श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
जीवनरंग
☆ “पुरस्कार…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
घराला काल रात्रीपासून झोप नाही.
कालच कळलं.. अण्णांना ‘आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालाय.
यंग इंडिया ऑर्गनायझेशन दरवर्षी हा पुरस्कार देतं.. पाच लाख रुपयांचा. मज्जा आहे बुवा अण्णांची.
अण्णा वेडा माणूस. त्याहून वेडी माई… हे वेड मजला लागले. वेड्याची बायको.. माईला वेड्याची बायको होण्यात काय सुख वाटायचं कुणास ठावूक? आपण तरी काय करणार?
.. तर काय सांगत होतो? हा अण्णा चांगला मुख्याध्यापक होता जिल्हा परिषदेच्या शाळेत. मोजून पंधरा वर्ष नोकरी केली. आयुष्यभर काटकसरीत जगला. पै पै साठवला… खरं सांगतोय.. परवडायचं नाही म्हणून मूलही होऊ दिलं नाही. काय म्हणायचा माहित्येय? शाळेतली मुलं ही माझीच मुलं. असला वेडा माणूस…
त्याला माईची साथ… कल्याणमस्तु!
एक दिवस वेडाचा झटका आला. दिली नोकरी सोडून. गेली दोघं जव्हारच्या जंगलात. झोपडीत राहिली तिथं दोघं. कुठली तरी ठाकरवाडी. एक एक पोरगं गोळा केलं. शाळा सुरू केली… झोपडीतच.
वह्या, पुस्तकं, औषधं, पोरांना पुरेसं अन्न… सब कुछ… स्पाॅन्सर्ड बाय आण्णा.. साठवलेल्या पैशातून.
तो सुद्धा संपत आला. शाळा हा एकच ध्यास. त्यासाठी सगळा अट्टहास. दिसेल त्याच्यापुढे हात पसरले.
.. अण्णा नेहमी म्हणायचे. चांगल्या कामासाठी, शिक्षणासाठी, हात पसरताना कधीही लाजू नये. सरकारी अनुदानासाठी धडपड चालू होती. अण्णांच्या चपलांचे अनेक जोड झिजून मेले. टेबलाखालचे व्यवहार अण्णांना कधी जमलेच नाहीत.
वाईट माणसं भेटली तशी काही चांगलीही. टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत गेलं. अण्णांनी सगळं लक्ष विद्यार्थ्यांवर केंद्रित केलं. नुसत्या मार्कांची फॅक्टरी नको होती अण्णांना… चांगल्या माणसाचं वाण देणारी शाळा हवी होती.
– अण्णांनी शाळा तशीच घडवली… शिस्त पाळणारी… संस्कार जपणारी… मातीला न विसरणारी.
अण्णांची शाळा म्हणजे हिऱ्याची खाण… जिथं मुळाक्षरं पोचली नव्हती, तिथली मुलं शिकली. मोठी झाली.
कुणी सरकारी अधिकारी झाले. कुणी डाॅक्टर झाले. कुणी इन्जिनिअर झाले… आणि कुणी शिक्षक….. अण्णांच्या तालमीत तयार झालेले शिक्षक पुन्हा अण्णांना येवून मिळाले. अण्णांची काळजी मिटली.
शाळा एकदम जाऊ दे जोरात. ते जाऊ दे हो.. प्रत्येक जण ‘चांगला माणूस’ झालाय. बरीच जणं शहरात गेली. तरीही मातीला विसरली नाहीत. जमेल तेवढी मदत आठवणीनं करायची. शाळेसाठी, वाडीसाठी.
अण्णा आणि माई… सेकंड इनींग्जची सुरवात. आयुष्यभर कधी ‘टाईमप्लीज’ म्हणलं नाही. आता दोघंही थकली..
सदानंद… अण्णांचाच विद्यार्थी. इंजिनिअर झालाय. काही दिवस नोकरी. आता स्वतःचं युनिट काढलंय भोसरीला. जेवढं कमावतो, त्यातले निम्मे वाटतो. त्याची बायकोही त्याला साजेशी. दोघंही अण्णांचेच विद्यार्थी. अण्णांवर दोघांचा भारी जीव. माई अण्णा दोघं आता त्याच्याकडेच असतात.
…. अण्णांना पुरस्कार मिळाल्यापासून सगळे आनंदात.
समारंभ छानच झाला. तुडुंब गर्दी. अण्णांचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम संपवून मंडळी घरी.
बक्षिसाचा चेक अण्णांनी माईच्या हातात दिला…
” यावर तुमचा हक्क. आयुष्यभर तुमची कुठलीही हौसमौज पुरवता आली नाही. स्वतःच्या सगळ्या इच्छा तुम्ही मारून टाकल्या. तुमचं एखादं तरी स्वप्न यातून पुरं करा..”
माई गहिवरल्या..
” खरं सांगू, डोळे भरून युरोप बघायचा होता एकदा…”
”ठरलं तर मग.”
.. “आधी तुमच्या दोघांचा पासपोर्ट काढायला हवा. महिनाभरात होऊन जाईल ते काम. मग तुमच्या युरोप टूरचं बुकींग करू…” सदानंद उवाच.
सदानंदने फारच मनावर घेतलं. चार आठवड्यात पासपोर्ट आला सुद्धा.
” उद्या जाऊ यात टूरिस्ट कंपनीच्या आॅफीसात ” अण्णांनी माईंना आठवण करून दिली.
” काही नको. पैसे संपले. काल गजा आला होता. तुम्ही गेला होतात चेकअपला. वाडीतल्या शाळेतली शिक्षकाची नोकरी सोडलीये त्यानं. तो तिकडे निघालाय बीड जिल्ह्यात… ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढतोय. तुमची खूप वाट बघितली. शेवटी कंटाळून गेला. लगोलग सदाला बोलवून घेतला. पुरस्काराची ती रक्कम त्याच्या खात्यात वळती केली. त्या पैशाची खरी गरज तिथं होती. म्हणून म्हणलं, टूरटूर करू नका फार…”
…. अण्णा गडगडाटी हसले… अगदी मनापासून. कौतुकानं त्यांनी माईंकडे बघितलं. माई नव्या नवरीसारख्या लाजल्या.
…. अण्णांनी दुसऱ्यांदा’जीवनगौरव पुरस्कार’पटकावला.
|| माई अण्णा प्रसन्न ||
© कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




