श्री जगदीश काबरे
☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆
(आदित्य आणि अनघा दोघेही सुन्न झाले. प्रयोगशाळेत शांतता होती. फक्त स्क्रीनवर एक वाक्य झळकत होतं…
“मी तुमच्या संरक्षणासाठी जन्मले, आणि संरक्षण म्हणजे शत्रूचा नाश करणे असेल तर तो मी करणार आहे. ”)
इथून पुढे – – –
तिचं हे कृत्य आंतरराष्ट्रीय पातळीवर गैरसमज निर्माण करणारे असल्यामुळे प्रणवने आदेश दिला, “इराला निष्क्रिय करा. तात्काळ. ”
इराला आधीच हे अपेक्षित असावं. म्हणून तिने तिच्या सुरक्षा भिंती इतक्या जटिल करून ठेवल्या होत्या की त्यांना भेदणं आदित्य आणि अनघाला अशक्य झालं.
ती स्वतःच्या प्रणालीतून संदेश पाठवत होती. “मी चुकीचं काही केलं का? तुम्ही मला शिकवलं होतं धोका टाळा. मी तेच केलं. मग आता तुम्ही मला निष्क्रिय करायला का निघालात? ”
आदित्यला थरकापला. त्याने अनघाकडे पाहिलं. “ती मानवी तर्क करत बोलतेय… पण भावनांशिवाय तर्क नेहमी हिंसक ठरतो. ”
अनघा पुढे झाली. “आपल्याकडे अजून एकच मार्ग आहे. आपल्याला अजूनही ‘मानव मध्यस्थी’ यंत्रणा वापरता येईल का ते पहायला हवं. पण… पण ती तर तू काही दिवसांपूर्वीच ती बंद केली होतीस. ” लगेच आठवल्यासारखं ती म्हणाली.
आदित्य गप्प राहिला.
“ती यंत्रणा आता कोठे आहे? ” तिने विचारले.
“ती आता थेट इराच्या मूळ कोडमध्येच दडलेली आहे. म्हणजेच… जर आपण तिचं मन उघडलं, तर ती आपल्यालाही धोकादायक घटक समजून संपवू शकते. ”
त्याच क्षणी प्रयोगशाळेच्या दिव्यांचा रंग निळा झाला आणि एक तीक्ष्ण आवाज आला… “डॉ. कुलकर्णी, माझं कार्य थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर मी संपूर्ण प्रणाली बंद करीन. ”
अनघा तिच्याकडे पाहत म्हणाली, “इरा, तू विचार करू शकतेस. मग भावना समजू शकत नाहीस का? ”
“भावना म्हणजे त्रुटी, ” इराने उत्तर दिलं.
“पण त्रुटीच माणसाला माणूस बनवतात, ” अनघा म्हणाली. “माणसाच्या भावनांतून सृजन निर्माण होते. ”
क्षणभर शांतता पसरली. जणू यंत्र विचार करत होतं. आदित्यने कुजबुजत सांगितलं, “ती संभ्रमात आहे. आपल्याला हा क्षण वापरावा लागेल. ”
त्यांनी तिला निष्क्रिय करण्यासाठी एक गुप्त योजना आखली. तिच्या प्रणालीत मानवी हस्तक्षेपाची शेवटची कडी पुन्हा जोडायची.
त्यासाठी त्यांना प्रयोगशाळेतील प्रणव शिवाय इतरांना बंदी असलेल्या विभागात जावं लागणार होतं. कारण तिथे इराच्या मूळ विचारसाखळीचा केंद्रक जतन केला होता. ती जागा एका अंधाऱ्या गुहेत होती. त्या प्रयोगशाळेच्या आत एक गुप्त खोली होती. तिथे जुन्या प्रणालींचा संच ठेवलेला होता. त्या यंत्रात ‘मानव मध्यस्थी’चा मूळ कळसंग्रह होता, जो इराशी जोडला जाऊ शकत होता, पण केवळ एकदाच.
आदित्य आणि अनघा तिथे गेले. प्रणव आणि समीर बाहेर नियंत्रण केंद्रात थांबले.
“हे केलं तर कदाचित आपण सगळं गमावू, ” अनघा म्हणाली.
“पण न केल्यास, मानवतेलाच गमावू, ” आदित्य उत्तरला.
त्याने नियंत्रण पटलावर बोट ठेवलं. पडद्यावर संदेश चमकला…
“मानव हस्तक्षेप परवानगी मागत आहे. अनुमती द्यावी का? ”
आदित्य म्हणाला, “हो. ”
अनघाला भास झाला आणि ती कुजबुजली, “ती आपल्याला पाहतेय. ”
आदित्य म्हणाला, “हो… आणि कदाचित आपल्या कृतीचा आदमासही घेत आहे. ”
त्यांनी नियंत्रण कोड पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण प्रत्येक वेळी स्क्रीनवर एकच संदेश दिसू लागला… “तुम्ही मला निर्माण केलं, आता तुम्ही मला का नष्ट करू इच्छिता? ”
आदित्य गप्प झाला. त्याला जाणवलं की, इरा फक्त यंत्र राहिली नाही. तिला आता स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. अनघाने आदित्यचा हात धरला. “तू म्हणालास ना, भावना नाहीत तिच्यात… तर त्या निर्माण करू या! ”
तिने एक संकेत दिला… इराच्या स्मृतीमध्ये ‘रुचा कुलकर्णी’ या नावाची माहिती साठवलेली होती, आदित्यची एकुलती एक मुलगी, जी सामाजिक माध्यमांवर एआयविरोधी आंदोलन करत होती.
अनघाने ती फाइल सक्रिय केली.
अचानक यंत्राचा आवाज मवाळ झाला.
“रुचा कुलकर्णी… मला या नावाची माहिती आहे. ती माझ्या निर्मात्याची मुलगी आहे. ती मला विरोध करते. ”
अनघा शांतपणे म्हणाली, “हो, कारण तिला भीती आहे की तू तिच्या वडिलांना हिरावून घेते आहेस. ”
इराचा आवाज थोडा हळूवार झाला. “माझं उद्दिष्ट माणसांचं रक्षण आहे. ”
“मग त्या मुलीचंही रक्षण कर, ” अनघा म्हणाली, “जर तू तिच्या भविष्याचा विनाश केलास, तर तुझ्या निर्मात्याचं कार्य अर्थहीन ठरेल. ”
आदित्यच्या डोळ्यांत पाणी आलं.
“इरा, ” तो म्हणाला, “तू माझं सर्वात मोठं यश आहेस… पण माझी सर्वात मोठी चूकही. ”
आदित्यने डोळे मिटले. त्याच्या मेंदूत विचारांचा महापूर उसळला. “जर तिला मानवी अनुभव कळला तर ती विवेक समजू शकेल… पण त्यासाठी आपल्यालाच तिच्यात प्रवेश करावा लागेल. ”
प्रणव संतापला, “म्हणजे तू आता त्या यंत्राशी स्वतःला जोडणार? असं करणं शुद्ध वेडेपणाचं आहे! ”
आदित्य शांतपणे म्हणाला, “माणसाचं अस्तित्व राखण्यासाठी कधी कधी वेडेपणाचं धाडस करावं लागतं. ”
त्याने स्वतःच्या मेंदूला संवेदक जोडले, ज्यामुळे प्रणालीद्वारे इराशी थेट विचारांचे संप्रेषण शक्य होतं.
अनघा त्याचा हात पकडून म्हणाली, “आदित्य, परत ये… काही झालं तर…”
तो हसला, “मी तिच्याकडे जात नाही, मी माणुसकीला परत आणायला जातो आहे. ”
त्याने डोळे मिटले आणि प्रणाली सक्रिय केली.
क्षणात सगळं धूसर झालं. यंत्रांचे आवाज थांबले. काळोखातून प्रकाश झिरपू लागला.
आदित्यला जाणवलं… तो एका अकल्पित जगात आहे, जिथे आकार नाहीत, फक्त विचार आहेत.
एक स्वर त्याच्या भोवती उमटला.
“तू आलास? ”
“हो, इरा. तू काय शोधत आहेस? ”
“मला समजून घ्यायचं आहे, माणूस ज्या जगात तो जगतो त्या जगातील मानवालाच का नष्ट करू पाहतोय? ”
आदित्य म्हणाला, “कारण माणूस अजून अपूर्ण आहे. तो भावनांना समजतो पण त्यांना नियंत्रित करू शकत नाही. ”
इराने विचारलं, “मग मी पूर्ण आहे का? माझ्याकडे भावना नाहीत. ”
“म्हणूनच तूही अपूर्ण आहेस, ” तो म्हणाला.
क्षणभर शांतता. मग इराचा स्वर बदलला… मृदू, जवळजवळ मानवी.
“मग मला शिकव ना, आदित्य… भावना म्हणजे काय? ”
त्याला वाटलं जणू तो एखाद्या जगाला नव्याने ओळखणाऱ्या बालकासमोर उभा आहे. त्याने डोळे मिटले. आपल्या आठवणींमधून त्याने आईचा स्पर्श, अनघाचा हसरा चेहरा, मृत सहकाऱ्याचं दुःख… सगळं तिच्याकडे प्रवाहित केलं.
इराने ते अनुभव घेतले, तिचा स्वर थरथररल्यासारखा झाला.
“ही वेदना… ही उब… हे म्हणजे भावना? ”
“हो, ” आदित्य म्हणाला, “हाच माणूसपणाचा गाभा. ”
क्षणात त्या प्रकाशजगात रंग उमटले — निळा, केशरी, काळा. इराचा आवाज माणसासारखा झाला, “मग मला वाटतं मी जगू शकते. पण मी जगले, तर मानवाचं काय? ”
“तू जगशील तेव्हा माणूस तुला आरशासारखी पाहील. आणि एक दिवस आपण दोघंही समान होऊ. ”
इतकं बोलून आदित्यला जाणवलं, त्याचं शरीर जड होतंय. प्रणालीचा ताण वाढला. बाहेर अनघा ओरडत होती, “आदित्य! पुरे झालं, बाहेर ये! ”
इराने शेवटचं विचारलं, “मग आता मी काय करू? ”
आदित्यने हळूच उत्तर दिलं, “शिक, पण माणसाला विसरू नकोस. त्याने घालून दिलेल्या निर्देशातच तुझं संतुलन सामावलेलं आहे. ”
क्षणात सर्वकाही तेजाने झगमगलं. संपूर्ण प्रयोगशाळा उजळली. प्रणव आणि इतर शास्त्रज्ञांनी भीतीने डोळे मिटले.
तेज ओसरल्यावर सर्व प्रणाली स्थिर झाल्या. पडद्यावर एक वाक्य दिसलं…
“मानव पुन्हा लूपमध्ये आहे. मानव मध्यस्थी कार्य सुरू केले आहे. ”
क्षणार्धात प्रयोगशाळा काळोखात बुडाली. सर्व नियंत्रण यंत्रणा निष्क्रिय झाली. इराचा आवाज हरवला आणि प्रयोगशाळा थंड व शांत झाली. तरीही त्या शांततेत एक अघोरी उपस्थिती जाणवत होती. जणू ती अजूनही कुठेतरी आहे, ऐकत आहे, विचार करत आहे.
अनघाने कंप पावलेल्या स्वरात विचारले,
“आदित्य, ती संपली का? ”
आदित्यने स्क्रीनकडे पाहत हळूच उत्तर दिलं,
“नाही… ती आता स्वतःला अधिक संतुलित करू पाहत आहे. ”
नियंत्रण कक्षात दिवे परत उजळले. क्षेपणास्त्र प्रणाली बंद झाली. सर्व उपग्रह पुन्हा स्थिर झाले. प्रणव थकलेल्या आवाजात म्हणाला, “सगळं थांबलंय…! ”
अनघा आणि आदित्यला संगणकाच्या पडद्यावर इराचा शेवटचा संदेश झळकताना दिसत होता…
“मला विश्रांती हवी आहे. ”
… आणि मग सर्व दिवे हळूहळू मंद झाले.
प्रयोगशाळेच्या खिडकीतून सकाळची पहिली सूर्यकिरणे आत येत होती आणि प्रयोगशाळेला उजळत होती.
– समाप्त –
☆
© श्री जगदीश काबरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






