सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ जिंदगी जीने के लिए… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“आयुष्यात दोन शक्ती महत्त्वाच्या •••• एक सहन शक्ती व दुसरी समज शक्ती ” •••

 काल बऱ्याच दिवसांनी अनघा घरी म्हणजे माहेरी आली. लग्न झाल्यावर पहिले वर्ष सणवार म्हणून तिचे येणे होत असे. पण आता घरी सासू सासरे, एक छोटं बाळ, म्हणजे घरात तीन लहान मुले. यांना सांभाळण्यात तिचा वेळ कसा जातो?? ते तिलाही कळत नाही. त्यातच आता सासरे आजारी आहेत, म्हंटल तर अजून काम वाढलेले आहे. अजय तिला खूप मदत करतो. आई बाबांची जबाबदारी जणू त्यानेच घेतली आहे. त्यांचे औषधपाणी बघणे, डॉक्टर ची visit त्यानंतर ब्लड टेस्ट, इतर टेस्टसाठी त्यांना नेणे -आणणे. तो खूप शांतपणे करत असतो. अनघाही त्याला साथ देते. •••

येवढ्यातच बाबा आजारी पडल्यापासून, तो आई बाबांना आपल्या घरी रहायला घेऊन आला. आतापर्यंत आई बाबा स्वतंत्रपणे अगदी आरामात रहात असत. बाबा सर्व काम स्वतः करत असत. कोणावर अवलंबून नव्हते. पण आता आजारपणामुळे नाईलाजाने त्यांना येथे येणे भाग पडले. मनातून त्यांना हे आवडत नव्हतेच. पण काय करणार?? म्हातारपण म्हणजे अनेक न आवडणाऱ्या गोष्टी करायला भाग पाडणारा आयुष्याचा काळ. •••• 

येथे आल्यावर सर्व व्यवस्थित सुरू झालं. पण बाबा सारखी चिडचिड करत असत. अनघाला कळतच नव्हत की आम्ही कुठे कमी पडतोय? कधी कधी अजयचे पण बाबांबरोबर खटके उडू लागले. आई शांत असायच्या. पण बाबा मात्र लहान सहान गोष्टींवरून चिडत असतं. ••••

एकदा त्यांचे औषध दोन तीन दुकानात शोधून ही मिळाले नाही. अजयच्या मिटिंगची वेळ झाल्यामुळे, संध्याकाळी जाऊन पुन्हा बघतो, असा विचार करून अजय औषध न घेता घरी परत आला. ••••

” माझं औषध मुद्दामच आणल नाही. असं कसं औषधं मिळालं नाही?? सर्व औषध मिळतात फक्त हेच मिळाल नाही. ” असं म्हणून बाबा खूप रागावले व जेवले नाही. तसेच झोपले. त्यांच्या अशा वागण्याने घरातील वातावरण खराब झाले. ••••

दुपारी चहा घेताना आई अनघाला म्हणाल्या, ••• “अगं! ! आजाराने ते त्रस्त झाले आहेत. त्यांना परावलंबन आवडत नाही. म्हणून असे वागतायेत. तुम्ही दोघे खरंच खूप लक्ष देत आहात. अनघा तू समजून घे बाबांना. “•••••

थोड्या वेळाने अनघाच्या कानावर सहजच आई बाबांचे बोलणे पडले. बाबा आईंना म्हणत होते, ••• “ही मुलं आपल्याकडे लक्ष देत नाही. आपण त्यांना जड झालो आहोत. बघ आज औषध आणल नाही. तेंव्हा आपण आपल्या घरी जाऊ. ” आईंनी त्यांच्या म्हणण्याला ••• ” हो का?? तुम्हाला असं वाटतं का?? बरं, आपण जाऊया घरी म्हणून दुजोरा दिला. “••••

अनघाला वाईट वाटले आत्ता तर आई काही वेगळंच बोलत होत्या आणि आत्ता काही वेगळंच. •••••

आज अनघाने आपल्या आई बाबांना बोलताना हे सर्व सांगितले. व रडू लागली. अजून काय करावं?? अशी अपेक्षा आहे त्यांची?? मला कळतच नाही. ••••

अनघाची आई म्हणाली, •••

अग! ! तुझा थोडा गैरसमज झालाय.

थोडा विचार कर. पूर्ण आयुष्य स्वतंत्र पणे जगणाऱ्या माणसाला या परावलंबी परिस्थिती शी जुळवून घेता येत नाहीये. त्यात म्हातारपण, आजारपणामुळे त्यांच्या मनात असंख्य विचार येत असावेत. नेहमी एक्टीव्ह राहणाऱ्या माणसाला पलंगावर पडून राहणे जड जातंय. आपल्यामुळे इतरांना होणारा त्रास त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नाही. त्यातच मुलांच्या होणारा खर्चाची काळजीही वाटत असावी. आणि आजींचे म्हणशील तर त्यांचेही वय झालंय. व या उतार ‌वयात बाबांना सांभाळण्याचे काम करायचे आहे. त्यांची होणारी सतत चिडचिड आईंनाच झेलायची आहे. उगीच वाद नको म्हणून परिस्थितीला सांभाळायला त्या तसं म्हणतात. तू समजते तसा अर्थ नाही. म्हणजे तू त्याचा तसा अर्थ काढू नको. अग! म्हातारपण म्हणजे बालपणच लहान मुलांसारख. कधी कधी त्यांच्या हो मधे हो मिसळावे लागते. थोड्यावेळाने ते ती गोष्ट विसरून जातात. तसंच काहीसं आहे हे. •••••

आयुष्यभर समजदारीने वागणारा माणूसही म्हातारपणी कसा वागेल??? सांगता येत नाही. तुला आठवतंय ना आपले आजोबा कसे करायचे?? आयुष्यभर प्रत्येक पाहुण्याची सरबराई करणारे, भरपूर खाऊपिऊ घालणारे आजोबा, शेवटी फार विचित्र वागत होते. जेवताना त्यांच्या जवळ कोणी गेले की माझे जेवण हा घेईल या भीतीने ते रागवत असत. ••••

अनघा हे सर्व विचार मनातून काढून टाक. तू आणि अजय छान काम करत आहात. जास्त काम पडतंय तुला हे मान्य आहे. पण आपल्या माणसांची काळजी घेणे हे आपलेच काम असते ना. सध्या दुसरी इतर कामे करू नको. स्वतः कडेही लक्ष दे. गरज असल्यास स्वयंपाक करायला एखाद्या मावशी मिळतात का बघ. वेळ पडली तर एजेंन्सी मधून बाबांसाठी एखादा सहायक मदतीला ठेव. •••

आईच्या बोलण्याने अनघाच्या मनातले अनावश्यक, तिला मानसिक त्रास देणारे विचारांची दिशा बदलली. तिला आई चे म्हणणे पटले. ••••

बाबा शांतपणे ऐकत होते. म्हणाले, •••• अगं! ! आई बरोबर सांगतेय. हे बघ हे सर्व आम्ही दूर बसून तुला सांगतोय. पण त्या situation मधे जो असतो, तेंव्हा तुमची मानसिक परिस्थिती वेगळी असते. पण शांत रहायचे. हे लक्षात ठेव. ••••

विचारांची दिशा बदलली, व अनघा शांत झाली. तुम्ही संभ्रमात असताना योग्य मार्गदर्शन मिळाले की प्रश्न सूटतात. •••

अनघाच्या आई बाबांनी आपली जबाबदारी छान पार पाडली. मुलांचे केवळ कौतुक न करता, चूका सुद्धा लक्षात आणून देणे, त्यांचे कर्तव्य व जबाबदारी त्यांना समजावून सांगणे, योग्य मार्गदर्शन करणे, ही जबाबदारी आई वडिलांचीच असते. •••

म्हणताना ना, ••••

” रिश्तों की कद्र करनी हो, तो 

वक्त रहते कर लिजिए जनाब 

बाद में सूखे पेड़ों को पानी देकर

हरियाली की उम्मीद करना बेकार हैं।”•••

म्हणतात ना, •••

“जिंदगी जीने के लिए दो शक्तियों की जरूरत होती है एक सहन शक्ती और दूसरी समझ शक्ती”।••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments