सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆
☆ तिन्हीसांजा – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
(“तुझ्या मनासारखे होईल याची मी खात्री देते. अगं, आपण स्त्रियांनीच स्त्रियांची मदत करायची. फक्त तुझ्या मनात काय आहे ते मोकळेपणाने सांग.”… रेवतीने ठरविले आता सारे काही या ताईंना स्पष्ट सांगायचे.) – इथून पुढे – –
“आमचा अभिजीत खूप हुशार आणि शिस्तीत वाढलेला मुलगा! स्वतःच्या कर्तृत्वाने सीए झाला. अभिजीतची जमेल तशी हौस- मौज आम्ही केली पण भास्करने कुठल्याच बाबतीत हात सैल सोडला नाही. बहिणींची लग्न, आई-वडिलांची जबाबदारी सांभाळून त्याने चाळीतल्या दोन खोल्यातून आम्हाला हाउसिंग कॉलनीत आणलं. तीन खोल्यांची छोटीशी पण स्वतंत्र आणि स्वतःची जागा. जागेसाठी घेतलेलं लोन हळूहळू फिटत होतं. भास्करचे मित्रच होते आजूबाजूला. आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहणारे नरेंद्र आणि सुलभा ह्यांची आणि आमची दोघांची खूप घट्ट मैत्री!
अनघाचे वडील एक नावाजलेले सॉलिसिटर आहेत. त्यांची स्वतःची फर्म आहे. तिथेच काम करणाऱ्या अभिजीतच्या दिसण्या- वागण्यावर, कर्तृत्वावर खुश होऊन अनघाच्या श्रीमंत वडिलांनी घरजावई म्हणून त्याला बरोबर हेरला. आपली एकुलती एक, जेमतेम पदवीधर झालेली, श्रीमंतीचा गर्व असलेली अहंमन्य मुलगी अनघा, चतुराईने अभिजीतच्या गळ्यात अडकवली.
भास्करला हे लग्न एवढं पसंत नव्हतं. अभिजीत त्या श्रीमंती थाटाला, उत्तराच्या नखऱ्यांना भुलला. अगदी खरं सांगायचं तर मलाही त्या श्रीमंतीचं थोडं आकर्षण वाटलं होतं.
ती दोघं आणि आम्ही कधीही एकत्र राहिलोच नाही. अभिजीतही हळूहळू तिकडचा होऊन गेला. सुखोपभोगाच्या सवयी चटकन लागतात. दोन्ही नातवंडांच्या बारशाच्या वेळी मीच तिथे पाहुण्यासारखी जाऊन आले. भास्करने मात्र त्या घराचा उंबरठा कधीच ओलांडला नाही.
दोन-तीन महिन्यांपूर्वी भास्करने एका दुपारी मला जवळ बसवून एक महत्त्वाची फाइल दाखविली. साऱ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या, विम्याच्या पॉलिसी, आमच्या घराचे कागदपत्र सारं व्यवस्थित दाखवून ती फाईल कुठे ठेवली आहे तेही दाखवले. या सगळ्याच्या झेरॉक्सची फाईल नरेंद्रकडे दिली आहे असेही सांगितले.
“आत्ता कशाला हे सगळे सांगत आहात मला? “
“अगं, तुला आपल्या आर्थिक व्यवहाराची सगळी नीट माहिती पाहिजे. तुझ्या एकटीसाठी पुरेल अशी सगळी व्यवस्था मी केलेली आहे. माझ्यानंतर हे घर तुझ्याच नावावर होईल. घराच्या कागदपत्रांवर दुसरं नाव कुणाचं घालायचं हे तू ठरव. नीट विचार करून सगळे निर्णय शांत डोक्याने घ्यायचे बर का! ‘
भास्करने जणू काही सारं आधीच समजल्यासारखं सगळी निरवानिरव करून ठेवली होती. भास्करला मी काटकसरी समजत होते. काही वेळेला माझ्या साध्या हौशी पुरवल्या गेल्या नाहीत म्हणून रुसत होते. पण भास्करने मुला- सुनेला बरोबर ओळखले होते. भास्करच्या दूरदृष्टीमुळे मी आज आर्थिक दृष्टया कुणावर अवलंबून नाही. जमेल तेवढे दिवस मला स्वतंत्र आणि मनासारखं जगायचं आहे. भास्कर एकाएकी गेला आणि आणि ध्यानी- मनी नसताना मुलावर विश्वास ठेवून अकस्मात मी इथे येऊन पोहोचले आहे. “
” रेवती, तू अजून सर्व दृष्टीने सक्षम आहेस. तुला जमेल तेवढे दिवस स्वतंत्रपणे राहण्याचा आनंद जरूर घे.
तुला घरी परत जायचं आहे एवढंच ना. करूया तशी व्यवस्था आणि इथेही तुझं एक हक्काचं माहेर आहे हेही लक्षात ठेव. “
कृतज्ञतेने रेवतीने सुधाताईंच्या खांद्यावर मान ठेवली आणि आनंदाश्रूंना वाट करून दिली.
जाताना धुरकटलेला वाटलेला कशेडीचा घाट आता परतीच्या प्रवासात रेवतीला हिरवळ अंगावर लेऊन प्रसन्नपणे हसत असलेला वाटला.
जायच्या आदल्या रात्री रेवतीने संधी साधून सुलभाला हळूच फोन केला होता आणि उद्या अभिजीतबरोबर बहुतेक त्याच्या घरी जात आहे असं सांगितलं होतं. तुझ्याकडे दिलेली किल्ली माझ्याशिवाय कुणाला देऊ नको असेही सांगायला ती विसरली नव्हती.
बेल वाजली आणि दारात रेवती असल्याचे पाहून सुलभाला आश्चर्याचा धक्काच बसला. बरोबर एक पाहुणीही दिसत होती.
“चहा आणते ग. हात पाय धुऊन घ्या”
“भाऊजींनाही घेऊन ये बरोबर. थोडं बोलायचं आहे. “
रेवतीने सांगितलेली सगळी हकीगत ऐकून नरेंद्र आणि सुलभा आवाक् झाले. अभिजीतला आईची जबाबदारी तर नकोच होती आणि संपत्तीत लोळणाऱ्या अनघाला आणि अभिजीतलासुद्धा आईच्या जागेचा, पैशाअडक्याचा लोभ सुटला होता. बायकोच्या नादाने बहकलेल्या अभिजीतचा नरेंद्रला खूपच राग आला होता. सुलभा म्हणाली, “पण एवढं तरी नशीब म्हणायचं की, त्यांनी जिथे तुला पोहोचवलं त्या सुधाताई अगदी समंजस निघाल्या. “
महाबळेश्वरला आठ दिवस शाही विश्रांती घेऊन परतलेल्या अभिजीत- अनघाने दोन दिवसांनी आई राहत असलेल्या कॉलनीत मोर्चा वळवला. खिशातून किल्ली काढून दार उघडायचा प्रयत्न करीत असलेल्या अभिजीतच्या लक्षात आलं की दाराचं कुलूप बदललेलं आहे. आतून हसण्या बोलण्याचे, कपबशांचे आवाज येत आहेत. आश्चर्याने आणि नाईलाजाने त्याने बेल वाजवली आणि समोरचे दृश्य बघून दोघेही थिजून गेले.
आईच्या सहासात मैत्रिणी गोळा झाल्या होत्या. आई कुणाला विणकाम शिकवत होती तर कोणाला भरतकाम.
रेवती त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून निर्भयपणे म्हणाली,
अरे त्या सुधाताई खूप चांगल्या आहेत बरं का! मी कुणालाच न सांगता, नातेवाईकांचा मैत्रिणींचा निरोप न घेताच इथे आणून सोडले गेले आहे हे त्यांना कळल्यावर त्यांनी मला लगेच घरी जाण्याची मोकळीक दिली. तू तुझ्या घरात आनंदाने राहा आणि कधी वाटलं तर इथे हक्काने ये असंही सांगितलं. तू त्यांना दिलेले पैसेही त्या परत करणार आहेत.
तेवढ्यात रेवतीची गाण्याची वही हातात असलेली नीला म्हणाली, “रेवती, तुझ्या वहीतलं हे नवीन गाणं किती छान आहे…
या सखयांनो परत फिरा ग
घराकडे अपुल्या
तिन्हीसांजाऽऽ करा सुखाच्या.
रेवतीच्या मनात येत होतं, नरेंद्र भाऊजींनी आपल्याला दाराचं कुलुप लगेच बदलण्याचा किती योग्य सल्ला दिला होता.
“निघतो आम्ही. ” रागारागाने अभिजीत जाण्यासाठी वळत म्हणाला तेव्हा त्याच्या खिशातून अनघाच्या सल्ल्याने, दरवाजाचे बदलायला म्हणून आणलेले कुलूप त्याला बोचकारत होते.
– समाप्त –
© सौ. पुष्पा चिंतामन जोशी
कोथरूड, पुणे
मो ९९८७१५१८९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈






सावधपणाचा सल्ला देणारी छान कथा