श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ कीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“साहेब आम्ही गरिब माणसं. कुठून आणणार एवढे पैशे. मावशींना तर माहितेय आमचा घरचा माणूस धड कामधंदा करत नाही. वाटलं तर घेऊन जातो रिक्षा नाहीतर पत्ते खेळत बसतो. नाहितर दारु पिऊन तमाशे करतो. मीच चारपाच घरची धुणीभांडी करुन संसार चालवते” 

तिनं बोलताबोलता पदर डोळ्यांना लावला.) – इथून पुढे — — 

“असंय पुष्पा की ती सायकल नवीनच आहे. तरीसुध्दा तुला आम्ही निम्म्या किमतीत देतोय. तू गरीब आहे म्हणून किराणा दुकानदार तुला फुकटात किराणा देतो का?गॅसवाला फुकटात सिलिंडर देतो का?नाही ना? मग नवी सायकल फुकटात कशी मिळेल?चल ठिक आहे चार हजारात घेऊन जा. एक हजार अजून कमी केले तुझ्यासाठी ” तिची किंव‌ येऊन मी म्हणालो

“नाही ना साहेब. चार हजार सायकलला दिले तर मी महिना कसा काढू?”

“साॅरी चार हजारापेक्षा कमी नाही होणार. फुकटात तर अजिबातच नाही मिळणार सायकल ” मी निक्षून सांगितलं तशी ती न बोलता निघून गेली. मला थोडं वाईट वाटलं. आपण एवढं कठोर‌ व्हायला नको होतं असं वाटून गेलं. पण पै पैचा हिशोब ठेवून कुटुंबाला वर आणणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला फुकट मागू नये आणि फुकट देऊ नये या स्वभावातून बाहेर येणं शक्य नव्हतं.

असाच महिना निघून गेला. त्या दरम्यान सुरेखानं मला सायकलबद्दल काय विचार केला असं दोनदा विचारलं पण मी तिला बाहेरचं कुणी गिऱ्हाईक आलं तर चार हजारात विकून टाकू पण फुकटात सायकल द्यायची नाही असं निक्षून सांगितलं.

त्यानंतर मी माझ्या काही व्हाॅट्सअप ग्रुपवर ” नवीकोरी गियरची सायकल योग्य किंमत आल्यास विकणे आहे. कृपया संपर्क साधावा ” असा मेसेज टाकला. आसपासच्या सायकल रिपेयरच्या दुकानदारांनाही सायकलबद्दल सांगून आलो. कुणीतरी येऊन सायकल घेऊन जाईल असा मला विश्वास वाटत होता. एकदा काॅलनीत काम करणाऱ्या माळ्याला सांगितल्यावर तो सायकल पहायला आला. पण ती आधुनिक सायकल त्याला नको होती. मागे कॅरियर असलेली साधी पण दणकट सायकल त्याला हवी होती. रात्री काॅलनीत गस्य घालणाऱ्या गुरख्यालाही ती दाखवली पण त्यालाही सामान ने-आण करण्यासाठी उपयुक्त असलेली सायकल हवी होती. मग एका रविवारी ही सायकल रिपेअर करणाऱ्या पंक्चरवाल्याकडे गेलो. त्याला गिऱ्हाईकाबद्ल विचारल्यावर तो म्हणाला ” साहेब मी तुम्हांला त्याच दिवशी सांगितलं होतं की आजकाल ज्यांना डाॅक्टरांनी वजन कमी करायला सांगितलंय ते किंवा सायकलिंगचे शौकीन लोकच सायकल विकत घेतात. आणि असे लोक जुन्या सायकली सहसा घेत नाहीत. तुम्ही तुमच्या ओळखीच्या गरीब माणसाला ती ज्या किंमतीला जाईल त्या किमतीला विकून टाका. नाहितर भंगारमध्ये द्या ” 

मी निराश झालो. मग मी कौस्तुभच्या मित्रांना फोन लावले. सायकलिंग असोसिएशनच्या कुणा सदस्याला सायकल हवी आहे का विचारलं. पण सध्यातरी कुणालाच सायकल नको होती. उलट त्यांनी मला ती सायकल लंडनला कौस्तुभकडे पाठवून द्यायचा सल्ला दिला. पण कौस्तुभलाही तिथं सायकल नको होती. भंगारवाल्याला विचारलं तर तो सातशे रुपये देत होता. अर्थातच मी नकार दिला.

एक दिवस संध्याकाळी सुरेखानं मला विचारलं 

“मग मिळतंय का सायकलला कुणी गिऱ्हाईक?”

“अजूनतरी नाही. पण मिळेल कधी ना कधी ” मी आशेने म्हणालो

“तुम्हीही ना काही पण जिद्दीपणा करता. आणि तोही फक्त चार हजारासाठी. चार हजारात कोणती बिल्डिंग बांधणार आहे आपण?तीन महिने झाले तुमच्या या जिद्दीपणामुळे ती सायकलही धुळ खात पडलीये आणि ती पुष्पाही ताटकळत बसलीये. दर आठवड्याला ती मला सायकलबद्दल विचारते. साहेबांना समजावून सांगा म्हणते. तिला काय उत्तर द्यावं तेच मला समजेनासं झालंय ” सुरेखा चिडून म्हणाली 

” तू मला जिद्दी म्हणतेय पण तुझी पुष्पा किती जिद्दीपणा करतेय हे तुला दिसत नाही. खरी गरजू असती तर थोडी घासाघीस करुन अडिच तीन हजारात सायकल घेऊन गेली असती. पण तिला तर फुकटच पाहिजे आहे ” मी रागावून म्हणालो.

” अहो पण मी म्हणते आपल्याला काय कमी आहे? मुलीचं लग्न होऊन गेलंय. मुलगा लंडनला चांगला कमवतोय. पुण्यातल्या दोन फ्लॅटचं चांगलं भाडं येतंय. तुमचा स्वतःचा तीन लाख पगार आहे. दागदागिने, एफ. डी. भरपूर आहेत. तीन प्लाॅट आहेत. रिटायर झाल्यावर तुम्हाला पेंशनही भरपूर मिळेल. अहो जे इन्कम येतंय त्यातला पाव हिस्सा सुध्दा खर्च होत नाहीये. आपल्या दोघांना मेलं लागतं तरी किती! मग त्या चार हजारासाठी तुम्ही एवढा का जीव काढताय? लोक लाखो रुपयांचं दान करतात. आपण एक साधी जुनी सायकल दान करु शकत नाही? बरं ते दानही काही वाया जाणारं नाही. ते सत्कारणीच लागणार आहे. देऊन टाका ना मेली ती सायकल “

तिचं बोलणं ऐकून मी थंडगार झालो. काय चुकीचं बोलत होती ती? मी उगीचच हटवादीपणा करतोय याची जाणीव मला झाली. तरीपण मला शरणागती पत्करावीशी वाटेना. मी शेवटचं अस्त्र वापरलं

” ठिक आहे तिला म्हणा एक टोकन म्हणून एक हजार दे आणि घेऊन जा सायकल ” 

” अरे रामा! अजूनही हजार रुपयात जीव अटकलाच आहे का? अहो पुष्पाच्या जागी दुसरी बाई असती तर मी काहीच बोलले नसते. पण पुष्पा इमानदार आहे. मुख्य म्हणजे ती खाडे करत नाही, उर्मट बोलत नाही, नखरे करत नाही. कामंही किती छान आहे तिचं. नाहीतर इतर बायका किती त्रास देतात ” 

” बरं बरं. सांग तिला उद्या घेऊन जा ” मी शेवटी पराभव पत्करला. तिच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले 

” हे ऐकून बिचारीला खुप आनंद होईल ” ती हसत म्हणाली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून घरी आलो तेव्हा पोर्चमध्ये सायकल दिसली नाही.

” काय झालं? नेली का सायकल?” मी सुरेखाला विचारलं 

” हो. तिचा मुलगा येऊन घेऊन गेला ” 

” काय म्हंटली पुष्पा? खुश झाली असेल “

” कशाची खुश! खालीपिली साहेबांनी तीन महिने बर्बाद केले म्हणे. अगोदरच दिली असती तर पोराचा पायी जायचा त्रास तरी वाचला असता असं म्हणत होती “

म्हणजे सायकल फुकटात देऊनही मीच अपराधी झालो होतो. बाईने आभार तर मानलेच नव्हते उलट मलाच दोषी ठरवलं होतं.

एक महिन्याने मला दिल्लीला ऑफिस कामानिमित्त एक आठवड्यासाठी जावं लागलं. परत आलो तर सुरेखा सिंकमध्ये भांडी घासत होती.

” काय गं पुष्पा येणार नाहीये का आज?”

” नाही. तिनं आपलं काम सोडलं ” 

” सोडलं? का?”

” का म्हणजे? तिला दुसरीकडे दहा हजार पगाराचं काम मिळालं म्हणून ती तिकडे गेली ” 

” दहा हजार पगार? अशी कोणती नोकरी मिळाली बुवा तिला?” मी आश्चर्याने विचारलं.

” नोकरी नाही. हेच धुणीभांडी, झाडूपोछा आणि दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाचं काम आहे. मोठा बंगलाआहे म्हणे आणि तीन भावांच्या फॅमिली एकत्र रहातात. कामंही तेवढंच जास्त असणार ” 

मला आठवलं माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एम. ई. केलेला भाचा एका कंपनीत नुकताच लागला होता. त्याला दहा हजारच पगार होता. म्हणजे तिसरी शिकलेली पुष्पा आणि लाखो रुपये खर्च करुन एम. ई. केलेला भाचा समान पातळीत आले होते. मला आजकालच्या शिक्षणातील झालेल्या घसरणीची आणि माझ्या भाचाची चांगलीच किंव आली.

” मग काय तूच धुणीभांडी करणार आहेस का?”

” तुम्हांला तर काय आनंदच होईल मी केलं तर. पैसे वाचतात ना तुमचे! मी लावून घेतलीये दुसरी बाई. उद्यापासून येणार आहे ” 

मला आठवलं आमच्या लग्नाच्या वेळी मी साधा क्लार्क होतो. पगारही कमीच होता. तेव्हा माझी आई आणि सुरेखा दोघी मिळून धुणीभांडी, घराची साफसफाई, स्वयंपाक करायच्या. एवढंच नाही तर पापड, वेफर्स, कुरडया, लोणची, दिवाळीचा फराळ सगळं घरीच व्हायचं. आई गेली तरी अगदी मुलं काॅलेजला जाईपर्यंत हे सुरु होतं. सुरेखा तोपर्यंत अगदी चवळीची शेंग होती. पण घरकामाला आणि अगदी पोळ्या करायलाही बाई यायला लागली तेव्हापासून सुरेखाला चांगलाच आराम मिळू लागला. सोबत तिचं वजनही वाढू लागलं. मग हळूहळू डायबेटिस, बी. पी. , गुडघेदुखी, कंबरदुखी हे आजार तिच्या मागे लागले. मुलीचं लग्न झाल्यानंतर तर ती एकदमच परावलंबी झाली. तिच्या हातच्या भाज्या मला आवडायच्या म्हणून तेवढं सोडून प्रत्येक कामाला तिनं बाई लावून घेतली होती. आणि त्यातली एक जरी बाई कामाला आली नाही तर ती चिडचिड करायची.

— क्रमशः भाग दुसरा 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments