मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

गाडगीळ मॅनेजमेंट, सांगली आयोजित मराठी काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांच्या काव्य रचनेस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. ई अभिव्यक्ती मराठी तर्फे श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🖊️

पुरस्कार प्राप्त कविता आज प्रकाशित करत आहोत.

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “पाऊस” ☆ दीप्ती कुलकर्णी ☆

 पाऊस आला, पाऊस आला, घेऊन मृदगंधाला

ग्रीष्मातील त्या उष्ण धरेचा, कणकण संतोषला

जलधारांनी बरसत आलाथेंबातुनी प्रगटला

बळीराजाही पेरायालाशिवारात गुंतला ||||

 *

इंद्रधनुचा मोहक पट तोआकाशी उमटला

बालचमुसह सर्वांसाठीआनंददायी बनला

जलाशयांचा, तरुवेलींचाजीवनदाता ठरला

चिंबही भिजल्या सृष्टीचा तो, सखा जणू भासला ||||

 *

धरतीनेही हिरवा शालुअंगभरी ल्यायला

गवतफुलांचा, फळाफुलांचा, सुगंध साकारला

मातीतुनी या नवकोंबांचाहर्ष दिसू लागला

तनामनाने चाहुल घेताआसमंती विहरला ||||

 *

चातकासही थेंबा घेऊनी, जन्म नवा लाभला

रिमझिम येता जलधारांचा, नाद ही झंकारला

पाऊस आला, पाऊस आला, मोद असा जाहला

नव आशांचा, नव स्वप्नांचा, झुला जणू झुलला ||||

© दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९९ आणि १०० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९९ आणि १०० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. ९९ – – 

जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।

तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ।

मुखे रामनामावळी नित्यकाळी ।

जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ।।९९।।

अर्थ : वाराणसी अर्थात काशीक्षेत्र पुण्याने परिपूर्ण असल्याने खरोखरच जगात धन्य आहे. तिथे गेल्यानंतर तेथील पुण्यप्रभावामुळे आपल्यासह आपल्या पूर्वजांना गती मिळते. मुखाने सदैव श्रीरामांचे नाम घ्यावे असा उपदेश भगवान शंकर तिथे आपल्या कानात करतात.

(पुण्यरासी – पुण्याने परिपूर्ण/भरलेले, गती – मृत्यूनंतर सद्गती अथवा मुक्ती मिळणे) 

विवेचन : या श्लोकात रामनामाचे महत्व स्पष्ट करताना समर्थांनी काशीक्षेत्राचे उदाहरण दिले आहे. आपल्याकडे काशीक्षेत्र सर्व तीर्थांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. त्यावरून ‘ काशीस जावे नित्य वदावे ‘ अशी म्हण आपल्याकडे पडली आहे. म्हणजे प्रत्यक्ष काशीला जायला जमले नाही तरी मला काशीला जायचे आहे असे नेहमी म्हणत राहावे. यावरून काशीक्षेत्राचे महत्व आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे भाविकांमध्ये अशी समजूत आहे की काशीला गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते. केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पूर्वजांना देखील उत्तम गती मिळते. म्हणून ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपण आयुष्यात एकदा तरी काशीला जावे अशी इच्छा असते. पूर्वीच्या काळी तर वृद्ध माणसे काशीला जात असताना तिकडेच देह ठेवला तर मुक्ती मिळाली असे समजत असत. तशी इच्छा मनात धरून बरीचशी मंडळी काशीला जात असत. आजही बऱ्याच भाविकांची तशी श्रद्धा आहे.

वरील श्लोकात दुसऱ्या ओळीत आलेला ‘ जाता ‘ हा शब्द दोन अर्थांनी घेता येतो. पहिला अर्थ म्हणजे काशीला गेल्यानंतर असा घेता येतो तर दुसरा अर्थ काशीला देह ठेवल्यानंतर असा घेता येतो. कोणताही अर्थ घेतला तरी काशी क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे हे लक्षात येते. काशीला भगवान शंकरांचे मंदिर ‘ काशी विश्वनाथ ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. देवाधिदेव महादेवाचे हे स्थान द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे मानले जाते. इथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला भगवान शंकर स्वतः ‘ मुखाने सतत रामनाम घ्या ‘ ही आपल्या हिताची गोष्ट तेथे कानात सांगतात असे म्हटले जाते.

थोडक्यात म्हणजे समर्थांनी या ठिकाणी पुन्हा एकदा भगवान शंकरांचे उदाहरण देऊन रामनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. ज्या काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याने मोक्ष प्राप्ती होते असे आपण मानतो, ते भगवान शंकर स्वतः रामनाम घेतात आणि आपल्यालाही रामनाम घेण्याचा उपदेश करतात. तुम्ही काशीला जा किंवा जाऊ नका. पण मुखाने सतत रामनाम घ्या. तेच तुमच्या हिताचे आहे ही गोष्ट समर्थांनी इथे आपल्या मनावर ठसवली आहे. सातत्याने आपण रामनाम घेत गेलो तर आपला देह, आपले मन पवित्र, शुद्ध आणि स्वच्छ होईल. तेच काशीक्षेत्र होईल.

स्वसंवाद

१. भौतिकदृष्ट्या ‘काशीला’ जाण्याची ओढ असण्यासोबतच, मी माझ्या अंतःकरणात रामनामाची ‘पुण्यरासी’ (काशी क्षेत्र) निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का?

२. जीवाला उत्तम गती प्राप्त होणे म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारे सुख नसून, चालू आयुष्यात रामनामाच्या अनुसंधानात राहून जन्माचे सार्थक करणे आहे, हे मला पटते आहे का?

३. “काशी विश्वनाथ स्वतः प्रत्येक जीवाच्या कानात रामनामाचा उपदेश करतात, ” हे ऐकल्यावर माझ्या दैनंदिन जीवनात रामनाम आदराने घेण्याची माझी वृत्ती अधिक दृढ झाली आहे का?

४. ‘पूर्वजांना गती मिळणे’ आणि स्वतःचा उद्धार करणे यासाठी विनामूल्य आणि अत्यंत सोपे असणारे रामनाम घेण्यासाठी मी रोज किती वेळ शांत चित्ताने देतो?

===== 

 श्लोक क्र. १०० – –

यथासांग रे कर्म ते हि घडेना ।

घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना ।

दया पाहता सर्वभूती असेना ।

फुकाचे मुखी नाम ते हि वसेना ।।१००।।

अर्थ :  पुण्य प्राप्तीसाठी आपण जे कर्म करतो, ते यथासांग घडत नाही. जे काही कर्म आपण त्यासाठी करतो, त्यात काहीतरी उणीव राहिली तरी पुण्य पदरी पडत नाही. सर्व प्राणिमात्रांबद्दल मनात दयेचा भावही उपजत नाही. हे सगळे समजण्यासारखे असले तरी फुकटचे असलेले भगवंताचे नाम देखील मुखात येत नाही.

 विवेचन : समर्थांनी लिहिलेला हा शंभरावा श्लोक विशेष आहे. मानवी प्रवृत्तीवर समर्थांनी अचूक बोट ठेवले आहे. माणूस सगळेच साध्य करण्याच्या मागे लागतो. संसार करता करता पुण्यप्राप्ती व्हावी काही धर्मकार्य करतो. परंतु धार्मिक कार्य करताना त्यात बऱ्याच वेळा काहीतरी उणीव राहून जाण्याची शक्यता असते. ते यथासांग, यथाविधी पार पडेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातून आपल्या गाठी काही पुण्याचा संचय होईल अशी अपेक्षा करणाऱ्या यजमानाच्या पदरी फारसे काही पडत नाही. त्यातच अलीकडच्या काळात धार्मिक कार्ये विधिवत करण्यापेक्षा त्यात ते जास्त देखणे आणि भव्य कसे होईल याकडे लक्ष असते. त्यातून अमाप खर्च केला जातो. आलेली पाहुणे मंडळी, त्यांचे आहेर इत्यादी गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे लागते. ही कोणाला अतिशयोक्ती वाटली तरी वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत यजमानांचे लक्ष धार्मिक कार्यात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त अशी अवस्था होते.

सर्वाभूती ईश्वर असे आपण मानतो. ज्ञानेश्वरीत तर ज्ञानेश्वर माउली ‘ जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत ‘असे म्हणतात. असे केले तरी त्या त्या रूपातील असणाऱ्या ईश्वराचीच पूजा आपल्या हातून घडते. सगळ्या संतांची चरित्रे या दृष्टीने आदर्श आहेत. संत एकनाथांनी तृषार्त गाढवाला पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला. ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे नुसते सांगितले नाही तर रेड्याच्या मुखी वेद वदवून ते सिद्ध केले. पण आपण सामान्य माणसे. आपल्याकडून ‘ सर्वभूती दया ‘ हे तत्व देखील नीट पाळले जात नाही. प्राणिमात्रांचे तर सोडून द्या पण घरातील नोकर, मोलकरीण यांच्याशी तरी आपण समभावाने वागतो का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

समर्थ म्हणतात, इथपर्यंतही ठीक आहे. समजण्यासारखे आहे. पण हे मना, अरे रामनाम किंवा भगवंताचे नाम घेण्यासाठी तर काही खर्च करावा लागत नाही ना? त्यासाठी कोणतेही धार्मिक विधी किंवा खर्च करावा लागत नाही. त्यात काही न्यून किंवा उणीव राहील अशी शक्यता देखील नाही. असे असूनही हे जीवा तू फुकटचे असे भगवंताचे नाम का घेत नाही? संत सोयराबाई म्हणतात, ‘ सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ‘ हेच आपणही करायला हवे.

स्वसंवाद :: 

१. माझ्या हातून होणारी धार्मिक कृत्ये ही केवळ बाह्य प्रदर्शनासाठी होतात की त्यात अंतःकरणाची खरी शुद्धता आणि विधीवरील निष्ठा असते?

२. ज्ञानेश्वर माऊलींच्या “जे जे भेटे भूत” या वचनाचा आदर मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांशी आदराने वागून करतो का?

३. धार्मिक विधीत काहीतरी उणीव राहून जाण्याची भीती असते; पण ज्या नामात कोणतीही उणीव राहण्याची शक्यता नाही, ते विनामूल्य असणारे रामनाम मी आवडीने घेतो का?

– क्रमशः श्लोक ९९ आणि १००

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रखुमाई रुसली” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “रखुमाई रुसली” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

सावळ्या हरी,

ऐकू या तरी,

काय झाला रुसायला

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

रखुमाई म्हणते फुगवून गाल

भक्तांच्या चालीवर तुमचा ताल

या भक्ताघरी काय ठेवलाय हो?

उठसूट घुसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

कोणी ती तुमची जनी का बनी

तिची कशी केली वेणीफणी

दळणकांडण करून गेला

लुगडी धुवायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

तो एक वेडा तुकोबा वाणी

त्याने कुठे लिहिली चार-दोन गाणी

विमान धाडायची गरज होती का

फुकटचे बसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

उगाळलं चंदन हरकत नाही

एकनाथ तसा कुणी परका नाही

श्रीखंड्या बनून तिथंच राहिलात

पाणी भरायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

 चला जावू पुसायला ||

 

आणखीन तो एक सेना न्हावी

त्याची ती धोपटी तुम्ही का घ्यावी

राजाची केली स्वतः हजामत

आणि बसला तासायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

भले दामाजीने धान्य वाटले

त्यासाठी तुम्ही काही करावे म्हटले

पितांबर सोडून

लंगोटीशिवाय काही नव्हतं नेसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

नाम्याचे गेला कीर्तन ऐकायला

अंगात आल्यावानी लागलात नाचायला

तरी बरं, तिथं कबीर होता

सावध करायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

 

चोखोबा एक तर जातीचा महार

त्याने कुठं केलं मायबाप जोहार

त्याच्या संगतीने ढोरं ओढलीत

रोहिदाच्या संग चामडी रंगवलीत

गोरीबासंग मडकी घडवलीत

आता कोण बाकी सांगा गुरुनाथ

काय झालं हसायला…

रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली,

चला जावू पुसायला ||

* * * *

कवी: अज्ञात

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०५ – नारळी पुनव…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०५ – विजय साहित्य ?

☆ नारळी पुनव…! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

आली श्रावण पौर्णिमा

कोळी बांधवांचा सण

शांत झाला दर्या राजा

देई रोजी रोटी धन…!

*

सुरू झाली मासेमारी

शिरे दर्यामधे होरी

बघ नटल्या सजल्या

गोड कोलियाच्या पोरी.

*

रंग रंगोटी करून

बघ सजविली नाव

पूजा करू सागराची

मिळो अंतरात ठाव…! ‌

*

दर्या राजा द्येव त्याचा

आहे नारळाचा मान

भात नारळाचा केला

सजे नैवेद्याचे पान…!

*

गंध फूल अक्षतांनी

होई सागराची पूजा

कर आमुचे रक्षण

ठेव बळकट भूजा…!

*

मासेमारी करताना

ठेव सुरक्षित धनी

तुझ्या पुजेसाठी बघ

किती जमल्या साजणी..!

*

कृपा प्रसादाने तुझ्या

राहो भरलेले घर

होरी खेळू देत माझी

तुझ्या लाटा लाटांवर…!

*

तुझ्या जीवावर करे

कोळी बांधव संसार

आली नारळी पुनव

कर पुजेचा स्विकार…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

झोपाळ्यावर झुलता झुलता

श्रावण हिंदोळे घेतो..

पर्जन्याची रिमझिम झेलत

श्रावण अंगणी येतो…

*

चाहुल देई आषाढ डुंबत

 नाचत तळ्यात मळ्यात

 धुंद होऊन फुलता श्रावण

 खेळे माझ्या अंगणात..

*

श्रावणधारा बरसून जाती

 ऊन पाऊस साजरा..

 सूर्याच्या किरणातून

 नाचत येती जलधारा..

*

 श्रावण येई घेऊन सोबत

 सणवारांच्या दिवसांना..

सृष्टी सारी आनंदून जाई

 उधळून देई गंधांना..

*

रंग गंधांच्या संगती

 श्रावण आणी मोरपिसे

कृष्ण जन्माच्या वेळेचे

 लागे सर्वांच्या मनी पिसे…

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंतिम इच्छा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अंतिम इच्छा ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रोज येऊनी दारवठ्याला

वाट तुझी बघत बसते,

आज उद्या नक्की येशील

समजूत मनाची घालते!

*

 भूल तुला कशी पडली

 दूरच्या स्वप्न-नगरीची,

 सोडून सारी शेती वाडी

 वाट धरलीस त्या देशीची!

*

थकली सारी गात्रं आता

आला दिवस ढकलते,

नाही सोडली वेडी आशा

भरवसा उद्यावर ठेवते!

*

 डोळे माझे मिटण्या आधी

 तुला एकदाच पाहायचंय,

 डोकं ठेवून तुझ्या मांडीवर

 शांतपणे मला जायचंय!

 शांतपणे मला जायचंय!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ व्योमकेशीणी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? व्योमकेशीणी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

वाढता वाढता

परिघ वाढला,

जाहला ब्रह्मांडाएवढा

तूझिया अस्तित्वाचा…

 

सारे मानव

झाले तूझीच

तूही झालीस

तयांचीच…

 

ज्ञानसूर्य होवोनी

पसरलीस किरणे बनूनी

सदगुरु ॐ आई 

विश्वाचिच झाली…

 

एकदेशी न उरली

व्यापिले व्योमकेश,

ग्रहनक्षत्रे, देवही

तव भवती रास करिती…

 

सकल आत्म्यांची

तू आत्मा झालीस,

प्रत्येकाच्या हृदयी तू

तूझिया हृदयी 

ब्रह्मांड वसे…

 

एकरुप झाली

स्व रुप नुरले

पूर्णत्वाची प्रतिमा तू

द्वैत अद्वैतात विरून गेले…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संदूक… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संदूक… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सारीपाटाच्या खेळामध्ये

सोंगटीच्या चालीने ती

चालत राहिली शिणलेल्या

पावलांना घेऊन. ..

काळाच्या पदराखाली

मनातील भावनांना

साठवत राहिली आयुष्यभर,

वेदनांना आवरणं घालून

भळभळत राहिली अश्वत्थामाच्या

जखमेसारखी. ..

शब्दांना सादवत राहिली

मनाच्या संदुकीत स्वतःला

बंदिस्त करून,

डोळ्याच्या बांधावर रिचवत

राहिली हळूहळू स्वतःला

गुह्य अंतरात कायमचे…

 🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रिकामा डबा परत द्यायचा नसतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

सकाळी दारावर टकटक झाली.

सुनिताकाकूंनी दार उघडलं.

समोर वच्छलामामी उभ्या होत्या.

हातात स्टीलचा डबा.

“अगं…

काल तुझ्याकडून उसळ घेतली होती ना…

हा डबा. “

सुनिता काकूंनी झाकण उघडलं.

आत उसळ नव्हती…

चार गरम पुरणपोळ्या होत्या.

“मामी…

हे कशाला? “

मामी हसल्या…

“रिकामा डबा परत दिला की… नातंसुद्धा रिकामं होतं गं. “

तेवढ्यात सुप्रियाकाकूही आल्या.

“काय गं…

आज पुन्हा डब्यांची देवाणघेवाण? “

वच्छलामामी हसल्या.

“अगं…

आपल्या गल्लीत डबा फिरत नाही…

आपुलकी फिरते. “

सगळ्या हसायला लागल्या.

दुपारी सीमाताई आल्या.

त्यांच्या हातात छोटासा डबा होता.

“मामी…

थोडा चिवडा केला होता. “

मामींनी डबा घेतला.

संध्याकाळी तोच डबा परत गेला…

पण यावेळी त्यात घरचा शिरा होता.

सीमाताई म्हणाल्या…

“मामी…

तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता. “

मामी म्हणाल्या…

“बाळा…

रिकामा डबा परत पाठवला…

तर समोरच्याला वाटतं…

काम संपलं.

पण काहीतरी भरून दिलं…

की नातं अजून जिवंत आहे, असं वाटतं. “

त्या दिवशी चारही जणी चहा पित बसल्या होत्या.

गप्पा सुरू झाल्या.

सुप्रियाकाकू म्हणाल्या…

“आठवतंय…

पूर्वी आपल्या गल्लीत एकही घर असं नव्हतं…

जिथे डबे फिरत नव्हते. “

सुनिताकाकू लगेच म्हणाल्या…

“अगं…

एखाद्या घरात भजी झाली…

की चार घरात जायची. “

सीमाताई म्हणाल्या…

“दिवाळीत तर प्रत्येक दारात डबेच डबे. “

वच्छलामामी हसल्या.

“आणि कोणाच्या घरी बाळंतपण असलं…

तर महिनाभर त्या घरात स्वयंपाक करायची गरजच नसायची.

प्रत्येक घरातून एक डबा यायचाच. “

क्षणभर सगळ्या शांत झाल्या.

मग मामी हळू आवाजात म्हणाल्या…

“माझे यजमान गेले तेव्हा…

पहिले पंधरा दिवस…

मी स्वयंपाकच केला नव्हता. “

सुनिताकाकूंनी त्यांच्या हातावर हात ठेवला.

मामी पुढे म्हणाल्या…

“सकाळचा डबा कुणाकडून यायचा…

दुपारचा कुणाकडून…

रात्रीचा कुणाकडून…

तेव्हा समजलं…

भूक पोळीने भागते…

पण दुःख माणसांनी हलकं होतं. “

चारही जणींचे डोळे पाणावले.

तेवढ्यात बाहेरून एका लहान मुलाचा आवाज आला.

“आजी…

आई म्हणाली…

थोडी कोथिंबीर आहे का? “

मामी आत गेल्या.

कोथिंबीर ठेवली.

सोबत दोन टोमॅटो…

आणि एक काकडीही ठेवली.

मुलगा म्हणाला…

“आजी…

आईने एवढं मागितलं नव्हतं. “

मामी हसल्या.

“माहितीय…

पण रिकामा डबा…

आणि रिकामी पिशवी…

दोन्ही परत पाठवायची नसते. “

संध्याकाळी…

सुनिताकाकूंची सून ऑफिसवरून आली.

तिने विचारलं…

“आई…

आज पुन्हा कोणाचा डबा आला होता? “

सुनिताकाकू हसल्या.

“हो. “

“हे सगळं अजूनही चालतं? “

सुनिताकाकू म्हणाल्या…

“हो बाळा…

कारण…

भाजीची चव मसाल्याने येते…

पण नात्यांची चव…

देवाणघेवाणीने येते. “

दुसऱ्या दिवशी…

सुनेने पहिल्यांदाच खीर केली.

तिने एक छोटा डबा भरला.

आणि म्हणाली…

“आई…

हे मामींकडे देऊन येते. “

सुनिता काकू काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या.

त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

कारण…

परंपरा सांगून टिकत नाही…

ती पाहून पुढे जाते.

आज…

आपल्या घरात मोठमोठे फ्रिज आहेत…

महागडी भांडी आहेत…

ऑनलाइन जेवण आहे…

पण…

शेजाऱ्याच्या दारात प्रेमाने ठेवलेला गरम डबा…

आजही कोणत्याच पैशाने विकत मिळत नाही.

कारण…

त्या डब्यात…

फक्त भाजी नसते…

आम्ही आहोत तुमच्यासोबतहा शब्दांविना दिलेला आधार असतो.

आजही…

काही जुन्या घरांत…

स्टीलचा डबा कधीच रिकामा परत जात नाही.

कारण…

त्या पिढीला माहिती होतं…

रिकामा डबा परत दिला…

तर पोट भरलेलं असेल…

पण नातं उपाशी राहील.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हिमालयी फुलराणी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हिमालयी फुलराणी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अष्टाक्षरी) 

रंग यांचा किती गोड

जणू घन आले खाली 

रिमझिम पावसात 

पहा फुले छत्री झाली

*

चिंतामणी म्हणू याला

म्हणू काय मी आकाशी

किती देखणी फुलारी 

रंगभरी मखलाशी

*

हिमालयी फुलराणी 

किती रुबाबच भारी

खसखस फुले म्हणू

नीलवंती जरतारी

*

केसाळली ह्याची पाने

मोठी मोठी छान फुले 

वसे हिमाच्या कुशीत

वाऱ्यासंगे पहा झुले 

*

पाकळ्यात नभ दिसे

कण सोनेरी दाटले

मना मोहिनी घालती 

उपवन हे भेटले

*

पावसाची रिमझिम 

बर्फ सारा फुलांवर

कधी थंडीची लहर

उमलते मनोहर

*

निळी निळी फुले सारी

माझ्या मनात भरली

त्यांच्या रूपाला भाळले 

काव्यातून चितारली

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares