☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
सत्संग-सज्जन प्रशंसा
परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण, भक्ती, सेवाभाव याबरोबरच सत्संग या गोष्टीला तितकेच महत्त्व दिल्याचे आपल्याला गाथेतील अभंगांतून दिसून येते. उच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गातील काही मंडळींकडून तुकाराम महाराजांना अतिशय त्रास दिला जात होता. आम्ही वेद पंडित, शास्त्राचा अभ्यास केलेले, म्हणून आम्हीच अध्यात्माचे जाणकार असे समजून जे समाजातील खालच्या वर्गाचे समजणाऱ्या लोकांना फार पीडा देत असत अशा पाखंडी वर्गावर तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून चांगलेच ताशेरे मारले आहेत.
ब्राह्मण असो की वैश्य असो अथवा शूद्र, संत सज्जन कोणाला म्हणावे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
हिरा ठेविता ऐरणी/ वाचे मारिता जो घणी /
तोची मोल यावे खरा/ करणीचा होय चुरा//
मोहरा तोची अंगे/ सूत न जळे ज्याचे संगे/
तुका म्हणे तोचि संत/ सोसो जगाचे आघात//
संत कसे असतात तर, जो हिरा ऐरणीवर ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही. तोच हिरा
मौल्यवान आहे दुसरे इतर बनावट काचेचे तुकडे असतात कारण ते घाव घालताच त्यांचा चुरा होतो. ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असता सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. त्याचप्रमाणे जो जगाने दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्याला संत म्हणावे.
ते संतांचा महिमा वर्णन करतात.
सकळ चिंतामणी शरीर/ जरी जाय अहंकार समूळ आशा/
निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी/ निर्मळ स्फटिक जसा.//
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/ येती तया पासी अवघे जन//
तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/ मोक्ष तेणे दर्शने//
मन शुद्ध तया काय करीसी माळा/
मंडित सकळा भूषणासी//
हरीच्या गुणे गर्जताती सदा/
आनंद तया मानसी//
तन मन धन दिले पुरुषोत्तम/ आशा नाही कवणाची//
तुका म्हणे तो परीसाहुनी आगळा/
काय महिमा वर्णू त्याचा//
या अभंगात तुकारामांनी संतांची लक्षणे सांगितली आहेत. चित्त शुद्ध असलेल्या संतांबद्दल तुकाराम महाराज गौरवाने बोलत आहेत की ज्याचा अहंकार गेला आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी याचा वास त्यांच्यात नाही तोच स्फटिकासारखा निर्मळ आहे, त्याचे सर्व शरीर चिंतामणीच आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशी, तिची त्याला जरुरी नाही. कारण सर्व तीर्थांना पावन करणारा संत हाच तीर्थस्थान झालेला आहे. सर्व जग अशा पुरुषापाशीच येते. याच्या दर्शनानेच मोक्षाचा लाभ होतो. ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला जपमाळेसारख्या बाह्य चिन्हांची काहीही जरुरी राहिलेली नाही. मन शुद्ध असल्यानेच तो सर्व भूषणांनी मंडित झालेला आहे. जे हरीचे गुणगान करत असतात ते निरंतर आनंदातच असतात.त्यांनी स्वतःला पुरुषोत्तमाच्या ठायी अर्पण केले आहे आणि जो कोणावरही आशा ठेवत नाही तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. संतांच्या दर्शनाने तापत्रयांचा नाश होऊन विश्रांती मिळते.
शुद्ध बीजापोटी/ फळे रसाळ गोमटी/
मुखी अमृताची वाणी/ देह देवाचे करणी//
सर्वांग निर्मळ/ चित्त जैसे गंगाजळ/
तुका म्हणे जाती/ ताप दर्शनी विश्रांती
बीज शुद्ध असले की त्यातून उगवणारी फळे रसाळ आणि गोडच असतात, असं सांगून संत तुकाराम पुढे म्हणतात की ज्याच्या मुखात अमृततुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवकार्यासाठी वापरला जात आहे, ज्याचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे त्याच्या दर्शनाने त्रिविध ताप हरण होऊन चित्ताला विश्रांती मिळते.
सोनियाचे ताट क्षीरीने भरिले/
भक्षावया दिले श्वानालागी//
मुक्ताफळ हार खराशी घातला/
कस्तुरी सुकराला चोजविली//*
वेद पारायण बधिरा सांगे ज्ञान/
तयाची ते खूण काय जाणे//
तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे/
भक्तीचे महिमान साधू जाणे//
एक संत साधूच असा आहे की जो भक्तीचा महिमा जाणतो. सामान्यांना हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगात रोजच्या जीवनातील काही उदाहरणे देतात.
सोन्याच्या पात्रात खीर भरून ती कुत्र्याला दिली तर त्याचा काय उपयोग? त्याचप्रमाणे गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला किंवा डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली
तर त्याचा महिमा त्यांना कळणार आहे का? एखाद्या बहिर्याला(अज्ञानी) माणसाला वेदाचे ज्ञान कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या बुद्धीला समजणार आहे का? जे खरे वर्म आहे ते ज्याचा तोच जाणू शकतो. याच कारणास्तव संतांची संगती धरावी असे तुकाराम महाराजांचे सांगणे आहे.
तुकाराम महाराजांना वैष्णवांचे दास होण्याची तळमळ लागली आहे. कारण ते म्हणतात.
ते माझे सोयरे सज्जन सांगाती/
पाय आठवीती विठोबाचे//
येरा मानविधी पाळणा पुरते/
देवाची ती भुते म्हणोनिया//
सर्व भावे जालो वैष्णवांचा दास/
करीन त्यांची आस उच्छिष्ठाची//
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास/
तैसी नाही आस आणिकांची//
तुकाराम महाराजांच्या मनात हरिदासांविषयी अत्यंत आदर आहे. जे पांडुरंगाच्या चरणांचे चिंतन करतात ते सज्जन माझे सोयरे आहेत असे ते म्हणतात.
बाकीच्यांना मी फक्त विधीपालनापुरते आदराने वागवतो कारण सर्व भूतमात्र देवाच्याच रूपाचे असतात. काया, वाचा, मनाने मात्र तुकाराम महाराज वैष्णवांचे दास आहेत. त्यांच्या उच्छिष्टाची महाराज आशा धरतात. त्यांना हरिदास जितके आवडतात तितके इतर कोणीही आवडत नाही. या अभंगात पर्यायाने सज्जनांची संगती चांगली हे सांगण्याचा महाराजांचा आटोकाट प्रयत्न आहे.
संतांची महती सांगणारा हा आणखी एक अभंग आपण पाहूया.
काय वाणू आता न पुरे हे वाणी/
मस्तक चरणी ठेवीतसे//
संत महात्म्य वर्णन करताना महाराजांची वाणी अपुरी पडते. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणतात,
थोरीव सांडली आपुली परिसे/
नेणे सिवो कैसे लोखंडासी//
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती/
देह कष्टविति पर उपकारे//
भुतांची दया हे भांडवल संता/
आपुली ममता नाही देही//
तुका म्हणे सुख पराविया सुखे/
अमृत हे मुखे स्त्रवतसे//
लोखंड अति हीन आहे, त्याला मी कसा स्पर्श करू? असे मनात न आणता परीस त्याचे सोने करतो, त्याचप्रमाणे संतांनी माझ्या सारख्या हीनाचा स्वीकार केला आहे. संतांचे अवतार जगाच्या कल्याणा करताच असतात, ते आपला देह परोपकार करण्यासाठी कष्टवितात. सर्वांवर दया करणे, हे संतांचे स्वाभाविक भांडवल आहे व त्यांना स्वतःच्या देहाची ममता नसते.
ते संत लोकांच्या सुखामुळेच सुखी होतात आणि त्यांचे बोलणे अमृता सारखे मधुर असते. हरीच्या नामामृताचा ओघच त्यांच्या वाणी वाटे वाहत असतो.
पुढील भागात सज्जन प्रशंसे विषयी आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ति सूत्रे ७० – –
तन्मया : ||७०||
अर्थ : भक्त भगवंतमय झालेले असतात.
विवेचन: विभक्त नाही तो भक्त अशी भक्ताची व्याख्या केली जाते. इथे तन्मय असा उल्लेख आहे. साधना पूर्णत्वास गेली की भक्त आणि भगवंत यांच्यात काही भेद रहात नाही. अशा साधकाचे वर्णन भगवंत गीतेत करतात.
*”नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय|*
*झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले||”*
(गीताई ०४. १०)
संताना ना कोणापासून भय असते, तर कोणासाठी त्यांच्या मनात क्रोध असतो. त्यांच्या मनात फक्त त्या भगवंताबद्दल निरतिशय प्रेम असते. जणू भगवंतच त्यांच्या ह्रदयात विराजमान असतो. आपल्याला हनुमानाची गोष्ट ठाऊक आहे. वेळ आल्यावर हनुमानाने आपली छाती विदीर्ण करून राम आपल्या हृदयात असल्याचे दाखवून दिले होते. अशी सर्व मंडळी ही सामान्य साधकांसाठी भक्तीचे आदर्श आहेत, प्रमाण आहेत.
प्रभू श्रीरामाला हनुमंताला बक्षिस देण्याकरता एकही गोष्ट योग्य वाटली नाही. शेवटी त्याने हनुमंताला आलिंगन दिले आणि त्याचे कौतुक पुढील शब्दांत केले आहे.
“रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।”
संत तुकाराम महाराज म्हणतात की साधना करता करता अशी वेळ आली की मला आता विठ्ठल माझा सोयरा वाटू लागला आहे. सोयरा अर्थात अगदी जवळचा.
ते एका अभंगात म्हणतात,
*”विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥२॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥ सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥४॥” तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥”*
(अभंग क्रमांक 497, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
अर्थ : सिद्ध भक्ताच्या माता, पिता व पूर्वजांना आनंद होतो. देव देवता आनंदाने नृत्य करतात आणि पृथ्वीला रक्षणकर्ता मिळून ती सनाथ होते.
विवेचन : दैनंदिन व्यवहारात एखादा मनुष्य जर श्रीमंत झाला, मोठा उद्योगपती झाला तर त्याचे कूळ तर उद्धरतेच, तसेच त्याच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत असतो.
परमार्थातील अंतिम पायरी म्हणजे भक्त आणि भगवंताचे एकरूप होणे. असे पूर्णत्व प्राप्त करणारे तसे मोजकेच असतात, पण ते असतात यात काही शंका नाही. भारतमातेच्या अशी अनेक नररत्ने जन्मास आली की ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतील आणि ही परंपरा अखंड राहील यात शंका असण्याचे कारण नाही.
एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखाद्या जडजीवाला नरदेह प्राप्त होतो, तेव्हा भगवंताला सर्वात जास्त आनंद होतो कारण त्याला वाटते की आता मी याला नरदेह दिला आहे, तर आता हा साधना करून माझी (अर्थात भगवंताची) प्राप्ती करून घेईल, पण प्रत्यक्षात मात्र लाखो करोडो मध्ये एखादा जीव देवत्वापर्यंत पोचतो. मग ज्याप्रमाणे ऑलिंपिक पदक मिळविल्यावर ज्याप्रमाणे त्या देशातील सर्वांना आपल्या घरी दसऱ्याच्या दिवशी दिवाळी आल्यासारखे वाटतेज तसे साधकाच्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना, पितरांना नव्हे तर देवदेवतांना ही तितकाच उत्कट आनंद होतो असे नारद मुनी आपल्याला सांगत आहेत.
अशा साधकाचे वर्णन संत तुकाराम महाराज आपल्या पुढील अभंगात करतात…
*”निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥२॥ त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्या कारणां पुरता विधि ॥३॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥४॥”*
साधकाच्या अंतरात देवत्व प्रगट झाले की तो सिद्ध होतो. देहाने मनुष्य दिसत असला तरी तो भगवंत झालेला असतो. बाहेरून त्या संताचा व्यवहार कदाचित अतिसामान्य असेल, पण अंतरात मात्र त्याचे अनुसंधान पक्के असते.
त्याच्या नजरेत सर्वजण समान असतात. ते अवतरण करतात, ते आपल्या सारख्या सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी. पूज्य ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की दोन रुपयाचे तिकीट काढले की गोंदवले येथे सगुण ब्रह्म पाहायला मिळायचे. अशा संतांमुळे पृथ्वीवरील पाप नष्ट होते, पृथ्वी सनाथ होते.
जय जय रघुवीर समर्थ
—–
भक्ति सूत्रे क्र. ७२, ७३ – –
*”नास्ति तेषु जाति विद्यारूपकुलधनक्रियादि भेदः ॥७२॥”*
*”यतस्तदीय: ||७३||”*
अर्थ : श्रेष्ठ भक्तांमध्ये जातपात, विद्या (शिक्षण), रूप, कुळ, पैसा, करत असलेले काम इत्यादींवर आधारलेले भेद नसतात, कारण ते भगवतांचे एकनिष्ठ भक्त असतात.
विवेचन : ही दोन्ही एकमेकांस साधारण पुरक आहेत म्हणून त्यांचे विवेचन एकत्र करीत आहे.
भक्ति करणे म्हणजे भगवंतावर अकारण प्रेम करणे हे आपण पाहिले आहे. दैनंदिन व्यवहार करताना मनुष्याला कधी जाणता तर कधी अजाणता मनुष्याला विविध प्रकारचे भेद पाळावे लागतात, अन्यथा त्याला व्यवहार करता येत नाही. उदा. वाहन कोणतेही असले तरी त्या वाहनाला ठेवण्यासाठी वाहनतळच उचित ठरते. वाहन महागडे आहे म्हणून कोणी त्याला झोपण्याच्या खोलीत नेऊन ठेवत नाही, अर्थात ते उचितही नसते.
संत अर्थात पूर्णत्व पावलेला भक्त हा स्वतः देव झालेला असतो. संत कधीही कोणामध्ये भेद पाळत नाहीत, भेद मानीत नाहीत.
आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले एक गीत आहे. — –
*”टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं*
*देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥*
*दरबारी आले रंक आणि राव*
*सारे एकरूप नाही भेदभाव*
*गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग||१||”*
या स्थितीला संत पोहचलेले असतात. कोणत्याही संताच्या स्थानी जावं, तिथे आपल्याला मुक्त प्रवेश मिळेल.
संतत्व प्राप्त केलेला मनुष्य व्यवहारातील भेद लक्षात घेऊन त्या त्या माणसांशी, त्या त्या प्राण्यांशी त्या त्या परीने वर्तन करतात.
श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अशी अनेक उदा. आहेत. त्यातील एक दोन मी इथे सांगतो. एकदा चोरी करायला आलेल्या चोरांना श्रीमहाराजांनी पकडले. त्यांना पोलिसात न देता, पुन्हा चोरी करणार नाही या अटीवर त्यांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. एका मनुष्य त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी आला होता. आपल्याला मारायला आलेल्या मनुष्याला सुद्धा श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याची तयारी केली होती. पण तो मनुष्य घाबरून पळून गेला. तेव्हा श्रीमहाराज म्हणून गेले, की त्याने चांगली संधी सोडली आणि स्वतःचे नुकसान करून घेतले. इतके दयासिंधुत्व संतच दाखवू शकतात. कारण स्वतः परमात्मा त्यांच्या अंतर्यामी कायम स्थित असतो.
प्रकृतीचे स्वतःचे असे विधिविधान आहे. त्यानुसार घटना घडत असतात. अमुक वेळेस पाऊस पडणार किंवा ऊन पडणार हे प्रकृतीच्या अधीन आहे. अनेक सामान्य माणसांना प्रश्न पडतो की संत अवतार घेतात, तर लोकांचे दुःख, दैन्य दूर का करीत नाहीत? या प्रश्नांची अनेक उत्तरे आजपर्यंत आपण पाहिली असतील, पण पुढील उत्तर मला अधिक उचित वाटते.
एकदा श्री रमण महर्षी यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही आपल्या शक्तीचा इतरांच्यापी कल्याणासाठी उपयोग का करीत नाही? तर त्यावेळी रमण म्हणाले की आम्ही दोन कुठे आहोत, आम्ही एकच आहोत. अर्थात मीच परमात्मा आहे आणि मीच सर्व काही करीत आहे. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांचा गोंधळ होऊ शकतो.
साधक जेव्हा सिद्ध होतो, तो गुरू स्वरूप होऊन जातो. तो जगदाकार होऊन जातो. एकदा श्रीमहाराजांना एका भक्ताने विचारले की आमच्या अनेक प्रश्नांचे तुम्ही इतक्या त्वरेने कसे उत्तर देऊ शकता? त्यावर श्रीमहाराज म्हणाले की मला तुमचा प्रश्न आधीच कळलेला असतो. जेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो
तेव्हाच तो मला कळतो आणि जेव्हा तुम्ही येऊन मला प्रश्न विचारता, तोपर्यंत उत्तर शोधायला मला अवधी मिळतो. मग मी त्याचे उत्तर देऊ शकतो. अर्थात श्रीमहाराज आपल्या मनात उपस्थित असतात, नव्हे ते कायम आपल्या मनात असतात, असे म्हणता येईल. भगवंताची एक उपाधी मन अशीच आहे, नाही का?
*”जेथे नाम, तेथे माझा प्राण | ही सांभाळावी खुण ||”*
– – श्री गोंदवलेकर महाराज
भक्तीच्या पहिल्या पायरीवर भक्त देवाला म्हणत असतो की *तस्य एव अहम्*.
अर्थात त्याचे रूप, गुणवर्णन ऐकले आहे, पण प्रत्यक्षात तो कसा आहे हे माहित नाही. पण तो मला आवडतो.
भक्तीच्या दुसऱ्या पायरीवर भक्त देवाला म्हणतो की *तव एव अहम्*.
अर्थात भक्त भगवंताच्या सान्निध्यात असतो. भगवंत भक्ताच्या सोबतीला असतो. *”जेथे जातो तेथे तू माझा सांगाती”* अशी भक्ताची खात्री असते.
भक्तीच्या तिसऱ्या पायरीवर भक्त आणि देव एकच होत असतात. *”मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानची* अशी स्थिती असते. देव आणि भक्त एकमेकाला म्हणतात, *त्वम् एव अहम्*. ही तदियतेची स्थिती म्हणता येईल.
यापुढील स्थितीमध्ये भक्त देवाला म्हणतो भक्तीचे सुख भोगण्यासाठी मला भक्तच राहू दे नि तू भगवंत रहा.
संत तुकाराम महाराज या स्थितीचे वर्णन पुढील प्रमाणे करतात.
*”नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव | मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥ दावी रूप मज गोपिका-रमणा | ठेवीन चरणावरी माथा ॥२॥ पाहोनि श्रीमुख देईन आळिंगन | जिवे लिंबलोण उतरीन ॥३॥ पुसता सांगेन हितगुज मात | बैसोनि एकांत सुख गोष्टी || ४|| तुका म्हणे यासी न लावी उशीर | माझे अभ्यंकर जाणोनीया ॥५॥”*
संदर्भ : अभंग क्रमांक २२७८, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
‘वर्डस्वर्थ‘ म्हणतात बालक हा माणसाचा पिता आहे. त्यांचा मुलांच्या निरागसतेवर, प्रामाणिकपणावर, बेफिकीर स्वभावावर व शुद्ध हृदयावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे टागोर सुद्धा निरागस, निष्कपट बालकांमध्ये रमतात. लहान मुले पाहताना त्यांच्यात त्यांना निसर्ग दिसतो, परमेश्वर अनुभवता येतो.
टागोरांना वाटतं, लहान मुले व निसर्ग आपल्याला खूप कांही शिकवित असतात. टागोरांच्या आठव्या कवितेमध्ये ते एका राजघराण्यातील मुलाबद्दल लिहितात. मौल्यवान वस्त्रांमुळे व अलंकारांमुळे त्या मुलाला खेळतांना मोकळेपणा मिळत नाही. त्यामुळे तो उदास होऊन बसतो. मुलांसाठी खेळ, मित्र त्या मौल्यवान वस्रांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पण हे मोठ्या माणसांना कळत नाही. त्यांना आपलं समाजातील स्थान, त्या स्थानाचा आब राखणं जास्त महत्वाचं वाटतं. कवी त्या मुलाच्या आईला सांगतात की या तुमच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांमध्ये लहानांना जखडू नका. मातीत खेळल्यामुळे मुले निरोगी राहतात. सर्व थरांतील मुलांबरोबर खेळल्यामुळे त्यांना सामाजिक भानही येतं. टागोरांना वाटतं की हे मानवी जीवन जत्रेसारखं आहे. बरंच काही वाईट आहे, दुष्टपणा आहे, गलिच्छपणा आहे, पण बरंच काही आनंद देणारं, चैतन्य देणारं, जगण्याची इच्छा बळावणारंही आहे. जसं जत्रेतून जावं असं कधीच वाटत नाही तसंच हे जीवन देखिल आपल्याला बांधून ठेवतं, आसक्ती निर्माण करतं. लहान मुलं मात्र ह्या लोभ, मोह, स्वार्थ यापासून कोसो दूर असतात.
आजच्या साठाव्या कवितेत देखिल टागोर लहान मुलांच्या विश्वावर भाष्य करतात. हे विश्व म्हणजे एक सागर आहे. ते म्हणतात लहान मुलं निरागसपणे काठावर वाळूत खेळतात. पाण्यात कागदाच्या नावा सोडतात. शिंपल्यांशी खेळतात. वाळूत घर बांधतात. आणि निसर्गाकडून घेतलेलं सगळं निसर्गावरच उधळून देतात. त्यांना ना तिथल्या मोत्यांचा, ना तिथल्या माशांचा हव्यास आहे. लाटा क्रुद्ध होतात तेव्हा त्यांची भीती इतरांना, मोठ्यांना आहे पण लहान मुलांना ती भीती पण नाही. लाटा लहान मुलांसारख्या असतात, त्या कितीही क्रुद्ध झाल्या तरी किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि जणू त्या मुलांसाठी मृदु स्वरांत अंगाई गातात.
टागोरांनी गीतांजलीत लहान मुलांशी संबंधित अशा मोजक्याच ३/४ कविता समाविष्ट केल्या आहेत. त्यातून ते अधोरेखित करतात की, मुलांचे विश्व आणि मोठ्यांचे विश्व खूप वेगळे असते. मोठ्यांना मोह असतो, भय असते. जे मुलांना स्वभावतःच अजिबात नसते. या कवितांमधून ते लहान मूल आणि प्रौढ माणसं यांच्यातल्या विरोधी वृत्ती प्रकर्षाने दाखवतात.
—–
☆ गीत: ५८ ☆
LET all the strains of joy mingle in my last song ⎯ the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and
waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of
pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word.
ON the seashore of endless worlds children meet. The infinite sky is motionless overhead and the restless water is boisterous. On the seashore of endless worlds the children meet with shouts and dances.
They build their houses with sand and they play with empty shells. With withered leaves they weave their boats and smilingly float them on the vast deep. Children have their play on the seashore of worlds.
They know not how to swim, they know not how to cast nets. Pearl fishers dive for pearls, merchants sail in their ships, while children gather pebbles and scatter them again. They seek not for hidden treasures, they know not how to cast nets.
The sea surges up with laughter and pale gleams the smile of the sea beach. Deathdealing waves sing meaningless ballads to the children, even like a mother while rocking her baby’s cradle. The sea plays with children, and pale gleams the smile of the sea beach.
On the seashore of endless worlds children meet. Tempest roams in the pathless sky,
ships get wrecked in the trackless water, death is abroad and children play. On the
seashore of endless worlds is the great meeting of children.