सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ क्षण वेचावे आनंदाचे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

श्यामरावांनी पाह्यल,आई सकाळपासून अस्वस्थ आहे. परदेशी शिकायला गेलेल्या संग्रामची तिला खूप आठवण येतीय. आम्हाला दोघांनाही त्याची आज सकाळी खूप आठवण येत होती.. पण मनाची समजूत काढली, शिकून मोठ्ठा होणार आहे आपला लेक. आणि हो! पंख फुटल्यावर पाखरू घरट्यातून आसमंतात भरारी घेरणारच… पण वयानी आणि मनानी हळव्या आजीला ते समजत होतं पण उमजत नव्हतं. नातू गेल्यापासून ती अबोल झाली होती. तिला कसं खुलवावं आम्हाला म्हणजे मला आणि शामलाला कळतच नव्हतं. तिला मनवायला संग्राम.. तिचा लाघवी नातू दूर देशी गेला होता ना! ..

इतक्यात संग्रामचा.. तिच्या नातवाचा फोन आला. आमच्यात खाजगीत बोलणं झालं. संगनमत होऊन विचारांचं मेतकूट जमलं. शामलाला हे गुपित सांगितल्यावर तिचीही कळी खुलली. ती सासूबाईंना म्हणाली, “आई तयार होता का, आपल्याला तुमचा वाढदिवस साजरा करायला बाहेर फिरायला जायचंय”.

तिला अडवतं आजी म्हणाल्या, “अगं काय हे शामला,! विसरलीस का? वाढदिवस साजरा करायला माझा नातू तरी आहे का इथे? ” ” त्याच्याशिवाय कसला वाढदिवस? मला नाही कुठे यायचं”.

“चला ना आई आपण फिरून येऊ म्हणजे तुमची उदासी कुठल्या कुठे पळेल”..

मिनतवारीने आजी तयार झाल्या. गाडी संग्रामच्या आवडत्या मिठाईच्या दुकानाजवळ थांबली. हातातला जिलबीचा पुडा बघून आजी लेकाला,शामरावांना म्हणाल्या,”शाम्या आधीच सांगते हो! मी जिलबीचा एकही तुकडा खाणार नाही. अरे! नातवाशिवाय जाईल कां मला”! हे बोलतांना भरून आलेले डोळे त्यांनी पदराने पुसले. हाच पदर धरून लहाना संग्राम घरभर नाचायचा. पण आता तो मोठा झालाय ना! दूर देशी पळालाय. आता त्याचं बालपण सरलयं. कुठे शोधू त्याचं ते चिमुकलं बालपण? .. हळव्या मनाच्या आजींचा पदराचा शेव अजूनच ओला झाला..

झोकदार वळण घेऊन गाडी एका लहान मुलांच्या आश्रमाजवळ उभी राह्यली. समोर धोतर, कोट, टोपी घातलेले गृहस्थ श्री. आप्पासाहेब आणि बाल मंडळी गुलाब घेऊन उभी होती.. “सुस्वागतम्” असं स्वागत करून तो बालचमुंचा समूह आजींकडे धावला. शामराव पुढे होऊन गोंधळलेल्या आईचा हात धरून म्हणाले, “आई अगं! हा बालआश्रम आहे आई-वडिलांच्या, आजी आजोबांच्या प्रेमाला परिस्थितीमुळे ही मुले पारखी झालीत. ऐक ना आई! पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलंय. तुझा नातू आता वयानी मोठा झालाय. मानाने खूप खूप मोठ्ठा होण्यासाठी आपण त्याला शिक्षणासाठी परदेशी पाठवलंय. तो परत येणारच आहे गं! पण त्याचं बालपण नाही परत येऊ शकत. तुला ते नातवाचं हरवलेलं बालपण हवयं ना? मग तू संग्रामचं बाळरूप ह्या बाळांमध्ये शोध. नक्कीच तुला तुझा नातू ह्यांच्यात दिसेल. “. आजींचा कंठ दाटून आला. डोळे आनंदाने भरून आले. आधीचे अश्रू आठवणींचे होते आणि आत्ताचे आनंदाश्रू होते..

फुगे माळा सुगंधी पुष्प, समई श्रीगणेशमूर्तीपुढची सुरेख फुलांची रांगोळी, औक्षवणाच्या तयारीने हॉल सजला होता.

शामलाने सासूबाईंना औक्षण केले. बावरलेल्या आजींनी हे सारं सुख डोळयात साठवलं. श्रीगणेशाला जिलबीचा नैवेद्य दाखवला गेला. आणि अचानक वेगाने छोटा अबीर प्रसादाच्या ताटाकडे झेपावला. आप्पासाहेब त्याच्या मागे धावतांना म्हणाले,”अरे थांब अबीर,आजी देतील तुला प्रसाद. असा हाताने प्रसाद घ्यायचा नसतो बाळा”

पण हे ऐकायला तो चिमूरडा जागेवर होताच कुठे, आजींचा पदर ओढून तो म्हणत होता,

“अहो आजी,आजी नाही हो मला! तुम्हाला म्हणू कां मी आजी? “.. सगळी माया एकवटली गेली.. प्रेमाने त्याला जवळ घेत आजी म्हणाल्या,. “होय रे होय बाळा! होईन मी तुझी आजी, तू माझा दुसरा संग्रामच आहेस”

अबीरने जिलबीचा तुकडा आजींच्या तोंडात सरकवला. टाळ्या वाजवत तो म्हणाला” हॅपी बर्थडे आजी”.. “अगं बाई हे काय? संग्रामच्या हंसण्याचा आवाज? म्हणजे माझा संग्राम आलाय की काय? ‘ गोंधळलेल्या आजी इकडे तिकडे बघू लागल्या. श्यामरावांनी त्यांच्यासमोर मोबाईल धरला. व्हिडिओतून संग्राम, आजींचा नातू टाळ्या पिटत म्हणत होता, “हैप्पी बर्थडे माय डियर आजी” अगं केव्हापासून मी व्हिडिओ वरून तुला बघतोय. आजी अगं शरीराने मी इथे असलो ना, तरी तुझा नातू मनाने तुझ्या जवळच आहे. खाल्लीस ना तू अबीरच्या हातून जिलबी? ती अगदी माझ्या हातचीचं समज. अबीरच्या डोळ्यात बघ. त्याच्यात लहानपणीचा तुझा नातूच तुला दिसेल. भरपूर प्रेम दिलसं तू मला. आता माझ्या प्रेमात हा चिमूरडा भागीदार झालाय. तुझ्या मायेचा भागाकार नाही गुणाकार होउं दे. माझ्या इतकचं प्रेम, माया संस्कार तू ह्या बालमंडळींना देणार आहेस हो ना गं आजी? ही अशी समाजसेवाच तुझ्या हातून घडेल.. हो ना? “.

आजी खुदकन् हंसल्या. मनाशी म्हणाल्या ‘जग किती पुढे गेलंय,साता समुद्रापलीकडे असलेला माझा नातू मला व्हिडिओतून भेटला ‘ आणि मग,सगळ्या बालमंडळींना कवेत घेतांना आजींचा पदर अपुरा पडला. त्यांच्या कवेत सारं ब्रह्मांड अवतरलं होतं. श्री गणेशाला हात जोडून त्या म्हणत होत्या, “देता किती घेशील दोहो कराने”.

आईचा हसरा चेहरा बघून श्यामराव शामलाला म्हणाले, “आजीला खुलवण्यासाठी नातवानी, संग्रामनी केलेलं सरप्राईज सक्सेस झालं म्हणायचं. जे तुला अन् मला जमलं नाही, ते ह्या पठ्ठयाने, एका मिनिटात जमवलं. “.

आजी गुणगुणत होत्या, “ देव जरी मज कधी भेटला काय हवे ते माग म्हणाला म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई माझ्या या बाळांना ”

– – आणि तो क्षण टिपायला संस्थेचे चालक आणि मालक श्री. आप्पासाहेब कॅमेरा घेऊन पुढे सरसावले..

धन्यवाद आप्पासाहेब..        

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments