डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ माऊलींच्या शब्दांना कडा नाहीत.. -लेखक : सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग ऐकताना मला नेहमी एक गोष्ट विलक्षण आकर्षित करते. त्यांच्या शब्दांना जणु कडा नाहीत.

परिमळ नाही—परिमळु.

गोपाळ नाही—गोपाळु.

सुंदर नाही—सुंदरु.

मनोहर नाही—मनोहरु.

ओंकार नाही—ओंकारु.

आणि मग मध्येच एखादा शब्द येतो—अळुमाळु! “अवचिता परिमळु, झुळकला अळुमाळु…”

हा अभंग मोठ्याने म्हटला तरी मोठ्याने बोलल्यासारखा वाटत नाही. तो आपोआप कुजबुजल्यासारखा होतो. ‘अवचिता’मध्ये आश्चर्य आहे, ‘परिमळु’मध्ये सुगंध आहे, ‘झुळकला’मध्ये वारा आहे आणि ‘अळुमाळु’ तर शब्द कमी आणि गालावरून अलगद फिरलेल मोरपीसच जास्त वाटतं. ‘अळुमाळु’चा प्राचीन मराठीतील अर्थही – किंचित, थोडासा, अल्प – असा येतो.

देवाच्या आगमनाची कल्पना आपण केली तर काय सुचेल?

.. प्रचंड प्रकाश. घंटांचा नाद. आकाशवाणी. काहीतरी भव्य.

.. माऊलींचा देव मात्र तसा येत नाही. तो परिमळासारखा झुळकतो.

कदाचित हीच माऊलींची खासियत आहे. त्यांचा ईश्वर आपल्याला दिपवण्यासाठी येत नाही; तो नकळत आपल्याला व्यापून टाकतो.

मग दुसरा अभंग ऐकावा—

“घनु वाजे घुणघुणा

वारा वाजे रुणझुणा…”

इथेही मेघ ‘गर्जत’ नाही. तो घुणघुणतो. वारा ‘सुसाट’ वाहत नाही. तो रुणझुणतो. पुढे ‘भवतारकु’, ‘चंदनु’, ‘नंदनु’ असे शब्द येत राहतात.

‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’मध्ये तर हा नाद आणखी विलक्षण होतो. अवगुणु, कमळदळु, निश्चळु, सुगंधु, परिमळु, सुंदरु… शब्द एकामागून एक येतात आणि अभंगाचा अर्थ समजण्याआधीच त्याची लय मनाला समजते.

इथे एक भाषिक गंमत मात्र आहे.

या शब्दांच्या शेवटी येणारा ‘उ’ हा प्रत्येक वेळी माऊलींनी केवळ शब्द मऊ करण्यासाठी जोडलेला नाही. ज्ञानेश्वरीच्या भाषेवरील अभ्यास पाहिला तर जुन्या मराठीत अकारान्त पुल्लिंगी शब्दांची अनेक एकवचनी रूपे उकारान्त असणे हे त्या काळच्या भाषेचेच वैशिष्ट्य होते. म्हणजे ‘सुंदरु’, ‘परिमळु’, ‘ओंकारु’ यामागे व्याकरणही आहे.

भाषेने माऊलींना मऊ माती दिली होती. पण त्या मातीतून त्यांनी घडवले काय, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.

->> त्याच काळच्या भाषेत युद्धही लिहिता आले असते. क्रोध लिहिता आला असता. तिरस्कार लिहिता आला असता.

पण माऊलींच्या शब्दविश्वात वारंवार येते ते काय?

->> परिमळ. मोगरा. वेल. कळी. शेला. कमळ. भ्रमर. चंदन. चांदणे. सखी.

‘मोगरा फुलला’ मध्ये हे तर अगदी टोकाला पोहोचते.

“इवलेसे रोप…”

“वेलु…”

“गगनावेरी…”

“बहरु कळियासी…”

->> आत्मज्ञानासारख्या प्रचंड विषयासाठी माऊली एखादे दार्शनिक रणशिंग फुंकत नाहीत. ते आपल्या दारात इवलेसे रोप लावतात. ते वाढत जाते. गगनापर्यंत पोहोचते. त्याला कळ्या येतात. फुले येतात. आणि शेवटी त्याच फुलांचा शेला विठ्ठलाला अर्पण होतो.

ज्ञानेश्वरांना विश्व समजावून सांगायचे आहे; पण ते त्यासाठी विश्वाचा आकार वाढवत नाहीत.

ते रोप लहान करतात आणि त्या इवल्याशा रोपातून आपल्याला गगन दाखवतात.

मला वाटते माऊलींच्या भाषेचा हा फार मोठा गुण आहे, त्यांच्या अध्यात्मात धाक नाही.

“रूप पाहतां लोचनी”मध्येही विठ्ठल ‘महान’, ‘सर्वशक्तिमान’, ‘अजेय’ वगैरे नाही.

->> तो ‘बरवा’ आहे.

“तो हा विठ्ठल बरवा

तो हा माधव बरवा…”

->> आणि पुढे तो “सर्व सुखाचे आगरु” आहे.

देवाचे वर्णन करताना ‘बरवा’ हा शब्द वापरण्यासाठी देवाबरोबरचे नाते किती जवळचे असावे लागेल! ज्याच्यापुढे थरथरायचे त्याला ‘बरवा’ म्हणता येत नाही. ज्याच्यावर प्रेम करायचे त्यालाच म्हणता येते आणि इथे मला वाटते शब्दांच्या पलीकडे माऊलींचे व्यक्तिमत्त्व दिसायला लागते. त्याचा सर्वांत मोठा पुरावा कदाचित अभंगात नाही, तर पसायदानात आहे.

जगात ‘खल’ आहेत, हे माऊली नाकारत नाहीत. दुष्टपणा आहे, अंधार आहे, दुरित आहे. पण त्यावर त्यांचा उपाय काय?

… खळांचा नाश होवो? नाही.

“जे खळांची व्यंकटी सांडो. ” ->> माणूस जाऊ नये. त्याचा वाकडेपणा जावा.

आणि एवढ्यावरही ते थांबत नाहीत,

 “तया सत्कर्मी रती वाढो. ” ->> वाईट माणसाला शिक्षा मिळावी, अशी इच्छा नाही. त्याला चांगल्या कामाची आवड निर्माण व्हावी, ही प्रार्थना आहे.

नंतर, “भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचें. ”

आणि अंधाराबद्दलसुद्धा ते ‘अंधार नष्ट करा’ अशा आक्रमक भाषेत बोलत नाहीत.

“दुरितांचे तिमिर जावो. ”

->> जणु सूर्य उगवावा आणि अंधाराने स्वतःच निघून जावे. किती विलक्षण आहे हे!

->> माणसाच्या वाईटपणाबद्दल बोलतानासुद्धा माऊली शब्दांची तलवार काढत नाहीत.

म्हणूनच आता मला वाटते, ‘अळुमाळु’, ‘परिमळु’, ‘गोपाळु’, ‘सुंदरु’, ‘मनोहरु’, ‘रुणुझुणु’, ‘घुणघुणा’, ‘गगनावेरी’, ‘कळियासी’ हे फक्त गोड आवाजाचे जुने मराठी शब्द नाहीत. त्या शब्दांमधून एक वृत्ती सतत डोकावत राहते.

जगाला समजावून सांगायचे आहे; जिंकायचे नाही.

माणसाला बदलायचे आहे; मोडायचे नाही.

ईश्वर दाखवायचा आहे; त्याची भीति घालायची नाही. 

कदाचित म्हणूनच महाराष्ट्र त्यांना ‘ज्ञानेश्वर महाराज’ म्हणतो, पण त्याहून जास्त प्रेमाने ‘माऊली’ म्हणतो.

‘महाराज’ या शब्दात आदर आहे. पण ‘माऊली’ या शब्दालाही कडा नाहीत. आणि तेच त्यांच्या रचनांनाही शोभून दिसते..

***

लेखक : सुबोध गाडगीळ

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted