मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ अंतरंगातील प्रवास… – संकलक : चित्कला कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ अंतरंगातील प्रवास… – संकलक : चित्कला कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

पुस्तक : अंतरंगातील प्रवास

संकलक : चित्कला कुलकर्णी

प्रकाशिका : विद्या अनिल फडके, मनोरमा प्रकाशन.

मूल्य : रु. 550/-

पृष्ठे : 252

हे पुस्तक म्हणजे “निरोप, पुनर्भेट आणि नवा जन्म मिळाला” या तीन विषयांचे सुंदर गुंफण!

“अंतरंगातील प्रवास “ हॆ इचलकरंजी येथील चित्कला कुलकर्णी यांनी संकलित केलेले एक सर्वांग सुंदर वाचनीय पुस्तक आहे. याचे मुखपृष्ठ आपल्याला खिळवून ठेवते. व्यक्तीच्या जीवनातील आणि निसर्गातील उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंची ओळख या चित्रातून आपल्याला मिळते. मनोरमा प्रकाशन ने प्रकाशित केलेले आणि माय मराठी आणि इचलकरंजी मायबोली लेखन, वाचन कट्ट्यास अर्पण केलेले हे पुस्तक सर्व सजग वचकांसाठीच आहे.

या पुस्तकामध्ये आपल्याला 57 लेख वाचायला मिळतात. प्रत्येक लेख आपल्याला वेगळा अनुभव नक्कीच देते. निरोप देता घेता या भागातील नावच आपल्याला त्यातील आशय सांगून जातो. चित्कला ताईंनी निसर्गाच्या सहवासात रमत उसळीसारख्या इवल्याशा गवताच्या निरोपाचे मन हेलावून टाकणारे भावस्पर्शी वर्णन मनाला थेट भिडते. शाळेचा, कॉलेजचा, मामांच्या निरोपाच्या नारळाची गोष्ट, इंग्लंड मधल्या इपस्वीच गावाचा लागलेला लळा आणि त्या गावाचा निरोप घेताना लेखिकेच्या मनाची झालेली घालमेल वाचून आपले हे डोळे ओलेते होतात. माहेरचा निरोप तर सगळ्यांनाच रडवतो. विनयाताईंनी या निरोपाचा उपयोग सासरी आल्यावर संसाराचे नंदनवन फुलवायला करायचा, हे सांगून निरोप सुखद केला आहे. अशा निरोपाचे वर्णन वाचताना वाचक आपल्याही आयुष्यातील निरोपाच्या आठवणींमध्ये रमून जातो.

पुस्तकातील पुनर्भेट या दुसऱ्या भागामध्ये, पुनर्भेटीच्या अनेक अनुभवांमध्ये वाचक ही रमून जातो. पहिल्याच लेखामध्ये नागपूरच्या प्रज्ञा ताईंनी पहिल्याच बोलला सिक्सर मारली आणि वाचकाला धो धो पावसामध्ये ओले चिंब केले. निसर्गाला अनुभवत श्रीकृष्ण चरणी अर्पणही केले. माझा बल्लव या लेखामध्ये दीपा ताईने सात पानी ” यादों की बारात “लिहून आपल्या मनाची घालमेल, दोन ध्रुवावर दोघे आपण, ही कातर उल घाल अशी वर्णन केली आहे की आपण त्यात पूर्ण समरस होऊन जातो. म्हणूनच नक्की सांगावेसे वाटते की प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. श्रीनिवास दादांनी “इन्ही लोगोने ” या गाण्याचे केलेले विश्लेषण मनाच्या तळापर्यंत नक्कीच पोहोचते.

या पुस्तकातील प्रत्येक लेखच मनाला थेट जाऊन भिडतो. किती आणि काय वर्णन करावे हे समजेनासे होते. वैजयंती ताईंनी अल्लडवयामध्ये वाचलेल्या व पु काळे यांच्या “पार्टनर ” पुस्तकाची पुनर्भेट उतार वयामध्ये कशी पटली हे फार सुंदर शब्दात गुंफले आहे.

आणि नवा जन्म मिळाला या पुस्तकाच्या तिसऱ्या भागांमध्ये 23 लेख वाचताना वाचकाचे भान हरपून जाते. साध्या सरळ आयुष्यामध्ये एखादी घटना किती हादरवून टाकू शकते हे वाचून आपला जीवही थरारून जातो. त्या थरारक अनुभवांमधून मिळालेले पुढील पेनल्टी आयुष्य अर्थातच कसे आनंदात, समाधानात जगले जाते हे वाचून वाचकही हुश्य केल्याशिवाय राहत नाही. यासाठी चित्कला ताईंची निवड, लेखक निवड, आणि सुंदर सुंदर लेख यासाठी त्यांना दाद ही दिलीच पाहिजे. नंदनजींचा निरोप छोटा लेख. पण कलाकार कुटुंबाची आठवण त्यांनी किती जपून ठेवले आहे हे समजते.

फिनिक्स या नावामधूनच डॉक्टर असूनही सुरुवातीपासून नाट्य क्षेत्रात नट म्हणून चमकणाऱ्या नागपूरच्या डॉक्टर विजय या चमकणाऱ्या ताऱ्याचे मेडिकलच्या पहिल्याच वर्षी अपघाती हादऱ्याने आयुष्यातील भयानक परिस्थितीला कुटुंबाने कसे तोंड दिले हे वाचून खरोखरच मिळालेल्या पुनर्जन्माचे सार्थक त्यांनी केले हे समजून येते.

इचलकरंजीच्या डॉक्टर सुरेश यांनी वंध्यत्वाचे स्त्रियांवर होणारे मानसिक परिणाम आणि त्या समस्यांमधून त्यांची सुटका करून त्या कुटुंबाला मिळवून दिलेला आनंद खूप छान वर्णन केला आहे. त्या कुटुंबाला आईला आणि बाळाला नवा जन्म देण्यामध्ये डॉक्टर निश्चितच यशस्वी ठरले आहेत.

कैलास दर्शनाचा सुमुख यांचा सुखद अनुभव प्रभाताई यांनी कुशलतेने लिहिला आहे. गाभाऱ्यातल्या कारुण्य सिंधूचे दर्शन घेणारा शब्द गोठलेला मी केवळ सूक्ष्म मानवी बिंदू झालो होतो जणू! या मधूनच या यात्रेची सार्थकता आपल्यापर्यंत पोहोचते.

हर्षदा ताईंना आलेला भयानक अपघाताचा अनुभव वाचून मनाचा थरकाप होतो. पण त्यांच्या मनामध्ये इनरव्हील सेवा रुजल्यामुळे त्यामधून किती मोठे समाजकार्य पुढील आयुष्यात घडले हेही समजते जे खूप वाचनीय आहे.

घरच्या जर्मन शेफर्ड च्या हल्ल्याने घडलेला थरकाप तो प्रसंग स्मिता ताईंनी खुबीने रेखाटला आहे. त्या प्रसंगाचे परिणाम वाचताना वाचकही भीतीने थरारून जातो.

एकीची समाजसेवेची आवड गृहिणी असूनही या कार्यामध्ये झोकून देऊन कसे कार्य करते, केले हे अनुपमा ताईंनी थोडक्यात शब्दात छान सांगितले.

फक्त या भागातलेच नाहीत तर सर्व पुस्तकांमधले सर्वच लेख अप्रतिम! प्रत्येक लेखांमधून खूप काही शिकायला मिळते. सगळे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. पुस्तक वाचायला घेतले की पूर्णत्वाला नेल्याशिवाय खाली ठेववतच नाही.

चित्कला ताईंचे मार्गदर्शन, सर्व लिहित्या हातांचे प्रयत्न, वैचारिक मनाचे स्पंदन असलेले ” अंतरंगातील प्रवास ” पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचलेच पाहिजे.

चित्कलाताई, आणि त्यांच्या सर्व टीमला नवोदित उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

परिचय :  अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इस्त्रायल हमास हिजबुल्लाह” – लेखक : श्री रोहन अंबिके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इस्त्रायल हमास हिजबुल्लाह” – लेखक : श्री रोहन अंबिके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इस्रायल हमास हिजबुल्ला 

 – – – एक अविरत संघर्ष

लेखक : रोहन अंबिके

पृष्ठः २००

मूल्य: ३००₹ 

आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सतत चालू असलेल्या संघर्षांपैकी एक म्हणून इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्षाकडे पाहता येईल. हा संघर्ष खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक शत्रुत्व, विचारधारा आणि उदयास येत असलेल्या जागतिक युतींमुळे प्रभावित झाला आहे.

‘इस्रायल-हमास-हिजबुल्लाह’ हे पुस्तक या संघर्षाची सुरुवात, निर्णायक लढाया आणि त्याचे दूरगामी परिणाम यांचे सखोल विश्लेषण करते.

हे पुस्तक ऑक्टोबर २०२३ च्या युद्धाचे परीक्षण करते. हा एक असा निर्णायक टप्पा होता ज्याने या संघर्षाला एक नवीन दिशा दिली. त्याचबरोबर समकालीन युद्धतंत्रात सोशल मीडियाच्या वाढत्या भूमिकेचाही आढावा घेते. जिथे करण्यात येणारा प्रचार आणि दिशाभूल करणारी माहिती जागतिक कथानकांना आकार देत असतात. हे पुस्तक भारताच्या बदलत्या भूमिकेवरही प्रकाश टाकते, ज्यात ऐतिहासिक संबंधांपासून ते अधिकच ध्रुवीकरण झालेल्या जगातील राजनैतिक उपक्रमांपर्यंतच्या बाबींचा समावेश आहे.

सखोल संशोधन केलेले आणि सूक्ष्म बारकावे असलेले ‘इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह’ हे पुस्तक केवळ बातम्यांच्या मथळ्यांपुरते मर्यादित राहत नाही. तर ते जागतिक भू-राजकारणाला सतत आकार देणाऱ्या या युद्धावर अधिक अभ्यासपूर्ण दृष्टिक्षेप टाकणारे ठरले आहे.

आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सतत चालू असलेल्या संघर्षांपैकी एक म्हणून इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्षाकडे पाहता येईल. हा संघर्ष खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक शत्रुत्व, विचारधारा आणि उदयास येत असलेल्या जागतिक युतींमुळे प्रभावित झाला आहे.

पुस्तकाचे मुख्य विषय व वैशिष्ट्ये

इस्रायल या ज्यू राष्ट्राची निर्मिती, पॅलेस्टाईनचा प्रश्न आणि १९४८ पासून सुरू झालेल्या अरब-इस्रायल युद्धांचा ऐतिहासिक आढावा यात घेतला आहे.

हमास (गाझा पट्टी): हमासची स्थापना, त्याची विचारधारा, पॅलेस्टाईन मुक्ती चळवळीतील त्याची भूमिका आणि इस्रायलविरोधी सशस्त्र संघर्ष यावर प्रकाश टाकला आहे.

हिजबुल्लाह (लेबनॉन): शिया मुस्लिम संघटना म्हणून लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा झालेला विस्तार, इराणकडून मिळणारा पाठिंबा आणि इस्रायलसोबतचे उत्तर सीमेवरील युद्ध याचे विश्लेषण यात आढळते.

इराणची भूमिका: या संपूर्ण संघर्षामागे ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ (Axis of Resistance) च्या माध्यमातून इराण कशा प्रकारे हमास आणि हिजबुल्लाहला मदत करतो, हे पुस्तकात स्पष्ट केले आहे.

७ ऑक्टोबर २०२३ चे युद्ध आणि परिणाम: हमासने इस्रायलवर केलेला अभूतपूर्व हल्ला, त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये सुरू केलेली लष्करी कारवाई आणि या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर झालेले दूरगामी परिणाम याचे ताजे विश्लेषण पुस्तकात समाविष्ट आहे.

तटस्थ मांडणी: लेखकाने कोणत्याही एका बाजूचा पूर्वग्रह न ठेवता भौगोलिक, धार्मिक, राजकीय आणि लष्करी दृष्टीकोनातून या संघर्षाचे तटस्थपणे मूल्यमापन केले आहे.

मध्य पूर्वेतील हे युद्ध फक्त दोन देशांपुरते मर्यादित नसून जागतिक अर्थकारण आणि महासत्तांच्या राजकारणाशी कसे जोडलेले आहे, हे समजून घेण्यासाठी रोहन अंबिके यांचे हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि वाचनीय आहे.

अनुक्रमणिका :: 

१. ज्यू ओळखः इतिहास आणि आंतरधर्मीय संबंध

२. संघर्षाची पार्श्वभूमी

३. पूर्वइतिहास

४. संघर्षाची धगः लेबॅनॉन आणि गाझा युद्धे

५. ७ ऑक्टोबर २०२३

६. हमास आणि हिजबुल्लाह

७. इस्रायलचा दृष्टीकोन

८. आधुनिक संघर्षांमध्ये समाज माध्यमांची भूमिका

९. आंतरराष्ट्रीय सहभाग आणि शेजारी देश

१०. भारताचा दृष्टिकोनः मुत्सद्दीपणा आणि शांतता प्रयत्न

११. तंत्रज्ञान आणि युद्धः ड्रोन, सायबर वॉरफेअर आणि पाळत ठेवणे

१२. शांतता आणि भविष्यातील परिस्थितीची संभावना

१३. शेवट की सुरुवात?

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू” – लेखिका : सुश्री शोभा भालेकर ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

श्री प्रसाद साळुंखे  

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू” – लेखिका : सुश्री शोभा भालेकर ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

पुस्तक : निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु (कथासंग्रह) 

लेखिका : शोभा भालेकर

प्रकाशक : रोहन प्रकाशन

काही पुस्तकांची नावंच इतकी सुंदर असतात की कुठलाही संवेदनशील वाचक त्या पुस्तकाकडे आकर्षित होतोच. असंच रोहन प्रकाशनच्या ‘निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु’ या शोभा भालेकर यांच्या कथासंग्रहाबाबत घडलं.

या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. प्रत्येक कथेचा अवकाश हा भिन्न आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबतीतलं वैविध्य आपल्याला जाणवतं. या वेगवेगळ्या समाजातल्या कथा तितक्याच ताकदीने हाताळायला अफाट निरिक्षण शक्ती लागते, याबाबत लेखिकेचं खरंच कौतुक. भाषाशैलीही सोपी पण दर्जेदार आहे, त्यामुळे कथेच्या भावविश्वाशी आपण क्षणात तादात्म्य पावतो.

‘ अस्तित्व ‘ नावाचीच पहिलीच कोकणातल्या ग्रामीण भागात घडणारी कथा हा कथासंग्रह वाचण्याचा प्रवास रंजक असणार याची जाणीव करून देते. ही कथा कोकणात प्रत्येक वाडीत किमान एक दिसणाऱ्या दिशाहीन, सांगकाम्या, व्यसनी, व्यवहार आणि संवेदनाशून्य तरुणाचं आयुष्य दाखवते.

‘ अंग झिम्माड झालं ‘ या कथेत संसारी जबाबदारीत पिचलेल्या एक फरफटलेलं आयुष्य जगणाऱ्या नायिकेचा प्रवास तिने घेतलेल्या व्यक्तिगत निर्णयांना फार आदर्शवादाच्या सोयीस्कर फुटपट्या लावून जज न करता अनुभवतो. तिचं हे परिवर्तन कमाल आहे.

असाच नायिकेचा कायापालट पुढे ‘ चक्रव्यूह ‘ या कथेतही पहायला मिळतो. पण ‘ चक्रव्यूह ‘ या कथेतल्या नायिकेचा तरुण दिसण्याच्या अट्टाहासाला, किंवा त्या अनुषंगाने स्वतःच्या केलेल्या बेढब उपहासाला आपण निश्चित वेगळ्या चष्म्यातून पाहतो, जज करतो. म्हणजे एक स्त्री लेखिका असूनही ब्लॅक, व्हाईट, आणि ग्रे यात फरक करण्याची लेखिकेची वैचारिक स्पष्टता आपल्याला एकाच कथासंग्रहात पडताळता येते.

‘ या पंखावरती मी नभ पांघरती ‘ ही कथाही पंखांना स्वच्छंद विहारायचं बळ देणारी आहे. सुखासीन आयुष्यात लढायचं की नियतीपुढे झुकायचं हा प्रश्न पडतो तेव्हा फार क्वचित लढा निवडला जातो. आततायी पणा न करता या कथेतील नायिका आसावरी राखेतून भरारी घेऊन शून्यापासून विश्व निर्माण करण्याची धमक दाखवते, ते खरोखर स्फूर्तीदायक वाटतं.

‘ हिरकणी ‘ या कथेतही मोलकरणीचं काम करणारी श्रमिक नायिका रेखाटली आहे. आपल्या मुलाला चाळीत घर घेऊन देण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती काबाडकष्ट करते. तिच्या या स्वप्न पाहण्याच्या हिमतीचं आणि ते पूर्ण करू पाहण्याच्या जिद्दीचं खरंच कौतुक वाटतं.

श्रमिकांचंच बोलायचं झालं तर ‘रातकिडा’ ही एका बापाची कथा फारच संवेदनशीलतेने हाताळली आहे. यात खांदेदुखीने त्रस्त एक रिक्षावाला आपलं दुखरं शरीर विसरून मुलाला इंजिनियर बनवायची खटपट करतो. त्याचं ही शारीरिक दुखणी पचवून मुलाच्या इंजिनियरिंग सारख्या खर्चिक शिक्षणासाठी दिवसरात्र एक स्वप्नासाठी झोकून देणं पाहून खरोखर डोळे पाणवतात.

‘ निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरु ‘ ही कथाही वेगळ्या धाटणीची आहे. ही कथा आहे वृद्ध आईसाठी झटणाऱ्या सुषमाची. सुषमाचं लग्नाचं वय सरत आलेलं असतं पण तिने जणू आपलं तारुण्य, संसाराची स्वप्न सारं बाजूला सारून आईच्या सुश्रुषेसाठी स्वतःला डांबून घेतलं असतं. म्हणजे आईची सुश्रुषा वाईट नव्हें, पण आपल्या आयुष्यातली सुख नाकारणं हे खटकतं. कारण तिच्या भावंडांनी जबाबदारीतून सोयीस्कर पाय बाहेर काढून आपापले संसार सुखाचे केलेले असतात. हिने मात्र स्वप्नातल्या राजकुमाराच्या कहाणीची पानं स्वतःहून मिटलेली असतात, त्यामुळे तिचं आयुष्य हे प्रवाही न राहता त्याचं डबकं होऊ लागतं. आयुष्यातल्या एका सुवर्णमध्यापर्यंत येण्याच्या प्रवासाची ही एक सुंदर कथा आहे.

‘ तराने पुराने ‘ या लॉकडाउन काळात घडणाऱ्या कथेत आजीआजोबांच्या घरी रहायला येण्याने घरच्या खास करून लहान मुलांच्या बदलेल्या दिनचर्येचं खेळीमेळीचं गणित मांडण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.

या साऱ्याच कथा फार संवेदनशीलपणे हाताळल्या आहेत. वाक्य फार पल्लेदार नाहीत, उगाच बोजड शब्द नाहीत. वाक्यरचना सोपी आहे, त्यामुळे आशयगर्भ कथानकही एखाद्या नाजूक फुलासारखं सुरेख उमलतं. त्यामुळे आपल्यासारख्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मंडळींना ट्रेनमधून येताजाता वाचायला सोईचं ठरतं. अर्थात वाचायला कितीही सोपं असलं तरी सोपं लिहिणं ही कला मात्र अवघडच, त्यामुळे लेखिकेला विशेष दाद द्यावीशी वाटते.

परिचय : श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दीपपूजा ” – दीपा पुजारी ☆ परिचय – ज्योती विलास जोशी ☆

सौ ज्योती विलास जोशी 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ “दीपपूजा ” – दीपा पुजारी ☆ परिचय – ज्योती विलास जोशी ☆ 

पुस्तक : दीपपूजा 

लेखिका : दीपा पुजारी 

प्रकाशक : मनोरमा प्रकाशन, मुंबई 

पृष्ठे -२१६,

किंमत -४३५/-

दीपपूजा’ हे सौ. दीपा नारायण पुजारी या माझ्या मैत्रिणीचे मनोरमा प्रकाशनने प्रकाशित केलेले ललितबंध संग्रहाचे पहिले पुस्तक! एखादी लेखणी पहिल्या प्रयत्नातच आपली चाहूल देते. दीपाच्या या लेखणीने अनेक वळणं घेतली आहेत. अनेक माणसं तिला भेटली. अनेक ऋतूंतील रंगांची चित्रकारी तिने केली आहे या पुस्तकात… पहिल्या पुस्तकातूनच मनात साठलेले वाचकांपर्यंत पोहोचवण्याची तिची आतुरता जाणवते. साध्या प्रसंगातून असाधारण शोधाची दृष्टी या लेखिकेला आहे. घर, माणसं, नाती, निसर्ग आठवणी, अनुभव या रोजच्या जगण्याला लेखिकेने आपल्या संवेदनशील नजरेने पाहिलेलं आहे. विषय फार मोठे नाहीत परंतु त्यातला आशय मोठा आहे.

‘माझी अस्मिता’ या ललित बंधातून तिने स्वतःला प्रतिबिंबित केले आहे. अभंगाच्या ओळी, ओव्या पेरून लिहिलेले काही विषय चिंतनशील असे आहेत. त्यातून तिने सात्विक जीवनशैलीचे दर्शन घडवलंय.

‘सावळगंध’ ‘नाचे मयुरी’ ‘फुलपाखरू’ अशा विषयातून तिने निसर्गाशी अनुसंधान साधलंय.

‘कपडे पटाची दंगल’ ‘पैठणी’ अशा ललितबंधातून तिच्यातील गृहिणी डोकावते.

‘राजस मोमोज’ ‘चकुल्या’ अशा काही पाककृतीतून ती सुगरण असल्याची प्रचिती येते.

वाचकांशी फारसं अंतर न ठेवता अगदी शेजारी बसून एखादी आठवण सांगणारी अशी ही लेखिका, छोट्याशा घटनेतून जीवनाचा अर्थ आपल्यासमोर ठेवते. तिच्या निरीक्षण शक्तीला दाद दिली पाहिजे. भाषाशैली ओघवती, वाचकाच्या मनाची पकड घेणारी, रसाळ, काव्यमय, विनोदी अशी आहे.

काही पुस्तकं आपण वाचतो, बाजूला ठेवतो पण काही पुस्तकं मनाच्या कोपऱ्यात शांतपणे वाचत राहतात. त्यामुळे आपल्यालाही आयुष्यातील विस्मृतीत गेलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवतात. तसेच काहीसे हे पुस्तक… संग्रही ठेवावं आणि पुन्हा पुन्हा वाचावं असं हे पुस्तक… या नव्या लेखणीचं स्वागत!! तिच्या पहिल्या पावलाला प्रेम मिळो! लेखणीला बळ मिळो!! तिच्या पुढच्या वाटचालीतून अशीच अनेक सुंदर शब्दफुले उमलत राहोत. ही मनापासून शुभेच्छा!!!

शब्दांनी सजवलेलं अंगण आणि त्यावर दीपाच्या विचारांची रांगोळी यांनी केलेली ही दीपपूजा…

© ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

jvilasjoshi@yahoo.co.in

9822553857

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भारतीय नास्तिकतेचा मागोवा” ☆ लेखक आणि परिचयकर्ता – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भारतीय नास्तिकतेचा मागोवा” ☆ लेखक आणि परिचयकर्ता – श्री जगदीश काबरे

पुस्तक : भारतीय नास्तिकतेचा मागोवा

लेखक : जगदीश काबरे 

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन, पुणे 

किंमत : रु. २५०/- (घरपोच मिळण्यासाठी संपर्क : 9322688872)

आपल्या समाजात ‘आस्तिक’ आणि ‘नास्तिक’ या संज्ञांबद्दल अनेक गैरसमज आहेत. नास्तिक म्हणजे देवाला शिव्या घालणारा, धर्मविरोधी किंवा समाजविघातक व्यक्ती, अशी एक चुकीची समजूत अनेकांच्या मनात आढळते. प्रत्यक्षात भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास पाहिला, तर चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. हा खरा इतिहास सामान्य वाचकांपर्यंत पोहोचावा, हा या पुस्तकामागचा मुख्य उद्देश आहे.

प्राचीन भारतात विविध तत्त्वचिंतनातून अनेक दर्शने निर्माण झाली. या दर्शनांनी विश्व, मनुष्य, आत्मा, ज्ञान, ईश्वर, कर्म आणि मोक्ष यांसारख्या प्रश्नांची स्वतंत्र उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमध्ये मतभेद होते; परंतु हे मतभेद वैचारिक होते. आजच्या भाषेत सांगायचे तर हा एक मुक्त बौद्धिक संवाद होता. कोणताही विचार अंतिम नाही, त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याची चिकित्सा केली जाऊ शकते, अशी ही भारतीय परंपरेची मोठी ताकद होती. ‘भारतीय नास्तिकतेचा मागोवा’ हे पुस्तक केवळ नास्तिकतेवर नाही; तर भारतीय बौद्धिक परंपरेच्या वैविध्यावर आहे. हे पुस्तक वाचताना वाचकाला अनेक प्रस्थापित समजुती नव्याने तपासून पाहाव्या लागतील. काही निष्कर्ष आश्चर्यचकित करतील, काही प्रश्न अस्वस्थ करतील आणि काही विचार नव्या अभ्यासाची प्रेरणा देतील. त्यातून विचारांचा पराभव बंदी घालून होत नाही; तो अधिक सक्षम विचार मांडूनच होतो हे लक्षात येईल. विवेक, तर्क, संवाद आणि चिकित्सक दृष्टी हीच भारतीय तत्त्वज्ञानाची खरी ओळख आहे. त्या परंपरेचा एक छोटासा मागोवा या पुस्तकातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी हे पुस्तक पूर्वग्रह न ठेवता, खुल्या मनाने आणि जिज्ञासेने वाचावे, हीच अपेक्षा.

सर्वसाधारणपणे बौद्ध, जैन आणि चार्वाक ही दर्शने नास्तिक मानली जातात. कारण त्यांनी वेदांचे अंतिम प्रामाण्य स्वीकारले नाही. परंतु या वर्गीकरणाकडे बारकाईने पाहिले, तर अनेक मनोरंजक प्रश्न उभे राहतात. उदाहरणार्थ, सांख्य आणि वैशेषिक या दर्शनांनी विश्वाच्या निर्मितीसाठी सर्वशक्तिमान ईश्वराची आवश्यकता मानलेली नाही. विश्वाचे स्पष्टीकरण त्यांनी नैसर्गिक तत्त्वांवर करण्याचा प्रयत्न केला. तरीही भारतीय परंपरेत त्यांना आस्तिक दर्शनांमध्ये स्थान मिळाले. याचे कारण त्यांनी आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म यांसारख्या संकल्पना स्वीकारल्या. म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञानात ‘आस्तिक’ आणि ‘नास्तिक’ या संज्ञा केवळ देवावर विश्वास आहे की नाही, एवढ्यावर ठरत नाहीत. त्या अधिक सूक्ष्म आणि ऐतिहासिक संदर्भात समजून घ्याव्या लागतात. या पुस्तकात याच गुंतागुंतीचा मागोवा घेतला आहे.

परिचयकर्ता : लेखक जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “राम रामेति रामेति..” – लेखक : डॉ. राहुल देशपांडे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “राम रामेति रामेति..” – लेखक : डॉ. राहुल देशपांडे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : राम रामेति रामेति

लेखक: डॉ. राहुल देशपांडे

पृष्ठ: १६८

मूल्य: ३००₹

हे पुस्तक कोणासाठी?

… जीवन जगत असताना आपल्या ठरविलेल्या ध्येयाकडे जायचा प्रवास सहज करायचा असेल त्यांच्यासाठी…

… रोजच्या प्रवासात अडथळे येऊन योग्य मार्ग सापडत नसेल आणि अति विचारांनी जे स्वतःचेच नुकसान करून घेत असतील त्यांच्यासाठी…

… जगणे अवघडच असते आणि मीच केवळ वेदना भोगत आहे असे समजून ईश्वराला दोषी ठरविणाऱ्या माझ्या अनेक मित्रांसाठी…

… आत्ता जरी मार्ग खडतर असला तरी जगणे खूप सोपे आणि सुंदर आहे यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी…

… ज्यांनी रामायण वाचले त्यांच्यासाठी, ज्यांनी वाचले नाही, त्यांच्यासाठीही. श्रीराम आणि सीतामाई यांना मानतात त्यांच्यासाठी आणि मानत नाहीत त्यांच्यासाठीही…

… प्रभू राम आणि सीता माई यांना आजच्या जीवनशैलीत नव्याने समजून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी…

… मला सगळा रस्ता माहिती आहे असे प्रवास सुरू करताना शंभर वेळा सांगतात आणि नंतर हळूच गुगल मॅप लावतात त्यांच्यासाठी… एकूणच सुखी व्हायचे आहे अशा सर्वांसाठी…

 ‘मी यशस्वी आहे का? ’ हा प्रश्न कधीही स्वतःला विचारू नये. कारण त्याचे उत्तर कठीण आहे. तेही खूप सापेक्ष आहे.

मात्र, ‘मी सुखी आहे का? ’ हा प्रश्न नक्की विचारावा आणि याचे उत्तर जर ‘हो’ आले तर तुम्ही नक्की यशस्वी आहात, यावर विश्वास ठेवा.

‘मात्र सुखी राहायचे कसे? ’ हा प्रश्न आजच्या ताणतणावाच्या, धावपळीच्या जगण्यात पडतो. ते पण साहजिक आहे.

गदिमा-बाबूजींच्या गीतरामायणाचा आधार घेत रामकथेतील विविध पात्रांच्या मदतीने मला सुखी जगण्याचा कानमंत्र मिळाला. तो या पुस्तकरूपाने तुमच्यासमोर ठेवत आहे. इथे तुम्ही राम मानता का नाही मानत, हा प्रश्न नाही. कारण इथे राम केवळ देव नाही, तर resilience, emotional intelligence आणि ethical leadership यांचा भारतीय रूप उलगडणारा दिशादर्शक आहे.

हे केवळ पुस्तक नाही.

क्रॅश कोर्स आहे – सुखी जगण्याचा.

आपल्या सुखी जगण्याच्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे…

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अंधाराच्या पारंब्या” – लेखक : श्री जयवंत दळवी ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

श्री प्रसाद साळुंखे  

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अंधाराच्या पारंब्या” – लेखक : श्री जयवंत दळवी ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆

पुस्तक : अंधाराच्या पारंब्या

लेखक : जयवंत दळवी 

मुंबईहून पुण्यात एका ऑफिसच्या मीटिंगला जात होतो. तेव्हा चहा नाश्ता करण्यासाठी म्हणून एका फूडमॉलमध्ये थांबलो. तिकडे पहिल्या मजल्यावर एका पुस्तकांच्या दुकानात काही नवी जुनी पुस्तकं चाळली. म्हणजे वरवरच पहिली आणि खात्रीशीर लेखक किंवा दर्जेदार प्रकाशनं पाहून काही जुनी पुस्तकं विकत घेतली. त्यात ही सोनं सापडलं. जुनं म्हणून नव्हे, तर कुठल्याही काळात सोनं हे सोनंच. ही कादंबरीही अगदी तशीच कालातीत कलाकृती.

१९७२ साली जयवंत दळवी यांची अंधाराच्या पारंब्या ही कादंबरी पहिल्यांदा ‘ अनुराधा ‘ या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाली. पुढे १६ सप्टेंबर १९९५ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.

या कादंबरीवर आधारित ‘ बॅरिस्टर ‘ हे नाटकही अमाप लोकप्रिय झालं. पण माझी आठवण आहे साधारण २००३ च्या सुमारासची. तेव्हा अल्फा (आताचं झी) मराठीवर ‘ पिंपळपान ‘ नावाची एक दर्जेदार मालिका लागायची. ही मालिका मला अफाट आवडायची. विशेषतः अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली ‘ बॅरिस्टर ‘ ही भूमिका. कादंबरी वाचताना वाटलं की मधली वर्षे झरझर सरत चाललीत, आणि अगदी तसाच अस्वस्थतेकडून अस्वस्थतेचा प्रवास आपण अनुभवतोय.

यात दाखवलेला काळ साधारण इ. स. १९२० च्या सुमारासचा. तत्कालीन महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजाच्या काही जुनाट रूढींचा मागोवा या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. त्याकाळी सभोवताल हळूहळू बदलायला सुरुवात झाली होती. म्हणजे बॅरिस्टर सारखी सुशिक्षित, विलायतेतून शिक्षण घेऊन आलेली मंडळी त्यांची सौंदर्यदृष्टी, जीवन समरसून जगण्याची स्वच्छंदता, कौतुक करायची, वैचारिक विरोध दर्शवायची स्पष्टवक्तत्ता एकीकडे. आणि भाऊरावांचा देवभोळेपणा, निरागसता, रूढींना धर्माला चिकटून राहण्याची वृत्ती, बॅरिस्टरांबद्दल आदरयुक्त भिती, बॅरिस्टरातल्या स्वभावात दडलेल्या लहान मुलावर जीवापाड माया हा लटका संघर्ष वाचायला रंजक वाटतो, क्वचित प्रसंगी अस्वस्थ करून सोडतो.

यातली एकेक पात्र जयवंत दळवी यांनी खरोखर लाजवाब रंगवली आहेत. बॅरिस्टरांच्या स्वच्छंद पण संवेदनशील स्वभावाचे पैलू, भाऊरावांच्या रूढी परंपरा बाबतच्या ठाम भूमिका आणि त्यातूनही दुसऱ्या वैचारिक प्रवाहाला दिलेला आदर, राधाक्कातल्या नववधूची स्वप्न, मानवी हेतूंची चाचपणी आणि एक अबोल घालमेल, विशेष कौतुक वाटतं ते मावशीबाईंचं, दैवाने लहानपणी दिलेल्या वैधव्याचा आणि समाजाने त्याचवेळी दिलेला कुरूपतेचा शाप भोगून, दिवसभर जीव कामात गुंतवणं आणि हसतमुख रहाणं, ही अन्यायाची मूक स्वीकृती, शरणागती आपल्याला अंतर्मुख करते. म्हणूनच मावशीबाईंचा लहानपणीच्या आठवणीतला विधवा केशवपनाचा प्रसंग राधाक्कासोबतच आपल्यालाही मूळातून उन्मळून टाकतो.

दुसरीकडे तितकाच सतावतो, कादंबरीभर गूढ कायम ठेवतो तो वाड्याला लागलेला खुर्चीत बसायचा शाप. घरातल्या धडधाकट कर्त्या पुरुषानं अचानक एक दिवशी डोळ्यात थंड वेडसर झाक घेऊन एकटक जमिनीकडे पहात बसणं, ही कल्पनाच श्वास कोंडण्याइतपत, जीवाची घालमेल होण्याइतपत अंगावर येते.

भाऊराव आणि त्यांची नववधू राधाक्का या वाड्याला चार सुखाचे क्षण देऊन क्षणभराचं घरपण देतात. म्हणजे बघा मालक घर बांधतो पण भाडोत्री घरपण देतात. पैशांनी वाडा बांधता येतो पण घरपण भावनेच्या नात्यांनीच तयार होतं. अर्थात भाऊराव आणि बॅरिस्टर यांचं नातं भाडोत्री आणि मालक या सदरातलं टिपिकल व्यवहारी कधीच नव्हतं. तर दुसऱ्या बाजूला बॅरिस्टर आणि राधाक्का यांच्यातलं नातंही अस्फूट, सौम्य आणि मर्यादांच भान ठेवून उमलू पहात होतं. नात्यांचा हा सारा प्रवास खरोखर वाचण्याजोगा आहे.

बऱ्यापैकी लोकांनी ही कादंबरी वाचली असेलच. प्रेमाची परिणीती कशात होते? याला कधी कधी काहीच अर्थ नसतो, कारण शेवटी तो प्राक्तनाचा भाग असतो. पण त्या आठवणींचा ताळेबंद आयुष्यभर जोखत बसणं हेही त्या प्रेमाचं यशच नाही का? असेच अनेक तिमिरपंथी प्रश्न घेऊन आपल्यातल्या माणसाला चाचपडतात या ‘अंधाराच्या पारंब्या’

परिचय : श्री प्रसाद साळुंखे

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9664027127

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “” – लेखक : श्री ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “टाइम मॅनेजमेंट” – लेखिका : सुश्री मीना शेटे-संभू ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : टाइम मॅनेजमेंट

 *तणावमुक्त, यशस्वी आणि सुखी जीवनाचे रहस्य*

 लेखिका : मीना शेटे – संभू 

पृष्ठ: १७२

मूल्य: २५०₹ 

हे केवळ वेळापत्रक तयार करण्यापुरतं मर्यादित नसून, उद्दिष्ट निश्चित करणं, कामांचं योग्य नियोजन, प्राधान्यक्रम ठरवणं, स्वयंशिस्त, सातत्य आणि डेडलाइनचं पालन यांचा समन्वय आहे. या पुस्तकात वेळेचा अधिक परिणामकारक उपयोग करून स्मार्ट वर्क कसं करावं, याचं सोप्या आणि शास्त्रशुद्ध भाषेत मार्गदर्शन केलं आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांमधून वेळेच्या व्यवस्थापनाची प्रभावी उदाहरणं उलगडत, छोट्या सवयींपासून मोठ्या तत्त्वांपर्यंत प्रत्येक पैलू समजावून सांगितला आहे. अधिक यशस्वी, संतुलित आणि परिणामकारक जीवन जगण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकासाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.

वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय, ते का आणि कसं करावं, याची इत्थंभूत शास्त्रशुद्ध; परंतु सुलभ भाषेतील माहिती. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे फक्त वेळापत्रक आखणं नव्हे, तर त्यात उद्दिष्टपूर्तीकरिता आणि उद्दिष्टं निश्चित करण्यापासून डेडलाइन पाळणं अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. फक्त खडतर कष्ट करत राहण्याऐवजी परिश्रमपूर्वक स्मार्ट वर्क करण्याला अधिक महत्त्व असतं. या मोठमोठ्या शब्दांचा खरा अर्थ महिलांच्या दैनंदिन कामातून स्पष्टपणे दिसून येतो म्हणूनच त्यांना वेळेच्या व्यवस्थापनाच्या गुरू म्हटलं पाहिजे. थेट वाचकांशी संवाद साधत वेळेच्या व्यवस्थापनातील बारीकसारीक गोष्टींपासून मोठ्या सिद्धान्तांपर्यंतच्या अनेक गोष्टींचा केलेला ऊहापोह.

 लेखिकेचा परिचय – 

मीना शेटे-संभू यांनी दै. सकाळमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून २२ वर्षे काम केले. शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता विषयाच्या मानद प्राध्यापिका आणि कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केले. गेल्या १५ वर्षांत त्यांनी विविध प्रकाशन संस्थांच्या विविध विषयांवरच्या १३७ इंग्रजी आणि ६ हिंदी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला असून, त्यांची सहा स्वरचित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘टाइम मॅनेजमेंट वेळेचे व्यवस्थापन’ हे त्यांचे सातवे स्वरचित पुस्तक आहे. याशिवाय त्यांची तीन इंग्रजी ई-पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शोध पत्रकारिता आणि अनुवाद या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कामगिरींबद्दल त्यांना काही प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ओडिसी” – मूळ लेखक : होमर – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ओडिसी” – मूळ लेखक : होमर – अनुवाद : श्री प्रणव सखदेव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ओडिसी 

लेखक : होमर

अनुवाद : प्रणव सखदेव

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन, पुणे 

पृष्ठ :- १८४ 

मूल्य: २५०₹ 

प्रकार:- पुराणकथा, साहसकथा

होमरचं ‘ओडिसी’ हे एका वीराच्या घरी परतण्याची कथा आहे. ट्रॉयचं युद्ध संपल्यानंतर इथाका या आपल्या राज्यात परतण्यासाठी ओडिसियसला तब्बल दहा वर्षांचा संघर्ष करावा लागतो. युद्ध संपलं असलं तरी त्याच्यासाठी खरी लढाई तेव्हाच सुरू होते. समुद्र, राक्षस, जादूगारिणी, देवतांचा कोप, मोह, फसवणूक आणि स्वतःच्या निर्णयांची किंमत आणी प्रत्येक टप्प्यावर त्याची परीक्षा घेतली जाते. दुसरीकडे इथाकामध्ये त्याची पत्नी पेनेलोपी वीस वर्षांपासून त्याची वाट पाहत आहे. सर्वांना ओडिसियस मरण पावल्याचं वाटत असल्याने तिच्यावर दुसरं लग्न करण्यासाठी दबाव टाकला जातो. मुलगा टेलीमॅकस वडिलांचा शोध घेण्यासाठी निघतो. त्यामुळे ही केवळ साहसकथा राहत नाही; ती एका कुटुंबाची, निष्ठेची आणि घरी परतण्याच्या अटळ इच्छेची कथा बनते.

या महाकाव्यात देवतांचं स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे. अथेना सतत ओडिसियसच्या पाठीशी उभी राहते, तर पोसायडन त्याच्या प्रत्येक पावलावर अडथळे निर्माण करतो. त्यामुळे संपूर्ण कथा ही एका माणसाच्या संघर्षाइतकीच दोन देवतांमधील अदृश्य संघर्षाचीदेखील कथा वाटते. ओडिसियस बुद्धिमान आहे, धाडसी आहे; पण हट्टीही आहे. अनेकदा त्याच्या स्वतःच्या निर्णयांमुळे संकटं ओढवतात. त्याच्या चुका, त्याचं चातुर्य आणि संकटांमधून मार्ग काढण्याची वृत्ती हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं वैशिष्ट्य आहे. होमरचं लेखन आजही प्रभाव टाकतं, कारण ते केवळ साहस सांगत नाही; ते युद्धाची किंमत, माणसाची मानसिकता, घरापासून दूर राहण्याची वेदना, सत्तेचा मोह आणि आशा न सोडणाऱ्या मनुष्यस्वभावाबद्दलही बोलतं. म्हणूनच ओडिसी हजारो वर्षांनंतरही तितकीच जिवंत वाटत.

प्रणव सखदेव यांनी केलेला मराठी अनुवाद अत्यंत प्रवाही आहे. ग्रीक पुराणातील अनेक व्यक्तिरेखा, स्थळं आणि प्रसंग असूनही वाचन कुठेही क्लिष्ट वाटत नाही. उलट प्रत्येक प्रकरणासोबत पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढत जाते. तुम्ही यावर आधारित चित्रपट पाहणार असाल तर आधी हे पुस्तक नक्की वाचा, कारण त्यामुळे कथानक, पात्रं आणि त्यामागची पार्श्वभूमी अधिक चांगल्या प्रकारे समजते. आणि जर पुस्तक आधीच वाचलं असेल, तर चित्रपटातील अनेक प्रसंग नव्या दृष्टीने अनुभवता येतात. जर तुम्हाला ग्रीक पुराणकथा, साहसकथा वाचण्याची आवड असेल, तर ‘ओडिसी’ नक्की वाचा. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा आजही तितकीच ताजी, रंजक आणि विचार करायला लावणारी वाटते.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “१५ मिनिट मेथड” – लेखिका : सॅम बेनेट ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “१५ मिनिट मेथड” – लेखिका : सॅम बेनेट ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : १५ मिनिट मेथड

 – – – काम पूर्ण करण्याची अतिशय सोपी पद्धत

लेखिका : सॅम बेनेट

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठ : २४०

मूल्य : २९९₹ 

आधुनिक आयुष्यामुळे आपल्याला सतत गोंधळलेलं आणि दबावाखाली असल्यासारखं वाटतं. स्वप्नं आणि उद्दिष्टांच्या दिशेने पुढे कसं जायचं आणि त्याचवेळी रोजची कामं कशी सांभाळायची, हेच समजेनासं होतं. कारण यादीत कितीतरी गोष्टी बाकी असतात आणि कामांची यादी सतत वाढतच जात असते.

यावर उपाय म्हणून सॅम बेनेट एक अत्यंत सोपी पण प्रभावी कल्पना मांडतात : फक्त १५ मिनिटांची छोटी कृतीदेखील तुमच्या आनंदात, समाधानात आणि अखेरीस संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.

या पुस्तकात – – – 

… परफेक्शनिझम, स्वतःवर शंका घेणं, इम्पोस्टर सिंड्रोम आणि स्वतःलाच मागे खेचणाऱ्या सवयींपासून मुक्त कसं व्हायचं

… आरोग्य किंवा इतर समस्यांमुळे आयुष्य विस्कळीत वाटत असताना स्वतःला कसं सांभाळायचं

… अवघड आणि मोठी वाटणारी कामं छोट्या, सहज हाताळता येतील अशा टप्प्यांत कशी विभागायची

… गरजेच्या वेळी ठामपणे आणि नम्रपणे “नाही” कसं म्हणायचं

… दिवसातील फक्त पंधरा मिनिटं स्वतःसाठी काढून संतुलित आयुष्यासाठी नवीन सवयी कशा तयार करायच्या

सॅम बेनेट या लेखिका, वक्त्या आणि सर्जनशीलता-उत्पादकता विषयातील तज्ज्ञ आहेत. व्यावसायिक अभिनेत्री आणि इम्प्रोव्हायझर म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामात विनोदबुद्धी, उत्साह आणि हजरजबाबीपणा यांची खास छाप निर्माण केली. सहज, व्यवहार्य आणि प्रेरणादायी शिकवणीमुळे त्या आज लिंक्डइन लर्निंगवरील जागतिक स्तरावरील लोकप्रिय प्रशिक्षकांपैकी एक असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares