श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ नावात काय आहे? – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

पॅसेंजरने उतरुन मी स्टेशनबाहेर आलो. डाॅक्टरांना सकाळी दहा वाजता भेटायचं होतं आणि आताशी नऊ वाजले होते. माझ्याकडे अजून एक तास शिल्लक होता. मला भुक लागली होती. मी स्टेशनजवळची हाॅटेल्स पाहिली पण ती एकजात सगळी गचाळ होती. मला आठवलं ज्या डाॅक्टरांकडे जायचं होतं त्यांच्या जवळच एक समर्थ रेस्टॉरंट होतं. मी एकदोनदा तिथं चहा प्यायलो होतो. तिथल्या गरमागरम पदार्थांच्या वासाने मला तेव्हा नाश्ता करायची इच्छा झाली होती. पण घाईत असल्याने मी नाश्ता केला नव्हता. आज मात्र माझ्याकडे वेळच वेळ होता शिवाय मला भुकही लागली होती. माझी पावलं आपसूकच त्या हाॅटेलकडे वळली. हाॅटेल बऱ्यापैकी मोठं होतं. स्वच्छही दिसत होतं पण तरीही तिथं अजिबात गर्दी नव्हती. वीसपंचवीस टेबलपैकी फक्त दोन टेबलवर दोन माणसं बसली होती. मागेही मी आलो तेव्हाही या हाॅटेलमध्ये गर्दी नव्हती. या हाॅटेलची क्वालिटी वाईट तर नाही? नाही तर अगदी मोक्याच्या ठिकाणी असूनही तिथं गर्दी का नसावी? प्रश्न पडून मी घुटमळलो आणि दुसऱ्या हाॅटेलमध्ये जाऊ असा विचार करुन मी पायऱ्या उतरणार तेवढ्यात गल्ल्यावरच्या माणसाने आवाज दिला. ” काहो साहेब काय हवं होतं? ” 

” काही नाही नाश्ता करायचा होता ” 

” अहो मग या ना. आलूवडा आहे, मिसळ आहे. भजी, पोहे, चहा, काॅफी सगळं आहे. या सगळं गरम मिळेल ” 

मी थोड्या नाराजीनंच आत येऊन एका टेबलवर बसलो

वेटर लगबगीने पुढं आला.

” काय आणू साहेब? ” त्यानं विनम्रतेनं विचारलं 

” गरम काय आहे? “

” मिसळ एकदम गरम आहे. बाकी वडा, भजेही ताजे आहेत”

” एक मिसळ आण “

तो गेला आणि दोनच मिनिटात मिसळपाव घेऊन आला‌. सोबत दही, चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि एका मोठ्या वाटीत मिसळीचा रस्सा. मिसळीचा वास तर खुप छान येत होता

मी कांदा टाकून मिसळीचा घास घेतला. मस्तच होती मिसळ. पावही एकदम साॅफ्ट आणि ताजे होते. मिसळ खाताखाता मी हाॅटेलमध्ये नजर टाकली. हाॅटेलच्या भिंती आणि फर्निचर जुनं दिसत होतं. यामुळे तर लोक इथं येत नसावेत? पण ती शक्यता मी फेटाळून लावली. बऱ्याच गावातली यापेक्षा जुनी आणि गचाळ हाॅटेलं जोरात चालत असलेली मी पाहिली होती. याचं हाॅटेलच्या पुढच्या चौकात एक ब्रजवासी नावाचं हाॅटेल होतं. तेही गचाळच होतं पण तिथं नेहमीच गर्दी दिसायची. काही हाॅटेल्सचं नशीबच वाईट असतं. नाहीतर इतकी चांगली चव असतांना लोकांनी याकडे पाठ नसती फिरवली.

मिसळ खाऊन झाल्यावर मी चहा मागवला. गवती चहा टाकल्यामुळे तोही खुप चांगला होता. मी तिथं पडलेलं मेनू कार्ड पाहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या पदार्थांचे रेटस् बरेच कमी होते. मी खाल्लेली मिसळ तर फक्त तीस रुपयाची होती. इतका छान चहा तोही फक्त दहा रुपयाचा होता.

मी पैसे द्यायला काऊंटरवर आलो. चाळीस रुपये देऊन तिथल्या माणसाला म्हणालो.

” मिसळ आणि चहा दोन्हीही छान होते ” 

तो कसानुसा हसला मग म्हणाला 

” येत जा साहेब. तुम्ही मागेही एकदोनदा येऊन गेले होते ना? ” 

” हो. बरोबर. चहा प्यायला आलो होतो ” 

त्यानंतर जेव्हा जेव्हा मलकापूरला गेलो. तेव्हा तेव्हा त्याच हाॅटेलमध्ये जाऊन मी नाश्ता केला. तिथले सगळेच पदार्थ रुचकर होते. चहा तर नंबर एक होता. पण हाॅटेलमध्ये नेहमी दोनतीनच गिऱ्हाईक बसलेले दिसायचे. मला त्याचं खुप वाईट वाटायचं. एक दिवस हे हाॅटेल नक्की बंद पडणार याबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही.

मध्ये तीनचार महिने कंपनीनं मला मराठवाड्याचं काम दिलं त्यामुळे मलकापूरला जायला मला जमलं नाही.

चार महिन्यांनी मी परत मलकापूरला गेलो. समर्थ हाॅटेलमध्ये जाऊनच नाश्ता करायचा हे मी ठरवलं होतं. त्यानुसार तिथं गेलो तर समर्थ रेस्टॉरंट कुठंच दिसेना. त्याजागी आता हाॅटेल गुजरात दिसत होतं. म्हणजे माझी शंका खरी ठरली होती. नावासोबत अर्थातच हाॅटेलचं बाह्यस्वरुपही बदललेलं दिसत होतं. आता आलोच आहे तर इथंच नाश्ता करु या विचाराने मी आत घुसलो. काऊंटरवर वेगळाच माणूस बसलेला दिसत होता. याचा अर्थ स्पष्टच होता. पुर्वीच्या मालकाने हे हाॅटेल कुणा गुजराती माणसाला विकलं होतं. आतमध्ये खुप गर्दी होती. एकही टेबल रिकामं दिसत नव्हतं. काय करावं याचा विचार करत असतांनाच वेटर आला. त्यानं मला एका माणसाला सरकावून बसायला जागा करुन दिली. हाॅटेलचा लूक पुर्णपणे बदलला होता. भिंतींना नवीन वाॅलपेपर लागले होते. फर्निचर नवीन दिसत होतं. मी मेनू कार्ड बघितलं. पुर्वीच्या टिपीकल भजे, मिसळ, बटाटावडा या पदार्थांसोबत आता खमण ढोकळा, पुरीभाजी, मसाला डोसा, इडली, मेदूवडा असे बरेच पदार्थ नवीन दिसत होते. पदार्थांचे रेटसही तगडे दिसत होते. मागील रेटपेक्षा जवळजवळ दुप्पट. मी मिसळ ऑर्डर केली. एकंदरीत वातावरणावरुन आणि गर्दीवरुन मराठी माणसाला धंदा जमत नाही हे अनेकांचं मत मलाही योग्य वाटू लागलं. मिसळ आली. त्यासोबत नेहमीचाच कांदा दही वगैरे मालमसाला होता पण खाण्याच्या प्लेट्स, चमचे वगैरे आकर्षक दिसत होते. मी चव घेतली. ती पुर्वीसारखीच छान होती. याचा अर्थ आचारी बदलला नव्हता. यावेळचा चहा मसाला घालून केलेला होता. तोही छानच होता. चला मालक बदलला तरी चव तीच पुर्वीची आहे याचं मला समाधान वाटलं. फक्त यावेळी मला दुप्पट पैसे द्यावे लागणार होते याची कुठंतरी खंत वाटत होती. मी काऊंटरवर पैसे द्यायला गेलो आणि चमकलोच. मघाशी तिथं बसलेला माणूस बाहेर उभा होता आणि काऊंटरवर पुर्वीच्या समर्थ रेस्टॉरंटचा माणूस बसलेला होता. मला पाहून तो हसला

” नमस्कार साहेब” 

” नमस्कार. तुमच्या मालकाने हे हाॅटेल गुजराती माणसाला विकलंय का? “

” नाही तर. मीच या हाॅटेलचा मालक होतो आणि आहे ” 

” तुम्ही गुजराती आहात का? “

तेवढ्यात कस्टमर पैसे द्यायला आले म्हणून मी बाजूला सरकलो. कस्टमर गेल्यावर मी परत तोच प्रश्न त्याला केला.

” नाही मी मराठीच आहे “

मी कोड्यात पडलो.

” पण मग तुम्ही हाॅटेलचं नाव का बदललं? “

परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments