जेव्हा केसांत चांदणं उतरू लागतं, गुडघ्यांच्या हालचालीत संगीताची मैफल भरते आणि चष्म्याशिवाय जग ‘धुसर’ भासू लागतं…
नेमक्या त्याच वळणावर एक निष्ठवान नायिका खंबीरपणे हात धरते.
तिचं नाव – ‘पेन्शन‘!
अढळ निष्ठा
पगार ही केवळ तारुण्यातील एक ‘चंचल प्रेयसी’ होती, पण पेन्शन मात्र उत्तरार्धातील खरी ‘हक्काची अर्धांगिनी’ आहे.
विनाअट साथ
ना तिला नखरे ठाऊक आहेत, ना रुसवा-फुगवा. ती कधी तारीख चुकवत नाही की कधी ‘ब्रेकअप’चा विचारही करत नाही.
सुखद सोबत
संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहाच्या सोबतीने ती दर महिन्याला कानात सांगते – “घाबरू नकोस हिरो, चित्रपट संपेपर्यंत मी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे!”
आयुष्याचा हा प्रवास ‘हनीमून’सारखा गोड आणि निश्चिंत ठेवणाऱ्या या लाडक्या महबूबेसाठी, दर नोव्हेंबरला आपल्याला फक्त एकाच गोष्टीची साक्ष द्यावी लागते…
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
दुर्जन निंदा – (२) ~पाखंडी लोक
मागील भागात तुकाराम महाराजांनी किती बीभत्स शब्दांत दुर्जनांची त्यांच्या अभंगातून निर्भत्सना केली आहे, हे आपण पाहिले. याही भागात आणखी काही अभंगांद्वारे तुकारामांचे अशा लोकांविषयीचे मत जाणून घेऊया, कारण दुर्जन निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. पाखंडी, म्हणजे वरवर दाखवायला सज्जन, भक्तीचे उपासक परंतु मनाने अत्यंत नीच अशा लोकांचा तुकाराम महाराजांना फार संताप आहे. त्यांच्याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण आज त्यांच्या अभंगांतून पाहूया…
भक्तीचे सोंग करणाऱ्या ढोंगी माणसांविषयी या अभंगात महाराज म्हणतात,
न ये नेत्रा जळ/ नाही अंतरी कळवळ/
तो हे चावटीचे बोल/ जन रंजवणे फोल//
न फळे उत्तर/ नाही स्वामी जो सादर/
तुका म्हणे भेटी/ जंव नाही दृष्टादृष्टी//
ज्याच्या डोळ्यात भावभक्तीच्या पाण्याचा टिपूस नाही, आणि जोपर्यंत अंतरंगात हरी विषयी कळवळा नाही, तोपर्यंत त्याच्या भक्ती विषयी भारलेल्या सर्व गप्पा पोकळ आणि फक्त करमणूक करणाऱ्या असतील. स्वामींची कृपा असल्याशिवाय ते अभक्ताला कधीही भेटणार नाहीत. वरवरची प्रार्थना केवळ पोकळ आहे.
ढोंगी भक्तांविषयी या अभंगात महाराजांनी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आहे.
टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी/
देखो नेदी जगी फासे जैसे//
धीवर या मत्स्या/ चारा घाली जैसा/
भीतरील फासा /कळो नेदी //
खाटीक हा स्नेह वादे पशु पाळी /
कापावया नळी तयासाठी//
तुका म्हणे तैसा भला मी लोकात/
परी तू कृपावंत पांडुरंग//
जो बहुरूपी असतो तो त्याचे वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगळ्यासारखा ध्यानस्थ बसतो. त्याचप्रमाणे मैद म्हणजे ढोंगी लोक स्वतःला भक्त म्हणविणारे, कपाळावर सतरा टिळे लावतो, गळ्यात कसल्या कसल्या माळा घालतो, नामाच्या मुद्रा कोरून लावतो आणि जगाला लुटण्याचे त्याचे आतील बेत कळू देत नाही. या लोकांची जात जशी काही फासेपारध्यांसारखीच असते. गळाला काहीसे आमीष लावून मासे अडकविण्याचा हा प्रकार आहे. खाटीक बोकड पाळून त्याला धष्टपुष्ट करतो आणि नंतर त्यास कापतो. अभक्त मंडळी याहून वेगळी नसतात, असे तुकारामांचे स्पष्ट मत आहे.
पाखंडी लोकांना महाराज सतत सांगत आहेत की तुम्ही अनुभवावाचून बडबड करणे थांबवा. ही तुमची बडबड म्हणजे बाळंत न होता बाळंतीणीप्रमाणे स्वतःवर सर्व सोपस्कार करून घेणे आहे.
व्याल्याविण करी शोभून तातडी/
चार ते गधडी करीतसे//
अशा लोकांना ते गधडी म्हणतात. (बिनडोक)
काही नित्यनेमाविण/ अन्न खाय तो श्वान/
वाया मनुष्यपण/ भार वाहे तो वृषभ//
त्याचा होय भूमी भार/ नेणे जातीचा आचार//*
जाला दावेदार/ भोगवी अघोर पितरासी//
अखंड अशुभवाणी / खरे नच बोले स्वप्नी//
पापी तयाहुनी नाही/ आणिक दुसरा//
पोट पोसी एकला/ भूती दया नाही ज्याला/
पाठी लागे आल्या/ अतिताचे द्वारेशी//
काही संतांचे पूजन/ न घडे तीर्थाचे भ्रमण//
यमाचा आंदण/ सीण थोर पावेल//
तुका म्हणे त्यांणी/ मनुष्यपणा केली हाणी//
देवा विसरूनी/ गेली म्हणती मी माझे//
वरील अभंगात तुकाराम महाराजांनी अभक्त लोकांचे वर्णन केले आहे. भोजनाआधी देवपूजा करणे, गीता, विष्णुसहस्त्रनाम किंवा जप जाप्य करणे असा काही नियम जो पाळत नाही, तो मनुष्य कुत्र्यासमान आहे. मनुष्यपणाचा तो व्यर्थ भार वाहतो. खरंतर तो बैलच म्हणावा. अशा माणसाचा भूमीला केवळ भार आहे. आपल्या पितरांचा तो केवळ दावेदार आहे, कारण तो त्याच्या कुकर्माने त्यांना नरक भोगवितो. त्याची वाणी अशुभ आहे, स्वप्नातही त्याला खरे बोलता येत नाही. फक्त स्वतःपुरता विचार करून दारी आलेल्या अतिथीला तो हाकलून देतो. कधी संतांचे पूजन करीत नाही, की तीर्थाटन करीत नाही. असे लोक म्हणजे मनुष्यपणाची केवळ हानीच आहेत.
तुकाराम महाराजांना पाखंडी, (स्वतःला हरीचे दास म्हणणारे, ज्ञानी समजणारे) लोकांचा अनुभव फार जवळून मिळाला. अशा लोकांविषयी त्यांचे एक ठाम मत बनले, ते या अभंगातून आपण पाहूया.
अतिवादी लावी/ एका बोट सोंग दावी/
त्याचा बहुरूपी नट/ नव्हे वैष्णव तो चाट//
प्रतिपादी वाळी/ एका पूजी एका छळी/
तुका म्हणे नाही/ भूतदया ज्याचे ठायी //
एक मनुष्य कपाळाला काळी रेघ लावून आपण वैष्णव आहोत असे सांगत सुटतो. वादविवादही करतो, परंतु तो खरा वैष्णव नव्हे. तो वेशधारी बहुरूपी आणि खोटा आहे. तो एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याचा धिक्कार करतो, आणि एकाला पूजनीय मानतो व दुसऱ्याला छळतो. खरे वैष्णव तर सर्वांशी समान वागतात. ते भूतदयेने परिपूर्ण असतात. या पाखंडी लोकांच्या ठायी भूतदया जराही नसते.
ढोंगी लोकांना तुकाराम महाराज रोखठोक बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्याचे उदाहरण म्हणजे हा खालील अभंग…
जाऊनिया तीर्थ/ काय तुवा केले/
चर्म प्रक्षाळीले/ वरी वरी//
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले/
भूषण ते केले आपणया//
वृंदावन फळ घोळले साकरा/
भीतरील थारा मोडेची ना//
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया/
तोवरी कासया फुंदा तुम्ही //
ते म्हणतात, ” अरे ढोंगी माणसा, तू तीर्थास जाऊन केलेस काय? तर तुझ्या चामड्याचे प्रक्षा लन केलेस, तुझे कातडे फक्त पाण्यात भिजवलेस. तुझ्या अंतराचे काय? कडू वृंदावन फळ साखरेत किती घोळले तरी त्याचा उपजत कडूपणा जात नाही, तुझे तसेच आहे. तीर्थ स्नान करून तुझ्या मनाचे मालीन्य कसे जाणार? जोपर्यंत तुझ्या ठिकाणी दया, क्षमा, शांती या भावना नाहीत तोपर्यंत तुम्ही हरीचे दास म्हणून गर्वाने फुलून जाऊ नका. “
तुकाराम महाराजांना खऱ्या भक्तीचा अर्थ म्हणजे मानवता, भूतदया, अंतःकरणाची शुद्धता हेच सामान्यांना सांगायचे आहे असे मला वाटते. तो खरा हरीचा दास आहे, त्यालाच माऊली आपल्या चरणी आश्रय देते.
आजच मी आईला मातृदिनानिमित्त हा दगड भेट म्हणून दिला.
वास्तविक पेपरवेट आणि शोपीस याव्यतिरिक्त तसा काही याचा फारसा उपयोग नाही. पण या एका छोट्याशा भेटीने माझी एका गरजू आईला मदत होणार होती.
****
काही महिन्यापूर्वी मी एका आदिवासींनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली तीही प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी, प्रदर्शन संपायच्या फक्त काही मिनिटे आधी. जवळजवळ 25 एक तरी स्टॉल होते आदिवासींचे.
– – त्यात एका स्टॉल वर मला हा दगड सापडला बहुतेक माझ्याच नशिबात होता तो.
स्टॉल वर एक आई आणि तिचा मुलगा होता. स्टॉल जवळ जवळ रिकामाच होता.
एक अगदी अशिक्षित बाई होती स्टॉलवर पण खरोखरच तिच्या अंगात कला होती. तिच्याबरोबर तिचा मुलगाही होता कारण आता तो मोकळा होता त्याला दिवाळीची सुट्टी लागली होती.
या स्टॉल मधून मिळणाऱ्या पैशातून त्याच्या शिक्षणाचा खर्च करायचा होता तिला.
आत्तापर्यंत तिने रंगवलेल्या दगडांचे फोटो होते त्या मुलाच्या मोबाईल मध्ये. लोकांचा पत्ता लिहून घेणे त्यांच्याकडून पैसे घेणे त्याचा हिशोब ठेवणे वगैरे काम चोख पणे करीत होता तो.
तिने रंगविलेल्या दगडांवर काही देवांची नावे होती शहरांची होती. अगदी आपण ऑर्डर दिली, सांगितले तर तुमच्या मित्रांचे देखील नाव रंगवून द्यायला तयार होती ती आई.
आणि त्यातला शेवटला न विकला गेलेला असा दगड जो बहुतेक माझ्याच नशिबात होता तो मी विकत घेतला.
आपल्याला देखील बागेत, रस्त्यात येता जाताना, प्रवासात, असे अनेक आकाराचे दगड दिसतात पण त्याला व्यवस्थितपणे रंगवून ते विकणे… वा खूपच कौतुकास्पद.
दगडांमधून अर्थार्जन… किती सुंदर कल्पना.
कल्पना आणि कला यांना योग्य रीतीने स्कोप/दिशा मिळणे गरजेचे आहे हेच खरे.
अर्थ : सर्वकाळी सर्व शक्तिनिशी प्रेमभावाने कोणतीही चिंता न करता एक भगवंत भक्ति करण्यास योग्य आहे असे समजून त्याची भक्ती करावी.
विवेचन : एखाद्याने साधकाने साधना करायला सुरवात केली. सकाळी अमुक अमुक वेळ अमुक उपासना आणि संध्याकाळी अमुक वेळ अमुक उपासना. बाकीचा वेळ माझा भगवंताशी संबंध नाही, असे म्हणून किंवा अशी कृती करून चालणार नाही. त्याचे अनुसंधान सतत टिकले पाहिजे, त्यासाठी त्याने सतत विविध मार्ग शोधून भगवतांच्या चिंतनात राहिले पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग सर्व संतांनी सांगितले आहेत. त्यातील एक मार्ग आपल्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करणे.
भक्ती ही केवळ काही वेळापुरती, उत्सवापुरती किंवा गरजेपुरती नसावी. ती सतत असावी. जेव्हा मन, वाणी आणि कृती या तिन्हींतून भगवंताचे स्मरण होते, तेव्हाच खरी भक्ती घडते.
भगवंताची भक्ती ही केवळ आनंद किंवा दुःखाच्या प्रसंगीच न करता, सर्व भावनांनी (जसे की प्रेम, भक्ती, करुणा, नम्रता, लोभ नसलेली तृष्णा, वियोग इ.) करावी. भक्त भगवंताशी प्रत्येक मनोभावाने जोडलेला असतो. समर्थ म्हणतात,
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥ संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥”
(संदर्भ : दासबोध दशक ४ समास ३)
ज्याप्रमाणात भक्ति वाढत जाते त्याप्रमाणात साधक निश्चिंत होऊ लागतो. कारण त्याच्या पाठीशी उपासनेची शक्ति उभी असते. एकदा देवाला, सद्गुरूंना साधक शरण गेला की त्याची सर्वोतोपरी काळजी सद्गुरू घेत असतात. असा सर्व संतांचा अनुभव आहे.
सर्व संतांमध्ये एक साम्य नक्की अनुभवायला मिळते, ते म्हणजे त्यांच्या अंतरी असलेले समाधान. त्यासाठी साधकाने आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून, आपली साधना अखंड करावी. सद्गुरू त्याला कायम सांभाळतात.
अर्थ : भगवंताचे कीर्तन किंवा नामस्मरण केले जाते, तेव्हा तो भगवंत फार लवकर प्रकट होतो आणि आपल्या भक्तांना आपले अस्तित्व जाणवून देतो.
विवेचन: समारोपाला चाललेल्या या लेखमालेच्या या सूत्रांत आपण भक्तीची फलश्रुती पहात आहोत.
या सूत्रात नारद मुनी आपल्याला भक्तीची एक अमूल्य अनुभूती सांगत आहेत. भक्त जेव्हा भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरण, कीर्तन करतात, त्याचे नानाविध प्रकारे गुणगान करतात, तेव्हा भगवंत दूर नसतो. तो तत्क्षणी, शीघ्रतेने, त्या भक्तांच्या रक्षणासाठी, त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट होत असतो.
सर्व संतांची चरित्रे अभ्यासली तर आपल्या ही सहज लक्षात येईल. कोणत्याही भक्ताचे चरित्र अभ्यासा. त्या त्या भक्तासाठी भगवंत धावत आलेले आहेत. मग तो गजेंद्र असो की द्रौपदी असो, भक्त प्रल्हाद असो की ध्रुव बाळ असो. भगवंत भक्ताच्या आवश्यकतेनुसार तो सखुबाईचे दळण दळतो, कबिराचे शेले विणतो, कुंभाराच्या घरी मडकी भाजतो, पाणक्या बनतो… ! किती सांगावे…
माझ्या सारख्या सामान्य मनुष्यानं भगवंताचे यथार्थ वर्णन करणे निव्वळ अशक्य!!
भक्ताने भगवंताला बोलविले की तो येतो. हे सूत्र भगवंताच्या प्रेमळ आणि कृपामय स्वभावाचे वर्णन करते. तो आपल्या भक्तांना दूर ठेवत नाही, तर त्यांच्या प्रेमाच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देतो. या सूत्रातून हे शिकायला मिळते की, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जटिल साधने आवश्यक नाहीत. प्रेमाने, भक्तिभावाने, नामस्मरणाने त्याचं आवाहन केलं की तो तत्काळ हजेरी लावतो. त्यामुळे भक्ती ही सहज, सुलभ, आणि सर्वोच्च साधना आहे. “कीर्तनातून भगवंताचा अनुभव मिळतो – हा भक्तीचा परमोच्च प्रभाव आहे. “
अर्थ : सत्य वचन, सत्य आचरण आणि सत्य संकल्प ही तीन सत्य वचने आहेत, पण त्यापेक्षा परम सत्याची भक्ति श्रेष्ठ आहे. केवळ भक्ति श्रेष्ठ आहे.
विवेचन :कोणताही काळ ज्याप्रमाणे नीतिमत्ता श्रेष्ठ मानली जाते, त्याप्रमाणे सत्य श्रेष्ठ मानले जाते. प्रामुख्याने सत्याचे तीन प्रकार सांगता येतील.
सत्य वचन (वाणीने सत्य बोलणे)
सत्य आचरण (कर्माने सत्य आचरण करणे)
सत्य संकल्प (मनाने सत्य व संकल्पशुद्ध असणे)
नारदमुनी या सूत्रात स्पष्ट सांगतात की, जरी एखादी व्यक्ती त्रिसत्य अर्थात वाणी, आचरण आणि संकल्प पूर्णपणे सत्यनिष्ठतेनी करणारी असली, तरीसुद्धा भक्तीच त्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
एखादा मनुष्य खरे बोलणारा आहे पण त्याचे आचरण शुद्ध नाही. एखाद्याचे आचरण अतिशय शुद्ध आहे, पण त्याचा संकल्प शुद्ध नाही असे अनेक दोष मनुष्यामध्ये असू शकतात. काही लोकं प्रकांड पंडित असतात, पण त्यांचा अभिमान पण तितकाच मोठा असतो, अशा लोकांना देवाची भेट दुष्करचं असते, उलट एखादा मनुष्य पंडित नसेल, त्याला लिहिता वाचताही येत नसेल, पण त्याचा भाव शुद्ध असेल, त्याच्या मनात भक्तीचा अंकुर उगवला असेल, तर अशा मनुष्यावर देव प्रसन्न होण्याची शक्यता जास्त असते.
“मनी नाही भाव आणि देवा मला पाव”
अशाने देव पावत नसतो. तर ज्याचा भाव शुद्ध झाला, त्याला देव खात्रीने दर्शन देत असतो, असा अनुभव सर्व संतांनी घेतलेला दिसून येतो. अनेक संत लौकिक अर्थाने निरक्षर होते, पण आज त्यांच्या अभंगावर लोकं विद्या वाचस्पती ची पदवी घेत आहेत, त्यांच्यावर शोध प्रबंध प्रकाशित करीत आहेत, त्यांचे अभंग पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जात आहेत.
आपल्याकडे नुसते सत्याचे महत्त्व नाही, तर सत्याचरण करणाऱ्याने त्याला भक्तीची जोड दिली, तीच साधना पूर्ण करणारी ठरते. केवळ नैतिकता, सत्यतेचे पालन हे अध्यात्मासाठी पुरेसे नाही, तर त्याला भावपूर्ण भक्तीची जोड आवश्यक आहे.
मनुष्य भक्ति करू लागला की त्याचे भाडोत्री असलेले अवगुण त्याला सोडून जाऊ लागतात. ही भक्तीची किमया आहे. जिथे भक्ती आहे, तिथे सर्व सद्गुण आपोआप येतात. म्हणूनच नारदांनी दोनदा “भक्तिरेव गरीयसी” असे म्हणत भक्तीच्या श्रेष्ठतेवर जोर दिला आहे.
सत्य, नैतिकता, शुद्ध आचरण हेसुद्धा तेव्हाच सर्वोच्च ठरतात, जेव्हा त्यामध्ये भगवंतावरची भक्ती मिसळलेली असते. म्हणून भक्ती ही साध्यही आहे आणि साधनही. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो. श्रीमहाराज एकदा नैमिष्यारण्यात जायला निघाले. त्यावेळी थोरल्या रामाच्या मंदिरातील रामाच्या मूर्तीतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज स्वतः आले आणि त्यांनी रामाचे डोळे पुसले, तेव्हा अश्रुपात थांबला. ही भक्तीची शक्ति आहे. अशी भक्ति असेल तर भगवंत खांबातूनही प्रगटतो. ही भक्तीच्या महानतेची काही उदाहरणे.
इथे श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील एक उतारा देत आहे – –
– – “खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान् लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. “
(संदर्भ : श्री गोंदवलेकर महाराज प्रवचने दिनांक २७ जून)
☆ “आधुनिक संताजीराव… धनाजीराव…” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब
२१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं !
युद्ध कथा रम्य असतात, हे खरेच आहे. पूर्वीची युद्धं आणि आधुनिक जगातील युद्धं यांत जमीन-आस्मानाचा फरक आहे, हेही तेवढंच खरे आहे. राजे-रजवाड्यांच्या काळात सैन्य एकमेकांवर चालून जाई, मोकळ्या मैदानात जणू एखादा खेळ खेळावा, तशी युद्धं लढली जात. पुढे दोन देशांमधील युद्ध म्हणजे एका देशाने दुस-या देशाची सीमा ओलांडून तो देश काबीज करणे. विमानांच्या वापराने ही आक्रमणे अधिक खोलवर आणि धारदार होत गेली. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली युद्धंही याला अपवाद ठरली नाहीत. परंतू १९८० च्या दशकापासून भारताचे अभिन्न अंग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात भारतीय सैन्याला पाकिस्तानी, अफगाणिस्तानी घुसखोर भाडोत्री सैनिक आणि स्थानिक अतिरेकी यांचा सामना खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला… आणि आजही हीच परिस्थिती आहे. अर्थातच हे पारंपारिक युद्ध नाही. त्यामुळे आपले सैनिक या भागांत नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जात आहेत, हे जनतेला माहीत असणे गरजेचे होते. पण जनतेला ही माहिती होण्याचे मोजकेच स्रोत होते. एक चित्रपट आणि दुसरा स्रोत म्हणजे पुस्तके… जी बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत लिहिलेली असतात. या स्रोतांच्या मर्यादांमुळे नेमके चित्र उभे राहत होतेच असे नाही.
पण विडीओ मुलाखती, खाजगी वाहिन्या यांमुळे प्रत्यक्ष संबंधित व्यक्तींच्या तोंडून युद्धाची वर्णने ऐकून परिस्थिती ब-यापैकी स्पष्टपणे समजून घेता येते आहे.
युद्धकथा समाजाला आवडतात. त्यामुळे हल्ली त्या मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जात आहेत. यांतून तरुणांना प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण याचे व्यापारीकरणही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. पण त्याला इलाज नाही. मुलाखती घेणारे या क्षेत्राशी संबंधित असण्याचे प्रमाणही पूर्वी कमी होते. त्यामुळे अनेकवेळा हास्यापद प्रश्न विचारले जात. पण प्रत्यक्ष युद्धात, मोहिमांमध्ये सहभागी होऊन शौर्य गाजवलेले काही लोक या क्षेत्रात आलेले आहेत, हे खूप छान होते आहे. यांत भारतीय सैन्यातील काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत. यांत सर्वांत प्रभावी काम दिसते आहे ते The Monks And The Warriors हे podcast चालवणा-या दोघां तरुण, शूर आणि अनुभवी निवृत्त लष्करी अधिका-यांचे!
यातील एक आहेत कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि दुसरे आहेत लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते. कर्नल कौशल कश्यप साहेबांनी मणिपूरमध्ये अनेक अतिरेकी ठार मारले… त्यासाठी त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. तर लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग यांनी सहा सहा दिवस जंगलातून पायी प्रवास करीत अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. हे दोघेही MARATHA LIGHT INFANTRY मधून निर्माण केल्या गेलेल्या 21, PARA SPECIAL FORCES या सैन्यविभागाचे मोठे शूर अधिकारी. यांनी निवृत्तीनंतर सेनेतील अधिकारी, सैनिक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्या PODCASTच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे.
नुकतीच या जोडगोळीने ब्रिगेडीअर सुनील भानोत (सेवानिवृत्त) साहेबांची अतिशय रोमांचक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या आरंभी त्यांनी एक विशेष कृती करून त्यांच्यातल्या जिवंत सैनिकांची जणू ओळखच करून दिली.
२१, स्पेशल फोर्सेस वाघनख दलाचे आराध्य दैवत म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्यविधाते छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब. शिवरायांनी अफझल खानास मातीत घालण्यासाठी वापरलेलं वाघनख हे हत्यार या दलाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले आहे. हे चिन्ह स्वीकारले जावे यासाठी कर्नल व्ही. बी. शिंदे (निवृत्त) साहेबांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शिवरायांचा अश्वारूढ पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आसाममध्ये स्थापित झाला आहे. हा पूर्णाकृती पुतळा पुण्यातील श्री. विराज खटावकर (शिल्पकार) यांनी बनवून दिला आहे. आणि पुण्यातून आसामपर्यंत या पुतळ्याचा गौरवशाली प्रवासही प्रसिद्ध झाला आहे.
कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांनी MARATHA LIGHT INFANTRY तून २१ स्पेशल फोर्सेसची निर्मिती करताना देशासाठी मोठे योगदान दिले. या स्पेशल सैनिकांनी मणिपूर आणि संबंधित राज्यांत खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. पण देशाला याबाबत फारशी माहिती आहे, असे दिसत नाही. कारण जम्मू-कश्मीर, चीन सीमा यांबाबत जास्त लिहिले, बोलले जाते. असो.
कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते यांनी त्यांच्या स्टुडीओमध्ये ठेवण्यासाठी शिवरायांची एक प्रतिमा खास बनवून घेतली आहे. या PODCAST ची सुरुवात करताना भानोत साहेबांसारख्या वीर अधिका-याच्या हस्ते महाराजांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे साधेसे, औपचारिक अनावारण करून घेतले व महाराजांना पुष्पे अर्पण केली. त्यांची ही कृती आपल्यासाठीही खूप अभिमानास्पद ठरावी. याप्रसंगी त्यांनी थोडक्यात शिवरायांची महती सांगितली जी ऐकण्यासारखीच आहे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या आसाममध्ये कार्यरत सैनिकांनी आपल्या महाराजांच्या शिकवणुकीचा अंगीकार करीत देशाच्या शत्रूला नामोहरम केले… गनिमी कावा वापरीत मोठा पराक्रम गाजवला… हे किती विशेष आहे.
अतिशयोक्तीचा दोष स्वीकारून असे म्हणावेसे वाटते की, कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब हे दोघे अधिकारी जणू स्वराज्याचे संताजीराव-धनाजीराव म्हणूनच कार्य आहेत. हे कार्य सैनिकांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. हे दोघे ज्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे, त्यांना मार्गदर्शनही करतात. अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले हे अधिकारी इतरांच्या मुलाखती घेताना स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर नेमके प्रश्न विचारत वक्त्यांना बोलते करतात, त्यांचा योग्य तो सन्मान राखतात. हे काम अतिशय महत्त्वाचे आणि अभिनंदनीय असेच आहे. तरुणांनी THE MONKS AND WARRIORS VIDEO PODCST जो YOUTUBE वर दिसतो, तो जरूर पहावा… प्रेरणादायी आहे.
खरं तर भारतीय सैन्यदलाने स्वत:ची अशी खास PODCASTS केली पाहिजेत. यासाठी या दोघा अधिका-यांची मदत घेता येईल. कारण सैन्याची बाजूही जनतेला प्रभावीरीत्या समजली पाहिजे.
मी यांच्यापासून प्रेरणा आणि माहिती घेऊन सैन्यकथा दर रविवारी लिहिण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मराठीत सुद्धा असे PODCAST होणे गरजेचे आहे… फक्त व्यावसायिकीकारण टाळले गेले पाहिजे. महाराष्ट्रात तर सैन्यकथांची अजिबात वानवा नाही.
धन्यवाद, कश्यप साहेब, धन्यवाद कौशलेन्द्र साहेब! बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं!
बीज एका मातीत रुजतं, वाढतं आणि मोठं होत राहतं आणि कालांतरानं तिथंच आणि त्याच मातीत मिसळून जातं. पण मानवी समाजातल्या मुलगी नावाच्या बीजाला एका मातीत वाढावं लागतं आणि मुळांसह उपटल जात दुस-या मातीत स्वत:ला गाडून घ्यावं लागतं… आणि तिथंही नुसतं रुजावं लागणार नसतं तर वाढावं लागतं… इतरांना सावली, फळं आणि आधार देण्यासाठी. या झाडाला दुसरी ओळख लगडलेली असते… एखादी नदी सागरात विलीन झाली की ती सागरच होऊन जाते, तशी!
पण मुलीचं एकाच मातीत रुजून तिथंच नष्ट होणा-या बीजापेक्षा किंचित बरं असतं… तिला नव्या मातीत एका आधीच वाढलेल्या झाडाचा आधार मिळतो… नव-याचा! किंबहुना या नात्यात नव-याचं हेच तर मुख्य काम असतं… अन्यथा त्याच्या संसाराची बाग फुलणार नाही!
जसं बाळाचं सर्वांत जवळचं जर कुणी असेल तर ती आई असते, तसे विवाहोत्तर आयुष्यात मुलीचं त्या नव्या घरात सख्खे जर कुणी असेल तर तो नवरा असतो… किंबहुना असावा लागतो. त्याच्या आधारे, त्याच्या साठी ती नवी नाती स्वीकारते आणि फुलवत राहते. रातराणी जसं फुलून येण्यासाठी चंद्र उगवण्याची प्रतीक्षा करत दिवस ढकलते, तशी नवपरिणिता नवरा घरी येण्याची वाट पहात राहते दिवसभर. कारण या अनोळखी जगात संवाद साधायचा तरी कुणाशी आणि किती? अर्थात, उलटत जाणारे दिवस हे सुसह्य करू शकतात… अनुभवाने नाती घट्ट किंवा ढिली होत जातात! अर्भकाला केवळ स्पर्शावरून समजतं… कुणाच्या खांद्यावर मान टाकली की झोप येते आणि जीवाला घोर रहात नाही!
ती याच मुलींची प्रतिनिधी. आईबापाचं नाव राखण्यासाठी त्यांचं नाव त्यागून नवं नाव, नवी भूमिका स्वीकारत जीवनाच्या रंगमंचावर एक पात्र जगून दाखवण्यासाठी उभी राहणारी.
लग्नाच्या धामधुमीत पहिले काही दिवस निघून गेले असतील… त्यात देवकार्य झालं असेल, एकदा सूनबाईला घेऊन घरी येऊन जा या आग्रहाखातर नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या असतील. आणि मग सर्वांच्या शोधक नजरांच्या पल्याड जाण्यासाठी दूर जावं लागलं असेल… मधुचंद्र म्हणजे केवळ एकांगी प्रवास नसतो… चंद्राच्या साक्षीने एकमेकांना प्रदक्षिणा घालत राहण्याच्या आणाभाका आणि कक्षा ठरवायचे हे दिवस!
नव-याकडून अनेक गोष्टी समजत जातात, नात्यांचे अर्थ, त्यांच्या सीमा, त्यांच्या बोलण्याचे, कटाक्षांचे मतितार्थ ध्यानात येतात. हे अगदी भरात आलेलं असताना, मोकळ्या आकाशाखाली तिच्या माथ्यावर मध्यान्हीचा सूर्य आग ओकून गेला… कपाळावरचं कुंकू मृत्यू नावाच्या रसायनाने रक्ताचा लाल रंग वागवू लागले!
त्याला निरोप देईपर्यंत सर्व काही लक्षात आलं… पण त्याला मूठमाती देऊन आपल्या देहाची माती घरी आणल्यावर, ज्यावर तांदळाचं माप ठेवलं होतं आणि ते माप हलकेच उलटवून जीवनाच्या अक्षता भूमीच्या स्वाधीन केल्या होत्या… तो उंबरा ओलांडताच समजलं की घरातल्या या गर्दीत आपलं कुणीच नाही! जे आहेत त्यांना आपलं मानावं लागणार आहे… कुणाच्याही आधाराशिवाय अर्धवट वाढलेल्या नाजूक वेलीला आभाळाकडे वाटचाल सुरु ठेवावी लागणार आहे!
ओले मूळ, खडकाचे अंग भेदी हे खरं असलं तरी काळाचा खडक भेदत राहणं म्हणजे प्रत्येक क्षणी बोटं रक्तबंबाळ करीत राहणे… खडक कित्येक वर्षांच्या अनुभवाने अधिकाधिक कणखर झालेला असतो. त्याला सुरुवातीला तर मूळाचा हा प्रयत्न म्हणजे केवळ गुदगुली वाटत असेल! अशी अनेक मूळं या खडकांनी सुकून गेलेली पाहिलेली असतात!
ती मात्र अजूनही तग धरून आहे. ती बाहेर पडते पण तिला घरी यावं लागतंच. तिचे आईबाप तिच्या माहेरी आहेत, तिला त्याच्या आईबापाला त्याची कमतरता जाणवू द्यायची नसते. तिला काही सांगायचं असतं… भिंती ऐकून घेतात पण काही प्रतिसाद देत नाहीत. रात्रीचा अंधार पूर्णवेळ हिच्या बंद पापण्यांआड उघड्या असलेल्या डोळ्यांकडेच तर पहात जागत राहतो! सूर्याचं पहिलं किरण दिसत नाही… कारण दमून गेलेल्या पापण्या उघडता उघडत नाहीत… त्यांच्यावर मनाचं आणि मणा-मणाचं ओझं असतं.
वेलीच्या पोटी एखादं फूल असेल तर त्याचा आधार मिळतो… पण इथं तर तेही नाही. जाणारा प्रत्येक क्षण नवीनवी आव्हानं समोर उभे करत राहतो. गर्दीतला हा एकांतवास नरकापेक्षाही भयावह. भावनांच्या आहारी जायचं की व्यवहाराच्या हा तिढा सुटता सुटत नाही. हे सोडलं तर पळून गेलेलं चालणारं नसतं आणि धरून बसलं की ओरखाडे सुरूच राहतात… खूप कठीण असतं हे… खूप कठीण असतं हे!
या अंधा-या गुहेचं प्रकाशाच्या बाजूला उघडणारं टोक या पावलांना कधी तरी गवसू दे… देवा!
आशेया… पहलगाम मध्ये सर्वस्व गमावून परत आली आहे… एक वर्ष म्हणजे आपल्यासाठी फार कमी कालवधी असला तरी तिच्यासाठी एक युग असेल… आणखी अशी किती युगं तिच्या नशिबी आहेत देवच जाणो! आपण केवळ प्रार्थना करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो तिला! ह्या ओल्या जखमा सुकाव्यात, त्यांवर आशेचं आवरण चढत जावं आणि एक नवं जग तिच्यासाठी आकाराला यावं!
☆ ‘गोपाळाची मुरली, गोरक्षाचा कल्याण’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आज गुरुवार. जरा सावकाश उठायचे ठरवले होते; पण सवयीप्रमाणे लौकरच जाग आली. वातावरण आल्हाददायक होते. किंचित गारवा होता. आन्हिके, स्नान, संध्या, पूजा-अर्चना उरकून मन प्रसन्न झाले. सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो आणि पावले जंगली महाराजांच्या मंदिराकडे वळली.
मंदिराच्या द्वाराजवळील विक्रेत्याकडून हार-फुले घेतली आणि पायऱ्या चढून समाधीपाशी गेलो. समाधीवरील भरजरी चादर सूर्यप्रकाशात चमकत होती. निशिगंध, गुलाब आणि तुळशीचा सुगंध दरवळत होता. उदबत्त्यांच्या धूम्ररेखा आवर्तने घेत वर चढत होत्या. समोरचे धूपपात्र धुमसत होते.
हार, फुले वाहून साष्टांग दंडवत घातला. एका कोपऱ्यात शुभ्र वस्त्रांतील, दाढी वाढवलेली, केशरी टोपीधारी एक वृद्ध ऋषितुल्य व्यक्ती ध्यानस्थ बसली होती. ते हिंदुमहासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रा. स. भट असावेत. त्यांनाही नमस्कार करून मी एका कोपऱ्यात ध्यानाला बसलो.
अर्ध्या तासाने बाहेर आलो. समोर ‘ओम चेंबर्स’ दिसत होते. अचानक आठवले — योगिनी सुमनताई ताडे सध्या इथेच त्यांच्या बहिणीकडे राहायला आहेत. वाटलं, आलोच आहोत तर त्यांनाही भेटून जावं.
ताईंच्या सदनिकेवर टकटक केली. दार एका शिष्येने उघडले.
“कोण पाहिजे?”
“सुमनमावशी आहेत का? मी त्यांच्या थोरल्या बहिणीचा जावई — दिवाकर. ”
“या, बसा. ताई खाली पाहुण्यांना निरोप द्यायला गेल्यात. येतीलच. ”
ताई नसताना घरात बसणे प्रशस्त वाटले नाही. म्हणून मी बाल्कनीत जाऊन उभा राहिलो. खाली पदपथावर ताई एका प्रौढ, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या महिलेशी बोलत उभ्या होत्या. मोतिया रंगाची रेशमी साडी, मरून काठ, दोन्ही खांद्यावरून घेतलेला पदर, डोळ्यावर चष्मा आणि हातात बिल्वरांची झळाळी…
त्या व्यक्ती परिचित वाटत होत्या.
तेवढ्यात रिक्षा आली. त्या बाईंनी ताईंना निरोप दिला आणि रिक्षात बसल्या. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत दोघी एकमेकींना हात हलवत राहिल्या.
थोड्याच वेळात ताई वर आल्या. मला पाहताच उत्साहाने म्हणाल्या,
“अरे, जरा लौकर आला असतास तर एका थोर व्यक्तीची ओळख करून दिली असती!”
मी विचारले, “कोण होत्या त्या?”
ताई हसल्या.
“अरे, ती साक्षात भगवंताची मुरली होती!”
“म्हणजे?”
“माणिक वर्मा! श्रीहरीची मधुर मुरली!”
क्षणभर मी अवाक् झालो.
“साक्षात माणिकताई? त्या इथे कशा काय?”
ताई म्हणाल्या,
“काल रात्री त्यांचा फोन आला. म्हणाल्या — ‘उद्या भेटायला येऊ का? मला तुमच्याकडून काही शिकायचं आहे. ’”
“तुमच्याकडून?”
“हो. त्यांना ‘गोरक्षकल्याण’ रागातील काही दुर्मीळ चीजा शिकायच्या होत्या. कुठूनतरी त्यांना समजलं होतं की माझ्याकडे त्या आहेत. ”
मी आश्चर्यचकित झालो.
“पण तुम्ही गाणं शिकलात कधी?”
त्यावर ताई शांतपणे म्हणाल्या,
“मी कुणाकडेही शास्त्रीय संगीत शिकले नाही रे. हे सगळं संतांचा प्रसाद आहे. ”
आणि मग त्यांनी सांगितलेली कथा विलक्षण रोमांचकारी होती.
बेळगावला योगिनी कलावती देवींच्या सान्निध्यात त्या काही काळ होत्या. एकदा पाद्यपूजेनंतर आईंनी स्वतः घेतलेल्या केशर-वेलचीच्या दुधातील अर्धे दूध सुमनताईंना पाजले.
ताई सांगत होत्या,
“त्या क्षणापासून, कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, माझ्या मुखातून रागदारी उमटू लागली. एकच भजन अनेक रागांत गाता येऊ लागले. विविध चीजा, रचना सहज सुचू लागल्या. हीच संतकृपा. ”
हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.
ताई पुढे म्हणाल्या,
“पण खरी थोरवी माणिकताईंची आहे. संगीतविश्वात एवढं मोठं स्थान असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही. अजूनही नवीन शिकायची तळमळ! सुरांच्या शोधात त्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडे आल्या — हीच त्यांची महानता. ”
त्यांचे शब्द ऐकता ऐकता माझे डोळे नकळत ओलावले.
इतक्यात दाराची बेल वाजली.
दार उघडले तर साक्षात माणिकताई समोर उभ्या!
मी गोंधळलोच.
त्या हसत म्हणाल्या,
“योगिनीताई, माझी पर्स इथेच राहिली वाटतं. त्या गोरखकल्याणच्या नादात विसरून गेले. ”
खरंच, पर्स गादीवरच पडली होती. मी ती त्यांच्या हातात दिली.
ताईंनी माझा परिचय करून दिला.
“हे दिवाकर. संगीताची फार आवड आहे यांना. ”
मी पटकन म्हणालो,
“ऐकण्याची आवड बरं का! गाता-वाजवता काही येत नाही. ”
त्यावर माणिकताई मनमोकळं हसल्या.
“असू द्या हो. आम्हाला रसिक श्रोतेच लागतात. श्रोते आहेत म्हणूनच आम्ही कलाकार आहोत. तेच आमचे अन्नदाते, तेच आमचे दैवत. ”
आम्ही दोघे खाली आलो. रिक्षा उभीच होती.
माणिकताई म्हणाल्या,
“या, तुम्हाला वाटेत सोडते. ”
मी संकोचत म्हणालो,
“नको ताई. मला समोरच जंगली महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. ”
त्या हसल्या. रिक्षा निघाली.
रिक्षा दिसेनाशी झाली…
आणि मी तिथेच उभा राहिलो — भारावलेला, स्तब्ध.
माझ्यासमोर साक्षात ‘गोपाळाची मुरली’ होती…
आणि त्या मुरलीच्या अंतर्यामी घुमत होता — ‘गोरक्षाचा कल्याण’!
(पावस निवासी परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदांच्या अंतरंग शिष्या, वैकुंठवासी परमपूज्य *योगिनीताई ताडे* यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन वैशाख वद्य दशमी अर्थात मंगळवार दिनांक १२ मे २०२६ या दिवशी होता.. त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख)
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस १५ मे. रविंद्रनाथांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच आज आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊ या.
महर्षी देवेंद्रनाथ टागोर (ठाकूर) म्हणून प्रख्यात असलेले बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू देवेंद्रनाथ हे राजा (प्रिन्स) द्वारकानाथ टागोरांचे ज्येष्ठ पुत्र.
देवेंद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे त्यांच्या जोड़ासाँको भागातील प्रसिद्ध वडिलोपार्जित वाड्यात १५ मे १८१७ रोजी झाला.
ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. फार पूर्वी तेथून या कुटुंबाने यशोहर गावी स्थलांतर केले. कालांतराने जातीबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली.
त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय, यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले.
द्वारकानाथ टागोर हे राजा राममोहन रॉय यांचे सहकारी होते. त्यामुळे देवेंद्रनाथांना लहानपणापासूनच राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राजा राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राजा राममोहन रॉय यांचे कनिष्ठ पुत्र, देवेंद्रनाथांचे सहाध्यायी होते. बंगाली ब्राह्मोसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे.
राजा राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले. त्यांनी एकेश्वरवादाचा (एकाच ईश्वराची पूजा) प्रसार केला.
(अपूर्ण-उरलेला भाग पुढील भागात)
—–
☆ गीत : ६७ ☆
THOU art the sky and thou art the nest as well.
O thou beautiful, there in the nest it is thy love that encloses the soul with colours and sounds and odours.
There comes the morning with the golden basket in her right hand bearing the wreath of beauty, silently to crown the earth.
And there comes the evening over the lonely meadows deserted by herds, through trackless paths, carrying cool draughts of peace in her golden pitcher from the western ocean of rest.
But there, where spreads the infinite sky for the soul to take her flight in, reigns the stainless white radiance. There is no day nor night, nor form nor colour, and never, never a word.
THY sunbeam comes upon this earth of mine with arms outstretched and stands at my door the livelong day to carry back to thy feet clouds made of my tears and sighs and songs.
With fond delight thou wrappest about thy starry breast that mantle of misty cloud, turning it into numberless shapes and folds and colouring it with hues ever changing.
It is so light and so fleeting, tender and tearful and dark, that is why thou lovest it, O thou spotless and serene. And that is why it may cover thy awful white light with its pathetic shadows.
THE same stream of life that runs through my veins night and day runs through the world and dances in rhythmic measures.
It is the same life that shoots in joy through the dust of the earth in numberless blades of grass and breaks into tumultuous waves of leaves and flowers.
It is the same life that is rocked in the ocean-cradle of birth and of death, in ebb and in flow.
I feel my limbs are made glorious by the touch of this world of life. And my pride is from the life-throb of ages dancing in my blood this moment.
☆ मदर्स डे – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
ॲना जार्विस
ज्या माऊलीनं हा दिवस सुरू केला, तिनंच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं…!!_
आपल्यासाठी ‘मदर्स डे’ म्हणजे फक्त आईला महागडं गिफ्ट देणं, सोशल मीडियावर फोटो टाकणं आणि एखादा छान केक कापणं इतकाच मर्यादित आहे… परंतु जेव्हा या दिवसामागचा खरा इतिहास समजतो, तेव्हा डोळ्यांत पाणी येतं आणि मनात एक अस्वस्थता घर करून बसते!
१० मे २०२६. सगळीकडे ‘मदर्स डे’चा उत्साह आहे, पण या उत्साहाच्या मागे एक शोकांतिका दडलेली आहे.
ही गोष्ट आहे *ॲना जार्विस* नावाच्या एका जिद्दी महिलेची, जिनं १९०८ मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ या दिवसाची सुरुवात केली होती.
ॲनाला वाटत होतं की, हा दिवस अतिशय वैयक्तिक, शांत आणि जिव्हाळ्याचा असावा. तिच्या कल्पनेतला ‘मदर्स डे’ म्हणजे आईला स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक साधं पत्र आणि तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा एक क्षण होता.
परंतु अवघ्या दहा वर्षांत या भावनेचा अक्षरशः बाजार मांडला गेला.
कल्पना करा, ज्या भावनेला ॲनानं पवित्र मानलं होतं, त्याच भावनेचा ‘हॉस्टाईल टेकओव्हर’ झाला… हॉलमार्कसारख्या कंपन्यांनी ‘मदर्स डे’साठी खास ग्रीटिंग कार्ड्स छापायला सुरुवात केली, फुलांच्या व्यापाऱ्यांनी दर दुप्पट-तिप्पट केले आणि चॉकलेट कंपन्यांनी जाहिरातींचा पाऊस पाडला.
ॲना जार्विसला हे सगळं बघून प्रचंड संताप आला. तिनं या नफेखोर व्यापाऱ्यांना ‘लफंगे’, ‘चाचे’ _(Pirates)_ आणि ‘दरोडेखोर’ अशी शेलकी विशेषणं लावली. आईच्या आठवणीचा हा व्यापार म्हणजे माणुसकीचा अपमान आहे, असं तिचं मत होतं.
खरी लढाई तर इथून पुढं सुरू झाली… ॲनानं या व्यापारीकरणाविरुद्ध कोर्टात धाव घेतली आणि आपली उरलीसुरली सर्व संपत्ती या कायदेशीर लढायांमध्ये खर्च करून टाकली. ती इतकी हतबल झाली होती की, तिनं हा दिवस अधिकृतपणे रद्द करण्यासाठी चक्क याचिका दाखल केली होती!
ज्या दिवसासाठी तिनं आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्याच दिवसानं तिला कंगाल केलं. १९४८ मध्ये ॲना जार्विसचा मृत्यू एका सॅनिटोरियममध्ये झाला.
पण इथं एक भयानक ट्विस्ट आहे… ॲनानं ज्या फ्लोरिस्ट आणि ग्रीटिंग कार्ड कंपन्यांविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला, त्याच कंपन्यांनी तिचं हॉस्पिटलचं बिल गुपचूप भरलं होतं!
आज २०२६ मध्ये आपण पाहतोय की मदर्स डेच्या नावाखाली अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होतेय. तरीही यंदा एक बदल जाणवतोय… अनेक तरुण आता महागड्या गिफ्ट्सपेक्षा ‘क्वालिटी टाइम’ आणि साध्या घरगुती जेवणाला पसंती देताहेत. कदाचित ॲना जार्विसला हेच हवं होतं.
एका साध्या भावनेचं कॉर्पोरेट साम्राज्यात झालेलं रूपांतर आपल्याला बरंच काही शिकवून जातं. आईवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खरंच एखाद्या ‘ब्रँडेड’ वस्तूची गरज असते का?
ॲना जार्विसची ही कहाणी ऐकल्यानंतर, तुम्ही यंदाचा मदर्स डे कसा साजरा करायचं ठरवलंय?
***
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈