डाॅ. मधुवंती कुलकर्णी
जीवनरंग
☆ चांगभलं… – भाग – ३ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆
☆
(“बाबा पारायन पूर्न केलं ते बरं झालं. आबास्नी सर्वांनी आधार दिला. सर्वांचे आभार मानतो. आपन असंच पारायन दरवर्षी करू. आई निनाईनं मला वाचिवलं. मला लागलं म्हनून आई कोपली म्हनू नगासा. यांतून मार्ग निगंल. मंदिराचं बांदकाम हुईल आसं माझं मन म्हनतंय”)
इथून पुढे – – –
तिथून फुडं दरवर्षी संत बहिणाबाई पोथी पारायन सुरू झालं. नंतर मातुर कुटलीबी घटना घडली नाय. त्यामुळं हळूहळू गावाचा ईस्वास पारायनावर बसला आनि जोमाने उत्सवाप्रमानं अत्यंत उत्साहात पारायन सुरू राहिलं. चार वर्षं झाली. यंदाचं पाचवं वरीस. पारायन सुरू झालं. दोन दिस झालं आनि अचानक कोल्हापूरहून मोतीलाल शेटजी गाडीतून गावात आले. त्यांचं चार पिढ्यांपूर्वी गावाशी नातं हुतं. गावात दुकान हुतं. पन पोरं बाहेर पडल्यामुळे दुकान तेंव्हाच बंद पडलं हुतं. रहातं घर पूर्वीच विकलं हुतं. दोन पिढ्या कोल्हापुरात राहून गडगंज झाल्या हुत्यात्या. सगळं येवस्थित हुतं. त्यास्नी वंशाला दिवा हवा म्हनून कुनीतरी सांगितलं, गावाकडं दान धर्म करायला होवा. त्यांना गावाचा ठावठिकाना लागला आनि त्यांनी ईचार केला की, आपलं पूर्वज जिथं रहात हुतं ते गाव तर पाहून यिऊ. तिथंच काही मदत करता आली तर पूर्वजांची आठवन म्हनून करू. मंडप पाहून शेटजींनी कार्यक्रमाची समदी इचारपूस केली. आता काय चाललंय इचारलं. पाटील, पंच, बाबा सर्वांच्या गाठी घेतल्या आनि समद्या गावकर्ऱ्यांफुडं जाहीर केलं की, मंदिर बांदायला सुरुवात करावी. मी लागल इतका दगड कोल्हापूरहून आननार हाय आनि मंदिराला दान करनार हाय.
बाबांना लई आनंद झाला. देवीनंच सुरूवात करून दिली. आता मंदिर होनार टप्प्याटप्प्यानं. फुडच्या वर्षात बाकी देनग्या गोळा केल्या. लाखभर रूपय जमा झालं. मंदिराबरोबरच समोर नंदी, तुळस सर्व काम झालं. रंगकाम झालं. मंदिर दिमाखात हुबं राहिलं. एक दिस कळस बसवावा आनि होमाचा कार्यक्रम करावा असं ग्रामपंचायत मिटींगमधे ठरलं. त्याप्रमानं बाबांनी पंढरपुरातून संन्यासी धुंडामहाराजांना निमंत्रित केलं. त्यांच्या हस्ते कळस बसवावा असं ठरलं. सांगलीतून कळस आनला. एका शुभ दिशी धुंडामहाराज आले. पालकी प्रदक्षणा झाली. पाच जोडप्यांनी मिळून होम केला. देवीची पूजा केली. पंचामृत स्नान झालं. देवी सजली. तेजस्वी दिसायला लागली. महाराजांनी कळसाचं पूजन केलं आणि मंदिरावर चढून कळस बसवला. खाली उतरले. सर्व विधी यथासांग झाले हुते. आता महाराजांनी प्रवचनाला सुरूवात केली.
“लोकहो, आपन सर्वांनी मंदिर बांदायचा पवित्र विचार केला. त्याला देविनं दुजोरा दिला. चार वर्षं आपल्याकडून सेवा करवून घेतली. आपल्याला देविनं खूप अनुभव दिले. परीक्षा पन बघितली.
सर्जाला इजा बी झाली. बरा बी झाला. हीच मोठी परीक्षा हुती. तिथं तुमी थांबला असता. पारायन थांबवलं असतं तर तुमी नापास झाला असता देविच्या परीक्षेत पन तुम्ही धीर धरला. देवीवर ईस्वास ठिवला. यालाच “श्रद्धा” म्हनतात.
ती तुमी दाखिवली. देविने ती पाह्यली. देवी प्रसन्न झाली. तुमचे मनापासून अभिनंदन करतो. ही श्रद्धा पुना कदीबी डगमगू दिऊ नका. म्हनजे प्रत्येकाचे जन्माला येऊन सार्थक झाले म्हनता यिल. ”
“आता महत्त्वाचा ईषय हाय. आपल्या गावातील भुलाबाईचा. ती हाय का इथं? ”असे म्हनून महाराज लोकांकडे पहायला लागले. ती लांब हुबी राह्यली हुती. कुनीतरी तिला बोलावलं आणि फुडं आनलं. महाराज म्हणाले, ”भुला, ये बाई फुडं. आता मला सांग, तुझ्या अंगात येतं म्हन्जे काय हुतं ते सांगता यील का? ”
भुला म्हनली, “महाराज ढोलकी वाजली की काय तरी हुतं. मेंदूला बाकी कायबी कळत न्हाय. निस्त कामातनं गेल्यावानी हुतं. कशाचीबी सूद रहात न्हाय. म्यां येकदमच नाचायला लागते. मला काय बी कळत नाय. बाया ईचारतात एकेक प्रश्न पन म्यां मला वाटतंय ते सांगते. बाया माझी वटी भरत्यात. साडी, कापडं जमा हुत्यात. पैसं देत्यात. माजा प्रपंच चालतो. मला महत्त्व देत्यात. मी कुटंबी चोरी केली नाय बगा. आईची सेवा करते”
महाराज म्हणाले, “भुला, देवी दिसती व्हय तुला? ” “नाय बा”
“मंग तू मंदिर बांदू नका हे कसं सांगितलंस? ”
“आवं, पूर्वापार अनुभव हाय. कुनाकुनाच्या सपनात देवी ईती. मंदिर बांदन्यापेक्षा शेवा जास्त झाली तर पुन्याईपन वाढल आनि देविच्या वाटला बी नगं, श्रापबी नगं म्हनून म्या तसं सांगितलं. ”
“बरं, या दोन दिसांत तुझ्या अंगात का आलं नाही? ”
“आवं, ढोलकी कुटं वाजली? ”
असं म्हनताच समदीकडं एकच हशा पिकला. भुलाबाईला कळंना का हसत्यात. ती कावरीबावरी झाली. तिला सन्मानाने व्यासपीटावर आनलं.
महाराज म्हनाले, ” पाटील आणि पंचहो, आपल्या गावातील मानसांच्या ईकासातही आपन लक्ष घालायला हवं. निसत्या इमारती, मंदिर बांदून ईकास कसा हुनार? लोकहो, अंगात का येतं तर ज्या मानसाकडं कुनी लक्ष देत नाय, ज्या मानसाला जगन्याचं साधन नसतं, त्याला वाटतं का नाही की माझ्याकडं लक्ष द्यावं, मला जगायला साधन हवं. त्याची काय चूक? त्याच्या मेंदूत चलबिचल हुते. मानसिकता बिगडते. आनि कायतरी वाजायला लागलं की ही मानसं घुमायला लागतात आनि विच्छा पूर्न करून घेतात. ”
पाटलानं हात जोडलं, “चुकलं महाराज. आता काय करू आमी? तुमीच सांगा”
“आता असं करा, या भुलाच्या जगन्यासाठी समद्या गोष्टींची येवस्ता करा. आता पहिली गोष्ट, सर्वांनी भुलाबाई म्हन्जे देविच जनू, या देविच्या घराची डागडुजी करा. तिला झेपेल ते काम द्या. ग्रामसेविका, शिपाई असं काय बी करा. ती जगेल आनि नीट राहिल. महिला सक्षम करा म्हनत्यात म्हन्जे आनखी तरी काय? ”
भुलाबाईनं अश्रूंचा अभिषेक महाराजांच्या पायावर घातला. तिला साडी चोळी करून सन्मानाने घरी पाटविले.
या गोष्टीला एक वरीस झालं. धुंडामहाराज पुन्यांदा बघायला आले आणि पारायनालाबी. त्यावेळी भुलाबाई सर्वांत फुडं वाचायला बसली हुती. नीट नेटकं आवरून चापून चोपून साडी नेसून वाचत हुती. तिच्या घराची डागडुजी बी झाली हुती. दुपारी प्रसाद वाटप झाल्यावर तिनं महाराजांना घरी येन्याची इनती केली. महाराजांनी घर पाहिलं. टुमदार घर पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी भुलाला आशीर्वाद दिला. एक मुलगी सक्षम झाली. संत तुकारामांचा अभंग त्यांच्या मनात रूंजी घालू लागला. “जे कां रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले||तो चि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा||अभंग गुनगुनत समाधानातच ते पंढरपुरला परत आले. अशारितीने देवीच्या निमित्ताने अंधश्रद्धा दूर होन्याबरोबरच गावात महिला सक्षमीकरण सुरू झाले.
– समाप्त –
© डॉ. मधुवती कुलकर्णी
बेंगलोर
दूरध्वनी ९४०३००६४३६.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




