श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “दयासागर” – भाग – १ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

लंडनच्या विमानतळावर विवेकने पाय ठेवला. क्षणभर त्याला गलबलून आलं. आपण खूप दूर येऊन पोहोचलो आहोत याची त्याला जाणीव झाली. चारी बाजूंना दिसणारा झगमगाट त्याचे डोळे दिपवू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता तो त्याच्या गावातला एसटी स्टँड! आपण मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसलो होतो. आपल्याला निरोप द्यायला आई आली होती. परदेशात जायला तिने परवानगी दिली असली तरी आता वर्षभर तरी भेट होणार नाही या कल्पनेने तिचे डोळे भरून आले होते. आपणही तिला लवकर येण्याचे आश्वासन दिले होते. ती आशा मनात बाळगूनच ती घराकडे परतली होती.

पण असं घरच्या आठवणीत गुंतून चालण्यासारखं नव्हतं. त्यानं ठरल्याप्रमाणे पुढचा प्रवास सुरू केला. लंडन पासून सुमारे दिडशे किलोमीटर लांब असलेल्या छोट्याशा खेडेगावात तो येऊन दाखल झाला. गाव अगदी छोटसं पण किती रमणीय होतं! चारी बाजूंनी वेढलेले डोंगर, कधी न पाहिलेली बर्फाच्छादित शिखरे, तांबड्या पिवळ्या पानांची झाडे, त्या खालून जाणारे काळे कुळकुळीत रस्ते आणि डोंगराच्या उतारावर पसरलेली टुमदार घरे. त्या छोट्याशा गावात मिशनची इमारत शोधून काढणं त्याला अवघड गेलं नाही. गावाच्या एका बाजूला असलेली लाल भडक दगडांची छोटीशी इमारत त्याला खुणावत होती.

पहिला दिवस कसा संपला समजलच नाही. प्रवासाचा शीण, गावाकडील माणसांच्या आठवणी, मग या सुंदर खेड्यात येणं, आल्यावर सर्व कागदपत्रे सादर करणं, प्रवेश मिळवणं, होस्टेलची रूम ताब्यात घेणं यात दिवस कसा संपून गेला त्याला समजलच नाही. आता मात्र कामाला लागायचं होतं. एक डॉक्टर म्हणून आपण इथं आलो असलो तरी आपण एक हिंदू मिशनरी डॉक्टर आहोत. प्रत्येक रुग्ण हा परमेश्वर- स्वरूप मानून त्याची सेवा करणं, इतकच नव्हे तर प्रत्येक माणसाशी त्याच पद्धतीने वागणं हाच आपला धर्म बनला पाहिजे. तशी वृत्ती आपल्यापाशी आहे याची त्याला जाणीव होती. काहीतरी वेगळं करून दाखवणं हा त्याचा पहिल्यापासूनचा स्वभाव होता. नाही तर उत्तम नोकरी मिळत असतानाही ती सोडून एका हिंदू मिशनरी हॉस्पिटलमध्ये तो कशाला आला असता?

आजचा संपूर्ण दिवस त्याने आपल्या संस्थेचा परिचय करून घेण्यातच घालवला. भारतात मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेच्या शाखा अनेक देशात पसरल्या होत्या. केवळ ग्रामीण भागात किंवा खरोखर आवश्यकता असेल अशा ठिकाणी जाऊन संस्था उघडणं, शाळा, दवाखाना, ग्रंथालय यासारख्या सोयी पुरवणं, इतकच नव्हे तर भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, कला, धर्म यांची जगाला ओळख करून देणं हा संस्थेच्या कामाचा मुख्य उद्देश होता. विवेक इथे डॉक्टर म्हणून आला होता. त्यामुळे लोकांच्यात मिसळून जाणं त्याला सहज शक्य होतं. आपली माणसं आणि तिथली माणसं, आपला धर्म आणि तिथला धर्म सर्वकाही अगदी जवळून अभ्यासता येणार होतं. म्हणूनच तो मनोमन खुश झाला होता

… आज त्याच्या कामाचा पहिला दिवस होता. ऑफिससमोरच्या बागेतील छोट्याशा कृष्णमंदिरात जाऊन त्याने दर्शन घेतले. मनःपूर्वक प्रार्थना करुन अत्यंत उदात्त भावनेने तो दवाखान्याकडे वळला.

सर्व स्टाफशी ओळख झाली. त्याच्याबरोबर त्याच्यासारखेच आणखी दोन भारतीय होते. एक होता केरळमधला डॉक्टर अय्यर, तर दुसरा होता कानपूरचा डॉक्टर वर्मा. बाकीचे तिघे इंग्लंडमधलेच होते. डीन होते डॉक्टर सुब्रमण्यम.. एक निष्णात शल्य विशारद आणि मूर्तीमंत उत्साह! त्यांनी सर्वांची ओळख करून घेतली. सर्वांचे स्वागत केलं.

“फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यु! आय एम प्राऊड ऑफ माय इंडियन फ्रेंड्स हू हॅव डिसाईडेड टू डिव्होट देअर लाईफ फॉर द सर्विस ऑफ द पीपल. आय थिंक, वुई नीड नॉट वेस्ट अवर टाईम. लेट अस् स्टार्ट अवर वर्क “.

… बघता बघता कामाचा प्रचंड व्याप सुरू झाला. दिवस पाळी असो वा रात्रपाळी, विवेक प्रत्येक काम अगदी मन लावून करीत होता. पेशंटची केवळ शारीरिक वेदनाच नव्हे तर त्याचं मानसिक दुःखसुद्धा समजून घेत होता. त्याला माहीत होतं की सगळेच पेशंट्स काही आपल्याशी खरं बोलत नाहीत. सांगितलेली पथ्य पाळत नाहीत. औषध घेण्यात टाळाटाळ करतात. पण कुणावरही न रागवता, सर्वांशी गप्पा गोष्टी करत तो पेशंटला सगळं काही करायला भाग पाडत होता. दिवसभर पेशंटच्या विश्वात रमावे आणि आपली ड्युटी संपली की पुस्तकांच्या जगात हरवून जावे. दवाखान्यातलेच नव्हे तर गावातले कितीतरी रहिवासी त्याचे अगदी चांगले मित्र बनले होते. आपल्या देशातील गमतीजमती सांगण्यात, आपल्या संस्कृती विषयी बोलण्यात, आपल्या धर्माविषयी, राष्ट्रपुरुषांच्या विषयी काय सांगू आणि काय नको असं त्याला होत असे. डॉक्टर अय्यरबरोबर तत्त्वज्ञानावर गप्पा मारताना रात्र कशी संपून जाई त्याला समजत सुद्धा नसे. डॉक्टर स्मिथच्या हिंदू धर्माविषयीच्या खुळचट कल्पना दूर करता करता त्याला कितीतरी गोष्टी समजावून सांगाव्या लागत असत. तो आल्यानंतर त्यानं कित्येक पेशंट्सना नुसत्या योगांच्या उपचाराने बरं केलं होतं. कित्येकांना व्यसनापासून मुक्त केलं होतं. कित्येकांना चक्क भक्तीमार्गाला लावलं होतं… कुणावरही कसलीही सक्ती न करता.! याचा परिणाम एकच झाला… तो म्हणजे डॉक्टर विवेक अगदी अल्पकाळात लोकांचं दैवत बनला.

अशाच एके दिवशी विवेक आपल्या क्वार्टरवर परतला. दारातच पायरीवर वॉर्ड बॉय बसलेला.

“काय रे जॉन, असा उदास का?

“काय सांगू साहेब, बरेच दिवस सांगीन म्हणतो. पण धीरच होत नाही “.

“हे बघ, आधी आत ये? नि:संकोचपणे सांग सगळं. काही होतंय का? “

“हॅ, आपल्याला काय होणार साहेब? चोवीस तास औषध आपल्या अवतीभवती असतात. कोणता आजार होतोय असं वाटलं की खा गोळी. “

“मग अडचण काय आहे? “

“साहेब, अडचण आहे ती पैशांची. घरात सतत काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत. पगार कसा पुरायचा? पैसा कसा पुरवायचा हेच समजत नाही. “

“अरे, मग मी काय करू म्हणतोस? “

“साहेब, शक्य असेल तर थोडेफार पैसे. ,.. फार नाही दहा पाउंड दिलेत तरी चालेल “

“तेवढ्याने भागणार आहे काय? ते संपतील. पुन्हा काय? त्यापेक्षा आपल्या गरजा कमी कशा करता येतील ते बघावं “

“चलतो साहेब, मोठ्या अपेक्षेने आलो होतो. “

“अरे, बस बस. असा वैतागू नकोस. मी देतो तुला आत्ता पैसे. पण उसनवारी करणं बरं नव्हे एवढेच माझं सांगणं. “

“तेही बरोबर आहे साहेब. आता तुम्ही म्हणता तसंच करतो. फालतू खर्च एकदम बंद. “

“तसं केलंस तर फार बरं होईल. “

…. पैसे खिशात टाकून आभार मानून जॉन पळाला. इतक्यात डॉक्टर अय्यर तिथे आले.

“हॅलो मिस्टर साने, काय दानधर्म केलात का? “

“दानधर्म कसला रे? त्याची थोडी नड होती, म्हणून दिले थोडे पैसे. “

“व्हेरी गुड, आता विसरून जा ते पैसे. “

” का? “

” तो काही प्रामाणिक माणूस नाही “.

“तुझा काही अनुभव? “

“नाही, पण त्याच्याविषयी ऐकलय तसं. “

“मग जाऊ दे. प्रत्यक्ष अनुभव नसताना आपण अविश्वास दाखवणं मला बरोबर वाटत नाही “

“ओ. के. जंटलमन. लेट अस् हॅव अ डिनर “

…. पंधरा दिवस झाले असतील नसतील. जॉनने प्रामाणिकपणे पैसे परत आणून दिले. मग हे नेहमीचेच होऊन बसले. जरूर भासली की जॉननं हात पसरावेत. विवेक देईल तेवढे पैसे त्याने घ्यावेत आणि काही दिवसांनी प्रामाणिकपणाने परत करावेत. जॉन आता मोकळेपणानं बोलत असे. घरची सुखदुःख सांगत असे. आपल्या खेड्याविषयी बोलत असे. विवेकही त्याच्या मैत्रिने सुखावला. हा वॉर्डबॉय आपला मित्र केव्हा झाला त्याला समजलही नाही. एका वीकेंडला तो त्याच्या गावीही जाऊन आला. त्याचं घर पाहिलं. छोटसं शेत पाहिलं. बदल म्हणून इथे यायला हरकत नाही असंही त्यानं ठरवलं.

“डॉक्टर साहेब, एका गोष्टीचं फार वाईट वाटतं “

“कोणत्या रे? “

“आपण शिक्षण जास्त घेतलं नाही याचं. नाहीतर चार पैसे जास्त मिळवता आले असते. “

“मग आता शिकतोस? मी शिकवतो तुला. “

“आता? काय लक्ष लागणार आहे शिक्षणात? पण एक विचार मात्र मनात येतो. “

“कोणता? “

“आपल्या गावात एक शाळा काढावी. छोटीशीच. छोटसं प्रार्थना मंदिर बांधावं. “

“वा, सुंदर आहे की कल्पना. पण या सगळ्याला पैसा लागणार आणि कोण करणार हे सगळं? कुठे करणार? इतकं सोपं नाही ते. “

“त्याचं काय आहे साहेब, करायचं म्हटल्यावर काही अवघड नाही. माझ्या घराजवळची मोकळी जागा तुम्ही पाहिलीत ना? आमचीच आहे ती. तिथेच तर करायचं सगळं. प्रश्न आहे तो फक्त पैशाचाच. बघू केव्हा जमेल तेव्हा. ठीक आहे, येतो मी. “

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments