आजच मी आईला मातृदिनानिमित्त हा दगड भेट म्हणून दिला.
वास्तविक पेपरवेट आणि शोपीस याव्यतिरिक्त तसा काही याचा फारसा उपयोग नाही. पण या एका छोट्याशा भेटीने माझी एका गरजू आईला मदत होणार होती.
****
काही महिन्यापूर्वी मी एका आदिवासींनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली तीही प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी, प्रदर्शन संपायच्या फक्त काही मिनिटे आधी. जवळजवळ 25 एक तरी स्टॉल होते आदिवासींचे.
– – त्यात एका स्टॉल वर मला हा दगड सापडला बहुतेक माझ्याच नशिबात होता तो.
स्टॉल वर एक आई आणि तिचा मुलगा होता. स्टॉल जवळ जवळ रिकामाच होता.
एक अगदी अशिक्षित बाई होती स्टॉलवर पण खरोखरच तिच्या अंगात कला होती. तिच्याबरोबर तिचा मुलगाही होता कारण आता तो मोकळा होता त्याला दिवाळीची सुट्टी लागली होती.
या स्टॉल मधून मिळणाऱ्या पैशातून त्याच्या शिक्षणाचा खर्च करायचा होता तिला.
आत्तापर्यंत तिने रंगवलेल्या दगडांचे फोटो होते त्या मुलाच्या मोबाईल मध्ये. लोकांचा पत्ता लिहून घेणे त्यांच्याकडून पैसे घेणे त्याचा हिशोब ठेवणे वगैरे काम चोख पणे करीत होता तो.
तिने रंगविलेल्या दगडांवर काही देवांची नावे होती शहरांची होती. अगदी आपण ऑर्डर दिली, सांगितले तर तुमच्या मित्रांचे देखील नाव रंगवून द्यायला तयार होती ती आई.
आणि त्यातला शेवटला न विकला गेलेला असा दगड जो बहुतेक माझ्याच नशिबात होता तो मी विकत घेतला.
आपल्याला देखील बागेत, रस्त्यात येता जाताना, प्रवासात, असे अनेक आकाराचे दगड दिसतात पण त्याला व्यवस्थितपणे रंगवून ते विकणे… वा खूपच कौतुकास्पद.
दगडांमधून अर्थार्जन… किती सुंदर कल्पना.
कल्पना आणि कला यांना योग्य रीतीने स्कोप/दिशा मिळणे गरजेचे आहे हेच खरे.
बीज एका मातीत रुजतं, वाढतं आणि मोठं होत राहतं आणि कालांतरानं तिथंच आणि त्याच मातीत मिसळून जातं. पण मानवी समाजातल्या मुलगी नावाच्या बीजाला एका मातीत वाढावं लागतं आणि मुळांसह उपटल जात दुस-या मातीत स्वत:ला गाडून घ्यावं लागतं… आणि तिथंही नुसतं रुजावं लागणार नसतं तर वाढावं लागतं… इतरांना सावली, फळं आणि आधार देण्यासाठी. या झाडाला दुसरी ओळख लगडलेली असते… एखादी नदी सागरात विलीन झाली की ती सागरच होऊन जाते, तशी!
पण मुलीचं एकाच मातीत रुजून तिथंच नष्ट होणा-या बीजापेक्षा किंचित बरं असतं… तिला नव्या मातीत एका आधीच वाढलेल्या झाडाचा आधार मिळतो… नव-याचा! किंबहुना या नात्यात नव-याचं हेच तर मुख्य काम असतं… अन्यथा त्याच्या संसाराची बाग फुलणार नाही!
जसं बाळाचं सर्वांत जवळचं जर कुणी असेल तर ती आई असते, तसे विवाहोत्तर आयुष्यात मुलीचं त्या नव्या घरात सख्खे जर कुणी असेल तर तो नवरा असतो… किंबहुना असावा लागतो. त्याच्या आधारे, त्याच्या साठी ती नवी नाती स्वीकारते आणि फुलवत राहते. रातराणी जसं फुलून येण्यासाठी चंद्र उगवण्याची प्रतीक्षा करत दिवस ढकलते, तशी नवपरिणिता नवरा घरी येण्याची वाट पहात राहते दिवसभर. कारण या अनोळखी जगात संवाद साधायचा तरी कुणाशी आणि किती? अर्थात, उलटत जाणारे दिवस हे सुसह्य करू शकतात… अनुभवाने नाती घट्ट किंवा ढिली होत जातात! अर्भकाला केवळ स्पर्शावरून समजतं… कुणाच्या खांद्यावर मान टाकली की झोप येते आणि जीवाला घोर रहात नाही!
ती याच मुलींची प्रतिनिधी. आईबापाचं नाव राखण्यासाठी त्यांचं नाव त्यागून नवं नाव, नवी भूमिका स्वीकारत जीवनाच्या रंगमंचावर एक पात्र जगून दाखवण्यासाठी उभी राहणारी.
लग्नाच्या धामधुमीत पहिले काही दिवस निघून गेले असतील… त्यात देवकार्य झालं असेल, एकदा सूनबाईला घेऊन घरी येऊन जा या आग्रहाखातर नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या असतील. आणि मग सर्वांच्या शोधक नजरांच्या पल्याड जाण्यासाठी दूर जावं लागलं असेल… मधुचंद्र म्हणजे केवळ एकांगी प्रवास नसतो… चंद्राच्या साक्षीने एकमेकांना प्रदक्षिणा घालत राहण्याच्या आणाभाका आणि कक्षा ठरवायचे हे दिवस!
नव-याकडून अनेक गोष्टी समजत जातात, नात्यांचे अर्थ, त्यांच्या सीमा, त्यांच्या बोलण्याचे, कटाक्षांचे मतितार्थ ध्यानात येतात. हे अगदी भरात आलेलं असताना, मोकळ्या आकाशाखाली तिच्या माथ्यावर मध्यान्हीचा सूर्य आग ओकून गेला… कपाळावरचं कुंकू मृत्यू नावाच्या रसायनाने रक्ताचा लाल रंग वागवू लागले!
त्याला निरोप देईपर्यंत सर्व काही लक्षात आलं… पण त्याला मूठमाती देऊन आपल्या देहाची माती घरी आणल्यावर, ज्यावर तांदळाचं माप ठेवलं होतं आणि ते माप हलकेच उलटवून जीवनाच्या अक्षता भूमीच्या स्वाधीन केल्या होत्या… तो उंबरा ओलांडताच समजलं की घरातल्या या गर्दीत आपलं कुणीच नाही! जे आहेत त्यांना आपलं मानावं लागणार आहे… कुणाच्याही आधाराशिवाय अर्धवट वाढलेल्या नाजूक वेलीला आभाळाकडे वाटचाल सुरु ठेवावी लागणार आहे!
ओले मूळ, खडकाचे अंग भेदी हे खरं असलं तरी काळाचा खडक भेदत राहणं म्हणजे प्रत्येक क्षणी बोटं रक्तबंबाळ करीत राहणे… खडक कित्येक वर्षांच्या अनुभवाने अधिकाधिक कणखर झालेला असतो. त्याला सुरुवातीला तर मूळाचा हा प्रयत्न म्हणजे केवळ गुदगुली वाटत असेल! अशी अनेक मूळं या खडकांनी सुकून गेलेली पाहिलेली असतात!
ती मात्र अजूनही तग धरून आहे. ती बाहेर पडते पण तिला घरी यावं लागतंच. तिचे आईबाप तिच्या माहेरी आहेत, तिला त्याच्या आईबापाला त्याची कमतरता जाणवू द्यायची नसते. तिला काही सांगायचं असतं… भिंती ऐकून घेतात पण काही प्रतिसाद देत नाहीत. रात्रीचा अंधार पूर्णवेळ हिच्या बंद पापण्यांआड उघड्या असलेल्या डोळ्यांकडेच तर पहात जागत राहतो! सूर्याचं पहिलं किरण दिसत नाही… कारण दमून गेलेल्या पापण्या उघडता उघडत नाहीत… त्यांच्यावर मनाचं आणि मणा-मणाचं ओझं असतं.
वेलीच्या पोटी एखादं फूल असेल तर त्याचा आधार मिळतो… पण इथं तर तेही नाही. जाणारा प्रत्येक क्षण नवीनवी आव्हानं समोर उभे करत राहतो. गर्दीतला हा एकांतवास नरकापेक्षाही भयावह. भावनांच्या आहारी जायचं की व्यवहाराच्या हा तिढा सुटता सुटत नाही. हे सोडलं तर पळून गेलेलं चालणारं नसतं आणि धरून बसलं की ओरखाडे सुरूच राहतात… खूप कठीण असतं हे… खूप कठीण असतं हे!
या अंधा-या गुहेचं प्रकाशाच्या बाजूला उघडणारं टोक या पावलांना कधी तरी गवसू दे… देवा!
आशेया… पहलगाम मध्ये सर्वस्व गमावून परत आली आहे… एक वर्ष म्हणजे आपल्यासाठी फार कमी कालवधी असला तरी तिच्यासाठी एक युग असेल… आणखी अशी किती युगं तिच्या नशिबी आहेत देवच जाणो! आपण केवळ प्रार्थना करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो तिला! ह्या ओल्या जखमा सुकाव्यात, त्यांवर आशेचं आवरण चढत जावं आणि एक नवं जग तिच्यासाठी आकाराला यावं!
☆ ‘गोपाळाची मुरली, गोरक्षाचा कल्याण’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आज गुरुवार. जरा सावकाश उठायचे ठरवले होते; पण सवयीप्रमाणे लौकरच जाग आली. वातावरण आल्हाददायक होते. किंचित गारवा होता. आन्हिके, स्नान, संध्या, पूजा-अर्चना उरकून मन प्रसन्न झाले. सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो आणि पावले जंगली महाराजांच्या मंदिराकडे वळली.
मंदिराच्या द्वाराजवळील विक्रेत्याकडून हार-फुले घेतली आणि पायऱ्या चढून समाधीपाशी गेलो. समाधीवरील भरजरी चादर सूर्यप्रकाशात चमकत होती. निशिगंध, गुलाब आणि तुळशीचा सुगंध दरवळत होता. उदबत्त्यांच्या धूम्ररेखा आवर्तने घेत वर चढत होत्या. समोरचे धूपपात्र धुमसत होते.
हार, फुले वाहून साष्टांग दंडवत घातला. एका कोपऱ्यात शुभ्र वस्त्रांतील, दाढी वाढवलेली, केशरी टोपीधारी एक वृद्ध ऋषितुल्य व्यक्ती ध्यानस्थ बसली होती. ते हिंदुमहासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रा. स. भट असावेत. त्यांनाही नमस्कार करून मी एका कोपऱ्यात ध्यानाला बसलो.
अर्ध्या तासाने बाहेर आलो. समोर ‘ओम चेंबर्स’ दिसत होते. अचानक आठवले — योगिनी सुमनताई ताडे सध्या इथेच त्यांच्या बहिणीकडे राहायला आहेत. वाटलं, आलोच आहोत तर त्यांनाही भेटून जावं.
ताईंच्या सदनिकेवर टकटक केली. दार एका शिष्येने उघडले.
“कोण पाहिजे?”
“सुमनमावशी आहेत का? मी त्यांच्या थोरल्या बहिणीचा जावई — दिवाकर. ”
“या, बसा. ताई खाली पाहुण्यांना निरोप द्यायला गेल्यात. येतीलच. ”
ताई नसताना घरात बसणे प्रशस्त वाटले नाही. म्हणून मी बाल्कनीत जाऊन उभा राहिलो. खाली पदपथावर ताई एका प्रौढ, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या महिलेशी बोलत उभ्या होत्या. मोतिया रंगाची रेशमी साडी, मरून काठ, दोन्ही खांद्यावरून घेतलेला पदर, डोळ्यावर चष्मा आणि हातात बिल्वरांची झळाळी…
त्या व्यक्ती परिचित वाटत होत्या.
तेवढ्यात रिक्षा आली. त्या बाईंनी ताईंना निरोप दिला आणि रिक्षात बसल्या. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत दोघी एकमेकींना हात हलवत राहिल्या.
थोड्याच वेळात ताई वर आल्या. मला पाहताच उत्साहाने म्हणाल्या,
“अरे, जरा लौकर आला असतास तर एका थोर व्यक्तीची ओळख करून दिली असती!”
मी विचारले, “कोण होत्या त्या?”
ताई हसल्या.
“अरे, ती साक्षात भगवंताची मुरली होती!”
“म्हणजे?”
“माणिक वर्मा! श्रीहरीची मधुर मुरली!”
क्षणभर मी अवाक् झालो.
“साक्षात माणिकताई? त्या इथे कशा काय?”
ताई म्हणाल्या,
“काल रात्री त्यांचा फोन आला. म्हणाल्या — ‘उद्या भेटायला येऊ का? मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे. ’”
“तुमच्याकडून?”
“हो. त्यांना ‘गोरक्षकल्याण’ रागातील काही दुर्मीळ चीजा शिकायच्या होत्या. कुठूनतरी त्यांना समजलं होतं की माझ्याकडे त्या आहेत. ”
मी आश्चर्यचकित झालो.
“पण तुम्ही गाणं शिकलात कधी?”
त्यावर ताई शांतपणे म्हणाल्या,
“मी कुणाकडेही शास्त्रीय संगीत शिकले नाही रे. हे सगळं संतांचा प्रसाद आहे. ”
आणि मग त्यांनी सांगितलेली कथा विलक्षण रोमांचकारी होती.
बेळगावला योगिनी कलावती देवींच्या सान्निध्यात त्या काही काळ होत्या. एकदा पाद्यपूजेनंतर आईंनी स्वतः घेतलेल्या केशर-वेलचीच्या दुधातील अर्धे दूध सुमनताईंना पाजले.
ताई सांगत होत्या,
“त्या क्षणापासून, कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, माझ्या मुखातून रागदारी उमटू लागली. एकच भजन अनेक रागांत गाता येऊ लागले. विविध चीजा, रचना सहज सुचू लागल्या. हीच संतकृपा. ”
हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.
ताई पुढे म्हणाल्या,
“पण खरी थोरवी माणिकताईंची आहे. संगीतविश्वात एवढं मोठं स्थान असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही. अजूनही नवीन शिकायची तळमळ! सुरांच्या शोधात त्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडे आल्या — हीच त्यांची महानता. ”
त्यांचे शब्द ऐकता ऐकता माझे डोळे नकळत ओलावले.
इतक्यात दाराची बेल वाजली.
दार उघडले तर साक्षात माणिकताई समोर उभ्या!
मी गोंधळलोच.
त्या हसत म्हणाल्या,
“योगिनीताई, माझी पर्स इथेच राहिली वाटतं. त्या गोरखकल्याणच्या नादात विसरून गेले. ”
खरंच, पर्स गादीवरच पडली होती. मी ती त्यांच्या हातात दिली.
ताईंनी माझा परिचय करून दिला.
“हे दिवाकर. संगीताची फार आवड आहे यांना. ”
मी पटकन म्हणालो,
“ऐकण्याची आवड बरं का! गाता-वाजवता काही येत नाही. ”
त्यावर माणिकताई मनमोकळं हसल्या.
“असू द्या हो. आम्हाला रसिक श्रोतेच लागतात. श्रोते आहेत म्हणूनच आम्ही कलाकार आहोत. तेच आमचे अन्नदाते, तेच आमचे दैवत. ”
आम्ही दोघे खाली आलो. रिक्षा उभीच होती.
माणिकताई म्हणाल्या,
“या, तुम्हाला वाटेत सोडते. ”
मी संकोचत म्हणालो,
“नको ताई. मला समोरच जंगली महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. ”
त्या हसल्या. रिक्षा निघाली.
रिक्षा दिसेनाशी झाली…
आणि मी तिथेच उभा राहिलो — भारावलेला, स्तब्ध.
माझ्यासमोर साक्षात ‘गोपाळाची मुरली’ होती…
आणि त्या मुरलीच्या अंतर्यामी घुमत होता — ‘गोरक्षाचा कल्याण’!
(पावस निवासी परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदांच्या अंतरंग शिष्या, वैकुंठवासी परमपूज्य *योगिनीताई ताडे* यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन वैशाख वद्य दशमी अर्थात मंगळवार दिनांक १२ मे २०२६ या दिवशी होता.. त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख)
काल एका ऑटो रिक्षाच्या मागे अजित दोवालभारताचे NSA म्हणजेNational Security Advisor यांचा फोटो असलेला एक sticker /poster बघीतला खाली लिहिलेले होते.
” My Hero “
अजित दोवाल म्हणजे अद्भुत व्यक्तिमत्त्व, विलक्षण बुद्धी, चाणाक्ष चतुर, Risk घेणे व त्यासाठी perfect planning for any operations. हे त्यांच्या स्वभावातच आहे. शत्रुच्या घरात घुसून मारायची हिम्मत ठेवणारे. यांच्या नावानेच थरथर कापतात शत्रू. कोणतेही operation दोवालांच्या नेतृत्वाखाली होणार, असे समजल्यावर दुश्मन तेथेच ढेर होतात.
” Real life Real HERO”
भारताचे जेम्स बॉन्ड आहेत. वयाची पंचाहत्तरी पार केली असली तरी कमालीची बुद्धी व कौशल्य.
मी रिक्षावाल्याला विचारले. हे poster कोणी लावले ??? तेव्हा तो म्हणाला…
मॅडम एक कॉलेज का लडका लगाया ये।मुझे बोला ये सिनेमा के हिरो का poster निकालो। और ये लगाओ। ये असली हिरो है। औरउसने ‘दोवालसहाब ‘के बारे मेंबहुत जानकारी भी दिया। मैं तुरंत तैयार हो गया। अभी मैं अपनी सवारी को भी poster के बारे में जितनामुझे पता है मैं बताता हूं।
मला त्या मुलाचे तर कौतुक वाटलेच. व या रिक्षावाल्याचे पण. त्याला सुध्दा खरा हिरो कोण??? हे लगेच लक्षात आले. खरी आणि चांगली गोष्ट कोणालाही कळते. फक्त सांगणाऱ्याचे सांगणे दमदार असले पाहिजे. मार्गदर्शन करणारा बरोबर असला, तर गोष्टी पटतात. आणि विचारही बदलतात.
“मेरा देश बदल रहा है “
हे आजकाल ऐकू येणारं वाक्य. देश नक्कीच बदलत आहे. जगाची भारताकडे बघायची नजर बदलली आहे. कोरोनानंतर आपली संस्कृती किती चांगली आहे. हेही जगाला कळले आहे. Hello म्हणत ‘Shake hand ‘ ची जागा आता ‘नमस्ते’ नी घेतली आहे.
देश अचानक बदलत नसतो. तो प्रयत्न करून बदलावा लागतो. ज्या देशात तरूणांची संख्या जास्त आहे, तेथे सर्व शक्यही आहे.
याची सुरुवात प्रत्येकाने करायला हवी. अगदी प्रत्त्येक घरात, शाळेत, नोकरी च्या जागी, प्रसार माध्यमे /मिडिया सर्वांच्या सहकार्याने देश नक्की बदलू शकतो.
सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेवढी चांगली नाही. दिवसभर breaking news च्या नावाने TV वर ओरडून ओरडून त्याच त्याच बातम्या सांगत असतात. शंभरापैकी पहिल्या पन्नास काय त्यापेक्षाही जास्त बातम्या negative असतात. खून, मारामाऱ्या बलात्कार, चोऱ्या, गोळीबार, एकमेकांना शिव्या देणे. मानहानी करणे. हे सर्व बघून/ ऐकुन आपल्या देशात फक्त अशाच गोष्टी घडतात का ????? हेच मनात येत.
आपल्या देशात चांगल्या गोष्टी घडतच नाही का ???? देशात सर्व वाईटच घडत असतं का???
बातम्या मधे जर पहिल्या पन्नास बातम्या चांगल्या सांगितल्या, तर त्याचा प्रभावी परिणामही दिसेल. Freedom of speech चा योग्य, सकारात्मक उपयोग ही करता येतो.
या भोवऱ्यातुन बाहेर पडणे, म्हणजे पहिली कठीण परिक्षा. एकशे चाळीस करोड लोकांचा हा देश आहे. आपल्या देशात काही तरी, कुठे तरी रोजच चांगलं नक्कीच घडत असणार. शंभर बातम्या मधे चांगली बातमी केंव्हा येते आणि जाते कळतही नाही. .
चांगली बातमी काहीही असू शकते. एखाद्या सामान्य माणसाचे असामान्य कार्य.
एखाद्या विद्यार्थ्याने मिळविलेले असामान्य यश. जसे 2020 च्या NEET परिक्षेत ओडीसा च्या Soyeb Aftab व दिल्ली ची आकांक्षा सिंग ने 720/720 असे perfect 720 marks मिळविले.
हरियाणा मधील ‘किरोडी’ नावाच्या एका गावाने एक नवा इतिहास रचला. त्या गावात असलेल्या एकुण २५० पैकी प्रत्त्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लावली आहे. हरियाणा सारख्या राज्यात उचलेले हे पाऊल खूप कौतुकास्पद, सकारात्मक, आणि अनुकरणीय आहे.
एका सोळा वर्षांच्या Priyavrath Patil नावाच्या मुलाने संस्कृत च्या सर्व महापरिक्षा पास केल्या. He is the youngest ever to pass all exams.
ओडिशा च्या तटावर पृथ्वी ll मिसाइल चे successful परिक्षण झाले. ,
उत्तराखंडची मशरूम queen नावाने प्रसिद्ध ‘दिव्या रावत’ जगभरात आपला व्यवसाय करते. किती तरी लोकांना तिने रोजगार दिला आहे.
BRO ‘ Border Road organisation ने एका वर्षात 54 पूल बांधले.
‘ Breaking news :म्हणून चांगली बातमी पण लोकांना आकर्षित करू शकते.
अशा चांगल्या बातम्या कुठे तरी एका कोपऱ्यात दडून असतात. बहुतेक फक्त बातम्यांचा शंभर आकडा पूर्ण करण्यासाठी त्यांचा समावेश होतो. पण पत्नीने प्रिकराच्या मदतीने पतीला मारून, त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले, ही बातमी मात्र आठवडाभर चघळली जाते.
एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची मेहनत discipline, dedication, regular practice त्यांचे training अशा कितीतरी गोष्टी बातम्या मधे चर्चेचे विषय असू शकतात. यांचा परिणाम/ प्रभाव वेगळा पडेल. एक positive उर्जेचा संचार होईल. अशी स्वप्ने बघणाऱ्या अनेक मुलांना दिशा मिळेल.
नवीन पीढीला मार्गदर्शन मिळेल.
तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काय वाटतं ?? आपला देश कसा प्रगती करू शकतो?? देशात काय बदल करावासा वाटतो ?? असे प्रश्न तरूण पीढ़ी ला विचारले तर त्यांच्या विचारांना चालना मिळेल. दिशा मिळेल.
विचारांची direction बदलेल..
आणि कौतुक म्हणजे, एवढा मोठा देश सांभाळणारे आमचे माननीय प्रधानमंत्रीना हे सर्व माहिती असतं. आपल्या मन की बात कार्यक्रमात ते अशा सर्व गोष्टींचा उल्लेख न विसरता आवर्जुन करतात. व त्या सर्वांचे अभिनंदन ही करतात.
कोणता देश किती श्रीमंत आहे ???? हे त्या देशाची प्राकृतिक संपदा, व त्या देशातील जनतेचे आचार विचार, संस्कृती, सवयी, त्यांचे देशप्रेम यावर अवलंबून असते.
देश सर्वोपरी आहे ही भावना असली तर सर्व सहज शक्य आहे.
☆ “पैसा नाती बदलतो हेच खरं !!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की…
गाडी सर्व्हिसिंगला दिली म्हणून बसनं ऑफिसला निघालो. दहा-पंधरा मिनिटं वाट पाहिल्यावर बस आली बऱ्यापैकी गर्दी होती. लांबचा प्रवास असल्यानं मागच्या सीटवर का होईना पण बसायला जागा मिळाल्याचा आनंद झाला. स्थिरस्थावर झाल्यावर सहज लक्ष गेलं तेव्हा पुढच्या सीटवर बसलेला दाढीवाला ओळखीचा वाटला. निरखून पाहिलं. तो पम्या होता. माझा मित्र. एकाच शहरात असून देखील तब्बल दहा वर्षानी आम्ही भेटत होतो. मी हाक मारणार इतक्यात पम्यानचं मागे वळून पाहिलं पण मला पाहून त्याचा चेहरा खारकन उतरला. पम्याचं पडलेलं तोंड बघून राग आला अन वाईटही वाटलं. दोघं औपचारीक हसलो. तोंडदेखले विचारपूस झाली. बोलताना पम्या नजर चुकवत होता आणि अचानक उभं राहत म्हणाला “बाय, परत भेटू. माझा स्टॉप आला”बस थांबल्यावर घाईघाईनं उतरून पम्या भरभरा चालायला लागला.
“काय पण एकेक नमुने असतात. ”कंडक्टर.
“काय झालं”मी विचारलं.
“यानं लास्ट स्टॉपचं तिकीट काढलं पण मध्येच उतरला”कंडक्टर हसत म्हणाला. मी काहीच बोललो नाही.
पम्या आणि मी, लहानपणापासूनचे मित्र. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मार्ग वेगवेगळे झाले तरी मैत्री शाबूत होती. नोकरी सोडून पम्यानं व्यवसाय सुरू केला. कामाच्या व्यापात हळुहळू आमचं भेटणं कमी झालं तरी आधीमधी सणाला भेटीगाठी व्हायच्या. आठ-पंधरा दिवसातून फोन व्हायचे.
एकदा सकाळी सातलाच पम्या भेटायला आला. त्याचं असं अवेळी भेटण्यानं मनात शंकेची पाल चुकचुकली आणि अंदाज खरा ठरला. पम्यानं उसने पैसे मागितले. शक्यतो मैत्रीत पैशाचा व्यवहार करू नये आणि केलाच तर पूर्ण पारदर्शकता हवी असं माझं स्पष्ट मत. आजतागायत मी असे व्यवहार टाळलेत. पम्याला स्पष्ट ‘नाही’सांगितलं पण त्यानं पिच्छाच पुरवला. रोज फोन किवा मेसेज करत होता. “यावेळेला मदत कर. परत कधीच मागणार नाही. दोस्तीची शपथ” “खूपच गरज आहे” “आयुष्यभर लक्षात ठेवीन” हेच पुन्हा पुन्हा सांगत होता. शेवटी मैत्रीखातर तीन महिन्यात परत करण्याच्या बोलीवर पैसे दिले. त्यानंतर काही दिवसांनी पैशाचा विषय काढला पण ‘देतो रे, लक्षात आहे”एवढंच उत्तर मिळालं. आमची मैत्री आणि माझा भिडस्त स्वभाव यामुळे सारखं सारखं पैसे मागणं योग्य वाटलं नाही. याविषयी घरीही सांगता येत नव्हतं. पैसे मिळाल्यावर पम्याचं वागणं बदललं. त्यानं घर, मोबाइल नंबर बदलला. नवीन पत्ता कोणालाच माहिती नव्हता. आमच्या कॉमन मित्रांशी बोलताना समजलं की पम्याला पैसे दिलेले माझ्यासारखे अजून एकदोघं आहेत.
दहा वर्षे झाली अजून एक रुपायाही परत मिळालेला नाही. उसने दिलेले वीस हजार रुपये अक्कल खाती जमा केलेत.
मैत्रीत अडीअडचणीला मदत केलीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. गरजेच्या वेळी मलाही मित्रांनी मदत केलीय. त्याची जाणीव आजही आहे. प्रत्येक मित्र ‘पम्या’ नसतो हे शंभर टक्के मान्य पण उसने पैसे मागणारा आणि वेळीच परतफेड न करणारा एकतरी ‘पम्या’ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. गायब झालेला पम्या अचानक भेटला आणि लगेच पळून गेला. प्रश्न पैशाचा नव्हता तर मैत्रीचा, विश्वासाचा होता. तोंड लपवण्यापेक्षा पैसे देऊ शकत नाही स्पष्ट सांगितलं असतं तरी चाललं असतं पण पम्यानं मैत्रीपेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं. वाईट याचचं वाटतं. जवळच्या माणसाकडून फसवलं जाणं फार त्रासदायक असतं. पैसा नाती बदलतो हेच खरं!!
नरसिंह म्हटलं की सगळ्यात प्रथम डोळ्यापुढे येते ती अत्यंत नम्रपणे हात जोडून लीन आणि कृतज्ञ भावनेने उभी असलेली भक्त प्रल्हादाची मूर्ती. आणि त्यानंतर मग आठवायला लागते ती भक्त प्रल्हाद, हिरणकश्यपू, आणि नरसिंह यांची सुप्रसिद्ध गोष्ट. लहानपणापासून अनेकदा गोष्टी रुपात वाचलेली, कधी प्रवचनात ऐकलेली ही गोष्ट मनावर इतकी बिंबली गेली आहे की नुसतं नरसिंह म्हणलं तरी संपूर्ण गोष्ट पटकन आठवते. लहानपणापासूनच आजही या गोष्टीचा माझ्या मनावर असलेला प्रभाव किंवा पगडा हा तसाच आहे. फक्त याच्यामध्ये केवळ शब्दशः भाव न पाहता, त्याच्या चमत्काराकडे न पाहता त्या घटनेची व्यक्तिगत जीवनाशी कशी सांगड घालता येईल असा विचार मनात सुरू झाला. एखाद्या परंपरागत गोष्टीचे किंवा कथेचे, प्रसंगाचे, नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांमधले संदर्भ हे जसेच्या तसे राहतातच असे नाही. तर ते त्या त्या काळाप्रमाणे प्रवाही होत राहतात किंबहुना रहायला हवेत तरच ती श्रद्धा किंवा तो भाव हा टिकून राहू शकतो.
आतापर्यंत वेगवेगळ्या उदाहरणांमधून परमेश्वराचं अस्तित्व हे चराचरात व्यापलेलं आहे, अणूरेणूत आहे असे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. त्यामुळे खांबामधून नरसिंह प्रगट होणं ही गोष्ट आपल्याला चमत्कारी वाटली तरी त्याचा सद्यस्थितीत काय महत्त्व असेल. हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली यामध्ये खांबच का? असा प्रश्न मनात निर्माण झाला. केवळ भक्त प्रल्हादाने ‘होय इथेही आहे’ असे सांगितले म्हणून की या खांबाचं काही वेगळं महत्त्व असावं. हा विचार करताना जाणवलं की खांब ही गोष्ट म्हणजे कुठल्याही इमारतीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. खांबाच्या जोरावर संपूर्ण इमारत व्यवस्थितरित्या तोलली जाते. तिला एक सौंदर्य प्राप्त होतं. खांब जितके अधिक तितकी ती वास्तू बळकट मानली जाते. त्यामुळे हा खांब हा फक्त एक वास्तू मधला घटक नसून तो त्याला सौंदर्य देणारा, आधार देणारा असा त्याचा कणाच मानला गेला पाहिजे. आता इथे हा खांब जर प्रतिकात्मकरित्या मानायचं झाला तर तो श्रद्धेचा खांब म्हणता येईल.
मानवी जीवनामध्ये श्रद्धेशिवाय कोणत्याच गोष्टी साध्य होत नाही. इथे श्रद्धा हा शब्द फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक अर्थाने न घेता तो एक वेगळा आणि व्यापक स्वरूपात घ्यायला हवा. तो म्हणजे श्रद्धा ही प्रत्येक कृतीमध्ये असते. अमुक एक प्रकारची घटना घडेल असं मानून वर्षानुवर्षे प्रयोग करत राहणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मनातसुद्धा आपल्या प्रयोगाबद्दल सश्रद्ध भावच असतो. अन्यथा यातून यश मिळेल किंवा नाही याची खात्री नसताना वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीवर चित्त केंद्रित करून प्रयोग करण्यात कुणालाही काय स्वारस्य वाटलं असतं. श्रद्धाच असते की जी परिणाम काय होईल याचा विचार न करता तुम्हाला आतून सतत कार्यरत ठेवते. त्यामुळे तिला कुठल्याही एका दृष्टीतून बघणं म्हणजे तिच्यावर आणि पर्यायाने स्वतःवरही अन्याय केल्यासारखं आहे.
तर हा श्रद्धा रुपी खांब भक्त प्रल्हादाचा डळमळीत करणं हा हिरण्यकश्यपूचा मुख्य उद्देश होता. म्हणून त्याने त्या श्रद्धेच्या खांबालाच लाथ मारून तो पाडण्याचा, नाहीसं करण्याचा प्रयत्न केला. पण इथे प्रल्हाद इतका अढळ, अचल होता की त्याच्या श्रद्धेनेच परमेश्वराला किंवा त्या ईश्वरी शक्तीला आवाहन केलं आणि ती साक्षात प्रगट झाली. म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट काय तर श्रद्धा ही इतकी दृढ हवी, ठाम हवी की एखाद्या गोष्टीच्या प्रत्यक्षात असण्यानसण्याने ती नाहीशी व्हायला नको. आणि जेव्हा अशी श्रद्धा अढळ असते तेव्हा आपल्याला त्यातून अपेक्षित ते ध्येय गाठता येतं, साध्य साधलं जातं. माझ्यासाठी गोष्टीतलं हे सार फार महत्त्वाचं आहे.
गोष्टीमध्ये भक्त प्रल्हाद असो वा हिरण्यकश्यपू या दोन्हीही फक्त व्यक्तिरेखा असल्या तरी केवळ त्यादृष्टीने न पाहता त्या स्वतंत्र वृत्ती म्हणून पहिल्या तर जाणवतं की यांचा झगडा अनंत काळापासून चालू आहे. आणि या दोन्ही वृत्तींचा अंश प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना आहे. त्यामुळे आपल्या एखाद्या सत्कार्यात काही अडचणी निर्माण झाल्या आणि आपण त्या अडचणींचाच विचार करून निराशेच्या गर्तेत चुकीच्या दिशेने जाऊ लागलो, तर समजावं आपल्या मधला हिरण्यकश्यपू जागा झाला आहे. आणि त्याला नाहीसा करण्यासाठी चांगल्या सकारात्मक विचारांशी, श्रद्धेची, कृतज्ञतेची भावना मनात निर्माण करणे गरजेचे आहे. जी भावना प्रल्हादाच्या मनात होती आणि त्यामुळेच तो आपल्या संकटावर मात करू शकला. माझ्यासाठी चमत्कार याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती घडून येणार परिवर्तन. जे दीर्घकाळ टिकतं. प्रल्हादाच्या जीवनावरच्या संकटाच्या समयी त्याच्या या दृढ भावनेने प्रत्यक्षात तो घडला आणि त्याचा जीव वाचला. पण असा हा चमत्कार एकाएकी घडलेला नसून तो त्याच्या अढळ, अविचल आणि निरंतर असणाऱ्या श्रद्धेमुळे घडला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे नरसिंहांनी येऊन संकटाचा नाश करावा असं जर मनापासून वाटत असेल तर भक्त प्रल्हाद होण्याला पर्याय नाही. ते होता यावं हीच इच्छा!
आशाबाईंचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या सामान्य जीवन जगणं पसंत करायच्या स्वयंपाकाची विलक्षण आवड.. लोकांना करून घालायची हौस बाजारात फिरून भाजीपाला आणण्याची हौस.. मला मंगला खाडीलकर यानी एकदा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या..
” एकदा आशा बाईंनी मला घरी बोलावलं मार्केटमध्ये जाऊन आम्ही भाजी घेऊन आलो अगदी भरपूर दोन पिशव्या भरून त्यांचे भाजीवाले ठरलेले. त्यांच्याशी उत्तम संवाद तोही त्यांच्या पातळीवर येऊन जणू काय त्या मैत्रिणी असाव्यात त्यानंतर घरी आल्यावर त्यांनी छान गरम भाकरी केली. ती टम्म फुगलेली भाकरी माझ्या पानात घालत त्या म्हणाल्या जेव त्याच्यावर लोण्याचा गोळा घातला आणि गरम भाकरी भाजी मला खाऊ घातली. ” असं अनेकांना आपल्या हातन करून खाऊ घालण्यात त्यांना खूप धन्यता वाटायची कारण त्यांच्यात एक छान गृहिणी लपलेली होती.
आपल्याला फक्त आवाजाची जादू असणारी आशा दिसते पण तसं नाही एक छान छोटी बहीण आपल्या अपंग असलेल्या भावावर नितांत प्रेम करणारी छोटी मुलगी हृदयनाथला सतत कडेवर घेऊन हिंडत असे ही आठवण खुद्द मंगेशकरांनी सांगितली ते म्हणाले, “आशा कधी कामाला मागे पडत नव्हती आम्ही आमच्या आजोळी आजीच्या घरी जायचं तेव्हा सगळ्यांचं टोपलं भर धुणं घेऊन आणि मला कडेवर घेऊन ती नदीवर जायची सगळ धुणं स्वच्छ धुऊन ती पाटी डोक्यावर घेऊन मला कडेवर घेऊन ती घरी येत असे आणि आजीला म्हणायची आजी मला खूप भूक लागली काहीतरी खायला दे त्यावर आजी त्यांना म्हणायची सारखं काय खायला लागतं ग तुला जा त्या डब्यात भाकरी आहेत तेल तिखट मसाला आहे घे आणि खा आणि तेल तिखट मसाला भाकरी हे जेवण अतिशय गोडीन त्या जेवत असत. ते म्हणाले तिने फार कष्ट काढले आहेत खूप संघर्ष केला आहे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तीने आपल्यावर घेतली आणि ती निभावली तिने खूप कष्ट केले आहेत”… हे सांगताना हृदयनाथांचा स्वर हळवा झाला होता हृदय नाथांना अखंड कडेवर सांभाळून घेणारी त्यांची बहीण आज गेली… सामान्य बाईचे दुःख भोगणारी वेदना सहन करणारी नवऱ्याच्या हिंसक वृत्तीला तोंड देणारी आणि त्यातून गरिबीत आपली मुले एका खोलीत राहून मोठी करणारी आशा पुढे महाराणी सारखी राहिली.
नकला करण्याचा एक विशेष गुण त्यांच्याकडे होता त्यामुळे बाबूजी आपल्याला कसे शिकवत असतात याची तर उत्तम नक्कल करायच्या ह्या गुणामुळे त्यांचे निरीक्षण खूप चांगले होते त्यामुळे पार्श्वगायनात आपलं गाणं कोणाच्या तोंडी जाणार आहे हे लक्षात घेऊन त्या गात असत हेलन बिंदू या कॅबिरे नृत्य करणाऱ्या अनेकांसाठी त्यांचा आवाज वरदान ठरला… त्यामुळे पिया तू अब तो आजा यासारखे गाणे आज आपण विसरू शकत नाही. लहान मुलांची ही गाणी त्यातही आशाताईंचा आवाज फिट होता. खतूबा ह्या गाण्यांमध्ये त्यांनी काढलेले वेगवेगळे आवाज हे गायन कलेच्या पलीकडचे होतेहे गाणे अलीबाबा चालीस चोर या चित्रपटातले असून पंचमदा त्यांच्या अनेक प्रयोगापैकी एक आहे गाण्याची सुरुवात अशी अरेबियन वगैरे हवी होती तेव्हा त्यांनी अरबी लोक लोकनृत्य करताना कसे ओरडतात ते पाहून त्या गाण्याची सुरुवात कशी केली… ते काही कवीने लिहिलेलं नव्हतं किंवा संगीतकाराने पण सांगितलेलं नव्हतं… तो त्यांचा स्वतःचा शोध होता. कवीचे शब्द आपल्या गाण्यातून लोकापर्यंत पोहोचवून त्याला न्याय देणं हे तर त्यांनी केलंच आहे पण शब्दशिवाय नुसत्या हमिंग वरती गाण म्हणलय देवानंद आणि नूतन सोबत चे एक गीत त्यामध्ये देवानंदला शब्द आहेत पण नूतन गाते ते हमिंग वर आहे ते पूर्ण शब्दाशिवाय च गाणं संवादाविना बोलू असे झाले आहे. इतकी ताकत त्यांच्या स्वरात आहे. बाबूजीं बरोबर गायलेली असंख्य मराठी गीत आपल्या मनात आणि घरात गोडवा भरून गेलेले आहेत. काल शेलार यानी शेवटची केलेली क्लिप त्यामध्ये त्या म्हणतात. ” मला हे दत्तगुरु दिसले “ह्या गाण्याचा कडव त्यांनी गायलं आहे मला वाटतं खरंच त्यांच्या परमेश्वर दिसत असावा नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं सगळं मिळालं पैसा अडका ऐश्वर्य प्रसिद्धी.. सगळं मिळवलं आता काही इच्छा नाही आता तृप्त आहे आता फक्त निघायचे… चार दिवसापूर्वी गाडगीळांशी बोलताना त्या म्हणाल्या माझ्या काही मुलाखत रेकॉर्ड केले असल्यास तर पाठव मला ऐकायचे आहेत आणि लवकर पाठव माझ्याकडे वेळ नाही बस एवढंच संभाषण झालं… मला वाटतं त्यांचा मृत्यू त्यांना समजला होता किंबहुना त्यांचं जगून झालं होतं. त्याना लक्षात आलंय असावे आणि म्हणून त्यांनी मनोमन परमेश्वराला हाक मारली असेल… जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे… अशा माणसांना आपण कधी थकले आहोत असं समजत नाही कारण ती आपल्याला हवी असतात आणि आपण त्यांना कधी विचारले नाही की बाबा रे खरच तू थकला आहेस का? का असं होतं हे माहित नाही पण होतं माथ्यावरती एकटीने पेललेलं संघर्षाचे, दुःखाचं ओझं वागवत ही बाई अत्यंत आनंदाने जीवन जगत आली. तिने आपल्या मुलांना एकच सांगितलं होतं गरीबीत जन्माला आलो तरी गरीबीत मरायचं नाही कारण गरिबीच्या यातना त्यानी भोगल्या होत्या त्या वेळा पाहिल्या होत्या, तो संघर्ष लढला होता, अशा एका संघर्षमय जीवनाचा काल अकस्मिक शेवट झाला. कोणाकडून फारशी सेवा न करून घेता अगदी सहजपणे त्या आपल्यातून निघून गेल्या पण त्यांची हजारो गाणी संपूर्ण विश्वामध्ये गाजली आहेत ती चिरंजीव आहेत त्यातून त्या आपल्याला रोज भेटणारच आहेत
अंतिम क्षणाला ब्रम्हा विष्णू महेश या सृजनकर्त्यापालनकर्त्या आणि विनाशकर्या परमेश्वराचा गोड स्वरात धावा करून त्यांच्याबरोबर सहज निघून गेल्या.. त्यांचा अंश होण्यासाठी! .. कदाचित लताबाई त्यांना तिथे भेटल्या असतील लताबाई त्यानी तेथे स्वागत केलं असेल. “अशा ये आलीस खूप दमलीस ग.. ” असं म्हणून त्यानी तीला मिठीत घेतल असेल दोन्ही बहिणींचे हे अपूर्व मिलन स्वर्गस्थ देवतांनी पाहून त्यांच्यावर नक्कीच पुष्पवृष्टी केली असेल. आशाबाई अजून काही वेळाने तुमचं पार्थिव शरीर पंचतत्वात विलीन होईल. पण तुमचा पंचतत्त्वात मिसळलेला ध्वनी, गोड आवाज, कधीही संपणार नाही तुमच्या प्रार्थना शाळेतील मुल गातील प्रेमी युगुल तुमचे प्रेम गीत गातील आया तुमची अंगाई गातील रसिका तरुण तुमचे कॅबरे ऐकतील कुणीतरी एखादी सलज्ज तरुणी तुमचं निगाहे मिलाने को जी चाहता है मनापासून गाईल आणि आपल्या प्रेमाकडे सलज्य नजरेने चोरून पाहिल केव्हा तरी पहाटे फसवून रात गेली आभाळा चांदण्याचे उसवून रात गेली हे सगळं तुम्ही अजरामर करून गेलात… आशाताई तुमच्या जीवन संघर्षाला तुमच्या मेहनतीला संकटना तोंड देऊन ताठ मानेने उभा राहणाऱ्या वृत्तीला तुमच्या गोड फिरत असलेल्या गळ्याला आणि भूतकाळ न विसरता सामान्य माणसासारखे आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसाची कदर करणाऱ्या तुमच्यासारख्या थोर कलावंताला साष्टांग दंडवत! तुमचा फक्त देह गेलाय जो आम्ही तुम्हाला समोरून कधी बघितलं नव्हतं आमच्यासाठी तुम्ही आहातच. काया नाही तरी नादा ने आहात.. तुमचा आवाज त्या आवाजातली फिरत शब्दांचा टोकदारपणा सारसार आमच्या कानात घुमत राहणार आहे लते बरोबर आशा नावाच विश्वाला पडलेले एक स्वप्न आज चांदण्यात विरून गेल. पृथ्वीवर पडणारा प्रकाश अधिक प्रखरं करून गेलं.!
*स्वरांची जादू, भावनांची भाषा आणि आयुष्याच्या प्रत्येक छटेचा अर्थ आपल्या गाण्यांतून सांगणाऱ्या आशा भोसले यांना ही अर्थपूर्ण शब्दांजली*…
भारतीय संगीतविश्वातील अजरामर स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना लेखरूपी श्रद्धांजली अर्पण करताना शब्द अपुरे पडतात कारण त्यांचा आवाज म्हणजेच भावना, जीवन आणि संगीताचा अखंड प्रवाह होय… त्यांच्या असंख्य गाण्यांतून त्यांनी प्रत्येक श्रोत्याच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
आशा ताईंचा आवाज हा केवळ गाण्यांचा नाही तर तो काळाचा साक्षीदार आहे… आशाताईंचा आवाज म्हणजे भावनांचा अथांग सागर… आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करणारा अनुभव… “राधा ही बावरी” मधील निरागस प्रेम, “माझे माहेर पंढरी” मधील भक्तीभाव, आणि “चुरा लिया है तुमने” मधील खट्याळ रोमँटिकता “पिया तू अब तो आजा” मधील त्यांचा खट्याळ आणि चैतन्यशील अंदाज, “दिल चीज़ क्या है” मधील नजाकत… स्वतःला अर्पण करण्यातील सौंदर्य आणि “इन आंखों की मस्ती” मधील भावपूर्ण गूढता तर “दम मारो दम” मधून बंडखोर तरुणाईचा आवाज बनल्या… “झुमका गिरा रे” मधील खट्याळपणा आणि “ये मेरा दिल” मधील आत्मविश्वास या प्रत्येक गाण्यांतून त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या रूपांत साकारलं… स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या आवाजात एक विलक्षण लवचिकता होती जी कोणत्याही संगीत शैलीला सहजपणे कवेत घेत असे… प्रत्येक गाण्यातून त्यांनी जीवनातील विविध छटा जिवंत केल्या… वेगवेगळ्या भावनांना स्वर दिला.. त्यांचा स्वर कधी कोमल झुळूक बनून मनाला स्पर्श करतो तर कधी उत्साहाची लाट बनून अंगात जोश भरतो… प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या गायकीची वेगळी ओळख निर्माण केली…
मराठी संगीतातही त्यांचे योगदान तितकेच मोलाचे आहे. “चांदणे शिंपीत जाशी” सारख्या गाण्यांतून त्यांनी कोमल भावनांना सुरेल स्पर्श दिला. त्यांच्या आवाजातली गोडी, सहजता आणि भावस्पर्शीपणा यामुळे ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत तर प्रत्येक शब्दाला आणि भावनेला आत्मा दिला.. त्यांच्या गाण्यांमधूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते सहज, बहुगुणी आणि सदैव ताजेतवाने…
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी विविध भाषांमध्ये गायली… हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची मोहिनी पसरवली… मराठी, हिंदी, गझल, पॉप—कोणतीही शैली असो आशाताई प्रत्येक ठिकाणी सहजपणे रुळल्या. त्यांच्या आवाजातली लवचिकता आणि भावनांची खोली यामुळेच त्यांची गाणी काळाच्या पलीकडे गेली.
संगीतकार आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. या जोडीने भारतीय संगीताला एक नवीन दिशा दिली, जिथे पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचाही सुंदर संगम दिसून येतो.
आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सूर नाहीत तर ती आपल्या आयुष्याच्या आठवणींशी जोडलेली भावना आहेत… कधी आनंदाचे क्षण, कधी विरहाचे दिवस, तर कधी स्वतःला शोधण्याचा प्रवास म्हणूनच त्या केवळ गायिका नाहीत तर आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत… त्यांच्या प्रत्येक गीतात एक कथा आहे एक अनुभव आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.
आशा भोसले यांचा आवाज हा काळाच्या पलीकडे जाणारा आहे. त्यांनी प्रत्येक पिढीला काही ना काही दिलं आहे कधी प्रेमाची गोडी, कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाचा उत्साह. त्यांच्या गाण्यांतून जीवनाच्या प्रत्येक भावनेला स्वर मिळाला आहे… आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सुरावट नव्हे तर जीवनाचा आरसा आहेत… आशाताईंचा आवाज आपल्याला शिकवतो की आयुष्य एकसुरी नसते ते अनेक रंगांनी भरलेले असते. कधी हसू, कधी अश्रू, कधी प्रेम तर कधी एकांत.. या सगळ्यांना त्यांनी आपल्या गाण्यांतून स्वर दिला.
आज त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचा प्रत्येक स्वर अजूनही हवेत दरवळतो आहे… त्यांचा आवाज प्रत्येक सुरातून, प्रत्येक गाण्यातून आपल्याशी संवाद साधत राहील. त्यांच्या गाण्यांतूनच त्या सदैव जिवंत राहतील… मनात, आठवणीत, आणि प्रत्येक सुरांत… जीवनाला सुंदर बनवणारा एक मधुर स्वर बनून…
आज त्यांना अभिवादन करताना त्यांच्या गाण्यांतूनच त्यांची आठवण जिवंत ठेवणं हीच खरी आदरांजली ठरेल कारण त्यांचा आवाज कधीच थांबणार नाही तो प्रत्येक सुरात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक हृदयात सदैव घुमत राहील.
आशा भोसले या केवळ एक गायिका नाहीत तर त्या एक भावना आहेत…
संगीताच्या इतिहासात सदैव जिवंत राहणारी एक अमर स्वरकन्या…
अशी ही सुरांची स्वामिनी दोन महाराण्यातील महाराणी आशा भोसले काल आपल्याला सोडून गेली. 92 वर्षाच्या महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख एकेरी करताना प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आपलेपणाच दिसतो. देवाला जसे आपण अरे परमेश्वरा असे म्हणतो तत्वत त्या दोन भगिनींना.. लता आणि आशा अशा… याना एकेरी संबोधनच मिळाली आणि तीच जगातील सर्वात आपलेपणाची भावना आहे असे मला वाटते.
काल टीव्ही वरती एक वाजता अचानक पणे बातमी आली आशाबाई आपल्याला सोडून गेल्या दोन मिनिट धक्काच बसला विश्वास बसेना चार वर्षांपूर्वी एक स्वर हरपला आणि आज दुसरा..! खूप वाईट वाटलं पण शेवटी मन म्हणायला लागलं अरे जगणार किती वर्ष. समृद्ध आयुष्य जगलेल्या जीवाने लोळत घोळत जाणे बरोबर नाही. आशाबाई अशाच उठून निघून गेल्या एका समृद्ध, संघर्षमय, बंडखोर, मिश्किल युगाचा अंत झाला. मंगेशकरांच्या पाच भावंडामधली ही सगळ्यात चुलबुली मुलगी.. एकदा एका मुलाखतीत ऐकले होते.. आशा घरात कुठे सापडली नाहीतर लहानपणी घरातली सारी या मुलीला हुडकायचे तेव्हा त्यांच्या मातोश्री बरोबर सांगायच्या अगं पलीकडच्या गल्लीत बाया शेवाया घालताहेत तिथे गेले असेल शेवया धरायला…! अशा बाईनी लहानपणापासूनच अशा शेवया घाल कुरडया कर पापड्या घाल सांडगे तोडून दे… या सगळ्या गोष्टीत आनंद घेतला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल आणि केवळ तीन वर्षांनी मोठी असलेल्या आपल्या भगिनीलाच सर्वस्व मानून तिचे श्रद्धेने ऐकत त्या मोठ्या झाल्या. लताबाईंवर जबरदस्त विश्वास ती म्हणाली आई वडिलांच्या पायाचे पाणी तीर्थ असते ते प्याल्याने आपले जीवन सुखी होते आणि ते झोपले असताना त्यांच्या पायावरून पाणी घालून ते एका ताटलीत जमा करून तीर्थसारखे प्राशन करणाऱ्या बहिणी… आशा बाईनी हा किस्सा सांगताना सांगितला होता… कदाचित आई-वडिलांच्या पदस्पर्शाच्या त्या पाण्याने आमचे जीवन उजळून निघाले त्यांचा आशीर्वाद लाभला आणि आम्हाला मोठ होता आलं…
मोठं होण्यासारखं काय होतं जवळ? वय अत्यंत लहान पाच भावंड एकट्या आईने काय करावं पैशाची विलक्षण नड दीनानाथ मंगेशकर गेल्यानंतर त्यांना घरी आणावं की नाही का तसेच स्मशानभूमीत न्यावे? हा प्रश्न त्या घराला पडला होता कारण दोनदा टॅक्सी करणे एवढे भाड्याचे पैसे नव्हते तरीही माईनी घरी नेण्याचा निर्णय घेतला ह्या सगळ्या घटनांचा परिणाम लताबाईंवर झाला होता कारण त्या थोड्याशा कळत्या होत्या. बाकी सगळे भावंडे लहानच होती ना मग सगळी श्रद्धा आपल्या मोठ्या बहिणीवर…! सुरांची जादू सगळ्यांजवळच होती लताबाई आपण मेहनत करत आणि इतराना करायला लावत. यौवनात पदार्पण केल्यानंतर आशाबाई थोड्या बंडखोर निघाल्या मनस्वी होत्याच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला. गणपतराव भोसले यांच्याशी लहान वयात लग्न केलं ते घरी कोणालाही पसंत नव्हतं तरीही त्यांनी आपला संसार नेटका करायचा प्रयत्न केला खूप गरिबी बघितली. गणपतराव भोसले विलक्षण हिंसक खूप त्रास दिला पण आपण केल आहे आपण निभावायच आहे हा आशाबाईंचा विश्वास ठाम होता, आणि त्यांनी ते केले. ही आशा भोसले यानी सांगितलेला एका मुलाखतीला किस्सा आहे… की मी कोणत्याही साडीवर पांढरा ब्लाउज घालून जात असे कारण माझ्याकडे तो एकच चांगला ब्लाऊज होता जुना ब्लाउज रात्री घालायचा आणि हा धुवून ठेवायचा सकाळी तो ब्लाउज साडीवर घालून रेकॉर्डिंग ला जायचं त्यामुळे दोन्ही खांद्यावर पदर घट्ट लपेटून म्हणलेली त्याची गाणी आपल्याला चित्रीकरणात दिसतात हे सार त्यानी मागे टाकले आणि मेहनतीच्या जोरावर त्या पुढे गेल्या त्यांना कामे मिळताना लताबाईंचाच तर मोठा अडसर होता लताबाईंच्या आवाजाची जादू लोकांवर साम्राज्य करीत होते पण हळूहळू त्यानी आपल्या आवाजाची जादू दाखवायला सुरुवात केली. आपल्या आवाजाचे वेगळेपण दाखवायला सुरुवात केले लताबाईंशी स्पर्धा नाही त्या नेहमी म्हणत लता शेवटी लता आहे..! एका मुलाखतीत तिने सांगितले होते दीदी कडून दाद मिळवणं खूप कठीण… एका गाण्यांमध्ये दोघी एकत्र गात होत्या गाणं होतं… मन क्यू बहका रे बहका आधी रात को… त्यावर अशा बाईंची दुसरे ओळ आहे बेला मेहका रे मेहका आधी रात को… आधी रात हा शब्द त्यांनी इतका सुंदर म्हणलाय लताबाईंनी चष्मा खाली घेतला आणि तिला हसून दाद दिली की अरे वा काय सुंदर हमसे भी आगे हो.. आशाबाईनी सांगितलं असे क्षण खूप कमी पण ते मी जपून ठेवले आहेत.
लताबाईंपेक्षा वेगळ्या धाटणीची असंख्य गाणी गाऊन सुद्धा म्हणजे कव्वाली भावगीत शास्त्रीय संगीत गायले गझल गायल्यात पाश्चिमात्य घाटाची गाणी गायली. कॅब्रे सॉंग गायलं… इतके वैविध्य आशाबाई देऊ शकल्या तरीही त्या म्हणतात लता ही लताच आहे तो हिमालय आहे हे असं म्हणायला खूप मोठे पण लागत. आपल्या मोठ्या बहिणीबद्दल आदर प्रेम हे सगळं सगळं ओसंडून वाहत होतं लताबाई एखादी गोष्ट नाही म्हणाल्या की आशांनी पुढे जाऊन ते कधीच केलं नाही कारण त्यांना कळून चुकलं होतं कि ती जे सांगते त्यात खूप जास्त तथ्य असते. अनेक डॉलरची बिदागी देऊन आपल्या मुलाच्या लग्नात लता आणि अशांनी गावे अशी इच्छा एका माणसाने व्यक्त केली होती लता दीदीनी त्याला साफ नकार दिला. आशाबाई येतील अशी आशा त्याला वाटत होती लताबाईंनी फक्त एकच वाक्य उच्चारलं… ” लता तू लग्नात जाणार आहेस का गायला? ” ह्या एका वाक्यात सगळं काही भरून होतं आणि आशाबाईने तात्काळ नकार दिला.
आशाबाई बंडखोर होत्या कारण त्या लहान बहीण होत्या हट्ट करणे बंडखोरी करणं हा त्यांचा हक्कच होता पण लताबाई ना ते करून जमणार नव्हतं कारण त्यांच्यावर त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती आपल्या वडिलांचं नाव मोठं करायचं होतं आणि हे करत असताना आपल्या भावंडांनी कुठेही चुकू नये चुकीचा निर्णय घेऊन ये चुकीच्या ठिकाणी गाऊ नये हाच लताबाईंचा उद्देश होता आणि हा त्यांचा हेतू ती सर्व भावंड जाणून होती त्यामुळे लता बाई त्यांच्यासाठी बहीणच नव्हे तर आई बाप सर्वस्व होत्या खूप मुली आपल्या कुटुंबासाठी राबतात पण त्यांची भावंड कदर करतीलच असं नाही लताबाईंच भाग्य मोठं ही सगळ्या भावंडांनी त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. आशाबाईंच्या प्रत्येक मुलाखतीत लतादीदींबद्दल विलक्षण आदर प्रेम आणि कृतज्ञता दिसून येते.