यावर नलूने पोराचं लगीन लावून दिलं. , भावाची मुलगी सून म्हणून आणली. काही दिवस छान गेले मग सुनेने आपले गुण दाखवायला सुरुवात केली. कजाग बायको पुढं पोराचं काही चालेना. एक दिवस दारूच्या नशेत बापू गाडीखाली सापडून मेला. घरातील एकंदर परिस्थिती पाहून नलू परत गावाकडे आली, एकटीच खोपट्यात राहू लागली. जमेल तेवढी कामे करू लागली. जसे शरीर थकले तसे तिच्याकडून काम होईनाचे झाले. तिची बरीच कामे सुटली. आमच्याकडे मात्र कामाला यायची. आम्ही होईल तेवढी मदत करायचो. शेवटी तिने लेका कडे जाण्याचा निर्णय घेतला. तिचा मुलगा बापाच्या पावलावर पाऊल टाकून दारू पिऊन धिंगाणा घालत होता. नाही म्हणायला नातू व्यवस्थित काम धंदा करत होता. नलूच्या निर्णयानुसार आम्ही तिला कोल्हापूरचे तिकीट काढून दिले. गाठीला काही असू दे म्हणून पैसे दिले. नलू कोल्हापूरला पोहोचली. स्टैंड वर उतरून चालत महाद्वार रोडला लागली. रस्त्यावरील गर्दी वाहनांचे कर्कश्य आवाज यातून मार्ग काढत ती चालली होती. गर्दीतून एक भरधाव जीप आली आणि तिला जोरात धक्का देऊन निघून गेली. ड्रायव्हर मागं न पाहता फरार झाला.

… नलू रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लोक “कोण म्हातारी? कुठली म्हातारी “?एवढी चौकशी करून काही न करता पुढे सरकत होती. त्यापैकी एका सद गृहस्थाला तिची दया आली. त्यांनी शेजारी पडलेल्या बोचक्यातून तिचा पत्ता शोधून काढला. तिला दवाखान्यात नेण्यासाठी सर्वा पुढे हात पसरले पण नसत्या फंडात कशाला पडा? असा विचार करत कोणीही त्यांना सहकार्य केले नाही. पोलीस येईपर्यंत नलूने प्राण सोडला. पोलिसांनी तिच्या पोराला बोलवून घेतले. अंगावर लक्तरे घातलेला तिचा पोरगा म्हणाला” मी तिचा पोरगा आहे हे खरं !पण मीच अन्नाला‌ मोताद आहे तर मी हिच क्रियाकर्म कसा करणार? माझ्या पोराला बोलवून घ्या”नातू आला. त्याने आजीच्या चेहऱ्याकडे तिऱ्हाईताप्रमाणे पाहिले आणि फिस्कारला”ही माझी आजी आहे, माझी आई थोडीच आहे? ज्याची आई आहे त्यांने क्रिया कर्म करणे हे त्याचे कर्तव्य आहे”. बापलेकात “तू तू मैं मैं”सुरू झाले. शेवटी हवालदारालाच दया आली. त्याने ‌नलूला‌ स्मशानात नेऊन अग्नी दिला. अशी बिचारी नलू जिवंतपणी मुलगा, नातू असूनही प्रेमाला पारखी झाली आणि मृत्यूनंतर बेवारशीच ठरली. ‘

‘मुले वाईट नसतात.. वाईट असतं आपलं म्हातारपण… , हे खरे!

प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दडलेली कथा! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ दडलेली कथा! ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

मी श्रीपाद बिराजदार. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर, गेली काही वर्षे, स्फुट लेखन, वर्तमानपत्रांमध्ये सदर लिहिणे असा छंद जोपासतो.

काही कामासाठी आज मी आमच्या “आपल्या माणसांची सहकारी बँक” बँकेत आलो होतो, फॉर्म भरून क्लर्कला दिला आणि त्याने बोलावण्याची वाट पहात होतो. आणि पुकारा आलाच, “SB सर, मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये येता का प्लीज ?”

मी गेलो. तर तिथे एकजण मॅनेजरसमोरच्या खुर्चीत बसतच होते. मला बघून मॅनेजर क्षणभर गोंधळले, पण मग स्वतःला सावरत, त्यांनी समोरच्या व्यक्तीशी माझी ओळख करून दिली, “या, श्रीपाद सर. यांना भेटा, हे इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले सर. “

मला उलगडा झाला. ज्या SB सरांना बोलावले होते, ते भोसले सर होते, मी नाही. नामसाधर्म्याने घोटाळा झाला होता. मी तसं त्या दोघांना बोलून दाखवलं. भोसले सर मनमोकळेपणे हसले. मॅनेजरांनी “मी लेखक आहे” वगैरे ओळख करून दिली. मॅनेजरशी असलेले त्यांचे काम आटोपून ते निघाले.

मी दोन मिनिटे थबकलो, तेव्हा मॅनेजरांनी भोसले सरांबद्दल थोडक्यात माहिती दिली. खूप खडतर बालपणातून चिकाटीने शिक्षण घेऊन पोलीस खात्यात इन्स्पेक्टर झाले होते ते, त्यांचे वडील बँकेच्या डायरेक्टर बोर्डावर होते. “खूप विनम्र आहेत इन्स्पेक्टर साहेब, सगळ्यांशी आपलेपणाने बोलतात, बुद्धीबळ अप्रतिम खेळतात, बरं का, ” मॅनेजर सांगत होते.

योगायोगाने दुसऱ्याच दिवशी एका कार्यक्रमात माझी भोसले सरांची परत भेट झाली, गप्पा झाल्या. “तुम्हा लेखकांना आजूबाजूच्या प्रत्येकच गोष्टीत एखादी कथा दडलेली भासत असेल ना, ” जेवत असताना ते दिलखुलासपणे बोलत होते, “पण माझ्या बाबतीत तसं काही नाही, बरं ! साधं सरळसोट आयुष्य जगलो आहे. नशिबाचे दान माझ्या बाजूने पडत गेलं, आणि इथवर पोचलो, ” ते निगर्वीपणे सांगत होते.

एवढ्यात थोडा गलबला झाला, एक भपकेदार सूट घातलेला, हातात महागडं घड्याळ – ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची चेन आणि चेहऱ्यावर माज असलेला एकजण कार्यक्रमात येत होता. भोसले सर अगदीच त्याच्या रस्त्यात असल्याने, अगदी नाईलाज म्हणून तो क्षणभर थांबला, चेहऱ्यावर कसंनुसं हसू आणलं, सरांनी ओळख करून दिली, “हे उत्तम बेंडखळे, बँकेत महाप्रबंधक – general manager आहेत, बरं का ! आणि विशेष म्हणजे, बुद्धीबळ अप्रतिम खेळतात. “

बेंडखळ्यांचा चेहरा उजळला, “दहा वर्षांपूर्वीची फायनल आठवते आहे ना ?” त्याने विचारलं.

“अर्थात, त्याचा रिझल्ट सगळ्यांनाच ठाऊक आहे. तुम्हीच निर्विवाद चॅम्पियन होतात, ” सर दिलखुलासपणे म्हणाले. बेंडखळे सुखावला आणि त्याच्या फॅन्सच्या गोतावळ्यासोबत पुढे निघून गेला.

“आता, या उत्तम बेंडखळ्यांचीच गोष्ट घ्या, त्यांच्या बाबतीतली एक खाजगी गोष्ट शेअर करायला मला आवडेल, ” सर सांगत होते, पण एवढ्यात दुसरे कोणीतरी आलं, आणि तो विषय राहूनच गेला.

पुढच्या आठवड्यात बँकेत गेलो, तेव्हा मॅनेजर सरांशी भेट झाली, उत्तम बेंडखळे यांचा विषय निघाला. का कोणास ठाऊक, पण मॅनेजर थोडे अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. मी त्यांच्या बुद्धिबळाचा विषय काढला, ते आणखीनच अवघडले, शेवटी मनाशी काही निर्धार केल्याप्रमाणे ते बोलू लागले, “भोसले सरांच्या वडिलांची आणि बेंडखळे सरांच्या वडिलांची जुनी ओळख. किंबहुना, भोसले सरांच्या वडिलांच्या शिफारसीनेच बेंडखळे सर आमच्या बँकेत नोकरीला लागले.

मग इन्स्पेक्टर साहेबांची बदली झाली, आणि बहुधा त्यांचा आणि बेंडखळे सरांचा संपर्क कमी झाला असावा.

इकडे काही ना काही कारणांनी बेंडखळे सरांचे धाडसी निर्णय सगळ्यांच्या पचनी पडत नव्हते. बँकेच्या दृष्टीने, अनेक risky व्यवसायांना, आमच्या गणितापेक्षा, बेंडखळे सरांनी कितीतरी जास्त कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. त्या बदल्यात या कर्जदारांकडून ते मोबदला (kickback) घेतात, अशी वदंता होती.

तेव्हा ते तरुण होते, एका मुलीच्या प्रेमात पडले होते. त्या मुलीच्या वडिलांना, तारणाशिवाय, बँकेकडून त्यांनी भली थोरली रक्कम कर्जाऊ दिली होती. पण कर्ज रक्कम मंजूर झाल्यावर ती तरुणी बेंडखळे सरांना भेटत नव्हती, ब्रेकअप करत होती म्हणे.

बेंडखळे सर दारू पिऊ लागले आहेत, अशा बातम्या पसरू लागल्या होत्या. डायरेक्टर बोर्ड त्यांना चौकशी समितीपुढे उभं करणार असंही ऐकिवात होतं.

नशेत त्यांनी त्या तरुणीच्या वडिलांशी बाचाबाची केली, तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली, सुदैवाने आपले भोसले सरच त्या पोलीस ठाण्यात होते. त्यांनी बेंडखळे सरांना सज्जड दम भरला, कडक शब्दांत त्यांची कानउघाडणी केली, परंतु त्याच वेळी तिच्या वडिलांना तक्रार मागे घ्यायला लावली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या दिवशी आमच्या बँकेने आयोजित केलेल्या बुद्धीबळ स्पर्धेचा अंतिम सामना होता आणि आमनेसामने होते उत्तम बेंडखळे आणि इन्स्पेक्टर भोसले.

भोसले सर ठरवलेल्या वेळी हजर होते, अर्धा तास होऊन गेला तरी बेंडखळे सरांचा पत्ता नव्हता, संयोजकांनी भोसले सरांना विजयी घोषित करायचं ठरवलं, पण सरांनी नम्रपणे नकार दिला, स्वतः बेंडखळे सरांना फोन केला, ते कुठे आहेत त्याची खातरजमा करून घेतली आणि कोणाला तरी पाठवून त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन आले.

बेंडखळे सरांचा अवतार पाहण्यासारखा होता, डोळे तांबडेभडक – आता ते झोप न झाल्याने का नशेने, ते सांगता येत नव्हतं, कपडे चुरगळलेले, दाढीचे खुंट वाढलेले.

सामना सुरू झाला. मीही थोडाफार बुद्धीबळ खेळतो, चौथ्या राऊंडला भोसले सरांनीच मला हरवलं होतं आणि पहिल्या दहा पंधरा खेळींतच माझ्या लक्षात आलं, की भोसले सर नीट खेळत नाहीयेत.

दोन तीनदा त्यांनी बेंडखळे सरांचे मोहरे मारायची संधी असूनही ते मारले नाहीत, एकदा आक्रमणाची जबरदस्त संधी असूनही त्यांनी उलट बचावात्मक castling केलं. मी नीट लक्ष देऊन पाहू लागलो. अर्ध्या तासानंतर बेंडखळे सर सावधचित्त झाले, चांगले खेळू लागले आणि सामना जिंकलेही – भोसले सरांनी त्यांना सामना जिंकू दिला, असंच खरंतर म्हणावे लागेल.

अभिनंदन करताना, भोसले सर बेंडखळे सरांच्या कानात म्हणाले, “उत्तम, आजपासून झालं गेलं ते विसरून जा. नवा डाव सुरू करा, आधीच्या चुका पुन्हा करू नका. त्या कालच्या तक्रारदारांना आठवड्याभरात सर्व कर्ज रक्कम परत करण्याचा दम भरला आहे मी. पण आता तुम्ही तुमच्या नावाला जागा, उत्तम कामगिरी करा. ” मी शेजारीच उभा होतो, शब्दन् शब्द ऐकला मी.

सुदैवाने, बेंडखळे सरांनी तो सल्ला मनावर घेतला. बुद्धिमान ते होतेच, आता त्यांनी करीअरवर लक्ष केंद्रित केलं, बढत्या मिळत गेल्या आणि आज ते महाप्रबंधक आहेत. “

ये अंदरकी बात ऐकून, मी स्तब्धच झालो.

भोसले सरांशी झालेल्या पुढच्या भेटीत जेव्हा बँकेचा आणि ओघाओघाने बेंडखळे सरांचा विषय निघाला, तेव्हा भोसले सरच आपणहून म्हणाले, “गेल्या वेळेला, मी तुम्हाला बेंडखळे सरांबाबतची, इतर कोणाला माहित नसलेली गोष्ट सांगत होतो, त्या दिवशी सांगायची राहूनच गेली. “

मी कान टवकारले, आता आपण बेंडखळेला कसं सुधारलं, वाचवलं, त्याचं आयुष्य पुन्हा कसं मार्गावर आणलं हे भोसले सर सांगणार या उत्कंठेने मी ऐकू लागलो.

“अहो, बुद्धीबळ स्पर्धेची अंतिम फेरी. माझ्याशीच लढत होती. आणि आदल्या रात्रीच बेंडखळे यांच्यावर पोलीस कंप्लेंट झालेली, बँकेत चौकशीचा ससेमिरा लागणार अशी परिस्थिती आणि तरी हा पठ्ठ्या आला, अप्रतिम बुद्धीबळ खेळला, आणि चॅम्पियनशिप जिंकून गेला.

ती पोलीस कंप्लेंट मागे घेतली गेली, बेंडखळे यांनी दिलेल्या कर्जाची पूर्ण वसूली झाल्याने बँकेने चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, आणि तिथून मग बेंडखळे यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही. ग्रेट स्टोरी.

बरं का, तुम्ही लेखक आहात. तुम्ही आवर्जून या दडलेल्या गोष्टीबद्दल लिहा, ” भोसले सर सांगत होते आणि या प्रसिद्धीपरांSमुख माणसाचं निरपेक्ष बोलणं मी तोंड उघडं टाकून ऐकत होतो.

(काल्पनिक कथा)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares