श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पन्नाचा हिरा!” ☆ श्री संभाजी बबन गायके

रक्त उपलब्ध होत नाही तोवर शस्त्रक्रिया करणे अशक्य होतं. आज तिसरा दिवस. नऊ वर्षांच्या संतोषची प्रकृती आता अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचली होती.

संतोष पटेल चे वडील बांधकाम कारागीर तर आई शेतमजूर. मोठ्या बहिणीच्या लग्नात आई-वडिलांनी जमा केलेली पुंजी खर्ची पडलेली. छोट्या संतोषच्या शारीरिक तक्रारींकडे लक्ष द्यायला पोट भरण्याच्या लढाईत गुंतलेल्या वडिलांना फुरसत नव्हती. ते लोकांची घरं उभारून देत, पण स्वत:ला एक साधं छप्पर मिळवू शकलेले नव्हते निम्मं आयुष्य संपलं तरी. बांधकाम नसेल तेंव्हा विहिरी खोदून देण्याचं जोखमीचं काम करावं लागायचं…. अनेकदा विहिरी ढासळत, पण सुदैवाने डोक्यावर दगड नाही पडला. हात-पाय तर किती तरी वेळा जायबंदी झाले त्याची गणना नाही. आई शेतमजुरी करायची. आणि या दोघांनी मिळून जरा बरी कमाई केली की घरात तांदूळ यायचा. अन्यथा पुढचे दिवस गव्हाची भरड, आणि ती संपली की ज्वारीच्या कण्या… यावर गुजराण करावी! मजुरी आणि अर्धा एकर कोरडवाहू जमीन यापेक्षा जास्त नाही देऊ शकत!

संतोष अभ्यासात हुशार होता, पण आळस करी. मग आई त्याला झाडाला बांधून चोप देई… म्हणे…. या गरीबीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे…. शिक्षणाचा!

पोरगं आठवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिलं आलं तेंव्हा आई-वडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९२% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तरीही पुढील शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न होताच. मग बांधकामावर विटा वाहणे आणि अशी अन्य कामे करून संतोष थोडाफार हातभार लावत होताच.

पुढे इंजीनियरींगसाठी भोपाळमध्ये आल्यावर भाजीवाल्याने मोफत दिलेल्या भाजीवर दिवस काढले. कुणीतरी मार्केटिंग मध्ये खूप पैसे आहेत, असे सांगितल्यावर तिकडे मोर्चा वळवला… आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. यावर आईने अशी काही खरडपट्टी काढली की विचारता सोय नाही! त्या माऊलीने गरिबीशी पैंज लावली होती….. मी नाही जिंकू शकले…. माझा मुलगा जिंकून दाखवेल तुझ्या विरोधातली लढाई!

— आईच्या शब्दांनी पुन्हा मार्गावर आणले खरे पण नोकरी काही मिळेना. वडील म्हणाले… घरी येऊन जनावरं सांभाळ, शेतात लक्ष घाल. बांधकामे तर मिळतात मला अजूनही…. मदतीला आलास तर चांगला रोजगार मिळेल!

गाव गाठलं. योगायोगानं वन विभागात रखवालदाराची तात्पुरती नोकरी मिळाली….. आणि तिथे अभ्यासाला वाव होता. जंगलातली शांतता आणि साहेब लोकांच्या निवासस्थानाबाहेरच्या दिव्यांचा प्रकाश…. मार्ग सापडला. मध्य प्रदेश पब्लिक सर्विस कमिशनची (MPPSC) ची परीक्षा दिली… एकट्याने अभ्यास करून. केवळ चार गुणांनी पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला… आणि मग आणखी नेट लावत, पंधरा महिन्यांनी झालेल्या त्याच परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE पदाला गवसणी घातली! पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाल्या दिवसापासून दाढी न करण्याची शपथ घेतली होती….. पंधरा महिने वाढलेली दाढी लाल दिव्याच्या गाडीत बसण्याआधी काढली…. जिद्दच होती तशी.

लग्न केलं ते पारंपारिक पद्धतीने. नव्या नवरीची वरात सायकल रिक्षातून काढली होती. एका डी. एस. पी. अधिका-याचे असे लग्न लोकांनी पहिल्यांदाच पाहिले असावे.

आपण सोसलेल्या गरिबीच्या झळा इतरांना बसू नयेत यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले. विविध माध्यमांमधून नवोदित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शनासाठी साहाय्य मिळवून द्यायला सुरुवात केली. सोशल मिडीयाचा अत्यंत प्रभावी वापर करीत संवाद वाढवत नेला. आज हजारो विद्यार्थी संतोष कुमार पटेल यांच्याशी जोडले गेलेले दिसतात! पडत्या काळात मदतीचा हात दिलेल्या लोकांना शोधून त्यांचे हात हातात घेऊन धन्यवाद देणारा हा अधिकारी… याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत!

नऊ वर्षांचा संतोष…. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, शहरात जायला पैसा नाही… मग गावातल्या झाडपाल्यावाल्या बाबांच्या आश्रयाला जाणे आलेच. शरीराच्या वरवरच्या जखमांवर झाडपाला उपयुक्त असतो, हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा मोठ्या व्याधीने शरीर ग्रासले की मृत्यू ठरलेला. संतोष असाच मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यावर कुणाकडून तरी उधार उसनवारी करीत त्याला मोठ्या रुग्णालयात आणले होते. शस्त्रक्रिया करायची ठरले.. पण रक्त द्यावे लागणार होते. १९९९ चा तो काळ. त्यावेळी त्या भागात रक्तदान करणे म्हणजे स्वत:ला कमजोर करून घेणे, असा समज होता. त्यामुळे रक्तदान करायला कुणी सहजासहजी तयार होत नसे. संतोषची शस्त्रक्रिया त्यामुळेच वेळेमध्ये होऊ शकली नाही. एक एक दिवस उलटत होता!

संतोष दाखल असलेला WARD तिस-या मजल्यावर होता. संतोषचे वडील सुपारी चघळत असत. असेच चिंतागती बसलेले असताना त्यांनी तोंडातील सुपारी वरून खाली टाकली…. ते नेमके खाली असलेल्या एका सफाई कर्मचा-याने पाहिले. मोठ्या तिरीमिरीतच तो कर्मचारी संतोषच्या वडिलांची खबर घेण्यास वर आला…. त्याने तोंडाचा पट्टा सोडलाच होता… पण संतोषचे वडील शांत उभे राहून दिलगिरी व्यक्त करीत होते. डोळ्यांत आसवे होती. त्या सहृदय कर्मचा-यास वाईट वाटले. त्याने परिस्थिती समजावून घेतली आणि “मी देतो रक्त! ” म्हणून रक्तदान करायला तो तयार झाला…. काहीही अपेक्षा न ठेवता. योगायोगाने त्याचा रक्तगट जुळला आणि संतोषचा जीव बचावला! सख्खे खानदान उपयोगात आले नाही पण हे खूनदान (रक्तदान) करायला अनोळखी माणूस आला…. संतू मास्टर त्याचे नाव! परिस्थितीने दोन गरीब कुटुंबांना रक्ताच्या नात्यात बांधले ते कायमचे.

संतोष पटेल साहेबांचे वडील अधून मधून संतू मास्टर यांच्या घरी जाऊन येत असत. नंतर त्यांचा संपर्क कमी झाला असावा. कारण दोघांची राहण्याची ठिकाणे दूर दूर होती. दिवस पुढे निघून गेले. मोठ्या होत गेलेल्या संतोषकुमार पटेल साहेबांना हे रक्ताचे काका आठवणीत होते. जीवनाच्या धकाधकीत काही गोष्टी मागे पडतात.

पुढे सतना स्टेशनमध्ये साहेबांचे काही काम निघाले आणि त्यांना लहानपणीची ती रक्तदानाची कथा आठवली. त्यांनी त्या रक्तदात्याचे घर शोधण्याचे ठरवले. तीन तास शोधाशोध केल्यावर एका अत्यंत गरीब वस्तीत संतू मास्टर रहात असत…. असे समजले. दोनच महिन्यांपूर्वी एका शाळेत सफाई करताना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला होता!

डी. एस. पी. साहेब साध्या वेशात आपल्या सहकारी कर्मचा-यांसह संतू मास्टर यांच्या घरी पोहोचले. त्यांचा मुलगा मजुरीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. संतू यांच्या दोन मुली आणि थोरल्या मुलीच्या दोन लहानग्या मुलीसुद्धा होत्या घरात. मोठ्या मुलीच्या चेह-यावरून साहेबांनी तीच संतू मास्टर यांची मुलगी हे ताडले. तिच्या पायांना स्पर्श केला… हातावर काही पैसे ठेवले… आशीर्वाद मागितला. म्हणाले…. ‘ मी तुमचा भाऊच आहे…. तुमच्या वडिलांची भेट नाही होऊ शकली. पण त्यांचेच रक्त माझ्या शरीरात वाहते आहे. आयुष्यात काहीही गरज पडली तर तुम्हांला आणखी एक भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. ‘.. असं म्हणत साहेबांनी त्या लहानग्या मुलींच्याही पायांना स्पर्श करीत आशीर्वाद घेतले! संतू मास्टर यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नात कन्यादानाची जबाबदारी सुद्धा घेतली!

मागे एकदा बालाघाट दौ-यावर असताना त्यांनी एका वृद्धाश्रमाला भेट दिली होती. साहेबांच्या पत्नीचा वाढदिवस त्यांनी त्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरवले होते. तेथील पूरन सिंग ठाकूर नावाच्या एका वृद्धाने पटेल साहेबांना खास पोलिसी पद्धतीने SALUTE केल्यावर पटेल साहेबांनी त्या वृद्धाची चौकशी केली. तर ते साहाय्यक फौजदार निघाले. पत्नीच्या निधनानंतर विमनस्क अवस्थेत त्यांनी घरदार सोडले, लहान मुलाला सोडून ते भटकत हिंडू लागले होते… व्यसने, आजार आणि मानसिक विकार यांनी ग्रासले गेल्याने त्यांना स्वत:बद्दल फार काही सांगता येत नव्हते… आणि त्यांनी घरदार सोडून चाळीस वर्षे उलटून गेली होती. पटेल साहेबांनी त्यांच्या पद्धतीने संवाद साधत तीन गोष्टी जाणून घेतल्या… त्या साहेबांच्या गावाची साधारण माहिती… आणि ते नोकरीत असताना फुटबॉल खेळत असत. या एवढ्या माहितीवरून पटेल साहेबांनी एक रील प्रसारित केला, त्यांच्या पोलिस खात्यातील मित्रांच्या मदतीने पूरन सिंग यांच्या मुलाचा शोध घेतला…. आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले! अशा अनेक कहाण्या आहेत… या प्रामाणिक आणि माणुसकीची जाण असलेल्या पोलिस अधिका-याच्या!

वर्दीला मान आहे, सन्मान आहे आणि भीतीयुक्त आदरही. या पदावर पोहोचणारे कुठून तिथे पोहोचलेले असतात ते कुणास ठाऊक? पण जे आपली पाळेमुळे विसरून जातात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? अनेकजण तर मागे वळून पहात नाहीत. पण संतोष कुमार पटेल, D. S. P. पोलिस विभाग, मध्यप्रदेश यांच्यासारखेही हिरे असतात. पन्ना जिल्ह्यात जन्मलेला हा हिरा म्हणूनच अधिक चमकदार भासतो.

गांव का डीएसपी नावाने श्री. संतोष कुमार पटेल एक फेसबुक पेज चालवतात. याद्वारे विविध विषयांवर विडीओज बनवतात आणि प्रसारित करतात. तरुणांना मार्गदर्शन, समुपदेशन करतात!

— — सकारात्मक गोष्टीही घडत असतात समाजात… त्या आपल्या दृष्टीस पडाव्यात म्हणून ही कहाणी सांगितली. तुम्हांलाही असे काही ठाऊक असल्यास लिहा.

जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments