सुश्री नीता कुलकर्णी

☆ “जाणीव…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गेले काही दिवस त्याचं मन थार्‍यावर नव्हतं. ऊदास झालं होतं.. भरकटलं होतं.. सध्या कुठलीच गोष्ट मनासारखी घडतं नव्हती. कंपनीने दोन महिन्यापूर्वी त्याला कामावरून कमी केलं होतं. चार-पाच ठिकाणी त्याने प्रयत्न केला होता पण काम होत नव्हतं. आज एके ठिकाणी तो गेला होता तिथेही त्याची निराशा झाली होती. वैतागुन मोटरसायकल घेऊन तो निघाला.

आई समोर होती.. म्हणाली,

” अरे देव बघत असतो रे… तो दाखवेल तुला मार्ग… होईल सगळं नीट. जरा धीर धर रे बाळा… “

” तरी पण… जरा जाऊन येतो. रात्री मित्राकडेच राहीन. ” 

तिरीमिरीतच तो निघाला.

तो ऐकणार नाही हे आईला कळतं होतं. ती शांत होती. तो अमोलकडे जाऊन मन मोकळे करून येईल… हे तिला माहित होते. फोन सुध्दा न घेता तो बाहेर पडला.

त्याला आज कुणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं. तो निघालाच..

मनात म्हणाला…

आई बिचारी भोळी आहे. तिला जगाची काही ओळख नाही. तिचा आपला देवावर प्रचंड विश्वास… जसं काही सगळं काही तिचा देवचं करतो… जाऊ दे…

संध्याकाळ झाली होती. आज त्याला अमोलकडे पण जावसं वाटेना. तो सुसाट वेगाने गडाकडे निघाला… त्याच आवडतं ठिकाण… तिथे पायथ्याशी जाऊन जरा शांतपणे बसू असे त्याने ठरवले.

आता वस्ती मागे पडली होती. मोकळा रस्ता होता. त्याच्या नेहमीच्या वळणावर त्याला झाड दिसलं.. तो वळला.. आता थोड्या वेळातच गडाचा पायथा…

मध्येच गाडी कुरकुरायला लागली.. आणि अचानक खरखर आवाज करत बंद पडली. तो वैतागला.. आजचा दिवसच खराब आहे…

खूप वेळा किक मारली… मग गाडी चालू झाली.

आता त्याच आसपास लक्ष गेलं. अंधार चांगलाच गडदं झाला होता. जोरात वारा वाहत होता.

त्या वाऱ्यानी हलणारी झाडं वेगळीच वाटत होती. अंधारात रस्ताही दिसेनासा झाला होता. विचारांच्या तंद्रीत आपण दुसऱ्याच रस्त्याला लागलो आणि आपली वाट चुकली हे त्याच्या लक्षात आले.

आकाशात बघितलं तर चंद्र, चांदण्या नव्हत्याच… नुसताच अंगावर येणारा काळाभोर काळोख.. कसाबसा तो गाडी हळूहळू चालवत होता.

 कुठे जातोय समजत नव्हतं. त्याच्या मनात आलं..

 चकवा लागला की काय…

कुठला आहे हा रस्ता…

थांबायची पण भीती वाटायला लागली होती.

अचानक एखादं हीस्त्रं श्वापद येऊन आपल्याला खाऊन टाकेल की काय असही क्षणभर त्याला वाटलं… भीतीची लहर अंगभर लपेटली होती.

कुठल्या संकटात अडकलो आहोत हेच कळत नव्हते… काळोखी वाट संपतच नव्हती…

तो तसाच पुढे निघाला. त्या भयाण शांततेत गाडीचा आवाज अंधार चिरत जातं अजूनच कर्कश्य वाटत होता.

अशाच सैरभैर अवस्थेत त्याला काहीतरी चमकल्या सारख दिसलं.

लांबवर दिसत असलेल्या त्या क्षीण उजेडाच्या दिशेने हिम्मतं धरून तो निघाला.

जवळ गेल्यावर गाडीच्या उजेडात त्याला शेंदूर लावलेला दगड दिसला. त्याच्यासमोर एका खोलगट दगडात तेल वात लावलेली होती. त्या वातीचाच प्रकाश त्याला दिसला होता. देवासमोर नारळ फोडलेला होता. त्याच्या जीवात जीव आला. दिवा आहे म्हणजे इथे निश्चितच कोणीतरी असणार…

इतक्यात आवाज आला,

” कोण आहे रे”

” मी… मी गडावर निघालो आणि वाट चुकलो. “

“थांब आलोच ” असं म्हणत एक म्हातारा काठी टेकत आला.

” अरे लेकरा आज अमोशाला असा रात्रीचा कशाला निघालास? आता अंधारात गडाची वाट सापडायची नाही. रात्र झालीय थांब इथचं”

गत्यंतरच नव्हतं. म्हाताऱ्याने पाणी दिलं. खरंतर भुकेची जाणीव झाली होती. म्हाताऱ्याने ते ओळखलं. अर्धी भाकरी आणि थोडीशी भाजी असलेला डबा त्याला दिला.

” हे खा.. एवढेच आहे बघ” 

न बोलता तो खायला लागला.

त्या झोपडीत मिणमिणणारा तेलाचा दिवा तेवढा होता.

म्हाताऱ्याने बाहेर जाऊन देवा समोरचा अर्धा नारळ आणला. त्याचे तुकडे केले.

” अमोशाचा असला तरी प्रसादाचा आहे घे… “

म्हणून त्याला दिले. तो निमूटपणे खायला लागला. म्हणाला,

” आजोबा असं इथं एकटं झोपायला तुम्हाला भीती नाही वाटत? “

” अरे कशाची भिती? आपण घाबरलो की जग घाबरवतयं बघ.. आपण ताठ राहायचं.. सामना करायचा. एक मारलं तर आपण दोन मारायचे ” आजोबा अगदी शांतपणे म्हणाले. तो त्यांच्याकडे बघायला लागला.

खाऊन झालं तसं हात धुवायला तो बाहेर गेला. त्याला वाट दाखवणारा दिवा आता शांत झाला होता. विझला होता.

आजोबा म्हणाले, ” चांगल्या घरचा दिसतोस मग अशा अवेळी गडावर कशाला निघालास”.

“सहजच वाटलं निघालो”

” वाटलं की केलं… असा वेडेपणा करू नये रे.. थोडं थांबावं.. विचार करावा… वेळ बघावी… बरं ती चादर घे आणि झोप आता”

तो सतरंजीवर आडवा झाला. तरी त्याला लवकर झोप लागेना…

 म्हाताऱ्याने ते ओळखलं म्हणाला,

“अरे झोप येईना का? तू झोप बिनघोर मी आहे ना.. काळजी नको करू… “

त्यांच्या शब्दांनी त्याला एकदम आश्वासक वाटलं…

” मी आहे ना.. “

या शब्दांनी त्याला आईच्या देव्हारात असलेल्या फोटोतील स्वामींचा चेहरा समोर आला त्याच्या खाली हेच शब्द लिहिलेले होते…

आज आपण अचानक इथे कसे आलो? हे आजोबा काय भेटले… त्यांनी तीच चार वाक्य कशी म्हटली… हे सगळं त्याला गुढ… अलौकिक वाटत होतं…

आता मनावरचा ताण कमी झाला. खरंच आपण इतके का गडबडून गेलो? जाऊ दे थोडे दिवस… काहीतरी निघेल मार्ग…

विचारांच्या नादात झोप कधी लागली त्याला कळलंच नाही.

सकाळी सूर्यप्रकाशाच्या उजेडानी त्याला जाग आली. आपण कुठे आहोत याचे भान आले. उठून तो बाहेर आला.

“झाली का झोप? ये.. “

म्हातारा म्हणाला.

” निघतो आता आई वाट बघत असेल. “

त्यानी आजोबांना वाकून नमस्कार केला. म्हणाला,

” तुम्ही भेटलात म्हणून.. नाहीतर रात्रीचा कुठे भरकटलो असतो कोण जाणे. “

” अरे वाट चुकलेल्याला आसरा द्यायचा.. त्यात काय एवढं… आणि कोणाला घरात घ्यायचं कळतं रे.. आता नीट घरी जा. “

” हो”

निघताना काळ्यामीट्ट अंधारात वाट दाखवणाऱ्या.. शेंदूर लावलेल्या दगडाच्या देवाकडे तो गेला. खाली बसून त्यानी नमस्कार केला. डोळ्यातून घळंघळं पाणी वाहत होते. याच देवाने त्याला रात्री प्रसाद दिला होता.

त्याला एकदम आईची आठवण झाली.

त्याचं मन भरून आलं.

मनात विचार आला.. काल रात्री ते आजोबा देवासारखे धावून आले… खरंतर म्हातारी माणसं नेहमी बोलतात तसंच साधंच बोलले पण… त्या चार शब्दांनी त्यांनी माझी समजूत काढली… असच वाटलं

मात्र एक कोडं त्याला पडलं होतं. कालच्या त्या अंधाऱ्या भयाण रात्री.. वाऱ्यात… एवढ्याशा तेलात तो दिवा टिकला कसा?

विझला कसा नाही?

निघताना आई म्हणाली होती..

” देव आहे रे “..

आईच्या त्या देवानीच तो दिवा आपल्यासाठी पेटता ठेवला..

म्हणजे ” तो ” असतो तर…

जाणिवेचा एक छोटासा दिवा आज त्याच्या अंतरंगात पेटला होता.

त्याच्याही नकळत…

कालचा मनातला राग जाऊन कुठलीतरी एक आत्मिक शांतता आत्ता त्याला वाटत होती… माझ्याकडे अनुभव, कॉलिफिकेशन आहे. मी अजून नेटाने प्रयत्न करीन तो मनाशीच म्हणाला..

संकटात असतानाच त्याची प्रचिती येते.

त्या विझलेल्या दिव्याला… शेंदूर लावलेल्या देवाला मनोभावे नमस्कार करून तो घरी निघाला…

कालचा अंधारा रस्ता आता झगझगीत सूर्यप्रकाशानी ऊजळला होता…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments