सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆
☆ तिन्हीसांजा – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन भास्कर गेला.
*दिवसकार्य झाले. आलेली सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. फक्त मुलगा आणि सुन राहिले होते. *
*गेले दोन तीन दिवस रेवती बघत होती की मुलगा आणि सुन* *तिचीही बॅग भरत होते. *
*तिच्या साड्या, भरतकाम* *विणकामाचं साहित्य, गाण्याच्या वह्या. *
*स्पष्ट बोलणं झालं नसलं तरी मुलगा त्याच्या घरी घेऊन जात असणार असा रेवतीचा अंदाज होता. *
*एकदोनवेळाच पाहिलेलं त्याचं अलिशान घर तिच्या डोळ्यासमोर तरळून गेलं*…
*”उद्या सकाळी लवकर आपण निघणार आहोत” रात्री झोपतांना मुलाने सांगितलं*
*ती बरं म्हणाली*..
*पण मुलाची अलिशान कार जेव्हा मुंबईच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण मुलाच्या घरी चाललेलो नाही. *
*कुठे चाललोय आपण? तिने विचारलं*
*”कळेल” मुलाचं अल्पाक्षरी उत्तर*…
*गाडी आता कशेडी घाट उतरत होती*.
रेवतीला चिपळूणपर्यंतचा रस्ता माहित होता कारण ती आणि भास्कर अनेकदा संगमेश्वरला देवदर्शनाला आली होती.
‘संगमेश्वरला देवदर्शनाला चाललोय का आपण? ‘ न राहवून रेवतीने विचारले.
‘तसंच काहीसं’ अभिजीतचं– मुलाचं- तुटक उत्तर आलं. अनघाने— सुनबाईने–गाडी सुरू झाल्यापासून झकास झोप काढली होती. वाटेत थोडं खाणंपिणं झाल्यावर अनघाने मोबाइलमध्ये जे डोकं खुपसलं होतं ते वर केलंच नव्हतं. या क्षुद्र जगाशी काही संबंधच नसल्यासारखंच वागणं होतं तिचं!
चिपळूणनंतर गाडी एका वेगळ्याच आडरस्त्याला वळली. खाचखळग्यांचा रस्ता पार करत एका कौलारू घरापुढे उभी राहिली.
‘तिन्हीसांजा’ ही त्या घरापुढील पाटी वाचून रेवतीच्या लक्षात आलं की, आपल्याला आता एका वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे.
अनिच्छेने रेवती खाली उतरली. तेवढ्यात एक गोरटेल्या, सतेज, साठी ओलांडलेल्या बाई बाहेर आल्या. “या मंडळी! तुमचीच वाट पाहत होते. ” हसतमुखाने त्या म्हणाल्या.
अभिजीतने रेवतीच्या दोन बॅगा काढून त्या बाईंच्या ताब्यात दिल्या. त्यांच्याबरोबर काही बोलून अभिजीत गाडीत बसण्यासाठी वळला.
“थोडं चहा पाणी घेऊन जा”.
“नको, नको. आम्हाला काळोख व्हायच्या आत महाबळेश्वरला पोहोचायचं आहे. आमची दोन्ही मुलं आजी-आजोबांबरोबर तिथल्या हॉटेलमध्ये आमची वाट पहात असतील”. अनघाने तर गाडीतून उतरण्याचीसुद्धा तसदी घेतली नव्हती.
रेवती गाडीतून उतरून, अंगण ओलांडून घराच्या पायऱ्या चढत होती. तिला कुणाकडेच बघण्याची, बोलण्याची इच्छा नव्हती. आपल्याला न सांगतासवरता फसवून या इथे आणून सोडलं म्हणून तिच्या मनातला संताप डोळ्यातून बाहेर पडत होता. सर्वांग गदगदंत होतं.
सुधाताईंना अशा प्रसंगांची सवय होती. त्यांनी शांतपणे रेवतीच्या पाठीवर हात फिरवला.
“सकाळपासूनच्या प्रवासाने दमला असाल. हात पाय धुवून घ्या. चहा पोहे खाऊ आणि मग बोलू”.
रेवतीचे हुंदके थांबत नव्हते. सुधाताईंनी तिला हळूच धरून मागील दारी नेले. गार पाण्याने स्वच्छ हात पाय धुतल्यावर आणि चहा पोहे पोटात गेल्यावर रेवतीला थोडं बरं वाटलं.
सुधाताईंबरोबर मागच्या वाडीत फिरताना स्वच्छ मोकळी हवा आणि ताजा वारा यामुळे रेवतीच्या मनातले काळे ढग थोडे विरळ झाले. क्षितिजावर रेंगाळणारी मावळत्या सूर्याची किरणं माडांच्या झावळ्यांमधून निरोप घेत होती. शेलाट्या, उंच पोफळी वाऱ्याबरोबर डोलत होत्या. आंब्या-फणसांची भारदस्त झाडं तिच्याकडे आश्वस्त नजरेने पाहत होती. हळूहळू फुलणाऱ्या प्राजक्ताचा, गुलबाक्षीचा आणि झाडांच्या पाचोळ्याचा एक विशिष्ट गंध वाऱ्याबरोबर येत होता.
रेवतीच्या मनात आलं, ‘कॉलनीतल्या मैत्रिणींबरोबर दोन दिवस ट्रीपला येण्यासाठी हे ठिकाण नक्कीच छान आहे. पण… पण आपली फसवणूक करून आपल्याला इथे आणून सोडलं आहे याचं शल्य तिच्या अस्वस्थ मनात भरुन राहील होतं. थोड्यावेळाने सुधाताई म्हणाल्या,
“चला, संध्याकाळची प्रार्थना म्हणूया” रेवतीने पाहिलं तर अंगणात आता आठ- दहाजणी बसलेल्या दिसल्या. त्या कातरवेळी, शांत वातावरणात शुभंकरोती, रामरक्षा, श्रीसूक्त ऐकताना रेवतीच्या मिटलेल्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. सुधाताईंनी नुसता पाठीवर हात ठेवला आणि हळूच म्हणाल्या, “रात्री जेवणं झाली की बोलूया बरं”.
गरम भाकरी, भात, त्यावर तुपाची धार, कुळथाचं पिठलं, पापड, तळलेली सांडगी मिरची असा साधा पण आवडता बेत होता. सुधाताईंसह हसत बोलत अंगत- पंगत चालली होती. रेवतीलाही भूक लागली होती. स्वयंपाक करणाऱ्या काकू सगळ्यांना आग्रहाने वाढत होत्या.
स्वयंपाकघर आवरल्यावर सुधाताईंनी हळूच खूण करून रेवतीला मागच्या अंगणात तुळशीच्या कट्ट्यावर बोलावलं. तुळशीजवळ लावलेल्या पणतीचा प्रकाश घराच्या भिंतीवर सावल्यांचा खेळ करीत होता. रेवती अस्वस्थ मनाने सुधाताईंना काय आणि कशा शब्दात सांगायचं याची जुळवाजुळंव करू लागली.
तिचे मन जाणून सुधाताई बोलू लागल्या.
“रेवती, हे आमचं वडिलोपार्जित घर बर का! मुलगा हुशार. पुण्याला राहून शिकला आणि अमेरिकेत पोचला. आता त्यांना कुणालाच परत यायचं नाहीये. ‘हे’ गेल्यानंतर मलाही अमेरिकेत नेत होता पण मला त्या तुरुंगात अडकण्याची इच्छा नव्हती. हे घर, वाडी आणि थोडी शेतजमीन माझ्या नावावर असल्याने आर्थिक दृष्ट्या मी कुणावर अवलंबून नाही. मी शांतपणे पण ठामपणे मुलाबरोबर कायमचे अमेरिकेला जायला नकार दिला. ‘संध्याकाळ’ आपल्या घरातच घालविलेली बरी. नाही का? “
माझ्याबरोबर दुसऱ्या अशाच काही मैत्रिणींना, शाळा कॉलेजात जाणाऱ्या गरजू मुलींना थोडा विसावा देता येईल, मलाही सोबत होईल अशा विचाराने मी इथे राहिले आहे. तुझ्या रडण्यावरून आणि मुला- सुनेच्या वागण्यावरून असं वाटत आहे की, तुझ्या इच्छेविरुद्ध तुला इथे आणून सोडलं आहे. मोकळेपणाने सांग. आपण यातून तुला आवडेल असा मार्ग नक्की काढू. ”
रेवतीने आश्चर्याने सुधाताईंकडे पाहिलं. खरंच? खरंच असं होईल?
रेवतीच्या डोळ्यातले भाव वाचून सुधाताईच पुढे म्हणाल्या,
“तुझ्या मनासारखे होईल याची मी खात्री देते. अगं, आपण स्त्रियांनीच स्त्रियांची मदत करायची. फक्त तुझ्या मनात काय आहे ते मोकळेपणाने सांग.
रेवतीने ठरविले आता सारे काही या ताईंना स्पष्ट सांगायचे.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. पुष्पा चिंतामन जोशी
कोथरूड, पुणे
मो ९९८७१५१८९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈




