श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ जो दुसऱ्यावरी विसंबला…  ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“दिलीप, त्या तुझ्या परवाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आली आहे? ” रवीकाका आपल्या मुलाला विचारत होते.

आता इथे आधी हे सांगायला पाहिजे की स्वतः रवीकाका गेली अनेक वर्षं इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात होते, गेले वर्षभर त्यांचा मुलगा दिलीपसुद्धा या क्षेत्रात जम बसवू इच्छित होता आणि आज काका ज्या साखरपुड्याची चौकशी करत होते, ती दिलीपने घेतलेल्या एका कार्यक्रमाची होती, स्वतः दिलीपच्या साखरपुड्याची नव्हती.

“हां, बाबा, मी ते फ्लॉवर डेकोरेशनचं चंदूला सांगितलं आहे, रिया केटरर्स बघती आहे, रमेश खुर्च्या सोफे आणणार आहे, आणि… ” दिलीप सांगू लागला. त्याला मधेच थांबवत काका म्हणाले, “अरे, पण तू काय करणार आहेस? “

“हे काय, मी फोन करून फॉलोअप घेतोय ना, ” दिलीप.

“इकडे ये बेटा, दोन मिनिटं बस माझ्या शेजारी, ” काका त्याला म्हणाले, “मी तुला एक गोष्ट सांगतो. “

थोड्याशा नाखुशीनेच दिलीप काकांजवळ बसला.

“वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बोईसर MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)- उद्योगनगरीमध्ये एक छोटा लेबर कॉन्ट्रॅक्टर राहत होता.

वेगाने वाढणाऱ्या या कारखान्यांना खात्रीशीर कामगारांची गरज असायची. कुशल कामगारांना चांगल्या पगारावर कायम स्वरुपी नोकऱ्या मिळायच्या. अडचण आणि चणचण असायची ती अकुशल कामगारांची.

झाडू मारणे, कच्चा माल अथवा तयार प्रॉडक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवणे, ट्रक रिकामा करणे अथवा भरणे – त्या दिवशी, त्या कारखान्यात जे काम सांगितले जाईल ते काम करायला लागणारा कामगारवर्ग – यांना कायमस्वरूपी कामावर घेतलं, तर उगाच भारंभार पगार द्यावा लागायचा, आणि हवे तेव्हा हे कामगार मिळाले नाहीत, तर कामाचा खोळंबा व्हायचा, कंपनीचं नुकसान व्हायचं.

मग मालकांना यावर पर्याय मिळाला तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचा. येत्या आठवड्यात आपल्या कारखान्यात किती टेम्पररी कामगार हवे आहेत हे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं जायचं, त्या कामगारांना – जसं ठरलं असेल तसं दर पंधरा दिवसांनी वा दर महिन्याला – वेतन दिलं जायचं, प्रत्येक मजूरामागे कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कमिशन दिलं जायचं.

माणसांना रोजगार मिळायचा, कंपनीला खात्रीशीर माणसं मिळायची आणि कॉन्ट्रॅक्टरला कमिशन. सगळे खुश!

यात अट एकच असायची, की काय वाट्टेल ते झालं, तरी ठरलेल्या संख्येइतके मजूर कॉन्ट्रॅक्टरने पुरवणं बंधनकारक असायचं. जर तो तितके मजूर पुरवू शकला नाही, तर त्याला दंड व्हायचा किंवा midc मध्ये नाव बदनाम व्हायचं आणि मग त्याला कॉन्ट्रॅक्टस मिळणं कमी होत जायचं.

तर या कॉन्ट्रॅक्टरला एका कंपनीत सहा मजूर देण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, स्थानिक सहा माणसं घेऊन त्याचं कामही छान चाललं होतं.

आता हा कॉन्ट्रॅक्टर आपलं कार्यक्षेत्र विस्तारायच्या विचारात होता, आणि त्याच्या सुदैवाने तशी संधी चालूनही आली. त्याच कंपनीला expansion करायचं होतं, त्यांना पंधरा दिवसांनी पुढच्या वर्षभरासाठी आणखी तीस अकुशल कामगार लागणार होते.

कंपनीने याला विचारलं. हा कॉन्ट्रॅक्टर हरखला, वाढणाऱ्या कमिशनचे आकडे त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले, त्याने तत्क्षणीच होकार देऊन टाकला.

होकार दिला तर खरा, पण आजूबाजूला चौकशी केल्यावर कंपनी देत असलेल्या पगारात इतके मजूर काही मिळेनात. दोन दिवस गेले तरी काही सोय होईना.

हा कॉन्ट्रॅक्टर हवालदिल झाला. इतक्यात त्याची भेट “साहू”शी झाली. साहू दोन चार वर्षांपूर्वी ओरिसा राज्यातून बोईसरला आला होता आणि आता इकडचाच झाला होता. त्याला पहिली नोकरी याच कॉन्ट्रॅक्टरने लावून दिली होती.

“काय जाला, शाब? ” ओरिया मिश्रित मराठीत साहू विचारता झाला. याने त्याचा प्रॉब्लेम सांगितला.

“अरे, बस! इतनीसी बात है, शाब? फिर ये साहू किस दिन काम आयेगा? आपने मुझे पहिला जॉब दिया था. आपका एहसान है मेरेपे. ” तो म्हणाला की त्याच्या ओरिसात पुष्कळ ओळखी आहेत आणि जायचा यायचा खर्च दिला आणि वर थोडे पैसे दिले, तर आठ – दहा दिवसांत तो तीस माणसं सहज आणू शकेल.

कॉन्ट्रॅक्टरचं टेन्शन कमी झालं. असंही त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता आणि साहूला तो गेली काही वर्षं ओळखत होता. त्याने साहूला पैसे दिले आणि दहा दिवसांत – म्हटल्याप्रमाणे, साहू तीस माणसं घेऊन आला.

कॉन्ट्रॅक्टरने दोन खोल्या भाड्याने घेतल्या, त्यात ही सगळी माणसं राहू लागली.

कंपनीत ही नवी माणसे कामाला लागली, त्यांचे पगार, कॉन्ट्रॅक्टरचे कमिशन सगळं छान सुरू झालं. नंतर नंतर या कॉन्ट्रॅक्टरचा साहूवरचा विश्वास वाढत गेला. कोणत्याही नव्या कंपनीत माणसं लागली की तो साहूला फोन लावायचा, साहू ओरिसाहून माणसं आणायचा, कमिशनचा आकडा वाढत जायचा.

आता साहूने नोकरी करणं सोडून दिलं होतं, तो या कॉन्ट्रॅक्टरचा उजवा हात म्हणून काम करत होता. आणि हा कॉन्ट्रॅक्टर साहूच्या जीवावर निर्धास्त होता.

एके दिवशी ज्या कंपनीने अगदी सुरुवातीला तीस नवीन कामगार मागवले होते, त्याच्या मॅनेजरचा या कॉन्ट्रॅक्टरला फोन आला. कंपनीची मॅनेजमेंट बदलली जात होती, एक परदेशी कंपनी या कंपनीला विकत घेत होती त्यामुळे पंधरा दिवस पगार मिळायला उशीर होणार होता. हे कानावर घालण्यासाठी मॅनेजरने फोन केला होता.

कॉन्ट्रॅक्टरने लगेच साहूला फोन केला. तो म्हणाला की कामगारांना त्यांच्या रोजच्या शिध्यासाठी, वरखर्चासाठी काही पैशांची सोय करणे गरजेचं होतं. आणखीनही एक दोन कंपन्यांतील कामगारांसाठी अशी तात्पुरती सोय करायला लागणार होती.

पगार झाला, की कामगारांकडून हे पैसे वळते करून घेता येणार होते.

त्याने एका खाजगी सावकाराचा नंबर कॉन्ट्रॅक्टरला दिला. कॉन्ट्रॅक्टरने लगेच त्या नंबरवर फोन करून पैशांची मागणी केली, महिन्याभरात व्याजासकट पैसे परत करण्याचा वायदा केला. व्याजाची रक्कम पठाणी होती, पण बँकांकडून कर्ज मिळवण्यात वेळ जाणार होता, आयकराची आणि कायदेशीर बाबींची झंझट लागली असती त्यापेक्षा हे सोपे होते.

कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेऊन साहूला दिले आणि सगळं काही आलबेल झाल्याबद्दल निःश्वास सोडला.

दोन आठवड्यांनंतर मॅनेजरचा कॉन्ट्रॅक्टरला फोन आला, आदल्या दिवशी कामगारांचा पगार झाला होता, पण आज त्यांच्यापैकी कोणीच कामाला आलेले नव्हते. मॅनेजरचा हा फोन चालू असताना दोन तीन इतर फोन येत असल्याचं कॉन्ट्रॅक्टरला लक्षात आलं.

“मी बघतो काय झालंय ते, ” असं म्हणत यानं फोन ठेवला, पाहिलं तर तीन वेगवेगळ्या कंपन्यांतून फोन आलेले. तीनही ठिकाणी फोन करून विचारलं, तर तिथंही कामगार कामावर आले नव्हते.

कॉन्ट्रॅक्टरला दरदरून घाम फुटला. त्याला काहीच सुधरेना. काय झालंय? काय होतंय? काहीच समजेना.

दोन मिनिटांनी भानावर आल्यावर त्याने पहिले छूट साहूला फोन लावला. त्याला ठाऊक असेल, तो काहीतरी मार्ग काढेल – याला आशा होती, याला खात्री होती… पण, पण साहूचा फोन स्विच ऑफ होता.

हा कावराबावरा झाला, भानावर आला, मोटरसायकलला लाथ घातली अन् त्या कामगारांच्या खोलीकडे सुटला. बघतो, तर खोल्या रिकाम्या, सामान नाही, माणसं नाहीत. साहूने नंतर आणलेल्या माणसांच्या खोल्यांवर तो गेला – तिथंही तीच परिस्थिती.

आजूबाजूला चौकशी केली, साहू सगळ्या माणसांना घेऊन गावाला पसार झाला असं कळलं.

हा कपाळाला हात लावून बसला. दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून घेणेकऱ्यांनी तगादा लावायला सुरुवात केली. साहूने अनेक कारखान्यातील कामगारांसाठी या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने पैसे उचलले होते, त्याच्या नावाने मोठ्ठे कर्ज करून ठेवलं होतं आणि आता ते पैसे घेऊन त्यानं पोबारा केला होता.

याची दुनिया उलथीपालथी झाली. पठाणांचा ससेमिरा पाठी लागला. त्यांची देणी देता देता त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तोंडाला फेस आला. घरातले दागदागिने आणि अगदी मोटारसायकलही विकली आणि सावकारांच्या हातापाया पडून त्याने आपली सुटका करून घेतली.”

गोष्ट सांगताना रवीकाका थांबले. आणि दिलीपच्या खांद्यावर हात ठेऊन सांगू लागले, “त्या साहूवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेऊन आपला घात करून घेणारा तो कॉन्ट्रॅक्टर मी होतो. तेव्हा मी बचावलो, पण तुझे आजोबा खूप घाबरले, त्यांना माझी काळजी वाटू लागली. त्यांनी मला बोईसरहून निघून दुसरीकडे जायला सांगितलं, मी या शहरात आलो, कामं करता करता इव्हेंट मॅनेजमेंटच्या दुनियेत पाय रोवले.

कामांची वाटणी करायची, इतरांकडून कामं करवून घ्यायची हे योग्य आहे. पण आळशी व्हायचं नाही, आंधळा विश्वास ठेवायचा नाही.

साहूच्या ओंजळीने पाणी पिताना मी गाफील राहिलो. माझी तीच चूक तू करू नकोस. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, हे तुला सांगण्यासाठी हा सगळा उद्योग, ” रवीकाका हसत हसत म्हणाले आणि आपली चूक उमगून, ती सुधारण्यासाठी दिलीपही कामाला लागला.

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments