सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
दुपार कलत आली तशी त्या गावच्या जत्रेसाठी जमलेली गर्दी पांगायला लागली… ‘किसनपूर’ म्हणजे कृष्णपूर हे त्या पंचक्रोशीतलं त्यातल्या त्यात मोठं गाव. या गावात मुरलीधराचं एक बरंच जुनं आणि मोठं देऊळ होतं. दरवर्षी तिथे गोकुळ अष्टमीचा उत्सव दणक्यात साजरा केला जायचा. आणि त्यावेळी भरणाऱ्या जत्रेसाठी आजूबाजूच्या गावातले लोक आवर्जून यायचे. खूप गर्दी जमायची… जी दरवर्षी वाढतच होती. त्या देवळात संध्याकाळी कीर्तन होणे हा उत्सवाचा अविभाज्य भाग झाला होता. नारायणबुवा नावाचे एक प्रतिष्ठित कीर्तनकार जणू यासाठीच बऱ्याच वर्षांपासून नेमलेलेच होते. गावात जागोजागी तसे बोर्डही टांगले जायचे.
यावर्षीही सगळं काही रीतीनुसार सुरु होतं. गर्दी कमी झाल्यावर आत्ता कुठे लोकांचं त्या कीर्तनाच्या बोर्डाकडे लक्ष जायला लागलं…आणि लोक आश्चर्यचकित होऊ लागले. यंदा नारायणबुवांच्या जागी हे कुठलं नाव आहे… ‘राजेंद्रबुवा? ’.. आणि शेजारी एका तरण्याबांड कीर्तनकाराचा फोटो? कधी नव्हे ते कीर्तन ऐकण्याची उत्सुकता वाढल्याचं जाणवायला लागलं होतं.
देवळाच्या प्रशस्त सभामंडपाकडे आता श्रोत्यांची पावलं वळू लागली. चक्क गर्दी जाणवायला लागली. हमखास येणारी वृध्द माणसं तर होतीच, पण यंदा चक्क काही तरुण मंडळी कीर्तन ऐकायला (की राजेंद्रबुवांना बघायला?) तिथे आली होती.
ठरल्यावेळी साथीदार आले आणि राजेंद्रबुवा कीर्तनकाराच्या टिपिकल वेषात तिथे दाखल झाले… ‘‘आयला हा बुबा टी शर्ट-जीन्स मध्ये काय फाकडू दिसेल राव ”… गण्या न राहवून बोललाच, पण मित्राने चिमटा काढला आणि गण्या गप्प बसला.
‘‘जय जय राम कृष्ण हरी…” गाभाऱ्यातल्या मुरलीधराला आणि श्रोत्यांना नमस्कार करुन बुवांनी जयघोष सुरु केला… ठेका सुरू झाला… पुढच्या रांगेतली मुंडासी डोलायला लागली… पण १० मिनिटे झाली तरी बुवांचा जयघोष काही थांबेनाच… गण्या आणि कंपनी वैतागली आणि त्यांनी बुवांना खूण केली. बुवाही नाही म्हटलं तरी घाबरलेलेच होते… ‘कीर्तन शिकलो खरा आजोबांच्या हट्टापायी… पण आता एवढ्या लोकांसमोर…’ चतुर गण्याने त्यांची अवस्था नेमकी टिपली आणि ‘हं… करा सुरू…’ असं खुणेनेच सांगितलं… त्यांना त्यांच्या गुरुने परवानगी दिल्याच्या आविर्भावात..
‘‘तर मंडळी आज मी तुम्हाला एक वेगळीच कथा सांगणार आहे… ऐका हं… एक आटपाट नगर होतं…”..
.. ‘आता यात काय वेगळं आहे? ’ गण्याचा चेहेराच बोलला.
‘‘एव्हाना त्या नगराचं एक राज्य झालं होतं…” राजेंद्रबुवाही गण्याच्याच वयाचे… ‘‘त्या राज्याचा राजा ‘आदर्श’ म्हणावा असाच… प्रजेसाठी जणू देवच. राणी सरकारही तशाच… प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या… कनवाळू उदार… त्यांना एक मुलगा होता… देखणा… उमदा… पण खुशालचेंडू म्हणावा असा… ‘जय जय रामकृष्ण हरी’ …” पुन्हा २ मिनिटं जयघोष…
‘‘मग पुढे…? ” गण्याला काही गप्प बसवत नव्हतं.
‘‘तर मंडळी असं सगळं उत्तम चाललेलं होतं ते राज्य… दिवसागणिक लौकिक वाढत होता. आणि अचानक एक दिवस… ” बुवांच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बदलले… अभिनय हा त्यांच्या पेशाचा एक अविभाज्य भाग होता ना… ‘‘मंडळी आणि अचानक एक दिवस अतिशय दु:खद बातमी हा हा म्हणता राज्यभर पसरली… राणीसाहेबांचे आकस्मिक देहावसान झाल्याची बातमी… आणि संपूर्ण राज्यावर दु:खाचा जणू डोंगरच कोसळला… ‘जय जय रामकृष्ण हरी’ ”
…. ‘हां इथे हे ठीक आहे’… गण्याने मान हलवली. श्रोतेही जरासे हळहळले…. ‘ पण आता पुढे बोला की बुवा…’.. गण्याने बुवांना खुणावलं. बुवांनाही एव्हाना सावरायला वेळ मिळाला होता…
‘‘त्यावेळी सगळ्यांवर काय परिस्थिती ओढवली होती ते काय सांगावं महाराजा … सगळं राज्य जणू आईविना पोरकं झालं होतं”… या वाक्याने मात्र गण्या जरा दुखावला होता… गप्प बसला… ‘‘ अहो राजेसाहेब विमनस्क अवस्थेत तास न् तास शून्यात बघत बसत होते. पण असं किती दिवस चालणार हो… राज्यकारभाराचा गाडा चालू ठेवायलाच हवा हे त्यांनाही कळत होतं. त्यांनी स्वत:ला कसंबसं सावरलं. राजपुत्रही एव्हाना सावरले होते. हळूहळू सगळं काही पूर्ववत झालं… ‘जय जय रामकृष्ण हरी’…” पुन्हा ठेका धरला गेला. बुवा नव्या कोऱ्या उपरण्याने घाम पुसत होते… गण्या उठण्याच्या बेतात होता… बुवांनी त्याला खुणेनेच बसायला सांगितलं आणि पुन्हा कथा सांगायला सुरूवात केली… ‘‘अहो काळ काही थांबतो का कुणासाठी? सांगा बरं…” बऱ्याच माना हलल्या… ‘‘आता राज्याला साम्राज्ञी हवीच, म्हणून राजेसाहेबांनी इतरांच्या आग्रहाखातर पुनर्विवाह करायला संमती दर्शविली… आणि वधू-संशोधन सुरू झाले…”.. ’पुन्हा जय जय राम कृष्ण हरी…’
पुढची कथा बुवांना आठवत नाहीये हे चाणाक्ष गण्याच्या लक्षात आलं… तो घाईने उठून बुवांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला… ‘‘तुम्ही दमलेले दिसता बुवा… साहजिकच आहे म्हणा… इतका वेळ सारखं बोलल्यावर दम लागणारच हो. मी तुम्हाला मदत करू का? म्हणजे कथा मी सांगतो, तुम्ही मधून मधून ‘राम कृष्ण हरी’ म्हणा…” आणि बुवांनी काही बोलायच्या आत गण्या बोलायला लागला…..
‘‘तर मंडळी आता तुम्हीच सांगा… आता राजेसाहेब वयाने इतके मोठे… म्हणजे राजपुत्र खरं तर लग्नाच्या वयाचा… मग त्यांच्या वयाला साजेशी बायको कशी मिळणार नाही का त्यांना? … म्हणजे तो काळ खूप वेगळा होता ना हो? म्हणून मग त्यांच्या आप्तांनी आणि मंत्रीमंडळानेही पुढाकार घेतला. राजघराण्यातली त्या वयाची वधू मिळणं शक्यच नव्हतं आणि एखादी तरुण राजकुमारी या म्हाताऱ्याशी…” गण्याने जीभ चावली… ‘‘अशा इतक्या वयस्कर राजेसाहेबांशी लग्न करायला कशी तयार होणार ना? आणि मी म्हणतो का म्हणून तयार व्हावं तिने? ” … बुवांनी गण्याला चिमटा काढला आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’.. मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. गण्याने स्वत:चा आवेग कसाबसा थोपवला आणि तो पुढे बोलायला लागला…
‘‘मग जवळच्याच गावातल्या एका गरीब माणसाची मुलगी सापडली. चांगली तरतरीत, नाकी डोळी नीटस होती, आणि हो, थोडीफार शिकलेलीही होती. नीट टापटीप रहाण्याची आवड उपजतच असावी हे लक्षात येत होतं. आणि बोलायलाही चटपटीत होती. भेटायला आलेल्या बड्या लोकांशी न घाबरता डोळ्याला डोळे भिडवून बोलत होती. अखेर वडलांना कर्जातून मुक्त करायचं या कर्तव्यभावनेने नाईलाजानेच लग्नाला होकार दिला त्या बिचारीने ”… गण्याचा घाम पुसून होईपर्यंत बुवा ‘रामकृष्ण हरी’ म्हणत राहिले. ‘आता पुढे मी सांगतो’, ते गण्याला म्हणाले, पण गण्यामधे उफाळून आलेला कथाकार काही थांबायला तयार नव्हता…
‘‘तर मंडळी, अशा तऱ्हेने राजेसाहेबांसाठी दुसरी वधू मिळाली. लग्नाचा दिवस ठरला… भव्य शामियाना… सुंदर सजावट… मोठा रंगमंच…” (‘रंगमंच? ’… श्रोत्यांमध्ये कुजबूज झाली…) पण गण्या थांबला नाही… ‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.
– क्रमशः भाग पहिला
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




