डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

परवा मंगेशचं लग्न झालं. सोन्याच्या पावलांनी देविका घरी आली आणि माणिकला धन्य धन्य झालं.

एकुलता एक मुलगा. चांगला शिकलेला आणि खूप मोठ्या पगाराची नोकरी. पण म्हणतात तसे इतके वर्षं योगच नव्हते लग्नाचे.

किती विवाह मंडळात नावे घातली ओळखीच्या लोकांना सांगून ठेवलं पण लग्न काही जमेना.

माणिकचे यजमान साध्याच नोकरीत आणि यथातथाच नोकरी.

बिचाऱ्या माणिकनं नोकरी करून संसार पुढे रेटला.

असाही तिला काही फार पगार नव्हता पण तरी हातभार लागायचा तेवढाच.

माणिक जितकी उत्साही, आयुष्यात रस घेणारी, समरसून जगणारी तितकेच वामनराव आळशी, सुस्त आणि निरुत्साही.

रोज ऑफिस कसेबसे करून घरी आले की येऊन पेपर वाचत बसायचे.

कोणी मित्र नाहीत की कसला छंद नाही. छंद एकच. सतत चांगलंचुंगलं खायचं. बाहेरच्या आराम खुर्चीवर बसून माणिक स्वयंपाकघरात काय करते त्यावर लक्ष ठेवायचं. आणि खेकसायचं तिच्यावर.

बिचारी माणिक सहन करायची सगळं. तिला धड माहेरचा आधार नाही, आईवडील भाऊ बहीण कोणी नाही. ही अनाथ मुलगी काकांच्या घरी वाढली. काकाने हा बंगला आणि हा नोकरीचा मुलगा बघून करून दिलं माणिकचं लग्न.

कुलकर्णींनी ही दिसायला चांगली मुलगी लग्नाचा सगळा खर्च आपणच करून घरात आणली,

म्हणून माणिक आधीच दबलेली होती. त्यात अतिशय माणूसघाणे आणि विक्षिप्त वामनराव पदरी पडले.

तरी हसतमुख माणिकने लगेचच कॉलनीतल्या मैत्रिणी जोडल्या.

हसून खेळून त्यांच्याबरोबर आयुष्य आनंदात घालवू लागली माणिक.

 

यथावकाश माणिकला दिवस गेले आणि छानसा मुलगा झाला.

माणिकने कामावरून रजा घेतली.

माणिकच्या सासूबाई चांगल्या होत्या. आपला कर्तृत्वशून्य मुलगा त्यांना चांगलाच माहीत होता. त्या म्हणाल्या”मी संभाळीन ग लेकाला तुझ्या. जा ग तू रजा संपली की नोकरीला. हा वामन्या काही तुला साथ देणार नाही बघ. तू नोकरी सोडू नको माणिक. आणखी चांगली नोकरी शोधत रहा.”

माणिकने लहानमोठे कोर्सेस केले आणि एका ऑफिसमध्ये तिला खरंच चांगली नोकरी मिळून गेली.

शहाणी माणिक एकाच मुलावर थांबली. तिच्या सासूबाईंना तिचं फार कौतुक होतं. पगार वाढल्यावर माणिक सासूबाईंना हौसेने पॉकेटमनी देई आणिम्हणे, सासूबाई घ्या हो हे पैसे. करा थोडी मजा. ”

माणिकचा मुलगा शाळेत चांगली प्रगति करत होता.

आपली आई आणि आजी त्याचे सर्वस्व होते. बाबांपासून तो लांबच असे. वामनरावांशी त्याचे सूर फारसे जुळले नाहीत. त्यांनाही मंगेशचं कौतुक नव्हतं. समजच कमी होती त्यांना जरा.

मंगेश शाळा कॉलेजमध्ये चांगले यश मिळवत पुढे गेला. त्याची सगळी फी माणिकने भरली.

ठराविक रक्कम हातात ठेवली की वामनराव वर एक पैसा देत नसत.

मग माणिक कुठून पैसे आणते, काय करते याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसे.

मंगेश कॉलेजला गेलाआणि थोडे कमी मार्क पडले त्याला बारावीला.

गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणेआता अशक्य होते.

माणिकने आणि मंगेशच्या आजीने त्याला धीर दिला. दोघीनी आपलं सोनं विकायचं ठरवलं आणि मंगेशची सोय केली.

मंगेशच्या डोळ्यात पाणी आलं.

आई आजी, तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही ग. तो गहिवरून म्हणाला.

आजी म्हणाली “माझं सोड मंगेशा. पण या आईला कधी विसरू नको रे बाबा. फार सोसलंय बर पोरीने. ”आजी डोळे पुसत म्हणाली. “

नाही ग आजी. मीआईला कधीतरी अंतर देईन का? ”मंगेश गहिवरून म्हणाला.

मंगेशने मग मात्र मागे वळून बघितलं नाही. , खूप हुशार नसला तरी कष्टाळू होता मंगेश. अहोरात्र मेहनत करत तो चांगले मार्क्स मिळवत पास झाला.

मंगेशला एका कंपनीत चांगली नोकरी लागली. त्यामानाने बरा पगार होता मंगेशला.

मध्यमवर्गात वाढलेल्या आणि कमी अपेक्षा असलेल्या त्या कुटुंबाला तो पगारही खूप मोठाच वाटला.

दरम्यान अगदी छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन मंगेशची आजी अचानक गेली. आता मात्र मंगेशचं लग्न व्हायला हवं असं माणिकला वाटायला लागलं.

तिशीजवळ आलेला मंगेश लहान नव्हता आता लग्नासाठी.

खूप खूप मुली बघितल्या माणिकने. पण मुलींच्या अपेक्षाच फार. शहरातल्या मुली तर इतक्या चढलेल्या की मंगेशचा पगार बघून त्या नकारच देत.

माणिक अगदी हताश झाली. तिचा मुली बघायचा उत्साह अगदी कमीच झाला. पण योग असावा तसे हे नागपूरजवळच्या मुलीचे स्थळ सांगून आले.

मुलगी एमबीए,, दिसायला बरी आणि मुख्य म्हणजे पुण्यात बदली मिळण्यासारखी होती. दिसायला डावीच होती देविका जोशी. पण सगळा विचार करून मंगेशने आणि माणिकने होकार दिला.

जोशींची परिस्थिती बेताचीच होती.

ठराविक रक्कम आम्ही तुमच्या हातात ठेवू. बाकी काही करू शकणार नाही. जोशी म्हणाले.

 

माणिक नाराज झाली पण मंगेश म्हणाला “असू दे ग आई. ती मिळवती मुलगी आहे. आपल्याच घरी येणार आहे ना. करू आपण जमेल तसा खर्च. ”

माणिकने पहिलाच मुलगा म्हणून खूप खर्च केला. आपल्या फंडातले खूप पैसे खर्च केले, सुनेला दागिने केले. खूप लोकांना हौसेने बोलावून बराच फंड रिकामा केला. मैत्रिणी सावध करत होत्या तरी त्यांचे न ऐकता.

नीला म्हणत होतीच. ”माणिक, अग काय हा खर्च? जरा विचार कर. असा तुझा घामाचा पैसा उधळू नकोस. एकुलता एक मुलगा असला म्हणून काय झालं? ”पण माणिकने ऐकलं नाही.

सून घरात आली. माणिकला सून नवीन असताना कौतुक वाटलं म्हणून तिला रोज हातात चहा, नास्ता, अगदी कौतुकाने रोज काय करू विचारून करी माणिक.

उन्हे डोक्यावर आली तरी यांची बेडरूम बंदच. , माणिकच्या घराचे सगळे रुटीन विस्कळित झालं.

एक दिवस वामनराव फिरून आले आणि दारातच पडले. त्यांना उठताच येईना. धावाधाव करून त्यांना मोठ्या हॉस्पिटल मध्ये अँडमिट केलं. त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया ताबडतोब करायला हवी असं सर्जनने सांगितलं.

खर्च सांगितला पाच लाख रुपये.

माणिकचा पाऊण पैसा तर मंगेशच्या लग्नातच आणि घराच्या रिनोव्हेशन मधेच गेला होता.

मंगेशने न बोलता जमवाजमव करून सगळं बिल भरलं आणि वामनराव घरी आले. घरी आले ते उठूच शकले नाहीत. त्यांच्या पायातली ताकदच गेली होती.

डॉक्टरांनी सांगितले, मणके झिजले आहेत आणि आता त्या नर्व्हज् दाबल्या गेल्यामुळे हे आता चालू शकणार नाहीत.

माणिकला अतिशय वाईट वाटलं. तिने खूप प्रयत्न करून बघितले. आयुर्वेदिक होमिओपॅथिक सगळ्या चिकित्सा करून झाल्या पण वामनरावाना कधीच उभं रहाता आलं नाही.

मग आलं डायपर आणि सेवेसाठी बायका ठेवणं. त्यांचे भक्कम पगार आणि खर्च माणिकच्या मागे लागले. खर्चाने पिचून गेली माणिक.

मुलगा सून ठराविक रक्कम हातात ठेवत. बाकीचा डोईजड खर्च माणिक कुठून करणार?

एक दिवस माणिक मंगेशला म्हणाली”अरे मंगेश, जरा जास्त पैसे देत जा तू. निदान तुमच्या दोघांचे जेवणखाण डबे वीजबिल हे नको का तुम्ही द्यायला? किराणा दुप्पट लागतो हल्ली. मला झेपत नाही रे हा खर्च. ”

लगेच देविका म्हणाली, हे बघा आई, बाबांचे पाच लाख बिल मंगेशनेच भरलं ना?

आणि आमच्या लग्नात मंगेशने नव्हता तुम्हाला खर्च करायला सांगितला. सगळा फंड उधळून टाकलात. आम्हाला नाही जमणार जास्त पैसे द्यायला. ”न बोलता मंगेश आणि देविका निघून गेले. माणिक हताश झाली. तिचे आणि वामनरावांचे तुटपुंजे पेन्शन तिला पुरेंना.

अशी चार वर्षे गेली. माणिक चार वर्षात काळज्या कष्टानं म्हातारी झाली. वाकून गेली पाठीत माणिक.

मैत्रिणी येत धीर देत. तिला बदल म्हणून कार मधून फिरायला नेत. हळहळून म्हणत, बघ माणिक.

आम्ही सांगत होतो ते ऐकलं नाहीस. किती उधळपट्टी केलीस लग्नात. सगळा फंड घालवलास वाया. आहे का त्या सुनेला मुलाला त्याचं काही? ”

पाच वर्षे अशी अंथरुणात काढून एका रात्री वामनराव झोपेतच गेले.

सुटले असेच भाव होते सगळ्यांच्या तोंडावर. माणिक आता रिकामी झाली. चोवीस तास वामनरावांच्या सेवेत गुरफटलेली माणिक आता एकदमच रिक्त झाली. काहीच काम राहिलं नाही तिला.

पडून असलेल्या वामनरावांशी तिला सोबत होती. ती त्यांना पुस्तके वाचून दाखवायची. दोघेजण पत्ते खेळायचे. या आजारपणामुळेदोघेही जवळ आले होते एकमेकांच्या.

गप्पा मारत, मागच्या आठवणी काढत ते त्यात रमून जात.

वामनरावांनी तिची अनेकवेळा क्षमा मागितली. मी तुला समजू शकलो नाही माणिक. असं अनेकवेळा ते म्हणाले.

“माणिक, हा बंगला तुझ्या नावावर आहे. तू माझ्यानंतर इथेच रहा. कुठे सह्या करू नको आणि मंगेशला अजिबात देऊ नको घर. आपण मृत्युपत्र करु आणि मग आपल्या पश्चात देऊ त्यालाच. ”त्यांनी माणिकला सांगून ठेवलं. आज त्यांची आठवण येऊन माणिकला अगदी असहाय वाटलं. कशी का होईना, त्यांची सोबत होती तिला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments