मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

दुर्जन निंदा – (२) ~पाखंडी लोक

मागील भागात तुकाराम महाराजांनी किती बीभत्स शब्दांत दुर्जनांची त्यांच्या अभंगातून निर्भत्सना केली आहे, हे आपण पाहिले. याही भागात आणखी काही अभंगांद्वारे तुकारामांचे अशा लोकांविषयीचे मत जाणून घेऊया, कारण दुर्जन निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. पाखंडी, म्हणजे वरवर दाखवायला सज्जन, भक्तीचे उपासक परंतु मनाने अत्यंत नीच अशा लोकांचा तुकाराम महाराजांना फार संताप आहे. त्यांच्याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण आज त्यांच्या अभंगांतून पाहूया…

भक्तीचे सोंग करणाऱ्या ढोंगी माणसांविषयी या अभंगात महाराज म्हणतात,

 न ये नेत्रा जळ/ नाही अंतरी कळवळ/

 तो हे चावटीचे बोल/ जन रंजवणे फोल//

 न फळे उत्तर/ नाही स्वामी जो सादर/

 तुका म्हणे भेटी/ जंव नाही दृष्टादृष्टी//

ज्याच्या डोळ्यात भावभक्तीच्या पाण्याचा टिपूस नाही, आणि जोपर्यंत अंतरंगात हरी विषयी कळवळा नाही, तोपर्यंत त्याच्या भक्ती विषयी भारलेल्या सर्व गप्पा पोकळ आणि फक्त करमणूक करणाऱ्या असतील. स्वामींची कृपा असल्याशिवाय ते अभक्ताला कधीही भेटणार नाहीत. वरवरची प्रार्थना केवळ पोकळ आहे.

ढोंगी भक्तांविषयी या अभंगात महाराजांनी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आहे.

 टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी/

 देखो नेदी जगी फासे जैसे//

 धीवर या मत्स्या/ चारा घाली जैसा/

 भीतरील फासा /कळो नेदी //

 खाटीक हा स्नेह वादे पशु पाळी /

 कापावया नळी तयासाठी//

 तुका म्हणे तैसा भला मी लोकात/

 परी तू कृपावंत पांडुरंग//

जो बहुरूपी असतो तो त्याचे वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगळ्यासारखा ध्यानस्थ बसतो. त्याचप्रमाणे मैद म्हणजे ढोंगी लोक स्वतःला भक्त म्हणविणारे, कपाळावर सतरा टिळे लावतो, गळ्यात कसल्या कसल्या माळा घालतो, नामाच्या मुद्रा कोरून लावतो आणि जगाला लुटण्याचे त्याचे आतील बेत कळू देत नाही. या लोकांची जात जशी काही फासेपारध्यांसारखीच असते. गळाला काहीसे आमीष लावून मासे अडकविण्याचा हा प्रकार आहे. खाटीक बोकड पाळून त्याला धष्टपुष्ट करतो आणि नंतर त्यास कापतो. अभक्त मंडळी याहून वेगळी नसतात, असे तुकारामांचे स्पष्ट मत आहे.

पाखंडी लोकांना महाराज सतत सांगत आहेत की तुम्ही अनुभवावाचून बडबड करणे थांबवा. ही तुमची बडबड म्हणजे बाळंत न होता बाळंतीणीप्रमाणे स्वतःवर सर्व सोपस्कार करून घेणे आहे.

 व्याल्याविण करी शोभून तातडी/

 चार ते गधडी करीतसे//

अशा लोकांना ते गधडी म्हणतात. (बिनडोक)

 काही नित्यनेमाविण/ अन्न खाय तो श्वान/

 वाया मनुष्यपण/ भार वाहे तो वृषभ//

 त्याचा होय भूमी भार/ नेणे जातीचा आचार//*

 जाला दावेदार/ भोगवी अघोर पितरासी//

 अखंड अशुभवाणी / खरे नच बोले स्वप्नी//

 पापी तयाहुनी नाही/ आणिक दुसरा//

 पोट पोसी एकला/ भूती दया नाही ज्याला/

 पाठी लागे आल्या/ अतिताचे द्वारेशी//

 काही संतांचे पूजन/ न घडे तीर्थाचे भ्रमण//

 यमाचा आंदण/ सीण थोर पावेल//

 तुका म्हणे त्यांणी/ मनुष्यपणा केली हाणी//

 देवा विसरूनी/ गेली म्हणती मी माझे//

वरील अभंगात तुकाराम महाराजांनी अभक्त लोकांचे वर्णन केले आहे. भोजनाआधी देवपूजा करणे, गीता, विष्णुसहस्त्रनाम किंवा जप जाप्य करणे असा काही नियम जो पाळत नाही, तो मनुष्य कुत्र्यासमान आहे. मनुष्यपणाचा तो व्यर्थ भार वाहतो. खरंतर तो बैलच म्हणावा. अशा माणसाचा भूमीला केवळ भार आहे. आपल्या पितरांचा तो केवळ दावेदार आहे, कारण तो त्याच्या कुकर्माने त्यांना नरक भोगवितो. त्याची वाणी अशुभ आहे, स्वप्नातही त्याला खरे बोलता येत नाही. फक्त स्वतःपुरता विचार करून दारी आलेल्या अतिथीला तो हाकलून देतो. कधी संतांचे पूजन करीत नाही, की तीर्थाटन करीत नाही. असे लोक म्हणजे मनुष्यपणाची केवळ हानीच आहेत.

तुकाराम महाराजांना पाखंडी, (स्वतःला हरीचे दास म्हणणारे, ज्ञानी समजणारे) लोकांचा अनुभव फार जवळून मिळाला. अशा लोकांविषयी त्यांचे एक ठाम मत बनले, ते या अभंगातून आपण पाहूया.

 अतिवादी लावी/ एका बोट सोंग दावी/

 त्याचा बहुरूपी नट/ नव्हे वैष्णव तो चाट//

 प्रतिपादी वाळी/ एका पूजी एका छळी/

 तुका म्हणे नाही/ भूतदया ज्याचे ठायी //

एक मनुष्य कपाळाला काळी रेघ लावून आपण वैष्णव आहोत असे सांगत सुटतो. वादविवादही करतो, परंतु तो खरा वैष्णव नव्हे. तो वेशधारी बहुरूपी आणि खोटा आहे. तो एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याचा धिक्कार करतो, आणि एकाला पूजनीय मानतो व दुसऱ्याला छळतो. खरे वैष्णव तर सर्वांशी समान वागतात. ते भूतदयेने परिपूर्ण असतात. या पाखंडी लोकांच्या ठायी भूतदया जराही नसते.

ढोंगी लोकांना तुकाराम महाराज रोखठोक बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्याचे उदाहरण म्हणजे हा खालील अभंग…

 जाऊनिया तीर्थ/ काय तुवा केले/

 चर्म प्रक्षाळीले/ वरी वरी//

 अंतरीचे शुद्ध कासयाने झाले/

 भूषण ते केले आपणया//

 वृंदावन फळ घोळले साकरा/

 भीतरील थारा मोडेची ना//

 तुका म्हणे नाही शांती क्षमा दया/

 तोवरी कासया फुंदा तुम्ही //

ते म्हणतात, ” अरे ढोंगी माणसा, तू तीर्थास जाऊन केलेस काय? तर तुझ्या चामड्याचे प्रक्षा लन केलेस, तुझे कातडे फक्त पाण्यात भिजवलेस. तुझ्या अंतराचे काय? कडू वृंदावन फळ साखरेत किती घोळले तरी त्याचा उपजत कडूपणा जात नाही, तुझे तसेच आहे. तीर्थ स्नान करून तुझ्या मनाचे मालीन्य कसे जाणार? जोपर्यंत तुझ्या ठिकाणी दया, क्षमा, शांती या भावना नाहीत तोपर्यंत तुम्ही हरीचे दास म्हणून गर्वाने फुलून जाऊ नका. “

तुकाराम महाराजांना खऱ्या भक्तीचा अर्थ म्हणजे मानवता, भूतदया, अंतःकरणाची शुद्धता हेच सामान्यांना सांगायचे आहे असे मला वाटते. तो खरा हरीचा दास आहे, त्यालाच माऊली आपल्या चरणी आश्रय देते.

क्रमशः… २० 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भ्रष्टाचाराचे भवितव्य ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ भ्रष्टाचाराचे भवितव्य ☆ श्री सुनील देशपांडे 

आपल्या देशाने लोकशाही व्यवस्थेचा आदर्श म्हणून स्वीकार केला परंतु प्रशासन ही लोकशाहीची शोषण यंत्रणा ठरली हे सुद्धा नाकबूल करून चालणार नाही. एके काळचे स्वतः पंतप्रधान जेव्हा सांगतात की एक रुपयांपैकी ८५ पैसे यंत्रणेमध्ये गायब होतात आणि प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत १५ पैसे पोहोचतात. याचा अर्थ प्रशासन यंत्रणा ही ८५% भ्रष्टाचारी आहे आणि शोषक आहे. प्रशासन यंत्रणेवर एवढा मोठा आरोप करून सुद्धा इतकी वर्ष होऊनही त्या आरोपाचे खंडन सुद्धा प्रशासन यंत्रणेतील कोणीही अजून पर्यंत केले नाही. भ्रष्टाचाराची सुरुवात ही प्रशासन यंत्रणेपासून झाली. कारण ब्रिटिशांच्या काळात मूठभर ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून राज्य करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला भ्रष्टाचाराचे स्वातंत्र्य देणे हे गरजेचे होते. प्रशासन यंत्रणा ही राज्यकर्त्यांची बटीक झाली ही फक्त पगारामुळे नव्हे, तर त्यांना मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या स्वातंत्र्यामुळे झाली. राज्यकर्त्यांपुढे लाचार होण्याचे भ्रष्टाचार हे सर्वात प्रमुख कारण होते. या प्रशासन यंत्रणेच्या भ्रष्टाचार स्वातंत्र्यामुळेच ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर एकतंत्री राज्य करणे शक्य झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही प्रशासन यंत्रणा ब्रिटिश कालीन प्रशासन यंत्रणेप्रमाणे जशीच्या तशी चालू राहिली. त्यावर अंकुश ठेवणे राजकीय सत्ताधाऱ्यांना संपूर्णपणे कधी जमलेच नाही. उलट पक्षी त्या प्रशासन यंत्रणेनेच स्वतःच्या सोयीसाठी हळूहळू राजकीय सत्ताधाऱ्यांनाच भ्रष्टाचारी जगामध्ये ओढून घेतले.

 आता जर राज्यकर्त्यांना खरोखरच काही करायचं असेल तर त्यांना दुसऱ्या एखाद्या अभिनव पद्धतीने प्रयत्न करून बघावे लागतील. त्याचेही भले बुरे परिणाम कालांतराने दिसतीलच. त्यानंतर नवीन काही प्रयोग होतीलच.

नव्हे त्यांना ते तसे करावेच लागतील.

मला अजून आठवते ज्यावेळी मा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते त्यावेळी एक व्यंगचित्र आले होते. एक व्यक्ती त्यांना म्हणते आता तुम्ही पंतप्रधान झाले आहात तर सर्व भ्रष्टाचा-यांना दूर करा.

त्यावर ते असे उत्तर देतात ‘ If I have to remove all corrupt persons, then, one man cannot run the government’

व्यंगचित्रकाराने अगदी वर्मावरच बोट ठेवले होते.

मी जर भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करायची असेल तर काही दिवस माझ्या कार्यालयात सुद्धा भ्रष्टाचारी असतील तरी त्यांचे बद्दल लगेच कारवाई करता येणार नाही. तशी केली तर माझ्या कार्यालयामध्ये स्टाफच राहणार नाही. जर मी माझ्या पक्षातल्या लोकांवर प्रथम कारवाई करायची ठरवली तर माझे पद व अधिकार सुद्धा राहणार नाही.

शुद्धीकरणाची सुरुवात आता दूर वरून बाहेरून आत मध्ये करण्याची गरज आहे. आपल्याशी संबंध नसलेल्या दूरच्या लोकांच्यावर आणि विरोधी पक्षांवर कारवाई प्रथम सुरू करणे हाच पर्याय शिल्लक उरतो. फक्त एवढेच व्हावे की विनाकारण चांगल्या व्यक्तींना त्रास होऊ नये. जे खरोखर भ्रष्टाचारी आहेत त्यांचे वरच कार्यवाही व्हावी. भ्रष्टाचार विरोधात कार्यवाही धडाक्याने चालू आहे हे पाहिल्यानंतर एखाद्या वेळेस स्व पक्षातले किंवा जवळचे लोक सुद्धा त्या भीतीने भ्रष्टाचारामधून मुक्त झाल्यास उत्तमच. बाहेरची कार्यवाही हळूहळू पूर्ण झाल्यास, सगळ्यात शेवटी स्वतःच्या जवळच्या लोकांच्यावर कार्यवाही सुरू करता येईल.

अशा तऱ्हेचा एक नवीन पॅटर्न जर राबवता आला तर तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःच्या पक्षात सामावून घेतलेले भ्रष्टाचारी लोक सुद्धा आत्ताच्या वॉशिंग मशीन मुळे नाही पण नंतरच्या ब्रेन वॉशिंगमुळे भ्रष्टाचारापासून दूर राहतील असा एक प्रयोग जर करत असतील तर काही हरकत नाही.

आत्तापर्यंतच्या परंपरेने जे काही चालले आहे त्याच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने पण सकारात्मक परिणाम घडण्याची शक्यता असेल तर एक नवा प्रयोगही करून पाहायला हरकत नाही. फक्त अशा कारवाया करताना विरोधी पक्षाचे असले तरीसुद्धा त्यापैकी खरोखरच भ्रष्ट असतील त्यांच्यावरच कार्यवाही व्हावी. विनाकारण विरोधातले म्हणून बदनामीसाठी त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसे झाल्यास उत्तमच. परंतु ती कार्यवाही न्याय यंत्रणे मार्फत व कायदेशीर मार्गानेच होणे आवश्यक असल्याने त्याला कालावधी प्रचंड मोठा लागणार आहे. ही त्यातली अडचणीची बाब ठरू शकेल. पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये. सध्या बहुता तसेच घडते आहे. कारवाईची सुरुवात जोर जोरात गाजावाजा करून होते आहे. एकदा ती न्याय यंत्रणेच्या चक्रामध्ये अडकवून टाकली की मग शांतता कोर्ट चालू आहे! ती केस केव्हा निकाली निघू शकेल हे कोणी सांगू शकेल काय?

सध्या तरी अनेक प्रकाराने यंत्रणेमध्ये बदल करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचे छोटेखानी प्रयत्न चालू आहेत. लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा करणे. ऑनलाइन पद्धतीने काही गोष्टी केल्याने सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज भासू नये. जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतील असे पाहणे. यातूनही खूप फरक पडतो आहे, पडला आहे.

काही बाबतीत सरकारी यंत्रणांची काही कामे खाजगी यंत्रणांकडे दिल्यास जो पैसा भ्रष्टाचारामधून काळ्याधना मध्ये जात होता, तो अधिकृतपणे खाजगी यंत्रणांना मिळाल्यास काय हरकत? लोकांचीही सोय आणि ती सोय झाल्यामुळे त्यांची चार पैसे खर्च करण्याची तयारी याचा सुवर्णमध्य निघेल. सध्या अशी यंत्रणा पासपोर्टच्या संबंधात वापरली जात आहे ती यशस्वीही होत आहे असे दिसते.

अशा वेगवेगळ्या मध्यस्थ सेवा निर्माण केल्यास लोकांचीही सोय होईल आणि रोजगाराचीही निर्मिती होईल. अनेक सरकारी यंत्रणांमध्ये आता ऑनलाईन अर्ज विनंती ही पद्धत सुरू झाली आहे. परंतु सर्वसामान्यांच्या अंगवळणी ही ऑनलाईन पद्धती पडत नाही. अशावेळी तरुणांसाठी अशा सेवांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती निर्माण करता येईल. सध्या रेल्वे, विमान इत्यादी आरक्षण सेवा अशा पद्धतीने दिल्या जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे आणि जनतेच्या उपयोगाची सुद्धा आहे. जुन्या पद्धतीने सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालून कंटाळून शेवटी नाईलाजाने खुर्चीवरील बाबूला पन्नास शंभर रुपये देऊन काम करून घेत असत. त्याऐवजी आता झालेले ऑनलाईन कामाचे प्रकार याबाबत सेवा देणाऱ्या बेरोजगार तरुणांना पन्नास शंभर रुपये सेवा शुल्क त्यांचे कडून ऑनलाइन सेवा उपलब्ध करून घेणे हे जास्त योग्य होईल. अशाप्रकारे

सामान्य जनतेची क्रयशक्ती जेवढी असेल त्यातून विविध सेवा उद्योगांना जास्त कामाची संधी मिळेल. त्यामुळे सामान्यजनांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणे यावर भर दिला जाणे ही गरजेची गोष्ट झाली आहे. त्या दृष्टीने सरकार वेगवेगळ्या योजना राबवून सामान्य माणसाच्या हातात पैसा खेळता ठेवण्याची योजना राबवत आहे का ? पण त्याचवेळी ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली तर ही गोष्ट सुद्धा राष्ट्राच्या दृष्टीने धोकादायक आणि नुकसानीची ठरेल. त्यामुळे अशा योजना या फक्त मर्यादित कालावधीसाठी किंवा वेगळ्या पद्धतीने परंतु त्यामधील धोके टाळून राबवता येणे शक्य आहे काय याचाही विचार करून अत्यंत कौशल्याने योजनांची निश्चिती करणे आवश्यक ठरेल.

उद्योग व्यवसायामध्ये सरकारी यंत्रणांची लुडबुड कमी करणे. कर प्रणालीचे सुलभीकरण. अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन सरकारी कामकाजाचे सुलभीकरण. अशा विविध गोष्टी करण्याचा हळूहळू प्रयत्न चालू आहे असे दिसते.

या सर्व प्रयत्नांचे योग्य ते परिणाम कालांतराने दिसतीलच कारण हे परिणाम झपाट्याने होत नसतात, परंतु त्यासाठी एका गोष्टीची मात्र आवश्यकता आहे. सरकार जरी बदलले पक्ष जरी बदलले तरी हे बदल पुन्हा उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा परिणाम शून्य.

अर्थात भविष्यावर नजर ठेवून वाट पाहणे, याशिवाय आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या नशिबात दुसरे काय आहे?

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विधिनिषेध… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ विधिनिषेध… ☆ अपर्णा परांजपे

परमार्थात काय करावे हे तर महत्त्वाचे आहेच पण काय करु नये हे अधिक महत्त्वाचे आहे !!

उदा जप करणे उत्तमच पण एकवेळ जप नाही जमला तर इतकं बिघडणार नाही पण न सांगितलेली गोष्ट केली तर फार नुकसान होतं

परमार्थात ‘विधिनिषेध’ (काय करावे आणि काय करू नये) याला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा आपण काय करावे (उदा. जप, तप, पूजा) यात इतके गुंततो की काय टाळावे याकडे दुर्लक्ष होते.

१. ‘न करणे’ हे ‘करण्या’पेक्षा कठीण असते

परमार्थात साधना करणे म्हणजे काहीतरी ‘मिळवणे’ नसून स्वतःमधील दोष ‘कमी करणे’ असते.

उदाहरण: दिवसातून एक तास जप करणे सोपे आहे, पण उरलेले २३ तास कोणाची निंदा न करणे, कोणावर न रागावणे किंवा असत्य न बोलणे हे जास्त कठीण आहे.

जर आपण जपाची बादली भरत असू, पण ‘निंदा’ किंवा ‘अहंकार’ नावाच्या छिद्रातून ती रिकामी होत असेल, तर त्या साधनेचा उपयोग शून्य होतो.

२. आज्ञापालन: हे सर्वात मोठे नुकसान

“न सांगितलेली गोष्ट करणे” हे साधनेत घातक ठरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे अहंकार.

जेव्हा साधक स्वतःच्या बुद्धीने “मला हे जास्त चांगलं वाटतं” म्हणून गुरुंनी न सांगितलेली गोष्ट करतो, तेव्हा त्याचा ‘मी’ बळावतो.

परमार्थात साध्या कृतीपेक्षा त्यामागील समर्पण महत्त्वाचे असते. जप चुकला तर तो अनावधानाने झालेला प्रमाद असू शकतो, पण मनाप्रमाणे वागणे हा जाणुनबुजून केलेला स्वैराचार असतो.

३. साधनेतील ‘छिद्रे’ बुजवणे आवश्यक

संत तुकाराम महाराज म्हणतात, “काय थोर झाले तीर्थाचे दर्शन । जरि नाही मन शुद्ध झाले ॥”

जर एखादा माणूस खूप दानधर्म करतोय, पण घरातल्या माणसांना त्रास देतोय, तर त्या दानाला काही अर्थ उरत नाही.

परमार्थात ‘काय करू नये’ याची यादी (जसे की: परनिंदा, मत्सर, क्रोध, दंभ) पाळल्यास अंतःकरण लवकर शुद्ध होते. शुद्ध अंतःकरणात मग थोडा केलेला जपही लवकर फळाला येतो.  

४. पथ्य आणि औषध

परमार्थ हा एखाद्या आजारावरील उपचारासारखा आहे. औषध (जप/साधना) घेणे जितके गरजेचे आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व ‘पथ्य’ (काय करू नये) पाळण्याला असते.

जर रुग्ण औषध घेतोय पण पथ्य पाळत नसेल, तर औषध लागू पडत नाही.

त्याचप्रमाणे, साधनेचे औषध तेव्हाच काम करते जेव्हा आपण कुसंगती, विषयांची ओढ आणि नकारात्मक विचारांचे पथ्य पाळतो.  

थोडक्यात सांगायचे तर, ‘साधना’ ही शिडी आहे, तर ‘संयम’ हा तिचा आधार आहे. डबके कितीही मोठे असले तरी त्याला छिद्र असेल तर ते कधीच भरणार नाही. म्हणून दोषांचा त्याग (काय करू नये) हे साधनेचा पाया मजबूत करण्याचे काम करते.

“केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या उक्तीसोबतच “काय सोसावे आणि काय टाळावे” याचे भान असणे हाच खरा शहाणपणा आहे.

परमार्थात ‘काय करू नये’ या विषयाला पुष्टी देणारा एक अत्यंत प्रसिद्ध आणि सार्थ संस्कृत श्लोक ‘श्रीमद्भगवद्गीते’ मध्ये येतो. हा श्लोक साधनेतील सर्वात मोठ्या अडथळ्यांना (म्हणजेच काय टाळावे याला) अधोरेखित करतो:

मुख्य श्लोक

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत ॥

(भगवद्गीता – १६. २१)

या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की:

“काम (वासना), क्रोध (राग) आणि लोभ (हाव) हे नरकाचे तीन प्रकारचे दरवाजे आहेत, जे आत्म्याचा नाश करणारे आहेत; म्हणून या तिन्हींचा त्याग करावा (हे करू नये).

या श्लोकाचे तुमच्या विचारांशी असलेले नाते खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल:

आत्म्याचा नाश: येथे ‘नाश’ म्हणजे मृत्यू नव्हे, तर साधकाच्या प्रगतीचा पूर्णतः थांबणे. तुम्ही कितीही जप केला, तरी जर तुम्ही काम-क्रोध-लोभाच्या आहारी जात असाल, तर तुमची सर्व साधना व्यर्थ जाते.

‘हे करू नये’ याचे महत्त्व: भगवंतांनी येथे “हे करा” म्हणण्याऐवजी “हे टाळा” (त्यजेत) यावर जास्त भर दिला आहे. कारण जोपर्यंत या तीन गोष्टी मनात आहेत, तोपर्यंत केलेली कोणतीही साधना फळ देणार नाही.

पायाभूत नियम: परमार्थात जप-तप ही वरची मजली आहे, पण काम-क्रोध-लोभाचा त्याग हा पाया आहे. पायाच नसेल तर मजला कोसळणारच.

आणखी एक पूरक सुभाषित (पथ्याबाबत)

परमार्थात ‘काय करू नये’ हे पथ्यासारखे असते. त्या संदर्भात हे सुभाषित खूप प्रसिद्ध आहे:

विना पथ्यं कदर्यस्य किं पथ्यौषधसेवनैः ।

सपथ्यस्य कदर्यस्य किं पथ्यौषधसेवनैः ॥

अर्थ: जर एखादा रुग्ण ‘पथ्य’ (काय खाऊ नये) पाळत नसेल, तर त्याला औषध देऊन काय उपयोग? (कारण औषध लागू होणार नाही). आणि जर रुग्ण ‘पथ्य’ व्यवस्थित पाळत असेल, तर त्याला औषधाचीही फारशी गरज उरत नाही (कारण तो आपोआपच बरा होईल).

परमार्थात लागू पडताना:

पथ्य = काय करू नये (उदा. निंदा, मत्सर, आज्ञाभंग).

औषध = काय करावे (उदा. जप, पूजा).

जर आपण ‘काय करू नये’ हे पाळले नाही, तर जपाचे औषध लागू होत नाही.

परमार्थातील ‘निषेध’ (काय करू नये) आणि ‘पथ्य’ या विषयावर संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत अतिशय सुंदर भाष्य करतात. विशेषतः सोळाव्या अध्यायात, जिथे दैवी आणि आसुरी संपत्तीचे वर्णन आहे, तिथे ते एका ओवीतून हा विचार मांडतात:

संत ज्ञानेश्वरांची ओवी (अध्याय १६)

विधी निषिद्ध सांडूनि। जे वर्तती स्वेच्छाचारिणी।

ते न पावती गा दोन्ही। इहपर लोक॥

अर्थ: जे लोक शास्त्राने सांगितलेले ‘विधी’ (काय करावे) आणि ‘निषिद्ध’ (काय करू नये) या दोन्ही मर्यादा सोडून केवळ आपल्या मनाप्रमाणे (स्वेच्छेने) वागतात, त्यांना इहलोक (या जगातील सुख) आणि परलोक (परमार्थातील गती) यांपैकी काहीही प्राप्त होत नाही.

विवेचन (ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात)

ज्ञानेश्वर महाराज येथे ‘मनासारखे वागणे’ (स्वेच्छाचार) हा साधनेतील सर्वात मोठा अडथळा मानतात. तुमच्या मूळ विचाराला पुष्टी देणारे काही महत्त्वाचे मुद्दे:

मर्यादेचे महत्त्व: जसा समुद्र आपली मर्यादा सोडत नाही म्हणून तो टिकून आहे, तसाच साधक जेव्हा ‘काय करू नये’ याची मर्यादा पाळतो, तेव्हाच त्याची साधना सुरक्षित राहते.

आज्ञाभंग हीच मोठी हानी: तुम्ही म्हटल्याप्रमाणे, “न सांगितलेली गोष्ट करणे” म्हणजे गुरूंनी किंवा शास्त्रांनी आखून दिलेली रेषा ओलांडणे होय. माउली म्हणतात की, अशी व्यक्ती कितीही जप करत असली, तरी ती विस्कटलेल्या घरासारखी असते; तिथे लक्ष्मी (दैवी गुण) वास करत नाही.

शुद्ध अंतःकरण: जेव्हा आपण निषिद्ध गोष्टी टाळतो (उदा. निंदा, दंभ, अहंकार), तेव्हाच अंतःकरण आरशासारखे स्वच्छ होते. त्या स्वच्छ आरशात मग ईश्वराचे रूप चटकन दिसते. उलट, आरसाच मळलेला असेल (म्हणजेच आपण चुकीच्या गोष्टी करत असू), तर कितीही प्रकाशाचा (साधनेचा) झोत टाकला तरी प्रतिबिंब दिसणार नाही.

संत तुकाराम महाराजांचा दृष्टिकोन

तुकोबा एका अभंगात म्हणतात:

“भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाच्या माथी हाणू काठी ॥”

येथे ‘नाठाळ’ म्हणजे केवळ बाहेरची व्यक्ती नव्हे, तर आपल्या मनातील ‘अयोग्य विचार’ होय. तुकोबा सांगतात की, जो विचारांनी शुद्ध नाही, त्याने कितीही बाह्य उपचार केले तरी ते व्यर्थ आहेत.

सारांश

तुमचा मूळ विचार की “जप नाही जमला तरी चालेल, पण चुकीची गोष्ट करू नये”, हेच संतांनाही अभिप्रेत आहे. कारण ‘साधना’ ही शिडी आहे, पण ‘सदाचार’ ही ती शिडी ज्या भिंतीला लावली आहे, ती भिंत आहे. भिंतच कच्ची असेल, तर शिडी कितीही उंच असली तरी उपयोग काय?

परमार्थात ‘काय करू नये’ हे ‘काय करावे’ पेक्षा का महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करण्यासाठी एक अत्यंत चपखल आणि जुना ‘दुधाच्या घागरीचा’ दृष्टांत दिला जातो.

दृष्टांत: दुधाची घागर आणि विषाचा थेंब

एका भक्ताने खूप कष्ट करून, पहाटे उठून गाईचे धारोष्ण आणि शुद्ध दूध एका मोठ्या घागरीत जमा केले. ते दूध त्याने अत्यंत श्रद्धेने ईश्वराला अर्पण करण्यासाठी किंवा त्याचे दही-तूप करण्यासाठी स्वच्छ करून ठेवले होते. हे दूध म्हणजे तुमची ‘साधना’ (जप, तप, वाचन) आहे.

पण, त्याच वेळी त्या घागरीत एका विषाच्या सुईचे टोक किंवा सापाच्या विषाचा एक छोटासा थेंब पडला.

आता विचार करा:

१. दूध कितीही शुद्ध असले, तरी ते आता पिण्यायोग्य राहिले का? नाही.

२. त्या दुधाची चव बिघडली नसेल, रंगही बदलला नसेल, पण त्यातील तो एक ‘निषिद्ध’ थेंब (विषाचा अंश) संपूर्ण दुधाला घातक ठरला.

विवेचन:

दूध जमा करणे = विधी (जप, ध्यान, कीर्तन करणे).

विषाचा थेंब = निषिद्ध (अहंकार, परनिंदा, किंवा गुरूंनी ‘नको’ म्हटलेली गोष्ट करणे).

जर आपण दिवसभर जप केला (दूध जमा केले), पण मनात एखाद्याबद्दल मत्सर ठेवला किंवा कोणाचा तरी अपमान केला (विषाचा थेंब), तर आपली सर्व साधना त्या एका कृतीने ‘विषारी’ किंवा निष्फळ होते.

दुसरा छोटा दृष्टांत: ‘छिद्र असलेल्या नावेचा’

समजा तुम्हाला नदी पार करायची आहे. तुमच्याकडे एक सुंदर नाव आहे आणि तुम्ही जोरात वल्हवत आहात. वल्हवणे ही तुमची ‘साधना’ आहे. पण जर त्या नावेला तळाशी एक छोटेसे छिद्र असेल, तर तुम्ही कितीही जोरात वल्हवले तरी ती नाव पैलतीराला पोहोचणार नाही; उलट ती मध्येच बुडेल.

येथे वल्हवणे (काय करावे) महत्त्वाचे आहेच, पण त्यापेक्षा छिद्र बुजवणे (काय करू नये / दोष टाळणे) हे अधिक महत्त्वाचे आहे. छिद्र असेल तर तुमचे सर्व श्रम वाया जातात.

तुमच्या विषयासाठी निष्कर्ष:

न सांगितलेली गोष्ट” करणे म्हणजे त्या नावेला मुद्दाम छिद्र पाडण्यासारखे आहे. जप राहिला तर प्रगती थांबेल, पण चुकीची गोष्ट केली तर अधोगती सुरू होते. म्हणूनच परमार्थात ‘साधनेच्या वेगा’पेक्षा ‘दोषांचा त्याग’ याला संत जास्त महत्त्व देतात.

असा हा अत्यंत महत्त्वाचा विचार करणे त्यावरच चिंतन व कृती करण्याचा निश्चय करणे आपले कर्तव्य आहे जर रामरायाची कृपा हवी असेल तर!

*

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ६ – ढिंचणीया -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ६ – ढिंचणीया – ☆ विभावरी कुलकर्णी

काही दिवसापूर्वी एका जुन्या घरात जाण्याचा योग आला. त्या घरातील वयस्कर व्यक्तीने खूप जुन्या वस्तू एका पत्र्याच्या पेटीत ठेवल्या होत्या. त्यात एक लाकडी वस्तू सापडली. ती काय असेल? हे काहीच समजेना. मग त्या गावात जरा वयस्कर, जाणकार व्यक्तींकडे चौकशी करताना काही माहिती मिळाली. तर या वस्तूचे नाव होते, ढिंचणीया किंवा गुडघवणी या वरूनही काही संदर्भ लागेना. पण जरा सखोल चौकशी करता, या बहुउपयोगी वस्तूची काही माहिती मिळाली.

‘ढिंचणीया’ हे प्राचीन भारतीय संस्कृतीतील, विशेषतः मराठा आणि राजस्थानी दरबारी परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण साधन आहे. हे मुख्यत्वे गुडघा किंवा कोपर टेकण्यासाठी वापरले जात असे.

​शिष्टाचार म्हणून जुन्या काळी राजदरबारात किंवा मोठ्या व्यक्तींसमोर बसताना जमिनीवर गुडघे टेकून बसण्याची पद्धत होती. बराच वेळ या स्थितीत बसल्यामुळे गुडघ्यांना त्रास होऊ नये, म्हणून या ‘ढिंचणीया’चा आधार घेतला जात असे. हे केवळ एक साधन नसून ते वापरणाऱ्याच्या प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. राजा-महाराजांचे ढिंचणीया हस्तिदंती, चांदीचे किंवा महागड्या लाकडावर नक्षीकाम केलेले असायचे.

याचे वेगवेगळे आकार असतात. त्या नुसार त्याचे उपयोग बदलतात.

​काहींचा वरचा भाग चंद्राकार असतो, ज्यावर गुडघा व्यवस्थित स्थिरावतो. खालचा भाग रुंद आणि जड असतो जेणेकरून ते हालू नये.

ढिंचणीयावर अतिशय सुंदर मणी काम आणि झालर लावलेली असे. अशा वस्तूंवर सहसा रेशमी कापड, मखमलीचे अस्तर किंवा बारीक धातूचे काम केलेले असते.

​हे महाराष्ट्रातील जुन्या घरांमध्ये वापरले जाणारे एक लहान आसन किंवा आधार आहे. याचा आकार डमरूसारखा किंवा पेला उलटा ठेवल्यासारखा असतो. पूर्वीच्या काळी जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवण करत किंवा इतर कामे करत, तेव्हा गुडघ्याला किंवा हाताला आधार देण्यासाठी याचा वापर केला जात असे.

​ ढिंचणीया विविध प्रकारात पाहायला मिळते.

​लाकडी व संखेडा प्रकार:

‘संखेडा’ शैलीतील ही गुजरातमधील एक प्रसिद्ध लाकडी कोरीवकाम आणि रंगकाम करण्याची कला आहे, ज्यामध्ये गडद लाल, मरून आणि सोनेरी रंगांचा वापर करून सुंदर नक्षीकाम केले जाते.

पितळी सजावट: लाकडी ढिंचणीयावर पितळी फुले लावून त्याला अधिक आकर्षक बनवलेले असते. हे विशेषतः श्रीमंत किंवा सरंजामी थाटाच्या घरांमध्ये पाहायला मिळत असे.

हे साधारणपणे ४ ते ६ इंच उंचीचे असतात, जेणेकरून बसलेल्या स्थितीत हाताचा कोपर किंवा गुडघा त्यावर टेकवता येईल. त्या मुळे गुडघ्या वरचा ताण कमी होतो. मांडी लॉक व्हायला मदत होते, ज्या मुळे दीर्घकाळ ताठ बसता येत असे. या मुळे रक्ताभिसरण सुरळीत रहाते. आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. काशाचे ढिंचण आरोग्यासाठी चांगले असते.

यावर नक्षीकाम, छिद्रे असतात. त्या मुळे हवा खेळती रहाते. आणि घाम येत नाही.

काही लाकडी ढिंचण बुद्धीळातील प्याद्याच्या आकाराचे असायचे. त्याने शरीराच्या काही भागावर मसाज करण्यासाठी वापर केला जायचा. काहीवर जप करताना कोपर टेकवला जात असे. त्यामुळे हाताला रग लागत नसे.

हे केवळ उपयोगाची वस्तू नसून घराच्या सौंदर्यात भर घालणारे एक शोभेचे साधनही मानले जात असे.

​आजच्या काळात या वस्तू केवळ संग्रहालयात किंवा जुन्या घराण्यांच्या वारशात पाहायला मिळतात. पण कोणाच्या घरात असेल तर त्याची काळजी घेऊन शोभेच्या वस्तूंची नक्कीच शोभा वाढवेल.

सफाई आणि निगा राखण्यासाठी काही गोष्टी कराव्यात.

​धुळीपासून संरक्षण करण्यासाठी यावर बारीक मणी आणि धागे असल्याने ओल्या कापडाचा वापर टाळावा. मऊ ब्रशने (उदा. पेंट ब्रश) हळुवारपणे धूळ झटकून घ्यावी.

​पाण्याचा वापर टाळावा. जर यामध्ये लाकूड किंवा पुठ्ठा असेल, तर पाणी लागल्याने ते फुगू शकते किंवा मणी सुटू शकतात.

​धातूची चकाकी टिकवण्यासाठी जर त्यावर चांदीचे किंवा पितळेचे मणी असतील, तर त्यांना हलक्या हाताने कोरड्या सुती कापडाने पुसावे. कोणत्याही प्रकारचे तीव्र केमिकल वापरू नका.

या वस्तूचा वापर केवळ प्रदर्शनासाठी म्हणून करावा. हवेतील ओलाव्यापासून वाचवण्यासाठी काचेच्या कपाटात (Showcase) ठेवणे सर्वोत्तम ठरेल.

अशाच काही पूर्वी उपयुक्त पण आता काळाच्या ओघात हरवलेल्या व दुर्मिळ वस्तूंची माहिती घेऊ या.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

 सहजच मनातल शब्दात – जेष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे

ज्येष्ठत्व म्हणजे वय वर्ष ६० च्या नंतरचा काळ. आजकाल लाईफस्पॅन वाढले आहे. त्यामुळे हा काळ पण चांगला लांबलचक असू शकतो. फक्त थोडा वेगळा, म्हणजे आतापर्यंत व्यतीत केलेल्या काळा पेक्षा वेगळा.

श्रेष्ठत्व म्हणजे आपले काम /नोकरी, पद, हुद्दा यात वरच्या पायरीवर असणे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे ही वाटचाल येथे याचा अर्थ, माझ्या मते त्यांच्या विचारांचा दर्जा, त्यांची वागणूक, त्यांचे एकंदर सोशल लाईफ, घरच्यांशी संबंध, तडजोड, समाजात त्यांचे वावरणे, समाजाप्रती त्यांची जबाबदारी मुख्यतः रिटायर्ड लाईफस्टाईल. कसे जगतात? या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.

या सर्व गोष्टी ज्येष्ठांच्या श्रेष्ठत्वाचे मोजमाप करणारे पॅरामीटर्स आहेत.

वयाच्या साधारण पंचविसाव्या वर्षांपासून नोकरी करणारा माणूस किंवा स्त्री जेंव्हा वयाच्या अठ्ठावन किंवा साठाव्या वर्षी रिटायर्ड होते, तेंव्हा एक वेगळेच जग त्यांच्या समोर असत.

आता पर्यंत नोकरी, पगार, मानसन्मान, बिझी लाईफ, एक ठराविक दिनचर्या अचानक एक दिवस सर्व बंद होणार, ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत खरी असली तरी पचायला जड असते. दिवसभर बाहेर राहण्याची सवय असल्याने, पूर्ण वेळ घरी राहणे जमत नाही. अचानक मिळालेला रिकामा वेळ कसा काढायचा? हा प्रश्न सोडविणे सोपं काम नाही. Post retirement manage करायला शिकावेच लागेल. दुसरा पर्यायही नाही.

या post retired management वरच तुमचे श्रेष्ठत्व अवलंबून असते.

एव्हाना घरातील चित्र ही बदलेले असते. घरात सून आलेली असते, मुल आपापल्या कामात बिझी असतात. खरं तर History Repeat होतं असते. दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या ला आपलेच घर नव्याने दिसते. घरातील सकाळ ते संध्याकाळ पर्यंत घडणाऱ्या घटनांना तो प्रथमच दररोज बघत असतो. घरातील अगदी सामान्य घडणाऱ्या गोष्टी बघून घरातील प्रमुख व्यक्तीला म्हणजे मला आता दुय्यम स्थान मिळतय की काय? अशी शंका मनात येऊ शकते.

बाबा! तुम्हाला घरातच रहाचंय ना, मग घाई करू नका. थांबा जरा.

अहो! तुम्ही नंतर जा ना आंघोळीला.

जरा थोड्या वेळ थांबा. मुलांचे डबे झाले की देते चहा तुम्हाला.

अशी अगदी साधी वाक्यं जरी कानावर पडली तर ती मनाला लागतात.

आता नोकरी नाही ना मला, तर मला कोणी विचारत नाहीये, आता माझी या घरात किंमत राहिली नाही. आधी असं कधी कोणी काही म्हंटल नाही. हा एक निगेटिव्ह विचार तुमची मानसिक शांतता घालवू शकतो. विचारांची दिशा बदलू शकतो

असे विचार म्हणजे तुमची श्रेष्ठत्वाकडे वाटचाल नाही तर खडूस म्हातारा कॅटेगरीत आपली मेंबरशीप नोंदविण्याची तयारी तुम्ही स्वतः च करत आहात एवढं नक्की. आणि त्याबरोबरच पूढच्या संभावित कठीण दिवसांच्या दस्तावेजां वर तुम्ही स्वतः च सही करत आहात. हे लक्षात असू द्यावे.

जेष्ठत्वाबरोबर श्रेष्ठत्व सांभाळणे तेवढं सोपं काम नाही.

एका स्त्रीला हा काळ तेवढा कठीण नसतो कारण नोकरी करत असतानाही ती होम फ्रंट वर काम करत होतीच. फक्त सूनेबरोबर जमायला हवं. माझ्या पेक्षा लहान छान, हुषार, शिकलेली मुलगी माझी स्पर्धक नाही तर माझ्या बरोबर या घराची जबाबदारी घेणारी आहे. माझ्या मुलाची यापुढे मला काळजी करायची गरज नाही. आम्ही दोघी म्हणजे नवीन आणि जून्या चे combination आहे. मी पारंपरिक तर ती नवीन आधुनिक. मस्त मजा करू आम्ही. दोघी मिळून छान घर सांभाळू.

हा एक विचार सहजच तुमचा दर्जा वाढवेल.

बरे असो,

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ व्यवहाराचा होता, जेष्ठत्वाचा काळ भावनांचा, नात्यांचा असतो. डोळ्यापुढे काहीही goal नसताना दिवस घालविण्यासाठी पुन्हा एकदा काही तरी नवीन करण्याचा, वेळेचे, कामाचे नियोजन करण्याची आवश्यकता असते..

I am retired from work not from Fun.

हे लक्षात ठेवून Rethink, Rebuild, Redesign करून पूढची जीवनशैली Reset करायची वेळ असते.

तुम्ही आपल्या नोकरीत किती ही हुषार, उच्च पदावर असला तरी ही post retirement management ची परीक्षा वेगळीच आहे, याचा सिलेबसही वेगळाच. यात Ego, Maths या विषयात नापास झाले तरच distinction मिळते. येथे व्यवहार नाही दृष्टीकोन महत्वाचा असतो.

आता घरचा प्रमुख असला तरी नवीन पीढी ला बरोबर समजून त्यांच्या बरोबर चालायची जबाबदारी असते. आता कधी सारथी, कधी senior advisor ची भूमिका करायची असते.

मी म्हणेन तेच, तसंच, मी बोलणार तुम्ही ऐका, I know everything असा हेकेखोर पणा जेवढा कंट्रोल मध्ये ठेवता येईल तेवढंच जीवन सुखकर होत. घरातील आणि घराच्या बाहेरही.

 तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी हा approach असावा.

लग्नानंतर नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर तुम्ही दोघे किती तरी वर्ष आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यातच बिझी होता. आपल्या अर्धांगिनी बरोबर quality time spend करण्याचे दिवस पुन्हा एकदा अनुभवायचे आहेत. सहजीवन पार्ट II पण मजेतच जगायचा आहे ना.

ते जाऊ दे

तुम्ही स्वतः तरी या आधी मनसोक्त स्ट्रेस फ्री आयुष्य जगला आहात का? वर्षानुवर्षे घड्याळाच्या काट्या कडे बघत दिवस काढले. किती तरी चांगले कार्यक्रम ऑफिस मध्ये महत्वाचे काम आहे म्हणून अटेंड केले नाही.. आजारी असतानाही महत्वाची मिटिंग आहे म्हणून ऑफिसात गेला आहात.

रिटायर्ड झाल्यावर घरचे वातावरण तर ऑफिस पेक्षा नक्कीच चांगले स्ट्रेसफ्री असणार आहे. येथे तुमचे स्पर्धक नाही तर तुमची आपली माणसं आहेत. येथे तुमचे पाय ओढणारे कोणी नसेल.

आज जेंव्हा ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जायची तयारी करायची आहे, तेंव्हा या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग काय ते ठरवा. बिनधास्त जगण्याचा हा काळ आहे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जाताना खूप काही मोठे मेहनतीचे काम करायची गरज नाही. भारी वजन वगैरे उचलावे लागत नाही. शारीरिक कसरत नाही, पण मानसिक कसरत करायची गरज मात्र असते.. फक्त थोडासा वेगळा विचार करायची गरज आहे. सवयीत थोडे बदल करायची गरज आहे.

विचारांचे मॅनेजमेंट जमले तर, retired आयुष्याचे मॅनेजमेंट जमलेच म्हणून समजा.

थोडक्यात काय ज्येष्ठत्वात पाऊल टाकले की एक वेगळीच नियमावली तयार करायची असते. आता खडूस म्हातारा की graceful आजोबा कोणत्या संघात प्रवेश घ्यायचा हे स्वतः च ठरवायचे असते.

या नियमावली वरच तुमचं श्रेष्ठत्व अवलंबून असते. अशी नियमावली आयुष्यात बऱ्याच टप्प्यावर करावीच लागते. नोकरी लागल्यावर, घरी बाळाचा जन्म झाल्यावर.

मी असाच आहे. असं म्हणून चालणार नाही.

Growing old is mandatory but getting old is optional.

अगदी म्हाताऱ्या माणसारखं वागायची काहीच गरज नाही. म्हातारपण graceful पण नक्कीच असू शकत. आपले छंद जोपासण्याची हीच तर ती वेळ आहे.

स्वतः वर थोडे नियंत्रण ही ठेवावे लागते. आजपर्यंत घरची कामं केली नाही, पण आता वेळ आहे तर केली तर काय हरकत आहे.? तुमच्या मुळे कोणाला हातभार लागत असेल, मदत होत असेल तर काय हरकत आहे.?

भाजी चिरणे, कपडे मशीन मध्ये लावणे, सर्वांसाठी चहा करणे, नातवांना गोष्टी सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना खेळायला बाहेर घेऊन जाणे.

म्हणतात ना

धुन बदलके तो देखो,

या सर्व कामांचा आनंद वेगळाच आहे.

मोठेपणा गाजवायचा नसतो तो वागण्यात दाखवायचा असतो.

तुमचा मुलगा सून तुमचे प्रतिस्पर्धी नाही. त्यांच्या भानगडीत जास्त पडू नये. सारखं टोकू नये. त्यांच्या खर्चावर लक्ष देऊ नका. नवीन जनरेशन आपल्या पेक्षा हुषार आहे, ते आपलं मॅनेज करतील पढे लिखे बुद्धु. असं कोणी म्हणायला नको असेल तर आपल्या पैशाचे व्यवस्थापनही व्यवस्थित करायला हवच. नटसम्राट चे उदाहरण मात्र लक्षात असू द्यावे.

नवीन जगात वावरताना रोजच्या नवनवीन होणार्या frauds बद्दल जागरूक रहाव लागेल.

घराबाहेरील जगाशी पण वागताना पुन्हा लक्षपूर्वक माईंडसेट तयार करावा लागेल.

तेथे तर वेगवेगळ्या लोकांशी संबंध येणार आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्याचे काम केले तर समोरच्या व्यक्तीला समजणे सोपे होते. समजदार व्यक्ती खूप ज्ञानी आणि मुर्ख व्यक्ती समोर शांत बसतो. भाजीवाला, रिक्षा चालकांनी हुज्जत घालण्यापेक्षा त्याला चार पैसे जास्त दिले तर हरकत नाही. कोणाचे काही चांगलं दिसलं तर कौतुक करायची सवय लावावी. त्यांना तर आनंद होतोच, आपल्याला पण चांगलं वाटतं.

लोकांना माझी गरज आहे की नाही माहीत नाही पण मला लोकांची गरज आहे.

हा एक विचार मनात ठेवला तर सर्वांबरोबर सहज जमत.

जेष्ठ नागरिक संघ, वाचक मंच, आपल्या आवडीनुसार यांचे सदस्यत्व घेतले तर आपोआपच चार लोकांशी ओळख होते, तुम्हाला पण तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण करायची संधी मिळते. यासर्व गोष्टींमध्ये स्वतः पूढाकार घ्यावा लागतो.

एकंदरीत वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठत्व तर आपोआपच मिळत, श्रेष्ठत्व मिळवायला स्वतः चे प्रयत्न करावे लागतात. मानसिक स्वास्थ्यासाठी पण हे गरजेचे असते.

म्हणतात ना,

संसार को बदलने की कोशिश मत करो, स्वयं को बदलो.

रस्त्यावर दगड असले तर आपण रस्त्यावर कार्पेट नाही टाकत, पायात चपला घालतो.

तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्याची जबाबदारी तुमची स्वतः ची आहे. आपल्या आयुष्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात कधीच देऊ नये.

आपल्या मनात, सवयीत, वागणुकीत असे विचार ठेवले तर सहजच

हे आजोबा आपले ज्येष्ठत्व छान सांभाळतात. मी पण म्हातारा झालो की असंच वागणार. असे comments नक्की मिळतील.

You will set an example for others.

सिर्फ सूरज के निकलनेसेही सवेरा नहीं होता।

विचारों के बदलनेसे भी नया दिन / नया दौर शुरू होता है।

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ क्षण झाला अमर… ☆ अपर्णा परांजपे

सहज सुचलं म्हणून… ✍️क्षण झाला अमर

१: “भूत-भविष्य चिंतनात नाही तर वर्तमान कळतं…”

भूत म्हणजे स्मृतींची सावली.

भविष्य म्हणजे कल्पनांची छाया.

दोन्हींचा आधार मन आहे — आणि मनच काळ निर्माण करते.

पण वर्तमान?

तो ना स्मृती आहे, ना कल्पना. तो शुद्ध अनुभूती आहे.

 

उपनिषद म्हणतात —

“यत् साक्षादपरोक्षाद् ब्रह्म” —

जे प्रत्यक्ष आहे, तेच ब्रह्म आहे.

वर्तमान क्षण हाच साक्षात् ब्रह्मानुभवाचा दरवाजा आहे.

जो क्षण पूर्णतेने जगतो, तो काळाच्या पलीकडे जातो.

 

२: “दिवसांचे महत्त्व कमी झाले की ‘क्षणांचे’ मूल्य कळते…”

दिवस हे मोजमाप आहे.

क्षण हा अनुभूती आहे.

दिवस बाह्य घड्याळ सांगते. मात्र क्षण अंतःकरण उलगडते.

जेव्हा आपण दिवसांच्या धावपळीतून थांबतो, तेव्हा जाणवते —

जीवन दिवसांनी नव्हे, तर जागृत क्षणांनी घडते.

 

अद्वैत दृष्टीने —

प्रत्येक क्षणात पूर्णत्व आहे.

कारण क्षणातच चैतन्य प्रकट आहे.

 

३: “भगवंत हृदयस्थ आहे…”

भगवंत शोधायचा बाहेर का?

तो तर साक्षीभावात, शुद्ध जागरूकतेतच आहे.

ईशावास्यमिदं सर्वम्” —

सर्व काही त्याने व्यापले आहे;

मग हृदय त्याच्या बाहेर कसे असेल?

जेव्हा मन भूत-भविष्य सोडते,

तेव्हा हृदयात शांत, निर्विकल्प प्रकाश उगवतो.

तोच भगवंत.

🕉️ थोडक्यात

न भूतं न भविष्यं, केवलं वर्तमानम्।

न कालः तत्र भाति, केवलं चैतन्यम्।

यस्मिन् क्षणे विश्रान्तिः, स एव ब्रह्मक्षणः॥

(भूत नाही, भविष्य नाही — जे उरते ते वर्तमान चैतन्य; ज्या क्षणी विश्रांती मिळते, तोच ब्रह्मक्षण.)

 *

ध्यान म्हणजे अपूर्णतेच गोडी वाटणे, अनुभवणे

भूत-भविष्य निवळले की क्षण पवित्र होतो;

क्षण पवित्र झाला की हृदय मंदिर बनते. 🙏

*

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ७ – अडकित्ता -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ७ – अडकित्ता – ☆ विभावरी कुलकर्णी

जुन्या वडिलोपार्जित घरातील अडगळ काढली की खूप वेगळ्या न बघितलेल्या वस्तू बघायला मिळतात. आणि मोठ्या माणसांच्या जुन्या आठवणी जागृत होतात. त्यांच्या कडून त्या आठवणी, वस्तूंचे महत्व व त्याच्याशी निगडित आठवणी ऐकायला खूप मजा येते. याच सामानात एक खूप जुनी पत्रिका सापडली. त्यातील एक वाक्य वाचले, पान सुपारी समारंभ! हे वाचून मोठीच गंमत वाटली. घरातील मोठ्या व्यक्तींना त्याचा अर्थ विचारल्यावर लक्षात आले. हा समारंभ म्हणजे सध्याचे रिसेप्शन! मग एक वस्तू दिसली. ती म्हणजे अडकित्ता! आमच्या पिढीने तो ओझरता तरी पाहिला आहे. पण आता कोणालाच माहिती नाही. मग आजीशी संवाद करुन माहिती मिळवली.

अडकित्ता ही महाराष्ट्राच्या आणि भारतीय परंपरेतील एक महत्त्वाची वस्तू आहे. सुपारी कातरण्यासाठी वापरले जाणारे हे एक कल्पक साधन आहे.

​अडकित्ता हे लोखंड, पितळ किंवा स्टीलपासून बनवलेले एक कात्रीसारखे साधन आहे. यात एका बाजूला धारदार पाते असते आणि दुसऱ्या बाजूला सुपारी धरण्यासाठी खोबणी असते.

​अडकित्त्याचा उगम नेमका कधी झाला याचे ठोस पुरावे नसले, तरी भारतात सुपारी खाण्याची परंपरा हजारो वर्षांपासून आहे.

​प्राचीन काळी सुरुवातीला सुपारी फोडण्यासाठी दगड किंवा साध्या सुऱ्याचा वापर होत असे. परंतु सुपारी कडक असल्यामुळे ती कातरण्यासाठी हळूहळू ‘लिव्हर’ (lever) तत्त्वावर आधारित अडकित्त्याचा शोध लागला.

​पेशवेकाळात आणि मोगल काळात अडकित्ता अधिक कलाकुसरीचा होऊ लागला. त्यावेळी हे केवळ एक साधन नसून श्रीमंतीचे लक्षण मानले जाई.

महाराष्ट्रामध्ये अंजर्ले (कोकण) आणि जळगाव येथील अडकित्ते खूप प्रसिद्ध होते. हे प्रामुख्याने लोहार काम करणाऱ्या कारागिरांकडून हाताने तयार केले जात.

​अडकित्ते त्यांच्या आकार आणि कामावरून विविध प्रकारांत विभागले जातात.

लोखंडी अडकित्ता

हे सर्वात मजबूत आणि दररोजच्या वापरासाठी असतात. यांची धार बराच काळ टिकते.

पितळी अडकित्ता

हे दिसायला आकर्षक आणि पिवळसर रंगाचे असतात. यावर अनेकदा कोरीव काम असते.

कोरीव/नक्षीदार अडकित्ता

यावर प्राणी (सिंह, पोपट, घोडा) किंवा फुलांच्या वेलींची नक्षी असते. हे प्रदर्शनासाठी जास्त वापरले जातात.

सजावटीचे अडकित्ते

काही अडकित्त्यांना चांदीचा मुलामा किंवा मोत्यांची सजावट असते, जे प्रामुख्याने लग्नसमारंभात वापरतात.

दुधारे/विशिष्ट रचनेचे अडकीत्ते

काही अडकित्ते सुपारीचे चिप्स पाडण्यासाठी तर काही जाड तुकडे करण्यासाठी बनवलेले असतात.

महाराष्ट्रातील नवापूर आणि अहमदनगर भागातील जुन्या पद्धतीचे अडकित्ते त्यांच्या मजबूतीसाठी आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. आजच्या काळात पाकिटातील तयार सुपारीमुळे अडकित्त्याचा वापर कमी झाला असला, तरी त्याचे पारंपरिक महत्त्व आजही टिकून आहे.

​खिशाचा (छोटा) अडकित्ता

प्रवासात सोबत ठेवण्यासाठी अतिशय लहान आकाराचे अडकित्ते.

​अडकित्त्याचे मुख्य आणि दुय्यम उपयोग म्हणजे  ​सुपारी कातरणे हा याचा मुख्य उपयोग आहे. कडक सुपारीचे सुबक तुकडे किंवा चकत्या (काचऱ्या) करण्यासाठी याचा वापर होतो.

पूर्वीच्या काळी अडकीत्त्याच्या साहाय्याने सुपारी विविध प्रकारे कातरता येणे हे एक कौशल्य समजले जायचे. अशी व्यक्ती प्रशंसेला पात्र असायची.

​तांबूल/विडा बनवणे पाहुणचारात विडा देताना अडकित्त्याने सुपारी कातरणे ही एक पद्धतशीर कला मानली जाते. प्रवासामध्ये बऱ्याच व्यक्तींजवळ पानसुपारीचा डबा असायचा आणि त्यात अडकित्ता हमखास असायचा.

​धार्मिक कार्य लग्नामध्ये किंवा मुंजीत ‘अहेरा’चा भाग म्हणून किंवा पूजेच्या साहित्यात अडकित्ता ठेवला जातो.

एक शस्त्र म्हणून

जुन्या काळात प्रवासात स्वसंरक्षणासाठी किंवा लहान कामांसाठी चाकू म्हणूनही अडकित्ता जवळ बाळगला जात असे.

​आजच्या काळात अडकित्त्याचा वापर कमी झाला असला, तरी अनेक घरांमध्ये तो एक ‘अँटिक’ (Antique) किंवा सांस्कृतिक वारसा म्हणून जपून ठेवला जातो.

अडकित्ता म्हंटले की आमच्या लहानपणीचे एक आजोबा आठवतात. त्यांच्या हातात ते निवांत असले की, नेहेमी अडकित्ता असायचा. आता मात्र हा अडकित्ता एखाद्या संग्रहालयात बघायला मिळतो. आणि आपले गतकाळातील वैभव सांगत असतो.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पत्रिका (कुंडली) आणि प्रगती पुस्तक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “पत्रिका (कुंडली) आणि प्रगती पुस्तक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

आपल्याला प्रगतीचा आधार समजवून घ्यायला याच दोन गोष्टी लागतात. दोन्ही ठिकाणी काही घरं (रकाने) आणि काही आकडे असतात. पत्रिकेवरच्या आकड्यांनुुसार निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विश्वास ठेवला नाही तरी, प्रगती पुस्तकावरच्या आकड्यांवर विश्वास ठेवावाच लागतो. आणि याच प्रगती पुस्तकावरच्या आकड्यांमुळे बर्‍याचदा (घरातली माझी) परिस्थिती बदललली होती. त्यामुळे आकडे आणि परिस्थिती माझ्या बाबतीत हातात हात घालून फिरत असली तरी मोठे आकडे आणि चांगली परिस्थिती अशी ती नव्हती, आणि नाही.

पत्रिका ही वेळ आणि काळ यावर, म्हणजे जन्मावर अवलंबून असते अस म्हंटल तर प्रगती पुस्तक हे केलेल्या कर्मावर अवलंबून असतं अस म्हणाव लागेल. पण या जन्मावर आणि कर्मावर अवलंबून असलेल्या गोष्टीबद्दल वर्मावर लागेल अस बरच काही ऐकाव लागलं आहे. पत्रिकेत कदाचित मागच्या जन्माच्या काही गोष्टींचा प्रभाव असेल. पण प्रगती पुस्तक फक्त वर्तमानाशी निगडीत असतं. आणि माझ वर्तमान मान वर करण्यासारखं कधीही नव्हत. आणि नाही.

पत्रिकेत भविष्याचा वेध असेलही. पण प्रगती पुस्तकावरून घरी काय परिस्थिती निर्माण होईल याचे लागलेले वेध लगेच लक्षात यायचे. आपली पत्रिका प्रत्येकाला समजेलच अस नाही. ती समजण्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण प्रगती पुस्तकाच तस नाही. ती आमचा अभ्यास दाखवात होती. आणि इतरांना अभ्यास न करताही तो लक्षात यायचा.

प्रगती पुस्तक हे शाळेचच असत अस नाही. ते नंतर तुम्ही काय, कसं, किती कमवलं, किंवा जमवलं, आणि गमवलं याचही असत. फक्त शाळेतल्या प्रगती पुस्तकावर ते आकड्यांनी दाखवतात, तर आयुष्यात केलेल्या गोष्टी या बोलून दाखवतात. पण त्यावरुन निकाल लक्षात येतोच.

माझी पत्रिका आणि माझं प्रगती पुस्तक यावर मी बोलण्यापेक्षा इतरांनाच बोलण्यासाठी भरपूर वाव मिळाला. माझ्या पत्रिकेत भविष्यात काय आहे हे कोणी अभ्यास करून सांगण्यापेक्षा, माझं प्रगती पुस्तक पाहून माझं भविष्य अभ्यास न करताही सांगणारे बरेच भेटले.

पण माझ्या पत्रिकेत सांगितलेल्या काहि गोष्टी बर्‍याच अंशी तशाच घडल्या. काही गोष्टी अशा…

मी मोठा होईन… खरंच मी पाहता पाहता साठीला आलो.

मी स्वत:च्या पायावर ऊभा राहिल… खरंच आजही मी काठीच्या आधाराशिवाय माझ्या पायांवर ऊभा आहे.

आत्ता बरीच बडबड करत असला, कोणाच विशेष ऐकत नसला तरी पंचविशी नंतर परिस्थितीत अमुलाग्र बदल घडून यायची शक्यता… अठ्ठावीसाव्या वर्षी माझं लग्न झाल आणि… बडबडतर कमी झालीच, आणि ऐकालाही लागलो. आता कोणाच ऐकतो हा भाग निराळा… पण त्यामुळेच आता आईच बोलणंसुध्दा ऐकाव लागतं. काही वेळा तर मुलंही बोलतात… बोलणं ऐकणं आणि ऐकाव लागणं यातला असलेला वरवरचा फरक खोलपणाने समजला.

धनराशीचा एखादा आकडा किंवा रकाना पत्रिकेत असतो का याची कल्पना नाही. पण इतर सगळ्या राशींनी रकाने पूर्ण भरल्याने कोणत्याही राशीने या बाबतीत माझ्यावर तेवढा विश्वास दाखवलाच नाही. किंवा विनाकारण त्या धनराशीने माझ्या पत्रिकेत घुसखोरी केलेली नाही.

माझ्या पत्रिकेतल्या काही आकड्यांवरुन स्थैर्य आणि सकारात्मक व्रुत्ती आहे अस लिहिलं होत. ते स्थैर्य म्हणजे नक्की काय हे मला बर्‍याच विषयात बरीच वर्ष पस्तीस किंवा छत्तीस गुण मिळाल्यामुळे, आणि पुढे पगारातही कमीतकमी मिळणार्‍या वाढीमुळे समजलं. फक्त त्या पस्तीस आणि छत्तीस या आकड्यांमुळे एकाच वर्गात राहण्याच स्थैर्य मात्र टळलं होत. कदाचित या बाबतीत माझा गुरु आणि माझे गुरु प्रभावशाली होते. किंवा दोघांचा शनि कमजोर होता. याच बाबतीत आमचे छत्तीस गुण जुळले असतील, आणि मला परिक्षेत छत्तीस गुण मिळाल्याने गुरूंचा मान राहिला असेल. त्या स्थैर्याचा अर्थ वाढणार नाही, असा न घेता कमी होणार नाही असाच मी सकारात्मक घेतला.

माझ्या पत्रिकेत असणाऱ्या आणखीन दोन गोष्टी म्हणजे इतरांनी केलेल्या कामामुळे याला अपेक्षित यश मिळाल नाही तरी आशावाद, आणि धैर्य सोडणार नाही… खरच माझ्या भविष्या बाबतीत मी म्युच्युअल फंडा सारखाच आशावादी आहे. तर धैर्य दाखवतांना गडगडलेला शेअर बाजार मला तेेवढा विचलित करत नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंद ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ आनंद ☆ शालिनी जोशी

 बालकवी म्हणतात,

आनंदी आनंद गडे

 जिकडे तिकडे चोहीकडे

 सगळीकडे आनंदच भरलेला आहे. येथे आहे. तेथे आहे. घरात आहे. बाहेर आहे. पण तो आपल्याला बोलवायला येत नाही. तर आपण त्याला शोधावा लागतो. शोधा म्हणजे सापडेल हेच आनंदाचे तत्व. मग तो झाडा, फुलात सापडतो. कधी पशु, पक्षांत सापडतो. आकाशातही असतो. जमिनीवरही असतो. फक्त बघायचे दृष्टी हवी. ज्याला जे आवडते, मन स्थिर होते तो त्याच्यासाठी आनंदाचा ठेवाच होतो.

 एखादा चित्रकार असेल, निसर्गाचे चित्र काढण्यात जेवढा तल्लीन होतो तेवढाच मांजराबरोबर खेळणाऱ्या पिल्लाचे चित्र काढण्यात किंवा एखाद्या भिकाऱ्याचे चित्र काढण्यात होतो. समोर जे आहे ते हुबेहूब कागदावर उतरवणे म्हणजे त्याच्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण करणेच असते. त्यात तो तासनतास रमतो. त्याच्यासाठी तो आनंदाचा ठेवाच असतो. दुसरा एखादा वाद्य वाजवण्यात, तर कोणी नृत्यात असाच रमून जातो. तोच त्याचा आनंद ठरतो. तर कोणी ऑफिसच्या कामात जीव लावलो. कोणी कथा लिहितो तर कोणी घर नीटनेटके ठेवतो. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या विषयात, वेगवेगळ्या ठिकाणी पण आनंद तोच. मिळवण्याची पद्धत वेगळी असते. पोटापाण्यासाठी काहीवेळा मिळेल ते काम करावे लागते पण तेच तत्परतेने केले तर आनंद. दिरंगाई केली, कशाला उद्या पाहू, अशी उडवा उडवी कधी समाधान देत नाही. काही लोक नोकरी सांभाळून संध्याकाळी अंध लोकांना, गरजूंना मदत करण्याचे, सेवाभावे वृद्धसेवा करण्याचे, रुग्णसेवेचे काम तसेच मंदिर सेवा मनापासून करतात. तेव्हा दोघांनाही सारखाच आनंद होतो, करणारा आणि ज्याची करतो त्याला म्हणजे आनंद द्विगुणीत होतो.

 जेथे माणूस स्वतःचे अस्तित्व विसरून रमतो. देहाचे दुःख, सुख विसरतो तोच आनंदी होऊ शकतो. आनंद म्हणजे पूर्ण समाधान, तृप्ती. तो पैशाने विकत घेता येत नाही. वाटता मात्र येतो. तेव्हा भूतकाळाचा शोक आणि भविष्याची चिंता विसरून वर्तमानाचा आनंद लूटावा. समर्थ रामदास म्हणतात,

 संत आनंदाचे स्थळ l संत सुखची केवळ l नाना संतोषाचे मूळ l ते हे संत ll

 (दा. १/५/१६)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “१ मे : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “१ मे : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन☆ श्री जगदीश काबरे ☆

१ मे हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची मुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील कामगार चळवळीत रुजलेली आहेत. तेव्हाच्या औद्योगिक क्रांतीच्या लाटेत कारखानदार आणि भांडवलदार वर्गाने कामगारांना अक्षरशः यंत्राप्रमाणे राबवले होते. दिवसाचे चौदा ते सोळा तास काम, अत्यल्प वेतन, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि बालमजुरी हे त्या काळाचे भयाण वास्तव होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर’ने १८८४ साली एक ऐतिहासिक ठराव केला. त्यानुसार १ मे १८८६ पासून आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्याची मागणी केली गेली. या मागणीसाठी शिकागो शहरात हजारो कामगार रस्त्यावर उतरले. ४ मे १८८६ रोजी हेमार्केट चौकात एक प्रचंड मोठी सभा भरली होती. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोट केला, पोलिसांनी गोळीबार केला, आणि अनेक कामगार तसेच पोलीस अधिकारी ठार झाले. या घटनेला ‘हेमार्केट हत्याकांड’ असे म्हणतात. या घटनेनंतर जगभरातील कामगार चळवळींना एक तीव्र आवेग मिळाला आणि कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक झाला. १८८९ साली पॅरिस येथे भरलेल्या ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदे’त १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून जगभरातील कामगार संघटना, डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी आणि समाजवादी चळवळींनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी कामगारांचे मोर्चे निघतात, सभा होतात, त्यांच्या हक्कांची चर्चा होते आणि शोषणमुक्त समाजाचे स्वप्न अधिक बळकट केले जाते.

भारतात कामगार दिनाची सुरुवात १ मे १९२३ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाली. ‘लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान’चे नेते मलयापुरम सिंगारवेलू चेट्टियार यांनी पहिल्यांदा या दिवसाचा उत्सव भारतात आयोजित केला. त्यानंतर हळूहळू देशभर कामगार दिन साजरा होऊ लागला. महाराष्ट्रात तर हा दिवस अधिकच विशेष आहे. कारण याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

स्वातंत्र्यानंतर भारताची भाषिक आधारावर प्रांतरचना करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. लोकांची मागणी होती की समभाषिक लोकांचे एकच राज्य असावे, म्हणजे प्रशासन, शिक्षण आणि न्याय यंत्रणा आपापल्या मातृभाषेत राबवता येतील. या मागणीसाठी देशभर चळवळी सुरू होत्या. आंध्र प्रांताने वेगळ्या तेलुगू राज्यासाठी आंदोलन केले आणि पोट्टी श्रीरामुलू यांच्या बलिदानानंतर १९५३ साली आंध्रप्रदेश स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर १९५३ मध्ये न्यायाधीश फझल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन केला. या आयोगाने १९५५ मध्ये आपला अहवाल सादर केला. मात्र या अहवालात मुंबई शहराच्या बाबतीत एक अत्यंत वादग्रस्त शिफारस केली गेली. मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असावा, किंवा मराठी व गुजराती या दोन्ही भाषिकांचे एकत्र ‘द्विभाषिक राज्य’ असावे, असे सुचवण्यात आले. या शिफारशीमागे अनेक राजकीय आणि आर्थिक कारणे होती. त्या काळी मुंबई हे आजच्यासारखेच देशाचे सर्वात मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र होते. गुजराती भांडवलदार, व्यापारी आणि उद्योजकांचे मुंबईवर मोठे वर्चस्व होते. केंद्रातील काही नेते मुंबई गुजरातला जोडण्याच्या बाजूने होते. मोरारजी देसाई, जे स्वतः गुजरातचे होते, ते तत्कालीन प्रभावशाली नेते होते आणि त्यांनी द्विभाषिक राज्याचा आग्रह धरला. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असेही जाहीर वक्तव्य केले गेले होते. हा निर्णय मराठी जनतेला अत्यंत अन्यायकारक वाटला आणि त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ऊर्जा मिळाली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे केवळ एक राजकीय आंदोलन नव्हते. ती एक व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेची लढाई होती. या चळवळीने महाराष्ट्रातील विविध जाती, वर्ग, समाजगट, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, साहित्यिक, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांना एकत्र आणले. मराठी माणसाच्या हृदयात खोलवर रुजलेल्या मातृभाषेच्या आणि मातृभूमीच्या प्रेमाने हे सारे एकत्र आले होते. १९५५-५६ या काळात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली. या समितीमध्ये डाव्या पक्षांच्या कम्युनिस्टापासून ते उजव्या विचारसरणीच्या जनसंघापर्यंत विविध विचारसरणींचे पक्ष सामील झाले. शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, हिंदू महासभा, हे सारे एकत्र आले होते. एरवी एकमेकांशी वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्या या पक्षांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी हातात हात मिळवले. हे या चळवळीचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. या चळवळीला मराठी साहित्यिक आणि कलाकारांचीही साथ होती. आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या वृत्तपत्रातून अत्यंत तेजस्वी आणि प्रखरपणे या चळवळीची बाजू मांडली. त्यांच्या लेखांनी, वक्तृत्वाने आणि व्यंगचित्रांनी जनमत प्रचंड प्रमाणात ढवळले गेले. एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे असे अनेक दिग्गज नेते या लढ्याचे आधारस्तंभ बनले. ही चळवळ मराठी समाजाच्या सामूहिक जागृतीचे प्रतीक होती. ग्रामीण महाराष्ट्रापासून ते मुंबईच्या गिरणगावातील कामगारापर्यंत, आणि पुण्याच्या विद्यापीठातून ते विदर्भाच्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांची या चळवळीशी नाळ जोडली गेली होती. हे एक खालून वर उठलेले, जनसामान्यांनी उभे केलेले ‘लोकसत्ताक’ आंदोलन होते.

१९५५ ते १९६० या कालखंडात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत अनेक आंदोलने झाली. जनआंदोलन आणि सरकारी दडपशाही यांचा संघर्ष टोकाला पोहोचला होता. या काळात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १०५ निरपराध मराठी नागरिक शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. कारण नंतर त्यांच्या रक्ताने महाराष्ट्राचा नकाशा लिहिला गेला. हे हुतात्मे कोण होते? कामगार, तरुण, विद्यार्थी असलेली ती सामान्य माणसे होती. ते रस्त्यावर उतरले होते, कारण त्यांना आपल्या मातृभाषेचा, आपल्या मुंबईचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान होता. मुंबईतील फ्लोरा फाउंटन जवळ असलेल्या हुतात्मा चौकाचे नाव या शहीदांच्या स्मृतीस वाहिले गेले आहे. दरवर्षी १ मे रोजी या चौकात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि महाराष्ट्र त्यांचे ऋण मानतो. या बलिदानांनी केंद्र सरकारलाही हादरवले. जनतेच्या रोषाची तीव्रता लक्षात घेऊन, आणि या आंदोलनाची व्यापकता पाहून, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली. द्विभाषिक राज्याची कल्पना सोडून मुंबईसह महाराष्ट्र आणि स्वतंत्र गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय झाला; आणि १ मे १९६० हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी दिवस उगवला. याच दिवशी ‘महाराष्ट्र राज्य पुनर्रचना कायदा १९६०’ अंमलात आला आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विविध भागांतील मराठी भाषिकांचे एक राज्य झाले. ही केवळ एक प्रशासकीय घटना नव्हती, तर ते मराठी माणसाच्या दीर्घ संघर्षाचे फलित होते.

याच दिवशी जागतिक कामगार दिन असणे हा तर ऐतिहासिकदृष्ट्या अर्थपूर्ण योगायोग आहे. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही एका अर्थाने कामगार वर्गाचीच चळवळ होती. मुंबईच्या गिरण्यांमध्ये राबणारा मराठी कामगार, कापड गिरण्यांतील मजूर, बंदरावर काम करणारे मजूर, हे या आंदोलनाचा कणा होते. त्यांच्या घामाने आणि रक्ताने महाराष्ट्र उभा राहिला. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी या नव्या राज्याचा पाया घालण्याचे महत्त्वाचे कार्य केले. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणे, विकासाची दिशा ठरवणे आणि विविध जातींना एकत्र बांधणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान होते. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असले तरी मुंबईमुळे ते देशाचे आर्थिक केंद्रही राहिले आहे.

महाराष्ट्राची निर्मिती झाली खरी, परंतु ती अपूर्ण होती. बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार आदी भागातील मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट केले गेले. हा महाराष्ट्रावरील एक मोठा अन्याय होता आणि आजही हा प्रश्न सुटलेला नाही. बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे, तरीही ते कर्नाटकात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ५ जून १९६० रोजी चार सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. या समितीने ‘पाटसकर फॉर्मुला’ वापरण्याची शिफारस केली. या फॉर्मुल्यानुसार गाव हा घटक मानून, ज्या गावात ५०% पेक्षा जास्त एका भाषेचे लोक राहतात, ते गाव त्या भाषिक राज्याला द्यावे, असे ठरले. मात्र हा फॉर्मुला अमलात आणण्यात अपयश आले. पुढे १९६६ साली माजी सरन्यायाधीश मेहेरचंद महाजन यांची एकसदस्य आयोग नेमण्यात आला. महाजन आयोगाने आपला अहवाल सादर केला ज्यात निपाणी, खानापूर यांसह २६४ गावे महाराष्ट्राला आणि अक्कलकोटसह २२७ गावे कर्नाटकाला देण्याची शिफारस केली. मात्र या आयोगाने बेळगाव महाराष्ट्राला देण्याची शिफारस केली नाही. हे महाराष्ट्राला मान्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाजन आयोगाच्या शिफारसी एकमुखाने फेटाळून लावल्या. बेळगावचा प्रश्न आजही तीव्र आहे. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ या संघटनेने या लढ्याचे नेतृत्व केले आहे आणि आजही करत आहे. संयुक्त महाराष्ट्राची मोहीम यशस्वी झाल्यानंतर ही समिती थोडी मोडकळीस आली असली तरी ती अजूनही आपले काम करत आहे. बेळगावमध्ये मराठी शाळा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हे कार्यकर्ते अथक परिश्रम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न विविध याचिकांद्वारे गेला आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले. परंतु कर्नाटक सरकार बेळगाव सोडण्यास तयार नाही. कर्नाटकाने तर बेळगावचे नाव ‘बेलगावी’ असे कन्नड पद्धतीने बदलले आणि तेथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली. या सगळ्यामुळे मराठी मनात संताप आहे.

महाराष्ट्र आज देशातील औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक अव्वल दर्जाचे राज्य आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. माहिती तंत्रज्ञान, वित्त, मनोरंजन, उत्पादन उद्योग या क्षेत्रांत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. पण या विकासासोबतच मराठी माणसाचे, सामान्य कामगाराचे, शेतकऱ्याचे जीवनमान कसे उंचावेल हा प्रश्न अजूनही समोर उभा आहे. कामगार दिनाच्या निमित्ताने आज हे विचारणे अत्यंत आवश्यक आहे की, ज्या कामगारांनी या राज्यासाठी लढा दिला, ज्यांच्या खांद्यावर मुंबईची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभी आहे, ते कामगार आज किती सुरक्षित आहेत? गिरण्या बंद पडल्या, कामगारांच्या वस्त्या उद्ध्वस्त झाल्या, रोजगाराच्या संधी कमी झाल्या. या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औचित्यपूर्ण ठरणारे आहे.

त्या काळी मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये लाखो मराठी कामगार काम करत होते. ते मूळचे कोकणातून, देशावरून आलेले होते. त्यांनी मुंबई घडवली होती. पण मुंबईत त्यांची गणना ‘परके’ म्हणून होत होती. मुंबई महाराष्ट्राला मिळावी ही त्यांची मागणी केवळ भावनिक नव्हती, तर ती त्यांच्या अस्तित्वाचीही मागणी होती. आपल्या कामाच्या ठिकाणावर आपल्या भाषेत बोलण्याचा, आपल्या संस्कृतीत राहण्याचा हक्क मागणे हे चुकीचे कसे म्हणता येईल? कार्ल मार्क्सने सांगितले होते की कामगार वर्गाला मातृभूमी नसते, परंतु भारताच्या संदर्भात हे सूत्र पुरेसे नाही. येथे भाषा, संस्कृती आणि प्रांत यांचा प्रश्न फक्त वर्गीय प्रश्नाशी गुंफलेला नाही. मराठी कामगाराला त्याची मराठी भाषा, त्याची महाराष्ट्रीय संस्कृती यांच्याशी जोडलेले राहणे आवश्यक होते. या दोन्ही संघर्षांचा — वर्गसंघर्ष आणि अस्मितासंघर्ष — यांचा मिलाफ म्हणजेच १ मे. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, डांगे हे नेते एकाच वेळी कामगार हक्कांचे पुरस्कर्ते आणि मराठी अस्मितेचे रक्षक होते. त्यांच्या दृष्टीत या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नव्हत्या, तर त्या एकमेकांच्या पूरक होत्या. शोषणमुक्त समाजात भाषिक न्याय असतो, आणि भाषिक न्यायाच्या समाजात वर्गीय शोषण असता कामा नये, हेच सूत्र होते.

आज महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करताना आपण काही प्रश्नांना सामोरे जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, मराठी माध्यमाच्या शाळांची घसरण, रोजगाराचे प्रश्न, ग्रामीण-शहरी विषमता, भाषेचे राजभाषा म्हणून स्थान काय आहे, हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे एक मोठे यश आहे. पण हा दर्जा कागदावर राहू नये. मराठी शाळा, मराठी विद्यापीठे, मराठी साहित्य संस्था यांना बळ देणे, मराठी तंत्रज्ञान विकसित करणे, हे सरकार आणि समाज दोघांचेही कर्तव्य आहे. ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी प्राण दिले, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी समाजाने सतर्क आणि संघटित राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी बेळगाव आणि सीमाभागातील मराठी जनतेशी एकजूट राखणे हे देखील महाराष्ट्राचे कर्तव्य आहे. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांची शिक्षणाची व्यवस्था जोपासणे, त्यांच्या न्यायासाठी लढा देत राहणे हे संयुक्त महाराष्ट्राची अपूर्ण मागणी पूर्ण करण्याचाच एक भाग आहे.

एवंच संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा भारतीय लोकशाहीतील एक उज्ज्वल अध्याय आहे. सामान्य माणसांनी संघटित होऊन, बलिदान देऊन, एका अन्यायाविरुद्ध यशस्वी लढा दिला, हे या चळवळीचे सार आहे. हे स्मरण आपल्याला सांगते की लोकशाहीत जागरूक नागरिकांचे सामूहिक बल हे सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाने — विशेषतः तरुण पिढीने — या दिवसाचे महत्त्व जाणले पाहिजे. हुतात्म्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ श्रद्धांजली वहाणे नव्हे; तर एक जबाबदारी स्वीकारणे आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कायम जागरूक आणि सक्रिय राहणे हेच खरे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे फलित असायला हवे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares