सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दुभंग… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नंदिनी-प्रतापच्या लेकीचं, नेहाचं लग्न दोन दिवसांपूर्वीच पार पडलं होतं. काल नेहाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा झाली होती. आज नेहा आणि तिचा नवरा पराग नेहाच्या माहेरी आले होते. नेहाचा भाऊ नचिकेत आणि रश्मीवहिनी उद्या दुबईला परतणार होते. प्रताप कॅनडाहून या लग्नासाठीच आला होता. काही कामानिमित्त तो बाहेर गेला होता.

नेहा-पराग, रश्मी, नचिकेत, सुकन्या आणि सलील यांच्या गप्पा छान रंगात आल्या होत्या. हास्य-विनोदाला उधाण आलं होतं. नंदिनीचे सासू-सासरे त्यांच्या खोलीत आराम करत होते. नंदिनीही आपल्या खोलीत आवराआवर करत होती. मधूनच कीचनमध्ये डोकावून शारदाबाईंना जेवायला काय कसं करायचं याच्या सूचना देत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

नचिकेतनं दार उघडलं तर बाहेर प्रताप दोन मोठ्या अवाढव्य बॅगा घेऊन उभा होता. दार उघडताच त्याने ढकलत त्या बॅगा आत आणल्या. नेहा, नचिकेत आणि रश्मीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचत तो म्हणाला, “तुम्हाला सगळ्यांना सरप्राइज द्यायचं होतं. म्हणून हे सामान शिपिंग कंपनीच्या गोडाऊनमध्येच ठेवलं होतं. आता मी कायमचा इकडे आलो आहे. “

त्याचं हे बोलणं ऐकून कोणाच्याही चेहर्‍यावर आनंद दिसला नाही, सगळ्यांची चलबिचल झालेली दिसली. नेहातर पटकन उठून आतल्या खोलीत निघून गेली. नचिकेत, रश्मी आणि सुकन्या- सलील गोंधळून एकमेकांकडे बघू लागले.

प्रताप आपल्या बॅगा आतमध्ये ठेवण्यासाठी वळाला. त्याला नेहा आणि नंदिनी आपल्या आई- वडिलांच्या खोलीत दिसल्या. बॅगा ठेवून तोही त्या खोलीत आला आणि म्हणाला, ‘आई, बाबा, मी आता भारतात परत आलो आहे, तिकडचं सगळं सोडून! आता इथेच एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी शोधण्याचा विचार आहे. ‘ 

यावर बाबांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आई एवढंच म्हणाली, ‘आता वेळ निघून गेली. ‘ आणि तिने नेहाला तिथून निघून जाण्याचा इशारा केला. ‘नंदिनी, तुझी सगळी तयारी झालीय का? नाहीतर तू ती पूर्ण कर. ‘ मग नंदिनीही तिथे थांबली नाही.

प्रताप काही क्षण आश्चर्यचकित होऊन बाहेर जाणाऱ्या नंदिनीकडे पहात राहिला. नंतर म्हणाला ‘तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आई? ‘ 

‘बस तिथे खुर्चीवर, सांगते. ‘

नेहा बाहेरच्या खोलीत आली. मुलांच्या गप्पांची जागा आता हलक्या आवाजातील कुजबुजीनं घेतली होती. नेहा एकदा आईच्या खोलीपर्यंत जाऊन आली. पण नंदिनीनं दार आतून बंद करून घेतलं होतं. आपल्या बेडवर उशीवर डोकं ठेवून ती पडली होती. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंसोबत आजवरच्या आयुष्याचा चलत चित्रपट तिच्या नजरेसमोरून सरकू लागला.

नागपूरस्थित बेंद्रेची नंदिनी एकुलती एक मुलगी. तिची बी. एस. सी. फायनलची परीक्षा झाली आणि प्रताप रानडेचं स्थळ सांगून आलं. बाबांच्या मित्रानेच सुचवलं. प्रतापनं सिव्हिल इंजिनिअरिंगची डीग्री घेतली होती आणि सहा महिन्यांपूर्वी त्याला एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली होती हैदराबादला. त्याचे आई-वडील पुण्यात होते आणि मोठ्या बहीणीचा नवरा मरीन इंजिनिअर असल्याने देश – विदेशात भ्रमंती करत होता.

त्यांचं कुटुंब मात्र मुंबईत अंधेरीला होतं. तिची नोकरी, मुलांच्या शाळा आणि सासरच्या नातेवाईकांचा मोठा गोतावळा यातच ती व्यग्र असायची. सावळी पण आकर्षक नंदिनी, प्रताप आणि रानडे कुटुंबियांना पसंत पडली. दोन्ही बाजूंनी पसंती झाली आणि तीन महिन्यांनंतर एका शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला.

प्रतापसोबत नंदिनीही हैदराबादला रवाना झाली. दोघांचा संसार सुरू झाला. यथावकाश नचिकेत आणि त्यानंतर दोन वर्षांनी नेहाचा जन्म झाला. प्रतापला पुण्यातील दुसर्‍या एका कंपनीकडून नोकरीची ऑफर आली आणि मग मंडळी पुण्यात आई-बाबांसोबत राहायला आली. दोन्ही नातवंडांचा सहवास मिळाल्याने आजी-आजोबादेखील खुश होते. दोनच वर्षांनी प्रतापनं कोथरूडमध्ये पाच खोल्यांचा प्रशस्त ब्लाॅक घेतला आणि आई-बाबांसह त्याचं कुटुंब इकडे राहायला आलं. काळ पुढे सरकत होता.

पुण्यातील नोकरी सोडून प्रताप कॅनडाला नोकरीसाठी गेला, तेव्हा नचिकेत चौथीत आणि नेहा दुसरीत होती. सुरुवातीला कॅनडातील कंपनीसोबत दोनच वर्षांचा करार होता. दोन वर्षे पटकन जातील आणि प्रताप परत येईल असाच विचार घरच्यांनी केला आणि त्याच्या कॅनडाला जायला आनंदाने सहमती दर्शवली.

मुलांच्या शाळा, अभ्यास आणि संगोपनात दिवस कसा संपायचा ते नंदिनीला कळतही नसे. शनिवार- रविवारी प्रतापला सुट्टी असल्याने त्याचा व्हिडिओ काॅल किंवा फोन ठरलेलाच. एकंदरीत आनंदात दिवस चालले होते. दोन वर्षांचा काळ संपत आला. आता एक महिन्यानंतर प्रतापचा करार संपेल आणि तो परत येईल, या विचाराने नंदिनी उल्हसित झाली होती. प्रतापही वारंवार आपण परत यायला कसे उत्सुक आहोत, हेच ऐकवत होता. आणि एक दिवस त्याने कंपनीसोबत पुढच्या तीन वर्षांसाठी नवीन करार केल्याचं तिला सांगितलं. नंदिनी नाराज झाली, पण त्याच्या प्रगतीच्या आड कशाला यायचं, तोही आपल्या कुटुंबासाठीच पैसा मिळवतो आहे ना, अशी तिनं स्वतःची समजून घातली. नवीन करारानुसार प्राप्तीही भरपूर होणार होती. मधल्या काळात डिसेंबरमध्ये दहा दिवसांची विश्रांती होती. प्रताप त्यावेळी पुण्यात येऊन गेला. कुटुंबासमवेत कुलु-मनालीची ट्रीप एंजॉय करून गेला.

नंदिनीचे सासू-सासरे चांगले होते. मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडणं, परत घेऊन येणं ही जबाबदारी सासऱ्यांनी स्वतःहून स्वीकारली होती. सासुबाईंना थोडा अस्थम्याचा त्रास होता. पण तरीदेखील जमेल तेवढी त्या घरकामात मदत करत होत्या. पण नंदिनीला नवऱ्याचा आणि मुलांना वडिलांचा सहवास मात्र मिळत नव्हता. ही भूक फक्त प्रतापच्या फोन आणि व्हिडिओ काॅलवरच भागवावी लागत होती. कामाचा ताण वाढलाय त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही कामात बिझी असतो, म्हणून त्याचे दर आठवड्याला येणारे काॅलही आता नियमित येत नव्हते.

 मुलं आता मोठी होत होती. सकाळी शाळा, दुपारी आराम, मग पोहणं, कराटेचे क्लास यांत ती गुंतलेली असायची. नंदिनीला मोकळा वेळ खायला उठे. आपणही काही तरी छोटी-मोठी नोकरी करावी असा विचार तिच्या मनात आला. सासू-सासऱ्यांनाही तिची अवस्था कळत होती. तिचं मन रमेल म्हणून त्यांनी तिला नोकरी करायची परवानगी दिली.

पुण्यातल्याच एका हाॅस्पिटलची रिसेप्शनिस्ट पाहिजे अशी जाहिरात नंदिनीच्या पाहण्यात आली. प्रयत्न तर करून बघू म्हणून नंदिनी तिथे भेटायला गेली. डाॅ. जयंत साने या स्त्री-रोग तज्ज्ञांचं ते हाॅस्पिटल तसं जुनं होतं. त्यांची आधीची रिसेप्शनिस्ट घरगुती अडचणीमुळे एक महिन्यानंतर नोकरी सोडून जाणार होती.

नंदिनीचं सौम्य सोज्वळ व्यक्तिमत्त्व, गोड बोलणं, शैक्षणिक योग्यता यामुळे आलेल्या ५-६ जणींमधून तिची निवड सहज झाली. घरापासून हाॅस्पिटल जरा लांब असलं तरी स्कूटी घेऊन जाणं नंदिनीला जमण्यासारखं होतं. दहा ते एक आणि ५ ते ७. ३० ही कामाची वेळही सोयिस्कर होती. संध्याकाळी घरी येऊन मुलांना वेळ देणं, स्वैपाक करणं साधता येणार होतं. मधल्या वेळात घरी येऊन संध्याकाळची थोडी तयारी करून ठेवणं शक्य होतं. शिवाय सासू-सासऱ्यांचा आधार होताच घरी.

अशा रीतीने पुढच्या महिन्यापासून तिची नोकरी सुरू झाली. कामातील तिचा चटपटीतपणा आणि सर्व रेकाॅर्ड व्यवस्थित ठेवण्याची पद्धत यामुळे डॉ. साने तिच्यावर खूष होते. शिवाय आलेल्या पेशंटशी तिचं वागणंही आस्थेवाईक होतं, त्यामुळे तिथे येणाऱ्या स्त्रियाही तिच्यावर खूष असायच्या.

सध्या तरी प्रतापला या नोकरीबद्दल न सांगण्याचं तिनं ठरवलं होतं. समजा आपल्याला नाही जमलं तर सोडून देऊ, असाही विचार तिनं केला होता. प्रतापचे काॅलही हल्ली कमीच झाले होते आणि फोनवरदेखील तो घाईतच असायचा. मोघम चौकशी करून फोन ठेवून द्यायचा. पूर्वीसारखा मुलांशीही फारसं बोलत नसे हल्ली तो. घरापासून तो लांब एकटा आहे, कामाचाही ताण आहे, असा विचार करून नंदिनी त्याला समजून घ्यायची. या दोन वर्षांत तर तो भारतात आलाही नव्हता, कामाचा वाढलेला ताण हे कारण देऊन. पण नचिकेत आणि नेहाच्या वाढदिवसाला फोन करायला तो विसरला, ह्याचं मात्र नंदिनीला खूप वाईट वाटलं. तिनंच बाजारातून अमेरिकन चाॅकलेट आणि काही गिफ्ट विकत घेतलं आणि बाबांनी पाठवलं, म्हणून मुलांची समजूत घातली.

तिसरं वर्षही असंच संपत आलं. दिवसेंदिवस त्याचा संपर्क तुटतच चालला होता. जेव्हा त्याने आपण पुढच्या तीन वर्षांसाठी तिथल्याच दुसर्‍या कंपनीत नोकरी स्वीकारणार असल्याचं सांगितलं, तेव्हा मात्र नंदिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण भारतात आता आपल्याला एवढ्या पगाराची नोकरी मिळणं शक्य नाही आणि आपल्या गुणवत्तेला इथे कशा संधी उपलब्ध होत आहेत, हे त्यानं आळवून तिच्या गळी उतरवलं. नंदिनीच्या मनाचं समाधान झालं नाही, पण ते मान्य करण्यावाचून तिच्याकडे उपाय तरी काय होता? मुलांनाही बाबांबद्दल काय सांगायचं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणं तिला अवघड जात होतं. प्रतापच्या आई-वडिलांनीही त्याचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो बधला नाही. त्या दोघांच्याही वाढत्या वयानुसार तब्येतीच्या काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या.

त्यानंतर बरेच दिवस त्याचा फोनही आला नाही. नंदिनीने प्रयत्न केला पण २-३ वेळा त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या काळजीने ती रोज फोन करायला लागली.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments