श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ युद्ध ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

अजिंक्य त्यांना वाटे किल्ला बुरूज माझे अभेद्य नव्हते

बरे जाहले गुपीत माझे हल्लेखोरां कळले नव्हते

दीड वितीचे इथे रणांगण समोर नखभर होते योद्धे

प्रेक्षणीय पण लुटूपुटूचे रण लढणेही नशिबी होते

 *

दिग्विजय कुणी बहाल केला गल्लीमधल्या विजयालाही

नाचविले कुणी माझे घोडे फत्ते जणु की अश्वमेधही

 *

तहास आणिक माघारिसही रणनीतीची चढली झूल

पराजयाला कधी लाभली हौतात्म्याची उदात्त भूल

 *

लुटूपुटूचे घावहि घातक ओरखड्यांच्या जखमा प्राणा

चकमकसुद्धा गांभीर्याने घ्यावी, उशिरा आले ध्याना

 *

केली जी मी घायाळांस्तव फळास आली चुकुन प्रार्थना

अर्पू लागले पामर काही मला फुकाची श्रेयवंदना

 *

न्यूनांचे अन् वैगुण्यांचे फिटता फिटता फिटले रिंगण

चक्रव्यूहही आले ध्यानी सरले सारे बाळबोधपण

 *

नुरली ईर्ष्या अजिंक्यतेची तटबंदीची सरली चिंता

युद्ध न उरले मुळी कुणाशी स्वतः स्वतःशी लढणे आता!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted