आज सकाळीच गणेश सलून मध्ये कटिंग करण्यासाठी गेलो असता माझ्या आधीच एक गृहस्थ त्यांची कटिंग चालू होती,.. जुन्या ओळखीतून नमस्कार झाला,
स्व.अशोकराव अग्रवाल शेठ यांचे धाकटे चिरंजीव सन्माननीय विकास अग्रवाल यांची भेट झाली,
अनेक जुन्या आठवणीला वळसा घालताना फ्लॅश बॅक मध्ये गेलो,
त्यांच्या मोहक लाघवी गोड वाणीतून मनाला खूप बरे वाटले…
मला ते म्हणाले “माफ करा साहेब तुमचे नाव मला माहित नाही परंतु लॉर्ड्स मारुती व्हॅन वाले म्हणूनच आम्ही तुम्हाला ओळखतो…
इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मी त्यांना विचारले… “गोपाल प्रिंटिंग प्रेस” चे नाव तुम्हीं अजूनही व्यवसायातून जपून ठेवले आहे,
“ते म्हणाले आमच्या आजोबांची आणि वडिलांची ती कृपा आणि संस्कार आहेत…”
या यशस्वी व्यवसायाचे अती महत्वाचे राज त्यांनी बोलून दाखविले…
ते म्हणाले…”आमच्या वडिलांनी आम्हाला म्हणजे आमच्या तिघा भावांना दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी शिकविल्या…”
“एक प्रत्येक ग्राहकांशी अगदी प्रेमाने अदबीने विनम्रपणे वागायचे कारण प्रत्येक ग्राहक आम्हाला काही न काही देऊनच जातो, “
“आणि दुसरे अतिशय महत्वाचे आपल्या कामगारांचे पगार दुनिया इकडची तिकडे होवो महिन्याच्या 1 तारखेला त्यांचा पगार झालाच पाहिजे, “
एवढे बोलल्यावर त्यांच्या आवाजात एक कंपन आले आणि गंभीर आणि भावनिक शब्दात ते सांगू लागले…
“वडील म्हणायचे महिन्याच्या 1 तारखेला कामगार नाही तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक लहान थोर त्याच दिवसाची प्रकर्षाने वाट पहात असतो, “
घरातील किराणा असेल, लेकरांची कपडे लत्ते असतील, शालेय सामग्री असेल, चपला असतील, दूधवाला असेल, प्रत्येकाची देणेदारी, दवाखाना असेल…अशा अनेक गरजू गोष्टीची पूर्तता महिन्याच्या 1 तारखेला मोठी आशा धरून दरवाजाच्या उंबऱ्यावर उभी असते, “
“त्या एक तारखेला जेंव्हा आपला कामगार घरी जातो ना! “
“तेंव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक जण मोठ्या आशेने दरवाज्याकडे टक नजर लावून बसलेले असतात, “
“आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांचा आपण हिरमोड कधीच करायचा नाही”
थोडेसे भावनिक ते म्हणाले,
“या दोन वडिलांच्या तत्वावर आज आम्हीं “गोपाल प्रिंटिंग प्रेस” ला इथपर्यंत म्हणजे 82 वर्षानंतर ही व्यवस्थित चालू शकलो…”
पुढे जाऊन ते हेही म्हणाले…”आजही आम्ही तिघे भाऊ दीपक शेठ, संदीप शेठ आणि मी विकास एकत्र आहोत…”
“आमचे विचार आचार एक आहेत…”
“आमचे तिन्ही भावांचे कुटुंब एकत्र आहे…”
मी मनाशीच पुटपुटलो…
पवित्र ग्रंथ सांगतो…”तीन पदरी दोर सहसा तुटत नाही”
याचा प्रत्यय आज याची देही आला…
1943 साली अग्रवाल कुटुंबियांनी सुरू केलेले हे श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील दालन आजही “गोपाल प्रिंटिंग प्रेस” या नावाने दिमाखात यशस्वी रित्या चालू आहे…
छोट्याश्या भेटीतून दोन मूलमंत्र उराशी घेऊन आजचा दिवसाचे अत्यंत सार्थक झाल्याचे खूप मोठे समाधान आज मला झाले…
☆ “हा EGO नाही तर SELF RESPECT...“ ☆ संध्या बेडेकर ☆
– – कधी कधी शक्ति प्रदर्शनकरणंआवश्यकअसत.
आज कुठून सूर्य उगवला माहित नाही. रोज शांतपणे सुरू होणारा दिवस, आज जरा विचित्रच सुरू झाला. रात्रभर अस्वस्थच होते मी.स्वप्न पण विचित्रच पडली. सारखी मारामारी दिसत होती. द्रोण, मिसाइल, सायरन किती ते आवाज! डोक भणभणत होत. रोज सकाळी देवाला नमस्कार करत आणि आजची सकाळ बघायला मिळाली, त्याबद्दल देवाचे आभार मानत, भूमीला वंदन करत उठणारी मी, आज वर्षानुवर्ष चालणारी परिपाटी पार विसरून गेले.
मन अस्वस्थ, अशांत, काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळ घडलय, जे मन विचलित करणार, तस काहीतरी वेगळच.
भांडण, मारामारी, ठोकाठोकी आज स्वप्नात हेच सगळं बघीतल.आणि TV वर पण जोरजोरात तेच सांगण चालू होत.
आज काही खर नाही.विचाराची दिशा चूकलीच आहे. आज त्याच संदर्भात जुन्या घटना आठवल्या.
मनाने एकदम भरारी घेतली. मन तर वाटच बघत असत. सुपरसोनिक स्पीड ने भांडणाच्या सर्व घटना बरोबर शोधून काढल्या. त्यावर बरोबर वार केला.
खरतर भांडाभांडी करायचा माझा स्वभाव नाही. पटत नाही अस जेंव्हा कधी माझ्या लक्षात येत, तेंव्हा मी रस्ता बदलते.हा सरळ सोपा मार्ग मी निवडला आहे. पण जेंव्हा हे लक्षात येत की आपल्या शांतिपूर्ण वागण्याला समोरचा granted घेतोय, तो आपल्याला मूर्ख समजतोय. बेवकूफ समजतोय, तेंव्हा मात्र दणका दयावाच लागतो. दणका मात्र वेळ बघून, जोरात बसेल, चार लोकांच्या लक्षात येईल असा देते.
जोर का झटका जोर से हीलगे असाच वार करायचा.
या विचारा बरोबर हे जे चाललय, ते चूक की बरोबर याचाही गोंधळ मनात चालूच असतो. त्यांना दणका देताना, आपल पण नुकसान होतच असत ना.
दणका द्यायचे दोन फायदे होतात.
एकतर आपल्याला आपली शक्ति कळते.वार करताना काय बरोबर? कुठे चूक झाली? हे कळत. म्हणजे पूढे जर अशी वेळ आलीच, तर जास्त पावरफुल वार करता येईल. लगेच पूढची strategy तयार होते.
आणि दुसऱ्यालाही आपण काय आहोत? हे समजत. बाकीचे चार लोक आपल्या आप सावध होतात. त्यांनाही आपल्या शक्तिची झलक दिसते. आपल्याबद्दल त्यांचे अनुमान/ Impression ते ठीकठाक करतात.
उदया पुन्हा खोड्या काढायच्या आधी, पंगा घ्यायच्या आधी सर्व विचार करतील.
त्यामुळे भांडण नेहमी चूकच असत अस नाही.असा आज मी शोध लावलाय.
लहानपणी शिकवल होत भांडायच नाही. आता गेले ते दिवस. एका गालावर मारल तर दुसरा गाल पूढे करायचे दिवस गेले.
कधी कधी शक्ति प्रदर्शन करणही आवश्यक असतच. आपण जपून ठेवलेले हथियार वेळ पडली तर काम चोख बजावतात की नाही त्यांची testng पण होऊन जाते.
भांडणात फायदा तसा कोणाचाच नसतो. भांडणानंतरही नाॅर्मल व्हायला वेळ लगतोच.
अरे!! त्यावेळेसमला अस बोलायला हव होत, अस म्हणायला हव होत. अस करायला हव होत. चर्चांचा दौर सुरू होतो.जो तो आपल्या बुद्धीनुसार, स्वभावानुसार, आपला फायदा बघून आपले विचार मांडत असतो.
हे सर्व मनात येत राहत. बरेच दिवस त्यावर विचार होत राहतो. हे अस किती दिवस चालेल? हे माहित नसत. एकदा मनसोक्त ठोकून झाल की लवकरात लवकर भांडण थांबविण आवश्यक असत. कधी कधी लोक दुसर्यांचा चष्मा घालून त्यांचा आधार घेऊन भांडतात.इंग्रजीत भांडतात.त्यांचा बहुतेक असा समज असतो की अस केल्याने समोरच्यावर जास्त दबाव पडेल. दबाव आणि प्रभावाचा माझ्यावर काडीचाही असर पडत नाही.
भांडताना केंव्हा थांबायच? ते मात्र वेळेवर कळलच पाहिजे. आपल्या भांडणाची मजा घेणारे कोण? किती जण आहेत? आपल्याला उक्सवणारे किती आहेत? आपल्याला समोर ढकलून मागच्या मागे पळून जाणारे कोण? किती? शुभचिंतक किती? हेही समजत. तसे शुभचिंतकांची संख्या खूप नसतेच.या अशा लोकांच्या तावडीत जायच नाही.
There are lot of jealous people with friendly faces around us.We must always remember this truth.
त्यांच्या मनोरंजनाचे कारण आपण व्हायच नाही. ते काय फ्री फूकट मध्ये मजा घेतात.नुक़सान तर आपलही होतय ना. आपण आपली किती energy, वेळ, पैसा, मनस्वास्थ्य? यावर खर्च करायच, हे आपल्यालाच ठरवायच असत. त्यामुळे वेळेवर, Cease fire करण जमल पाहिजे.
लोकांना काय वाटेल ते वाटू दे. काही समजो वा न समजो लोक काय दोन्ही बाजूने बोलतात.
If you want to make wrong decision, ask everyone.
Cease fire मी घाबरले म्हणून झाला नाही, केलाय.. माझा उद्देश्य पूर्ण झाला होता. म्हणून केलाय. मग पूढे होणारे नुकसान वाचविण्यातच हुशारी होती.एवढ समजण्या इतपत आपण हुशार आहोतच. आपल्याला आपली जबाबदारी, कर्तव्य, माझ, माझ्या कुटुंबाच हित समजण्या एवढी हुशार मी नक्कीच आहे. फूकटच काही मिळतय म्हणून लाळघोटेपणा करण, जमत नाही मला. हा माझा
EGO नाही SELF RESPECT आहे.
सकाळी विचलीत असलेल मन हळुहळु शांत झाल. जे झाल ते चांगल झाल. आणि लवकर थांबल, तेही चांगलच झाल.
म्हणतात ना,…
Revenge is just waste of Time, Skip people.
हे जरी खर असल तरी कधी कधी छान दणका देण आवश्यक असतच.
शक्ति प्रदर्शन करण ही आवश्यक आहे.
खूप soft राहिल तर लोक मूर्ख समजतात.तेंव्हा आपली strong personality दाखविणेही आवश्यक असते.
छेडोगे तो, छोडेंगे नही, थोडा नुकसान सह लेंगे, लेकिनझुंकेगे तो बिल्कुलही नही.
हा मेसेज देणे आवश्यक असत…
At the same time…
If you treat me good, I will treat you better.
हेही सांगणे/ दाखवणे आवश्यक असते.
कोणाला सांभाळायच? आणि कोणापासून सांभाळून रहायच? हे ही समजलच पाहिजे. नाही का?
श्रावणातल्या पौर्णिमेची चाहूल लागली की मनाच्या एखाद्या हळुवार कोपऱ्यात बालपण पुन्हा जागं होतं. रंगीबेरंगी राख्या, मिठाईची ताटं, भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारा आनंद आणि त्यानंतर मिळणारी छोटीशी ओवाळणीची भेट… राखीबंधनाचा हा सोहळा केवळ एका दिवसाचा नसतो. तो आठवणींच्या धाग्यांनी विणलेला असतो.
पूर्वी राखी म्हणजे बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेला संरक्षणाचा धागा, अशी त्याची साधी व्याख्या होती. भाऊ बहिणीचे रक्षण करेल, तिच्या पाठीशी उभा राहील, अशी त्यामागची भावना. त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीत या भावनेला निश्चितच महत्त्व होते.
पण काळ बदलला आहे. आजची बहीणही सक्षम आहे, स्वावलंबी आहे, स्वतःचे निर्णय घेणारी आहे. ती भावाकडून केवळ संरक्षणाची अपेक्षा करत नाही. तिला त्याची साथ हवी असते, पण त्याचबरोबर तीही भावाच्या आयुष्यातील आधारस्तंभ होऊ शकते.
म्हणूनच आज राखीचा अर्थ नव्याने समजून घ्यायला हवा.
‘तू माझं रक्षण कर’ ऐवजी ‘आपण एकमेकांसाठी उभे राहू’, हा आजच्या राखीचा अधिक सुंदर अर्थ असू शकतो.
भाऊ बहिणीच्या स्वप्नांना पाठिंबा देईल आणि बहीण भावाच्या संघर्षात त्याचा हात घट्ट धरून ठेवेल. यशाच्या क्षणी दोघे एकमेकांसाठी टाळ्या वाजवतील आणि अपयशाच्या क्षणी एकमेकांना सावरतील. हे नाते संरक्षणाच्या एकतर्फी भावनेतून सहजीवनाच्या आणि समानतेच्या भावनेत प्रवेश करेल.
आज अनेक भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत, देशांत राहतात. स्क्रीनवरून होणाऱ्या भेटी, व्हिडिओ कॉलवरच्या गप्पा आणि कुरिअरने पोहोचणारी राखी यामुळे अंतर कमी होते. मनगटावर राखी बांधली जात नसली तरी मनातला धागा तसाच घट्ट राहतो.
कधी कधी तर राखीचा अर्थ रक्ताच्या नात्यापलीकडेही जातो. आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटलेली मैत्रीण, संकटात धावून आलेला मित्र, आधार देणारा सहकारी—ही नातीही आपल्याला सांगून जातात की माणसाला सुरक्षित वाटण्यासाठी रक्ताचं नातं असणं आवश्यक नाही; विश्वासाचं नातं असणं आवश्यक आहे.
आजच्या पिढीला राखी देताना आपण तिला केवळ एक परंपरा म्हणून देऊ नये. तिच्यामागचा विचारही द्यायला हवा. स्त्रीचे संरक्षण करण्यापेक्षा तिचा सन्मान करणे, तिच्या निर्णयांचा आदर करणे आणि तिच्या स्वातंत्र्याला साथ देणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच भावालाही आपल्या भावनांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा, कमकुवत क्षणी आधार मागण्याचा आणि बहिणीकडून आधार स्वीकारण्याचा तितकाच अधिकार आहे.
बहिणीला राखीच्या बदल्यात महागडी भेटवस्तू देणे, पैसे देणे किंवा तिच्या नावावर काहीतरी देऊन आपले कर्तव्य पूर्ण झाले असे मानणे, यापेक्षा तिच्या कर्तृत्वाची दखल घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तिला ‘घेणारी’ म्हणून नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभी राहणारी, निर्णय घेणारी आणि कुटुंबाच्या जडणघडणीत समान वाटा उचलणारी व्यक्ती म्हणून पाहणे गरजेचे आहे.
बहिणीला दानाची नव्हे, सन्मानाची गरज आहे. तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन, तिच्या करिअरला पाठिंबा, तिच्या मताला महत्त्व आणि तिच्या स्वप्नांना मोकळे आकाश—हीच तिच्यासाठी सर्वात मोठी राखीची भेट ठरू शकते.
राखीचा धागा कितीही नाजूक असला तरी त्यात नातं घट्ट बांधण्याची ताकद असते. त्या धाग्यात मालकी नसावी, बंधन नसावे; असावी ती फक्त आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाची गाठ.
म्हणून या राखीपौर्णिमेला बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना एवढंच म्हणावं—
“तू माझं रक्षण करशील, यापेक्षा मला खात्री आहे की तू माझ्या पाठीशी उभा राहशील. आणि तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात मीही तुझ्या सोबत असेन.”
कदाचित हाच आधुनिक राखीबंधनाचा खरा अर्थ आहे.
मनगटावरचा धागा काही दिवसांनी जुना होईल, तुटेलही. पण परस्पर विश्वासाचा धागा आयुष्यभर टिकला, तरच राखीबंधन सार्थकी लागेल.
गुरुपौर्णिमेच्या दिवस होता ऑफिसमधून परतताना एसटी स्टँडवर नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती.
एका बाकावर मी आणि एक वृद्ध गृहस्थ शांतपणे बसले होतो. साधा पांढरा कुर्ता, हातात जुनी कापडी पिशवी आणि डोळ्यांत विलक्षण शांतता. एकीकडे माझ्या शेजारी एक तरुण सतत मोबाईलवर ओरडत होता. बाबा तुम्हाला काहीच कळत नाही, प्रत्येक गोष्टीत सल्ले देऊ नका, मी आता लहाना राहिलेला नाही, माझं आयुष्य मी स्वतः बघेन, तुम्ही उगाच माझ्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणं बंद करा, असा रोजचाच त्रास झालाय मला तुमचा, असं रागारागाने बोलून त्याने फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर संताप आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. माझ्या मनालाही वाटलं की आजकालची मुलं आईवडिलांचा आदरच करत नाही. कोणाची परिस्थिती कशी आणि मनस्थिती मला ओळखता. येत नव्हती. नक्की काय झालं हे कळत नाही. पण एका बापाची काळजी समजत होती. कुठलातरी ताण मुलाच्या मनावर होता त्याच्या शब्दातून तो जाणवत होता.
तेवढ्यात समोर बसलेले आजोबा उठले आणि त्या मुलाजवळ गेले. ते रागावले नाहीत किंवा त्यांनी उपदेशही केला नाही. त्यांनी फक्त अत्यंत आपुलकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की बाळा एक विनंती करू. तो चिडून म्हणाला की काय. आजोबा हसले आणि म्हणाले की आज घरी गेल्यावर बाबांच्या खोलीत जा, ते झोपले असतील तर त्यांच्या पायाशी दोन मिनिटं शांत बस. तो हळूच हसला आणि म्हणाला की त्याने काय होणार. आजोबा अतिशय हळुवार आवाजात म्हणाले की काही नाही झालं तरी चालेल,
पण एक दिवस असा येईल की त्या खोलीत पलंग असेल, उशी असेल, त्यांच्या चप्पलाही दारात तशाच असतील, त्यांचा कपड्यांचा वासही खोलीत असेल, फक्त हाक मारायला बाबा नसतील आणि त्या दिवशी पश्चात्तापाचे अश्रू ढाळले तरी ती गमावलेली दोन मिनिटं जगातील संपूर्ण संपत्ती दिली तरी विकत मिळत नाहीत. क्षणभर संपूर्ण स्टँडवर गहिवरलेली शांतता पसरली. त्या शब्दांचा थेट त्याच्या हृदयाला स्पर्श झाला.
आईवडिलांचं असणं हे किती मोठं छत्र असतं आणि आपण काय गमावून बसू शकतो याची जाणीव त्याला झाली. त्याच्या डोळ्यात क्षणार्धात पाणी आलं. त्याने थरथरत्या हातांनी पुन्हा फोन काढला आणि बाबांना फोन लावला. यावेळी त्याचा आवाज पूर्णपणे बदलला होता, गळ्यात हुंदका दाटून आला होता. तो कातर आवाजात म्हणाला की बाबा मला माफ करा, मी खरंच खूप चुकलो, मी आत्ताच घरी येतोय, आज आपण एकत्र बसून चहा पिऊया आणि मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला काय उत्तर आलं माहीत नाही, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर पश्चात्तापानंतरचं एक वेगळंच समाधान आणि हसू होतं. मी त्या आजोबांकडे पाहिलं आणि विचारलं की तुम्ही शिक्षक आहात का.
ते हसले आणि म्हणाले की नाही बाई, मी फक्त आयुष्याकडून शिकलेला विद्यार्थी आहे. इतकं बोलून ते गर्दीत बस मधे चढून निघून गेले. मी त्यांचं नावही विचारू शकले नाही. आज अनेक वर्षांनीही गुरुपौर्णिमा आली की मी देवापुढे दिवा लावते, पण त्याआधी घरातल्या माणसांसोबत दहा मिनिटं बसते. कारण त्या अनोळखी वृद्धाने मला शिकवलं की गुरू तो नसतो जो मोठमोठी प्रवचनं देतो, गुरू तो असतो जो एका वाक्यात आयुष्याचा आणि नात्यांचा अर्थ बदलून टाकतो. त्या अनोळखी माणसाचं नाव मला आजही माहीत नाही, पण प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी मनात त्यांना नमस्कार करते. कारण काही गुरू पुस्तकात भेटतात, काही मंदिरात आणि काही अचानक एखाद्या एसटी स्टँडवर. मनामध्ये गुरुचे स्थान मिळवतात.
असे गुरू कोणत्याही शाळेच्या पाटीवर किंवा पुस्तकात नसतात, तर ते आयुष्याच्या वळणावर अचानक भेटतात. त्यांची एकच साधी गोष्ट आपल्याला नात्यांचं खरं मोल शिकवून जाते. कोणतीही अपेक्षा न ठेवता मनाला स्पर्श करून आयुष्य बदलणारा हाच अनुभव खऱ्या अर्थाने गुरू असतो.
‘टाटा मोटर्स’चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कशिया, स्पथोडिया, ग्लिरिसिडिया, जकरेंडा, पेल्टाफोरम, बाटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल! जगविख्यात पक्षिनिरीक्षक डा. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी.
चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची ‘इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी. ‘ ‘टेल्को’ कंपनीने ती ताब्यात घेऊन तिथे आपली ‘ मशीन टूल डिव्हिजन’ सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला ‘स्टडर्स बिल्डिंग’ नावाची, इंग्रजी ‘सी’ च्या आकाराची एक बैठी एकमजली वातानुकूलित इमारत आहे. तिला ऐसपैस पडवी आहे. इतर शॉप्स आणि इमारतींपासून ती जरा दूर आहे. तिच्या मागे उत्तरेला दाट झाडी आहे. त्यामुळे तिथे अनेक पक्षांचा राबता असतो. या परिसरात मानवाची फारशी वर्दळ नसते. या इमारतीत ‘आर अँड डी १’, ‘मेकनिकल अँंड हायड्रॉलिक लॅब अँड टेस्टिंग’ आणि मेट्रोलॉजि’ हे विभाग आहेत. त्यावेळी काही काळापुरती माझी नियुक्ती या हायड्रॉलिक लॅब विभागात झाली होती.
ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. दुपारी तीन-चारची वेळ होती. आकाश झाकळून आले होते. सर्वत्र अंधार पडला होता म्हणून बिल्डिंगमधले दिवे लावले. जेव्हा इमारत विद्युत प्रकाशाने उजळून निघाली, तेव्हा लक्षात आले की कॉरिडॉर मात्र अंधारात आहे. तिथल्या ट्यूबलाईट्स लागत नाहीयेत. मी लगेच सी पी ई डीला (सेंट्रल प्लांट इंजिनियरिंग डिव्हिजन) फोन करून कळविले आणि सर्व नवीन ट्यूबलाईट्स बसवायची विनंती केली. पाच वाजता जनरल शिफ्ट संपल्यामुळे मी घरी निघून गेलो.
दुसऱ्या पाळीतील सी पी ई डी च्या कर्मचाऱ्याने तत्परतेने येऊन कॉरिडॉरमधील सर्व दिवे बसवले. त्याचे हे काम होईतो जेवणाची सुट्टी झाली. त्याने बरोबर आणलेल्या शिडीची घडी घालून ती पडवीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकवून उभी केली आणि तो गेला. शिडी तशी तिथेच राहिली. ती परत न्यायची तो विसरला आणि पुढे सात-आठ दिवस ती तशीच पडून राहिली.
एक दिवस माझ्या दृष्टीस ती शिडी पडली. मी सी पी ई डी ला फोन करून ती शिडी त्वरित घेऊन जायला सांगितले. मला कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचा रागही आला. काही वेळाने शिडी न्यायला एक जण आला पण त्याने शिडीला हातही लावला नाही. नुसताच तिच्याकडे बघत बघत, आला तसा परत गेला. शिडी तिथे कोपऱ्यात होती तशीच उभी!
दुसऱ्या दिवशी मी जरा तणतणतच फोन केला. म्हटलं, “काय चाललंय हे? ती शिडी का नेत नाही तुम्ही? आता आठ दिवस होऊन गेले इथले काम करून. काम झाल्यावर पुढचे निस्तरायला नको वेळच्यावेळी? ” पलीकडून मलाच प्रश्न झाला, “काय? अजून नाही नेली? कमाल आहे. मी कालच सांगितलं होतं आणायला. इथे आमच्या डिपार्टमेंटचं कामही अडून राहिलंय त्यामुळे. मी आत्ता लगेच पाठवतो कोणालातरी आणि उचलून आणतो. ” मी तरीही जरा जोरातच बोललो, “आत्ताच्या आत्ता हलवा इथून. आहो, म्हणजे आम्ही फाईव्ह एस ची डिसिप्लिन काटेकोरपणे पाळायची, त्यासाठी परिश्रम घ्यायचे आणि तुम्ही ही अशी गलथान कामं करायची? ते काही नाही. त्वरित उचला इथून. “
तो कर्मचारी परत आला पण शिडी उचलायच्या ऐवजी सरळ माझ्या केबिनमधे शिरला आणि अजिजीने म्हणाला, “एक्स्ट्रिमलि सॉरी सर. काईंडली एक्स्यूज मी. सर, खरं म्हणजे मी परवा शिडी न्यायला आलो होतो. शिडी उचलायला तिच्या जवळ गेलो तो माझ्या लक्षात आले की त्या शिडीच्या वरच्या एका पायरीच्या सांदीत एक पक्षांची जोडी आपले घरटे करत्येय. ते अर्धेअधिक झालंय करून. पुढच्या चार-पाच दिवसात बांधून पूर्ण होईल बहुतेक. ते पाहून मनात विचार आला, बिचाऱ्यांनी काडी काडी गोळा करून घर बांधायला घेतलंय. दिवसभर आळीपाळीने हेलपाटे मारतायत दोघही. समजा, मी ही शिडी नेली तर त्याचे घरटे तुटेल. दोघांनी केलेले काम वाया जाईल. त्यांचे घरट्याचे स्वप्न अर्धवट राहील. त्यांनी घेतलेल्या साऱ्या कष्टांवर पाणी पडेल. पुन्हा त्यांना दुसरी सुरक्षित जागा शोधावी लागेल. परत काड्या, कापूस, चिंध्या शोधून आणाव्या लागतील. यात किती वेळ जाईल साहेब. त्यांचा सगळा शेड्यूल डिस्टर्ब होईल. पक्षांचा अंडी घालण्याचा हा सिझन आहे. म्हणून तर त्यांची लगबग चाललीय येवढी. अशात एखाद्याचे घर असे विनाकारण उध्वस्त करणे बरे दिसते का आपल्याला, तुम्हीच सांगा. असे पाप नको व्हायला हातून म्हणून मी शिडी नेत नाहीए. त्यातून जर तुमचा हट्टच असेल तर नेतो. पण मनाला पटत नाही हे. सांगा काय करू? नेऊ का राहू देऊ तिथेच? महिन्याभाराचा प्रश्न आहे. एकदा त्यांच्या पिलांना पंख फुटले की जातील भुर्रssकन् उडून. प्लीज कोआँपरेट करा सर. “
त्या कर्मचाऱ्याच्या भावना इतक्या प्रामाणिक होत्या, त्याच्या बोलण्यात येवढे आर्जव होते की मला काय करावे हेच सुचेना. तो माझ्याशी बोलत असताना इतर मशीनवर काम करणारे दोन-तीन आपरेटरही भोवती गोळा झाले. सर्वांना त्या कर्मचाऱ्याचे म्हणणे पटले असावे. खरे म्हणजे मलाही त्याचे म्हणणे पटले होते. त्याच्या या उदात्त विचारांना दाद द्यावीशी वाटत होती. त्याचे कौतुक करावसे वाटत होते.
तरीही मी म्हणालो, ” अरे असे कसे करता येईल. पुढचे दीड-दोन महिने ही शिडी अशीच ठेवायची कोपऱ्यात अडगळीसारखी, त्यावर धूळ, कोळिष्टकं जमायला! त्या भागाची झाडलोट, स्वच्छता होणार नाही. इट विल लुक अग्लि, अन्-टायडी, इनडीसेंट अँड विच इज नाट अक्सेप्टेबल”.
यावर माझ्याच शॉपमधला एक पुढे आला आणि म्हणला, ” सर, त्याची काळजी आम्ही घेऊ, इथे काम करणारे सगळे. ” “काळजी घेऊ म्हणजे नक्की काय करणार? जे दिसायला कुरूप आहे त्याला कसे रूप देणार तुम्ही? उगीच काहीतरी आपलं. ” मी तरीही विरोध दर्शविला.
त्यावर दुसरा म्हणाला, “सर, ते आमच्यावर सोपवा ना. एक दिवस जाऊ द्या. उद्या करू काहीतरी व्यवस्था. आम्ही केलेली व्यवस्था आवडली तर ठेवा. नाही तर हा त्याची लडर घेऊन जाईल. ही पाखरं दुसरा आश्रय शोधतील. आपण फाईव्ह एस च्या आग्रहासाठी आपल्या आश्रयाला आलेली पाखरं उडवून लावू. फाईव्ह एस चे आडिट होईल, आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. मग आपण त्याला फ्रेम करून इथेच, या कोपऱ्यातल्या भिंतीवर टांगून ठेऊ. साऱ्या जगाला दाखवू आपले कर्तृत्व. ”
हा शेवटचा उपरोध अतिशय तीक्ष्ण आणि मर्मभेदी होता. विषय भावनिक झाला होता. औद्योगिक परस्पर संबंधांत ताण निर्माण करू पहात होता. कामगारांच्या म्हणण्यात सुसंस्कृतता, सहृदयता, भूतदया, पर्यावरणाचे भान, जबाबदारीची जाणीव इ. अनेक जीवनमूल्ये व व्यवसायमूल्ये डोकावीत होती. त्यांचा आदर करणे आवश्यक वाटले मला.
क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग मीच म्हणालो, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर राहू दे शिडी तिथे. बघू नंतर. ” माझा निर्णय सगळ्यांना आवडला. “थक्यू सर. आम्ही काळजी घेऊ. ” असे म्हणत सगळे पांगले, आपापल्या मशीनवर जाऊन कामाला लागले. मी ही मिटिंगला निघून गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफेसमधे आलो. दिवसाच्या कामाचे शेड्यूल सहकाऱ्यांना समजून सांगितले. कामाच्या सूचना दिल्या आणि टेबलावर येऊन पडलेले टपाल पहायला सुरवात केली. तेवढ्यात एक कर्मचारी टेबलाजवळ आला आणि म्हणाला, “सर, तुमचं हे हातातलं काम झालं की जरा कॉरिडॉरमध्ये याल का? बघा कसं झालंय ते. ” त्याचा विषय माझ्या लगेच लक्षात आला आणि मी म्हणालो, “नंतर कशाला? हा आलोच, चल, तुझ्याबरोबर लगेच येतो. ”
बाहेर येवून बघतो तो काय! शिडी कोपऱ्यात पूर्वीसारखीच भिंतीला रेलून उभी होती. वरती गवताचे घरटे आकार घेतच होते. पण शिडीभोवती काही अंतरावर वर्तुळाकारात सुंदर फुलांच्या कुंड्या मांडल्या होत्या. त्याच्या बाहेर साखळीचे कुंपण उभारले होते. शेजारी एक स्टँड उभा करून त्यावर सुवाच्य अक्षरात एक पाटी लावली होती. त्यावर लिहिले होते, “please don’t disturb. Work in progress”.
जवळच्या एका झाडाच्या फांदीवर दोन पत्र्याची लहान डबडी लटकवली होती. एका डब्यात पाणी आणि दुसऱ्या डब्यात मुठभर राळे ठेवले होते. कामगारांची ही संवेदनशीलता, कल्पकता आणि योजकता पाहून मी थक्क झालो!
विशेष म्हणजे ज्या ‘फाईव्ह एस’ या जपानी व्यवस्थापनतंत्राचा अवलंब करण्याचे धोरण कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारात राबवू इच्छित होती, ज्याचे प्रशिक्षण प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले होते त्या तंत्रातील सूत्रांचे तंतोतंत पालन या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले होते!
त्यांना हे तंत्र इथे अवलंबायला कोणी सांगितले? कोणी शिकवले? निसर्गातील सर्व जीवजंतू, वनस्पती, भूमि, जल, वायू, पर्यायाने आपले पर्यावरण या विषयी आमचे कर्मचारी इतके जागरूक, दक्ष आहेत? ‘हो, आहेत’, हेच या प्रश्नाचे उत्तर. समोर दिसतंय हे त्याचे एक उत्तम उदाहरण!
निसर्गातील सर्व प्रकारच्या जीवनशृंखला जपण्याविषयी ते पुरेसे जागरुक आहेत, गंभीर आहेत हे पाहून धन्य वाटले. कारखान्यातील तंत्रज्ञान, कौशल्ये इ. विषयात त्यांना प्रशिक्षित केले जाते. ती व्यवसायिक गरज असते. तसे आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कर्तव्ये, सुरक्षितता, समाज विकास इ. विषयी सुद्धा त्यांना प्रशिक्षित केले जाते हे आमच्या टाटा मोटर्सच्या प्रशिक्षण धोरणाचे वैशिष्ठ्य. हे त्यांना शिकवलेले ज्ञान खालपर्यंत झिरपत आहे हे सिद्ध करणारा हा प्रत्यक्ष पुरावा. प्रत्येकाला, पावलोपावली जे ज्ञान आणि भान दिले जाते, त्या ज्ञानाचा त्यांनी व्यवहारात केलेला हा उपयोग खरंच कौतुकास्पद होता.
मी त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांचे आभारही मानले कारण माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमात मलाही सहभागी होण्याची संधी दिली म्हणून!
पुढील दोन महिने माझे सर्व उत्साही सहकारी एखाद्या पहिलटकरीण लेकीची काळजी तिचे आई-वडील जशी घेतात तशी काळजी घेत होते त्या विहगयुगुलाची! त्या जोडप्याला कोणाचा जराही व्यत्यय होऊ नये म्हणून इतरांना तो रस्ताही तात्पुरता बंद केला त्यांनी. चक्क सूचनाच लावली त्या मार्गावर ” Entry prohibited”. ते स्वतःही सारे लांब उभे राहूनच काळजी घ्यायचे.
यथावकाश पक्षिणीने त्या घरट्यात चार अंडी घातली. दोघांनी आळीपाळीने ती उबवली. त्यातील तीन अंड्यातून पिले बाहेर आली. एक अंडे वाऱ्यामुळे खाली पडून फुटले. पुढील पंधरा-वीस दिवस हे पिलांचे भरण-पोषण-शिक्षणात गेले. काही दिवसात पिलांना पंख फुटले आणि एका रम्य सुप्रभाती चिवचिवाट करीत ती पिले घरट्यातून आकाशात आत्मविश्वासाने झेपावली!
ज्यांनी अथक परिश्रम घेऊन घरटे बांधले, त्यात आपला संसार थाटला, तीन पिलांना जन्म दिला, त्यांचे संगोपन करून जगायला सक्षम बनवले ते पक्षाचे जोडपे मात्र दुसऱ्या दिवसापासून अचानक दिसेनासे झाले. आम्ही कर्मचारी मित्रांनी दोन-तीन दिवस त्यांची वाट पाहिली. पण कोणीच फिरकले नाही!
साप्ताहिक सुटीनंतर कामावर आलो आणि आफीसमधे प्रवेश करताना सवयीप्रमाणे कॉरिडॉरच्या ‘त्या’ कोपऱ्याकडे लक्ष गेले. पण आता तर तो कोपराही रिकामा होता. शिडी आणि त्यावर उभारलेले घरटे अदृष्य झाले होते. फुलांच्या कुंड्या, साखळीचे कुंपण, जवळचा स्टँड, हे सारे उचलले गेले होते. खालची जमीन धुऊन पुसून स्वच्छ केली गेली होती. भिंतीवर एक नवीन पोस्टर चिकटवले होते. त्यावर लिहिले होते…
Project completed successfully!
Thanks to all team members for their active support and participation.”
साक्षी शहरात लहानाची मोठी झालेली, पण तरीही बऱ्यापैकी orthodox मुलगी. गावातल्या शेती सांभाळून नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न झालं, आणि साक्षी अधून मधून शेतावरही जायला लागली.
दिवसभर शेतात काम करणाऱ्या बायका पाहिल्या की राहून राहून तिला प्रश्न पडायचा – यांची बाळं दिवसभर आयांशिवाय कशी राहत असतील?
न राहवून एके दिवशी तिने हा प्रश्न शेतात काम करणाऱ्या एका बाईला विचारलाच. आणि तिचं उत्तर ऐकून अवाक झाली. “तुला माहितीये की ती बाळं आयांशिवाय दिवस – दिवस कशी राहतात ते? अग, त्या बायका त्या एवढ्याश्या मुलांना कप कप ताडी (दारू) पाजतात. मग काय दिवसभर ती लेकरं झिंगलेल्या गुंगलेल्या अवस्थेत रहातात.
जसजशी मुलं मोठी होतात, तशी आणखीन आणखी ताडी रिचवतात. बरं, आई वडिलांनी चार उपदेशाचे सल्ले सांगावेत, तर ते स्वत:च मुलांसमोर – आज काय आनंद झाला आहे म्हणून, तर उद्या दु:ख झालं म्हणून, नि परवा सहज म्हणून दारू पितात. मुलांना काय आदर्श रहाणार?
ही व्यसनं मुलांची आयुष्यं बरबाद करत आहेत. “
काळ वाटचाल करत राहिला.
नवऱ्याची नोकरी बदलल्यावर साक्षी त्याच्याबरोबर शहरात आली होती. तिलाही एक गोजिरवाणा मुलगा झाला होता आणि तो आता तेरा वर्षांचा – म्हणजे इंग्रजी परिभाषेत teen ager झाला होता. आज साक्षी, त्याच मैत्रिणीला, मुलगा सदैव कसा मोबाईल घेऊन बसला असतो ही तक्रार करायला फोन करत होती.
“अग, आल्या गेल्याशी सोड, आम्हा आई बाबांशीही बोलणं नाही. धड अभ्यासाकडे लक्ष नाही की खाण्याकडे. शाळेत जातो हे आमच्यावर उपकारच समज. घरी आला की मोबाईल सुरू.
रात्री कधी उठून पाहिलं तरी हा मोबाईलमध्ये डोस्कं खुपसून बसलेला असतो. रात्री झोपायला उशीर म्हणून सकाळी उठायला उशीर. चष्मा लागला आहे, मान दुखते म्हणतो.
या सगळ्याला तो जळला मोबाईल कारणीभूत आहे. आम्ही दोघंही त्याच्या कानीकपाळी ओरडत असतो – ठेव तो मोबाईल, जरा मैदानी खेळ खेळायला जा, जरा घाम तर येऊ दे. पण उपयोग शून्य. “
मैत्रिणीला साक्षीचेच जुने डायलॉग आठवले.
लहानपणी या मोबाईलचं व्यसन साक्षीनेच मुलाला लावले. त्याला दोन घास भरवायचे असले की ती त्याला मोबाईलवर व्हिडिओ लावून द्यायची. आपल्याला सीरिअल पहायची असली की त्याला मोबाईल गेम चालू करून द्यायची.
तोंडाने सांगायचं मोबाईल वापरू नकोस, पण या ना त्या कारणाने स्वतः साक्षी आणि नवरा, दोघेही खूप मोबाईल वापरायचे.
मग करोना काळात तर मुलांना, शाळेच्या बहाण्याने, मोबाईल वापरायचं परमिटच मिळालं. लेकाला स्वतंत्र मोबाईल घेऊन दिला गेला आणि मग तो जास्तच वहावत, जास्तच गुरफटत गेला.
“माझं ऐकशील का? , ” मैत्रीण साक्षीला विचारत होती. “पहिलेप्रथम तुम्ही दोघं नवराबायको आपला मोबाईल वापर मर्यादित करा. मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही तोंडाने त्यांना उपदेश करत असाल पण स्वतःच त्यात आकंठ बुडाले असाल, तर ही विसंगती मुलं पटकन ओळखतात.
मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम त्याला सांगा, समजावून द्या. त्याच्या झोपेची गणितं कशी बिघडली आहेत, आणि त्याने आरोग्य कसं बिघडलं आहे, ते दाखवून द्या.
Family time ठरवा, त्यात कोणी मोबाईल वापरणार नाही, एकमेकांशी गप्पा मारू असं ठरवा आणि अंमलात आणा.
हे सगळं एका दिवसात होणार नाही, पण सुरुवात तर करा. दारूचं व्यसन असो वा मोबाईलचं, ते सोडलं पाहिजे असं व्यसनी माणसाला स्वतःहून वाटलं पाहिजे.
पण याची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. लहान मुलाला गूळ खाऊ नकोस म्हणून उपदेश करण्यापूर्वी, स्वतः रामकृष्ण परमहंसांनी आठवडाभर गूळ खाणं सोडलं होतं, आणि मगच उपदेश केला होता.
व्यसन, मग ते दारूचं असो वा मोबाईलच्या अति वापराचं, दोन्हीही घातकच. ” समेवर येत मैत्रीण म्हणाली आणि साक्षीच्या विचारांना आणि तदनुसार कृतीला चालना देत, तिनं फोन ठेवला.
“आणि आपली बया बसलीये पाच वर्षांपासून घरी. किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. कंप्युटर इंजीनियर झाल्याझाल्या तिला चांगल्या कंपनीत नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, चारचौघात अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करतेय. तिला एवढं पॅकेज आहे. पण नाही, एकही अपेक्षा पोरीनं पुर्ण केली नाही ” विनायक उद्विग्न होऊन म्हणाला
” जाऊ द्या. अशीही आपल्याला काही तिच्या पैशांची गरज नाहीये “
” पैशाचा इश्यूच नाहीये माधवी. इतकं चांगलं शिक्षण घेऊनही तुम्ही त्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीये तर त्या शिक्षणाचा फायदाच काय? मग साधं बीए, बीकॉम केलं असतं तरी चाललं असतं. कशाला तिच्या शिक्षणासाठी आपण इतका पैसा खर्च केला असता? ” विनायक चिडून म्हणाला
” जाऊ द्या तुम्ही चिडू नका. शांततेने जेवून घ्या. आणि तिलाही काही बोलू नका. उगीच तुमचा बीपी वाढून जाईल “
” वाईट वाटतं गं! लोक विचारतात तेव्हा सांगायलाही लाज वाटते की माझी मुलगी घरीच बसलीये. कसलाच जाॅब करत नाहीये “
” मी परवाच तिला नोकरीबद्दल बोलले तर ती माझ्यावरच खवळली. ‘ तुम्हांला मी जड झाले असेन तर करुन टाका माझं लग्न ‘असं म्हणायला लागली “
” दुसरा पर्यायच काय ठेवलाय तिनं आपल्यासमोर? खरंच यावर्षी करुनच टाकतो तिचं लग्न ” विनायक उद्वेगाने म्हणाला
” नाहीतर काय! घरात बसूनही काय करते ती? सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. सदोदित तो मोबाईल घेऊन बसलेली असते. काय करते कुणास ठाऊक! आपण काही बोललो तर रुसून बसते. चारचार दिवस बोलत नाही “
“उद्यापासूनच तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करुया. आताच ती सव्वीस वर्षाची आहे. जास्त उशीर केला तर नंतर लग्न जमणंही कठीण होऊन बसेल. खरंतर आपण अगोदरच तिचं लग्न उरकून टाकायला हवं होतं. उगीच तिला नोकरी लागण्याची
वाट बघत बसलो “
” तिच तर म्हणत होती की ‘नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून ‘आजकालची मुलं म्हणे नोकरी करणारी मुलगीच पसंत करतात’असं तिचंच म्हणणं होतं “
“आता तिचं काहिही ऐकायचं नाही. चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं ” विनायक ठामपणे म्हणाला
दुसऱ्या दिवसापासून खरोखरच त्यानं वेगवेगळ्या शहरातल्या विवाह संस्था, मंडळात नयनाचं नाव नोंदवायला सुरुवात केली. आपल्या नातेवाईक, मित्रांना फोन केले. ‘मुलीचं यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुमच्या माहितीतलं चांगलं स्थळ सुचवा “अशी त्यांना विनंती केली.
काही दिवसांनी एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगा हैदराबादला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. नऊ
लाखाचं पॅकेज होतं. फोटोवरुन तरी चांगला दिसत होता. विनायकनं त्याची माहिती आणि फोटो नयना आणि माधवीच्या मोबाईलवर पाठवले. पण दोघींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोन दिवसांनी त्यानंच माधवीला विचारलं.
“मी ते स्थळ पाठवलं होतं ते तुम्ही दोघींनी बघितलं नाही का? “
” बघितलं. नयना नाही म्हणतेय “
” का? सगळं तर चांगलं आहे “
” तिचं नेहमीचंच कारण. नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणे “
” बोलव तिला ” विनायक संतापून म्हणाला
माधवीनं नयनाला तीनचार हाका मारल्या पण तिनं प्रतिसाद दिला नाही. शेवटी माधवी उठून तिच्या खोलीकडे गेली आणि तिला घेऊन आली.
“काय बाबा? “
“काय करत होतीस? तुझ्या आईनं इतक्या हाका मारल्या. ऐकू नाही आल्या? “विनायकनं रागाने विचारलं
“काही नाही. गाणी ऐकत होते. कानात ईअर फोन होते म्हणून ऐकू आलं नाही “
” बरं. मी ते स्थळ पाठवलं होतं, त्याला तू नाही म्हणतेय म्हणे “
” हो. मी मागेही तुम्हांला सांगितलं होतं की मला नोकरी लागल्याशिवाय लग्नच करायचं नाही म्हणून “
“मला एक सांग. तू इथे नोकरी करुन काय उपयोग? मुलगा जर दुसऱ्या शहरात असेल तर तुला इथली नोकरी सोडावीच लागणार ना? “
” हो बरोबर. पण आजकालच्या मुलांनाच नोकरी करणारी मुलगी हवी असते. नोकरी करणाऱ्या मुली स्मार्ट, हुशार आणि जगासोबत चालणाऱ्या असतात असं त्यांना वाटतं. अशा मुलींना जास्त पॅकेजेसची मुलं मिळतात “
” पण या मुलाची तर मुलगी नोकरी करणारीच हवी अशी काही अट नाहिये “
” हो. पण मग त्याला पॅकेजही तर कमीच आहे “
“नऊ लाखाचं पॅकेज कमी आहे? “विनायकनं आश्चर्याने विचारलं “तुला माहित नसेल बेटा की मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मला फक्त तेराशे रुपये पगार होता. हातात फक्त नऊशे-साडेनऊशे रुपये पडायचे. आमचं लग्न झालं तेव्हाही मला फक्त साडेतीन हजार पगार होता. तुझी आई श्रीमंत घरातली होती तरीसुद्धा तिच्या वडिलांनी फक्त माझी सरकारी नोकरी आणि आमचं घराणं पाहून आमचं लग्न लावून दिलं. आणि नंतरही आम्हांला कधी पैशांची चणचण भासली नाही. आज तीस वर्षाच्या नोकरीनंतरही माझं पॅकेज सोळाच लाख आहे. त्यामानाने या मुलाचं पॅकेज सुरुवातीलाच एकदम छान आहे. आणि ते पुढेही वाढू शकतं “
” तुमचा काळ वेगळा होता बाबा. आता महिन्याला एक लाखही पुरत नाहीत “
” तुम्ही स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला तर महिन्याला पाच लाखही पुरणार नाहीत. व्यवस्थित मॅनेज केलं तर तीसचाळीस हजारातही महिना आरामात पार पडतो. तुझ्या दिलीपकाकाचंच उदाहरण घे. फक्त चाळीस हजारात व्यवस्थित घर चाललंय. मुलं महागड्या काॅलेजमध्ये शिकताहेत. खाऊनपिऊन सुखी आहेत. कधी पैसा पुरत नसल्याची तक्रार नसते. बरं जाऊ दे तुला जर नोकरीच करायची होती तर तू आतापर्यत काय केलंस? पाच वर्षं झालीत तुला इंजीनियर होऊन. तुझ्या सगळ्या मैत्रिणी नोकरीला लागल्यात म्हणे. मग तुलाच का नोकरी लागत नाहिये? “
नयनाचा चेहरा पडला. हळू आवाजात ती म्हणाली
” करतेय मी प्रयत्न पण कुठे जागाच निघत नाहीये त. आणि बाबा मी दोनदा केलीये नोकरी. अगदीच काही घरात बसून नव्हते. “
“बरोबर. पण ती किती महिने केलीस? त्या सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये तीन महिने आणि सायबर सोल्यूशन्समध्ये दोन महिने. खरं ना? “
” मग काय करणार? तिथं एक तर पगार कमी आणि हॅरॅसमेंटच इतकी होती की एकेक दिवस काढणं मला मुश्कील झालं होतं “
” बेटा नोकरी म्हंटलं की तिथं थोडीफार हॅरॅसमेंट असणारच. माझंच बघ. सरकारी नोकरी असूनही माझी ऑफिसमधून यायची वेळ नक्की नसते. बारा बारा तेरातेरा तास ड्युटी होऊन जाते. कधीकधी रविवारी, सुटीच्या दिवशीही ऑफिसला जावं लागतं. सततच्या मिटिंग्स्, काॅन्फरन्सने जीव वैतागून जातो. वरुन सिनीयर्सच्या शिव्या खाव्या लागतात त्या वेगळ्या च. सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असंच असतं कारण सगळ्यांवरच प्रेशर असतं. मलाही बऱ्याच वेळा वाटतं की सोडून द्यावी नोकरी. मस्त आराम करावा पण मी तसं करु शकत नाही ” विनायक तिला समजावत म्हणाला
” तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. तुम्हांला नोकरी सोडून कसं चालेल? आणि माझं चालू आहे नोकरी बघणं. नोकरी लागली की बघा मला मोठमोठ्या पॅकेजेसच्या मुलांची स्थळ चालून येतील “
” फक्त पॅकेजच महत्वाचं असतं का बेटा? मुलाचं घराणं, त्यातली माणसं, मुलावरचे संस्कार हे तुला महत्वाचे वाटत नाही का? आणि फार श्रीमंत घर कधीच नको. तिथे बऱ्याचदा बायकांना बरोबरीने वागवलं जात नाही. त्यांच्या मताला किंमत दिली जात नाही “
” असेलही तसं. पण आजकालच्या मुलींना हँडसम आणि श्रीमंत मुलगाच नवरा म्हणून हवा असतो “
” चुकीचं आहे ते. बरं जाऊ दे. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहिये. महिनाभर आम्ही थांबतो. तोपर्यंत तुझ्या नोकरीचं जमलं तर ठिक नाहीतर चांगलं स्थळ आलं तर तुला लग्न करावंच लागेल “
” बाबा एका महिन्यात मला कशी नोकरी लागेल? एक वर्ष तरी थांबा “नयना काकुळतीने म्हणाली
” नाही. तुझ्या नोकरीची वाट बघताबघता पाच वर्षं निघून गेली आहेत. जास्त उशीर केला तर तू थोराड दिसायला लागशील. आणि मग थोराड दिसणाऱ्या मुलाशीच तुला लग्न करावं लागेल “
” मला कुणी समजूनच घेत नाही ” नयना संतापून रडायला लागली “ती आई तशीच आणि तुम्हीही तसेच
. सारखे मागे लागतात. मनासारखं काही करुच देत नाहीत “
☆ “जबाबदार कोण? पालक की मुले?” ☆ श्री जगदीश काबरे ☆
भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची वैयक्तिक निवड नसून ती कुटुंब, परंपरा, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यतेशी घट्ट जोडलेली संस्था आहे. म्हणूनच “मला लग्न करायचं आहे की नाही, कधी करायचं आहे, कुणाशी करायचं आहे” हे प्रश्न वैयक्तिक असले तरी त्यांची उत्तरं अनेकदा व्यक्तीपेक्षा कुटुंब आणि समाज ठरवतात. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की अत्यंत उच्चशिक्षित, परदेशात काम करणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणसुद्धा विवाहासारख्या निर्णयात पूर्ण स्वायत्तता घेत नाहीत. यामागे केवळ परंपरेचा दबाव नाही, तर भावनिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचे घटकही गुंतलेले आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्थेची रचना ही सामूहिक आहे. म्हणजेच व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित, सन्मान आणि एकात्मता यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाचा निर्णय घेताना “माझं आयुष्य” यापेक्षा “आपल्या घरचं काय? ” हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांगड अशी धारणा असल्याने, निर्णय प्रक्रियेत पालकांचा हस्तक्षेप ‘हक्काचा’ मानला जातो. अशा वातावरणात स्वतंत्र निर्णय घेणे बंडखोरी वाटू शकते. परिणामी, मुलं स्वतःहून लग्न ठरवण्याऐवजी कुटुंबाच्या मान्यतेची वाट पाहतात किंवा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवतात.
यात आर्थिक मानसशास्त्राचाही मोठा वाटा आहे. लग्न हा भारतीय संदर्भात केवळ सोहळा नसून तो एक मोठा आर्थिक प्रकल्प असतो. हॉल, जेवण, कपडे, दागिने, पाहुणचार, या सर्वांचा खर्च प्रचंड असतो. परंपरेने हा खर्च पालकांनी उचलायचा असतो, आणि अनेक वेळा तो “प्रतिष्ठेचा प्रश्न” बनतो. त्यामुळे मुलगा-मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी “हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे” ही धारणा त्यांच्या मनात कायम राहते. स्वतःच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणे म्हणजे केवळ पैसे देणे नाही, तर त्या खर्चामागील सामाजिक अपेक्षा, नातेवाईकांचे समाधान, प्रतिष्ठेचे गणित यांची जबाबदारी घेणे होय; आणि ही जबाबदारी घेण्यास अनेक जण मानसिकदृष्ट्या तयार नसतात. याशिवाय भावनिक अवलंबित्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय समाजात मुलांना लहानपणापासूनच “तुमच्यासाठी आम्ही आहोत” अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा पालकांच्या अनुभवावर अवलंबून राहण्याची सवय लागते. लग्नासारख्या मोठ्या निर्णयात चूक झाली तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील, ही भीतीही असते. म्हणूनच “आई-वडिलांनी ठरवलेलं सुरक्षित” अशी मानसिकता तयार होते. हा केवळ भीतीचे परिणाम नसून, ती एक प्रकारची सामाजिक कंडिशनिंग आहे.
सामाजिक दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचे राजकारणही या प्रश्नाच्या मागे दडलेले आहे. “लोक काय म्हणतील? ” हा भारतीय मानसिकतेचा केंद्रबिंदू आहे. मुलगा किंवा मुलगी स्वतः लग्न ठरवतात, विशेषतः आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय, तर कुटुंबावर टीका होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अनेक वेळा पालक स्वतः पुढाकार घेतात आणि मुलांनाही तसेच करण्यास भाग पाडतात. परिणामी, व्यक्तीची स्वायत्तता दुय्यम ठरते आणि सामाजिक मान्यता प्राथमिक ठरते. मुलं स्वतःहून लग्न का ठरवत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे निर्णयक्षमता विकसित न होणे. आपल्या शिक्षणपद्धतीत करिअर, स्पर्धा, नोकरी यावर भर दिला जातो; पण जीवननिर्णय, नातेसंबंध, भावनिक परिपक्वता याबाबत मार्गदर्शन कमी असते. त्यामुळे एखादी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असली तरी वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्यात ती गोंधळलेली असू शकते. यामुळे “कुटुंब ठरवेल” हा सोपा मार्ग निवडला जातो.
ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर मानसिक स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक असते. जेव्हा व्यक्ती “माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेईन आणि त्याचे परिणामही मी स्वीकारेन” अशी भूमिका घेते, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. काही शहरी भागात, विशेषतः नव्या पिढीत, हा बदल दिसू लागला आहे. लव्ह मॅरेज, साधे विवाह, कोर्ट मॅरेज, स्वतः खर्च उचलणे यासारख्या प्रवृत्ती वाढत आहेत. पण हा बदल अजूनही मर्यादित आहे, कारण परंपरा आणि सामाजिक अपेक्षा अजूनही मजबूत आहेत. शेवटी, हा प्रश्न मुलं जबाबदारी का घेत नाहीत, इतकाच नाही तर समाज त्यांना तसे करू देतो का, हाही आहे.
अन्यायाची होण्याची जाणीव असताना व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील निर्णायक टप्प्यांवर, विशेषतः विवाहासारख्या निर्णयात, स्वतःची जबाबदारी का घेत नाही? हा प्रश्न केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या मानसिक रचनेवर प्रकाश टाकणारा आहे. कारण येथे “जबाबदारी घेतली नाही” हा निष्कर्ष जितका महत्त्वाचा आहे, तितकाच “घेऊ दिली गेली का? ” हाही प्रश्नही महत्त्वाचा आहे. या दोन स्तरांमधील ताण समजून घेतल्याशिवाय संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांची सामाजिक घडण अशी झाली आहे की, आज्ञाधारकता, कुटुंबनिष्ठा आणि समायोजन हाच त्यांच्या चांगुलपणाचा निकष ठरवले गेला. त्यामुळे विवाहाच्या बाबतीत स्वतःची निवड मांडणे हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, कुटुंबाच्या अपेक्षांना आव्हान देणारे पाऊल ठरते. अशा वेळी “आई-वडिलांसमोर काही चाललं नाही” ही फक्त सबब नसून, ती एक सामाजिक वास्तवाची अभिव्यक्ती आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारा आत्मविश्वास ही गोष्ट केवळ वैयक्तिक इच्छेवर अवलंबून नसते; ती दीर्घकाळाच्या संस्कारातून, संधींमधून आणि सामाजिक पाठबळातून विकसित होते. म्हणूनच अनेक स्त्रिया उच्चशिक्षित असूनही, निर्णायक क्षणी स्वतःची भूमिका ठामपणे मांडू शकत नाहीत.
सामाजिक बंधनांमध्ये अडकलेली व्यक्ती अनेकदा त्या बंधनांना स्वीकारून बसते आणि आपल्यावर अन्याय सहन करत असते. यालाच मानसशास्त्रात संस्कारातील गुलामी मान्य करणे म्हणतात. म्हणजेच बाह्य दडपण हळूहळू व्यक्तीच्या आतल्या विश्वासाचा भाग बनते. परिणामी, ती स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेते, स्वतःच्या निवडीवर विश्वास ठेवत नाही आणि सुरक्षिततेच्या नावाखाली पारंपरिक मार्ग स्वीकारते. येथे अन्याय केवळ बाहेरून होत नाही, तर तो आपल्या अंतर्गतही होत राहतो. तथापि, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांसारख्या समाजसुधारकांनी स्त्रीला स्वओळख, शिक्षण आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचा जो प्रयत्न केला, तो पूर्णपणे समाजात झिरपला नाही, हेही वास्तव आहे. यामागे केवळ स्त्रियांची उदासीनता कारणीभूत नाही, तर त्या विचारांना प्रतिकार करणारी सामाजिक रचना अजूनही टिकून आहे. शिक्षण मिळालं तरी निर्णयस्वातंत्र्य मिळेलच असं नाही, कारण घरातील सत्तासंबंध, आर्थिक अवलंबित्व, आणि कुटुंब तुटेल या भीतीमुळे अनेक स्त्रिया तडजोडीचा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे स्वातंत्र्याची जाणीव आणि स्वातंत्र्याची अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी निर्माण होते.
आजची पिढी अशा लग्नाला “डिसफंक्शनल मॅरेज” म्हणून ओळखू लागलेली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. कारण आधी जे ‘नॉर्मल’ मानलं जात होतं ते भावनिक तुटलेपण, संवादाचा अभाव, केवळ सामाजिक बंधन म्हणून टिकवलेलं नातं आता प्रश्नांकित होत आहे. त्यामुळेच अनेक तरुण-तरुणी विवाहाबद्दल अधिक सजग झाले आहेत आणि “आपण हा अन्याय स्वतःवर होऊ देणार नाही” अशी भूमिका घेऊ लागले आहेत. या बदलामुळेच घटस्फोटांचे प्रमाण वाढताना दिसते. पण वाढते घटस्फोट हा कुटुंब संस्थेच्या अपयशाचा निर्देशक आहे की असमानतेला नकार देण्याचा प्रयत्न आहे, याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे फक्त आजच्या पिढीला दोष देणं सोपं असलं तरी ते अपुरं आहे. कारण जेव्हा पिढ्यानुपिढ्या असमानतेवर आधारलेली विवाहसंस्था उभी केली जाते, तेव्हा तिच्या परिणामांना सामोरं जाताना संघर्ष अपरिहार्य असतो. आजचे तरुण-तरुणी समतेची अपेक्षा करतात, भावनिक सुसंवाद शोधतात आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रयत्न करतात. जर ही अपेक्षा पूर्ण होत नसेल, तर ते नातं तोडण्याचा निर्णय घेतात. हा केवळ ‘अधीरपणा’ नाही, तर ते मूल्यांमध्ये झालेल्या बदलाचे लक्षण आहे.
मग विवाहसंस्थेचा सुकाणू पारंपरिक असमानतेकडून समतेच्या आणि मानवतेच्या मूल्यांकडे वळवायचा का? याचे उत्तर समाजाच्या सामूहिक इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. जर पालक अजूनही मुलांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा आग्रह धरत राहिले, तर नवीन पिढीशी संघर्ष वाढणारच. उलट, जर त्यांनी मुलांना निर्णयक्षम बनवले, त्यांच्या निवडीचा आदर केला, आणि समतेच्या मूल्यांना पाठिंबा दिला, तर विवाहसंस्था अधिक सुदृढ आणि अर्थपूर्ण होऊ शकते. म्हणून प्रश्न दोषारोपाचा नसून जबाबदारीच्या पुनर्वाटपाचा आहे. स्त्रिया, पुरुष, पालक आणि समाज, सर्वांनी मिळून विवाहाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. समता, स्वातंत्र्य आणि परस्पर सन्मान या मूल्यांवर आधारित नातेसंबंध निर्माण झाले, तरच विवाहसंस्था टिकाऊ आणि समाधानकारक ठरेल. अन्यथा, असमानतेवर उभी असलेली कोणतीही रचना कितीही परंपरेच्या आधारावर टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी ती आतून पोखरलेलीच राहील. जोपर्यंत कुटुंब आणि समाज व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत मुलं पूर्ण स्वायत्ततेने लग्न ठरवतील आणि पार पाडतील अशी अपेक्षा वास्तववादी ठरणार नाही. ज्या प्रमाणात व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारेल आणि कुटुंब त्या स्वातंत्र्याला मान्यता देईल, त्या प्रमाणात भारतीय विवाहसंस्थेची मानसिकता बदलत जाईल, हेच खरे नाही का?
तुम्ही खूप छान लिहाल हो.. चार लोकांनी वाचलं पाहिजे ना? हां बरोबर आहे… चार लोक फार महत्वाचे असतात. चार या संख्येला अत्यंत महत्त्व आहे. ते चारधाम चार वेद हे मी सांगणार नाही माझा विषय जरा वेगळा आहे आणि वेगळा विषय मांडला ही आपली खासियत आहे. चार याबद्दल आपण काय काय बोलतो बघा
लहानपणी आपण ऐकत होतो… अरे चार मुलं बघ ती कशी वागतात तस आपण करावं वागावे वर्गामध्ये चार चांगल्या मुलांची संगत धर… चार चांगली पुस्तकं…
वाच चार बुक शिकला तर जीवनाचे कल्याण होईल
नाही समजलं तुला तर चार लोकांना विचारवं
इथपासून प्रवास सुरू होतो मग कधी कधी असं ऐकायला लागतं
चार चौघा जणांसारखा वाढवलं नाही तुम्हाला पाहिजे ते प्रत्येक वेळी देत गेलो म्हणजे यांनी खूप थाटात वाढवले आपल्याला…
लक्षात घ्या पुढे आपण हळूहळू मोठे मोठे होत जातो
अरे घरात गोष्टीत लक्ष घाल तुला काय स्वातंत्र्य दिलय का? … चार माणसाची चर्चा करावी चार माणसांचा विचार घ्यावा मग पुढे पाऊल टाकावं… कुठल्यातरी चार फालतू मुलांमध्ये हिंडू नकोस…
अजून एक सूचना चार चार दिवस घराबाहेर जातो जातोस कुठे?
अरे बापरे हे मात्र अवघड आहे बर का… “अहो चार दिवस झाले मी ओरडते तुम्हाला गॅस संपतआलाय, संपत आलाय गॅसला नंबर लावा… तुमचं महिला कुठे लक्षात नसतं घरात मेलीने मी एकटीने मरायचं”
अगं कशी चालली आहेस… लग्नाला चाललीस ना… अंगावर दागिने घालावेत… चार लोक आम्हाला नाव ठेवतील…
चार माणसात कसं उठवून दिसायला पाहिजे आमची मुलगी चारचौघेत ऊठून दिसेल अशी आहे ईति वधू पिता अर्थात हे पूर्वी होतं…
चार हात कामाला लागले तर बघता बघता कामा संपतात एकमेका साहाय्य करू हा मंत्र…!
दोनाचे चार हात झाले की सुटले बाई मी एकदाची… वैतागलेली आई!
घरात भांडण झाल्यावर समजूतीच्या चार गोष्टी सांगताना, “चार भिंतीच्या आत गोष्टी आहे तोवर बरं असतं लोकांना काय त्या भिंतीनाही कान लावून लोक ऐकतात लक्षात ठेवा “अनुभवी सूचना
घरातल्या कर्त्याची सूचना तुझ्यापेक्षा चार पावसाळी जास्त पाहिलेत आम्ही… धाक! कार्ट बेरकी ते म्हणाल ते सगळे दुष्काळी होते.
चार पैसे कमवून आणायची अक्कल नाही निघालेत आम्हाला सांगायला पैसे मागितले की सुरुवात म्हणून मिळेल ते काम बघून पैसे कमवावे स्वतःच्या दोन पायावर उभे राहावे
आयुष्यात चार माणसे जोडून घेता आली नाहीत कुणाशी न पटलेल्या माणसाबद्दल बोलताना हे वाक्य
हमखास
चार चाकी गाडी घ्यायचे माझे स्वप्न होते ते माझ्या मुलाने पूर्ण केले हो मध्यमवर्गीय कृतार्थ बाप
आजी… अग हातात चार बांगड्या घालाव्यात बाळा बाईच्या जातीला असे भुंडे हात शोभत नाहीत.
भाऊसाहेब रिटायर झाला पण सगळं देऊन बसू नका चार पैसे आपल्या कनवटीलाठेवा… नटसम्राट सल्ला
एकत्र कुटुंब पद्धतीतला घरातला मोठा माणूस काका वगैरे… “चारचौघात आमचं नाक कापलं जाईल असं काही करू नका म्हणजे झालं शिकायला हरकत नाही पण नको ती थेर घरात नकोत.
काही परदेशात वगैरे जायला नको चार चौघासारखा आयुष्य जगा समाधानाने आपल्या देशात राहा वडीलकीचा सल्ला
एकदा एका सुनेला सासू म्हणाली अगं चार बायकां सारखं रहावं आपण..! हे असले कपडे… कुंकू न लावणं… मंगळसूत्र मनगटाला बांधायला शोभत नाही…! त्यावर सून म्हणाली, “सासुबाई मी पाचवी बाई आहे ती आता जरा समजून घ्या चाराच्या पलीकडे जरा जाऊ द्या ना गाडी हाय का नाही गंमत
शेवटी चार माणसे येतील एवढे तरी चांगलं वागा बाबांनो एक सामाजिक वाक्य
बाहेर चार माणसं तर विचारतात का आणि घरात आमच्या डोक्यावर मिरे वाटतात मनातल्या मनात म्हणाले जाणारे वाक्य
काळजी आणि प्रेमापोटी पण वैतागलेला मुलगा… “बाबा चार लोकात जा जरा बसा बरं वाटेल तुम्हाला. घरात काय वाचता टीव्ही बघता… इत्यादी इत्यादी
असो अशा अनेक गोष्टी आहेत यामध्ये चार चा उल्लेख असतो तो का हे मला खूप दिवस कळले नव्हते आता तुम्हाला उत्सुकता मग आता कळले आहे का? थोडे पुढे जाऊयात
मी गणिताची शिक्षिका… एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. दोन बिंदूतून एकच रेषा जाते. तीन बिंदू एक प्रतल निश्चित करतात म्हणजे सपाट पृष्ठ भाग… या साठी एसएससी बोर्डाच्या पेपर मध्ये पूर्वी आठवा प्रश्न टॅलेंट क्वेश्चन म्हणून असायचा त्यामध्ये विचारलं होतं सायकल ला स्टॅन्ड का लावतात? त्याचं उत्तर असं होतं की गोल चाकाचा टेकलेला एक एक बिंदू अधिक त्याच एक बिंदू दोन नुसत्या चाकावर सायकल उभी राहू शकत नाही पण स्टॅन्ड लावला की तिसरा बिंदू मिळतो आणि प्रतल निश्चित होते आणि स्टॅन्ड वर सायकल उभी राहते म्हणजे प्रतल निश्चितेसाठी तीन बिंदू लागतात.. इत्यादी इत्यादी… पण प्रतल निश्चितीसाठी तीन बिंदू लागत असले तरी ते बॅलन्स होण्यासाठी चार बिंदू गरजेचे असतात म्हणजे पलीकडच्या बाजूला जर अजून एक स्टॅन्ड लावला तर सायकल तिरकी उभी राहणार नाही ती सरळ उभी राहिल. मग सायकल सरळ उभी राहण्याचे स्टॅन्ड सुद्धा बाजारात मिळत होते ते पाठीमागच्या टाका चाकाला पायाने सरकून लावायचे असावयाचे. म्हणजे चार मुळे समतोल साधला जातो.
याचे एक उदाहरण मी एका मुलाखतीचा ऐकलं होतं मुलाखत होती सलीम जावेद या सुप्रसिद्ध लेखकाच्या जोडी पैकी सलीम यांची त्यांनी सांगितले की डायलॉग लिहिताना त्या वाक्यांमध्ये शब्दांचे समतोल साधणे अत्यंत गरजेचे असते तरच ते डायलॉग ठळकपणे लोकांच्या लक्षात राहतात याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले होते की दिवार मधला डायलॉग
मेरे पास माँ है… हा लिहिताना त्यांनी लिहिले होते मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है? इती अमिताभ… मेरे पास मा है शशी… मेरे पास मा है याला वजन येईना मग त्यांनी ऍड केलं… “मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है तुम्हारे पास क्या है? “मग शशी कपूर शांतपणे म्हणतो, ” मेरे पास माँ है” प्रेक्षकांची शिट्टी आणि टाळ्या!
एका बाजूला तीन शब्द एका बाजूला एक त्या चार शब्दांमुळे त्या संपूर्ण डायलॉग ला वजन आलं आणि तो अजरामर झाला तर असं शब्दांना वजन आम्हाला द्यावं लागतं त्याचा बॅलन्स साधावा लागतो. हे सलीमजीने अनेक उदाहरण देऊन फार छान सांगितलं होतं
*
मला वाटतं हे चार माणसं काय म्हणतील? चार लोकांचा विचार घ्या… , चार माणसे तरी शेवटी येणार का? इथे सुद्धा बॅलन्सच असावा म्हणून नेहमी आपण चार आकडा वापरतो असे मला वाटते… बघा ना तुम्ही म्हणून बघा… सहा माणसं काय म्हणतील? … पाच माणसं तरी येतील का? … आठ माणसात आमच्या अब्रू घालू नको… मजा नाही यात… जे चार मध्ये आहे! अशा खूप गोष्टी आहेत. आठवा बघा आणि लिहा. चार माणसं वाचतील अशा अपेक्षांनी लिहले आहे पटलं तर घ्या आणि चार जणांना पुढे पाठवा…!