श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ युद्ध… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
अजिंक्य त्यांना वाटे किल्ला बुरूज माझे अभेद्य नव्हते
बरे जाहले गुपीत माझे हल्लेखोरां कळले नव्हते
*
दीड वितीचे इथे रणांगण समोर नखभर होते योद्धे
प्रेक्षणीय पण लुटूपुटूचे रण लढणेही नशिबी होते
*
दिग्विजय कुणी बहाल केला गल्लीमधल्या विजयालाही
नाचविले कुणी माझे घोडे फत्ते जणु की अश्वमेधही
*
तहास आणिक माघारिसही रणनीतीची चढली झूल
पराजयाला कधी लाभली हौतात्म्याची उदात्त भूल
*
लुटूपुटूचे घावहि घातक ओरखड्यांच्या जखमा प्राणा
चकमकसुद्धा गांभीर्याने घ्यावी, उशिरा आले ध्याना
*
केली जी मी घायाळांस्तव फळास आली चुकुन प्रार्थना
अर्पू लागले पामर काही मला फुकाची श्रेयवंदना
*
न्यूनांचे अन् वैगुण्यांचे फिटता फिटता फिटले रिंगण
चक्रव्यूहही आले ध्यानी सरले सारे बाळबोधपण
*
नुरली ईर्ष्या अजिंक्यतेची तटबंदीची सरली चिंता
युद्ध न उरले मुळी कुणाशी स्वतः स्वतःशी लढणे आता!
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





