अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
दुर्जन निंदा – (२) ~पाखंडी लोक
मागील भागात तुकाराम महाराजांनी किती बीभत्स शब्दांत दुर्जनांची त्यांच्या अभंगातून निर्भत्सना केली आहे, हे आपण पाहिले. याही भागात आणखी काही अभंगांद्वारे तुकारामांचे अशा लोकांविषयीचे मत जाणून घेऊया, कारण दुर्जन निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. पाखंडी, म्हणजे वरवर दाखवायला सज्जन, भक्तीचे उपासक परंतु मनाने अत्यंत नीच अशा लोकांचा तुकाराम महाराजांना फार संताप आहे. त्यांच्याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण आज त्यांच्या अभंगांतून पाहूया…
भक्तीचे सोंग करणाऱ्या ढोंगी माणसांविषयी या अभंगात महाराज म्हणतात,
न ये नेत्रा जळ/ नाही अंतरी कळवळ/
तो हे चावटीचे बोल/ जन रंजवणे फोल//
न फळे उत्तर/ नाही स्वामी जो सादर/
तुका म्हणे भेटी/ जंव नाही दृष्टादृष्टी//
ज्याच्या डोळ्यात भावभक्तीच्या पाण्याचा टिपूस नाही, आणि जोपर्यंत अंतरंगात हरी विषयी कळवळा नाही, तोपर्यंत त्याच्या भक्ती विषयी भारलेल्या सर्व गप्पा पोकळ आणि फक्त करमणूक करणाऱ्या असतील. स्वामींची कृपा असल्याशिवाय ते अभक्ताला कधीही भेटणार नाहीत. वरवरची प्रार्थना केवळ पोकळ आहे.
ढोंगी भक्तांविषयी या अभंगात महाराजांनी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आहे.
टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी/
देखो नेदी जगी फासे जैसे//
धीवर या मत्स्या/ चारा घाली जैसा/
भीतरील फासा /कळो नेदी //
खाटीक हा स्नेह वादे पशु पाळी /
कापावया नळी तयासाठी//
तुका म्हणे तैसा भला मी लोकात/
परी तू कृपावंत पांडुरंग//
जो बहुरूपी असतो तो त्याचे वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगळ्यासारखा ध्यानस्थ बसतो. त्याचप्रमाणे मैद म्हणजे ढोंगी लोक स्वतःला भक्त म्हणविणारे, कपाळावर सतरा टिळे लावतो, गळ्यात कसल्या कसल्या माळा घालतो, नामाच्या मुद्रा कोरून लावतो आणि जगाला लुटण्याचे त्याचे आतील बेत कळू देत नाही. या लोकांची जात जशी काही फासेपारध्यांसारखीच असते. गळाला काहीसे आमीष लावून मासे अडकविण्याचा हा प्रकार आहे. खाटीक बोकड पाळून त्याला धष्टपुष्ट करतो आणि नंतर त्यास कापतो. अभक्त मंडळी याहून वेगळी नसतात, असे तुकारामांचे स्पष्ट मत आहे.
पाखंडी लोकांना महाराज सतत सांगत आहेत की तुम्ही अनुभवावाचून बडबड करणे थांबवा. ही तुमची बडबड म्हणजे बाळंत न होता बाळंतीणीप्रमाणे स्वतःवर सर्व सोपस्कार करून घेणे आहे.
व्याल्याविण करी शोभून तातडी/
चार ते गधडी करीतसे//
अशा लोकांना ते गधडी म्हणतात. (बिनडोक)
काही नित्यनेमाविण/ अन्न खाय तो श्वान/
वाया मनुष्यपण/ भार वाहे तो वृषभ//
त्याचा होय भूमी भार/ नेणे जातीचा आचार//*
जाला दावेदार/ भोगवी अघोर पितरासी//
अखंड अशुभवाणी / खरे नच बोले स्वप्नी//
पापी तयाहुनी नाही/ आणिक दुसरा//
पोट पोसी एकला/ भूती दया नाही ज्याला/
पाठी लागे आल्या/ अतिताचे द्वारेशी//
काही संतांचे पूजन/ न घडे तीर्थाचे भ्रमण//
यमाचा आंदण/ सीण थोर पावेल//
तुका म्हणे त्यांणी/ मनुष्यपणा केली हाणी//
देवा विसरूनी/ गेली म्हणती मी माझे//
वरील अभंगात तुकाराम महाराजांनी अभक्त लोकांचे वर्णन केले आहे. भोजनाआधी देवपूजा करणे, गीता, विष्णुसहस्त्रनाम किंवा जप जाप्य करणे असा काही नियम जो पाळत नाही, तो मनुष्य कुत्र्यासमान आहे. मनुष्यपणाचा तो व्यर्थ भार वाहतो. खरंतर तो बैलच म्हणावा. अशा माणसाचा भूमीला केवळ भार आहे. आपल्या पितरांचा तो केवळ दावेदार आहे, कारण तो त्याच्या कुकर्माने त्यांना नरक भोगवितो. त्याची वाणी अशुभ आहे, स्वप्नातही त्याला खरे बोलता येत नाही. फक्त स्वतःपुरता विचार करून दारी आलेल्या अतिथीला तो हाकलून देतो. कधी संतांचे पूजन करीत नाही, की तीर्थाटन करीत नाही. असे लोक म्हणजे मनुष्यपणाची केवळ हानीच आहेत.
तुकाराम महाराजांना पाखंडी, (स्वतःला हरीचे दास म्हणणारे, ज्ञानी समजणारे) लोकांचा अनुभव फार जवळून मिळाला. अशा लोकांविषयी त्यांचे एक ठाम मत बनले, ते या अभंगातून आपण पाहूया.
अतिवादी लावी/ एका बोट सोंग दावी/
त्याचा बहुरूपी नट/ नव्हे वैष्णव तो चाट//
प्रतिपादी वाळी/ एका पूजी एका छळी/
तुका म्हणे नाही/ भूतदया ज्याचे ठायी //
एक मनुष्य कपाळाला काळी रेघ लावून आपण वैष्णव आहोत असे सांगत सुटतो. वादविवादही करतो, परंतु तो खरा वैष्णव नव्हे. तो वेशधारी बहुरूपी आणि खोटा आहे. तो एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याचा धिक्कार करतो, आणि एकाला पूजनीय मानतो व दुसऱ्याला छळतो. खरे वैष्णव तर सर्वांशी समान वागतात. ते भूतदयेने परिपूर्ण असतात. या पाखंडी लोकांच्या ठायी भूतदया जराही नसते.
ढोंगी लोकांना तुकाराम महाराज रोखठोक बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्याचे उदाहरण म्हणजे हा खालील अभंग…
जाऊनिया तीर्थ/ काय तुवा केले/
चर्म प्रक्षाळीले/ वरी वरी//
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले/
भूषण ते केले आपणया//
वृंदावन फळ घोळले साकरा/
भीतरील थारा मोडेची ना//
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया/
तोवरी कासया फुंदा तुम्ही //
ते म्हणतात, ” अरे ढोंगी माणसा, तू तीर्थास जाऊन केलेस काय? तर तुझ्या चामड्याचे प्रक्षा लन केलेस, तुझे कातडे फक्त पाण्यात भिजवलेस. तुझ्या अंतराचे काय? कडू वृंदावन फळ साखरेत किती घोळले तरी त्याचा उपजत कडूपणा जात नाही, तुझे तसेच आहे. तीर्थ स्नान करून तुझ्या मनाचे मालीन्य कसे जाणार? जोपर्यंत तुझ्या ठिकाणी दया, क्षमा, शांती या भावना नाहीत तोपर्यंत तुम्ही हरीचे दास म्हणून गर्वाने फुलून जाऊ नका. “
तुकाराम महाराजांना खऱ्या भक्तीचा अर्थ म्हणजे मानवता, भूतदया, अंतःकरणाची शुद्धता हेच सामान्यांना सांगायचे आहे असे मला वाटते. तो खरा हरीचा दास आहे, त्यालाच माऊली आपल्या चरणी आश्रय देते.
क्रमशः… २०
© अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈















