मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “वैष्णव” – लेखक : वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वैष्णव” – लेखक : वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

वि.वा.शिरवाडकर यांनी लिहीलेली ही एक लहान कादंबरी…’वैष्णव’.कादंबरीचे लेखन केलंय १९४६ साली. कादंबरीत वर्णीलेला काळ आहे १९४२ चा.

एका छोट्या गावात शिक्षकाची नोकरी करणारा तरुण. बायको आणि मुलासोबत रहात असतो. तुटपुंजे वेतन..ओढग्रस्तीची अवस्था… पापभिरू.. सतत मान खाली घालून चालणारा..आणि कणाहिन देखील. घरात भिंतीवर दोन तसबिरी.. एक दत्ताची आणि दुसरी गांधीजींची.गांधींचे नाव फक्त ऐकलेले.शाळेत वरीष्ठांकडुन झालेला अन्याय.. अपमान सहन होत नाही.. आणि सरकारी नोकरीवर तो लाथ मारतो. एकामागून एक आपत्ती येत रहातात.

नोकरीच्या शोधात तो मुंबईत येतो. त्यावेळी मुंबईत इंग्रजांविरुद्ध सुरू असलेले आंदोलने निर्णायक टप्प्यात आलेले असते.९ऑगस्ट ला गवालिया टँक मैदानावर सुरू असलेल्या सभेला तो जातो. गांधीजींचे भाषण ऐकतो, आणि त्याच्यात आमुलाग्र बदल होतो. 

दुसऱ्या दिवशीच तो तरुण गावाकडे परततो.आणि त्याच्या नैत्रुत्वाखाली गावात सरकार विरुद्ध आंदोलन छेडले जाते. त्यात तो काही अंशी यशस्वी होतो देखील. पण बलाढ्य ब्रिटिश सत्तेपुढे अखेर ते आंदोलन दडपले जाते.

एका पापभिरू.. कणाहिन व्यक्ती गांधींजींच्या भाषणाने प्रेरित होऊन कशी लढा देते.. त्याच्यात कसे कसे बदल होत गेले हे शिरवाडकरांनी खुपच सुंदर शब्दात उभे केले आहे. त्याच्या लढ्याला यश मिळाले की नाही हे महत्त्वाचे नाही तर गांधीजींच्या विचाराने प्रेरणा घेऊन अगदी गाव पातळीवर असलेले सामान्य जन सुध्दा ब्रिटीशांविरुध्द निर्भयपणे कसे उभे राहिले हे च या कादंबरीत वर्णीलेले आहे.

९ ऑगस्ट च्या आंदोलनाच्या वेळी शिरवाडकर मुंबईत होते.. त्या ऐतिहासिक सभेला देखील उपस्थित होते. त्यामुळे त्या दिवसाचे त्यांनी जे वर्णन केले आहे त्यात एक जिवंतपणा आहे.

म. गांधींचे मोठेपण वि.वा.शिरवाडकरांच्या शब्दात वाचायचे असेल तर ‘वैष्णव’ अवश्य वाचा.

लेखक : वि.वा. शिरवाडकर 

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सरीवर सरी” – लेखिका अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “सरीवर सरी” – लेखिका अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक  : सरीवर सरी – (कविता संग्रह) 

कवयित्री : अरुणा मुल्हेरकर.

प्रकाशक : शाॅपीझेन ऑनलाईन अहमदाबाद

पृष्ठे : ८१

मूल्य : रु २६८/—

सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री. अरुणा मुल्हेरकर यांचा ‘ सरीवर सरी ‘  हा तिसरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहात त्यांच्या एकूण ५१ कविता आहेत आणि या सर्व कवितांमधून त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले आहेत. यात प्रेम, निसर्ग, सामाजिक समस्या, अन्याय, भक्ती, नारी सन्मान, देशभक्ती,आध्यात्म अशा विविध विषयांवर त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे काव्यरचना केलेल्या आहेत.

या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य असे आहे की यातील बहुतेक कविता या वृत्तबद्ध आहेत.मात्रावृत्त आणि अक्षरगण वृत्तांच्या चौकटीतील आहेत.   शिवाय यात अभंग, सुमित, गझल,बालगीत आणि इतर काही नाविन्यपूर्ण काव्यप्रकारांचाही समावेश आहे.  अशा विस्तारित काव्य क्षेत्रातला अरुणाताईंचा संचार मनाला थक्क करणारा आणि कौतुकास्पद  आहे.

अरुणाताई त्यांच्या मनोगतात म्हणतात की त्यांनी कोविडकाळात लेखन क्षेत्रात प्रवेश केला.म्हणजे अगदी  अलीकडच्याच काळात. मात्र त्यांचा सरीवर सरी हा काव्यसंग्रह वाचताना त्या नवोदित साहित्यिक आहेत यावर विश्वासच बसत नाही कारण इतकं त्यांचं काव्य परिपक्व आहे.

प्रतिभा, बहुश्रुतता आणि अभ्यास या तीन काव्य कारणांना काव्यशास्त्रात महत्त्व आहे आणि या तीनही संकल्पनांचा प्रभाव त्यांच्या कवितांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. 

या संग्रहातील त्यांची पहिलीच कविता देहात चांदणे फुलले वाचताना एक अत्यंत हळुवार, तरल भाव वाचकाच्या मनावर उतरतो. या शृंगार रसातल्या काव्यात त्या म्हणतात,

 तो स्पर्श रेशमी होता

 तनुलता कशी थरथरते 

झेलूनी मदनाचे बाण

 देहात चांदणे फुलते

खरं म्हणजे ही संपूर्ण कविता रसग्रहणात्मक आहे. प्रियकराच्या स्पर्शाने देहात चांदणे फुलते ही कल्पनाच किती रम्य आहे! सहज आणि कोमल शब्दांचा साज, रसगंधयुक्त, नादयुक्त आणि लयबद्ध आहे.

बंधनात मी या काव्यातल्या( वृत्त हरी भगिनी)

 बंधनात राहूनिया मी 

जीवन माझे अनुभविले

 वादळ वारे तुफान आले

 जीवन सुंदर जाणीयले

या ओळी जीवनावरचा सकारात्मक विचार अगदी सहजपणे मांडतात. शिवाय त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून झरणारे शब्द एक वेगळेच सौंदर्य घेऊनच कागदावर उतरतात याची वाचकाला प्रचिती येते.

आनंदकंद वृत्तातील आयुष्य हेच आहे ही गझल कसं जगावं याविषयी भाष्य करते.  यातलाच हा एक शेर..

 कमळात भृंग घेतो 

अडकून जो स्वतःला 

रस पान तोच करतो 

पाहून तू राहावे

यातलल्या प्रत्येक शेरातील खयालत आणि मिसरा  इतका सुंदर आहे की अगदी उत्स्फूर्तपणे या रचनेला दाद  दिली जाते.

सत्य ही कविता ही खूप लक्षवेधी आहे.

जीवन जगताना काही सत्यं नाकारता येत नाहीत. वृद्धत्व हे असेच एक सत्य. या कवितेत कवियत्रीचा आरशाशी झालेला संवाद खरोखरच मनाला भिडतो. आरसा जसं बाह्यरुप  दाखवतो तसंच मनातलं अंतरंग जाणून घेण्यासही प्रवृत्त करतो. आणि नेमका हाच विचार अरुणाताईंनी यात मांडलेला आहे.

 उघड मनाच्या कवाडाला

 स्वीकारून तू सत्याला

 जगत रहा क्षण आनंदाचे

 खुलविल तुझ्या रूपाला

आनंदाने जगणे म्हणजेच वृद्धत्वावर मात करणे आणि पर्यायाने बाह्य रूपाला खुलवणे. वा! किती सुरेख संदेश! शब्द थोडे पण आशय मोठा.

अरुणाताई प्रेमगीतात जितक्या रमतात तितक्याच ईश्वर भक्तीतही तल्लीन होतात.

एका अभंगात त्या म्हणतात,

 कृष्ण आहे मागे।

 कृष्ण आहे पुढे। 

कृष्ण चहुकडे। भगवंत।।

हा  अभंग वाचताना मला सहजच शांता शेळके यांच्या गीताची आठवण झाली. 

मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश

माझ्याकडे देव माझा 

पाहतो आहे. अरुणाताईंच्या या अभंगातही हाच भक्तीचा भाव आणि गोडवा जाणवतो.

हेलकावे ही काहीशी जात्यावरची ओवी वाटावी अशी कविता.

 दळताना कांडताना 

सय येते माहेराची

 झोके घेत मन माझे 

दारातल्या अंगणाची

एक हळवं माहेराची ओढ असलेलं स्त्री मन या काव्यातून जाणवतं.

कालगती हे एक सुंदर निसर्ग काव्य आहे. विविध ऋतूंचे सुरेख वर्णन यात आहे आणि कालचक्र महात्म्य यात कथीत केलेले आहे.

 वसंत येतो वसंत जातो

 ग्रीष्माची मग होते चढती

 ऋतु मागुनी  ऋतू हे सरती

 यास म्हणावे कालगती..

अरुणाताईंजवळ एक वैचारिक, सामाजिक मन आहे याची जाणीव त्यांच्या का? या कवितेत होते.

 वेलीवरच्या कळ्या कोवळ्या

 का हो आपण खुडता 

जन्मा आधी गर्भामध्ये 

कसे त्यांना कुस्करता

संपूर्ण कवितेत स्त्रीभृणहत्येवर अत्यंत कळकळीने आक्षेप घेतानाच त्यांनी नारी जन्माचा सन्मान केला आहे.

तो आणि ती या कवितेत पोवाडा आणि लावणी याची केलेली तुलना अतिशय मनोरंजक आहे.

लोक वाङ्मय, लोकसंगीत महाराष्ट्राची शान असे म्हणत त्यांनी मराठी साहित्यातल्या लोक भाषेला मानाचा मुजरा केला आहे.

सरीवर सरी या शीर्षक कवितेत त्यांनी लेखणी विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मन असते सैरावैरा 

त्यासी लेखणी आवरी

 शब्दफुलोरा फुलतो 

वर्षती सरींवर सरी 

सरीवर सरी हे शीर्षक वाचल्यावर सहज वाटते की ही पाऊस कविता असेल पण अरुणाताईंनी खुबीदारपणे या शब्दरचनेला कलाटणी देऊन शब्द फुलंच्या सरी लेखणीतून कशा वर्षाव करतात ते अगदी मार्मिकपणे सांगितले आहे.

खरं म्हणजे या काव्यसंग्रहातल्या सर्वच कविता अतिशय रसास्वाद देणाऱ्या आहेत.  या कवितांतून कवियत्री अरुणाताईंचे शब्द वैभव, शब्दप्रचुरता, आणि शब्दयोजना किती प्रभावी आहे ते जाणवते. काव्यरचनेतला कुठलाही शब्द ओढून ताणून आणल्याचे जाणवत नाही. शब्दालंकार आणि अर्थालंकाराची योजकता अत्यंत सहज आहे. त्यामुळे वाचक काव्य भावाशी आणि काव्यार्थाशी  अत्यंत सहजपणे जोडला जातो.

अरुणाताईंचा वृत्तबद्ध काव्याभास आश्चर्यजनक आहे. अगदी प्रथितयश, सुप्रसिद्ध, नावाजलेल्या अनेक कवींच्या काव्यपंक्तीत समाविष्ट होण्या इतक्या त्यांच्या वृत्तबद्ध कविता दर्जेदार आहेत. माझ्या या लिखिताचा इतर वाचकांनाही अनुभव येईलच.

त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणजे सुंदर, पारदर्शी, निर्मळ विचार, रसमयता,  नाद मधुरता आणि लयबद्धता.  त्या स्वतः संगीत विशारद असल्यामुळे सूर, ताल आणि लय यांच्याशी त्यांचं असलेलं नातं त्यांच्या कवितांतून  प्रामुख्याने जाणवतं. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे ते त्यांचं संवेदनशील मन, हृदयातला ओलावा, घटनांकडे पाहण्याचा त्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र दृष्टिकोन आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच त्यांच्या सुंदर कविता. साहित्य आणि संगीत हातात हात घालून आले की कसा रोमांचकारी चमत्कार घडतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरुणाताईंच्या भारदस्त कविता.

सरीवर सरी या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अजित महाडकर यांची प्रस्तावना लाभली आहे हा एक दुग्ध शर्करायुक्त योगच म्हणावा.

जाता जाता एक,अगदी न राहवून नमूद करावेसे वाटते की वडिलांचा वारसा कन्या कशा रीतीने चालवू शकते. सुप्रसिद्ध साहित्यिक कै. ज.ना. ढगे यांचा साहित्यिक वारसा त्यांची  ही कन्या समर्थपणे चालवत आहे हे अभिमानाचे नाही का?

 अरुणाताई तुमचे खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढील साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “फास्ट फूड” – लेखिका : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. लीला जोशी ☆

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “फास्ट फूड” – लेखिका : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. लीला जोशी ☆ 

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : शिवसृष्टी प्रकाशन

पहिली आवृत्ती : मधुश्री प्रकाशन तर्फे १९९८ (रु.९०/—)

तिसरी आवृत्ती :  १८ अक्टूबर २०१८

किंमत : रु. २४०/—

सौ. उज्ज्वला केळकर

साहित्याची अनेक दालनं आणि त्यात सहजपणे वावरणारे लेखकही अनेक, पण त्यातलं लेखनाच्या दृष्टीनं वावरायला अवघड दालन विनोदी लेखनाचं. सर्वच प्रकारच्या साहित्य निर्मितीला प्रज्ञा आणि प्रतिभेची जोड लागते हे अगदी खरं असलं तरी अस्सल विनोदी लेखनासाठी लागणारी प्रज्ञा आणि प्रतिभा काही वेगळीच. ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या फोटोग्राफीला कौशल्य आवश्यकच असलं तरी अजाण बालकाची नेमकी पोझ कॅमे-यात टिपायला लागणारं कौशल्य वेगळंच, तसंच विनोदी लेखनाचं आहे. त्यामुळेच अस्सल विनोदी लेखन करणा-या लेखकांची संख्या खूपच मर्यादित, त्यात विनोदी लेखिकांची संख्या तर जवळजवळ हाताच्या बोटांवर मोजण्याजोगी. अशा या मोजक्या लेखिकांमध्ये ‘फास्ट फूड’ मुळे आणखी एका लेखिकेची भर पडलीय ती सौ.उज्ज्वला केळकरांची.

सौ. उज्ज्वलाताईंनी अर्पणपत्रिकेच म्हटल्याप्रमाणे ‘जीवनातील गांभिर्याकडे हसत-खेळत बघण्याची दृष्टी’ ही गोष्ट विनोद निर्मितीसाठी अतिशय आवश्यक. अशी दृष्टी उज्ज्वलाताईंकडे आहे. तसंच या दृष्टीतून केलेल्या समाजाच्या, परिस्थितीच्या आणि व्यक्ती-व्यक्तीच्या निरीक्षणाचं प्रतिबिंब विनोदी कथेत उमटविण्याची ताकदही त्यांच्या प्रज्ञेत आणि प्रतिभेत निश्चितच आहे, हे त्यांच्या ‘फास्ट-फूड’ या पहिल्याच कथासंग्रहानं सिध्द केलंय.

‘विषयाची विविधता ही लेखिकांच्या लिखाणात क्वचित आढळणारी जमेची बाजू’ हे ‘फास्ट-फूड’ चं प्रमुख वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खुद्द ‘फास्ट-फूड’ या कथेत फास्ट-फूडच्या हव्यासाची घेतलेली फिरकी झक्कासच. पण कथेचा शेवटही निर्णायक. ‘शिक्षक-दीनाची’ ष्टोरी तर एकदम बेस्ट. अगदी कथेच्या शीर्षकातील दीर्घ ‘दीन’ पासूनच. कथा संपूर्णपणे ग्रामीण भाषेत लिहिताना लेखिका कुठेही अडखळलेली तर नाहीच, उलट लेखिकेला नित्य ग्रामीण भाषेत लेखन करण्याचा सराव असावा इतक्या सहजतेनं कथेनं ग्रामीण बाज टिकवून धरलाय. कथेत उभं केलेलं ग्रामीण वातावरणही हुबेहूब.

‘मीही लेखक आहे’ हे ठसविण्याची शर्यत लागल्यासारखं प्रचंड प्रमाणात निर्माण होणारं साहित्य, त्यातला व्यावसायिकपणा, त्यामुळे त्याच्या दर्जावर होणारा निकृष्ट परिणाम यावर हसत-हसवत प्रकाश टाकणारे, ‘साहित्याचे साचे’, तसंच ‘मी मंगलाष्टके करते’, ‘हातभर कविसंमेलनाची वावभर कहाणी’ यासारख्या अनेकांच्या अनुभूतीला प्रत्यक्ष उजाळा देणा-या कथा, विनोदी लेखनाचं गमक लेखिकेला नेमकं सापडलंय याची साक्ष देतात.

‘माझा नवरा, माझी पाहुणी’ ही कथा विनोदी धाटणीची असली तरी स्त्री-पुरुष मनाच्या आंदोलनांचं चित्र सहजपणे पुढे उभं करते. 

निवडणुका, वरसंशोधन, पाहुणे हे तसे परिचित विषय; पण ‘स्वर्लोकात इलेक्शन’, ‘वन्संसाठी वरसंशोधन’, ‘असे पाहुणे येती’ या कथा थोड्या वेगळ्या वाटेनं जाऊन आपला ठसा उमटवतात. प्रतिभेवीण काव्यलेखनाची हौस भागवून घेणा-या कवींची संख्या सध्या मोजण्या पलिकडची (आणि येणा-या उदंड कविता-पिकाची चव चाखण्यापलिकडची) अशा कवींचं प्रतिनिधित्त्व ‘फास्ट-फूड’ मधल्या शारदारमणांनी किती बेलामूल केलंय याचा प्रत्यय ‘शारदारमण गिनीज् बुकात’ आणि ‘शारदारमणांची सेटी’ वाचणा-यालाच कळेल.

संग्रहातल्या सर्व अकरा कथा वाचताना स्पष्ट जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक कथा लिहिण्यापूर्वी लेखिकेनं त्या कथाविषयाचा केलेला पूर्ण अभ्यास. या जमेच्या बाजूनं संग्रहाचा दर्जा उंचवायला नि:संशय मदत केलीय. त्यामुळेच ‘फास्ट-फूड’ केवळ विनोदाचं लेबल लावलेला संग्रह ठरत नाही. (एका कथेच्या शीर्षकासाठी कंसात लिहिलं होतं – विनोदी कथा. प्रत्यक्ष कथेत विनोद-कथा म्हणण्यासारखं काहीच नसल्यामुळे बहुधा लेखक अगर संपादकांनी अगोदरच हसवण्याची सोय केली असावी.) 

वाचकाला हसवत-हसवत अंतर्मुख करणं हे विनोदाचं बलस्थान. ‘फास्ट-फूड’ मधल्या कथा वाचताना या बलस्थानाचा प्रत्यय बहुतांश कथांमध्ये येतो. सध्या रोज नवनवीन पुस्तकं मोठ्या संख्येनं प्रकाशित होत असली, तरी खरा वाचनानंद देणा-या पुस्तकांची संख्या फारच मोजकी. म्हणूनच कथांमध्ये क्वचित आढळणारा परिचित कल्पनांचा वापर आणि एखाद्या कथेचं जरासं रेंगाळणं, हे अपवाद वगळल्यास एकूणच ‘फास्ट-फूड’ हा लेखिकेचा पहिलाच विनोदी-कथासंग्रह त्यांच्या लिखाणाबद्दलच्या वाचकांच्या अपेक्षा वाढवणारा आहे यात शंका नाही.

परिचय :- सौ. लीला जोशी

संपर्क – ‘गंधाली’ वारणाली रोड, विश्रामबाग, सांगली ४१६४१५

लेखिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 e-id – [email protected]

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “काव्यरेणू” (कविता संग्रह) – कवयित्री : रेणुका मार्डीकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “काव्यरेणू” (कविता संग्रह) – कवयित्री : रेणुका मार्डीकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

कवयित्री- सौ रेणुका धनंजय मार्डीकर

प्रकाशक : पंचक्रोशी प्रकाशन, बारामती

कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर यांच्या ‘ काव्यरेणू ‘ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच  धुळे येथे झालेल्या शुभंकरोती साहित्य परिवाराच्या प्रथम राज्यस्तरीय संमेलनात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

एकूण बासष्ट कवितांचा हा संग्रह! यातील एकेक कविता जसजशी वाचत गेले तेव्हा मनात आले वा! काय अफाट प्रतिभा आहे ही!  पुस्तकाची शीर्षक कविता काव्यरेणू जी अगदी शेवट आहे तीच मी प्रथम वाचली आणि केवळ चार कडव्यात संपूर्ण पुस्तकात काय आहे ते समजल्यावर पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली.

या संग्रहात सगळेच आहे हो ! यात बालमन आहे, तारुण्य आहे, वार्धक्य आहे, मानवता आहे, लोभस निसर्ग आहे, अध्यात्म आहे. रेणुका ताई म्हणतात,

 शब्द शारदा अंतरी येऊन

 काव्य बहरले माझ्यामधले

 काव्यरेणू हे सर्वांसाठी

 ओंजळ भरुनी अखंड दिधले=

तर अशी ही काव्याने भरलेली ओंजळ आहे.

त्यांच्या निसर्ग कविता वाचताना  लक्षात येते की अधिकतर कविता पावसावरील आहेत.  त्यांच्या कवितातून पावसाची विविध रूपे पहावयास मिळतात.

ओल्या मातीचा सुगंध ही वर्षा ऋतूचे वर्णन करणारी कविता. ऋतू गाभुळला बाई. गाभूळला अतिशय समर्पक शब्द.  या एका शब्दाने मेघांनी भरून आलेले आभाळ आणि निसर्गाचे ओलेतेपण तात्काळ नजरेसमोर उभे राहते.  या ओळी पहा- 

                   वारा जाऊनी कानात

                   सांगे लता वल्लरींच्या

                   धूळ झटका रे सारी

                    आल्या सरी मिरगाच्या

चेतनगुणोक्ती अलंकारामुळे काव्य कसे जिवंत वाटते, निसर्ग टवटवीत दिसतो.

प्रभात समयी वरून येऊनी या कवितेत कवयित्रीने सुंदर पावसाच्या सकाळचे वर्णन केले आहे.

विरहाचा श्रावण ही कविता श्रावणातल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विरहाची व्यथा सांगते.

 आभास होतसे मजला

 मोगऱ्यात राणी दिसली

 तिज कवेत मी घेताना

 गंधाळून कळी ती हसली

…  किती सुंदर रूपक साधले आहे.

 शेतकऱ्याचे आणि पावसाचे फार जवळचे नाते काळजीची सल या कवितेत दिसून येते

 पाटाचं पाणी साऱ्या

 रानात फिरलं

 जोंधळ्याची रास लागून

 लक्ष्मी खेळलं

शेतकऱ्याच्या भाषेतील कविता असल्यामुळे अधिक जवळची वाटते.

ऋतू पावसाळी हे पावसावरील गीत आहे

 ऋतू पावसाळी धुंद धुंद झाला

 गिरी कंदरी ती फुले वनमाला

गीत असल्यामुळे लयबद्धता आली आहे

केळभ करतो सुंदर  नर्तन या पावसाच्या कवितेत छन छननन, दीड दा दीड दा,  थुई थुई या शब्दयोजनांनी पावसातील संगीत आणि नृत्य दृश्य झाले आहे.

सुगंधी झाल्या पहा पायवाटा ही पावसावरील कविता रेणुका ताईनी भुजंगप्रयात या वृत्तात लिहून त्यांनी छंद शास्त्राचाही अभ्यास केला आहे हे वाचकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

याव्यतिरिक्त .. त्या कोवळ्या सकाळी( सकाळचे वर्णन), ऋतुराज, वसंताचे वैभव वर्णन करणारी षडाक्षरी कविता, गुज सांगते ना झाड- वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारी अष्टाक्षरी कविता, वाट बाई वळणाची- गोव्याकडे जाणारा घाटातील वळणावळणाच्या रस्त्याचे ओवी अंगाने केलेले वर्णन, अशा अनेक निसर्गाच्या कवितांचा समावेश या पुस्तकात आहे.

रेणुकाताई त्यांच्या मनोगतात लिहितात की त्या निसर्गात आणि शेतीमातीत नेहमीच रमतात. निसर्ग पाहिला की त्यांना कविता स्फुरते. काव्यरेणूतील या निसर्गकविता वाचल्या की त्यांच्या मनोगतातील विधानाची सत्यता पटते.

कोणत्याही कवीचा प्रेम हा अगदी आवडीचा विषय नाही का? रेणुका ताईंच्या या संग्रहात प्रेम भावनेवर अनेक कविता आहेत. मग ते प्रेम प्रियकर~प्रेयसीचे असेल, पती-पत्नीचे असेल, वात्सल्य असेल, विरहातीलही प्रेमभावना असेल. या एकाच पुस्तकात सर्व भावना काव्यरूपात वाचताना मन आनंदून जाते.

 तुझी माझी रे जोडी ही शृंगार रसयुक्त प्रेम कविता! नवपरिणीतेचे मनोगत या कवितेत व्यक्त झाले आहे.

 सासरघरच्या उंबरठ्याशी नववधूच मी थरथरली

 मर्यादांचे कुंपण तरीही कळी पहा मोहरली.

…  या दोनच ओळीत एका नववधूची मानसिकता रेणुका ताई समर्थपणे दर्शवितात.

आणि शेवटी संसार परिपक्व होतो तेव्हा त्या लिहितात,

 फळ पिकल्यावर मधुर लागते

 तशीच आपली जोडी

 जीवन नौका तरुन जाईल

 अशीच त्यातील गोडी

.. .  शब्दयोजना कशी अगदी सहज आणि लयबद्ध आहे.

 चांदण्याच्या अंगणात

 चंद्र आणि चांदणीचा

 अनुराग गगनात

 चिंब ओलेत्या मनात या कवितेच्या या वरील ओळींतून कवयित्रीचे अनुरक्त मन व्यक्त होते.

नभी चांदवा येताना हे असेच एक प्रेम गीत!

 गोड गुलाबी चाहूल लागे नभी चांदवा येताना

 प्रीतीच्या त्या धुंद क्षणाला हळूच कवेत घेताना

….  ध्रुवपदच किती छान! हळुवार शब्दातून प्रीत भावना व्यक्त झाली आहे.

 चिंब चिंब जाहलो सख्या चांदण्यात या भिजताना

 सागर साक्षी होता तेव्हा श्वास नव्याने रुजताना

 कोजागिरीच्या चंद्रासंगे प्रेम गीत मग गाताना

 प्रीतीच्या त्या धुंद क्षणाला हळूच कवेत घेताना

…. हे शृंगारिक काव्य अगदी पुनवेच्या चंद्रासारखेच शितल आणि पवित्र वाटते. कुठेही उत्तान शृंगार नाही.

साथ तुझी देता मला या प्रेम कवितेतही कवीची लाडकी चंद्र,चांदणं, फुले ही खास प्रीती स्थानं आढळून येतात

 प्रीतीत मी मोहरलेली या प्रेम कवितेत रेणुका ताई म्हणतात,

 स्वर्ण आभा रवी किरणांची

  मुखचंद्रावर पडलेली

 गालावरची खळी सांगते

 प्रीतीत मी मोहरलेली

….  गुलाबी थंडीत प्रेमाला बहर येतो असे म्हणतात.

प्रेम रंगी रंगे थंडी ही अशीच एक प्रेम कविता .. अष्टाक्षरी या अक्षरछंदात लिहिलेली. शब्दयोजना किती समर्पक आहे पहा…

  थंडी गुलाबी गुलाबी

 इशारा केला ना गोड

 अनुराग रंगलेला

 सख्या साजणाची ओढ

स्त्री आणि तिला माहेरची आठवण येणार नाही, शक्य आहे? रेणुका ताईंच्या या संग्रहात मन गेले माहेरा ही माहेराची सय येणारी कविता.

 मन गेले ग माहेरा

 आमराई पिकलेली

 गंध आला आला आला

 मोहरून मीही गेली.

….  माहेरच्या वैभवाचा प्रत्येकच मुलीला अभिमान असतो. या कवितेत तो दिसून येतो.

भक्ती म्हटली की कवितेत प्रथम दिसतो तो कृष्ण. काव्यरेणूमध्येही गोकुळचा बासरीवाला आहे. भक्तीत तन्मय झालेल्या रेणुकाताईही कृष्णामध्ये एकरूप होतात. त्या म्हणतात,

 माझे मन धुंद होते

 सांजवेळी सायंकाळी

 अवचित वेणू वाजे

 वृंदावनी ये झळाळी

 क्षण पळभर एक

 कान्हामय सारे झाले

 एकरुप होऊन मी

 कृष्णा सवे पुन्हा आले

…. कधी मी बसावे अशा शांत वेळी ही कविता कृष्णभक्तीवरच आहे. सुमंदारमाला या वृत्तात ती

लिहिली आहे परंतु शब्दयोजना करताना कुठेही प्रयास पडल्यासारखे वाटत नाही. कंठ्यातील मोती सरसर सरकत जावेत तसे एक एक शब्द रेणुकाताईंच्या लेखणीतून उतरले आहेत.

राम लल्लाच्या चरणी घेऊया विश्राम हे भक्ती गीत त्यांनी लिहिले आहे.

पांडुरंगाच्या भेटीशिवाय भक्तीचे प्रदर्शन होणार नाही. आषाढीचा दिन या कवितेत पंढरपूरला जाणाऱ्या आणि जमलेल्या भक्तांची मनोवृत्ती रेणुकाताईनी चित्रित केली आहे.  त्या लिहितात,

 भगवी पताका फडके

 वारकरी मनात साठलं

 चिपळ्यांचा नाद बोले

 माऊली विठ्ठल भेटलं

 …. कविता वाचताना वाचकालाही कवयित्री पंढरपूरला घेऊन गेल्यासारखे वाटते.

रेणुका ताईंची आजीची पैठणी शांताबाईंच्या पैठणीची आठवण करून देते.

फडताळात एक गाठोडे आहे ..  त्याच्या तळाशी अगदी खाली  जिथे आहेत जुने कपडे कुंच्या  टोपी शेले शाली ..  त्यातच आहे जपून ठेवलेली एक पैठणी

पैठणीच्या घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले

 …. या शांताबाई शेळके यांच्या ओळी. आणि रेणुका ताई लिहितात,

 जुन्या काळ्यापेटीत वस्तू मौल्यवान

 आजीची पैठणी त्यात आनंदाचे दान

 आयुष्याचे सारे उन्हाळे पावसाळे

 पैठणीने पाहिले या सारे सुख सोहळे

 …. क्या बात है!

आयुष्याचा सातबारा – आयुष्यावरील फार सुरेख कविता. माणसाचा देह पंचमहाभूतांचा असतो यावर आधारित रेणुका ताई लिहितात,

चक्र अविरत चाले । ऊन वारा  माती पाणी

पंचतत्व संचारात । शरीराची ही कहाणी

जन्म आणि मृत्यू मध्ये । असे पोकळ गाभारा

त्यात असतो राखीव । आयुष्याचा सातबारा

…  किती प्रगल्भता आहे या विचारात!

माणसाकडे सर्व गोष्टी असूनही त्यात समाधान नसल्यामुळे तो कसा उपाशी सैरभैर फिरत राहतो याचे सार्थ वर्णन तुझा रिकामा झुला या आध्यात्मिक कवितेत रेणुकाताईने केले आहे.  त्या लिहितात,

अंतरात तो तुझ्याच आहे,  परि न दिसला तुला

सैरभैर हे मन फिरणारे,  तुझा रिकामा झुला

आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या रेणुकाताई त्यांच्या माय मराठीची कथा या अष्टाक्षरीत जात्यावरच्या ओव्या, अभंग, भारुड, लावणी, बखर, लोकगीते, कथा, कादंबऱ्या या सर्वच साहित्याने आपली मराठी भाषा कशी नटली आहे याचे वर्णन करतात.

आली दिवाळी माझ्या घरात, राखी पौर्णिमा नभांगणी, वसुबारस, चैत्रगौर अशा हिंदूंच्या पारंपारिक सणांविषयीच्याही कविता आहेत.

सर्वच बासष्ट कवितांचा परामर्श घेणे शक्य नाही, परंतु पूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर रेणुकाताईंचा अभ्यास, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, सकारात्मक मनोवृत्ती, आणि अत्यंत संवेदनशील मन  याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. त्या त्यांच्या मनोगतात म्हणतात ” कविता अंतरातून येते, ती तयार होत नाही.” काव्यरेणूतील सर्वच कविता अशा अंतरातून आलेल्या आहेत, म्हणूनच त्या वाचकांच्या थेट अंतकरणाला भिडतात.

त्यांच्या लेखनातील वैशिष्ट्य म्हणजे, कविता वृत्तबद्ध असो वा नसो, प्रत्येकच कवितेत लय साधली आहे, जी कोणत्याही पद्यप्रकारासाठी आवश्यक आहे.

रेणुकाताई एक प्रतिभाशाली कवयित्री आहेतच पण त्याचबरोबर त्या एक उत्तम चित्रकार आहेत. काव्यरेणू या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी स्वतः तयार केले आहे. त्यांनी काढलेल्या विविध रांगोळ्यांचा कोलाज करून मुखपृष्ठ तयार झाले आहे.  त्यांच्या या कलेला नक्कीच दाद दिली पाहिजे.

काव्यसंग्रह संपूर्ण वाचल्यावर माझी जी प्रतिक्रिया झाली तीच प्रतिक्रिया या पुस्तकाचे प्रस्तावना लेखक श्री विलास एकतारे यांचीसुद्धा झाली आहे, हे प्रस्तावना वाचल्यावर माझ्या तात्काळ लक्षात आले.

पुढील येणाऱ्या काळात सौ रेणुका धनंजय मार्डीकर  यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित होवोत आणि त्यांना भरभरून यश प्राप्त होवो या माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “माझ्या चष्म्यातून”…अर्थात ‘चित्रकाव्य‘ – कवी : प्रमोद वर्तक ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “माझ्या चष्म्यातून”…अर्थात ‘चित्रकाव्य’ – कवी : श्री प्रमोद वर्तक ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक            : “माझ्या चष्म्यातून”…अर्थात ‘चित्रकाव्य’

कवी              : श्री प्रमोद वर्तक

पृष्ठे                : ९५

मूल्य              : रु. १००/_

विनोद  आणि विडंबनात्मक  लेखनातून वाचकांना मोद मिळवून देणा-या श्री. प्रमोद वर्तक यांचे नवे कोरे पुस्तक ‘ माझ्या चष्म्यातून ‘ नुकतेच हाती पडले.हे त्यांचे दुसरे साहित्यिक  अपत्य. (यावेळेला जुनं झालं.त्यातलं एक ).पुस्तकावर शिर्षकामधे ‘अर्थात चित्रकाव्य ‘ असेही लिहीले आहे.म्हणून  उत्सुकतेने उघडून,चाळून पाहिले.त्यानंतर  मला   ‘माझ्या चष्म्यातून ‘ काय काय दिसले ,ते तुम्हालाही दाखवण्याचा हा प्रयत्न !

व्यक्तिचित्रण  हा प्रकार आपल्याला माहित आहे.एखाद्या व्यक्तीचे शब्दांच्या माध्यमातून  हुबेहूब  वर्णन  करणे म्हणजे व्यक्तीचित्र. म्हणजे  रुप, रंग, बोलणे, उठणे बसणे, सवयी, स्वभाव अशा अनेक वैशिष्ट्यांनी बनलेली ती व्यक्ती एखाद्या चित्राप्रमाणे आपल्यासमोर उभी राहते,तेही कुंचला न वापरता केवळ शब्दांच्या माध्यमातून. चित्रकाव्य हा एक वेगळा प्रकार या पुस्तकात पहायला मिळतो. एखादे चित्र किंवा छायाचित्र पाहिल्यावर आपल्या तोंडून सहजपणे वा, मस्तच, बापरे, किती छान असे उद्गार निघतात. पण तेच चित्र पाहून कवीमनाचा माणूस  फक्त  एवढ्यावर थांबत नाही.तर त्याच्या मनात काव्यात्मक  शब्दांतून प्रतिक्रिया उमटतात.चित्राला पाहून उमटलेल्या या प्रतिक्रिया म्हणजेच ‘चित्रकाव्य ‘!

श्री. प्रमोद वर्तक 

श्री. प्रमोद  वर्तक  यांच्या ‘ माझ्या चष्म्यातून  ‘ या पुस्तकात  अशी  चित्रकाव्ये आहेत. म्हणजे चित्रही आहेत आणि काव्यही आहेत. या पुस्तकात  एकंदर ८८ चित्रे किंवा छायाचित्रे आहेत व तितकीच काव्ये आहेत.चित्राला अनुसरून काव्य  असल्यामुळे चित्र कशाचे आहे ते समजून घेणे आवश्यक  आहे.

सुरूवातीला  पाच सहा छायाचित्रे ही देवदेवतांची असून साहजिकच  त्यांचे वर्णन  करणा-या काव्यपंक्ती  वाचायला मिळतात.त्यानंतर मात्र  विषयांची विविधता असणारी चित्रे आहेत  व त्याला अनुसरून  केलेले काव्य आहे.चित्र  व त्याखाली लगेच काव्य  असल्यामुळे वाचक चित्र  व काव्य  या दोन्हीत रमून जातो.यामध्ये आपल्याला निसर्ग, त्यातील प्राणी,पक्षी,गोंडस बालके,सागर यांची चित्रे बघायला मिळतात.त्याबरोबरच  नामवंत  व्यक्ती  कलाकार, सामान्य  माणसाची सुखदुःखे, आनंदाचे क्षण, छायाप्रकाशाचा खेळ, एखादी वृत्तपत्रीय बातमी ,जाहिरात अशी नाविन्यपूर्ण   छायाचित्रे पहायला मिळतात.या सर्वांचे समर्पक  वर्णन  करणारी छोटीशी कविता वाचायला मिळते.काही वेळेला कवी आपल्याच भावना बोलून  दाखवत आहे असे वाटते तर काही वेळेला एकदम  नवीन कल्पना कवी आपल्यासमोर मांडतो. कवीने एका छायाचित्रावर तर दोन वेगवेगळी काव्ये केली आहेत.एकाच चित्राकडे कवी वेगवेगळ्या नजरेने कसे पाहतो, ही कवीच्या चष्म्याची किमया काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पुस्तक  वाचल्याशिवाय कसे कळणार ?,(पान क्रमांक  ४६ व ४७). एखादा अल्बम बघावा तसे आपण एक एक पान उलटत जातो आणि शेवटच्या पानापर्यंत  कधी येऊन पोचलो समजतही नाही.मऊ मुलायम गुळगुळीत  कागदावरील रंगीबेरंगी चित्रे आणि कवीचे शब्दरंग यामुळे हे पुस्तक  वाचताना मनाला मिळणारा आनंद सुगंधी फुलाच्या गंधाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा असा आहे.

फक्त   एक चित्रकाव्य इथे देत आहे.

आधुनिकतेच्या वाटेने जाणा-या  श्री.प्रमोद वर्तक  यांनी एका आधुनिक काव्यसंग्रहाची निर्मिती करुन मराठी साहित्यात वेगळी वाट तयार केली आहे.त्याबद्दल  त्यांचे हार्दिक  अभिनंदन  आणि पुढच्या जुळ्या (साहित्यिक) अपत्यासाठी शुभेच्छा ! 

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘द अल्केमिस्ट’ – लेखक – पाउलो कोएलो अनुवाद – श्री नितिन कोत्तापल्ले ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘द अल्केमिस्ट’ – लेखक – पाउलो कोएलो अनुवाद – श्री नितिन कोत्तापल्ले ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

पुस्तकाचे नाव – द अल्केमिस्ट

लेखक – पाउलो कोएलो

अनुवाद – नितिन कोत्तापल्ले

पद्मगंधा प्रकाशन

पृष्ठसंख्या-160

अल्केमिस्ट या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे धातु परिवर्तन विद्या प्राप्त झालेला माणूस, किमयागार सिद्धपुरुष इत्यादी.या पुस्तकामध्ये या शब्दाचा अर्थ इतर धातू चे रूपांतर सोन्यामध्ये करणारा किमयागार असा अभिप्रेत आहे.

माणसामध्ये असणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही मिळू शकतो हा या पुस्तकाचा गाभा आहे.संपूर्ण पुस्तकाची कथा सॅन्तियागो नावाच्या मुलाच्या स्वप्न आणि स्वप्नपूर्ती भोवती फिरते. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो त्याच्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतो, त्यात त्याला काय आणि किती अनंत अडचणी येतात, तरी तो त्याची स्वप्नपूर्ती कशाप्रकारे करतो याचे खूपच रोमांचकारी वर्णन या पुस्तकात केलेले आहे

पुस्तक तर सुंदर आहेच पण अनुवादकार नितीन कोत्तापल्ले यांनी लेखकाचा परिचय दिलेला आहे तो पण मला येथे नमूद करावासा वाटतो. पाउलो कोएलो यांचा जन्म 1947 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याने लेखक व्हायचा निश्चय केलेला होता. मात्र वडिलांसारखे असल्याने इंजिनियर व्हावे असे त्याच्या आई-वडिलांचे मनसुबे होते. त्याचे वाङ्ग्मया वरील प्रेम त्याच्या आई-वडिलांना अतिरेकी वाटत होते. ते त्याला वेडा ठरवत होते. या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या मधला बंडखोर जागा झाला व बेताल वागू लागला. त्याकरिता त्याला मनोरुग्णालयातील विजेचे झटके देऊन उपचार करण्यात आले होते. पण त्याने त्याचे साहित्यावरील प्रेम अबाधित ठेवले होते. पुढे 1976 पर्यंत 65 गाणी लिहून ब्राझीलचा रॉक संगीताला त्याने नवीन चेहरा दिला होता. कालांतराने स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यामुळे राजसत्तेने त्याला तुरुंगात डांबून त्रास दिला. सुटकेनंतरही  दोन दिवसांनी छळ छावणीमध्ये मरणप्राय वेदनांचा सामना त्यांनी केला. शेवटी मनोरुग्ण असल्याचं नाटक करून त्याने छळ छावणीतून सुटका करून घेतली होती. ही सारी त्यांच्या वयाच्या 26 व्या वर्षाच्या आधीची कहाणी. नंतर कालांतराने त्यांनी 41 व्या वर्षी ही अतिशय वेगळी कादंबरी लिहिली. ती म्हणजे द अल्केमिस्ट. सुरुवातीला फारशी कोणाच्या लक्षात न आलेली ही कादंबरी. पण नंतर जनतेने या कादंबरीला अक्षरशः डोक्यावर घेतले. या कादंबरीचा 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे व कोट्यवधी प्रतींच्या विक्रीचा उच्चांक नोंदवला आहे.

अगदी भारावून जाण्यासारखे कथानक असल्याने वाचताना खंड पडू नये असे सतत वाटत राहते. सुप्रसिद्ध गायिका मॅडोना म्हणते इतरत्र ज्या खजिन्याचा आपण शोध घेतो ते आपल्याच जवळ असतात हे सांगणारी ही परी कथा आहे.

“का उगाच शोधत बसशी ? तुझे असे तुझे तुज पाशी”याचा  प्रत्यंतर हे पुस्तक करून देते

ही कथा आहे सँतीयागो नामक एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या मुलाची. त्याच्या घरच्यांना तो धर्मगुरू व्हावा असं वाटत होतं पण केवळ वेगवेगळे प्रदेश पाहण्यासाठी, प्रवास करण्यासाठी हा मुलगा मेंढपाळ बनतो त्याला एक स्वप्न पडतं की एक लहान मुलगी त्याच्या मेंढ्या बरोबर खेळत आहे. ती चिमुकली त्याचा हात हातात धरून त्याला इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये आणते व सांगते ह्या पिरॅमिडमध्ये तुला खजिना सापडेल. असे स्वप्न त्याला दोनदा पडते. सँतीयागोला मेंढपाळाचे काम करत असताना बरीचशी मोठी मोठी पुस्तके वाचायची आवड होती. अशा या स्वप्न वेड्या सँतीयागोला स्वप्नाचा पाठलाग करत असताना काय काय अडचणी येतात, कोण कोण त्याला मदत करतं याच रोमहर्षक वर्णन अगदी शेवटपर्यंत केलेले आहे. त्याच्या या अद्भूत प्रवासात त्याला खूप जण भेटतात कुणी मदत करणारे, कुणी त्रास देणारे, त्याची सुंदर प्रेयसी आणि खास करून किमयागार. हा किमयागार वारंवार प्रोत्साहन देऊन त्याला स्वप्नपूर्ती कडे कसा नेतो हे वाचणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे. सर्व अडी अडचणीतून शेवटी त्याला खजिना सापडतोच ते फक्त आणि फक्त तो त्याच्या हृदयाचे ऐकत असतो यामुळेच.

एकंदरीतच आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला पाहिजे ते मिळवू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा असा संदेश हे पुस्तक देते. आपल्यामध्ये जर आशावाद असेल तर कोठेही आणि केव्हाही एक किमयागार म्हणजेच आपला आंतरिक आवाज हा आपल्यासाठी हजर असतो. जो आपल्यातील अफाट शक्तीचा वेळोवेळी आपल्याला साक्षात्कार करून देतो. हेच या पुस्तकाचे सार आहे.

या पुस्तकात खूप सुंदर वाक्य वाचनात आली ती अशी

हृदयाचे नेहमी ऐक. हृदयाला सर्व गोष्टी कळतात कारण हृदय हे विश्वातम्याचाच  एक भाग असतं. एक दिवस ते तिथेच परत जाणार असतं.

मृत्यूची धमकी नेहमीच माणसाला जीवनाविषयी सजग बनवते.

आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो.

तुझ्या हृदयाला सांग प्रत्यक्ष दुःखापेक्षा दुःखाची भीती ही अधिक वाईट असते.

तर असे हे पुस्तक सर्वांनीच वाचावे पण किशोरवयीन युवक युवतींनी आवर्जून वाचावे असे आहे. आपला आंतरिक आवाज ओळखून सकारात्मक विचारसरणीने भारावून जाण्यासाठी नक्कीच वाचा हे खूप सुंदर पुस्तक.

धन्यवाद

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली – मो.नं 9552298887

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “सांजधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “सांजधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सूर्य अस्ताला चालला आहे. सर्वत्र केशरी संधीप्रकाश पसरला आहे. तेच प्रतिबिंब जलात असून जलकाठावर असलेल्या एका झाडावरून एक पक्षी ओरडत आहे. असे एक साधारण संध्याकाळचे चित्र.

त्यावरील शिर्षक सांजधून हे तो पक्षी ओरडत नसून एक धून गात आहे असे सुचवते.

मन सांजेप्रमाणे विभोर होते आणि मनात संध्या समयीची हुरहूर जाणवते.

साधारण संध्याकाळ झाली की देवघरात दिवा लावतात. तसाच सृष्टीच्या घरातील क्षितिजावरील देवघरात हा संध्यादीप कोणी लावला आहे असा विचार मनात येतो.

संध्याकाळ जाऊन आता अंधार पडणार आहे ती कातरता नकळत मनाला जाणवते. तशीच ती ढगांच्या कडेवरही जाणवते.

मग उगचच तो पक्षी चकोर पक्षी आहे आणि आता आकाशात चंद्र उगवेल म्हणून ते चांदणे प्यायला सज्ज होऊन चोच उघडून बसला आहे असे वाटते.

सूर्यबिंब हे अस्ताला गेले तरी चराचर जागृत राहणार आहे हे झाडाच्या आणि पक्षाच्या छबीतून समजते.

एका दिवसाची कहाणी संपत असली तरी मनात उद्याची आशा देणारी छान स्वप्नांची रजनी प्रदान करणारी अशी संध्याकाळ वाटते.

भगवेपणामुळे सन्यस्त योग्या प्रमाणे वाटणारा सूर्य मनाला धीरगंभीरताही प्रदान करतो.

असे संध्याकाळचे अनेक अर्थ सांगणारे हे चित्र आहे.

पण सरळ सरळ असे वाटणारे चित्र जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर हे एक सांकेतिक अर्थ सांगणारे चित्र वाटते. सगळ्यांनाच हे माहित आहे की शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली होती. मग त्या सोन्याच्या स्पर्शाने सगळी भूमी सोन्याची झाल्यासारखी वाटून त्या भूमीवर येणाऱ्या झाडांना सोन्याची फळे येतील ही ग्वाही तो पक्षीही सकलांना देत आहे.

म्हणूनच की काय पण शिवाजी महाराजांनी फडकवलेली ही भगवी पताका रोज आपण विसरलो तरी निसर्ग विसरत नाही आणि नेमाने ही पताका फडकवतो असे वाटते.

गुढार्थ बघितला तर कोणी सन्यस्त योगी सूर्य रूपाने येणार तो जाणार असे शिकवून आता जो क्षण लाभला आहे तो आनंदाने जगून घ्या सन्मार्गी लावा असा संदेश देत आहे.

पुस्तकाच्या अंतरंगात डोकावले की कळते हे श्री मोहनलाल वर्मा यांच्या हिंदी भाव कथानचा मराठी अनुवाद आहे. मग असे वाटले हे त्या भाव कथानंमधील वेगवेगळे भावरंग दाखवून सुरेखशी संध्याकाळ स्वतः एक सांजधून गात आहे.

खरच वेगवेगळ्या कथामधील वेगवेगळे भाव पण एकाच मनात दाटणारे असे एकाच चित्रात दाखवणारे हे चित्र वरवर पाहाता अगदी साधे वाटते पण खूप सारे भाव जगवणारे आहे.

इतके छान मुखपृष्ठ चित्र देणाऱ्या श्री अन्वर पट्टेकरी, प्रकाशक पराग लोणकर :-प्रियांजली प्रकाशन आणि लेखिका सौ उज्ज्वला केळकर यांना खूप खूप धन्यवाद

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हाती ज्यांच्या शून्य होते” – लेखक : श्री अरुण शेवते ☆ परिचय – सौ. जस्मिन रमजान शेख ☆

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “हाती ज्यांच्या शून्य होते” – लेखक : श्री अरुण शेवते ☆ परिचय – सौ. जस्मिन रमजान शेख ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : “हाती ज्यांच्या शून्य होते”

संपादकः  श्री अरुण शेवते

प्रकाशक : ऋतुरंग प्रकाशन,मुंबई

३५ वी  आवृत्ती : ऑगस्ट २०१७

पृष्ठः २३२

किंमतः २५०/-

शून्य म्हणजे काहीच नाही असेच आम्ही शाळेत शिकलो अन् आता शिकवतो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर कळलं की शून्याला किती किंमत आहे, शून्य किती शक्तिवान आहे. ज्यांच्या हाती बाकी  उरलेली असते, ते त्या बाकीच्या बेरीज वजाबाकीतच अडकून पडतात. मात्र ज्यांच्या हाती शून्य असते ते नवे विश्व निर्माण करतात. अवघ्या विश्व निर्मितीची शक्ती या शून्यात आहे.

लेखकाच्या  मनोगतातील पहिले वाक्यच मेंदूला झिणझिण्या आणणारे आहे. कर्तृत्ववान माणसाच्या ऐश्वर्यामागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. खरंच यशाच्या शिड्या चढून वर गेलेली व्यक्ती आपण पाहतो, पण त्या शिड्यांच्या जुळवाजुळवीचे श्रम किती भयानक आणि कष्टप्रद असू शकतात याचा विचारच कोणी करत नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्या लखाखत्या यशापेक्षा तो श्रमाचा काळाकुट्ट अंधारच इतरांचे आयुष्य उजळवणारा ठरतो. या अंधारातील प्रकाश शोधण्याचं आणि ते सर्वांपुढे मांडण्याचं शब्दरुपी ,उत्तूंग असे कार्य लेखक, संपादक अरुण शेवते यांनी केलेले आहे.

या संग्रह पुस्तकात गदिमा,सुधीर फडके, ए.पी.जे.अब्दुल कलाम, यशवंतराव गडाख, लता मंगेशकर, महेमूद, कर्मवीर भाऊराव पाटील, एम.एफ.हुसेन, सुशीलकुमार शिंदे, निळू फुले, अशा आपल्या भारतातील, तर शेक्सपिअर, अब्राहम लिंकन, चार्ली चापलीन, स्टीव्ह जॉब्स, ग्रेटो गार्बो अशा अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कीर्तिमान व्यक्तींच्या आयुष्यातील गडद सावलीचे दर्शन आपल्याला घडवून आणलेले आहे.  एका एका हिऱ्याचे पैलू खुलवून दाखवले आहेत. 

मंधू मंगेश कर्णिक यांच्या ‘ नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होतो ‘ असे शिर्षक असलेल्या लेखामध्ये ए.  पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील बरेच बारकावे टिपलेले आहेत. त्यातील काही वाक्ये आणि त्यांचे अनुभव कलाम यांच्या प्रेमळ, संवेदनशील मनाचे रहस्य उलगडून समोर आणतात. ती वाक्ये म्हणजे        “प्रार्थना, उपासना सर्वत्र एकाच पवित्र भावनेने केली जाते “ हा महान मंत्र त्यांना श्री रामेश्वरम येथील शिवमंदिरातील घंटानादाने आणि नजीकच्या मशिदीतील आजान यांनी शिकवला. ‘ सर्व जगातील माणूस हा एकच आहे आणि त्याचे कल्याण साधण्यातच परमेश्वराची खरी उपासना आहे.’ त्यांच्या  पुढील आयुष्यातील यशाचे गमक इथे सापडते. 

श्यामला शिरोळकर लिखित ‘ ग्रँड इंडियन सर्कसचे सर्वेसर्वा विष्णुपंत छत्रे, यातून श्री छत्रे यांच्या आयुष्यातील अनेक घटना आपल्याला प्रेरकच ठरतात. ‘आपल्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडावे ‘ असे विचार लहानपणापासूनच विष्णूपंत यांच्या मनात थैमान घालत होते. त्यांच्या चाबुकस्वाराच्या नोकरीपासून ते ग्रँड सर्कसच्या उभारणीपर्यंत त्यांच्या जीवनात आलेले चढ उतार वाचताना प्रत्येक घटना डोळ्यासमोरून चित्रपटासारखी सरकत जाते. हातात काहीही नसताना हजारो लोकांपुढे विल्सन सर्कसच्या मॅनेजरसमोर  त्यांनी केलेली गर्जना त्यांनी एका वर्षात पूर्ण केली. त्यांचे धाडस, हुशारी आणि जिद्द वाचकाला बरंच काही शिकवून जाते.

तसेच  कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवणारे स्टीव्ह जॉब्ज,  पोस्टमास्तर असलेले पण पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले अब्राहम लिंकन, खाटीकखान्यात नोकरी करत, रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता जगविख्यात नाटककार बनलेले शेक्सपिअर,  कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी करत, घर व कुटुंब सांभाळत स्वतःच्या कलेवर जग जिंकणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर, गदिमा, गुलजार, एम.एफ. हुसेन, धीरुभाई अंबानी अशा अनेक दिग्गज लोकांच्या जीवनातील संघर्षाचे आणि त्यातून संपादन केलेल्या उत्तुंग यशाचे चित्रण या संपादकीय पुस्तकात वाचायला मिळते. या सर्वांच्या आयुष्यात एकच सामाईक गोष्ट होती ती म्हणजे शून्य ! त्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले. जगापुढे एक आदर्श ठेवला. 

शेवटी संपादकीय मनोगतात मा. अरुण शेवते म्हणतात, “ तुम्हीसुद्धा हाती शून्य असताना स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण करू शकता.” …..  हे वाक्य प्रत्येकाला आकाशात उंच भरारी घेण्याचे बळ देते. म्हणूनच हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे.

परिचय : सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “बियॉन्ड लिमिट्स” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “बियॉन्ड लिमिट्स” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

ठसठशीत कुंकू काळजीची नजर आणि त्या नजरेच्या टप्प्यातले एक बालक एवढेच चित्र आणि त्याखाली लिहिलेले बियॉण्ड लिमिट्स हे शीर्षक. बस एवढेच छायाचित्र.

पण बारकाईने पहिले तर हे चित्र खूपसे बोलू लागते.

अगदी सरळ भाषेत म्हटले तर घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी या म्हणीवर आधारित चित्र काढा म्हटले तर ते असेच असेल.

एक आई संसार आणि नोकरीं दोन्ही सांभाळताना कायम तिच्या मनात आपल्या बाळाचे विचार असतात. तिला तिच्या बाळाचे रूप नजरेत कायम दिसते. याच विचारात ती आपली नोकरीं करत असते. ती आईची व्यथा, वेदना या चित्रातून स्पष्ट दिसते.

आईचे घर म्हणजे तिची धरती, तिची नोकरी म्हणजे तिचे आकाश. मग या धरती अंबरच्या मिलनी अर्थात क्षितिजावर तिला तिचे मूल स्पष्ट दिसत असते आणि या क्षितिजावरूनच त्याने गगनभरारी घ्यावी हे तिचे स्वप्न अगदी हुबेहूब रेखाटले आहे वाटते.

आपले बाळ हे स्त्रीचे हळवेपण असते तर तेच बाळ त्या बालकावर संकट आले तर तिचे बलस्थान पण होऊ शकते. हीच खंबीर नजर त्याचे कवच ठरू शकते असेही दाखवते.

बियॉण्ड लिमिट्स हे वाचल्यावर याच एका स्त्रीला आपल्या मर्यादा ओलांडून आपल्या बाळासाठी काही करण्याची इच्छा आहे हे लक्षात येते.

आईची नजर कायम आपल्या बाळावर असतेच पण ते कमी आहे म्हणून की काय पण कुंकवाचा तिसरा नेत्रही बाळाकडे रोखून पहात आहे असे वाटते.

हाच तिसरा नेत्र बालसूर्य होऊन बाळाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत आहे असे वाटते.

त्या चेहऱ्यावरील काळजीचा एक नेत्र क्षणभरही बाळाला ओझर होऊ देत नसला तरी दुसरा डोळा त्याच्या काळजीने झरतो आहे पण मोठ्या कौशल्याने हे अश्रू ती लपवते कोणाला दाखवत नाही असेही हे चित्र सांगते.

त्या चेहऱ्यावर केस विखुरलेले दाखवले आहेत. तिचे मन त्या प्रमाणे विस्कटलेले असले तरी तेच केस मुलायम रेशमी बंध होऊन मुलाला आईकडे खेचतात असाही अर्थ निघू शकतो पण एक आई आणि तिचे बाळ यामधील अतूट बंधाचे हे चित्र आहे एवढे मात्र निश्चित असले तरी अंतरंगात डोकावल्यावर कळते की आपल्या एकुलत्या एक मुलाला झालेल्या ब्लड कॅन्सर मुळे पिळवटलेले काळीज डोळ्यातून पाझरले तरी त्या लेकराला यातून बाहेर काढण्याची आई वडिलांची ही संघर्ष कथा तर मुलगा तन्मय याची या दुखण्यावर मात केलेली ही यशोगाथा आहे. तेच भाव या चित्रात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच या पुस्तकात गव्हान्कुराचा उल्लेख प्रामुख्याने औषधाच्या रूपाने आला आहे. या चित्रातील चेहऱ्यावरील केस किंवा पदराचे काठ हे त्या गव्हांकुरासारखे दिसतात. तेच तिच्या डोक्यात आहेत आणि त्यानेच ते बाळ वाढतंय असेही वाचल्यानंतर चित्रातून प्रतीत होते.

खरोखर वाचण्यासारखी प्रेरणादायी अशी ही कादंबरी  किंवा जीवनकथा आहे.

त्यासाठी मुखपृष्ठ कार अरविंद शेलार, परिस पब्लिकेशन आणि सगळ्यात महत्वाचे लेखिका हेमलता तुषार सपकाळ यांचे मन:पूर्वक आभार.

200 पानांची ही कादंबरी 350 रुपये एवढे मूल्य आहे. आशा आहे आपण ही कादंबरी घेऊन वाचालच पण एक प्रेरणादायी कथा म्हणून ती इतरांना पण भेट द्याल.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पैंजण ” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “पैंजण ” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

लेखिका- सौ राधिका भांडारकर

प्रस्तावना~ मा. श्री अरूण पुराणिक,पुणे

प्रकाशक- शाॅपीझेन ऑनलाईन,अहमदाबाद

सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर यांचे पैंजण हे एकूण ३५ लेखांचे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. या आधीही त्यांचे लव्हाळी आणि ग म भ न हे दोन लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. पुस्तकाची पृष्ठसंख्या केवळ ११३ असल्याने सर्व लेख सहज एका बैठकीत वाचता येतात. मुखपृष्ठ पाहताच पैंजणांची नादमधूर किणकिण कानी पडल्याचा भास होतो.एकेक लेख जसजसे वाचत जावे तसतसे लेखांना साजेसे असेच मुखपृष्ठ आहे याची खात्री पटते.

पुणे शहरी वास्तव्य असणारे सेवानिवृत्त शिक्षक,आणि सर्वांचे लाडके कवि/लेखक श्री. अरूणजी पुराणिक यांची या पुस्तकाला फार सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. जवळ जवळ प्रत्येकच लेखावर त्यांनी त्यांचे भाष्य केले आहे. ती वाचूनच या पुस्तकाचे स्थान किती मौल्यवान आहे याची कल्पना येते.

पैंजण या पुस्तकात त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, घरगुती, प्रेम, वात्सल्य, ममता, विविध क्षेत्रातील व्यक्ती, असे बहुविध विषय हाताळले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुबोध आणि ओघवती भाषा आणि लेखनातून सखोल विचार मांडण्याची हातोटी. नदीच्या प्रवाहाप्रमाणे त्यांची लेखणी सरसर पुढे जाते आणि नदी जशी वाहत असताना दुतर्फा काठावरील लता वेलीना पाणी पाजत पाजत जात असते तद्वतच राधिका ताईंचे लिखाण वाचताना वाचकांची तृष्णा शमून समाधान वाटते.

दिवाळीसारख्या मोठ्या सणाचे एक आगळे महत्त्व ‘एक दिवा त्यांच्यासाठी’ या लेखात आपल्याला वाचावयास मिळते. जे उपेक्षित आहेत, ज्यांच्या घरात रोजची चूल पेटणेही अशक्य आहे,  अशा वस्तीत जाऊन त्यांना दिवाळीचा आनंद देणे ही खरी दिवाळी असे त्या म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेल्या पसायदानाचा नेमका अर्थ या लेखातून वाचकांना नक्कीच उलगडतो.

पैंजण या नादमधूर शब्दाविषयी राधिका ताईनी केलेली सुरुवातच पैंजण या लेखात वाचकांना आकर्षित करते. त्या लिहितात, ” पैंजण हा एक तीन अक्षरी अनुनासिक शब्द. पण तो ओठावर येता क्षणीच निसर्गातील संपूर्ण रसमय रुणझुण घेऊन अवतरतो. पैंजण या शब्दात लाडीक भाव आहेत, लडिवाळपणा आहे, वात्सल्य आहे…” वाचकांना या शब्दातच रुणझुण आहे असं वाटत नाही का? मला तर हा लेख वाचताना छुम छुम करीत लाडिकपणे कृष्णाकडे चाललेली राधाच डोळ्यासमोर उभी राहिली. संपूर्ण लेखाची भाषा किती हळुवार आहे, हेच त्या लेखाचे यश आहे.

आईचा डब्बा प्रत्येकाने अनुभवलेला. आईने डब्यात पोळी चटणीचा रोल दिलेला असो, पोळी भाजी तर कधी इडली चटणी असो, किंवा उपमा पोहे असोत.  या डब्याच्या आठवणीने  सुखद अनुभूतीचा पुनःप्रत्यय घेताना फार आनंद वाटतो. म्हणूनच हा लेख मला पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो. आपल्या मुलांसाठी पोळी भाजीचा डबा करताना, आईच्या हातच्या डब्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जीवनातील असे छोटे छोटे क्षण, परंतु ब्रह्मानंद देणारे लेखिकेने टिपले आहेत. अगदी साधा विषय परंतु किती आनंद देणारा.

गौराई आली, ॠषिपंचमी महात्म्य, अक्षय तृतीया हे लेख वाचताना हिंदू संस्कृती, परंपरागत चालत आलेले हे सण, त्यामागील कथा या सगळ्यांचा राधिकाताईंनी परामर्श घेतला आहे.  तसेच भारत हा कृषीप्रधान देश आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता आपले बहुतांशी सणवार, उत्सव आपल्या भूमीशी, मातीशी जोडलेले आहेत यावर लेखिकेने विशेष भर दिल्याचे जाणवते. या सणांच्या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे जरुरीचे आहे ही शिकवण मिळते.

‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे ‘ हा लेख ! शीर्षक वाचल्यावाचल्या काहीतरी गहन विचार मांडले असावेत अशी शंका येते,  परंतु त्या लेखाची सुरुवातच अशी करतात की त्यांना  वाचकांना कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही.  या लेखात आपल्याला फक्त राधिकाताईच दिसतात. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची विचार करण्याची पद्धत, आणि मनात जे आहे, ते स्पष्टपणे,  निर्भीडपणे मांडण्याची त्यांची वृत्ती स्वच्छ दिसते. आजच्या काळाला अनुसरून त्यांनी जीवनाचा इनबॉक्स, अज्ञात सेंडर, रोजच्या रोज येणाऱ्या मेल्स, त्यातल्या मोजक्या वाचायच्या बाकी डिलीट करायच्या अशा प्रकारची शब्दयोजना करून वाचकांचे मनोरंजनही केले आहे. वाचकांना पुस्तकात कसे खिळवून ठेवावे हे राधिकाताई चांगले जाणतात यात शंकाच नाही.

राधिकाताई त्यांच्या मतांविषयी ठाम असतात आणि ती मते त्या प्रामाणिकपणे मांडतात. ‘ नांदतो देव हा आपल्या अंतरी ‘ हा लेख वाचताना याची प्रचिती येते.  त्या कबूल करतात की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या गोष्टी केवळ आपले कुटुंबीय, सगेसोयरे श्रद्धेने करतात म्हणून आपणही करावयास पाहिजेतच असे त्यांना कधी वाटत नाही. त्या देवळाच्या रांगेत देवदर्शनासाठी उभ्या राहणार नाहीत, पण म्हणून त्या नास्तिक आहेत असं नाही. देव म्हणजे नक्की काय? अस्तिक्यवाद, ईश्वर वाद वगैरे क्लिष्ट तत्त्वज्ञानात डोके घालण्याची त्यांची इच्छा नाही, कारण त्या सामान्य बुद्धीच्या आहेत हे कबूल करण्याची प्रामाणिकता त्यांच्यात आहे. शाळेत मॉरल सायन्समध्ये शिकलेले ” गॉड इज एव्हरीव्हेअर” हे वाक्य त्यांच्या मेंदूत चिकटलेले आहे.

क्षमा करणे ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. क्षमा एक अप्रतिम गुण.  या लेखात क्षमेचे महत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. ज्याला क्षमा करता येत नाही त्याची वृत्ती हिंसक आहे असे त्यांना सांगायचे आहे. कारण त्या लिहितात की “आजकाल विविध माध्यमातून … “मै तुम्हे देख लूंगा”.. “मुझसे बढकर कोई बुरा नही”..” आजपर्यंत माझी मैत्री पाहिलीस आता दुश्मनी अनुभव ” … अशा प्रकारची वाक्ये कानावर सतत आदळत असतात. ही सूडबुद्धी दर्शविणारी वाक्ये म्हणजे वाद,अशांतता माजविणारी हिंसक भाषा आहे.”

उन्हाळ्यात बागेतील सर्वच झाडे जेव्हा मरगळलेली दिसतात तेव्हा कोपऱ्यात वाढलेला निवडुंगच तेवढा आपले काटे दिमाखाने मिरवत हिरवागार राहिलेला असतो. लेखिकेच्या मनात येते की तिनेही असेच निवडुंगासारखे विराट वाटेवरही टवटवीत राहावे. मनातली ही भावना व्यक्त करणारा निवडुंग हा लेख,  वाचनीय !

जनरेशन गॅप हा प्रश्न नेहमीच सर्वांना भेडसावणारा आहे.  हाच विषय घेऊन वृद्ध आणि तरुण पिढीतील वैचारिक अंतर हा लेख राधिकाताईंनी लिहिला आहे. दोन पिढ्यातील अंतर आणि वैचारिक वाद हे सर्वच काळात चालू असतात आणि असणारच. पण म्हणून आधीच्या पिढीतील वृद्धांनी  त्यांच्या काळानुसार समजून घेणे किती आवश्यक आहे हे राधिकाताई या लेखात आवर्जून सांगतात. त्यांचे विचार किती प्रगल्भ आणि प्रॅक्टिकल आहेत हे हा लेख वाचताना जाणवते आणि त्यांच्याविषयी मनात आदरभाव निर्माण होतो. “नव्याकडे नव्याने दृष्टी बाळगावी. तक्रारीच्या सुरापेक्षा स्वीकृतीची, शिकण्याची मानसिकता बाळगावी. तेव्हाच दोन पिढीतील वैचारिक अंतर सुसह्य होईल” हा फार मौलिक संदेश त्यांनी वाचकांना दिला आहे.

सर्वच पस्तीस लेखांवर भाष्य करणे उचित  ठरणार नाही. थोडक्यात परामर्श घेताना एवढेच सांगेन की..  या ती आनंदाचे झाड लावून गेली अशा लेखातून मातेची ममता, वात्सल्य, तिने केलेले संस्कार यांचे किती महत्त्व असते, अशी ही शाळा यातून दिसणारा नात्यातला ओलावा, पुतळाबाईच्या जीवनातील कारुण्य, तरी करारी व्यक्तिमत्त्व, सावरकरांच्या जाज्वल्य आठवणी … हे सर्व वाचताना मनातील अनेक भावना उचंबळून येतात.

या पुस्तकातील प्रत्येकच लेख वाचकांना अंतर्मुख करतो आणि त्या त्या विषयावर चिंतन करावयास लावतो.

राधिका ताईंच्या लेखणीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही विषय हाताळताना त्या त्या संदर्भात राधिकाताई त्यांच्या जीवनातील विविध कटू गोड अनुभव सांगतात, त्यामुळे कोणताही विषय कधीच क्लिष्ट वाटत नाही. एक एक लेख जसजसे वाचत जावे, तसतशा राधिकाताई वाचकाला समजत जातात. त्यांचा वाचन ~लेखनाचा छंद, त्यांची रुढी परंपरा याविषयीची परखड मते, त्यांची सकारात्मक मानसिकता, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतूनही काहीतरी शिकण्याची त्यांची जिज्ञासा, त्यांचे संवेदनशील मन, त्यांच्या विचारातील स्पष्टता … असे नानारंगी व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांच्या लेखनातून उलगडत जातात. नकळतपणे वाचकांची आपापल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलत जाते हा माझा अनुभव आहे. राधिकाताईंचे एक एक लेख कुठेतरी आपल्याही जीवनाशी निगडित आहेत असे वाटते आणि हेच त्यांच्या लेखनाचे यश आहे.

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print