श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “वाह! सरताज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
महाराष्ट्रातील सर्व शाळांतून ‘हिंद की चादर’ नावाचा उपक्रम सुरु आहे. हिंदू धर्माच्या रक्षणार्थ बलिदान दिलेले सिख गुरु श्री तेग बहादूरजी यांच्या स्मरणार्थ अनेक उपक्रम केले जात आहेत. या इतिहासाची विद्यार्थ्यांना शालेय वयातच ओळख व्हावी यादृष्टीने गुरुजींच्या आयुष्यावर आधारित निबंध, गीतगायन, चित्रकला अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
गुरु श्री तेग बहादूरजी
प्रसिद्ध पंजाबी गायक श्री. सतिंदर सरताज यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या पराक्रम आणि बलिदानाची कहाणी अगदी मोजक्या शब्दांत अतिशय प्रभावीरीत्या गाण्याच्या विडीओच्या माध्यमातून मांडली आहे. शालेय विद्यार्थ्यांना हे गीत ऐकवण्यात येत आहे. इतरांनीही हा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे, असे वाटते!
शिखांचे सहावे गुरु गुरु हरगोबिंद सिंग यांच्या पोटी श्री त्यागमल यांचा १ एप्रिल, १६२१ रोजी अमृतसर येथे जन्म झाला. त्यांच्या मातोश्रींचे माता नानकी असे होते. मुघल सेनेविरोधात करतारपूर येथे झालेल्या लढाईत केवळ तेरा वर्षांचे वय असलेल्या त्यागमल यांनी मोठे शौर्य गाजवले. या पराक्रमामुळे त्यांचे नाव तेग बहादूर असे ठेवण्यात आले. तेग म्हणजे तलवारीची धार, तेज. आठवे गुरु म्हणून श्री हरीरायजी गादीवर असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत शिखांचे नववे गुरु बाबा बकाला गावात वास्तव्यास असून त्यांचा शोध घ्यावा, असे सुचवले.
त्यानुसार बाबा बकाला गावात अनुयायांनी मोठा शोध घेतला. स्वत:ला गुरु म्हणवून घेणारे अनेक लोक त्या गावात निघाले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
त्याच दरम्यान माखन शा लुबाना नावाचा एक व्यापारीही गुरुंच्या शोधात बाबा बकाला गावात येऊन पोहोचला. या व्यापाऱ्याचे जहाज समुद्रात अचानक आलेल्या वादळात बुडणार होते. त्याने मनोमन गुरुंची प्रार्थना केली होती. माझे प्राण वाचले तर मी गुरुंना पाचशे सुवर्णमुद्रा भेट म्हणून देईन, असे त्याने ठरवले होते. परंतू एवढ्या मोठ्या संख्येने स्वत:ला गुरु म्हणवणारे लोक पाहून त्याच्यापुढे खरे गुरु कोण? हा पेच उभा राहिला. पण बुद्धीमान असलेल्या या व्यापा-याने एक युक्ती केली. तो प्रत्येक तथाकथित गुरुंकडे गेला. आपण माझे प्राण वाचवलेत, त्याबद्दल मी तुम्हांला दोन सुवर्णमुद्रा भेट देऊ इच्छितो असं म्हणत त्याने त्या गुरुंना दोन दोन सुवर्णमुद्रा देऊ केल्या. आणि त्या सर्वांनी त्या स्वीकारल्या!
– —- व्यापारी निराश झाला. पण इतक्यात त्याला कुणीतरी तेग बहादूर यांचेकडे जाण्यास सुचवले. गुरुंच्या समोर दोन सुवर्णमोहरा ठेवताच गुरु तेग बहादूर म्हणाले… यात ४९८ सुवर्णमुद्रा कमी आहेत! समुद्रात जहाज बुडत असताना गुरुंना व्यापा-याने पाचशे सुवर्णमुद्रा देण्याचा नवस मनातल्या मनात केला होता… त्यामुळे कुणालाही सुवर्णमुद्रांची पाचशे ही संख्या माहीत असणे अशक्य होते. हे सामर्थ्य केवळ सिद्ध पुरुषांच्या अंगीच असू शकते, हे व्यापा-याने ओळखले… त्याचा गुरु शोध तेग बहादूर यांच्यापाशी थांबला! त्याने घराबाहेर धाव घेतली आणि आनंदातिशयाने ओरडून लोकांना सांगितले… गुरु सापडले! तेंव्हापासून शिखांचे नववे गुरु म्हणून श्री तेग बहादूरजी यांचे नाव प्रसिद्धीस आले. त्यांनी माता नानकी यांच्या नावाने एक नवीन नगर वसवले. जे पुढील काळात आनंदपूर म्हणून प्रसिद्ध झाले.
काश्मिरातील हिंदू पंडित समुदायाने इस्लाम धर्माचा स्विकार करण्याची सक्ती औरंगजेबाने केली. अन्यथा वाईट परिणामास तयार रहा असा इशाराही दिला. त्यामुळे घाबरून गेलेल्या पंडितांनी मदतीसाठी गुरु तेग बहादूर यांचेकडे धाव घेतली. हिंदू समुदायाने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शीख समुदायाकडे साहाय्य मागणे ही विशेष बाब होती. श्रीगुरू तेग बहादूर यांनी आपल्या अनुयायांना घेऊन दिल्लीकडे कूच केले.
त्यावेळच्या मुघल बादशाह औरंगजेबाची भेट घेऊन काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी सशस्त्र संघर्ष करण्याचीही त्यांची तयारी होती. औरंगजेबाने गुरु तेग बहादूर आणि त्यांच्या अनेक अनुयायांना आग्रा येथेच कैद केली. मग दिल्लीत आणून त्यांच्यावर आणि त्यांच्या अनुयायांवर अमानुष अत्याचार केले. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यास अभय देण्याचे आमिषही दाखवले. पण धर्मवीर श्री गुरु तेग बहादूर यांनी स्पष्ट नकार दिल्यावर आधी त्यांचे अनुयायी भाई मतीदासजी, भाई सतीदासजी, भाई दयालाजी यांचे शस्त्राने कापून, आगीत जाळून आणि अशाच अत्यंत क्रूर पद्धतीने प्राण घेतले. तरीही कुणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही. शेवटी गुरु तेग बहादूर यांचा औरंगजेबने जाहीर शिरच्छेद करवला.
– – – या सर्वांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची कुणाची हिंमत नव्हती. तेवढ्यात त्या जागी एक मोठे वादळ उठले… धूळ उठली. गुरुजींचे अनुयायी जैता जी यांनी गुरुंचे मस्तक तिथून पळवले व ते आनंदपूर येथे पोहोचले. गुरुंचे सुपुत्र गुरु गोबिंदसिंग यांनी या मस्तकावर तेथे अंत्यसंस्कार केले. इकडे गुरुंचे दुसरे अनुयायी बंजारा लखी शा यांनी गुरुजींचे धड स्वत:च्या घरी नेले. व मुघल सैनिकांच्या नजरा चुकवून घरातच त्यांचे अग्निसंस्कार केले. त्यासाठी त्यांनी घरातच चिता रचली व घरच पेटवून दिले!
– – हिंदू समाजाच्या रक्षणासाठी शिख गुरुंनी अशाप्रकारे बलिदान दिले. या त्यांच्या कामगिरीमुळे गुरु तेग बहादूर यांना ‘ हिंद दी चादर ‘ अर्थात हिंदू धर्मावर घातले गेलेले संरक्षक वस्त्र, कवच अशी उपाधी दिली गेली.
… गुरु तेग बहादूर यांनी रचून ठेवलेल्या पायावरच पुढे गुरु गोबिंदसिंगजी यांनी खालसा अर्थात पवित्र लढाऊ गटाची स्थापना केली व पुढे मुघलांविरोधात सशस्त्र संघर्ष केला!
– वाहे गुरु:-अद्भूत परमात्मा.
– खालसा:- शुद्ध. फतेह:-विजय.
– जो बोले सो निहाल… जो कुणी शुद्ध मनाने म्हणेल की ईश्वर शाश्वत सत्य आहे.. सत श्री अकाल… तो सुखी, मुक्त होईल!
– – – वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फतेह.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







