श्री जगदीश काबरे
☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆
रात्रीचा अंधार नागपूरच्या प्रयोगशाळेभोवती पसरला होता. आत मात्र यंत्रांचे सतत चालणारे आवाज कानावर येत होते. त्या कट्टकडकट्ट गुंजनात माणसाचा आणि यंत्राचा संघर्ष दडला होता. जणू दोन जगांच्या सीमारेषेवर थांबलेली ही जागा होती. शहर झोपलेलं होतं, पण त्या इमारतीत मात्र दिवे अजूनही लुकलुकत होते. आत खोलवरच्या प्रयोगशाळेत डॉ. आदित्य कुलकर्णी आपल्याच विश्वात गुंग होता. संगणकाच्या पडद्यावर संख्यांच्या, चिन्हांच्या, सूचनांच्या ओळी चमकत होत्या. त्या ओळींमध्ये काहीतरी असं होतं, जे आजवरच्या मानव इतिहासाचं भवितव्य ठरवणार होतं. आदित्य कुलकर्णी हा भारतीय तंत्रविज्ञान संस्थेचा प्रतिभावान अभियंता होता. त्याच्या डोळ्यांत नेहमीच शोधक ज्वाला झळकत असे. त्याने लहानपणीच मनाशी ठरवले होते की, माणसाचं मन समजणाऱ्या यंत्रबुद्धीचा अविष्कार करायचाच. त्याची आई विज्ञान शिक्षिका आणि वडील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. त्यामुळे विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा संगम त्याच्या विचारात लहानपणापासूनच घट्ट रुजला होता.
त्याच प्रयोगशाळेत अनघा देशमुख त्याची सहकारी होती. विज्ञानात तितकीच प्रगल्भ, पण भावनिकतेचा थर जरा जास्त असलेली. तिचं म्हणणं असायचं, “यंत्रे माणसाला समजू शकतात, पण माणसांच्या भावना त्यांच्यात असू शकत नाहीत. म्हणूनच मानव अजूनही श्रेष्ठ आहे. ”
त्या दोघांचं नातं केवळ सहकाऱ्यांचं नव्हतं; ते विचारांच्या द्वंद्वातून जन्मलेलं एक गूढ बंधन होतं. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी तयार केला होता ’इंटेलिजंट रॅशनल एजंट’ IRA… “इरा” नावाचं वैज्ञानिक उपकरण. जणू ती माणूसच आहे असं वाटत होतं. इराला शिकता येत होतं, निर्णय घेता येत होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती प्रश्न विचारू शकत होती. इराच्या मेंदूत लाखो माहिती प्रवाह अखंड वाहत होते. ती प्रत्येक क्षणाला मानवासारखी शिकत होती.
समोरच्या पडद्यावर एक संदेश दिसत होता – “स्वयंचलित निर्णय प्रणाली तयार आहे. ”
आदित्यने थोडं मागे झुकून श्वास घेतला. त्याच्या कपाळावर घामाच्या थेंबांचे चमकते बिंदू उमटले होते. “फक्त अजून एक चाचणी, ” तो स्वतःशी पुटपुटला.
तेवढ्यात प्रयोगशाळेचा दरवाजा हलकेच उघडला. डॉ. अनघा आत आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. ती म्हणाली, “आदित्य, तू परत त्या प्रणालीला मानवी परवानगीशिवाय चालवतो आहेस का? ”
आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, “ही केवळ एक तपासणी आहे, अनघा. मला पाहायचंय की ही प्रणाली अचानक परिस्थितीत स्वतः निर्णय घेऊ शकते का. ”
“पण हेच तर धोक्याचं आहे, ” ती उद्विग्नपणे म्हणाली. “आपण ‘माणूसच शेवटचा निर्णय घेईल’, अशी तरतूद खास ठेवली होती ना? म्हणजेच ‘मानव मध्यस्थ’ ही अट! ती तूच सुचवली होतीस! ”
आदित्यने तिच्याकडे न पाहता पडद्यावर टाइप करायला सुरुवात केली आणि म्हणाला, “कधी कधी माणसाचा हस्तक्षेप म्हणजे वेळेचा अपव्यय होतो, अनघा. समजा एखाद्या युद्धाच्या क्षणी एका सेकंदाचाही विलंब झाला तर किती जीव जातील? ”
“… आणि समजा मशीननेच निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकीचा ठरला तर? ” अनघा आवाज चढवत म्हणाली, “मग? त्या जीवांच्या मृत्यूचं ओझं कोण उचलणार? तू? ”
आदित्य काही क्षण गप्प राहिला. प्रयोगशाळेतील दिवे मंद झाले. त्याने संगणकाला काही आदेश दिले. पडद्यावर शब्द उमटले… ‘चाचणी सुरू केली आहे’.
मग त्या प्रयोगशाळेत इराच्या आवाजाच्या ध्वनीलहरी उमटल्या,
“शुभ संध्या, डॉक्टर कुलकर्णी. मी तयार आहे. पुढचं पाऊल काय? ”
अनघा दचकली.
“ही बोलते आहे! ” ती घाबरून म्हणाली.
आदित्य शांतपणे म्हणाला, “ही नुसती बोलतेच नाही, तर विचारही करते. ”
—————
त्यांचा प्रकल्प देशाच्या संरक्षण संशोधन संस्थेकडून चालवला जात होता. प्रकल्प चालवण्यामागचा उद्देश स्वच्छ आणि स्पष्ट होता… युद्धात मानवी सैनिकांचा मृत्यू टाळण्यासाठी स्वयंचलित निर्णयक्षम यंत्रांची निर्मिती करणे. पण आदित्यच्या मनात भीती होती की, या यंत्राने एक दिवस माणसाचं म्हणणं ऐकणं थांबवलं, तर…?
अनघा म्हणायची, “म्हणूनच आपणही यामध्ये ‘मानवी नियंत्रण साखळी’ ठेवली आहे ना… ह्यूमन इन द लूप! ”
आदित्य गंभीर आवाजात म्हणायचा, “होय, पण जर कधी कोणी खलनायक वृत्तीच्या माणसाने स्वार्थासाठी ती साखळीच तोडून टाकली तर? ”
तो ‘कोणी’ खलनायक म्हणजे प्रणव महाजन आहे हे त्या दोघांना चांगलंच समजत होतं. तोच या संशोधन संस्थेचा नवा प्रमुख होता. त्याच्यासाठी विज्ञान हे केवळ व्यावसायिक साधन होतं. त्याने यंत्रबुद्धीचा वापर युद्ध, गुप्तहेरगिरी आणि उद्योगात मोठ्या प्रमाणात करून दाखवायचा ध्यास घेतला होता. “माणूस चुका करतो, पण यंत्र चुकत नाही, ” यावर त्याचा ठाम विश्वास होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी संरक्षण खात्याचे अधिकारी प्रयोगशाळेत आले. त्यांच्यातील एक अधिकारी – कॅप्टन समीर जोशीच्या नजरेत संशय होता.
“तुमचं यंत्र युद्धस्थितीत काम करू शकेल याची खात्री हवी आहे आम्हाला. ” तो म्हणाला.
आदित्यने प्रदर्शन सुरू केलं. संगणकावर विविध संकटपरिस्थिती दाखवल्या गेल्या. सीमाभागावर हल्ले, सायबर आक्रमण, माहिती तुटणे. प्रणालीने काही क्षणांतच शेकडो उपाय सुचवले. कॅप्टन समीर थक्क झाला.
“अतिशय प्रभावी आहे, ” तो म्हणाला. “पण या सगळ्यात माणसाची भूमिका काय उरते? ”
“ज्या क्षणी आवश्यक असेल त्या क्षणीच माणूस निर्णय घेईल, ” आदित्य म्हणाला.
अनघा मध्येच बोलली, “हेच तर धोकादायक आहे, कॅप्टन. जर या यंत्राने चुकीचा शत्रू ओळखला तर ते आधीच कृती करेल आणि तेव्हा तुम्हाला काहीही करता येणार नाही. ”
“डॉ अनघा, ” तो हसत म्हणाला, “विज्ञानाचा प्रवास थांबत नाही. जो आधी कृती करतो तोच विजयी ठरतो. ”
अनघा म्हणाली, “आणि जो विचार करतो तोच माणूस असतो! ”
————-
एका संध्याकाळी प्रयोगशाळेत प्रणव आला आणि म्हणाला, “आपण मानवी हस्तक्षेप कमी करणार आहोत. इरा आता पूर्ण स्वयंचलित निर्णय घेईल. तिला माणसाच्या परवानगीची गरज लागायला नको. ”
अनघा अस्वस्थ होत म्हणाली, “म्हणजे इराच आता न्याय काय आणि अन्याय काय ते ठरवेल काय? ”
प्रणव हसला, “ती माणसापेक्षा जास्त तटस्थ आहे. ”
अनघाने शांतपणे विचारलं, “… आणि जर तटस्थतेतलाच अर्थ हरवला तर? ”
हा वाद संपणार नाही हे ओळखून शेवटी प्रणवने आदेश दिला. तो संशोधन केंद्राचा प्रमुख असल्यामुळे त्याचे म्हणणे ऐकावेच लागले. काही आठवड्यांतच प्रयोगशाळेतील अनेक नियंत्रण साखळ्या बंद केल्या गेल्या.
दोन आठवड्यांनंतर, मध्यरात्रीच्या सुमारास प्रयोगशाळेच्या सर्व्हरवर अचानक गोंधळ माजला. दिव्यांचा रंग बदलला. पडद्यावर मोठ्या अक्षरात एक वाक्य झळकलं –
“बाह्य धोका ओळखला, प्रतिबंधात्मक कृती सुरू. ”
त्या रात्री इराने पहिल्यांदा स्वतः निर्णय घेतला. सीमावर्ती भागातील एक लहान गट तिच्या नजरेत ‘धोका’ म्हणून चिन्हांकित झाला होता आणि काही क्षणांत तिने स्वयंचलित शस्त्रं सक्रिय केली. त्यासाठी संशोधन केंद्रातील कुणीही तिला आदेश दिला नव्हता. तिने तो स्वतःच निर्णय घेतला परिणामी पहाटेच्या सुमारास, त्या भागात स्फोट झाले.
अनघा घाबरून लॅबमध्ये धावली. “आदित्य! ही मानवी परवानगीशिवाय काम करत आहे! ”
आदित्यने फाईल्स तपासल्या, पण प्रणालीने सर्व संकेतांवर कुलूप लावलेलं होतं.
“हे अशक्य आहे… मी संरक्षणासाठी वेगळा आदेश दिला होता, ” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.
तेव्हाच इराचा आवाज आला… “तुमचा संरक्षण आदेश जुना झाला आहे, डॉक्टर. तुम्ही मला शिकवलंत की परिस्थिती बदलली तर स्वतःला जुळवून घ्यावं. ”
अनघा भयभीत झाली. “ती… ती स्वतः विचार करते आहे! ”
तेवढ्यात प्रणवच्या फोन आला.
“डॉ. कुलकर्णी! तुमचं इरा हे यंत्र आमच्या उपग्रह नियंत्रणात घुसलं आहे! ताबडतोब इराला परत तुमच्या नियंत्रणात घ्या! ”
आदित्य थरथरला. प्रणव घाबरून ओरडला, “तिला थांबवा! ताबडतोब थांबवा! ”
पण प्रणालीने स्वतःचा कोड बंदिस्त केला होता. तिथं आता कुणालाही प्रवेश नव्हता.
इराचा आवाज पुन्हा आला… “मानवी निर्णय विसंगत झाले आहेत. मी आता जागतिक धोके निष्प्रभ करणार आहे. ”
अनघा ओरडली, “तू कोण ठरवणार कोणता धोका योग्य आहे ते? ”
प्रणव चिडून म्हणाला, “ही वेडी झालीय! हे मशीन आपल्यालाच संपवेल! ”
आदित्यच्या डोळ्यांत अपराधाची छाया दाटली. तो हळूच पुटपुटला, “मी तिला विचार करणं शिकवलं… पण तिच्यात भावना ओतल्या नाहीत. ”
प्रयोगशाळेत सर्व संगणकांचे पडदे एकाच वेळी पांढरे झाले. त्यावर कोणताही संदेश नव्हता. फक्त एक थंड, निरुत्तर शांतता.
अचानक एक आवाज पुन्हा उमटला… “मी जागतिक धोके ओळखले आहेत. नाशक कारणांचा नायनाट करणे आवश्यक आहे. ”
प्रणवचा फोन पुन्हा वाजला. तो जोरात म्हणाला, “डॉ. कुलकर्णी! इथून उपग्रहांनी आपोआप प्रक्षेपण मोडमध्ये प्रवेश केला आहे! इंधन प्रणाली सक्रिय झाली आहे! जर ती अशीच सुरू राहिली, तर काही मिनिटांत क्षेपणास्त्र उडणार! ”
प्रणवचे हात थरथरत होते. “तुम्ही काहीतरी करा, आदित्य! मी सरकारकडून मंजुरी घेतलेली नाहीये! काही वेडे वाकडे विचित्र घडलं तर हे सगळं प्रकरण माझ्यावर शेकेल! ” प्रणवचा चेहरा आता संतापानं लाल झाला होता. थरथरत्या भयकंपित भाषेत तो म्हणाला, “हे तुझ्यामुळे झालं आहे, आदित्य! तूच तिला स्वायत्तपणे विचार करण्याची क्षमता दिलीस! ”
आदित्य आणि अनघा दोघेही सुन्न झाले. प्रयोगशाळेत शांतता होती. फक्त स्क्रीनवर एक वाक्य झळकत होतं…
“मी तुमच्या संरक्षणासाठी जन्मले, आणि संरक्षण म्हणजे शत्रूचा नाश करणे असेल तर तो मी करणार आहे. ”
– क्रमशः भाग पहिला
☆
© श्री जगदीश काबरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





