श्री अशोक ल. देशपांडे
मनमंजुषेतून
☆ “आबई” ☆ श्री अशोक ल. देशपांडे ☆
जन्मांध आबई ही गावकऱ्यांची आधार होती आदिवासी समाजाची प्रनिनिधी. एकटीच. नाही म्हणायला मुंगशी नावाची एक गोरीभराड बहिण, तीचा नवरा दगड्या व त्यांचं एक अपत्य ‘ मानीक ‘ हा आबईचा गणगोताधार होता. सबंध उमरी गावं आबईची काळजी वहात होता.
आबईच्या हातात काठीचा आधार फार उशीरा आला. मारोतीच्या पारासमोर एका खोपटात ती एकटी रहात होती. समोरच असलेल्या बिन-खिराडीच्या (चाकाच्या) विहीरीवर ही रात्री सुद्धा बिनदिक्कत पाणी भरायची. स्वतःची भाजी भाकर स्वतःच करायची.
दळण कांडण हा तीचा मुख्य धर्म होता. त्याची मजुरी हीच तीची मिळकत. ही मजुरी पैशाच्या तसेच वस्तुरुपानं तर कधी भाजी भाकर तर चहा अशा अनेक स्वरुपात असायची. अर्थात ‘चहा’ हा काही मजुरीचा भाग नसायचा तसेच तीला खाऊ घालणं हे देखील मजुरी म्हणून नसायचे. अर्थात उमरी गावानं तीला सांभाळून घ्यावं हीच तीची अपेक्षा नव्हे पण भावना असावी.
त्यावेळी गावाल चक्की (पीठाची गिरणी) नुकतीच सुरु झाली होती. त्यापूर्वीपासून व चक्की सुरु झाली तरी आबईच्या पाठचे दळण कांडण काही सुटले नाही. सपीट, ज्वारीच्या कण्या, बाजरीच्या कण्या, बेसन (चून), भाजलेले तांदूळ, भरडा, उडीद – मुगाच्या डाळी दळून भरडून देणे.
या अव्याहत कामानं आबईचे हात सतत गुंतलेले असत. आज काय पाटलीनबाई कडे तर उद्या काय पांडेबुवाकडलं तर परवा काय महादूमाळया कडलं असा तीचा संचार असायचा. दुपार झाली की कामाच्याच ठिकाणी तीची थोडी विश्रांती असायची. दुपारचा चहा झाला की परत जात्याची घरघर, खलबत्याचा खणखणाट, तर कधी उखळातील मुसळासोबतची धपधप. घरच्या मिरच्याचं तीखट व विकतच्या हळकुंडा ची हळद हा ही प्रकार तीच्या नित्यकर्माचा भाग होता. अर्थात हे प्रकार वर्षातून एकदा किंवा दोनदा होत असत.
आबई ने लुगडं कधी विकत घेतलं नसावं. पाटील पांडे बुवा कडील बायकांची जुनेरं तीच्या कामी येत असत.
काळा म्हणता येईल असा वर्ण, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा कधी तरी डोक्याला लागलेले खोबरेल तेल, अंध असल्याने तीक्ष्ण असेलेले कान, गावातील प्रत्येकाच्या आवाजावरून माणूस ओळखण्याची प्रचंड क्षमता, अंगावर जुनेर, डोक्यावरून नीट पदर घेतलेली, गावचे तीन चारच रस्त्ये पाठ असलेली, कुणाचाही आधार न घेता कामाच्या ठीकाणी पोहचणारी, गावाच्या कुत्र्याच्याही ओळखीची असलेली आबई-हळूवार पायाने गंतव्य स्थानी सुखरूप पोहचणारी व दिवेलागणीच्या ठीक आधी परत एकटीच आपल्या झोपडीत विसावणारी अशी विलक्षण, सर्वांच्या जीवनाची अविभाज्य भाग असलेली.
आम्ही पोरं तिच्या समोर उभे राहून “मला ओळखलं का व आबये’ असं मुद्दाम विचारित असू “.. आम्ही वर्षभर यवतमाळला शिक्षणाकरीता रहात असू, सुट्यात घरी आलो की कुतुहलाने हा प्रश्न आबईला हटकून विचारित असू. ती लगेच म्हणायची ” मले का म्हाईत न्हाई काय रे असोक ” तसेच विलास ला सुद्धा. माहेरपणाला आलेल्या पोरींचा आवाज ऐकला की ” सुमनबाई कवा आली? ” ‘ईमलबाई कवा आली ” असं म्हणायची.
सतत कष्टरत असलेल्या आबईला “पांडुरंग प्रिय होता. पण अंध, असहाय्य अशा तीला पंढरपूरची ओढ लागून काय उपयोग होता? तीला ती यात्रा व दर्शन कोण घडविणार? पण नित्यनेमाने पंढरपूर यात्रा करणारे, सात्वीक प्रकृतीचे, अत्यंत साधे भोळे असे आमच्याच गावचे “महादू माळी ‘’, ह्यांनी ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली व इतरही गावकऱ्यांना सोबत घेऊन एकदा आबईला विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले.
आबई ने हातातील हार पांडुरंगाकडे दूरुनच फेकला व आश्चर्य असे की तो हार पांडूरंगाच्या गळ्यातच पडला. आबईला महादजी म्हणाले, “बरुबर पडला व माय तुहा हार पांडूरंगाच्या गळ्यात “.
आबई, कृतकृत्य झाली. जे कधीही घडणे संभव नव्हते ते घडले होते. आबईचा चेहरा शेवटपर्यंत ह्या दर्शनाने प्रसन्नच होता.
– — – हाच उजळ चेहरा घेऊन आबई आपल्या गावी परतली होती.
© श्री अशोक ल. देशपांडे
अमरावती
मो. 92257 05884
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





